आपली गोष्ट - मनूचं सरबत

Submitted by sugandhi on 8 May, 2025 - 23:34

प्रस्तावना - https://www.maayboli.com/node/86676

माझ्या किचनच्या खिडकीतून दिसेल अशी पॅशन फ्रुटची वेल मी हौसेने लावली आहे. किचनमध्ये काम करताना खिडकी समोर संपूर्ण कंपाउंड वर पसरलेली ती हिरवीगार वेल बघून माझे डोळे निवतात. सदा सर्वदा हिरवीगार असलेली ही वेल खूप फुलते. पॅशन फ्रुटचं फुल अगदीच कृष्ण कमळाच्या फुलासारखं दिसतं. तिला एकदा फळं यायला लागली की खूपच येतात. आंबट गोड आणि बियांमुळे थोडं क्रंची असं असतं हे फळ. मग आम्ही कधी नुसतच मीठ घालून ती फळं खातो किंवा कधी त्याचं सरबत बनवतो.

या सरबतावर माझं विशेष प्रेम आहे. प्रत्येक वेळी हे सरबत केलं की मला माझ्या लहानपणीचा एक किस्सा आठवतो. त्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी कोकणात आजोळी गेले होते. आजीचं टुमदार घर छान आंबे आणि काजूच्या बागेत होतं. घराच्या एका बाजूला सुरेख हिरवागार असा कृष्ण कमळाचा अष्टकोनी मांडव होता. दिवसभर त्याच्या फुलांचा घमघमाट पसरलेला असायचा आणि त्यावर भुंगे गुणगुणत असायचे. खाली छान सारवून ठेवलेलं असे. दुपारच्या वेळी खूप ऊन पडलं तरी या मांडवात छान सावली असायची. मग दुपारी काहीतरी पुस्तक वाचत आम्ही तिथं लोळायचो.

या मांडवाच्या मागच्या बाजूला आजीचे भाज्यांचे मळे आणि विहीर होती. आजीकडे आठवड्याच्या सात भाज्या लावलेल्या असायच्या. भाज्यांच्या मळ्याशेजारी पॅशन फ्रुटची एक वेलही होती. त्या उन्हाळ्यात या वेलीला खूप फळं लगडली होती.

दुपारी आम्ही भावंड कृष्ण कमळाच्या मांडवात काही बाही खेळत बसलो होतो. इतक्यात शेजारचे मामा मामी आणि त्यांची मुलं आली गप्पा टप्पा करायला! आजीने हाक मारली, "मने ये इकडे, तुला पॅशन फ्रुटचं सरबत कसं लागतं बघायचं होतं ना, छान गडद जांभळी झालेली सगळी फळं तोडून आण, मग सरबत करू आपण सगळ्यांना!" मी एका उडीत वेलीखाली जाऊन पोचले. टाचा उंच करून, जमतील तेवढी फळं काढली आणि पळाले आजीच्या किचनमध्ये. आजी म्हणाली, "खूप लोकांचं करायचं आहे ना सरबत, मग पेल्याने नको मोजूस, सरळ तांब्याने मोज. चार तांबे पाणी घे माठातलं, साखर मीठ घाल, तोवर मी गर काढून देते सगळ्या फळांचा!" मग आजीच्या देखरेखी खाली झकास थंडगार सरबत तयार झालं.

एका मोठ्या ताटामध्ये पेले मांडून सरबत ओतलं आणि आजीने एकेकाला नेऊन द्यायला सांगितलं. ताईला दे, मामाला दे, मामीला दे असं करत करत सगळ्यांना सरबत देऊन झालं. प्रत्येकाला मी सरबत दिलं की "मनुने केलं हो, छानच झालंय" असं कौतुकही सांगून झालं. शेवटचा सरबताचा पेला मी आजीच्या हातात नेऊन दिला. तिने एक घोट घेऊन, परत एकदा माझं कौतुक करायला सुरुवात केली. पण माझे मात्र डोळे भरले, गाल फुगले, नाक लाल झालं.. आजीला कळेच ना काय झालं. मग मी म्हणाले, "सगळ्यांना आठवणीने सरबत द्यायला सांगितलंस पण मलाच नाही ना सांगितलं घ्यायला!" आणि आजी थबकलीच! "अग्गोबाई! मने, मला वाटलं मला द्यायच्या आधी घेतलंस हो तू!! पण बयो चुकलंच हो माझं, विचारायला हवं होतं मी तुला!"

मग तिने पुन्हा ताईला अजून वेलीवर असतील ती फळं आणायला बाहेर पाठवलं, परत सरबत केलं आणि मला दिलंच, पण दिवसभर ती चूकचुकत राहिली, "वयच झालं बाई माझं मने, अशी कशी विसरले मी तुला विचारायला!" मला आता खरं म्हणजे सरबत वगैरे सगळं मिळालं होतं. पण अनायसे कोणीतरी कोड कौतुक करतंय तर का सोडा! मी पुढचे दोन-तीन दिवस भरपूर लाड करून घेतले. आजीने दोन दिवसांनी समजावून सांगितलं - "मनी, आजीवर राग धरून राहू नको हो, पण बाळा, आपलं आहे ते घ्यायला दुसऱ्यांनी कशाला सांगायला हवं? हक्काने घ्यायचं आपलं आपलं! दुसऱ्यांनी विसरू नाही हे खरं आहे, पण सर्वात आधी आपणच आपल्याला काय हवं नको ते बघायचं असतं हो!" - हल्ली विमानातही हेच सांगतात नाही - दुसऱ्याला ऑक्सीजन मास्क घालायला मदत करायच्या आधी स्वतःचा घाला म्हणून!

तेव्हापासून मनूचं सरबत हा आमच्याकडे विनोदाचा विषय झाला आहे. घरात खूप जण जमलो की पॅशन फ्रुटचं सरबत पिता पिता, कोणी ना कोणी म्हणतचं - "सगळ्यांना दिलस ना ग? नाहीतर कुणालातरी मनूचं सरबत व्हायचं!" मग एकच हशा पिकतो आणि हसता हसता मी हळूच डोळ्याच्या कडा पुसते. बाहेरची हिरवीगार पॅशन फ्रुटची वेल वाऱ्यावर डुलत राहते!

Group content visibility: 
Use group defaults

माझ्याकडे पण होता हा वेल. भरपूर फळं यायची.....
सगळ्याना वाटून टाकायचे, पण नन्तर शेजारी म्हणायचे की किलो किलो साखर पण दे फळासोबत...
स्वाद खुप छान, पण फळ आम्बट्ढाण.....

लेख गोड झाला आहे पण..

Thank you, तुम्ही सगळे आपल्या गोष्टी वाचत आहात आणि प्रतिसाद देत आहात हे बघून खूप छान वाटतं.
खरं म्हणजे पॅशन फ्रुट च सरबत मला चवीपेक्षा या आठवणीसाठीच जास्त आवडतं! माझ्या लेकीला मात्र चवही खूप आवडते.

चित्रासाठी माझं फारसं क्रेडिट नाही. ते AI वापरून काढलं आहे.

छान आहे. Btw तुमचं नाव मायबोलीवर पहिल्यांदा वाचलं. इथे नवीन असाल‌, तर एक सूचना आहे.

सर्वसाधारणपणे वाचकांनी आपल्या लेख, कथांना थोडे criticize केले, तर ते मान्य करून आपल्या लेखनात सुधारणा कराव्यात हा नियम आपण लेखक पाळतो.‌ पण इथे थोडी पुढची पायरी गाठावी लागेल. माबो 'समीक्षक' वाचकांनी तुमच्या लेखनाची कितीही खिल्ली उडवली, कशाही शब्दांत टीका केली तरी तीही गोड मानून घ्यावी. नाहीतर इथले 'समीक्षक' वाचक तुम्हाला वाळीत टाकू शकतात.

अर्थात सगळे सारखे असू शकत नाहीत. बरेचसे 'साधे' वाचकही नक्कीच आहेत. ज्यांना वाटेल तशी टीका करता येत नाहीत, खोचकपणा जमत नाही. जे त्यांचे म्हणणे नीट समजावून सांगतात वैगेरे ; पण सावध रहावं हे बरं.