पॅलेस्टिनी लोकांना जिथे जिथे आश्रय दिला गेला तिथे तिथे त्यांनी आपल्या आततायी आणि हिंसक कारवायांनी त्या त्या देशाच्या प्रशासनाला नाकी नऊ आणले. लेबनॉनची तर केवळ दोन दशकांमध्ये रयाच गेली. शेजारच्या सीरियामध्ये गृहयुद्ध सुरु होतंच, आणि तिथले लोक पॅलेस्टिनी बरे वाटावेत इतके भांडखोर...त्यामुळे याही देशात बजबजपुरी माजली. तशात सीरियाने स्वतःला अण्वस्त्रधारी करण्याच्या दृष्टीने अणुप्रकल्पाची सुरुवात करण्यासाठी थेट इराण आणि उत्तर कोरिया अशा जगाने बहिष्कृत केलेल्या देशांना हाताशी धरलं. इस्राएलनेही छुप्या मार्गाने आपल्या अण्वस्त्रांच्या निर्मितीचा कार्यक्रम पुढे नेला आणि यशस्वी करून दाखवला. त्यांनी आजूबाजूला कोणीही अण्वस्त्रधारी होऊ शकणार नाही याची पूर्ण काळजी घेतली....इराकमध्ये सद्दामच्या आणि सीरियामध्ये असाद यांच्या अणुप्रकल्पांवर हवाई हल्ले करून त्यांनी आपण काय करू शकतो याची चुणूक जगाला दाखवून दिली.
पॅलेस्टिनी लोकांमध्ये आता असंतोष वाढलेला होता...ज्याचा फायदा घेतला शेख अहमद यासीन याने. हा अल जुर्रा नावाच्या आत्ताच्या इस्राएल आणि ब्रिटिशकालीन पॅलेस्टिनच्या भागात १९३७ साली जन्माला आला. आपल्या भावा - बहिणींना घेऊन हा १९४८ सालच्या अरब - इस्राएल युद्धानंतर गाझा भागात पळाला आणि तिथल्या अल - शती भागात स्थिरावला. तिथे मित्राबरोबर कुस्ती खेळता खेळता त्याच्या मानेला इतकी गंभीर इजा झाली की तो जवळ जवळ अंध आणि मानेखाली पूर्णपणे विकलांग झाला. अशा या पंगू व्यक्तीकडून कुठल्या भरीव कामगिरीची अपेक्षा सामान्यतः ठेवता येत नाही, पण याने आपल्या शाबूत राहिलेल्या मेंदूने जे काही करून दाखवलं, ते त्याचं नाव इतिहासात ठळकपणे नोंदवून गेलं.
कैरो महाविद्यालयात प्रकृतीच्या कारणामुळे त्याला शिक्षण पूर्ण करता आलं नाही. शेवटी घरीच या ना त्या मार्गाने त्याने शिक्षण घेतलं आणि त्याने आपल्या बुद्धीची चुणूक दाखवून दिली. राजकारण, धर्म, आंतरराष्ट्रीय नातेसंबंध, अर्थशास्त्र अशा अनेक विषयांमध्ये त्याला गती होती. शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी जमलेल्या लोकांना धार्मिक प्रवचनं देण्यात तो आघाडीवर असे. लहान वयात यहुद्यांच्या त्रासामुळे आपल्याला आपलं घरदार सोडून पळून जावं लागलं ही बोच त्याच्या मनात सतत होती. त्या सगळ्या वातावरणात तो शेजारच्या इजिप्तमध्ये बाळसं धरत असलेल्या मुस्लिम ब्रदरहूडकडे आकर्षित झाला आणि त्याने गाझा पट्टीत त्या संघटनेच्या शाखेची मुहूर्तमेढ रोवली. तिथे त्याला भेटले त्याच्यासारखेच पॅलेस्टिनी निर्वासित....अब्दुल अझीझ आलं रंतिसी, महमूद झहर,महमूद तहा असे अनेक जण त्याच्याबरोबर एकत्र आले आणि त्यांनी १९८७ साली एक संघटना स्थापन केली - हमास .
या हमासची स्थापनाच मुळी झालेली भडक माथ्याच्या नेत्यांकडून. ते सगळे शस्त्रास्त्रांची आणि हिंसेची भाषाच बोलणारे. त्यांच्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर सहानुभूती मिळवून आपल्या प्रश्नांना योग्य व्यासपीठावर नेण्याची चतुराई नावालाही नव्हती. तशात ही संघटना गाझा पट्टीमधली. पलीकडच्या वेस्ट बँक भागात यासार अराफत यांची PLO संघटनेने पाय रोवलेले होते. त्यामुळे गाझा भागात हमासने आपली संघटना रुजवली आणि विस्तारली. आता पॅलेस्टिनी लोकांच्या समोर दोन तुकड्यात विभागलेल्या त्यांच्या ' देशात ' दोन वेगवेगळ्या संघटना जन्माला आलेल्या होत्या. यासार अराफत यांनी सुरुवातीला विमान अपहरणापासून ते हिंसेपर्यंत सगळ्या गोष्टी करून पुढे हळू हळू मवाळ व्हायला सुरुवात केली. नोबेल मिळाल्यामुळे असेल कदाचित, पण त्यांनी चर्चेचा मार्ग स्विवरून कमीत कमी हिंसा तरी काही प्रमाणात कमी केली...पण असल्या कोणत्याच बंधनांना हमास जुमानणारी नव्हती.
हमासने हळू हळू गाझा भागात आपली संघटना मजबूत केली. तिथल्या बँका, जमिनी, स्थावर मालमत्ता, धार्मिक ट्रस्ट, वक्फ बोर्ड अशा सगळ्या महत्वाच्या संघटनांमध्ये हमास प्रबळ झाली. त्याशिवाय कतार, सौदी अरेबियामधल्या काही विशिष्ट संघटना, इराणमधल्या इस्राएलच्या विरोधातल्या काही संघटना, इजिप्तमधल्या मुस्लिम सुन्नी संघटना यांच्याकडून छुप्या मार्गाने त्यांनी आपल्या पैशांची तजवीज केली. २०११ साली या संघटनेच्या हाती तब्बल ७० दशलक्ष डॉलर असल्याचा अहवाल काही आंतरराष्ट्रीय अभ्यासकांनी सादर केला होता ज्यावरून या संघटनेची आर्थिक ताकद कळू शकते.
१९८९ साली या शेख यासीनची इस्राईलने धरपकड केली आणि त्याला तुरुंगात डांबलं. त्याच्या हमास संघटनेच्या अस्तित्वावर आता इस्रायली लष्कर पूर्ण ताकदीनिशी घाला घालण्यासाठी सज्ज झालं. हमासचे काही महत्वाचे नेते कतार, जॉर्डन, सौदी अशा सुरक्षित ठिकाणी पळाले आणि त्यांनी तिथून संघटनेच्या कामाची सूत्रं हाती घेतली.
१९९४ साली बारूच गोल्डस्तीन या माथेफिरू ज्यू तरुणाने वेस्ट बँकच्या इब्राहिमी मशिदीत तब्बल २९ मुस्लिम लोकांची हत्या केली...आणि तीही रमझानच्या पवित्र महिन्याची प्रार्थना सुरु असताना. इस्रायली पंतप्रधान यित्झाक राबिन यांनी या घटनेची निर्भत्सना केली, पण या माथेफिरूच्या बाजूने तसलेच कडवे झिओनिस्ट ज्यू ठामपणे उभे राहिलेले बघून त्यांनी आपले शब्द मागे घेतले आणि संघर्षाची ठिणगी पडली. दंग्यांमध्ये १९ मुस्लिम इस्रायली सैनिकांकडून मारले गेले. या सगळ्याला प्रत्युत्तर म्हणून संतापलेल्या पॅलेस्टिनी तरुणांनी हमासच्या पाठबळाने स्वतःच्या शरीरावर बॉम्ब लावून आत्मघाती स्फोट घडवून आणायला सुरुवात केली.
टोकाचे झिओनिस्ट ज्यू आणि तितकेच भडक पॅलेस्टिनी यांच्यात शस्त्रसंधी होण्यासाठी अनेकांनी प्रयत्न करून बघितले पण दोन्ही बाजूंच्या माथेफिरू तरुणांना ते मान्य नव्हतं. हिंसा होतंच राहिली. पुढे राबिन यांच्या जागी आलेले बेन्यामीन नेतान्याहू हे तर अशा सगळ्या हिंसेचे कट्टर समर्थक...त्यांनी सरळ जॉर्डन देशात आसरा घेतलेल्या खालिद मशाल या हमास नेत्याच्या हत्येचं फर्मान काढलं. मोसादच्या खास एजंट्सनी जॉर्डनमध्ये जाऊन या खालिद मशालवर नर्व्ह गॅसचा मारा केला. पण परतीच्या वाटेवर असताना जॉर्डनच्या पोलिसांनी त्यांना पकडलं आणि त्यांच्यावर खटला चालवायची धमकी देऊन इस्रायलला आंतरराष्ट्रीय पातळीवर उघडं पाडलं. ही घटना १९९७ सालची....या काळात पॅलेस्टिनी आणि इस्रायली संघर्षाची चरमसीमा गाठली गेली होती.
इस्राईलने आपल्या शिलेदारांना सोडवण्याच्या बदल्यात शेख यासीन याला तुरुंगातून मुक्त केलं. यासीन एखाद्या विजयी योद्ध्याच्या थाटात तुरुंगाबाहेर आला आणि पॅलेस्टिनी जनतेने त्याला डोक्यावर घेतलं. अर्थातच इस्राएलच्या डोळ्यात तो खुपत होताच....पण त्याला या सगळ्या गोष्टींचा उपयोग धूर्तपणे आपल्या फायद्यासाठी करणं जमलं नाही. रोखठोक राजकारण करणारे आणि त्यात पिढ्यानुपिढ्या भडक माथ्यानेच वागणारे पॅलेस्टिनी सतत आंतरराष्ट्रीय पातळीवर टीकेचेच धनी होत राहिले. हमासने भूमध्य समुद्रात बुडालेल्या जहाजांपासून, युद्धात ध्वस्त झालेल्या वाहनांपासून आणि अशाच मिळेल त्या स्रोतापासून धातू वेगळे केले, युद्धात हस्तगत झालेल्या रॉकेट्स - मिसाईल्सवर काम करून ' रिव्हर्स इंजिनीरिंग ' तंत्राने अतिशय कमी किमतीत आपले रॉकेट्स आणि मिसाईल्स बनवले आणि इस्राएलवर अधून मधून त्यांचा वर्षाव करायला सुरुवात केली. त्यांना अखेर आंतरराष्ट्रीय समुदायाने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं...पण त्यांच्याइतकीच पापं केलेले इस्रायली मात्र नामनिराळेच राहिले.
अखेर २००४ साली इस्राईलने मोका साधून शेख यासीन याला टिपलं. राहत्या घरापासून १०० मीटर अंतरावर असलेल्या सब्रा मशिदीत दररोज सकाळी यासीन नमाज पढायला जातो, हे मोसादच्या गुप्तहेरांनी शोधून काढलं होतं. त्याचा जायचा - यायचा रस्ता, त्याच्या बरोबर किती जण असतात, ते कशा पद्धतीने शेख यासिनचं संरक्षण करतात याचा मोसादच्या गुप्तहेरांनी व्यवस्थित छडा लावलेला होता. त्यांनी आपल्या F-१६ लढाऊ विमानांना या मशिदीवरून मुद्दाम उड्डाण करायला लावून परिसरात खळबळ माजवली. या विमानाचा आवाज अतिशय मोठा होता...पण इस्राईलने योजना अशी आखली होती, की त्या आवाजाच्या आडून आपली कमी उंचीवरून उडणारी AH -६४ अपाचे हेलिकॉप्टर्स त्यांनी या भागात आणली आणि यासीनला टिपलं. यासीनची दोन मुलं सुद्धा या हल्ल्यात अल्लाच्या वाटेवर धाडली गेली.
या हल्ल्यानंतर अब्दुल अझीझ अल रंतिसी याने हमासची धुरा सांभाळली. २००७ साली गाझाच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये हमासला दणदणीत पाठिंबा मिळाला आणि या भागात त्यांच्या उमेदवारांना भरभरून मतं मिळाली. आता हमासने आपल्या प्रतिस्पर्धी फताह संघटनेच्या लोकांना आणि पदाधिकाऱ्यांना गाझा पट्टीतून निघून जायला सांगितलं आणि या दोन संघटनांमध्येच युद्धाला तोंड फुटलं. इस्राएल बाजूला राहिलं आणि पॅलेस्टिनी लोकांना आपल्याच दोन संघटनांमधला संघर्ष बघावा लागला. २००४ साली यासर अराफत निर्वर्तल्यामुळे ( अनेकांच्या मते त्यांच्यावर विषप्रयोग झालेला होता, कारण त्यांच्या मृतदेहाच्या ऑटोप्सीला त्यांच्या पत्नीने कणखर दिला होता...) या सगळ्या संघर्षात हस्तक्षेप करणारं कोणी उरलेलं नव्हतंच.... अखेर संयुक्त पॅलेस्टिनी सरकार दुभंगून गाझा पूर्णपणे हमासच्या हातात आलं आणि फताह वेस्ट बँकच्या हातात गेलं.
या घटनेनंतर हमास एकाकी झाली. अधून मधून इस्राएलच्या भूमीवर रॉकेट हल्ले करून त्यांच्या कुरापती काढणं, सतत सीमारेषेवर संघर्षाची परिस्थिती निर्माण करणं अशा प्रकारे हमास आपलं अस्तित्व दाखवत राहिली. २००८ साली इजिप्तच्या मध्यस्थीने पुन्हा एकदा शांतता प्रस्थापित करण्याच्या चर्चा सुरु झाल्या...पण आता हमासच्याच अंतर्गत तयार झालेल्या जहाल गटांनी हिंसा सुरूच ठेवली. सुरुवातीची नऊ दिवसांची युद्धबंदी संपल्या संपल्या हमासनेच रॉकेट्स डागून इस्राएलच्या समोर नाक खाजवायची आततायी कृती केली. इजिप्तच्या होस्नी मुबारक यांनी हमासला समजावण्याचे अनेक प्रयत्न केले पण उपयोग झाला नाही...आणि इस्राईलने आपल्या हवाईदलाला हाताशी घेऊन ' ऑपरेशन कास्ट लीड ' सुरु केलं.
या संघर्षात तब्बल २८० पॅलेस्टिनी मारले गेले आणि ६०० जखमी झाले. हमासने जमिनीखालून खोदलेल्या बोगद्यांचा इस्रायली सैन्याने छडा लावून त्यांची तिथेही नाकेबंदी केली. अखेर सडकून मार लागल्यावर हमास घायकुतीला आलं आणि त्यांनी युद्ध थांबवायची घोषणा केली. २००९ साली अमेरिकेत बाराक ओबामा प्रशासनाने या सगळ्या प्रकारचा एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावण्यासाठी पुढाकार घेतला. आधीचे जॉर्ज बुश जितके इस्राएलच्या जवळचे होते, तितके ओबामा नव्हते...पण एव्हाना अमेरिकेची ज्यू लॉबी सक्रिय झाली होती. बिन्यामीन नेतान्याहू यांनी ओबामा प्रशासनाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. त्यांनी आपल्या बाजूने आता हमासचा पुरता बंदोबस्त करण्याच्या उद्देशाने सरळ सैनिकी कारवाया सुरु केल्या. २०१४ साली हजारो पॅलेस्टिनी मारले गेल्यावर इस्राईलने हमासला अखेर गुढघ्यांवर आणलं.
हमास आता आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाकी पडल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाने यासर अराफत यांचा मार्ग निवडला. सीरियाच्या यादवी युद्धापासून त्यांनी स्वतःला वेगळं केलं आणि आपल्या बाजूच्या कट्टरतावादी संघटनांना चाप लावण्याचे प्रयत्न ( निदान तोंडदेखले तरी ) केले. ' इस्राएलच्या पूर्ण विनाश ' हे उद्दिष्ट त्यांनी आपल्या संघटनेच्या उद्दिष्टांतून गाळून टाकल्याची घोषणा केली आणि १९६७ सालच्या सीमारेषेला आंतरराष्ट्रीय सीमारेषा म्हणून मान्यता देऊन पॅलेस्टिनला देशाचा दर्जा देण्याचीही मागणी आंतरराष्ट्रीय पातळीवर केली. स्वतःला त्यांनी चक्क मुस्लिम ब्रदरहूडपासूनही दूर केलं...
पण एव्हाना इस्राएलमध्ये नेतान्याहू नावाचा कट्टर झिओनिस्ट सत्तेत आलेला होता. त्यांना हमासच्या या सगळ्या नव्या अवताराचं जराही अप्रूप नव्हतं...त्यांनी बळजबरीने पॅलेस्टिनी वस्त्यांमधून अरबांना हाकलून देऊन तिथे ज्यू घेट्टो बसवण्याची नवी मोहीम हाती घेतली. हमासने जराही काही केलं तर त्याच्या प्रत्युत्तरादाखल त्यांनी जबरदस्त सैनिकी कारवाई करण्याचं धोरण स्वीकारलं. अगदी हमासने स्वतःला एखाद्या माथेफिरू हल्ल्यापासून दूर केलेलं असलं तरी नेतान्याहू मात्र सरळ हमासच्या नावाने शंख फोडत युद्धभूमीवर आपल्या लष्कराला खुली सूट द्यायचे. अखेर या सगळ्याची परिणीती या भागात नव्याने युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्यात झाली....
२०१८ साल उजाडलं ते अरब देशांकडून आश्चर्यकारकरित्या इस्रायलशी नव्याने संबंध निर्माण करण्याच्या हालचालींनी. त्याआधी हमाससारख्या दहशतवादी संघटनांना रसद पुरवल्याच्या मुद्द्यावरून अरब देशांनी कतारशी राजनैतिक संबंध तोडून या भागात आकाराला येत असलेल्या नव्या समीकरणांची नांदी केलेली होतीच. पुढे अब्राहाम कराराच्या माध्यमातून त्यांनी इस्राएलपुढे मैत्रीचा हात नेला आणि एका अर्थाने वर्षानुवर्षे पेटत असलेल्या पॅलेस्टिनी प्रश्नाला आपणही कंटाळलो असल्याची ग्वाही दिली. पॅलेस्टिनी लोकांनी हमाससारख्या संघटनांना दिलेला पाठिंबा, सततचा संघर्ष, आपल्या कुवतीच्या कित्येक पटीने जास्त प्रमाणात केलेला आडमुठेपणा, बदलत्या आर्थिक - राजनैतिक समीकरणातही न सोडलेला हेकेखोरपणा आणि इतर अरबी देशांमध्ये निर्वासित म्हणून आसरा घेऊनही तिथे चालवलेला मुजोरपणा या सगळ्यामुळे त्यांना हा दिवस बघावा लागला. अब्राहाम कराराचा आधार घेऊन अरब - इस्राएल संबंध हळू हळू पूर्वपदावर येऊ लागले, त्यावर पुढच्या भागात...तोवर अलविदा.
वाचतेय
वाचतेय
काहीच माहिती नव्हती मला या
काहीच माहिती नव्हती मला या बद्दल, वाचायला मजा येतेय.
छान.
छान.