अद्भुत कथा: ताऱ्यांचे गाव

Submitted by निमिष_सोनार on 20 May, 2025 - 09:03

युरोपच्या एका दुर्गम पर्वतीय भागात, दाट जंगलांनी वेढलेले, फुलांनी नटलेले, आणि ढगांमध्ये लपलेले एक लहानसं गाव होतं—स्टारबर्ग. या गावाचा उल्लेख कुठल्याही नकाशावर नव्हता. आणि कदाचित म्हणूनच ते तितकं खास होतं!

स्टारबर्गचं वैशिष्ट्य म्हणजे तिथलं "ताऱ्यांचं तळं". हे तळं इतकं स्वच्छ, शांत आणि नितळ होतं की, त्याच्या पाण्यात पहाटेच्या प्रकाशातसुद्धा चंद्राचे प्रतिबिंब पाहायला मिळत असे. परंतु तिथे खरी जादू व्हायची रात्री!

प्रत्येक रात्री जेव्हा आकाशात तारे लुकलुकत असत, तेव्हा त्यातले काही तारे अचानक वेगाने खाली यायचे आणि सरळ त्या तळ्यात पडायचे आणि तरंगायचे. मोठे अद्भुत प्रकाशमान दृश्य त्यावेळेस दिसायचे.

पाण्याच्या संपर्कात आल्यावर त्या ताऱ्यांचं रूपांतर एक सुंदर, तेजस्वी रत्नात व्हायचं—वॉटरजेम्स. ही रत्ने साधारण माणसाच्या तळहातात मावतील इतके लहान असायचे, पण त्यांचं तेज इतकं प्रखर असायचं की मिटलेल्या मुठीतसुद्धा प्रकाश झिरपत असे!

गावातील प्रत्येक व्यक्ती, आपापल्या वेळेनुसार एक वॉटरजेम उचलायची आणि डोळे बंद करून त्याला मुठीत घट्ट धरायची. मग त्या क्षणी त्यांच्या मनात एक स्पष्ट विचार उमटायचा—कधी कुणाला एखादं काम करायचं सुचायचं, तर कधी आयुष्यात कोणत्या मार्गाने जावं हे, तर कधी कोणता धोका टाळावा हे कळायचं! तो संदेश शब्दांत नसायचा, पण मनाच्या कोपऱ्यात आपोआप अचूक पोहचायचा. जणू एक मार्गदर्शन आणि ज्ञानाचा झरा!

त्यामुळे त्या गावातील लोक कोणतंही काम करताना कधीच भरकटले नाहीत. कोणी शिल्पकार झाला, कोणी वैद्य, कोणी कवी, तर कोणी शिक्षक. प्रत्येकाच्या जीवनात शांतता होती, कारण कुणाचीच कधी द्विधा मनस्थिती होत नव्हती. त्यांना जे त्या तेजस्वी विविधरंगी खड्याकडून सुचवलं जायचं, तेच ते करत. आणि त्यामुळेच गावात कधीच भांडण, स्पर्धा, किंवा वाद नव्हते.

प्रत्येकजण स्वतःच्या जागी समाधानी होता.

पण एक दिवस, गावात एक नवीन मुलगा आला—जॉर्ज. तो बाहेरच्या जगातून आलेला होता. गावच्या वेशीवर असलेल्या पर्वतावर तो चढला असता त्याला पर्वताच्या दुसऱ्या बाजूला हे चमकणारे तळे दिसले आणि तो खाली उतरला! गावकरी काय करतात याचे त्याने काही दिवस निरिक्षण केले.

एका रात्री त्यानेही एक लाल रंगाचे नुकतेच आकाशातून पडलेले तेजस्वी रत्न तळ्यातून उचलले आणि तोच अनुभव त्यालाही आला.

पण त्याच्या मनात प्रश्नही उमटले—"माझ्या मनात जो विचार आला, तो खरंच योग्य आहे का?", "मी जर या रत्नाने सांगितलेल्या सूचनेपक्षा वेगळं काही केलं तर काय होईल?"

हे विचार त्याच्या मनात रुजले. त्याने वॉटरजेम्स कडून आलेल्या सूचनांचे अनुसरण न करता, स्वतःचा मार्ग निवडायचा ठरवलं.

लोकांना तो हेच विचारू लागला, “का तुम्ही त्या रत्नांच्या सल्ल्यावर अवलंबून आहात? स्वतःचं मन नाही का तुमचं?”

त्या गावात आजपर्यंत असा विचार कोणीही केला नव्हता.

हळूहळू काही तरुण जॉर्जच्या विचारांना बळी पडले. त्यांनी रत्नांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केलं आणि तिथूनच गावात अनिश्चितता सुरू झाली. काहींच्या पिकांचं नुकसान झालं, काहींना रोगांचा सामना करावा लागला, काहींमध्ये वाद वाढले. जॉर्जला रडायला आले. त्याला वाटलं, "माझं चुकलं का?"

तो पुन्हा तळ्याकाठी गेला, एक रत्न उचलले, आणि तो घट्ट धरून डोळे मिटले. या वेळी त्याच्या मनात फक्त एकच वाक्य उमटलं, “तुला स्वातंत्र्य हवं, पण दिशाही, ते शक्य नाही.”

त्याला जाणवलं, ते रत्न त्याला कोणताही आदेश देत नव्हता. तो फक्त मार्ग दाखवत होता. निवड आपलीच होती, कारण दिशा हरवली की माणूस चुकतो! गावात येऊन त्याने स्वतःची आणि इतरांची दिशा चुकवली होती.

त्याने गावकऱ्यांची माफी मागितली आणि पर्वतावर चढून दुसऱ्या बाजूने उतरून जिथून आला होता तिथे तो निघून गेला.

गाव पुन्हा आकाशातून पडणाऱ्या त्या रत्नांच्या मार्गदर्शनात चालू लागलं. पण त्या दिवसापासून, प्रत्येक रत्नाला हातात घेतल्यावर प्रथम एक वाक्य ऐकायला यायला लागलं.

"मी सांगतो त्यावर आधी विचार करा, मग ठरवा, काय करायचं."

स्टारबर्ग अजूनही तिथे आहे—शांत, सुंदर आणि तेजस्वी.

तिथे आकाशातून तारे अजूनही तळ्यात पडतात. पण आता त्या रत्नांचा उपयोग मार्गदर्शनासाठी होतो, नियंत्रणासाठी नव्हे.

कारण त्या गावाने एक गोष्ट शिकली:

"सल्ला हा प्रकाशासारखा असतो—घ्यायचा की डोळे बंद करायचे नाही हे आपल्या डोळ्यांवर अवलंबून असतं. पण पूर्ण अंधारात, त्याची खरी किंमत आपल्याला कळते."

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह! काय सुंदर कथा आहे. हे रुपांतर आहे की तुमची आहे? विचारात पाडते खरी. खूप आवडली.
चित्र कसलं सुंदर आहे आणि समर्पक. हे चित्र ए आय ने बनवले का?

खूप सुंदर... मला तर रूपांतरितच वाटली. प्रतिसाद बघितला तेव्हा खुलासा झाला.

मस्त
मलाही रूपांतर वाटले
आपल्या इकडचे संदर्भ का नाही वापरले असाही प्रश्न पडला.. म्हणजे एखाद्या पूर्व ईशान्यकडच्या राज्यातील देखील चालला असता.