महिला दिन आणि साहिर एक काव्यात्मक नाते

Submitted by किंकर on 8 March, 2023 - 20:31

महिला दिन आणि साहिर एक काव्यात्मक नाते

आज आठ मार्च .........

सूर्य मावळतीकडे झुकला आणखी एक दिवस संपला . सामाजिक माध्यमांनी ( सोशल मीडिया ) जागतिक महिला दिन अधिकृत पणे साजरा केला. आपण सर्वांनी स्री शक्ती च्या विविध रूपांना वंदन केले. दिवस मावळला आणि लोकांचे लक्ष उद्याकडे लागले.

स्त्रियांच्या प्रश्नाकडे शासन कर्त्याचे लक्ष वेधण्यासाठी १९११ साली युरोपातील काही भागात ज्या चळवळीने आकार घेतला तो दिवस होता आठ मार्च . तेंव्हा पासून जगाच्या नकाशावर कुठे ना कुठे स्त्रियांच्या प्रश्नांवर आवाज उठू लागले. १९७५ साली संयुक्त राष्ट्र संघाने आजचा दिवस ' जागतिक महिला दिन ' म्हणून अधिकृत पणे साजरा करण्याचे नक्की केले .

भारतामध्ये या दिवसाकडे पाहताना स्त्रियांच्या प्रश्नाकडे पाहताना ,अगदी आदिशक्ती म्हणून तिची ताकद मान्य करीत जिजामाता , ताराराणी, झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर असा इतिहासातून सुरु झालेला प्रवास सावित्रीबाई फुले , आनंदीबाई जोशी यामार्गाने जात अगदी कल्पना चावला इथपर्यंत गगनभरारी घेतो.

इतकी नावे घेतली तरी सर्व कर्तबगार स्त्रिया आणि त्यांची क्षेत्रे यावर भाष्य झाले असे म्हणता येत नाही तसेच जेंव्हा आपण माया त्यागी , निर्भया , श्रद्धा या प्रवासाकडे वळतो तेव्हा या महिला दिनाच्या सायंकाळी मन सैरभैर होते .

स्त्री शक्ती मान्य आहे पण जोपर्यंत ती पुरुषी अहंकाराची पुरेशी दखल घेत प्रगती करते आहे तोपर्यन्तच ....
असा एक छुपा अजेंडा जपणारे सत्ताधीश , मग ते राजे राजवाड्यात राहणारे असोत किंवा अगदी स्त्रियांच्या मतावर निवडून येत नंतर त्याच्याकडे दुर्लक्ष करणारे राजकारणी असोत सर्वजण या अहंकाराच्या बाबत एकाच माळेतील मणी ठरतात .

आज जागतिक महिला दिन सांगता करताना पाकव्याप्त काश्मीर मधील तालिबान्यांचे फर्मान काय सांगते चला परत मध्य युगाकडे ,'चला -बुरखा घाला ' असे सांगत धर्मांध जसे स्त्रियांच्या हक्कांवर गदा आणत आहेत . तसेच ३३ टक्के आरक्षण देताना , 'महिला सरपंच नावाला आणि नवरा मलिदा खायला ' या सूत्राने सत्ता नियंत्रण ठेवणारे पुढारी हे दोन्ही स्त्रियांच्या मार्गातील अडसरच आहेत.

या सर्वांवर उपाय काय तर या धर्मांधतेचा बुरखा फाडणे . समान संधी उपलब्ध करून देणे . आणि समाजात जागरूकता निर्माण करणे . आणि या जागरूकतेची गरजेतूनच आपण जागतिक पातळीवर आजचा दिवस साजरा करीत आहोत. अशी जागरूकता प्रत्येकला स्वतः करता येईलच असे नाही , मग असे काम ज्यांनी केले आहे ते त्यांचे काम लोकांच्या समोर पोचावणे इतके तर आपण नक्की करू शकतो .
आणि तसा प्रयत्न मी आज एका वेगळ्या प्रकारे करीत आहे .

१९११ साली युरोपात सुरु झालेली स्त्री हक्काची चळवळ, त्यास १९७५साली जागतीक स्तरावर मिळालेली मान्यता ,या काळाचा विचार केला तर, या कालावधीचा साक्षीदार ठरेल अस एक सिद्धहस्त व्यक्तिमत्व मला प्रकर्षाने आठवणीत येते . १९२१ रोजी आजच्या आठ मार्च या दिवशी जन्मलेल्या या व्यक्तिमत्वाचे नाव आहे -' साहिर लुघियानवी '
या कवीने त्याच्या शब्दावरच्या हुकमतीने १९८०पर्यंत चित्रपट सृष्टीवर साम्राज्य केले. पण आजच्या जागतिक महिलादिनी मला साहिरजींची प्रकर्षाने आठवण झाली याचे प्रमुख कारण म्हणजे सामाजिक प्रश्नांवर ,धर्मांध वृत्तीवर आणि स्त्रियांच्या समाजातील स्थानावर त्यांनी केलेले भाष्य . आणि असे भाष्य करताना त्यांनी वापरलेले माध्यम आहे - काव्य.

राजकारणाचा बुरखा पांघरून सत्ताकारणाचा खेळ करत स्त्रीकडे फक्त आणि फक्त एक साधन ( वस्तू ) म्हणून बघणाऱ्या समाजाला ते विचारतात -

जिन्हें नाज़ है हिंद पर वो कहाँ हैं
कहाँ हैं, कहाँ हैं, कहाँ हैं
प्यासा या चित्रपटासाठी लिहलेले हे गीत म्हणजे एक चित्रपट गीत नसून आपल्या डोळ्यात अंजन घालणारे एक कालातीत सत्य आहे या गीताचा शेवट करण्या पूर्वी हा प्रश्न कोणा एकचा नाही ,कोणत्या एका धर्माचा /जातीचा नाही तर स्त्री पुरुष भेद भावाचा आहे याची जाणीव करून देतात . आणि हे वास्तव स्पष्ट करताना ते म्हणतात -
मदद चाहती है ये हवा की बेटी
यशोदा की हम जीन सी, राधा की बेटी
मदद चाहती है ये हवा की बेटी
यशोदा की हम जीन सी, राधा की बेटी
पयम्बर की उम्मत, झुलेखा की बेटी
जिन्हें नाज़ है हिंद पर वो कहाँ हैं
कहाँ हैं, कहाँ हैं, कहाँ हैं

आणि या संपूर्ण सामाजिक प्रश्नांची धार तीव्र करण्यासाठी शेवटी हे वास्तव पाहण्यासाठी डोळे उघडे ठेवून ते बघण्याचे निमंत्रण देताना ते म्हणतात -
ज़रा मुल्क के रेहबरों को बुलाओ
ये कुचे, ये गलियाँ, ये मंजर दिखाओ
जिन्हें नाज़ है हिंद पर उनको लाओ
जिन्हें नाज़ है हिंद पर वो कहाँ हैं
कहाँ हैं, कहाँ हैं, कहाँ हैं

इतक्या आत्मीयतेने स्त्री प्रश्नावर लिहणारा हा कवी त्याच्या दुसऱ्या एका गीतात , मी माझ्या माया त्यागी ते श्रद्धा वालकर या सैरभैर करणाऱ्या प्रश्नाकडे आपण ज्या दृष्टिकोनातून पाहतो त्या पेक्षा किती वेगळ्या दृष्टिकोनातून स्त्री पाहते याची वस्तुस्थिती मांडताना त्याची लेखणी हि फारच धारदार बनते आणि शब्द उमटतात -
औरत ने जनम दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाज़ार दिया
जब जी चाहा मसला कुचला, जब जी चाहा धुत्कार दिया
औरत ने जनम दिया मर्दों को

या संपूर्ण गीताची रचना जस जशी पुढे सरकते तसे तसे स्त्री पुरुष समानता आणि वास्तव यात जमीन अस्मानाचा फ़रक आहे ,या वास्तवाचे भान येते. या गीताचे दुसरेच कडवे हा प्रश्न फक्त भारताचा नसून जागतिक पातळीवरचा आहे याची जाणीव देते कारण त्यात ते म्हणतात -
तुलती है कहीं दीनारों में, बिकती है कहीं बाज़ारों में
नंगी नचवाई जाती है, ऐय्याशों के दरबारों में
ये वो बेइज्ज़त चीज़ है जो, बंट जाती है इज्ज़तदारों में

स्त्री समानता आणि पुरुषी वर्चस्व यात अजूनही वर्चस्व वाद कसा टिकून आहे हे सांगताना कवी म्हणतो -

मर्दों ने बनायीं जो रस्में, उनको हक का फरमान कहा
औरत के ज़िंदा जलने को, कुर्बानी और बलिदान कहा
किस्मत के बदले रोटी दी, और उसको भी एहसान कहा
औरत ने जनम दिया मर्दों को

आणखी बरेच काही मांडता येईल , साहिर यांचा जन्म दिवस आणि महिला दिन यांचे अचूक नाते पकडण्याचा हा एक प्रयत्न या निमित्ताने आपणास या दोन
महान रचना ऐकता याव्यात म्हणून त्यांची लिंक देत आहे -

https://www.youtube.com/watch?v=lUnNZKoOcJI

https://www.youtube.com/watch?v=RSAjnqg7OeE

Group content visibility: 
Use group defaults

सुरेख लेख आहे.
स्त्री पुरुष समानता आणि वास्तव यात जमीन अस्मानाचा फ़रक आहे ,या वास्तवाचे भान येते....... दुर्दैवाने तेच खरे आहे.

दूरस्थ कोणत्या तरी संस्थे च्या अभ्यास वर अवलंबून राहून त्या नुसार मत बनवण्या पेक्षा .आपले स्वतःचे कुटुंब,शेजारी, नाते वाईक,मित्र मंडळी .
ह्या आपल्या माहिती मधील घरात.
मुलींना प्राथमिक शिक्षण पासून उच्च शिक्षण दिले जाते का?
मुलींना त्यांचे ध्येय साध्य करण्याकिता कोण विरोध करार का?
आपल्या स्वतःच्या कुटुंबात स्त्री चे मत घेतले जाते का?.हे बघा.
मला तरी सर्व ठिकाणी आणि मझ्या घरात स्त्रियांना दुय्यम वागणूक बिलकुल दिली जात नाही
हा अनुभव आहे

देवकी , साद , स्वाती २ , सामो - आपल्या प्रतिसादासाठी मनपूर्वक धन्यवाद !

Hemant 333 - सर्व प्रथम आपण व्यक्त झालात त्यासाठी धन्यवाद .

आपल्या प्रतिसादाबाबत ,स्वतः च्या अनुभवांबाबत , बोलायचे तर मी माझे कुटूंबीय नातेवाईक या परिघात घरातील स्त्री नेहमीच आदराच्या स्थानी राहिली आहे , मुलींना शिक्षणाची संधी आणि निर्णय घेण्याची मोकळीक देखील आहे .

पण आपण ज्या समाजाचे घटक म्हणून जगतो त्यातील सर्व स्तरावर आणि सर्व ठिकाणी हि परिस्थिती नाही .उच्च शिक्षण , परदेशी शिक्षण यासाठी केला जाणारा खर्च हा खर्च म्हणून न पाहता त्याकडे ,' गुंतवणूक ' म्हणून पहिले जाते . मुलीच्या शिक्षणावर खर्च करताना कधी कधी हात आखडता घेताना दिसून येते .

ग्रामीण भागात मराठी माध्यम व इंग्लिश माध्यम निवडताना मुलगा आणि मुलगी असा भेद होताना दिसतो . शाळा गळती ह्या विषयाची आकडेवारी पाहताना शिक्षण सोडावे लागण्याच्या प्रमाणात मुली जास्त आहेत . हे वास्तव विसरता येत नाही .

त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या परिसरात अनुभव स्त्री शक्तीचा आदर करणारे असतील तर त्यासाठी प्रथम तुमच्या पुरोगामी विचारांना अभिवादन आणि तुमचे शतशः धन्यवाद . पण आपला परीघ वाढवला कि बदलत्या परिस्थिती कडे उघड्या डोळ्यांनी पाहणे आणि त्या ठिकाणी स्त्री शक्तीचा आदर करीत त्यांना अधिक चांगल्या संधी देणे हि पण आपलीच जबाबदारी आहे . असे माझे व्यक्तिशः मत आहे

सबंध थोडा दुरान्वयी वाटला पण लेख आणि त्यामागची भावना छान आहे.

तुलती है कहीं दीनारों में, बिकती है कहीं बाज़ारों में
नंगी नचवाई जाती है, ऐय्याशों के दरबारों में
ये वो बेइज्ज़त चीज़ है जो, बंट जाती है इज्ज़तदारों में >> ह्याच अर्थाचे प्यासाच्याच दुसर्‍या गाण्यात देशाची त्यातल्या तरूणांची आणि स्त्रियांची अवस्था वर्णन करतांना साहिर लिहितात

जवानी भटकती हैं बदकार बन कर
जवां जिस्म सजते है बाज़ार बन कर
यहाँ प्यार होता है व्योपार बन कर
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है

लेख आवडला कारण त्यातली गाणी आवडती आहेत. धन्यवाद.

मला तरी सर्व ठिकाणी आणि मझ्या घरात स्त्रियांना दुय्यम वागणूक बिलकुल दिली जात नाही>>>>>>

हाहाहा.. तुमच्या घरातील स्त्रियांनी तुमच्या घराने ‘जपलेल्या’ रुढी/परंपरा/पद्धती/रितीरिवाज यांना छेद देणारा एक जरी निर्णय घेतला तरी हा तुम्ही स्वतःवर माखलेला शेंदुर क्षणात गळुन पडेल.

दिल न चाहे भी तो, साथ संसार के
चलना पडता है सबकी खुशी के लिये..

हा मन्त्र आळवत स्त्रिया जगतात आणि पुरुषांना ‘पाहा, आम्ही कित्ती कित्ती स्वातंत्र्य देतोय ’आमच्या’ स्त्रियांना’ हे बोलायची संधी देत राहतात, सबकी खुशी व खुद की मनःशांती के लिये..

बाकी स्त्री समानता वगैरे सगळी अंधश्रद्धा आहे, पुरुषांनी जोपासलेली.

जो मरे त्याला कोण रडे अशी एक म्हण आहे.
किती ही इन्कम वाढला तरी उद्योगात काही फायदा नाही.

किती ही पगार वाढवले तरी पगार खूप च कमी आहे.
अशा प्रकारचे रडगाणे गाण्याची लोकांची सवय असते.
100 वर्षपूर्ती आणि आज स्त्रियांच्या स्थिती मध्ये नक्कीच फरक पडला आहे.
मुली ना आज शिक्षण दिले जाते म्हणून सर्व क्षेत्रात आहेत.
खुप त्यांस स्वतंत्र दिले जात आहे अगदी कायदे पण एकतर्फी त्यांच्याच बाजू नी आहेत.
तरी .
आमच्या वर पुरुष अन्याय करतात .
आमचे कसे शोषण होते.
हे रडगाणे काही थांबत नाही.
जो positive badal झाला आहे त्या वर पण भाष्य केले पाहिजे .
बघावे तेव्हा आम्ही कसे शोषित हेच सांगण्यात काही अर्थ नाही.
त्या मुळे शोषण चे पण गांभीर्य कमी होते

आरक्षण घेणारा जो वर्ग भारतात आहे.
ते पुढील १००० वर्ष आम्ही कसे मागास आणि आमच्यावर कसा अन्याय होतो.
म्हणून सुविधा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
स्त्रिया पण त्याच मार्गाने जात आहेत.
आम्ही कसे शोषित ध्या आम्हाला आरक्षण,.
स्वतः स्वतःची जागा कधी निर्माण करणार.
अतिशय कडवा प्रतिसाद आहे पण .
अशाच प्रतिसाद ची देशाला गरज आहे

साहिरचे काव्य नेहमीच हार्ड हीटिंग असते. त्यांची लेखणी उपरोधिक ते जळजळीत या रेंजमध्ये सहजी फिरत समाजाला आरसा दाखवते. त्यांचा जन्म ८ मार्च ला झाला हे माहित नव्हते.
त्यांनी लिहिलेले 'तू मेरे साथ रहेगा मुन्ने' हे गाणे त्रिशूल चित्रपटातल्या अमिताभ च्या कॅरॅक्टरचे बॅकबोन आहे. नेहमीच्या टिपिकल प्रेमळ, त्यागाची मूर्ती असणाऱ्या माँच्या कॅरॅक्टरपेक्षा वेगळे असे चित्र यातून उभे राहते.

मी अश्विनी - प्रतिसादासाठी धन्यवाद .आपले म्हणणे -'सबंध थोडा दुरान्वयी वाटला पण लेख आणि त्यामागची भावना छान आहे.' याबाबत इतकेच म्हणता येईल कि महिला दिन आणि साहिर यांचा जन्मदिवस एकच. त्या निमित्ताने त्यांच्या काव्यातील स्त्री समजून घेण्याचा एक वेगळा प्रयत्न आहे .
साधना , rmd - प्रतिसादासाठी धन्यवाद
साधनाजी आपले मत -
हाहाहा.. तुमच्या घरातील स्त्रियांनी तुमच्या घराने ‘जपलेल्या’ रुढी/परंपरा/पद्धती/रितीरिवाज यांना छेद देणारा एक जरी निर्णय घेतला तरी हा तुम्ही स्वतःवर माखलेला शेंदुर क्षणात गळुन पडेल. किंवा
बाकी स्त्री समानता वगैरे सगळी अंधश्रद्धा आहे, पुरुषांनी जोपासलेली.
आणि त्यास rmd यांचा दुजोरा

आणि त्या नंतर Hemant 333 यांनी दिलेले दोन प्रतिसाद

या सर्वांवर एकत्रित बोलायचे झाल्यास - स्त्री पुरुष समानता आणि स्त्रियांना दिली जाणारी दुय्यम वागणूक आणि स्त्री स्वातंत्र्य या बाबत समाजातील सर्व स्तरात अजूनही समानता आलेली नाही इतकेच माझे मत आहे.

शिक्षण आणि प्रबोधन यांच्या समन्वयातून पुढे जाण्याची गरज आहे . हेमंतजी आपला दृष्टिकोन असा आहे कि -
मला तरी सर्व ठिकाणी आणि मझ्या घरात स्त्रियांना दुय्यम वागणूक बिलकुल दिली जात नाही>>>>>> आणि मी जर अन्याय कारक वागत नाही तर स्त्रिया आमच्यावर अन्याय होतो असे म्हणतात ते चूक आहे .
याबाबत मी म्हणेन कि हेमंतजी आपण स्त्रियांच्या बाबत जरी समानतेची काळजी घेत असलात तरी सर्वत्र अशी परिस्थिती नाही . त्यामुळे बाकीच्यांची यावरील मते म्हणजे अनावश्यक किंवा अनाठायी ओरड आहे असे आपणास वाटले तरी दुर्दैवाने वस्तुस्थिती तशी नाही .
अर्थात हा मुद्दा मतांतरे राहिली तरी दुर्लक्ष करण्याजोगा नाही . आणि अजून बरेच काम होणे बाकी आहे हे मात्र खरे.

MazeMan - प्रतिसादासाठी धन्यवाद