Submitted by निशिकांत on 28 April, 2020 - 11:32
हजार वाटातुनी जशी मी वाट निवडली होती
"दोष द्यायचा प्राक्तनास" ही रीत बदलली होती
जिवापाड जपले अपुल्यांना, पण निष्ठुरही झालो
तकलादू नात्यांची जेंव्हा वीण उसवली होती
भोगत आहे सुखशांतीचे वैर सुबत्तेसंगे
उशास धोंडा असता निद्रा शांत लागली होती
खाउन झाल्या ठेचा, तुडवुन खाचा खळगे झाले
पण पायांनी चालायाची प्रथा राखली होती
बुरख्याखाली सभ्यपणाच्या जगताना मानाने
"असून बद, बदनाम नसावे" रीत पाळली होती
विरह वेदना सखे विसरणे अखेर जमले नाही
शेवटच्या श्वासात आठवण का दरवळली होती?
वर्तुळात मी शोधत होतो एक कोपरा माझा
स्वप्ने सारी अशीच वेडी मृगजळातली होती
रियाज केला जीवनगाणे सुरेल गाण्यासाठी
जीवनात जी लय सापडली, पुरून उरली होती
जशी दर्शनी कुस्ती असते तसे प्रेमही झाले
अनुभवता हे "निशिकांता"ची वाट लागली होती
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा