उपेक्षा कथा

Submitted by सतीशगजाननकुलकर्णी on 21 September, 2022 - 02:48

उपेक्षा

ट्रिंग .. ट्रिंग ट्रिंग ,, ट्रिंग ट्रिंग ट्रिंग
दारावरची बेल तीनदा वाजली तरी सौरभला दार उघडण्याची इच्छा होत नव्हती. हॉल मधल्या आरामखुर्चीत डोळे मिटून पडून राहावे आणि स्वत:च्याच विचारात बुडून जावे असे त्याला वाटत होते. अलीकडच्या काही दिवसात, विशेषत: महिन्याभरापूर्वी बाबा गेल्यापासून त्याच्या मनाची अवस्था उद्विग्न झाली होती.मित्र नको, वाचन नको, फोन नको... काही काही नको. सौरभला हवा होता फक्त एकांत आणि त्याच्या बाबांच्या आठवणी.
बाबां गेल्याचा तो शेवटचा दिवस.. त्यांची अंतयात्रा .. यात्रा कसली? कशी बशी आठ ते दहा माणंस जमली होती. त्याला यात्रा थोडेच म्हणायचे.? एक सोपस्कार होता झाल.! बाबा नुकतेच निवृत्त झाले होते हि गोष्ट खरी पण पस्तीस वर्षे ज्या माणसाने कॉलेज मध्ये प्राध्यापक म्हणून काम केले त्या कॉलेजमधून प्रेम राहू दे शिष्टाचार म्हणून सुद्धा कुणी त्या दिवशी आले नव्हते. चार नात्यातली माणस आणि चार इकडची तिकडची... इतकी वर्षे शिकवून एकहि विद्यार्थी बाबा गेल्याचे कळल्यावर भेटायला सुद्धा आला नाही? याला माणुसकी म्हणायचे? एका प्राध्यापकाच्या जीवनाचा हा शेवट.! खर म्हणजे बाबा किती चांगले शिकवायचे... शिकवत असताना त्याचं तल्लीन होण .. त्यांचा धीरगंभीर आवाज... शाळेत असल्यापासून बाबांचं शिकवण त्याला माहित होत .. सौरभच्या डोळ्यसमोर त्याच शालेय जीवन दिसू लागल...
दहावीच वर्ष ... कसून अभ्यास करायचे ते दिवस होते.... सोफासेट वर बसलेले बाबा आणि खाली सतरंजीवर सौरभ. तल्लीन होऊन बाबा शिकवत राहयचे आणि सौरभ त्यांचा शब्द न शब्द शोषून घ्यायचा . इंग्लिश सारखा अवघड विषय सुद्धा रंजक पद्धतीने मुलांना समजावून सांगण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. खर तर बाबा कॉलेज मध्ये प्राध्यापक होते पण तरीसुद्धा त्यांनी अपार्टमेटमधील दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी क्लासेस चालू केले होते. पण कशी बशी चार मुले क्लासला यायची ! कोण दुर्देवी ? बाबा का मुले ?
सौरभला त्याचे बाबा कॉलेज मध्ये प्राध्यापक आहेत याचा नेहमी अभिमान वाटायचा. बाबांच्याच मुळे त्याला इंग्लिश भाषेची गोडी लागली होती. म्हणून त्याने ठरवल होते दहावी पास झालो कि आर्ट्स साईड घ्यायचे. आणि पुढे मग बघू काय करायचे? निदान बाबा घरी आणि कॉलेज मध्ये असल्याने आपल्याला इंग्लिश भाषेतील पुस्तकाच वाचन तरी करता येईल. त्यान त्याच्या मनातील जेव्हा बाबांना सांगितल तेव्हा बाबा जोरात हसले होते “ बर बघू, आधी दहावी चांगल्या मार्काने पास हो” बाबांनी ते हसण्यावारी नेल पण त्याचा निर्णय मात्र पक्का होता. आणि जेव्हा जेव्हा तो बाबांच्या खोलीत जायचा तेव्हा तो निर्णय अधिक पक्का व्हायचा.
त्यांच्या खोलीत शिस्तीत उभी असलेली ती जाडजुड पुस्तके आणि समोर लावलेले ते अत्रे, विजय तेंडूलकर आणि जॉर्ज बर्नोड शो चे फोटो. त्या फोटोसमोर बसून बाबा तास न तास काहीतरी लिहित बसायचे. सौरभ त्या फोटोकडे बघून विचारायचा
“ बाबा, हे फोटो तुम्ही तुमच्या खोलीत का लावलेत?”
बाबानि मंद स्मित केल आणि म्हणाले, “ मोठ्या लोकांच्या फोटो कडे बघितल्यावर आपल्यालाही त्या पासून प्रेरणा मिळते आणि त्यांचाप्रमाणे व्हावस वाटत”
“ पण बाबा हे अत्रे, तेंडूलकर लेखक होते. तुम्ही लेखक आहात?तुम्ही काय लिहित असता?” बाबा यावर काहीच बोलले नाहीत. माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाले,
“ खूप मोठा हो. भरपूर कष्ट कर. पैसे काय माणूस मिळवतोच रे. पण या जगात तुझ नाव राहील अस काहीतरी करून दाखव. माझे आशीर्वाद आहेत तुला” सौरभने मान हलवली पण बाबा काय बोलले ते मला कळलच नव्हत.
बाबा फार कमी बोलत. ते वाचत तरी किंवा ते लिहित तरी. एकाच घरात राहत असून सुद्धा त्यांना सौरभने आईशी सुद्धा बोलताना फारसे कधी बघितले नव्हते. सौरभ त्याच्या मित्रांच्या घरी जायचा तेव्हा त्यांचे आईबाबा बोलत असताना बऱ्याचदा बघितले होते. पण त्याचे आईवडील मात्र फारसे बोलताना कधी बघितले नाही. एकदा सौरभने आईला विचारले.,
“ आई, मी मित्रांच्या कडे जातो तेव्हा त्यांचे आई बाबा नेहमी काही ना काही बोलत असतात. पण तू आणि बाबा कधीच बोलताना बघितले नाही?” आई काहीच बोलली नाही. पण तिच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती. बाबांचा पगार तसा बरा होता पण त्यांना एक विधवा बहिण सुद्धा होती तिलासुद्धा ते आर्थिक मदत करत असायचे. आणि त्यामुळे आईला नेहमी काटकसरीने संसार करायला लागायचा. आई कटकट करत बोलायची तेव्हा सौरभच्या हे लक्षात आले होते. पण म्हणून इतका अबोला ?
“ आई, एक विचारू ?बाबा नेहमी काय लिहित असतात?” आई एकदम माझ्यावर चिडून म्हणाली
“ डोंबल लिहितात माझ. तू उलत जा बाहेर. मला कटकट करू नको” दोन चार कथा आणि एखादा लेख छापून आला तर लेखक म्हणे ! आई स्वत:शीच बोलत होती. पण तिचा वैताग मात्र मला कळत होता. तिला काटकसरीने संसार करायला लागण्यापेक्षा बाबांच्या वेगळ्या विश्वाचा राग होता. सौरभच्या बालपणात दोन वेगळी विश्वे होती .. एक प्रापंचिक कटकटीन वैतागलेली आई आणि आपल्याच नादात असलेले बाबा. पण त्या दिवशी सौरभला कळले आपले बाबा लेखक सुद्धा आहेत. या दोन विश्वाकडे बघत बघत सौरभ दहावी झाला. आणि त्यान बाबांच्याच कॉलेज मध्ये प्रवेश घेतला.

कॉलेज मधील ते रंगीबेरंगी जीवन .. पण सौरभला त्या जीवनापेक्षा मोह होता तो कॉलेजच्या भव्य इमारतीचा ... तेथील वाचनालयाचा... विद्वान प्रोफेसरांच्या शिकवण्याचा... ज्ञान समृद्ध करण्याचा... आणि अर्थातच बाबांच्या शिकवण्याचा. वर्गात बसलेली ती चाळीस पन्नास मुले आणि त्यांच्या पुढे शिकवणारे आपले बाबा... कॉलेजच्या त्या वातावरणात दोन वर्षे कशी गेली ते सौरभला कळले नाही... तो बारावी पास झाला आणि फर्स्ट इअर ला त्याने प्रवेश घेतला.
इंग्लिश शिकवायला अर्थातच बाबा होते. पहिलाच तास बाबांचा होता. पण वर्गात फारशी मुले नव्हती. इतर पिरीडस ना वर्ग कसा भरलेला असतो. पण इंग्लिशच्या तासाला फक्त दहा पंधराच मुले. बाबा आले. त्यांनी शिकवायला सुरवात केली. शिकवण्याची त्यांची पद्धत तीच होती.. तिच तल्लीनता .. तोच व्यासंग .. घरी मुलाला शिकवतोय म्हणूनवेगळी पद्धत आणि वर्गात पाट्या टाकायच्या अस काहीच नव्हत. पण अस असताना त्यांच्या पिरीयडला कशी बशी दहा मुल. सौरभला वाईट वाटल. पण आज पहिला दिवस म्हणून त्याने तिकडे दुर्लक्ष केल. पण तीच स्थिती नंतर सुद्धा कायम होती.
त्या दिवशी सौरभ मित्रांच्या घोळक्यात उभा होता. आपापसात त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. कुणी एकजण म्हणाला , “ इंग्लिशच्या पिरीडला बसतोस?”
“ छ्या .. “ अंगावर पाल पडावी तसा तो विषय त्याने झटकला. “ तो काय शिकवतोय ते त्याच त्याला तरी कळतय का नाही कुणास ठाऊक ?तो प्रोफेसर कसा झाला ते कळत नाही?”
बाकीच्या मित्रांनी त्याच्या हातावर टाळी दिली आणि एकच हास्यकल्लोळ झाला. सौरभ त्यांचा मुलगा आहे हे मित्रांना माहित नव्हत. पण सौरभला मात्र राग आला होता. म्हणे आपल्या बाबांना प्रोफेसर कुणी केल? या मुलांची लायकी आहे काय माझ्या वडिलांकडून शिकवून घेण्याची? वाटत होत .. पण सौरभ तिथून निघून गेला.
सौरभ आता वडिलांशी बोलण्याईतपत मोठा झाला होता. मित्रांनी केलेला वडिलांचा अपमान त्याच्या डोक्यातून जात नव्हता. त्या दिवशी वडील संध्याकाळी लिहित बसले होते तेव्हा सौरभ त्यांच्या खोलीत गेला आणि त्याने विचारले,
“ बाबा, मला थोड बोलायचं होत” वडिलांनी मुलाचा मूड ओळखला आणि त्यांनी हातातील पेन बाजूला ठेवल.
“ बोल”
“ बाबा, मी तुमच शिकवण लह्नापणापासून बघत आलोय. आणि अजूनही तुम्ही तितक्याच तन्मयतेने शिकवता. तुमचा बाबा म्हणून मला अभिमान आहेच पण तुम्ही चांगले शिक्षक, प्राध्यपक म्हणून जास्ती आहे” बाबा डोळे मिटून ऐकत होते. त्यांची स्तुती फारशी कुणी करत नसते. सौरभ कडून दोन कौतुकाचे शब्द ऐकल्यावर त्यांना बरे वाटले. पण सौरभचा मुद्दा काय याची उत्स्कुकता त्यांना होतीच.
“ पण मी कॉलेज मध्ये आल्यापासून बघतोय. तुमच्या वर्गात फक्त दहा मुले. खर तर वर्गात पन्नास मुले असायला हवीत ना? मग अस का?” माझ्या बोलण्यावर बाबा जोरात हसले. सौरभ इतका गंभीर होऊन बोलत होता पण तरी ते का हसतायत ते त्याला कळले नाही.
“ सौरभ, वर्गात मुले का येत नाहीत हा प्रश्न त्यांना विचारायचा का मला? हा दोष त्यांचा कि माझा?” खरच कि.! मुल येत नाहीत हा बाबांचा दोष नाही. पण तरी सुद्धा बाकीच्या पिरीडस ना वर्ग भरलेला असतो हे काही त्याच्या डोक्यातून जात नव्हते. त्याने बाबांना विचारलेच
“ बाकीच्या वर्गात सौरभ परीक्षार्थी येतात. माझ्या वर्गात विद्यार्थी येतात. मी त्यांना ज्ञान देतो” बाबांचे उत्तर सौरभला आवडले होते. त्या दिवशी बाबा आणि सौरभ बरेच मोकळेपणी बोलले. आणि त्याच संधीचा फायदा सौरभने घायचे ठरवले.
“ बाबा, एक विचारू.? तुम्ही हे काय लिहित असता?”
“ काही नाही रे. सुचतील तशा कथा, कविता लेख लिहित असतो”
“ म्हणजे तुम्ही लेखक आहात ना?” आईशी बोलत असताना सौरभला हे पुसटसे कळले होते पण तरीसुद्धा बाबा काय करतात हे त्याला त्यांच्याकडून ऐकायचे होते.
सौरभने पुढे विचारले, “ मग तुम्ही हे कुठ पाठवत का नाही. त्याच पुस्तक का करीत नाही?”
बाबांनी माझ्या पुढ पाच सहा मासिक टाकली आणि ते म्हणाले, “ यात माझे काही लेख, कविता कथा छापून आल्या आहेत” पण हे सांगताना त्यांच्या बोलण्यात मला विषाद जाणवत होता. बाबाना मी माझ्या लहानपणापासून लिहित असताना बघत होतो. म्हणजे कमीत कमी वीस वर्षे तरी ते लिहितातच आहेत. मग एकूण पाच ते सहा मासिकातच त्याचं लिखाण छापून आल.? त्यांचा नावान एकही पुस्तक नाही.?
बाबांच्या शिकवणीला चार मुल .. वर्गात दहा? मुल .. त्यांचे कसेबसे छापून आलेले पाच सहा लेख, कथा आणि कविता. एका विद्वान प्रोफेसरांच्या आयुष्याची हि कथा....
दिवस, महिने जात होते. तेच नेहमीच रुटीन चालू होत. सौरभचे शिक्षण संपले.बाबा निवृत्त झाले आणि अचानक एक दिवस आई देवाघरी गेली. एकाच घरात दोन विश्वे होती पण त्यातील एक विश्व संपले होते. आणि अबोल बाबा अजुनी गप्प झाले. त्यांचे लिखाण,वाचन सगळ संपून गेल. एकाकीपणाने त्यांना घेरल होत.
सौरभने बाबांना विचारले, “ बाबा, तुम्हाला आईची आठवण येते?”
“ आठवण यायला मी तिला विसरायला पाहिजे ना? माझ्या सारख्या दुर्देवी माणसाशी तिला का संसार करायला लागला असेल?नियतीचा हा काय खेळ?” आईची आठवण काढून बाबा ढसाढसा रडले. त्यांना समजवण्याइतपत सौरभ मोठा नव्हता. कसाबसा तो त्यांना धीर देत होता.
आई गेली आणि काहीच दिवसात बाबा गेले. ते गेल्याचा निरोप सौरभने कॉलेज मध्ये दिला, अपार्टमेट मध्ये दिला. पण त्यांच्या अंतयात्रेला फक्त आठ ते दहा माणस. समोर बांधत असलेल बाबांचं प्रेत आणि आपपसात कुजबुजत असणारी ती माणस. ते चित्र अजुनी त्याच्या डोळ्यासमोरून गेल नव्हत. आपल्या बाबांची दुर्दैवी कहाणी त्याला आज अस्वस्थ करत होती.

ट्रिंग ट्रिंग ट्रिंग... दारावरची बेल पुन्हा एकदा वाजली. आणि सौरभ त्याच्या तंद्रीतून जागा झाला. हे सारख कोण बेल वाजवतय? मघाशी सुद्धा असच कुणीतरी वाजवून गेल. त्यान वैतागून दार उघडलं. दारात कुणीतरी अनोळखी माणूस उभा होता.
“ मी आदित्य सरपोतदार.” हे नाव कुठे तरी ऐकल होत पण ते आठवण्याच्या मनस्थितीत सौरभ नव्हता.
“ बोला” सौरभने त्याला विचारल.
“ मी आत आल तर चालेल का?” त्यान हसून विचारल. तो माणूस अनोळखी असताना सुद्धा शिष्टाचार म्हणून सौरभने त्यांना आत घेतलं.
“ बोला”
“ मी माझी ओळख करून देतो. मी आदित्य सरपोतदार. फिल्म डायरेक्टर आहे.”
“ ओह. मला तुमच नाव माहिती आहे. पण एक मोठा डायरेक्टर माझ्या घरात कसा येईल म्हणून मी थोडासा गोंधळलो होतो”
“ नो नो. मी मोठा बिठा नाही. खर तर तुमचे वडील मोठे आहेत. आपल्या वडिलांची एका दिवाळी अंकात आलेली “ उपेक्षित” नावाची कथा माझ्या वाचनात आली होती. त्या कथेमध्ये काहीसे बदल करून मी त्यावर एक चित्रपट बनवू इच्छितो. मी तुमच्या वडिलांना एक पत्रही पाठवले होते. पण ... “ त्याने सौरभपुढे एक पत्र धरले. बाबांच्या एका कथेवर चित्रपट काढण्यासाठी त्याने पत्र लिहिले होते. बाबांची लेखी परवानगी त्याला पाहिजे होती, सौरभला आता आश्चर्याचा धक्का बसला. आदित्य सरपोतदार बाबांच्या कथेवर चित्रपट काढणार होता ! सौरभने सुद्धा ती कथा वाचली नव्हती.
तो गोंधळून म्हणाला “ पण बाबा तर नुकतेच.. “
“ आय नो. सौरभ” आदित्यने अजुनी एक वर्तमानपत्र त्यांच्या पुढे ठेवत म्हणाला. बाबा गेल्याची एक बातमी त्यानेच वर्तमानपत्रात दिली होती ते वर्तमानपत्र आदित्य दाखवत होता.
“ सौरभ, मी तुमच दु:ख समजू शकतो. पण ...”
“ तुम्हाला, माझ्याकडून काय हव आहे?”
“ तुमच्या वडिलांच्या नंतर तुम्हीच त्यांचे वारसदार आहात. त्यांच्या कथेवर चित्रपट काढायची मला परवानगी द्या. मी तुम्हाला मानधन द्यायला तयार आहे” सौरभच्या मनात विचार आला ज्या माणसाला संपूर्ण आयुष्यभर उपेक्षा सहन करावी लागली त्या माणसाच्या निधनानंतर त्याच्याच एका कथेवर आदित्य सरपोतदार सारखा डायरेक्टर चित्रपट काढतोय !! पुन्हा भेटायचं आश्वासन देऊन आदित्य सरपोतदार निघून गेला.
आदित्य गेला आणि सौरभ अधिकच भाऊक झाला. आणि क्षणात त्याच्या डोळ्यातून आश्रू वाहू लागले. त्या आश्रू मध्ये भिंतीवर लटकलेली ना त्याला वडिलांची प्रतिमा दिसत होती ना आदित्यने समोर ठेवलेलं पत्र!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

कथा आवडली, पण उपेक्षा का झाली हे उलगडले नाही आणि माझ्या माहितीप्रमाणे आदित्य सरपोतदार नावाचे खरेखुरे मराठी व हिंदी चित्रपट दिग्दर्शक आहेत.
https://en.wikipedia.org/wiki/Aditya_Sarpotdar

राहुलजी

हुशार असूनही त्या प्राध्यापकाला योग्य ते यश मिळत नाही. प्राध्यापकाला कॉलेज मध्ये मान नाही, व्यासंग आहे, लेखन क्षमता आहे पण तरीही लेखक म्हणून त्याला यश नाही. कौटुंबिक आयुष्यात त्याला बायकोच प्रेम नाही. हि सगळी त्याची उपेक्षाच नव्हे काय ? आणि अशा माणसाला त्याच्या निधानंतर मात्र यश मिळत. हा या कथेचा क्लायमेक्स.
आदित्य सरपोतदार एक दिग्दर्शक म्हणून आहेत हि गोष्ट माझ्या नजरेतून सुटली होती. लिहिण्याच्या ओघात ते झाले. हि चूक मी दुरुस्त करतो. धन्यवाद.