एकमेकांपासून लांब राहून प्रेम कसे टिकवावे?

Submitted by इथूनतिथूनमिथून on 8 January, 2022 - 08:13

आमची ओळख दोन-अडिज वर्षे जुनी. एकाच ॲाफिस मधे आणि एकाच प्रोजेक्टमधे असल्याने कायम बोलणे, चहा-कॅाफी, लंच एकत्रच व्हायचे. मला ती सुरूवातीपासूनच आवडत होती. तीला सांगणार तितक्यात पहिला लॅाकडाऊन सुरू झाला. लॅाकडाऊनमधे मिटिंग्स पुरतेच बोलणे व्हायचे. मग एका रात्री तीला मेसेज करून मन मोकळे केले. तीच्याकडूनही अगदी हो नसले आले तरी नाही देखिल नव्हते. त्यानंतर मिळेल तेव्हा मेसेज करायचो. सगळे घरीच असल्याने फोनवर बोलणे असे कधी झालेच नाही. हळूहळू मेसेजमधेच तीलाही मी आवडतो असे तीने सांगितले. बाहेर सगळीकडे गोंधळ चालू असताना मी अगदी सातव्या आसमानात होतो. बोलायची इच्छा असली तरी फोनवर बोलणे शक्य नव्हते. त्यानंतर जसा लॅाकडाऊन उठला तसं काहीच दिवसात भेटलो. ॲाफिस तसेही सुरू नव्हते झाले. अजून दोनदा भेटलो आणि ॲाफिस सुरू होणार तितक्यात कळालं की ती आता नविन एका प्रोजेक्टसाठी महाराष्ट्रा बाहेर जाणार. तीने ॲाफर किजेक्ट करावी असे वाटूनही ते होणे शक्य नव्हते. तसे मी तीला सांगणेही बरे वाटत नव्हते. मग म्हटलं एकाच वर्षाचा प्रश्न आहे. पुन्हा येईलच इथे. तीलाही माझ्यापासून दूर जायची इच्छा नव्हती पण नाईलाज होता. काहीच दिवसात ती नविन ठिकाणी शिफ्ट झाली. आता निदान फोनवर मनसोक्त बोलू शकू असं वाटत होते तर तिच्या प्रोजेक्टमधे सारखीच आग लागलेली असते. शिवाय घरातली इतर कामेही तिलाच करावी लागतात म्हणून वेळही कमीच मिळतो. अशात अर्थातच वाद वाढू लागले, भांडणं होऊ लागली आणि शेवटी ब्रेकअपही झालेच. पण त्यानंतर ना मला तीच्यावाचून करमलं ना तीला. पुन्हा ७ महिन्यांनी पॅचअप झालं. पॅचअप होऊनही आता ६-७ महिने झालेत पण अजूनही कम्युनिकेशनचा प्रॅाब्लेम आहेच. मला ती आवडते ह्यात वाद नाही पण कधीकधी तीचेच काय ते नीट कळत नाही. जेव्हा बोलणे होते तेव्हा जणू आम्ही एकमेकांसाठीच बनलोय वगैरेसारख्या फीलिंग्स असतात पण इतर वेळेस तितका ठामपणा नसतो. नक्की कसा हा गुंता सोडवावा म्हणून इथे येऊन विचारावेसे वाटले.

Group content visibility: 
Use group defaults

तिच्या प्रोजेक्टमधे सारखीच आग लागलेली असते. >>> हे गंभीर आहे. शक्यतो लवकरात लवकर तिला काळजी घ्यायला सांगा. तिच्या कंपनीत आगरोधक उपकरणे आहेत कि नाहीत, फायर ड्रिल होते कि नाही याची चौकशी करा. जर तुम्हाला हलगर्जीपणा आढळून आला तर तिला नोकरी सोडायला सांगा किंवा तिच्या कंपनीबद्दल पोलीस तक्रार करा. हे तातडीने व्हायला हवे.

बाकीच्या गोष्टी कमी महत्वाच्या आहेत. त्यावर तोडगा निघेलच.

लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप हार्डली वर्क्स... दुसरी शोधून ठेवा...
त्रास कमी होईल ब्रेक अप झाला तर....

प्रेम टिकवून पुढे काय करणार आहात?
लग्न?
तसे असेल तर मराठी समाजात ज्या गोष्टी आडकाठी आणू शकतात त्या कोणत्याही प्रेसेंट नाहीत याची खात्री करून घ्या, नाहीतर प्रेम टिकवायची कसरत करून केवळ कुंडली जुळत नाही, जात वेगळी वगैरे फालतू कारणांनी सगळे मुसळ केरात.

जर लग्न करूच असा ठाम विचार नसेल, तर जस्ट गो विथ the flow.
स्टेटस सिरीयस रिलेशन/ एक्सकलुसिव्ह पार्टनर वगैरे ठेवायचा विचार असेल तर तुम्ही सांगितली आहे ती परिस्थिती परत परत येऊ शकते. किती वेळा ब्रेक अप/पॅच अप कराल?

तुम्ही सिरीयस आहात, ती सोडून दुसऱ्या कोणाचा विचार तुमच्या डोक्यात नाही हे तिला एकदा पूर्ण स्पष्ट सांगा and you will wait for her हे ही सांगा, ते तुमच्या वागण्यातून तिला जाणवू दे, मात्र हे करताना काही शे km वरून तुमच्या प्रेमाने तिची घुसमट होणार नाही याची काळजी जरूर घ्या.
एक पार्टनर बिझी असताना दुसर्याने किंचित बॅक फूट वर राहून रिलेशन मध्ये जास्त वेळ घालावा, तू बिझी आहेस तर मी पण अमुक तमुक सर्टिफिकेशन आटपून घेतो म्हणून तुम्ही सुद्धा बिझी झालात तर प्रकरण कठीण होईल

तिच्या आजूबाजूला अनेक तरुण मुले असणार आहेत, प्रत्येक मुलाची जाणते/अजाणतेपणी तुमच्या बरोबर तुलना करून ती पाहणार आहे. हे नैसर्गिक आहे.
बाकी तिचा निर्णय तिच्यावर सोडून द्या,
आणि ती जो निर्णय घेईल तो मान्य करायची मानसिक तयारी ठेवा.

पॅचअप होऊनही आता ६-७ महिने झालेत पण अजूनही कम्युनिकेशनचा प्रॅाब्लेम आहेच. मला ती आवडते ह्यात वाद नाही पण कधीकधी तीचेच काय ते नीट कळत नाही> >> म्हणजे काय नक्की? कम्युनिकेशन ला problem कसाकाय आहे? रोज रोज बोलणं झालंच पाहिजे असं धरुन चालताय का काय.. एकमेकांशी बोलायला आवडणे वेगळे, कमिटमेंट is different thing , आणि ती दीर्घ सहवासाशिवाय तितकीशी ठाम नसते, सो बेटर, ती तिकडे आहे तोवर चांगल्या मैत्रीप्रमाणे बोलत रहा. इकडे पुन्हा आली की मग relationship बद्दल विचार करा.
आणि हो,, long distance relation बहुतेक वेळा तरी doesn't work.

तिच्या आजूबाजूला अनेक तरुण मुले असणार आहेत, प्रत्येक मुलाची जाणते/अजाणतेपणी तुमच्या बरोबर तुलना करून ती पाहणार आहे. हे नैसर्गिक आहे.
बाकी तिचा निर्णय तिच्यावर सोडून द्या,>> +११

तिच्या आजूबाजूला अनेक तरुण मुले असणार आहेत, प्रत्येक मुलाची जाणते/अजाणतेपणी तुमच्या बरोबर तुलना करून ती पाहणार आहे. हे नैसर्गिक आहे.
बाकी तिचा निर्णय तिच्यावर सोडून द्या,>
+1

अजूनही वाटतं की सेफ्टीकडे पहिल्यांदा लक्ष द्यायला हवे. जोपर्यंत आग लागतेय तोपर्यंत बाकीचा विचारही करू नये.

खरं सांगायचे तर जे टिकते तेच प्रेम.
तिची घरचीही कामे असतात म्हणता, तुमचीही असतील समजूया. पण ती कामे करता करताही जर तुम्हाला एकमेकांशी हेडफोन लाउन वा विडिओ कॉल करून बोलावेसे वाटत असेल तरच तुम्हाला एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटतोय आणि तुमची केमिस्ट्री जुळलीय असे समजावे.
असे छान नटून थटून डेटवर जाणे आणि तिथे हसणे खिदळणे हे लाईफभर नसते. घरच्याघरी चड्डी बनियानवर असताना पोट खाजवत आपण कसे दिसतोय याची पर्वा न करता तुम्ही तिच्याशी बोलू शकत असाल तर समजावे की तुमचे एकमेकांवर प्रेमही आहे आणि एकमेकांच्या प्रेमावर विश्वासही आहे. कारण तुम्ही जसे आहात तसे एकमेकांना स्विकारले आहे.

प्रेमाच्या प्रकरणात आपले समोरच्यावर किती प्रेम आहे यापेक्षा जास्त महत्वाचे असते ते समोरच्याबद्दल वाटणारा विश्वास. आज तुम्हाला हा धागा ईथे काढावासा वाटणे हे हा विश्वास डळमळीत झाल्याचे प्रतीक आहे. तुमचे तिच्यावर उत्कट प्रेम असेलही. पण आता तिचेही आपल्यावर प्रेम आहे हा विश्वास टिकवणे जमतेय का हे आधी बघा.

आणि हो, जसे हा धागा ईथे काढताना मन मोकळे केले तसेच मन मोकळे करणारा एक मेल लिहा तिला. त्यात लिहा हे सारे. हे काम करते. आम्ही हे केलेय एके काळी. तुमचा डळमळीत झालेला विश्वास त्या मेलचा रिप्लाय वाचूनच आता पुन्हा मिळू शकतो. शुभेच्छा Happy

इथले निगेटिव्ह विचार वाचून आश्चर्य वाटले. एकच वर्षाचा प्रश्न आहे, कामात खरोखर बिझी असू शकेल. एक वर्षात तुम्ही अजून जवळ याल, फक्त काँटॅक्ट सोडू नका आणि इथे बोललात तसे तिच्याशी पण स्पष्ट (पण न भांडता) बोला.(सुखी संसार म्हणजे न भांडता मत मांडणे, हे मी अजूनही शिकतोय, तुम्हाला तर खूप वेळ आहे). Enjoy and Have fun.

Rules of life
Rule 1 Wife/fiancé/boss is always right.
Rule 2: When in doubt, refer to rule 1.

ऋन्मेषचा प्रतिसाद आवडला
आमचंही लाँग डिस्टन्स रिलेशन होत पण आम्ही एकमेकांशी भरपूर बोलायचो , घरातली कामं करता करता किंवा प्रवासात मोकळा वेळ असताना ,
दोन्ही बाजूंनी प्रेम आणि विश्वास असेल तर हे नातं नक्कीच टिकत , बहरत जातं
आमचं लग्न झाल्यावर प्रेम आणखी वाढलं सहवासाने

लोकांना अजुनही असं का वाटतं कि इथे त्यांच्या समस्यांचं निराकरण होइल?
लोक कोतबो / माबो वर वैयक्तिक समस्या का लिहितात?
१. कादंबरी साठी सोशल प्रयोग (समस्या खरी नाही)
२. मज्जा (समस्या खरी नाही)
३. वेळच वेळ आहे, काहितरी टीपी (समस्या खरी नाही)
४. मन मोकळं होतं (समस्या खरी आहे)
५. अटेंशन सिकर
६. मजा येते फँटसी लिहिताना (सुपर मॅन फीलिंग)
७. स्कोर सेटल करता येतात

मन मोकळे होणे हे असावं कारण आजच्या जगात मन मोकळं करावेसे विश्वासू मैत्र, नाती कमीच उरली आहेत
ज्यांच्याकडे आहेत ते नशिबवान
ज्यांच्याकडे नाही त्यांना असे धागे काढावे लागत असतील

Out of sight is out of mind असे तुमचे कदाचित होत असावे. त्यामुळे ऋन्मेऽऽष यांचा पर्याय पटतो. WhatsApp video / Google Meet वगैरेवर गप्पा मारायचे पर्याय आहेत. आजच्या काळात अंतर ही समस्या राहिली नाही. एकमेकांपासून लांब राहून बिलियन डॉलरचे प्रोजेक्ट लोकं करत आहेत. प्रेम का नाही टिकवता येणार? पण "कुठे ते व्हिडीओ कॉल वगैरे लावत बसायचं?" असे काही विचार मनात येत असतील(दोघांच्या/एकाच्या) तर विषय सोडून द्या. त्या केसमध्ये सिम्बा यांचा प्रतिसाद समोर ठेवा आणि move on करा. ऑल द बेस्ट!

थोडंंसं फिल्मी व्हायचं.
https://www.youtube.com/watch?v=jsaKIKHmz3M
आवाज जात असेल तर
https://www.youtube.com/watch?v=RG3i3InLEUo
किंवा
https://www.youtube.com/watch?v=alceWhaicrU
नाहीच झाली भेट तर
https://www.youtube.com/watch?v=hmlkF695bbQ

अतुल अहो किती मेजर तुलना गंडली आहे
बिलियन डॉलर प्रोजेक्ट मध्ये ओढ हुरहूर एकमेकांसाठी झुरणं, अंग मोहरून येणं यातलं काही म्हणजे काही सुद्धा नसलं तरी चालतं, किंबहुना नसावच Happy
प्रोजेक्ट ची तुलना प्रेमाशी कशी करताय

आज रुसलंय वाटतं एक माणूस
औमी ना जा सांगत
अगं वेडाबाई

असले डायलॉग प्रोजेक्ट च्या मिटिंग मध्ये इम्याजिन करून बेक्कार हसतोय Happy

आता निदान फोनवर मनसोक्त बोलू शकू असं वाटत होते तर तिच्या प्रोजेक्टमधे सारखीच आग लागलेली असते. शिवाय घरातली इतर कामेही तिलाच करावी लागतात म्हणून वेळही कमीच मिळतो >> त्या पहिल्यांदाच घरापासून लांब रहायला गेल्या असाव्यात. स्वानुभावरून सांगते, मी पण जेव्हा प्रोजेक्ट निमित्त दिड वर्षे चेन्नईत रहायला गेले होते तेव्हा priorities बदलल्या होत्या.. नविनच मिळालेलं स्वातंत्र्य, नविन शहर, नविन लोकं, घरी कितीही उशिरा आलं तरी जाब विचारणारं कोणी नाही .. हे सगळं अनुभवण्यात एक वेगळीच मजा होती.. त्याही ती मजा अनुभवत असतील.. त्यांना मजा करू द्या.. कारण ते दिवस पुन्हा येत नाहीत.. तुम्हाला मिरची लागत असेल तर काही तरी गोड खा (हो, लागते अशी मिरची जेव्हा पार्टनर आपल्याशिवाय दुसरीकडे मजा करत असतो) परत आल्यावर मनसोक्त बोला, हवे तेवढे भेटा.. तसंही पॅचअप झालंय तर पूर्वी झालेल्या चूका पुन्हा रिपिट होता कामा नये ह्याकडे लक्ष द्या.

>> बिलियन डॉलर प्रोजेक्ट मध्ये ओढ हुरहूर एकमेकांसाठी झुरणं, अंग मोहरून येणं यातलं काही म्हणजे काही सुद्धा नसलं तरी चालतं, किंबहुना नसावच

प्रत्यक्ष भेटून गप्पा माराव्यात तसे बोलण्याइतकी आजकाल बँडविड्थ उपलब्ध आहे इतकेच सुचवाचे होते. दीर्घ अंतरामुळे भेटी होत नाहीत ही त्यांची समस्या आहे.

अग्निपंख,

सहमत

गेली कित्येक वर्षे मी हाच प्रश्न येथे विचारत आलो आहे

लोक कोतबो / माबो वर वैयक्तिक समस्या का लिहितात?>>>> 99% लोक समजा जेन्युईन नसतील तरी जेव्हा १% केसेस खऱ्याखुऱ्या असतील तेव्हा लांडगा आला सारखी गत होऊ नये म्हणून सर्वच केसेस जेन्युईन समजून सल्ला देणे हा मार्ग अवलंबणारे लोक आहेत.
अर्थात त्यांच्या संयमाची परीक्षा घेतली जाऊ नये. नाहीतर एक चांगली सुविधा बंद / अविश्वासार्ह होईल. नुकसान कुणा एकाचे नाही.

कुठली केस खरी कुठली खोटी हे मोजण्यासाठी फूटपट्टी नाही. तरीही लोक सूज्ञ असतात.

लोक कोतबो / माबो वर वैयक्तिक समस्या का लिहितात?>>> त्यांना मन मोकळं करायचं असेल किंवा सल्ला (वैद्यकिय/मानसोपचाराचा किंवा टेकनिकल) हवा असेल. त्यात गैर काय? हा प्रष्ण कायमच का पडतो काही लोकांना कळत नाही..तुम्हाला युसलेस वाटत असेल तर तुम्ही धागा वाचणे स्किप करा ना..
नाशिक ला मुव्ह करावे का..या धाग्या वर किती सुंदर चर्चा झाली होती..काही लोक सेम बोटीतही होते

हे गंभीर आहे. शक्यतो लवकरात लवकर तिला काळजी घ्यायला सांगा. तिच्या कंपनीत आगरोधक उपकरणे आहेत कि नाहीत, फायर ड्रिल होते कि नाही याची चौकशी करा. जर तुम्हाला हलगर्जीपणा आढळून आला तर तिला नोकरी सोडायला सांगा किंवा तिच्या कंपनीबद्दल पोलीस तक्रार करा. हे तातडीने व्हायला हवे.

ते तर होईलच, पण महोदय तुमच्या कुठेतरी आग लागली आहे असे निदर्शनास येत आहे