यशस्वी पण दुर्दैवी

Submitted by अविनाश जोशी on 24 February, 2026 - 01:29

यशस्वी पण दुर्दैवी
दिलीप कुमार जवळ जवळ शंभर वर्ष जगला. अतिशय ट्रॅजेडी किंग म्हणून गाजने कित्येक चांगल्या संधी लाभूनही बऱ्याच बाबतीत तो दुर्दैवी ठरला. उत्तम व्यक्तिमत्व आणि देहयष्टी, अभिनयातील अत्यंत जाण, कलेकरिता परिश्रम घ्यायची तयारी असे सगळे गुणधर्म त्याच्या होते.
हा हरहुन्नरी कलावंत पाकिस्तानातून येऊन इथे स्थायिक झाला. त्याने सिनेमात काम करणे हे त्याच्या वडिलांना खालच्या दर्जाचे काम वाटले असते. अशा या तरुणाला देविका राणीने प्रथम पाहिले आणि त्याला चित्रपटात काम करण्याबद्दल विचारले. त्यांनी सिनेमात काम करण्यास घरून विरोध असल्याचे सांगितले. त्यावर देविका राणीने त्याचे नाव बदलायचे ठरविले आणि तेव्हापासून तो दिलीप कुमार झाला. त्याची धडपड सुरु असताना पाहिलं प्रेम प्रकरण झालं कामिनी कौशल बरोबर. काही वर्ष चाललेलं प्रेम प्रकरण, विचित्ररित्या मोडलं. कामिनी कौशलची मोठी बहीण मरण पावली. तिला तीन लहान मुले होती. घरच्या दबावामुळे तिला जिज्याजीशी लग्न करावं लागलं.
दुसरं अतिशय गाजलेले प्रेम प्रकरण म्हणजे दिलीप कुमार - मधुबाला. अनेक चित्रपटात ही जोडी गाजलेली होती. दोघेही मुस्लिम असल्यामुळे धर्माचाही प्रश्न आला नसता. मुगले आझमचे शूटिंग चालू असताना बीआर चोप्राच्या नया दौर या पिक्चरमध्ये दोघेही होते. त्या सिनेमाचे माळव्यात चाळीस पंचेचाळीस दिवसाचे शूटिंग होते. मधुबालाच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये ही ते नमूद केले होते आणि त्या काँट्रॅक्टवर मधुबालाच्या वडिलांनी सुद्धा सह्या केल्या होत्या पण आयत्या वेळेस वडिलांनी मधुबालाला पाठवायचं नाकारलं. त्यामुळे बीआर ने मधुबाला आणि तिच्या वडिलांवर खटला भरला आणि तिला पिक्चरमधून काढून टाकलं. या खटल्यात दिलीप कुमारने बीआर चोप्राच्या बाजूने साक्ष दिल्यामुळे त्याबद्दल वडिलांची माफी न मागितल्याने प्रकरण पेटले. त्या दोघांच्या या भांडणामुळे मुगले आझमचे शुटिंगही दीड - दोन वर्ष लांबले. अशा रीतीने दिलीप कुमारचे दुसरे प्रेम प्रकरण संपले.
त्या सुमारास गुरुदत्त प्यासाचे प्रोडकशन करत होता. गुरुदत्तने बऱ्याच विचारा नंतर दिलीप कुमारला मुख्य भूमिकेसाठी साइन केले. मुहूर्ताच्या शॉटच्या वेळेस तो स्टुडिओतही आला पण मध्येच तो एका दुसऱ्या दिग्दर्शकांबरोबर बोलत बसला. बराच वेळ वाट पाहूनही दिलीप कुमार सेटवर न आल्याने मुहूर्ताचा शॉट गुरुदत्तावर चित्रीकरण करण्यात आला आणि अशा रीतीने एका अजरामर कला कृतीतून दिलीप कुमार बाहेर गेला. नया दौर मध्ये त्याची नायिका वैजंतीमाला होती त्या दोघाचे अनेक चित्रपट हिट होते. हे दिलीप कुमारचे तिसरे प्रेम प्रकरण.
काही दिवसांनी राजकपूरने संगमचे प्रॉडक्शन करण्याचे ठरवले. राजकपूर, दिलीपकुमार खालसा कॉलेजात एकत्र शिकत होते आणि तेव्हापासून दोघांची मैत्री होती. त्यामुळे गोपाल आणि राधाच्या भूमिकेकरिता राजकपूरने दिलीप कुमार आणि वैजंतीमाला या जोडीला ऑफर दिली. दिलीप कुमारने बऱ्याच विचारांती ती नाकारली पण वैजंतीमाला संगम ग्रुपला जॉईन झाली त्या रागात राम और शाम या चित्रपटाच्या यादीतून त्याने वैजंतीमालाला कमी केले आणि त्या जागी वहिदा रहमानला घेतले हे त्याचे चौथे प्रेम प्रकरण.
त्याच सुमारास त्याला लॉरेन्स ऑफ अरेबिया या प्रसिद्ध चित्रपटाकरिता ऑफर देण्यात आली होती ती ही त्याने नाकारली त्यामुळे ओमारशरीफ या नटाला चांगली संधी मिळाली.
त्या नंतर त्याच्या जीवनात आली सायराबानू यावेळेस तो चव्वेचाळीस होता तर ती बावीस वर्षाची होती तिचे शिक्षण मुबंई आणि इंग्लंड मध्ये झाले होते आणि तिच्या आई नसीम बानू हिचे सायराचे लग्न दिलीपशी व्हावे असे होते. त्यामुळे या प्रकरणात सायराबानू अग्रेसीव होती. सायरा -दिलीप जोडप्याला अपत्य लाभ झाला नाही. घरच्यांच्या प्रचंड दबावामुळे त्याने अठ्ठावन्नव्या वर्षी हौद्राबादच्या आस्मा या सुंदरीशी विवाह केला. तिचा नवराही होता आणि तीन मुलेही होती. या लग्नास सायराबानूने प्रचंड विरोध केला आणि त्या बद्दल ती सतत झगडत राहिली. अखेरीस आस्मा बरोबरचे संबंध संपुष्टात येऊन ती आपल्या पतीकडे परत गेली. अशा रीतीने पंच कन्यांशी संबंध येऊनही दिलीपकुमार निपुत्रिक राहिला आणि केवळ नशिबाने त्याला प्यासा , संगम आणि लॉरेन्स ऑफ अरेबिया अशा चित्रपटांपासून दूर ठेवले.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निपुत्रिक राहिला कारण सायरा बानुला काहीतरी मेडिकल इश्यु होता असे वाचले. यात दुर्दैवी वगैरे काही मला तरी वाटत नाही. सायराने त्याची शेवटपर्यंत उत्तम काळजी घेतली. मुले असती तरी दीर्घायुष्यी पित्याची काळजी घेणे त्यांना कितपत जमले असते देव जाणे.

ज्याना अपत्य नाही त्यांना कृपया दुर्दैवी वगैरे म्हणु नका. अपत्य नसणे किंवा होऊ न देणे हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. इतरांनी त्यात डोकावणे बरे नाही.

आस्मा प्रकरणात सायराने खुप आक्रमक भुमिका घेतली. मुस्लिम असल्याने दिलिप कायदेशिररित्या दुसरी बायको करु शकला असता पण सायराने पुर्ण इन्डस्ट्री व समाजाचे मत आपल्या बाजुने वळवण्यात यश मिळवले व दिलिपला अस्माला तलाक द्यावा लागला. तेव्हा सायराचे खुप कौतुक वाटले होते.

ज्याना अपत्य नाही त्यांना कृपया दुर्दैवी वगैरे म्हणु नका. अपत्य नसणे किंवा होऊ न देणे हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. .... सहमत.

वैयक्तिकरित्या मला दिलीपकुमार कधीही आवडला नाही. एका ठराविक पद्धतीच्या (दुःखी)भूमिकेतच तो चांगला वाटला.

दिलीप अत्यंत आढ्यताखोर अहंमन्य आणि गर्विष्ठ म्हणून प्रसिद्ध होता. इतर कलावंतांना खाली पाहणे आणि स्वतः बद्दल अवास्तव कल्पना हा त्याचा स्थायीभाव होता. उर्दू भाषा न येणाऱ्या कलावंताला तो कस्पटासमान लेखत असे. श्रीमती लता मंगेशकर यांच्या सुरुवातीच्या हिंदीला त्याने "दाल भात कि बू आती है" असे संबोधले होते

एकदा तो फ्रान्सला जात असताना प्रथम वर्गात त्याच्या शेजारी एक प्रवासी आपल्या व्यवसायाचा हिशेब करत होता. दिलीप कुमार ने आपण कोण आहोत हे त्याला सांगतले. त्यावर तो प्रवासी दिलगिरी व्यक्त करत म्हणाला कि फारसे सिनेमे पाहत नाही. दिलीप कुमार चित्रपट व्यवसायात आपण किती मोठे आहोत याची शेखी मिरवत होता आणि तो सहप्रवासी शांत होता आणि नम्रपणे त्याचे बोलणे ऐकत होता.
शेवटी ना राहवून दिलीप कुमारने त्याला आपले नाव विचारले.

त्यावर तो प्रवासी नम्रपणे म्हणाला जे आर डी टाटा आणि आपल्या कामात परत व्यस्त झाला.

गॉसिपपूर्ण लेख ?

जे आर डी टाटा यांच्याबरोबरचा हा किस्सा श्री दिलीप कुमार यांनी स्वतःच मुलाखतीत सांगितलं होता.

"दाल भात कि बू आती है"

हे श्रीमती लता मंगेशकर यांच्या बद्द्ल शिरीष कणेकर यांनी लिहिलेलं मी वाचल्याचं आठवतंय. कारण यानंतर त्यांनी उर्दूची खास शिकवणी लावली होती असे ही त्यानी लिहीले होते.

बाकी तुमचं चालू द्या

वरचा लेख हो! तुम्ही स्वतःला का लावून घेताय?
कलावंताच्या कलाकृती सोडून इतर गोष्टींबद्दल बोलणं म्हणजे गॉसिप.
आता लताबाईंची पण अफेअर्स होती म्हणून कोणी सांगेल. त्यांनी इतर गायिकांच्या गळ्यावर कसा पाय दिला हे तर बोललंच जातं. मला कधी कधी खूप एकटं वाटतं, तू जेवलीस का असं विचारणारं पण कोणी नाही, असं त्या म्हणाल्याचं पुस्तक लिहिणार्‍या एका माणसाच्या फेसबुक रील्स मध्ये मला दिसलं.
रवीं द्र जैन आणि हेमलता यांच्याबाबत - प्रेम नुसतं आंधळंच नाही तर बहिरंही असतं अशी कमेंट लताबाईंनी केली इति कणेकर. या गोष्टी रंगवून सांगितल्या तर चालेल का?

वैयक्तिकरित्या मला दिलीपकुमार कधीही आवडला नाही. एका ठराविक पद्धतीच्या (दुःखी)भूमिकेतच तो चांगला वाटला.>>>>

साठीच्या दशकात जन्मलेल्या व दुरदर्शनवरचे चित्रपट पाहात मोठ्या झालेल्या माझ्या पिढीला कित्येक चांगल्या कलाकारांच्या उतरत्या वयातल्या भुमिका पाहायला मिळाल्या. त्यांच्या ऐन भरातल्या भुमिका फारश्या पाहिल्या गेल्या नाहीत आणि त्यांची चुकीची ओळख उतरत्या वयातल्या भुमिकांमुळे निर्माण झाली.

दिलिपकुमारने मुसाफिर व आझाद हे दोन्ही चित्रपट एकाच काळात केले. आझाद मधला त्याचा हॅपी गो लकी तरुण तितकाच खरा वाटतो जितका मुसाफिरमधला राजा.

फारुख शेख गेला तेव्हा चांगला कॉमेडियन गेला वगैरे कमेंट्स वाचुन मला आश्चर्य वाटले कारण मला त्याची ओळख हळव्या प्रेमीच्या भुमिका करणारा तरुण अशी होती. त्याचे नुरी, बाजार, साथ साथ वगैरे चित्रपट डोळ्यांसमोर होते. पण उमेदीची वर्षे संपल्यानंतर त्याने कॉमेडी केली असेल आणि आताची पिढी त्याला त्याच रुपात ओळखते.

शक्ती मध्ये दिलीपकुमारचा अभिनय आवडला
होता. बाकी चित्रपटांमधे (मधुमती, नया दौर, सगीना वगैरे)ठीक ठाक वाटला होता. कणेकर त्याचं फार कौतुक करायचे.

जे आर डी टाटांना दिलीपकुमार माहिती नसण्याचे जेव्हढे आश्चर्य वाटते (कारण पेपरमध्ये / रस्त्यात जाहिराती तर दिसत असतील ना) त्याहीपेक्षा जास्त आश्चर्य दिलीपकुमारला जे आर डी टाटा माहिती नसण्याचे वाटले. मुंबईत राहून एव्हडी साधी माहिती नसणे हे काही असामान्य व्यक्तिमत्व समजायचे का?

हा ७०-८० वर्षांपुर्वीचा काळ होता. तेव्हा मुळात रस्त्यांवरती इतकी होर्डिंग्स तरी का ही असायची शंका आहे. जुन्या चित्रपटात रस्त्यांवर फारसे होर्डिंग दिसत नाहीत.

<<आश्चर्य दिलीपकुमारला जे आर डी टाटा माहिती नसण्याचे वाटले.>>
नाव माहिती आहे पण फोटो बघितला नाही असे होऊ शकते.
पण असे किस्से कुणी स्वतःचा अनुभव म्हणुन सांगितले असले तरी मला ते खरे असण्याची शक्यता ५०% च वाटते. (हा माबुदो समजण्यास हरकत नाही. पण अनेक सेलिब्रिटींना/उच्चपदस्थ लोकांना सुद्धा काल्पनिक अथवा इतरत्र कुठे ऐकलेला/वाचलेला किस्सा स्वतःसोबत घडला असे ठोकुन देण्याची सवय असते.)

दिलीपकुमार बद्दल माझा काहीही अभ्यास नाही, त्याच्या तरुणपणीच अगदीच मोजके चित्रपट पाहिले, त्याच्या उतरत्या वयातली चित्रपट थोडे जास्त. नया दौर व मधुमती चित्रपट बघणे हीच एक पर्वणी असणे काळात बघितलते. इतर चित्रपटातील त्याचा अभिनय व संवाद फेकण्याची स्टाईल आवडली.
(त्याच्याबद्द मला कसलाही आकस असण्याचे काहीही कारण नाही हे उगाच नमूद करून ठेवतो.)

<<<घरच्यांच्या प्रचंड दबावामुळे त्याने अठ्ठावन्नव्या वर्षी हौद्राबादच्या आस्मा या सुंदरीशी विवाह केला. >>>

५८ वर्षे वयाच्या आणि आर्थिक दृष्ट्या संपन्न असणाऱ्या ह्या गरीब बिचाऱ्या इसमाला, घरच्यांच्या दबावामुळे दुसरे लग्न करावे लागले हे वाचुन मन करुणेने भरुन आले. लोक उगाचंच स्त्री ला अबला म्हणतात खरे दुर्बल तर हे असे पुरुष ज्यांना वयाच्या ५८ व्या वर्षी देखील निर्णय स्वातंत्र्य नव्हते.

दिलीप कुमार बद्दल माहिती नाही परंतु जे आर डी टाटा यांच्या नम्र आणि ऋजू स्वभावाबद्दल आमच्या वडिलांनी स्वतः अनुभव घेतलेले आहेत.

बॅलार्ड इस्टेट मधील त्यांच्या कार्यालयातून कुलाबा येथील त्यांच्या निवासस्थानी जाताना आपल्याच कार्यालयातील चपराश्याला त्यांनी आपल्या अँबेसेडर मध्ये (लिफ्ट दिलेली) बसवून कुलाब्याला नेलेले आमच्या वडिलांनी स्वतः पाहिलेले आहे. ते आपली अँबेसेडर सुद्धा कित्येक वेळेस स्वतः चालवत असत.

उच्च पदी असूनही पाय जमीनीवर असणारी माणसं तशी कमीच असतात आणि त्यामुळेच ती जास्त लक्षात राहतात.