रामायण - एक राजकीय प्रवास भाग - १

Submitted by अविनाश जोशी on 23 August, 2024 - 02:57

सीतेचे हरण केल्यामुळे राम- रावण युद्ध झाले हा चुकीचा समज आहे. बहुतेक रामायणाच्या सर्व प्रकारच्या प्रतीमधून एक गोष्ट निश्चित आहे. श्रीराम अवतार मुळातच रावण वधासाठी झाला होता. या लेखात काही दंत कथा, पुराणोक्त कथा आणि वेगळे विचार मांडले जाऊ शकतात.
त्याकाळी आर्यावर्त म्हणून समजला जाणारा भाग अफगाणिस्थानपासून (गांधार देश) ते ब्रह्मदेशाच्या पूर्वेपर्यंत आणि विंध्य पर्वताच्या उत्तरेपासून ते स्वर्ग देशा पर्यंत पसरला होता. हा स्वर्ग म्हणजे स्वर्ग - नरक मधला नव्हे. स्वर्ग नावाचा देश तिबेटच्या आसपास कुठेतरी होता. चिनी लोककथांमध्ये सुद्धा शांग्रीला असे राज्य मानले गेले आहे. अनेक राजांनी या स्वर्गावर स्वारी केली आहे. इंद्र याचा अर्थ प्रमुख आणि त्या राज्यातला प्रमुख म्हणजे देवेंद्र किंवा इंद्र. प्रमुख या अर्थाने इंद्र हा शब्द अनेक वेळा वापरला जातो जसे नरेंद्र, राजेंद्र, गजेंद्र इत्यादी.. राजाला तेच नाव ठेवण्याची प्रथा बऱ्याच ठिकाणी आढळते. थायलंड मध्ये रामा १, रामा २ असे बरेच राजे होऊन गेले तर इंग्लंडच्या राजघराण्यात राजाला एडवर्ड, जॉर्ज अशी ठराविक नावे असतात. रघुकुलामुळे आणि भौगोलिक परिथितीमुळे अयोध्या हे तत्कालीन सामर्थ्याचे केंद्र बिंदू होते. त्यामुळे रामाचा अवतार तेथेच होणे जरुरीचे होते.
यात एक अडचण होती की दशरथाच्या पत्रिकेत पुत्र योग नव्हता , अर्थात दशरथ निपुत्रिक मात्र नव्हता. त्याला एक मुलगी होती आणि ती त्याने आपल्या एका मित्राला दान म्हणून दिली होती. त्या राजाने या मुलीचे लग्न ऋष्यतुंग नावाच्या मुनीशी केले होते.
राम कथेत वसिष्ठ, विश्वामित्र आणि कैकयी यांचे महत्व अनन्यसाधारण होते. कैकयी ही अत्यंत महत्वाकांक्षी असून ती युद्धनिपुण आणि अत्यंत मुत्सद्दी स्त्री होती. वसिष्ठ आणि विश्वामित्रानंतर राम अवताराकरिता असंख्य ऋषींची , अस्त्रांची आणि मदतनीसांची अभेद्य फळी उभी केली होती. या दोन ब्रह्मऋषिनी कथेतील पात्रांना कळसूत्री बाहुली प्रमाणे हलवले आहे. दशरथ राजा वनात शिकारीला गेला आणि त्याच्या हातून श्रावण बाळाचा वध झाला. श्रावण बाळाच्या वडिलांनी दशरथाला तू पुत्रशोकानी मारशील असा शाप दिला. आता हा शाप जर खरा व्हायचा असला तर दशरथाला पुत्र होणे अपेक्षित होते. या ब्रह्मऋषिनी पुत्र कामेष्टी यज्ञाचा संकल्प केला. या यज्ञाचे पौरोहित्य मात्र ऋष्यतुंग या मुनींना करावयास भाग पडले. या यज्ञातील पायसामुळे तीन राण्यांना चार पुत्र तर वाऱ्याने एक भाग नेल्यामुळे आणि नंतर तो अंजनीला प्रदान केल्यामुळे हनुमान जन्माला आला. इथे हे लक्षात ठेवण्यासारखे आहे की दरशरथाला पुत्र योग नव्हता हे लक्षात ठेऊन दशरथाशिवाय हे पुत्र दाशरथी झाले. याच पायसातला एक भाग घारीने आणि नंतर वायूने अंजनीला दिला तरी हनुमानाला दशरथ पुत्र संज्ञा नाही. त्याला वायूपुत्रच म्हटले गेले आहे. या कथित योगामुळे वसिष्ठानी एका दाक्षिणात्य प्रजातीला नकळत आपले केले..... अपूर्ण ...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुळ रामायणाच्या नकला करताना लिहिणार्‍यांनी त्यात नमक स्वादानुसार तसे कथा श्रद्धेनुसार घुसडल्या. आता झेरोक्स मशिनचा शोध लागल्याने यापुढे असे घडणार नाही यावर आपण श्रद्धा ठेऊयात.

वर पर्णिका यांनी एक चौपाईचा उल्लेख करुन ती चौपाई लिहिणार्‍या माणसाच्या काळातला समाज किती खालावला असेल याबद्दल भाष्य केले. इतक्या खालावलेल्या समाजाला समजावण्यासाठी रामाला जास्त शक्ती त्याच ग्रंथात दिलेली असेल असत्यांना म्हणायचे आहे असे मला वाटले. कदाचित त्यांना काही वेगळे म्हणायचे असेल.

नारायण यांचे उत्तर आवडले. मला हा पुर्ण संदर्भ माहित नव्हता.

ते वाचताना मनुस्मृती आठवली. नारी संदर्भात ही चौपाई जशी प्रसिद्ध आहे तसेच मनुस्मृतीमधले न स्त्री स्वातम्त्र्यम अहर्ती हेही प्रसिद्ध आहे आणि यावरुन झोडपले जाते. सध्या युगांत वाचतेय. भीष्मावरील लेखात इरावती कर्व्यांनी लिहिलेय की ‘ज्या कुळातील वधु अश्रु गाळतात, त्यांचा तळतळाट होतो ती कुळे नाश पावतात, जिथे स्त्रीला सन्मानाने वागवले जाते तिथे देवता वास करतात असे मनुस्मृतीत लिहिलेय जे कुरु कुळाकडे पाहुन पटते.’

मनुस्मृतीत हे लिहिलेय म्हणजे त्या काळी (मनुस्मृती महाभारतानंतरची आहे) हा समज प्रचलीत होता आणि अर्थात कुलक्षय कोणासही नको असल्याने स्त्रियांना थोडेफार तरी माणसासारखे वागवले जात असे असा निष्कर्ष काढला जात नाही पण न स्त्री… वाचुन मनुस्मृतीचे वाभाडे मात्र काढले जातात.

मुळातुन असले तर ते संस्कृत मधुन असतील ना? मग ते काय कळणार?

मराठीत भाषांतरीत असतील तर वाचायला आवडेल. बिओसि चे संशोधीत महाभारतही संस्कृतातुन मिळाले पण मला काय कळणार.

मुळ भाषांतर अमेझोन किंवा इतरत्र असेल तर लिंक द्या. खुप लिंक्स मिळतात पण त्यात सजावट जास्त असते. ती नकोय.

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अधिकृत भाषांतर शोधून वाचा.
हिंदीत समग्र वाल्मिकी रामायण आहे. संस्कृत आवृत्ती सुद्धा आहे. जी भाषा आवडेल तिच्यावर क्लिक करता येते. इंग्रजीत सुद्धा उपलब्ध आहे.

संस्कृत हिंदी दोन्ही भाषेत श्लोक या फॉर्म मधेही आहे.

क्षमस्व! लिंक स्वतः शोधा. इतर लेखकांचे दाखले देण्याऐवजी मूळ वाचायचा सल्ला आहे. अशी सक्ती करता येत नाही. पटले तर घ्यावे..
लिंक शोधून देण्याइतका वेळ नाही. कदाचित सहा महिने थांबावे लागेल.

मुळ रामायणाच्या नकला करताना लिहिणार्‍यांनी त्यात नमक स्वादानुसार तसे कथा श्रद्धेनुसार घुसडल्या. आता झेरोक्स मशिनचा शोध लागल्याने यापुढे असे घडणार नाही यावर आपण श्रद्धा ठेऊयात.>>>चूक. आता इथेच तुमच्या समोर अविनाश जोशी यांनी रामायणाची सुधारित आवृत्ति काढली आहे. सिरिअसली घेण्यासारखे काही नाहीये. ह्यांनी आधीही एक आवृत्ती काढली होती. त्यावर वाचकांनी शेकड्याने विनोदी प्रतिसाद देऊन धमाल केली होती. हहपुवा रामायण.

साधनाताई
यांना नक्कल म्हणवत नाही. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ ( हेच नाव आहे का पहा) च्या रामायणात श्लोकांचे मराठी भाषांतर आहे. त्यात मूळ भाषेऐवजी भरीचा शब्द असेल तर तसे म्हटलेले आहे. यात अगदी त्रोटक घटना आहेत. त्या वाचल्यानंतर इतर लेखकांना त्या फटी बुजवाव्याशा वाटल्या असतील. ही गोष्ट अनेक दाखल्यांनी सिद्ध करता येते. त्यासाठीच मूळ रामायण वाचा असे म्हटले.

मूळ रामायणानुसार रूमी आणि तारा यांचा संबंध काय हे समजत नाही. मग प्रादेशिक रामायणात (यातल्या काही आवृत्त्या प्रमाणित आहेत, पुन्हा प्रमाणित कुणी केल्या ?) रूमी आणि तारा या बहीणी आहेत. मूळ रामायणात हा भाग महत्वाचा नाही. पण जेव्हां कथासप्ताहात बुवा रसाळ वाणीने रामायण सांगू लागतात तेव्हां ते एकेका प्रसंगाचे निरूपण करताना आपली प्रतिभा पणाला लावत असतात तसाच हा प्रकार.

माझे वैयक्तिक मत विचाराल तर जग छोटंसं असताना पराक्रमाची, आदर्शवादाची ही कथा सर्वत्र होती जिची संस्करणे सर्वत्र पोहोचली. मूळ कथाकाराने खूप खूप वर्षांपूर्वी अशी पार्श्वभूमी घेतली असेल तर इसपू चारशे वर्षांपूर्वी वाल्मिकी ऋषी खूप खूप वर्षांपूर्वी म्हणतात म्हणून ते किती कर्षांपूर्वी हे समजणार नाही. त्यासाठी आयुधांचा इतिहास, लिप्यांचा इतिहास ताडून पहावा लागेल.

हाहा केकु

सुदैवाने प्रमाण कशाला म्हणावे याची एसोपि आहे.

@साधना, मन:पुर्वक धन्यवाद. तुमच्या प्रतिसादामुळे मला कम्युनिकेशन मधली गॅप नेमकी समजली. काल नारायण ह्यांच्या कमेंट मधल्या नेमका संबंध काय ह्या प्रश्नाचा मला अर्थच लागत नव्हता.

हा सगळा गोंधळ स्त्री आणि शुद्र ह्यांच्या चौपाईतील समावेशाने झाला आहे. मी पुर्ण वेळ 'पशु' ह्या एकमेव एंटिटीवर फोकस होते. फॉर द रेकॉर्ड मला काय म्हणायचे होते ते जरा विस्ताराने मांडते.

संत तुलसीदास हे थोर संत होते. इस्लामी सत्ता पीक वर असताना तत्कालीन ऐत्तदेशीय समाजात निर्नायकी आणि दुफळी माजली होती. त्यांना एकत्र ठेवण्याचे आणि "फॉर द ग्रेटर गुड " बघण्याची शिकवण तुलसीदासांनी दिली. जवळ जवळ आपल्या कडे संत रामादासांनी जे कार्य केले तसेच कार्य तुलसीदासांचे आहे. ह्या दोघांनी "राम" आणि "हनुमान" हे आपले आराध्य दैवत मानले हा मला योगायोग वाटत नाही.
हे सगळे असले तरी इतर कुणाही थोर पुरुषांप्रमाणे, he was the product of his time.‌ त्या काळी सामान्य पणे ढोल हा जसा बडवण्यासाठीच असतो तसाच पशु (फॉर दॅट मॅटर स्त्री आणि शुद्र सुद्धा) हा समज सर्वमान्य होता. म्हणुनच करुणा सिंधु राम देखील ह्या विधानाला आक्षेप घेत नाही. कारण भुतदया, animal rights, इ. मुल्य त्या काळी अस्तित्वातच नव्हती. त्यामुळे साक्षात भगवंताने‌ एखाद्याला पशु मानले तर त्याचा वध करणे हे तुलसीदास आमच्या दृष्टीने तर्कसंगत कृत्य आहे.
पण सध्या वनवासात असणारा आणि वालीच्या वनात वेस्टेड इंटरेस्ट असलेला अयोध्येचा राजपुत्र म्हणून रामाकडे बघितले तर एखादा योद्धा बेसावध असताना, दुसर्या कुणाशी तरी लढण्यात गुंतला असताना दुर अंतरावरुन बाण सोडुन त्याचा वेध करणे हे एथिकल कॉंप्रमाइज वाटते.

अर्थात राज ह्यांनी लिहलय तसा ह्याचा वेगळ्या दृष्टिकोनातून विचार केला जाऊ शकतो. थोडक्यात हा open to interpretation असा प्रसंग आहे. ह्या विषयाला इथे पुर्णविराम देणे संयुक्तिक ठरेल.

@ रघु आचार्य , तुमच्या सविस्तर पोस्ट्स साठी धन्यवाद. रामायणाची जवळ जवळ २००० वर्षांपूर्वी ची प्रत आज उपलब्ध आहे हे फार भारी आहे. तुम्ही दिलेल्या दिशेने शोधाशोध करते.

रामायणाची जवळ जवळ २००० वर्षांपूर्वी ची प्रत आज उपलब्ध आहे हे फार भारी आहे.>>>असे मी कुठे म्हटलं आहे? मुळातून याचा अर्थ मूळ वाल्मिकी मायणानुसार. त्याची ती प्रत उपलब्ध नाही.

रामचरितमानस 500 वर्षापूर्वीची अस्सल प्रत उपलब्ध आहे. काही ठराविक दिवशी तुम्हाला ती पाहता येते.

<<<वाल्मीकी रामायणाची लिखित प्रत ही दुसर्‍या शतकातली आहे. जेव्हां समुद्रगुप्ताने वेद, पुराणे, महाकाव्ये लिहून घेतली.>>>

ही प्रत उपलब्ध नाही का आज? इसचे दुसरे शतक म्हणजे १८०० वर्षांपूर्वी लिहिलेली प्रत असा माझा समज झाला.

ती प्रत टिकून राहणे शक्य नाही. त्या वेळी कागद भारतात आलेला नव्हता.
शिष्य किंवा अनुयायी स्वतःच्या अक्षरात तो ग्रंथ उतरून काढत. ती पुढची अस्सल प्रत समजली जायची अशी त्या काळची प्रथा होती.
तुलसीदास यांच्या काळात कागद होता.

प्रत म्हणजे कागद किंवा भुर्ज‌‌‌ पत्रावर लिहलेली प्रत अपेक्षित नव्हती. पण १८०० वर्षांपूर्वी जो मजकूर लिहिला गेला त्यात नंतर काही बदल किंवा ऍडिशन‌न होता तो मजकूर जसाच्या तसा उपलब्ध आहे असं जर असेल तर ते फार अमेझिंग आहे. महाभारताची सर्वात जुनी प्रत म्हणजे उपलब्ध मजकूर (भांडारकर संस्थेची प्रत) तो १००० वर्षांपूर्वी चा आहे. त्या तुलनेत हे अमेझिंग वाटले.

भांडारकर संस्थेने उपलब्ध प्रतींनुसार "अस्सल" प्रत बनवली आहे. आणखी एका संस्थेने बनवली आहे. लक्षात नाही. त्यासाठी जुन्यात जुनी प्रत उपलब्ध असेल तरी मूळ प्रत आणि 1000 वर्षे पूर्व प्रत यातील सुमारे 800 वर्षे अंतर महत्त्वाचे आहे. या काळात परंपरेने ते जतन केले असेल. हे भांडारकर किंवा दुसरी संस्था अचूकपणे आणि अधिकृतपणे सांगतील. आपण फक्त अंदाज करू शकतो.

नक्कल प्रत जी नंतर अस्सल ठरते तिच्यात काही बदल झाला असेल तर कसा समजणार हे माहिती नाही. कदाचित कुणाच्या तरी मार्गदर्शनाखाली असे काम चालत असणार. ते आचार्य वगैरे अधिकारी लोक प्रत प्रमाणित करत असावेत.

चीन मधे अन्य भारतीय ग्रंथांच्या अशा प्रती जतन केलेल्या आहेत.

नक्कल प्रत जी नंतर अस्सल ठरते तिच्यात काही बदल झाला असेल तर कसा समजणार हे माहिती नाही. कदाचित कुणाच्या तरी मार्गदर्शनाखाली असे काम चालत असणार. ते आचार्य वगैरे अधिकारी लोक प्रत प्रमाणित करत असावेत.>>>>

युगांत मध्ये इरावतीबाईंनी बिओसिने कसा अभ्यास केला व उपलब्ध सर्ब प्रतींना एकमेकांशी ताडुन पाहुन त्यातले मुळ काय व घुसवलेले काय हे कसे शोधले ह्याचे संक्षिप्त पण नेटके विवेचन केले आहे.

मला गंमतीशीर वाटलेला भाग म्हणजे उत्तरेकडची प्रत जेव्हा दक्षिणेत गेली तेव्हा सुरवातीच्या नकला सारख्याच होत्या पण हळुहळु कसे बदल झाले त्याचा उल्लेख. उत्तरेकडील प्रतीत दुश्यंत-शकुंतला, ययाती-शर्मिष्ठा याण्चे लग्न नाही पण दक्षिणेतल्या काही प्रतीत लग्नही लावले व भटांना दक्षिणाही दिली…सत्यवती-पराशराचेही लग्न लावले.. तिथल्या मान्य रुढी लिखाणातही उतरल्या, समाजमान्य नसलेले हद्दपार झाले.

रामायणावर असा अभ्यास झालेला नाही का?

भांडारकरची महाभारताची संशोधित आवृत्ती माहीत आहे. रामायणाची बहुतेक नाहीये. विवेक देबरॉयने आणि रामायणाचा अनुवाद बडोदा ओरिएंटल इन्स्टिट्युटच्या संशोधित आवृत्तीवरून केलाय. महाभारतासाठी त्याने भांडारकर वापरलेले.

आपण यावर काथ्याकूट करण्यात अर्थ नाही. मायबोलीवर इतिहासाचे अभ्यासक असतीलच.

नक्कल, संस्करण आणि आवृत्ती यात गोंधळ होतोय बहुधा.
संस्करणामधे त्याच कथेची वेगळी पटकथा असते. जशी रामायणाची सर्वात जुनी अस्सल संस्कृत संस्करणाची प्रत उपलब्ध आहे. ती कंब रामायण.
कंब ऋषींनी जे रामायण लिहीले त्यात काही ना काही प्रक्षेप आहेत. कदंब रामायणात काही आहेत.

नक्कल ला पर्यायी शब्द सापडला नाही. त्या काळात सायक्लोस्टाईल, झेरॉक्स नसल्याने नष्ट होणार्‍या भूर्जपत्रावरचा मजकूर पुढे जतन करण्यासाठी ते पुन्हा लिहीणे हा एकमेव पर्याय असेल. रामायण , महाभारताच्या संदर्भात नाही पण अन्य ग्रंथांच्या बाबतीत हे वाचलेले आहे.

कापडावर लिहीत होते का ? कुठल्या काळात, भारतात कागदाचे आगमन कधी झाले हा एक स्वतंत्र विषय आहे. सध्या तरी इतका वेळ नाही म्हणून थांबतो.

बडोदा ओरिएंटल इन्स्टिट्युटच्या संशोधित आवृत्तीवरून >>> बरोबर. महाराज सयाजीराव गायकवाडांच्या पुढाकाराने.

अनेक रमायणे आज उपलब्ध आहेत पण त्यापैकी वाल्मिकी रामायण आणि तुलसीदासांचे रामाचरितमानस विशेष प्रसिद्ध आहेत, पैकी सध्या रामचरितमानस समाजमनात विशेष स्थान राखून आहे. पण जर तार्किक दृष्ट्या विचार केला तर वाल्मिकी रामायण अधिक विश्वासार्ह मानावं लागतं, कारण ते वाल्मिकी ऋषींनी श्रीराम हयात असताना लिहिलं होतं. पण यातही काळानुसार बदल केले गेल्याची दाट शक्यता आहे.

सध्या ज्या रामायणाला वाल्मिकी रामायण म्हटले जाते, त्याची भाषा बऱ्यापैकी आधुनिक संस्कृत आहे. आर्ष संस्कृत तर अजिबात नाही. त्यामुळे ते रामायण - मूळ लेखी सापडलं असो वा नसो - बऱ्यापैकी अर्वाचीन आहे हे उघड आहे.

वरती यत्र नार्यस्तु हे वेदात असल्याचे कुणीतरी लिहिले आहे, तेही बरोबर नाही. ती भाषाही आर्ष नाही. तो श्लोक मनुस्मृतीत येतो, वेदात नाही. भाषेवरून मनुस्मृती वेदांपेक्षा फारच आधुनिक आहे हे लक्षात येते.

तिथे वेद या शब्दाचा वापर चतुर्वेदांपैकी एखादा अशा अर्थाने केला नसून सर्व शस्त्र, पुराण, स्मृती इ. साठी ढोबळ शब्द म्हणून केला आहे. हिंदू धर्माचा गाभा वेद असल्याने त्यांच्या आधारावरच हिंदू धर्माची अर्थात वैदिक धर्माची स्थापना झाली आहे आणि वेदांतील ज्ञानालाच अधिक विस्तृत करून इतर हिंदू साहित्यात जसे की पुराण, शास्त्रे, उपनिसषदे, स्मृती इत्यादींमध्ये मांडल्यामुळे या सर्वांचा उल्लेख एकत्रित पणे अनेक वेळा वेद असा केला जातो.

वेदांतील ज्ञानालाच अधिक विस्तृत करून इतर हिंदू साहित्यात जसे की पुराण, शास्त्रे, उपनिसषदे >>> प्रत्येक वेदामध्ये चार पोटभाग असतात - संहिता, ब्राह्मणे, अरण्यके आणि उपनिषदे. संहितेत प्रामुख्याने कर्मकांड, त्यांचे विधी इत्यादी माहिती असते. ब्राह्मणात त्याचेच अधिक सखोल विवरण असते. अरण्यके आणि उपनिषदे यात प्रामुख्याने तत्वचिंतन असते.

त्यामुळे वेदांतले ज्ञान उपनिषदात विस्तृत करून सांगितले आहे हे विधान काहीसे चुकीचे आहे. वेदात जे काही ज्ञान आहे तेच मुळी अरण्यके आणि उपनिषदे यांत आहे. बाकी संहिता ही प्रामुख्याने यज्ञ आणि बाकी कर्मकांड यांच्याशी संबंधीत आहे.

Pages