"आई, आपण इकडे का जेवायला बसलो आहोत? झाडाखाली? किडे आहेत इथे! चल ना तिकडे जाऊ सगळे"
भार्गव दहा वर्षाचा होता. मोठ्यांच्या भानगडी समजण्याचे त्याचे वय नव्हते. त्याची मोठी बहिण कोमल सोळा वर्षांची होती. तिला फार काही कल्पना होती असे नव्हे, पण इतके कळत होते की आई योग्य निर्णय घेत असणार.
आई म्हणजे नीलाक्षी, नीला!
नीलाने भार्गवकडे किंचितच कडक नजरेने पाहिले व भार्गव गप्प बसून खाऊ लागला. अधिक कडक नजरेने भार्गवकडे बघणे किंवा त्याला काही कडकपणे बोलणे योग्य नाही हे नीलाला माहीत होते. मात्र भार्गव गप्प बसल्यावर डोळ्यात किंचित पाणी आले आणि नीलाने नवर्याकडे, मेजरकडे चुटपुटत पाहिले. तिच्या नवर्याला गंमत म्हणून सगळे मेजर म्हणत. मेजरनेही मान खाली घातली. कोमल गपचूप खाऊ लागली.
पलीकडे काही अंतरावर जल्लोष सुरू होता. नीलाच्या सख्ख्या मोठ्या बहिणीच्या मुलाच्या लग्नाचे रिसेप्शन होते. एकीकडे प्रशस्त पसरलेला बुफे, एकीकडे एक जाद्ञ्गार जादू करून दाखवतोय, एकीकडे मैदानात दिड-दोनशे लोक भोजनाचा आस्वाद घेत गप्पा झोडतायत, एकीकडे मुलाचे आणि मुलीचे मित्र-मैत्रिणी नवीन गाण्यांवर नाचतायत आणि एकीकडे नीलाची बहिण आणि तिचे मिस्टर सगळ्यांची विचारपूस करतायत.
फक्त नीलाचे कुटुंब बुफेमधून मोजके पदार्थ व एक स्वीट डिश ताटात घेऊन इकडे एका अंधार्या झाडाखाली असलेल्या पारावर बसून जेवण करत होते.
जेवण मस्त होते. वादच नाही. दोन्हीघरचे तगडे श्रीमंत होते. तसे तर श्रीमंतीचा, चवीचा आणि जेवण आवडण्याचा काही संबंध नसतोच, पण तो अलीकडे लावला जातो. मात्र हे जेवण खरोखरच सुग्रास होते. मेन्यू ठरवताना तर नीला ताईबरोबर खूप अॅक्टिव्ह होती. नीलाला ते आठवले. ते आठवण्यासोबतच असेही वाटले की आपण इथे यायला तरी हवे होते की नको होते!
आलोच नसतो तर वाईट दिसले असते या विचाराने नीलाने निदान रिसेप्शनला तरी येण्याचा निर्णय घेतला होता. मेजरचा जरा सौम्य विरोध होता, पण नीला म्हणाली होती की असे प्रसंग कुठे सारखे येतात? नाही गेलो हे डोळ्यांवर येईल. भार्गव आणि कोमलला खूप एन्जॉय करायचे होते, पण पलीकडे चाललेल्या जल्लोषात भाग घ्यायचा तरी कसा हा प्रश्न कोमलला पडला होता. भार्गवला आशा होती की त्याची आई निदान त्याला तरी डान्स फ्लोअरवर जायची परवानगी देईल.
"चला, झाले का?"
मेजरने नीलाकडे व मुलांकडे बघत उगीचच विचारले. नीलाने निरर्थकपणे मान हलवत डिश झाडाच्या पारावर ठेवली. मग कोमलनेही ठेवली. खरे तर कोमल पोटभर जेवलीच नव्हती. मेजरचे जेवण आधीच झालेले होते. मेजर मोठा शिस्तीचा! स्वतः शिस्त पाळणार आणि शिस्त न पाळणार्यांना अद्दल घडवण्याची हिम्मत दाखवणार! मात्र त्याला आत्ता कशातच रस नव्हता. हे कसले लग्नाचे जेवण, मेजरच्या मनात येत होते. भार्गव डान्स फ्लोअरवर नाचणारी त्याची सगळी भावंडे पाहून एकेक घास खात होता. त्याला किंचितशी घाई करत नीला म्हणाली:
"चला भागोबा, उशीर झालाय, चला पटकन् पार्किंगकडे"
"आई, मावशी का रडतीय? लग्न म्हणजे चांगले असते ना?"
नीलाने भार्गवला थोपटले व चुचकारले.
हळूहळू सगळे उठले आणि पार्किंगकडे गेले.
गेले अनेक दिवस पाऊस पडत होता. विचित्र मोसम होता. आकाश आणि नीलाचे डोळे यांना आज एकाचवेळी एकच काम सुचले होते. मेजर नीलाला थोपटत होता. कोमलला कळत होते की इतके जवळचे नाते असूनही मावशी आणि तिच्या घरच्यांनी साधी विचारपूसही केली नाही. भार्गवला तेही कळत नव्हते.
मेजरने नेहमीप्रमाणे ड्राईव्ह वे मधून सुळसुळीतपणे गाडी बाहेर काढून रस्त्यावर आणली.
"आलो नसतो तरी चालले असते"
मेजर हळूच पुटपुटला खरे, पण नीलाने ते व्यवस्थित ऐकले. एरवी नीला उसळून काहीतरी म्हणाली असती. मात्र आज तिच्या तोंडात वेगळे उद्गार आले.
"ताईची साईबाबांवर अपार श्रद्धा आहे ना! म्हणून आपण पत्रिका तिथे ठेवायला गेलो लग्नाची! ताईला लग्नाच्या गडबडीत वेळ होणारच नव्हता. आता एवढे केल्यावर निदान लग्नाला तरी जायलाच हवे ना?"
"ते ठीक आहे, पण बघितलेही नाही आपल्याकडे"
"जाऊदेरे मेजर, परत येताना आपण सगळे अपघातातात मेलो नसतो तर आज आपणच ताईसोबत आगतस्वागत करत असतो ना?"
=====
-बेफिकीर'!
छान कथा ...
छान कथा ...
अनपेक्षित शेवट ...
लग्नपत्रिका वाटायला गेले असता नवरदेव किंवा नातेवाईकांचा अपघाती मृत्यू झाल्याच्या बातम्या वृत्तपत्रात नेहमी येतात .. कथा वाचून त्या आठवल्या ...
शप्पथ सांगतो बेफि, ऑफिसात
शप्पथ सांगतो बेफि, ऑफिसात बसुन वाचत होतो कारण मिटिन्ग मधल्या वादावादि ने डोके उठले होते...कंटाळा पण आलेला, झोप येत होती....आणि शेवटच्या वाक्याला खाड्कन झोप उडाली...
सिम्पल बेफि टच.... !
छान लिहिली कथा , कथेचा शेवट
छान लिहिली कथा , कथेचा शेवट धक्कादायक होता.
मस्त
मस्त
मला शेवट निट समजला नाही.
मला शेवट निट समजला नाही. पत्रिका ठेवायला कधी, कुठे गेले होते ? आणि परत येताना म्हणजे ?
भारीच....
भारीच....
मस्त एकदम!!!!
बाय द वे; गाडीचं पण भूत झालय काय?
छानच.. शेवट अगदि अनपेक्षित..
छानच.. शेवट अगदि अनपेक्षित.. मला वाटलं ते असे जेवत आहेत कारण सेना मधील काम बहिणीला कमीपणाचे वाटत असेल म्हणुन त्या कुटुंबाला कोणी जास्त विचारल नाहि.
Pages