एका लेखाची चाळीशी

Submitted by कुमार१ on 21 September, 2022 - 02:02

प्रास्ताविक :
माझ्या आयुष्यातील पहिलावहिला लेख मी ३९ वर्षांपूर्वी लिहिला. तेव्हा मी नुकताच एमबीबीएसची अंतिम परीक्षा उत्तीर्ण झालो होतो. त्यानंतर एक वर्षे इंटर्नशिपचा कालावधी असतो. त्या काळी त्यापैकी सहा महिने ग्रामीण भागात राहायला लागायचे. मी पुणे जिल्ह्यातील एका खेड्यात माझे ग्रामीण प्रशिक्षण पूर्ण केले. त्या वास्तव्याच्या अनुभवावर आधारित मी प्रस्तुत लेख लिहिला. तो नंतर कॉलेजच्या वार्षिकात प्रसिद्ध झाला. यंदा त्या प्रथम लेखनाने चाळीशीत पदार्पण केले आहे. त्यानिमित्त तो लेख जसाच्या तसा इथे प्रकाशित करीत आहे. लेखनाची भाषा आणि (अ)परिपक्वता वयानुरुप आहे हे वाचकांनी समजून घ्यावे ! _/\_

हा लेख वैद्यक विद्यार्थीविश्वाशी निगडित असल्याने त्यातील काही मुद्द्यांचे/ शब्दांचे संदर्भ समजण्याठी आधी स्पष्टीकरण देणे आवश्यक वाटते:

१. P.H.C. = Primary Health Centre

२. तेव्हा आमच्या वर्गासाठी पुणे विद्यापीठ क्षेत्रात ग्रामीण इंटर्नशिपची जी केंद्रे ठरलेली होती त्यापैकी फक्त शिरूर येथे प्रशिक्षणार्थी मुले व मुली एकत्र राहत असत. हे मोठे प्रशिक्षण केंद्र असल्याने तिथे एका ज्येष्ठ प्राध्यापकांच्या देखरेखीखाली तशी व्यवस्था केलेली होती. बाकी इतर सर्व केंद्रांवर एक तर फक्त मुलगे किंवा फक्त मुली अशी परिस्थिती असायची. माझ्या लहान केंद्रावर अर्थातच आम्ही फक्त चार मुलगे होतो.

३. Weaning : जन्मल्यानंतर बाळ अंगावर दूध पिऊ लागते. त्यानंतर काही महिन्यांनी अंगावरचे दूध कमी करत घन पदार्थांचा आहार वाढवायचा असतो. या ६-९ महिने चालणाऱ्या प्रक्रियेला Weaning म्हणतात (समर्पक मराठी शब्द सुचवावा).
………………………………………………………………….................................................................................................................
मुक्काम पी. एच. सी.

mbbs deg cert (2).jpg

जेव्हा शासकीय महाविद्यालयातून थर्ड एमबीबीएस पास झालो तेव्हा असे सांगण्यात आले, की तुम्हाला आता एक वर्ष सक्तीने सरकारसाठी राबावे लागणार आहे व त्याबद्दल पोटापाण्यापुरते पैसे मिळतील. त्यापैकी सहा महिने खेड्यात जावे लागणार होते. “शिरूर घ्या अन ऐश करा”, असे सिनिअर लोकांनी सांगितले. परंतु आपल्याला हवे ते केंद्र मिळण्यासाठी ‘जे काही करावे लागते’, ते न जमल्याने मला शिरूर मिळाले नाही. अखेर माझी अन्य एका खेड्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेमणूक झाली. मग दुसऱ्या दिवशी प्रवासास निघालो. एसटीचा प्रवास संपल्यानंतर खडकाळ रस्त्यावरून पायपीट चालू झाली. चालता चालता असे जाणवले की बरेच लोक कुतूहलाने माझ्याकडे बघत होते. टेरीकॉटचे कपडे व बूट एवढ्या दोन गोष्टी सुद्धा इथे लक्ष वेधून घ्यायला पुरेशा होत्या. आता त्या केंद्राचा पत्ता विचारायचा होता.
रस्त्यात दिसणाऱ्यापैकी त्यातल्या त्यात कमी खेडवळ माणूस गाठला. त्यांना विचारले,

“अहो इथे सरकारी दवाखाना कुठे आहे?” त्याने बरेच हातवारे करून पत्ता सांगितला आणि विचारले,
“काय नवीन डाक्टर वाटतं”
“ हो, इंटर्नशिपसाठी आलोय, प्रशिक्षण असतं आमचं”
“म्हंजे शिकावू डॉक्टर म्हना की !”
... च्यायला, अगदी चिमणीच पाडली साल्यानं.

अखेर मुक्कामी पोचलो. “प्राथमिक आरोग्य केंद्र” हे शब्द व त्याखाली आई-बाबा, दोन मुले आणि लाल त्रिकोण अशी चित्रांकित पाटी असलेल्या इमारतीत शिरलो. ओपीडी मध्ये बसलेल्या मेडिकल ऑफिसरची भेट झाली. मी आल्याचे पाहून ते एकंदरीत खूष झाले. कारण मागच्या बॅचचे प्रशिक्षणार्थी जाऊन चार दिवस लोटल्याने त्यांच्यावर ओपीडीतील सर्व पेशंटस बघायची वेळ आली होती. मग हॅलो, वेलकम, नाव, गाव, बाप काय करतो व पुढे काय करणार, इत्यादी गप्पा झाल्यावर सहा महिन्यातील कार्यक्रम समजला.
family planning.jpg

सकाळ-संध्याकाळ ओपीडी काढणे हा त्यातला मुख्य भाग. याशिवाय नसबंदी शस्त्रक्रियेत मदत करणे, शाळांमधून जाऊन बालके तपासणे, क्षयरोग-कुष्ठरोग इत्यादी संबंधी जनजागृती करणे आणि जी काही शिबिरे होतील त्यात इकडून तिकडे करणे या गोष्टींचा समावेश होता. आमचे राहायचे क्वार्टर्स तसं बरं होतं. चौघांची राहायची सोय होती आणि मुख्य म्हणजे हे ठिकाण नर्सेस क्वार्टर्सच्या अगदी समोर होते. एक-दोन दिवसात बाकीचे तिघे आले आणि रूटीन व्यवस्थित चालू झाले.

ओपीडीला भरपूर गर्दी असायची. नव्वद टक्के लोकांची लक्षणे ठराविक असायची. एकंदरीत डोके व कंबर हे दुखण्यासाठी आणि हात व पाय मुंग्या येण्यासाठीच निसर्गाने दिलेले आहेत की काय असे वाटू लागे. व्हिटामिन B12 चे इंजेक्शन हे तिथले एक अत्यावश्यक ड्रग असायचे. या इंजेक्शनने खरोखरीच अंगात ताकद येते की काय असे मला सुद्धा शेवटीशेवटी वाटू लागलं होतं !

काही आजारांवर लोकांकडून गावठी इलाज हे प्राथमिकता म्हणून केले जात. त्यातून बरे वाटले नाही तरच पेशंट इथे येई. अशा इलाजांपैकी काही समजुती तर आपल्या बुद्धीपलीकडील आहेत. कावीळ झालेला माणूस जेव्हा आपल्याकडे यायचा तेव्हा त्याच्या गळ्यात ती विशिष्ट माळ घातलेली असायचीच. एखादी जखम झाली असताना भात खाल्ला तर जखमेत पू कसा काय होतो, याचे स्पष्टीकरण मला तरी माहीत नाही ! सर्पदंशाच्या बाबतीत, चावलेला साप विषारी होता का, हे ठरवण्यासाठी कोंबडीचा प्रयोग गावातील एका वैदूकडून सर्रास करण्यात येई. साप चावलेल्या जागेवर कोंबडीचे गुद्द्वार टेकवण्यात येई; जर कोंबडी मेली तर साप विषारी.

कुटुंबकल्याण कार्यक्रम हे आरोग्य केंद्राच्या कामकाजाचे महत्त्वाचे अंग असते. बाकी एखाद्या जोडप्याला मुलगा झाल्याशिवाय कुटुंबाचे ‘कल्याण’ होऊ शकत नाही, हे आपल्या लोकशाहीचे दुर्दैव नाही काय ? एक प्रासंगिक विनोद अजून आठवतो. केंद्रांमधील एक मल्टीपर्पज वर्कर होता. सहज घरची चौकशी केली,

“काय मग. मुलेबाळे किती?”
“ पाच मुली आणि एक मुलगा ! आपल्या सर्व सवलती सरकारने बंद केल्यास बघा !”
(त्याचाही अभिमान)
“अहो, निदान तुम्हाला तरी संततिनियमनाचे महत्त्व कळायला नको का ?”
“डॉक्टर, संततिनियमन म्हणजे काय - नियमाने संतती होत राहणे !!”

एकदा मुलगा झाल्यावर मात्र नसबंदी करून घेण्याकडे वाढता कल जाणवे; त्यातही अर्थात पुरुषापेक्षा स्त्रीचीच. बिनटाक्याच्या शस्त्रक्रियेबाबत मात्र अजून गैरसमज असायचे. एकदा बिनटाक्याचे शिबीर होणार होते. तेव्हा जास्तीत जास्त संख्या जमवण्यासाठी लोकांना पटवायचे काम चालू होते. एका बाईचा नवरा फारच हट्टी निघाला. मी म्हणालो,

“अहो, पंधरा मिनिटात ऑपरेशन, लगेच घरी घेऊन जायचे. पुन्हा (सरकारतर्फे) पैसे पण जास्त आणि लगेच मिळतात” त्यावर तो वैतागून म्हणाला,
“डॉक्टर, आम्ही काय पैशासाठी आपरेशन करतो का? ते जादूवाली भानगड काय नगं. पद्धतशीर टाक्याचे आपरेशन होऊ द्या. पायजे तर आम्ही पैसे देतो !”

तांबी (कॉपर टी) बसवण्यासाठी जरा औदासिन्यच असे. यासाठी स्वतःहून येणाऱ्या स्त्रिया फारच कमी. त्यामुळे ओपीडीत लहान मुलाला दाखवण्यासाठी घेऊन आलेल्या बायकांना पकडावे लागे. तांबी बसवायचे काम दोन मिनिटाचेच असले तरी बाईला समजावून द्यायला मात्र दोन दोन तास जायचे आणि बसवल्यानंतर तीन वर्षे बाईने काही कुरकुर केली नाही, तरच डॉक्टरला खरा आराम !

अशा कितीतरी कार्यक्रमांमुळे रिकामा वेळ तसा मिळतच नसे. पण चुकून मिळालाच तर मात्र काय करायचे असा प्रश्न पडायचा. कारण “शिरूर संस्थान” सारखी करमणुकीची साधने येथे नव्हती. तसं टेबल टेनिस, कॅरम इत्यादी गोष्टी गौण आहेत; बरोबर मैत्रिणी नाहीत हे खरे दुःख ! पण रोजच्या संसारात मात्र येथे जातीने लक्ष घालावे लागे. साखरेचा भाव काय, रॉकेल कधी मिळणार आहे, हे बघावे लागे. एखाद्या दिवशी स्वयंपाकाच्या बाई येणार नसतील तर आम्हा चौघांपैकी एकाला ओपीडीतून पळ काढून स्वयंपाकाची आघाडी बघावी लागे. एक प्रकारे भावी आयुष्याचीच ही इंटर्नशिप नाही का?

एक स्वस्त आणि मस्त करमणूक आयुष्यात प्रथमच येथे अनुभवली. ती म्हणजे तंबूतील थिएटर. इथे अनेक जुने हिंदी मराठी चित्रपट लागत. दर तीन दिवसाला नवीन चित्रपट येई. विद्यार्थिदशेत असताना मोजकेच चित्रपट पाहिले होते. ‘पूरब और पश्चिम’ पासूनचे अनेक जुने राहून गेलेले चित्रपट या मैदानावरील चित्रगृहात मोठ्या चवीने तृप्त होईपर्यंत पाहिले.

महिन्यातील दोन शुक्रवार मात्र घातवार असायचे. कारण या दिवशी पुण्याहून इंटर्नशिप नियंत्रण खात्याचे लोक भेट द्यायला यायचे. त्यांच्या करमणुकीसाठी जर्नल नावाचा एक रुक्ष प्रकार लिहून ठेवावा लागे. ते लोक त्याला प्रेमाने डायरी असे म्हणायचे. मग आदल्या गुरुवारी हे काम उरकण्यात येई. त्यांच्या भेटी दरम्यान त्या प्रकाराची अगदी बारकाईने तपासणी होई आणि मग 100 ग्रॅम डाळ म्हणजे किती चमचे घ्यायची, असल्या गोष्टींवरून सुद्धा चंपी होई. प्रशिक्षणार्थी डॉक्टर कामावर दांड्या मारत नाहीत ना हे बघण्यासाठी या खात्यातर्फे अधूनमधून अचानक भेट दिली जाई. एके दिवशी आमच्यावर अशी अचानक धाड पडली आणि आम्ही चौघेही हजर पाहून ते लोकच आश्चर्यचकीत झाले !

अधूनमधून आजूबाजूच्या लहान खेड्यांतील आरोग्य उपकेंद्रांना जावे लागे. या भेटींमधून मात्र खऱ्या भारत देशाचे दर्शन घडे. तिथे जीपमधून जाताना शरीर अक्षरशः ढवळून निघे. पावसाळ्यात तर काही गावच्या ओढ्यानाल्यांना इतके पाणी येई, की एकीकडून दुसरीकडे जाणे अशक्य व्हायचे. एकीकडे आपला ‘Insat 1 B’ अवकाशात भराऱ्या मारतोय अन दुसरीकडे हे ओढेनाले लोकांना गावाबाहेर पडू देत नाहीत. असे कितीतरी अडथळे आणि विसंगती.

poverty india.jpg

अशा या लहान खेड्यातील (आपल्या भाषेत इंटिरियरमोस्ट) समाजजीवनाचे दर्शन कित्येकदा मन हेलावून टाकणारे असे. दोन वेळेस पुरेसे अन्न, कपड्यांचे दोन जोड आणि एक कौलारू घर एवढे ज्याला प्राप्त झाले आहे तो खरोखरच इथला श्रीमंत म्हटला पाहिजे. तीन रुपये रोजगारावर पोट भरणारी एखादी स्त्री, जर आपल्या दोन वर्षाच्या मुलाला अजूनही फक्त अंगावरच दूध कसेबसे पाजत असेल, तर तिला weaning वर लेक्चर देणारे आपण कोण? दारू पिऊन बायकोला मारझोड करणारा नवरा हा आर्थिक व सामाजिक विषमतेतूनच निर्माण होत नाही का? ‘पेठ-डेक्कन-कॅम्प’ संस्कृतीत वाढलेल्या माझ्यासारख्याला तर ही विषमता फारच जाणवली. दारिद्र्य-रोगराई-दारिद्र्य हे एक दुष्टचक्र झालेले आहे. “सन २००० पर्यंत सर्वांसाठी आरोग्य” हे स्वप्न साकार होण्याआधी ‘गरिबी हटाव’ पूर्णतः साध्य होणे आवश्यक आहे.

अशा असंख्य विचारांनी अंतर्मुख झालेल्या अवस्थेत हे सहा महिने संपले. या ग्रामीण इंटर्नशिपचे फलित काय होते ? तर, माझ्या दृष्टीने जे ‘मेडिसिन’ होते - म्हणजे मधुमेह आणि हृदयविकार- त्या दृष्टीने ज्ञानात विशेष भर पडली नव्हती. परंतु, गेल्या साडेचार वर्षात फारशी जाणीव न झालेल्या सोशल मेडिसीनचे महत्त्व मात्र पुरेपूर पटले होते.
……………………………………………………………………………………...............................................
................................................................................................................................................
टीप :
जे वाचक 1990 नंतर जन्मलेले आहेत त्यांच्या माहितीसाठी :

१. “गरीबी हटाव” ही तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आवडती राजकीय घोषणा होती.

२. “हेल्थ फॉर ऑल बाय 2000” हे जागतिक आरोग्य संघटनेचे1980-1990 च्या दशकांतील ध्येय होते.

३. “दोन मिनिटाचे काम आणि तीन वर्ष आराम” ही जाहिरात तांबी हे गर्भनिरोधक साधन बसवण्याबाबत महाराष्ट्र शासनाने तयार केलेली होती.
,...,......,.............

.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे लेख. असा गाव बघितलेला आहे आणि माझं थोडंफार बालपण तिथेच गेलंय. त्यामुळे लेख अजून जास्त भावला. पूर्ण गावात एकच डॉक्टर, तो पण स्पेशालिस्ट वगैरे काही नाही. फक्त डॉक्टर एवढंच माहित. गावात सरकारी आरोग्य केंद्र मी तरी बघितलं नव्हतं. ते शेजारच्या गावात तासाभराच्या अंतरावर. काही पेशंट्सचे खूप हाल व्हायचे. तिकडे विंचू, साप सुद्धा खूप असायचे. त्यामुळे विषाराच्या घटना जास्त. पण गावठी उपचारावर भर होता. विंचू चावला की लिंबू पोटॅशिअम पावडर घालून पिळणे, काविळ भाजणे, गालगुंड झाल्यावर उंबराचे फळाचा गर लावणे. हार्ट अटॅक फार होत नव्हते पण झाल्यास माणूस जगत नव्हता.
आज पुन्हा तो गाव आठवला.

वरील सर्वांचे पूरक माहिती व अभिप्रायाबद्दल आभार !

*दूध सोडवणे>>> सुंदरच ! आवडला

** तिकडे विंचू, साप सुद्धा खूप असायचे. त्यामुळे विषाराच्या घटना जास्त.>>
अगदी बरोबर आहे.
या संदर्भातील चांगले उपचार मिळण्यासाठी पार जिल्हा रुग्णालयापर्यंत जायची वेळ यायची. त्यामुळे दुर्दैवाने काही रुग्ण दगावत.

धन्यवाद कुमारसर, नक्की कळवेन त्यांना! ह्या लेखाची लिंकच पाठवेन. Happy

Weaning शब्दाबद्दलची चर्चा चांगली चाललीये. Ing चा अर्थ व तुम्हाला नक्की काय अभिप्रेत आहे नीट कळले.
'मातृदुग्धशनैर्वियोग', धमाल आहे. हे ऐकताच बाळ 'असू दे आई' म्हणत, स्वतःच मुगाच्या खिचडीचा कुकर लावेल. Lol

>>>Submitted by अस्मिता. on 24 September, 2022 - 07:40>>> सुरेख प्रतिसाद.
तुमच्या सासऱ्यांना खरोखर सलाम. माझाही दंडवत स्वीकारावा.

अस्मिता यांनी सुचवल्याप्रमाणे माझ्या त्या प्रशिक्षण काळातील अन्य काही आठवणी लिहितो.

१. आजूबाजूच्या लहान गावांमध्ये उपकेंद्रात फारशा सोयी नसायच्या . मग काही वेळेस तिथल्या एखाद्या गरोदर बाई नववा महिना भरत आला की बाळंतपणासाठी आमच्याकडे पाठवल्या जात. ते काम जीपचे चालक करत.

या चालकांशी गप्पा मारताना त्यांनी अनेक मजेदार अनुभव सांगितले. काही काही गावांमधून आमच्याकडे येताना रस्ते प्रचंड खराब आणि खड्डेयुक्त असत. अशा प्रसंगी दिवस भरत आलेल्या बाई जीप आमच्याकडे पोचायच्या आत त्यामध्येच बाळंत होत !

अशा सुमारे सहा घटना त्यांच्या बाबतीत घडल्या होत्या. त्यानंतर त्यांनी अशा प्रसंगी निघताना जीपमध्ये आमच्या केंद्रातल्या एक नर्सबाई बरोबर नेण्याची पद्धत चालू केली.

डॉक्टर, खरोखरच आपण आपले अनुभव लिहावेत. ह्या बाबतीत अस्मिता +१
मायबोलीवर डॉ शिंदे ह्यांनी आपले अनेक अनुभव लिहिले आहेत, त्याचे पुस्तकही निघाले. अत्यंत वाचनीय.
आतापर्यंत मराठीत वैद्यकीय व्यवसायातील अनेकांनी सुंदर पुस्तके लिहिली आहेत. ( डॉ मुंजे ह्यांचे विशेष लक्षात राहिले होते) सामान्य वाचकाला त्यामुळे वैद्यकीय व्यवसाय, त्यातील आव्हाने, पेशंटस चे वर्तन, औषधे अशा अनेक प्रकारची माहिती मिळून आमच्यासारख्यांचे उद्बोधन होते.
आपण जरूर लिहावे.

'युनिव्हर्सिटी ऑफ पूना', 'दोन किंवा तीन पुरेत' वगैरे चित्रांवरून काळ लक्षात आला आणि सोबतीला प्रत्यक्ष अनुभवाने सिद्ध झालेले लेखन, आवडलेच !

एक घोषणा अधिकची - 'दुसरे मूल केंव्हा? पहिले शाळेत जाईल तेंव्हा'

काका जिल्हा वैद्यकीय अधिकारी (DHO) म्हणून कार्यरत असतांना अनेक गाव-खेड्यांना भेटी देत. त्यांच्या तोंडून महाराष्ट्रभरातील ग्रामीण-दुर्गम भागातील सरकारी दवाखान्यांचा हालहवाल ऐकलाय, त्यामुळे सगळे नीट रिलेट करू शकलो.

एक मात्र आहे, साधारण २०-२५ वर्षांपूर्वीपर्यंत मध्यम लोकवस्तीच्या गावातूनसुद्धा सरकारी दवाखाना असे, तिथे कंपाउंडर, नर्सबाई /मिडवाईफ असत. डॉक्टर 'रोज' OPD ला थोडावेळ / काहीवेळ का असेना उपलब्ध असत आणि क्रोसीन / मलेरियाच्या क्विनाईन सारखी औषधे 'विनामूल्य' उपलब्ध असत. मग पुढे शिक्षणसेवकाच्या धर्तीवर 'आरोग्य सेवक' आले आणि ग्रामीण महाराष्ट्रातून ठीकठाक दर्जाची सरकारी वैद्यकीय सेवा आणि विनामूल्य औषधे-उपचार जवळपास हद्दपार झाले.

ह्या लेखामुळे अनेक प्रसंग, अनेक व्यक्ती आठवल्या. मुद्देसूद लिहिण्याचे, प्रसंग खुलवण्याचे आणि उत्तम भाषा वापरण्याचे कसब हे तुम्ही फार कमी वयातच कमावले होते हे दिसून आले Happy

वरील सर्वांचे पूरक माहिती व अभिप्रायाबद्दल आभार !
....
१.आमच्यासारख्यांचे उद्बोधन होते.
आपण जरूर लिहावे.>>>
तुमचे उत्साहवर्धक प्रतिसाद ही तितकेच महत्त्वाचे आहेत.
...
२. डॉक्टर सुरेश शिंद्यांच्या लेखनाची आठवण झाली.
>>
ते माझ्यासाठीही प्रेरणादायी आहेत.

मला आठवते लहानपणी मी तिसरी चौथीत असताना "तीन मुले पुरेत" असे प्रबोधन सुरू झाले होते. दोन किंवा तीन नंतर झाले. कुटुंब नियोजन केव्हा सुरू झाले नक्की माहीत नाही, पण आमच्या गावात तरी तेव्हा दणक्याने त्याचे प्रबोधन सुरू झाले होते.
तशात जे लोक लग्न मंडपात लाऊड स्पीकर लावत तिथे किंवा इतर वेळीही केव्हातरी नको हे चौथं मूल हे गाणे लावले जाई. हे सारखे ऐकायला मिळत असे. बहुतेक सगळ्या घरी तेव्हा चार मुले होती. चौथ्या मुलांना मात्र तेव्हा या गाण्याने चांगलेच रडवले. इतर मुलं त्यांना यावरून चिडवत असत. मी तिसरा आणि माझी धाकटी बहीण चौथी. तिला कोणी चिडवलं की रडत येऊन मला सांगे आणि मग आम्ही दोघे मिळून भांडायला जायचो, त्यात कमी पडलो की घरी येऊन आईला सांगायचो तू त्यांना रागव म्हणून.

३.
*युनिव्हर्सिटी ऑफ पूना', >>>
पुण्याचे ब्रिटिशकालीन नाव लक्षात यावे हा हेतू होताच.
पुढे मी एमडी झालो तेव्हा मात्र नाव पुणे केले होते आणि त्या पदवीचे प्रमाणपत्र इंग्लिश व मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये असल्यामुळे आकाराने भले मोठे आहे !

अजून एक दिसेल. तेव्हा तशी प्रमाणपत्रे घाऊक प्रमाणावर छापलेली होती आणि एमबीबीएस चे कोणते वर्ष (एक दोन का तीन) ते चक्क बॉलपेनने लिहिले जात होते.
....
*पुढे शिक्षणसेवकाच्या धर्तीवर 'आरोग्य सेवक' आले आणि ग्रामीण महाराष्ट्रातून ठीकठाक दर्जाची....>>>
+११११
अधोगती.....

वरील सर्वांचे पूरक माहिती व अभिप्रायाबद्दल आभार !
....
नको हे चौथं मूल
>>> अशक्य भन्नाट गाणं आहे हो !
ठेका सुरेख आहे. पूर्वी नव्हते ऐकले.
धन्यवाद

अनुभव २.
प्रशिक्षणाच्या काळात आजूबाजूच्या गावांमधील शाळांमध्ये जाऊन मुलांची तपासणी करावी लागे. त्यामध्ये कुपोषणाचे असंख्य नमुने बघायला मिळत.

एक शाळा आठवते.
आम्ही साधारण 100 मुले पाहिली. मुले रांगेने येत होती. रांगेतील प्रत्येक दुसऱ्या किंवा तिसऱ्या मुलाच्या डोळ्यात अ जीवनसत्वाच्या अभावाने जे ठिपके दिसतात ते दिसत होते
(https://www.maayboli.com/node/68592).

सुदैवाने शासनाकडून आम्हाला अ जीवनसत्वाच्या जेनरिक गोळ्यांचा भरपूर साठा मिळालेला होता. तेव्हा अक्षरशा मूठ भरून ते आम्हाला त्यांना मुक्तपणे वाटता आले.या जीवनसत्त्वाच्या अभावामुळे रातांधळेपणापासून ते पार अंध होणे इथपर्यंत दुष्परिणाम दिसतात.

त्यामुळे शालेय वयातच ही तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

वाचतोय.
>>>डॉक्टर, खरोखरच आपण आपले अनुभव लिहावेत. ह्या बाबतीत अस्मिता +१>>>
+111
आज हे वाचले : https://www.tv9marathi.com/videos/pune-maval-news-lady-patient-taken-to-...
मावळ तालुक्यातील एका स्त्रीला उपचारांसाठी झोळीतून उचलून न्यावे लागलय. खडतर आहे हे.

अनुभव ३.
प्रशिक्षणा दरम्यान आषाढी वारी होती तेव्हा आम्हाला वारकऱ्यांसाठी फिरतीओपीडी चालवण्यासाठी पाठवले होते. संध्याकाळच्या सुमारास आम्ही संबंधित मार्गावर एक टेबल खुर्ची आणि चार प्रकारच्या औषधांच्या गोळ्या घेऊन बसलो होतो. वारकरी तिथे पोहोचतात आमच्यापुढे अक्षरशः त्यांची रांग लागली.

पाय व डोके दुखणे, चक्कर येणे किंवा पोट बिघडणे अशी त्यांची ठराविक लक्षणे होती. आमच्याकडे जी मोजकी औषधे होती त्यातील वेदनाशामक व ब जीवनसत्त्वांच्या गोळ्या आम्ही जवळजवळ प्रत्येकालाच देत होतो.

सुमारे तीनशे जणांना त्या दिवशी औषध वाटप झाले आणि शेवटी आमच्या जवळील औषधांचा साठा पूर्ण संपला.
जवळपास पाच तास हे काम चालले होते. हा एक अविस्मरणीय अनुभव ठरला.

धन्यवाद.
…..
नुकतीच माता बाल आरोग्य संबंधीची एक चांगली जाहिरात महाराष्ट्र शासनाने प्रसारित केली आहे.
त्यातले ब्रीदवाक्य सुरेख :

मातृत्वाचा सन्मान
हाच आपला अभिमान

>>>मातृत्वाचा सन्मान
हाच आपला अभिमान>>
छान आहे एकदम.
ही पण एक जाहिरात खूप वेळा वाचली आहे.
"गप्पी मासे पाळा हिवताप टाळा

गप्पी मासे पाळा
हिवताप टाळा

>>>
ही जाहिरात तर अजूनही काही भिंतीवर दिसेल. या संदर्भातील माझा सन २००२ च्या दरम्यानचा एक अनुभव लिहीतो.

त्या काळात मी पुणे लोणावळा लोकल ट्रेनने नियमित प्रवास करत होतो. माझ्या डब्यात नेहमी एक रेल्वे कर्मचारी असायचे. साधारण दापोडी च्या आसपास ते आसनावरून उठून दारात जायचे आणि तिथून खाली जो नदीचा प्रवाह आहे त्यात त्यांच्या पिशवीतलं काहीतरी टाकायचे. माझा असा समज झाला होता की हा माणूस नदीत निर्माल्य टाकतो आणि त्यामुळे मनात एक प्रकारचे अढी निर्माण झाली होती( प्रदूषण वगैरे).

एकदा ते आणि मी असे दोघेच डब्यात होतो तेव्हा मी माझे कुतूहल शमवले आणि त्यांना विचारले की तुम्ही नदीत काय टाकता ?

तेव्हा ते म्हणाले, की मी गप्पी माशांसाठी जे खाद्य लागते ते टाकतो. जेवढे गप्पी मासे नद्यांमधून वाढतील तेवढे चांगलेच.
हे ऐकल्यावर मी त्यांचे कौतुक केले आणि त्यांना मनोमन वंदन केले !

धन्यवाद.
....
अजून एक आठवण लिहितो.
आमच्या प्रशिक्षणाचा तिसरा महिना होता. मध्यरात्री दोनचा सुमार. आमच्या दारावर धाड धाड धाड धाड आवाज. वास्तविक रात्रीचा कॉल असेल तेव्हा शिपाई शिस्तीत बेल वाजवायचा. परंतु आज हे अजब होते ! खडबडून जागे झालो आणि दार उघडले.
उघडल्या उघडल्या प्रथम दारूचा भपकारा हवेत जाणवला आणि मग दिसला तो आमच्या आरोग्य केंद्राचा शिपाई. झोकांड्या खातच आमच्या बाहेरच्या खोलीत आला, पेशंट आला आहे ते सांगायला. त्याचे हे वर्तन अक्षम्य होते. पहिल्यांदा त्याला बखोटीला धरून खुर्चीवर बसवले. त्याची आपली एक सारखी बडबड चालू,
“मी पेलेलो न्हाई, मी पेलेलो न्हाई”...
मग आम्ही आवाज काढला. म्हटल आता उद्या रिपोर्ट करतो साहेबांना. असं म्हणताक्षणी गयावया करायला लागला. झोकांड्या खातच जवळपास आमच्या पायाशीच पडला आणि एकदम निपचित झाला. आता आला का वांधा.

मग पटकन आमच्यातले दोघे आधी आरोग्य केंद्राकडे पळाले. उरलेल्या दोघांना हा दारातला पेशंट सांभाळणे आले होते. त्याला गदागदा हलवले व तोंडावर पाणी मारले. मग महाराज पुन्हा बरळायला लागले. मी म्हणालो,

“आयला, तुला आता उचलतो आणि नेतो साहेबांच्या दारातच”.
मग पुन्हा गयावया. अखेर आम्ही त्याला तिथेच जमिनीवर झोपवले. जवळजवळ पहाट होईपर्यंत आमच्या इथेच पडून होता. सकाळी जेव्हा त्याची उतरली तेव्हा खालच्या मानेने निघून गेला.

दरम्यान आरोग्य केंद्रातले प्रकरण यातून खराब होते. गावकऱ्यांनी एक बाईला आणलं होतं. तिच्या चेहर्‍यावर आणि अंगावर मारहाणीच्या खुणा. तिचा नवरा अट्टल बेवडा. त्याला गावकऱ्यांनी यथास्थित बदडलं होते आणि बाईला दवाखान्यात घेऊन आले होते. मग शक्य ते सर्व उपचार करून बाईंना सकाळपर्यंत झोपवून ठेवले.

अशा या दोन दारुड्यांचे प्रताप निस्तरताना संपूर्ण रात्र खर्ची पडली.

दारुड्या नवर्‍याला ट्रीटमेंट नाही द्यावी लागली का?

हिंदीमध्ये लाइफलाइन नावाची एक दूरदर्शन मालिका होती. त्यातला एक डॉक्टर प्राथमिक आरोग्य केंद्रात होता.

दारुड्या नवर्‍याला ट्रीटमेंट नाही द्यावी लागली का?
>>>
नाही, त्याला तेव्हा केंद्रात आणला नव्हता. गावकऱ्यांनी 'खरपूस मार' हा उपचार केला होता ! Happy

Pages