चित्रपट "छावा" च्या निमित्ताने .... !!

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 February, 2025 - 10:31

नवा आहे.. पण छावा आहे.
लहानपणापासून छावा हा शब्द एखाद्या स्मार्ट तरतरीत तरण्याबांड मुलांसाठी वापरत आलोय. बॉयफ्रेंडचा समानार्थी शब्द छावा आणि गर्लफ्रेंड असेल तर छावी..
पण मला नाही वाटत हा शब्द पुन्हा या अर्थाने माझ्याकडून वापरला जाईल.

निमित्त चित्रपट छावा - बघायला सात दिवस उशीरच झाला. पण या सात दिवसात जवळपास सत्तर परीक्षणे अधाश्यासारखी वाचून काढली. आणि या चित्रपटावर आधारीत सातशे रील्स बघितल्या. चित्रपटाची कथा ही ईतिहासाची जितकी आवड आहे त्यानुसार माहीत होतीच. पण ते दाखवणार कसे याची उत्सुकता होती.

गेले काही वर्षात जे काही मोठ्या बॅनरचे वीएफएक्सयुक्त ऐतिहासिक चित्रपट आले ते पाहता अपेक्षा फार नव्हत्या. ट्रेलर देखील तितका भारी वाटला नव्हता. विकी कौशलचे नाचणे सुद्धा रुचले नव्हते. त्यामुळे चित्रपट आल्यावर, चार लोकांचे रिव्ह्यू वाचल्यावर थिएटरला जावे की ओटीटी रीलीजची वाट बघावी हा निर्णय घ्यावा असे ठरवले होते. कारण वेळ आणि पैसा खर्च करताना विचार करावा लागतोच. पण वैयक्तिक आवड काहीही असली तरी आपल्या मातीतील पराक्रमी वीरांवर चित्रपट येत आहेत आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांचा ईतिहास पोहोचत आहे हे चांगलेच घडतेय असे वाटत होते.

देर आये दुरुस्त आये. गाणे चित्रपटातून उडवले गेले. वीएफएक्सचे पराक्रम कमीत कमी होते. संभाजी महाराजांचे व्यक्तीमत्व आपल्या अभिनयाच्या आणि दमदार संवादांच्या ताकदीवर उभे करायचे शिवधनुष्य विकी कौशलने लीलया पेलले. अन्यथा ट्रेलरमध्ये ओरडतानाच फार दाखवले होते. खरे क्षण आणि संवाद थिएटरसाठी राखून ठेवले होते.

येसूबाई म्हणून रश्मिका ऐवजी दुसरी कोणीतरी (श्रद्धा, शर्वरी, मृणाल) हवी होती अशी बरीच मते ऐकली. त्यात तथ्यही वाटले. पण असो, ते जर तर झाले. रश्मिका फार कमी पडली असे वाटले नाही. तिच्या ईतर दुसर्‍या कुठल्याही चित्रपटापेक्षा ती यात छान दिसली.

औरंगजेब साकारणार्‍या अक्षय खन्नाने व्हिलन कॅटेगरीतील अभिनय वेगळ्याच उंचीला नेला. ना त्याने थयथयाट केला, ना तो निव्वळ थंड डोक्याचा खूनशी वाटला, ना तो विकी कौशलशी अभिनयाची जुगलबंदी करायला गेला. पण यापुढे औरंगजेब म्हटले की अक्षय खन्नाचे ते रुपच आठवावे असे काम करून गेला.

चित्रपटाची पटकथा प्रामुख्याने संभाजी राजे विरुद्ध औरंगजेब यावरच फोकस ठेवून लिहीली गेली होती. त्यामुळे या दोघातील एक अभिनेता जरी कमी पडला असता तर पुर्ण चित्रपट सपक झाला असता. पण तसे व्हावे ही श्रींची ईच्छा नव्हती.

या दोघांनी संवाद छान म्हटले पण मुळात ते होतेही तितकेच दमदार. कवी कलश यांनाही छान संवाद मिळाले जे गरजेचे होते. चित्रपटाच्या शेवटी कथानायक संभाजीराजे हे जग सोडतात आणि खलनायक औरंगजेब जिवंत राहतो. पण तरीही विजय संभाजीराजे यांचाच होतो आणि औरंगजेब हरतो हे प्रेक्षकांपर्यंत त्या संवादातूनच परीणामकारक पोहोचते.

पण, चित्रपट परीपुर्ण नाहीये. अडीच तासाच्या चित्रपटात संभाजी राजेंचा ईतिहास बसवणे तसे अवघडच होते. कदाचित म्हणून सुरुवात शिवाजी महाराजांच्या निधनाच्या बातमीपासून केली. पण त्यानंतरही पुढच्या दोन अडीच तासात जे दाखवले त्यातले बरेच काही कमी करून ईतर बरेच काही दाखवता आले असते. ज्यातून संभाजी राजेंचे व्यक्तीमत्व आणखी चांगल्या प्रकारे खुलून आले असते. तसेच ईतिहासाची अजून चार पाने लोकांपर्यंत पोहोचली असती. त्यामुळे एकंदरीत विचार करता काही इन्डिविज्युअल पर्फॉर्मन्सेस एकत्र आले आहेत, पण एक चित्रपट म्हणून बरेच काही कमी पडले असेही वाटले.

पण, हे ही नसे थोडके. चित्रपट संपल्यावर भले लोकं साश्रू नयनांनी मूकपणे बाहेर पडली असतील, पण घरी जाऊन प्रत्येक कुटुंबात यावर चर्चा झाली असेल. मोठ्यांनी आपल्याकडील ईतिहासाच्या ज्ञानाची देवाणघेवाण केली असेल. तर लहानग्यांनी ते ऐकले असेल. या चित्रपटाचा प्रभाव तितका नक्कीच पडला आहे आणि हे सुद्धा महत्वाचे आहे. अन्यथा स्वानुभावावरून सांगतो, शाळेत असताना गणित, विज्ञान, भाषा, भूगोल अश्या जीवनोपयोगी विषयांसोबत ईतिहास हा तितकासा महत्वाचा नसलेला विषय दरवर्षी का शिकवला जातो हा प्रश्न मला नेहमी पडायचा. ईतिहास शिकण्याचे महत्व कधी कोणी सांगितलेच नाही. पण कालांतराने स्वत:हून समजले की खरे ज्ञान हे पुस्तकी नसून जे आयुष्य आपल्याला शिकवते ते असते, आणि ते आपण ईतिहासातील चुका आणि अनुभवातूनच शिकत असतो. त्यामुळे प्रत्येकाला आपला ईतिहास माहीत हवाच.

पटकथा संकलन वगळता ईतर कमतरता या चित्रपटाच्या प्रभावापुढे मला तरी गौण वाटल्या. पण तरीही ए आर रेहमानच्या संगीताबद्दल मात्र असे का झाले किंवा त्याने असे का केले हा प्रश्न अजूनही सतावत आहे. पार्श्वसंगीताच्या नावावर सतत काही अरेबियन बायका व्हिवळत होत्या. औरंगजेबाच्या द्रुश्यांना ते चालून गेले. त्याकडे बघून चीड यावी म्हणून असे चीड आणनारे संगीत वाजवले गेले असावे. पण आपल्याकडच्या दृश्यांना का हे आचरट प्रयोग केले? लढाईच्या दृश्यांना सुद्धा वेगवेगळे शब्द वापरून असाच आरडाओरडा चालू होता. ऊपकार एकच केले ते म्हणजे क्लायमॅक्स दृश्यात कुठले प्रयोग न करता संयम बाळगला. पण सर्वात महत्वाचे म्हणजे अपवाद वगळता संगीत कुठे मराठमोळे, आपल्या मातीतील वाटलेच नाही आणि हा अक्षम्य अपराध ठरावा. ज्याला जबाबदार केवळ ए आर रेहमानच नाही तर दिग्दर्शक सुद्धा तितकाच ठरतो. आणि म्हणूनच छावाचे परीक्षण अजय-अतुल यांची आठवण काढल्याशिवाय अपुर्णच!

असो,
कित्येक चित्रपटगृहात लोकं महाराजांचा जयघोष करत आहेत, तर चित्रपट संपल्यावर खणखणीत आवाजात महाराजांची गारद म्हटली जात आहे. याचे विडिओ सोशल मिडीयावर वायरल होत आहेत. यामागे काही प्रमाणात फॅड सुद्धा असावे पण महाराजांप्रती तितकेच प्रेम आणि आदर असलेल्या लोकांची या महाराष्ट्रात वानवा नाही. राष्ट्रगीत संपताच जसे उत्स्फुर्तपणे भारतमाता की जय म्हणावेसे वाटते, कोणी गणपती बाप्पा म्हटले की आपसूक तोंडातून मोरया बाहेर पडते, तीच ताकद "छत्रपती शिवाजी महाराज की जय" या घोषणेत आहे. त्यामुळे हे निव्वळ फॅड नसून कित्येकांना खरेच हे एका उत्सवासारखे वाटत असावे.

कित्येक दिवसांनी सकाळचा पहिला शो पहिल्या रांगेपासून हाऊसफुल झालेला पाहिला. तिकीट बूक करताना आदल्या रात्रीचा साडे अकरा वाजताचा शो जो मध्यरात्री अडीच वाजता संपला असता तो सुद्धा हाऊसफुल झालेला पाहिला. राष्ट्रगीत संपल्यावर भारतमाता की जय पाठोपाठ छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून लोकांनी चित्रपट बघायला सुरुवात केली. संभाजी राजेंनी सिंहाचा जबडा फाडताच लोकांनी टाळ्या वाजवल्या. अजून काही मोजक्या प्रसंगी त्या आल्या पण त्यात कुठेही नेहमीच्या टपोरी शिट्ट्या नव्हत्या. आपण जवान चित्रपट नाही तर छावा बघत आहोत याचे भान लोकांना कायम होते.

क्लायमॅक्सला मात्र एकाही संवादावर टाळी आली नाही. टाळी तर दूर कोणी एक शब्द तोंडातून बाहेर काढला नाही. कारण पुढे आपण काय बघणार आहोत आणि याचा शेवट काय होणार आहे हे लोकांना माहीत होते. चित्रपट अगदी योग्य फ्रेमवर थांबला. जरी लोकं मूक झाले असले तरी ती प्रत्येकाला स्वराज्य अभिमानाची गाथा वाटावी असाच शेवट होता. आणि मग जे आपल्या थिएटरमध्ये देखील घडावे अशी ईच्छा होती ते घडले. एका लहान मुलाने गारद म्हणायला सुरुवात केली आणि ती पुर्ण होईपर्यंत लोकं शांतपणे आपल्या जागी ऊभे राहिले. ज्या संभाजी राजेंवर शालेय ईतिहासाच्या पुस्तकाने देखील अन्याय केला त्यांच्या छावा चित्रपटानिमित्त हे दृश्य बघणे आणि अनुभवणे नशिबी आले...

धन्यवाद,
- ऋन्मेऽऽष

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अक्षय खन्नाला संतोष जुवेकर कोण हे माहितीही नसेल . तो कशाला जुवेकर ला भाव देईल ? जुवेकर उगाच माझीच लाल म्हणून बोंबलात बसलाय

झेंडा मधे त्याचे काम जबरदस्त होते. पण या पिक्चर मधे अगदीच त्रोटक रोल होता.

पण मला वाटले तो अक्षय खन्ना या कलाकाराबद्दल इन जनरल बोलत नसून या पिक्चर मधे जे कोणी मुघल रोल वाले होते त्यांच्याशी न बोलण्याबद्दल सांगतोय. म्हणजे "इतका मी कॅरेक्टरमधे शिरलो" वगैरे Happy

यावरून कत्रिना कैफ प्रियांका गांधींचा की सोनिया गांधींचा रोल करताना हिंदी नीट बोलत नव्हती ते आठवले Happy अर्थात तिला आवर्जून ते करावे लागले नसेल.

छावा चित्रपटात दाखवलेल्या सर्वधर्मसमभाव अप्रोच बद्दल टीका वाचुन आश्चर्य वाटले. त्या काळातल्या व्याख्येनुसार सर्वधर्मसमभाव हे धोरण होते शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज दोघांचेही. ह्याच धोरणाचा एक भाग म्हणून दक्षिण दिग्विजय मोहिमेत महाराजांनी कुतुबशहा ला भेट दिली होती. महाराजांचे धोरण साधारण असे होते, "आपण भुमि पुत्र आहोत मुघल परके (तुर्की/उझबेक/मंगोल) आहेत. त्यांची सत्ता आपल्यावर नको. ह्यात राजकारण असेल पण भुमिका होती हे निर्विवाद.

शिवाजी महाराज -कुतुबशहा ह्यांच्यात झालेल्या मैत्री करारात महत्वाची भुमिका बजावणार्या मादण्णा आणि कामण्णा ह्या दोन बंधुंचा (ह्यांच्या पैकी एक दीवाण होता), राजकीय/धार्मिक वैमनस्यातून खुन झाला त्यामुळे औरंगजेब दख्खन मध्ये आला तेव्हा कुतुबशही -मराठी राज्य अशी युती होऊ शकली नाही.

संभाजी महाराज दिलेरखानाला जाऊन मिळाले तेव्हा दिलेरखानाच्या सुन्नी सैनीकांनी शिया महिलांची विटंबना करणाऱ्यावर त्यांनी आक्षेप घेतला होता (जो घेण्याची हिंमत शिया सरदारांना दाखवता आली नव्हती) असे विश्वास पाटलांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज दोघेही हिंदू मुस्लिम दोन्ही धार्मिक संस्थांना आर्थिक मदत देत असत.

तात्पर्य काय सर्वधर्मसमभाव ही खरोखरच त्यांची भुमिका होती‌ हे नक्की. मात्र चित्रपटात ती व्यवस्थित दाखवली की तिचे आधुनिकीकरण केले गेले ह्याबद्दल चर्चा होऊ शकते.

त्या काळातल्या व्याख्येनुसार सर्वधर्मसमभाव हे धोरण होते शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज दोघांचेही.
>>>>>

हो, हे बरोबर आहे.
चित्रपटात तसे उल्लेख जाणवतील असे पेरले आहेत. पण तरी ते सत्य देखील होतेच. मुस्लिम धर्मीयांवर अन्याय करणारे हिंदू राजे नसून हे रयतेचे राजे होते हे देखील आणखी अधोरेखीत करायला हवे होते.

म्हणजे "इतका मी कॅरेक्टरमधे शिरलो" वगैरे >>> सिरियसली? या अशा, एखाद्या कलाकाराला न शोभणार्‍या मूर्ख डिस्क्रिमिनेटिव्ह वागण्याला तू 'कॅरॅक्टरमधे शिरणं' म्हणतोस??

एकतर हे असं 'कॅरॅक्टरमध्ये शिरणं' वगैरे तद्दन मुर्खपणा आहे- हे अनेक ज्येष्ठ म्हणतात. पण तो आपला विषय नाहीच. त्याबद्दल नंतर बोलू. 'कॅरॅक्टरमध्ये शिरणं' म्हटलं तरी ते भुमिका करताना असतं ना? की शिवाजीचा रोल केलेलं रायगडाचं नाटक संपल्यावर घरी जाताना पीएमटीमध्ये तुम्ही 'एक शिवनेरी द्या' असं 'भुमिकेत शिरुन' म्हणता?

व्हिलनचा रोल करणार्‍या कलाकाराचा दुस्वास करणार्‍या कलाकाराला काय म्हणावं? सविता दामोदर परांजपे का कुठच्या तरी नाटकात गिरीश ओक आणि संजय मोने यांच्या हिरो आणि व्हिलन अशा भुमिका होत्या. त्यांनी प्रयोग म्हणून एका प्रयोगाआड भुमिका एक्स्चेंज केल्याचं जुवेकरने कधी ऐकलं नसेल का?

तुम्ही नट असता, त्याआधी एक माणूस असता. माणूस म्हणून नीट नसाल तर नट म्हणून कसे आहात तेही अनेक कसोट्यांवर ठरवावं लागेल.

यस साजिरा,
भाच्या खोटे आणि मनोहर लेले चे रोल्स आलटून पालटून करायचे संजय मोने गिरीश ओक !
तो जुवेकर अगदीच इमोशनल फुल असल्या सारखा बोललाय, विकीला संभाजीचा रोल म्हणून मान, उठून उभे रहाणे इ.
उतेकारही अहो ‘राजे’ सबोधत होते मुलाखतीं मधे विकीला Uhoh

उतेकर 'राजांच्या' दिग्दर्शकाच्या रोलात घुसले असतील. Proud आपलंच नशीब आणि काय. 'भुमिकांत घुसणं' आपल्या सटवाईने लिहिलं आहे. '...की जय' म्हणलं की स्वतः शिवाजी आणि आपली आई जिजाऊ असल्याचा भास होतो. या इवल्याश्या जन्मात आणखी काय पाहिजे?

व्हिलनचा रोल करणार्‍या कलाकाराचा दुस्वास करणार्‍या कलाकाराला काय म्हणावं? >> संतोष जुवेकर Happy

एक मला प्रश्न पडतो कुठे सगळ्या कलाकारांच्या मुलाखती ऐकत बसायच्या काही बडबड करत असतात बऱ्याचदा..

त्या काळातल्या व्याख्येनुसार सर्वधर्मसमभाव हे धोरण होते शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज दोघांचेही.>>> +१

इथेच तर लोकं गल्लत करतात... म्हणजे चावा चित्रपटावर ती लोकांच्या काही कमेंट्स आल्या त्यावरन सांगते.
हिंदवी स्वराज्य म्हणजे फक्त हिंदूंचच राज्य अशी शिवाजी महाराजांचे कल्पना होती ..
बहुदा त्यांचे झेंडे हातात घेऊन राजकारण करणाऱ्या लोकांवरून असे समज होत असावेत

साजिरा - ते मी म्हणत नाहीये. कलाकार बर्‍याच वेळा आपण कसे भूमिकेत शिरलो असे सांगत असतात. ते इथे सांगण्याच्या नादात तो तिथपर्यंत पोहोचला असेल सांगतोय मी Happy तो कॅरेक्टरमधे शिरला का याबद्दल मला प्रत्यक्षात मत असायला त्या कॅरेक्टरला जरा तरी फुटेज हवे. तो एक दोन सीन मधे दिसला इतकेच लक्षात आहे.

असे स्पष्टीकरण देताना मला यातला जेफ गोल्डब्लम नेहमी आठवतो Happy
https://www.youtube.com/watch?v=W4fvYCFaa9I

नशीब संतोष जुवेकर जरा कमीच भूमिकेत शिरला. नाहीतर आवेशाच्या भरात मुघलांची भूमिका करणाऱ्या अभिनेत्यांवर तलवार घेऊन चालून गेला असता.

फा, रिसीव्हड् .

जुवेकरने फेबुवर धुरळा उडवलाय. इतकं सिलेक्ट्व्हली मूर्ख असू नये माणसाने.

नशीब तो जुवेकर म्हटलं नाही कि मी फिल्मसिटी मधून घोड्यावरून कळव्याला घरी जायचो शूटिंग संपलं कि .
मला वाटत मूर्खपणापेक्षा तो ओव्हरस्मार्ट पण करायला गेला ,त्याला माहिताय सध्या अशा अडाणीपणाची सद्दी चालीय जरा हात धुऊन घेऊ.हाय काय नाय काय ?

विकी कौशल ने पण असंच काहीस स्टेटमेंट दिलं होत अक्षय खन्ना बाबतीत. दोघ एकमेकांना बघायचं पण टाळत होते. का रोल एकदमच लहान असल्यामुळे हास्यपद वाटतंय.

भूमिकेत शिरणं वगैरे किती झूट आहे हे एका मुलाखतीमध्ये राजशेखरनी सांगितलं होतं. ते तर बाईची अब्रू लुटणाऱ्या खलनायकचे रोल करत असत.

साजिरांची( या वरची पोस्ट) , कंसराज, विकु, हर्पा, फा >>>> सर्वांना Lol Lol

मला तर जुवेकर माबोमुळेच कळाला होता , त्याच्या अस्तित्वाची मनावर कसलीही खूण नाही. Happy

भूमिकेत शिरणं, जगणं हे शब्दशः नसावं. जो काही अर्थ पोहोचतो तो काही अभिनेत्यांकडे पाहून अगदी अगदी वाटतो.
काहींचा तेव्हढा आवाकाच नसेल तर त्यांचे टॉल क्लेम ऐकून अंग बोटभर चिंधी हातभर असं वाटतं.

भुमिकेत शिरणे याबद्दल प्रत्येक कलाकाराचा अनुभव वेगळा असेल ना? काहींना डोळ्यातुन हुकमी पाणी काढता येते तर काहींना ग्लिसरीनची गरज भासते.

काल एक वेब सिरिज बघत होते. त्यातली एक कलाकार एका दृष्यात आवाज न करता म्हणजे हुंदके वगैरे न देता गदगदुन रडत होती. असे रडताना ओठ, हनुवटी, शरीर जसे थरथरते तसेच त्या दृष्यात होते. त्या अभिनेत्रीने तारुण्यात हिंदीत हिरोइनची कामे केलेली आहेत आणि ती अभिनयात नंबर वन म्हणुन अजिबात प्रसिद्ध नव्हती. तरीही ते दृष्य तिने इतके अचुक दिले, ते दृष्य करताना भुमिकेत शिरुन तिने खरेच रडुन तसा इफेक्ट आणला असेल.

जुवेकरची वरची मुलाखत पाहिलेली नाही पण त्याचे मराठीतील काम पाहिलेय. बरे करतो. भुमिकेत शिरतो की कसे हे आता आठवत नाही. मुळात त्याला कुठे पाहिलेय, चित्रपटात की सिरियलमध्ये हेही आठवत नाही, पाहिलेय इतकेच आठवते.

गुरूदत्तच्या बाबतीत त्याच्यावर भूमिकांचा परिणाम झाला होता असे बर्‍याच ठिकाणी वाचले.
दिलीपकुमार यांना पण रडक्या भूमिका न करण्याचा सल्ला दिला होता. त्या पात्राची मानसिक अवस्था समजून घेतल्याशिवाय भाव तरी कसे आणता येतील ? हल्ली राजकीय नेतेच भूमिकेत शिरून टिव्हीवर रडताना दिसतात ते वेगळं. Happy
वरच्या दोघांनी कधी तसा क्लेम केलेला वाचनात नाही आले.

पण उपाखफा न्यायाने काही पिळदार अभिनेते उद्या म्हणतील कि मी बालकलाकार असताना गुरूदत्तने प्यासाच्या भूमिकेसाठी माझ्याकडे मार्गदर्शन घेतलं होतं.

अभिनेते आणि नेते यात फारसा फरक राहिलेला नाही. दोघांनाही कारण नसताना जनता भाव देते. त्यांनी जे काम सातत्याने करणे अपेक्षित आहे ते त्यांनी अधुनमधुन केले तरी जनता त्यांना देव मानते.

भूमिकेत शिरणं तर ठीक आहे पण बाहेर यावं की योग्य वेळेवर. लहानपणी आम्ही महाभारत-महाभारत खेळून झाडूच्या काड्यांचे धनुष्यबाण करून एकमेकांना मारायचो तितके अप्रगल्भ- बालिश वाटतेय हे. मी काही पाहिली नाही मुलाखत, अशा मुलाखती या मुलाखती नसून प्रमोशन असते. ज्या प्रकारे ते एकमेकांची स्तुती करतात 'अहो रूपं अहो ध्वनी'ची आठवण येते. Happy

टॉल क्लेम म्हटलंय ना. काहींचे दावे पटतच नाहीत.
भूमिकेत शिरणे म्हणजे मेथड अ‍ॅक्टींग अपेक्षित असावं.

शा मुलाखती या मुलाखती नसून प्रमोशन असते. >>> +१
मी पण नाही बघत या मुलाखती.

उपाखफा न्यायाने काही पिळदार अभिनेते उद्या म्हणतील कि मी बालकलाकार असताना गुरूदत्तने प्यासाच्या भूमिकेसाठी माझ्याकडे मार्गदर्शन घेतलं होतं. >>> Lol काही सेकंद लागले "पिळदार" चा पीळ सोडवायला पण मग क्लिक झाले Happy

बाय द वे उपाखफा हा मराठी शॉर्टफॉर्म असला तरी वाटतो उर्दू शब्द Happy

अस्मिता - मग "झेंडा" नक्कीच पाहा. १००% रेको. त्यातले संतोष जुवेकरचे काम चांगले आहे. पिक्चरही मस्त आहे.

अशा मुलाखती या मुलाखती नसून प्रमोशन असते >>> हो. आणि या फिल्मी/सिरीज वाल्या लोकांची एक हिंदी-मराठी-इंग्रजी मिश्रीत भाषा तयार झाली आहे. ती ऐकताना फार बोअर होते. "मी हा पिक्चर केला" वगैरे.

'भुमिकेत शिरणं' हे बर्‍याच वेळी नट आणि प्रेक्षक - अशा दोन्ही बाजूंनी चुकीच्या अर्थाने घेतलं जातं. आपण इथंही याबाबत जरा गल्लत करतोय असं वाटतं. 'भुमिकेत शिरण्या' बद्दल अनेकांनी लिहिलंय, बोलले आहेत. आता पटकन आठवलं ते लागूंनी लिहिलेलं 'लमाण'. हे अनेक दृष्टींनी अफाट पुस्तक आहे, ते असो. पण या 'भुमिकेत शिरण्या' बद्दल त्यात जरा विस्ताराने लिहिलं आहे. नसिरुद्दीन सारख्या अनेकांनीही याबद्दल लिहिलंय, बोललेत. 'मेथड' अ‍ॅक्टिंग', मेईस्नर अ‍ॅक्टिंग इ. वगैरे प्रदेश चर्चा करावा लागेल. धागाकर्त्याला धागे काढायची हौस आहेच. या निमित्ताने यावर वेगळा धागा काढला तर चर्चा होईल.

एकाच कलाकृतीतल्या कलाकारांनी एकमेकांशी न बोलणं म्हणजे हे सगळे नट मुर्खांच्या नंदनवनात वावरत असल्याचा साक्षात पुरावा आहे. 'भुमिकेत शिरणं' म्हणजे (अनेकांनी तो मूर्खपणा आहे असं म्हणलं असलं तरी) हे नसतं.

“ पिळदार अभिनेते” - Lol ते स्वतःच्या वडिलांना (खरंच, त्यांनी स्वतः म्हटलंय तसं), अमिताभ, धर्मेन्द्र वगैरेंना सिनियर असल्याने आणि त्यांच्या बायकोच्या शब्दात, ‘त्यांना इतकं ज्ञान आणि अनुभव’ असल्यामुळे एखाद दिवशी “वसंता, असं बघ, कि तुला हा जो कवीचा रोल करायचाय“ असं म्हणून गुरूदत्तची शिकवणी घेतलीच नसेल असं होणार नाही. Wink Happy

Pages