आत्मविश्वास कसा वाढवावा ? न्यूनगंड कसा कमी करावा?

Submitted by अजय on 10 March, 2021 - 23:45

कधीकाळी माझ्यातला आत्मविश्वास एकदम कमी झाला होता. तो मी प्रयत्नपूर्वक वाढवू शकलो. त्या टप्प्यातनं जाताना मला उपयोगी पडलेल्या या काही युक्त्या. मी डॉक्टर/ मानसोपचार तज्ञ नाही . या युक्त्या मी नुसत्या वाचलेल्या नसून मी प्रत्यक्षात वापरून मला त्याचा फायदा झाला आहे.

आधी या मागची थेयरी सांगतो.
१) मनोकायिक आजारांबद्दल (Psychosomatic disorder) किंवा Mind body connection भरपूर माहिती नेटवर उपलब्ध आहे. तुमच्या मनातल्या काही विचारांमुळे तुमच्या शरीरावर परिणाम होऊ शकतो. संशोधनावरून असं लक्षात आलंय की हे दोन्ही दिशेने कार्य करतं आणि चांगल्या वाईट दोन्ही परिणामांसाठी काम करतं. आपण शरीरात चांगले बदल घडवून मनावर आणि स्वभावावर त्याचा परिणाम करून घेणार आहोत.
२) आयुष्यातल्या एका भागात होणार्‍या बर्‍या वाईट अनुभवांचा परिणाम इतर भागांवर पसरतो. कंपार्टमेंटलायझेशन करता येतं पण ते आपोआप होत नाही त्यासाठी मेंदूला कष्ट करावे लागतात. एका भागाचा परिणाम दुसरीकडे होणे हे जास्त आपोआप असते. त्यामुळे आपल्या एका भूमिकेत आत्मविश्वास आला तर तो दुसर्‍या भूमिकेतही वाढतो. हे आनंदी अवस्थेबद्दलही (डिप्रेशन कमी करण्यासाठीही )लागू पडते.
३) आपल्या सभोवतीच्या वातावरणाचा , व्यक्तींचा, घटनांचा आपल्यावर सतत कळत नकळत चांंगला वाईट परिणाम होत असतो. याचा आपण आपल्या फायद्यासाठी करून घेऊ शकतो.
३) छोट्या छोट्या सवयीतून मोठे बदल घडवून आणता येतात.

आता प्रात्यक्षिकाकडे वळू:
यातल्या ३ ही पायर्‍या महत्वाच्या आहेत. त्या वगळू नका.

१) रुटीन तयार करा: रोज एक ठराविक , तुम्हाला सगळ्यात जे सोपे असेल ते रुटीन सुरु करा. उदा. दररोज सकाळी उठल्यावर अंथरुणाची घडी करा. का ? एक म्हणजे दिवसातले सगळ्या पहिले काम तुम्ही केलेत तर एक काम संपवल्याचा आत्मविश्वास तुमच्यात येईल. आणि दुसरे हे इतके सोपे आहे , त्याची सवय पटकन लागून जाईल.
तुमचा यावर विश्वास नाही? अमेरिकन नौदलाचे अ‍ॅडमिरल विल्ल्यम मॅकरव्हेन यांचा हा व्हिडीयो पाहण्यासारखा आहे.

२) या रूटीनचा भाग म्हणून काहीतरी व्यायाम सुरु करा. (अंथरूण आवरल्यावर आणि दात घासल्यावर). हा व्यायाम अगदी सोपा हवा, कुठल्याही साधनाचा वापर न करता (किंवा अगदी सहज मिळणार्‍या साधनाचा वापर करून) यायला हवा आणि घरच्या घरी एकट्याने करता यायला हवा. सोपा आणि घरच्या घरी एकट्याने (कुणाची मदत न घेता) हे खूप महत्वाचे आहे. उदा. बैठका , सूर्यनमस्कार, सहज जमू शकेल असे योगासन (शवासन सोडून) , दोरीवरच्या उड्या . आणि यातला एकच व्यायाम सुरु करा. उदा रोज ५ बैठका किंवा रोज एक सूर्यनमस्कार असे आठवडाभर केल्यावर पुढच्या आठवड्यात तुम्हाला सहज जमेल तितके वाढवा . उदा ५ बैठकांच्या ऐवजी ६ बैठका. ही छोटीशी वाढ होणे हे ही खूप महत्वाचे आहे. काही आठवड्यांनंतर तुमचे शरीर पहिल्या दिवसापेक्षा जास्त असलेल्या व्यायामासाठी तयार झाले असेल आणि हे आपले आपल्या जमले आहे हे याची मेंदूत नकळत नोंद होऊन आयुष्यातल्या या छोट्या गोष्टीबद्दलचा आत्मविश्वास वाढला असेल. हा व्यायाम फक्त आत्मविश्वास वाढवण्यासाठी आहे. तुम्ही इतर व्यायाम करत असाल (उदा वजन कमी करण्यासाठी वगैरे) ते वेगळे करा.
विश्वास बसत नाही ? हार्वर्ड विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या लेखातही हेच सुचवले आहे.

३) रोज रात्री अंथरूणात पडल्यावर , डोळे मिटून , तुमच्यात आत्मविश्वास आल्यावर , तुम्ही कसे दिसाल, वागाल, बोलाल हे डोळ्यासमोर आणा (Visualize). पण हे नुसते डोळ्यासमोर आणून थांबायचे नाही तर त्याचा काल्पनिक अनुभव घ्यायचा आहे. उदा. तुम्हाला चारचौघात बोलायची भिती वाटते. डोळे मिटून अशी कल्पना करा की तुम्ही चारचौघात अस्खलीत बोलता आहात. पण तिथेच थांबायचं नाही तर तपशीलात जाऊन कल्पना करायची. तुम्ही कुठले कपडे घातले आहेत , त्यांचा रंग काय आहे, तुमची केशभूषा कशी आहे, तुम्ही कुठल्या खोलीत बोलता आहात, तिथे किती तापमान आहे, कुठले वास येत आहेत, कुठले आवाज येत आहेत , अजून कोण आहे याची खोलात जाऊन कल्पना करा. थोडक्यात तुम्हाला जो अंतिम परिणाम अपेक्षित आहे , तो झालेला आहे याची मेंदूला सवय करून घ्यायची.
यावर विश्वास नाही ? ऑलिपिक खेळाडू या युक्तीचा वापर करून स्वतः मधे बदल घडवून आणतात.

या युक्त्यांमुळे तुमचे सगळे प्रश्न सुटणार नाहीत. पण आत्मविश्वास वाढवण्याचा हा पहिला महत्वाचा टप्पा आहे हे मी अनुभवावरून नक्की सांगू शकतो.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

खूप छान आणि उपयुक्त धागा, धन्यवाद..
आत्मविश्वासाला तडा जायला जसे आपले अपयश, काही वाईट अनुभव कारणीभूत असतात. त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात आपल्याला डेमोरॅलिझ करणारे लोक असतात. यामध्ये काही वेळेला आपले नातेवाईक आपल्यापेक्षा वयाने मोठे सुद्धा असू शकतात, त्यामध्ये त्यांना आपल्याबद्दल वाटणाऱ्या काळजीचा भाग हि असतोच. पण एक उदा. देतो. ई. १० वि ला मिळालेले मार्क्स आणि पुढील शिक्षणाची शाखा हा सगळ्यांच्या आयुष्यात येणारा आणि महत्वाचा प्रश्न, निर्णय घेणारा खमक्या असेल तर ठिक नाही तर त्याचे काही खरे नाही. मी १० वि पास झाल्यावर माझा निर्णय झालेला होता. आजकाल मिळणाऱ्या मार्कांच्या मानाने मार्क्स खूप कमी होते पण विज्ञान शाखेची आवड आणि सोबत देणारे मित्र यांच्या भरवशावर मी माझा निर्णय घरी कळवला. घरून आई -वडिलांचा पाठिंबा होताच. पण स्वतःला मार्गदर्शक किंवा हितचिंतक या भूमिकेतून काही नातेवाईकांनी सल्ला दिलाच, झेपणार नाही, खूप मेहेनत आहे म्हणुन. पण सगळ्यांना फाट्यावर मारून एकदाची ऍडमिशन झाली. पुढील आयुष्यात बऱ्याच वेळा, आपण निवडलेला मार्ग बरोबर आहे ना, अपयश आल तर काय? मग सो-कोल्ड हितचिंतक पुन्हा तोंडसुख घेणार हि भीती होतीच. पण झाला एकदाचा बेडा पार.

पण बऱ्याच वेळा मी पाहिलंय कि सगळ्यांनाच निर्णय घेणं जमेलच असे नाही. त्याबद्दल हि मार्गदर्शन करा ..

छान लेख आहे! घरातील छोटी मोठी कामे करण्याचा फायदा आत्मविश्वासाबरोबरच इतर कारणांकरताही खूप झाला आहे. कधीकधी बरीच कामे करायची बाकी असतात आणि एक मेण्टल ब्लॉक आलेला असतो. अशा वेळी आधी एखाद दुसरे छोटे काम हातावेगळे केले तर त्यातून तुम्हाला बाकीची कामे पूर्ण करायला चालना मिळते.

करीयर च्या सुरूवातीला मला आत्मविश्वास नव्हता किंवा न्यूनगंडही असेल - एकूणच ममव वातावरणात व वागण्यात नम्रता व विनय असण्याला महत्त्व असलेल्या कल्चर मधून कॉर्पोरेट मधे वागताना जे बदल करावे लागले त्याला तेव्हा अशा उपायांचा खूप उपयोग झाला असता. तेव्हा थोडे स्वतःहून चाचपडत केलेले प्रयत्न व थोडे सरावाने ते वागणे जमत जाणे - अशातून तो न्यूनगंड गेला. आता तेव्हाइतकी नाही पण थोडीफार अजूनही कधीकधी तशी अवस्था येते - कामात, टीम मधे काही बदल झाले की - तेव्हा असे उपाय नक्कीच उपयोगी होतील.

>>>एकूणच ममव वातावरणात व वागण्यात नम्रता व विनय असण्याला महत्त्व असलेल्या कल्चर मधून>>> Lol

+जे बदल करावे लागले त्याला तेव्हा अशा उपायांचा खूप उपयोग झाला असता. तेव्हा थोडे स्वतःहून चाचपडत केलेले प्रयत्न व थोडे सरावाने ते वागणे जमत जाणे -
- मराठी मालिकांचा विषय हाच असतो.

> १० वि ला मिळालेले मार्क्स आणि पुढील शिक्षणाची शाखा हा सगळ्यांच्या आयुष्यात येणारा आणि महत्वाचा प्रश्न, निर्णय घेणारा खमक्या असेल तर ठिक नाही तर त्याचे काही खरे नाही. >
खरच आहे अशा वेळी ज्यांना यातले ज्ञान नाही ते लोकही सल्ले थोपवायला करतात.

Pages