
कुसुमाकर वसंत
“नितरां सृजति इति निसर्गः” अशी निसर्गाची व्याख्या आहे. जो सर्वांगांनी सर्जनशील असतो तो निसर्ग. निसर्गाचे आणि ऋतूंचे एक वेगळेच असे नाते आहे. निसर्गातील बदल म्हणजेच ऋतू. १९५६ साली दुर्गाबाई भागवत यांनी ऋतुचक्र लिहिले आणि अशा प्रकारचे ललितगद्य हे इतिहास घडवणारे ठरले. आजूबाजूच्या निसर्गातील होणारे सूक्ष्म बदल त्यांनी अगदी लीलया टिपले आहेत. पण आपण वर्षानुवर्षे शिकत आलेले मराठी महिन्यांचं आणि ऋतूंचे गणित मात्र जुळत नाही. म्हणजे आपले मराठी महिने चांद्र मासांवर बेतले आहेत तर आपले ऋतू हे सौर कालगणनेशी निगडित आहेत. मराठी महिन्यांची नावे ही पौर्णिमेला चंद्र ज्या नक्षत्रात असतो त्यानुसार असतात (उदा. चित्रा- चैत्र, विशाखा- वैशाख, श्रवण- श्रावण).
यावर्षीच्या (२०२६) कालनिर्णय प्रमाणे १८ फेब्रुवारीला सौर वसंत ऋतू प्रारंभ झाला आहे आणि २० एप्रिल रोजी सौर ग्रीष्म ऋतू प्रारंभ. वसंत संपात हा ह्यावर्षी २१ मार्चला आहे. म्हणजे वसंत संपाताच्या एक महिना आधी आणि एक महिना नंतर हा वसंत ऋतूचा काळ धरावा. श्री द महाजन सरांनी ऋतूंच्या कालनिश्चिततेसाठी एक वेळापत्रक सुचवलं आहे. हे अगदी तंतोतंत जुळत नसलं तरी थोड्याफार फरकाने ते अगदी सुसंगत आहे.
१) वसंत - १६ फेब्रुवारी ते १५ एप्रिल
२) ग्रीष्म - १६ एप्रिल ते १५ जून
३) वर्षा - १६ जून ते १५ ऑगस्ट
४) शरद - १६ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर
५) हेमंत - १६ ऑक्टोबर ते १५ डिसेम्बर
६) शिशिर - १६ डिसेम्बर ते १५ फेब्रुवारी
हे सौर ऋतूंचे गणित नीट कळायला मुळात भारतीय राष्ट्रीय सौर दिनदर्शिकेचा सखोल अभ्यास केला पाहिजे.
राष्ट्रीय दिनदर्शिकेत १२ महिन्यांची नावे चैत्र ते फाल्गुन अशाच क्रमाने आहेत. फक्त मार्गशीर्ष महिन्याचे नाव ‘अग्रहायण’ असे बदलले आहे. राष्ट्रीय दिनदर्शिका ही खगोलशास्त्राशी संबंधित असून, तिची ऋतुचक्राशी उत्तम सांगड घातली आहे. राष्ट्रीय दिनदर्शिकेचा वर्षांचा पहिला दिवस (लीप वर्ष सोडून) २२ मार्च हा असतो. भारतीय चैत्र मासारंभ शके १९४८ (कालनिर्णय पहा). राष्ट्रीय दिनदर्शिकेत वैशाख ते भाद्रपद या सलग पाच महिन्यांचे ३१ दिवस, तर उर्वरित सात महिन्यांचे प्रत्येकी ३० दिवस असतात. सूर्याचा उत्तर गोलार्धातील काळ त्याच्या दक्षिण गोलार्धातील काळापेक्षा थोडा जास्त असल्यामुळे राष्ट्रीय दिनदर्शिकेत वैशाख ते भाद्रपद या कालावधीत येणारे पाच सौर महिने प्रत्येकी ३१ दिवसांचे असून, उरलेल्या ७ महिन्यांचे ३० दिवस असतात. अशा तऱ्हेने ३६५ दिवसांचे वर्ष पूर्ण होते.जे इंग्रजी वर्ष ‘लीप’ असते, त्या वर्षी सुरू होणारे राष्ट्रीय वर्षही ‘लीप वर्ष’ घेतात. अशा ‘लीप’ वर्षांची सुरुवात २२ मार्चला न होता २१ मार्चला करतात. आणि त्या वर्षी चैत्र महिन्याचे ३१ दिवस घेतात. सूर्य उत्तर गोलार्धात प्रवेश करतो, त्या दिवशी १२ तासांचा दिवस आणि १२ तासांची रात्र असते. म्हणून त्या दिवशी नवीन वर्षांची सुरुवात केली जाते. साहजिकच ही तारीख १ चैत्र असते (आपल्या कॅलेंडरप्रमाणे ही तारीख २२/२१ मार्च असते)
यावरून राष्ट्रीय दिनदर्शिकेची वैशिष्टय़े आणि त्याची शास्त्रीय बैठक लक्षात येईल. चैत्र, आषाढ, आश्विन आणि पौष या महिन्यांची सुरुवात सूर्याच्या स्थानांशी निगडित आहे. चैत्र आणि आश्विन महिन्याच्या सुरुवातीला (अनुक्रमे २२ मार्च आणि २३ सप्टेंबर) सूर्य वैषुविक वृत्तावर असतो. यावेळी दिवस आणि रात्र समान असतात. आषाढ महिन्याच्या १ दिनांकापासून (२२ जून) दक्षिणायन सुरू होते, तर पौष महिन्याची म्हणजे उत्तरायणाची सुरुवात असते. (२२ डिसेंबर)
आपल्या इंग्रजी महिन्याची सुरुवात सूर्याच्या अशा विशिष्ट स्थानांशी निगडित नाही. स्वातंत्र्यानंतर ही दिनदर्शिका राष्ट्रीय दिनदर्शिका म्हणून स्वीकारली गेली.
आपला भारत हा खंडप्राय देश असल्यामुळे इथे भौगोलिक बदल आढळतात. प्राचीन संस्कृत साहित्यातील वर्णने ही प्रामुख्याने उत्तरेकडील असल्यामुळे तिथली भौगोलिक परिस्थिती ही दक्षिणेपेक्षा भिन्न आहे. त्यामुळे उत्तरेकडील वृक्ष आपल्यापेक्षा उशीराने बहरतात.
गीतेत श्रीकृष्णांनी "मासानां मार्गशीर्षोऽहम् ऋतूनां कुसुमाकर:" असे वसंत ऋतूसाठी म्हटले आहे. वसंत ऋतूत निसर्गात जशी रंगांची उधळण झालेली असते तशीच रंगांची उधळण करणारे सण देखील याच महिन्यात येतात. आपण भारतीय उत्सवप्रेमी. "उत्सवप्रिया खलु मनुष्या:" असे शाकुंतल नाटकातील एक वचन प्रसिद्ध आहे. वसंत ऋतूत होळी, धूलिवंदन, रंगपंचमी, गुढीपाडवा, रामनवमी, अक्षय तृतीया असे सण येतात.
मात्र वसंत पंचमी हा सण येतो तो माघ शुद्ध पंचमीला, शिशिर ऋतूत. हा दिवस सरस्वतीचा जन्मदिन म्हणून साजरा करतात. अनेक प्रांतात सरस्वती पूजन केले जाते. तिला पिवळी वस्त्रे नेसवून तिच्या पायाशी पुस्तके, पेन, लेखण्या ठेऊन पूजा करतात. तसेच काही ठिकाणी पहिल्यांदा पाटीपूजन करून लहान मुलांना शिक्षणाचा श्रीगणेशा करायला लावतात. पंजाबात पतंग उडवून व पूजा करून हा सण साजरा करतात. पेशवेकाळात देखील हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केली जात असे. लोक धान्याची कणसे एकमेकांना भेट देत. धान्याचे तुरे पागोट्यात/ फेट्यात खोचत असे काही संदर्भ आहेत. पिवळी वस्त्रे नेसून हा उत्सव साजरा केला जातो. पिवळा रंग हा सृजनाचा रंग मानला जातो. कलकत्त्यात सरस्वती देवीच्या मूर्ती पूजतात. शोलावूड पासून देवीचे दागिने अलंकार बनवतात. पण मग माघ शुद्ध पंचमीला आणि शिशिर ऋतूत येणाऱ्या या सणाला 'वसंत' पंचमी हे नाव कसे पडले असावे? तर सरस्वती जन्माच्या वेळी राग 'वसंत' गायला होता आणि त्याचमुळे याला वसंत पंचमी असे नाव पडले असावे. कारण वसंत ऋतूच्या कालनिश्चिततेचे विवेचन तर वर दिलेच आहे.

वसंत ऋतूत, शिशिरातील पानगळती थांबलेली असते, चैत्रात- वसंतात वृक्षांना नवीन पालवी फुटते. पुढे येणाऱ्या ग्रीष्मात सावली मिळावी म्हणून निसर्गाने केलेली ही तयारी म्हणावी का? या चैत्रात येणाऱ्या नवपल्लवीसाठी "किसलय" हा एक खूप सुंदर शब्द आहे.
तर याच वसंत ऋतूत एक उत्सव, महोत्सव प्राचीन काळी साजरा केला जात असे. त्याचे नाव मदनमहोत्सव, अनंगमहोत्सव. हा उत्सव अनंग त्रयोदशी ते पौर्णिमेपर्यंत साजरा केला जात असे. तारकासूर राक्षस, त्याला मिळालेले वरदान, शिव पार्वती विवाह आणि नंतर होणारा कार्तिकेयाचा जन्म आणि तारकासुराचा वध या गोष्टी सर्वांना माहीत आहेतच. कालिदासाच्या कुमारसंभव महाकाव्यात याचे फार सुंदर वर्णन केले आहे. त्यात कामदेव दहन हा भाग येतो. कामदेव म्हणजेच मदन. त्याच्याकडे एक धनुष्य आहे ते आहे इक्षुदंडाचे म्हणजेच उसाचे. त्याचे नाव कुसुमचाप, पुष्पधन्वा आणि त्याची प्रत्यंचा बनली आहे भुंग्यांच्या ओळीने. या धनुष्याबरोबर आहेत पाच सुवासिक फुलांचे बाण.
अरविंदं अशोकं च चूतं च नवमल्लिका ।
नीलोत्पलं तथा हि एते पंचबाणस्य सायकाः।।
लाल कमळ, सीताअशोक, आम्रमंजिरी, मदनबाण आणि नीलोत्पल. ही सगळी फुले फुलतात वसंत ऋतूत आणि जो आहे मदनाचा प्रिय सखा.
शिवाने आपला तिसरा नेत्र उघडून कामदेवाला भस्मसात केल्यावर, त्याच्या पत्नीच्या-रतीच्या विनंतीवरून मदनाला, अनंग (अंगरहित) रूपात 'मन' ह्या सहाव्या इंद्रियात जिवंत ठेवले. यावरूनच त्याला मनसिज, चित्तजन्मा अशी नावे मिळाली. तर या मदनाचा अंमल ज्या तरुण 'मनांवर' चालतो ते या मदनाची पूजा करतात. अनंग त्रयोदशी (३० मार्च) ते पौर्णिमेपर्यंत कामदेवयातनात, मदनमंदिरात असे मदनमहोत्सव किंवा वसंत महोत्सव साजरे केले जातात. तरुण तरुणी सजून धजून एकत्र येतात. संगीत, नृत्य, रंगोत्सवात हा मदनोत्सव उत्साहात साजरा केला जातो. अशा या मदनमहोत्सवाची खूप शृगांरिक आणि रसभरीत वर्णने संस्कृत काव्यात आढळतात. विस्तारभयामुळे ते इथे देणे टाळतो.
तर अश्या या कुसुमाकर वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी फाल्गुन कृष्ण प्रतिपदेला नवीन आम्रकुसुमाचे भक्षण केले जाते आणि वसंतोत्सव साजरा केला जातो.
निसर्गातील अनेक वृक्ष सुद्धा या वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी बहरतात. त्यातील काही प्रमुख म्हणजे आंबा, पळस, काटेसावर, बकुळ, पांगारा, कडुनिंब, कांचन, बहावा इत्यादी..
यातील बरेच वृक्ष हे 'दोहद वृक्ष' म्हणून ओळखले जातात. म्हणजे सुंदर स्त्रियांनी यांचे दोहद (डोहाळे) पुरवल्यास ते फुलतात अशी कवीकल्पना आहे.
स्त्रीणां स्पर्शात् प्रियङ्गुः विकसति बकुलः सीधुगण्डूषसेकात्
पादाघातात् अशोकः तिलककुरबकौ वीक्षणालिङ्गनाभ्याम्
मन्दारो नर्मवाक्यात् पटुमृदुहसनात् चम्पको वक्त्रवातात्-
चूतो गीतात् नमेरुः विकसति च पुरो नर्तनात् कर्णिकारः

सुंदर स्त्रीच्या स्पर्शाने प्रियंगु, तिच्या मद्याच्या चूळीने बकुळ, लत्ताप्रहराने सीताअशोक, नेत्रकटाक्षाने तिलक, आलिंगनाने कोरांटी, नर्मवाक्याने मंदार, स्मितहास्याने चंपक, हळुवार फुंकरीने आंबा, गीताने नमेरू आणि समोर नृत्य करण्याने कर्णिकार हे वृक्ष बहरतात.
संदर्भ:
श्री द महाजन सर यांचे लेख.
कल्पसुमांची माला - नीला कोर्डे
लोकसत्तातील काही लेख
लेखातील काही छायाचित्रे आंतरजालावरून साभार.
नवीन प्रतिसादही सुंदर आहेत!
नवीन प्रतिसादही सुंदर आहेत!
इंदिवर म्हणजे निळं कमळ हे मला माहिती नव्हतं.
बोरकरांच्या एका कवितेत आहे- जिथे उगवे मावळे त्यांचा लावण्यसोहळा, असा कालिंदीच्या काठी एक इंदिवर निळा.
इंदिवर
इंदिवर
यावर कालिदासाची एक प्रसिद्ध प्रहेलिका आहे.
कमले कमलोत्पत्तिः श्रूयते न तु दृश्यते ।
कमळावर कमळाची उत्पत्ती (जन्म) होते, न कधी ऐकले न कधी पाहिले.
बाले तव मुखाम्भोजे कथमिन्दीवरद्वयम् ॥
मग हे बाले, तुझ्या या मुखकमलावर हे दोन (नेत्ररुपी) इंदिवर काय आहेत?
आज "अनंग त्रयोदशी" आहे
Pages