वास्तु १७

Submitted by जयश्री साळुंके on 2 April, 2020 - 23:38

कुमुदिनी बाई...
तो चेहरा जरी सई चा असला तरी त्या कुमुदिनी बाई होत्या आणि सौम्य त्यांच्या अगदी जवळ उभा होता. त्यांच्या चेह्यावरचं तेज जाऊन आता हिडीस भाव आलेले मला दिसत होते, पण सौम्य मात्र त्यांच्याकडे खेचला जात होता. त्याला अजुन पण तिथे सईच दिसत होती, म्हणजे होती तशी ती सईच पण काहीतरी गफलत नक्की होती. ती आल्यापावली मागे फिरली आणि सौम्य तिच्या मागे चालायला लागला. त्याला आवाज देण्याचा खूप प्रयत्न केला मी, पण तो कशाच्या तरी अमलाखाली असल्या प्रमाणे चालतच राहिला. दिवे तर आधीच विझलेले होते, जो काही प्रकाश होता तो फक्त चांदण्यांचा, अमावस्या असल्यामुळे चंद्र तर नव्हता, पण चांदण्या खूप होत्या.
घाई करत मी एक मशाल पेटवली आणि सौम्य च्या मागे पळालो. तर सौम्यला एक मुलगी ओढून आणताना दिसली, दोघं थोडं जवळ आल्यावर लक्षात आलं की ही तर आपली रिया आहे. इतक्या दिवसांनी तिला बघितल्यावर झालेला आनंद काही खूप काळ टिकला नाही माझा कारण सौम्य पूर्ण वेगळ्या मिती मध्ये दिसत होता. त्यांना दोघांना घेऊन मी यज्ञा जवळ आलो, अभिमंत्रित केलेलं पाणी सौम्यच्या चेहऱ्यावर शिंपडलं आणि थोड पाणी रियाला प्यायला दिलं. तिला पाणी देण्याची दोन का होती, एक म्हणजे तिच्या चेहऱ्यावर प्रचंड थकवा जाणवत होता आणि दुसरं म्हणजे ही नक्की रियाच आहे की आघोऱ्याची चाल हे माहिती करून घेणं गरजेचं होतं. दोघं शांत झाल्यावर आम्ही तिघांनी पुन्हा दिवे लावायला सुरुवात केली. रात्र संथ गतीने पुढे सरकत होती. दिवे लावत असतांना रीयाने इतके दिवस ती कुठे होती आणि तिला कळालेल्या काही गोष्टी सांगायला सुरुवात केली.
"तुला आठवत सौम्य आपण त्या दिवशी मंदिरातून परत आलो आणि नंतर थोडा आराम करायचा म्हणून आपापल्या खोल्यांत गेलो?" रिया.
"हो आणि त्यानंतर तू कोणालाच दिसली नाहीस, आम्ही सर्वांनी सगळ्या गावात शोध घेतला, पण तुझा कुठे पत्ता लागत नव्हता" सौम्य.
"कारण त्या दिवशी मी खोलीत गेले आणि तिथे आधीच वेद म्हणजेच तो बसलेला होता, मी खोलीत गेले आणि माहित नाही कसं काय पण पुढच्या क्षणाला मी एका जंगलात होते." रिया
"तेवढं मी पण बघितलं होतं, की वेद तुला घेऊन गेला. पण त्याने तुला कुठे नेलं ते मात्र मला नाही कळालं." वास्तू
"त्या जंगलात एक विचित्र शांती होती, अंगावर येणारी शांतता. त्या वातावरणात पूर्णपणे एक नकारात्मकता भरलेली जाणवत होती. मी आणि अघोरी सोडून अजुन कोणी होत तिथे, दिसत नव्हतं पण कोणी तरी निश्चित पणे होतं." रिया बोलत असताना सौम्य तिला मधे अडवतो.
"मला माहितीये तो तुला कुठे घेऊन गेला होता ते, हे तेच ठिकाण आहे जिथे त्याने ताई आणि बाकीच्या मुलींच्या आत्म्याला बांधून ठेवलं आहे." सौम्य
"म्हणजे मला तिथून पळायला मदत करणारे त्या मुलींची आत्मे होते तर. तिथून मी निघाले आणि सरळ नदीपात्रात उडी मारली, जेव्हा शुध्दीवर आले तेव्हा तिथल्या एका काकूंनी मला सावरलं. त्यांना मी सगळं सांगितल्यावर एक खूप महत्त्वाची गोष्ट कळाली आहे. की त्या अाघोऱ्याला कायमच संपवायचं असेल तर त्याला त्याच जागेवर मारावं लागेल जिथे त्याचा जन्म झाला आहे. कारण जन्म आणि मृत्यू हे एक चक्र आहे, आणि ते चक्र जर संपवायचं असेल तर तर ते त्याच जागी संपतं जिथून त्याची सुरुवात झालेली असते." रिया
"पण मग एवढ्या कमी वेळात त्याच जन्मस्थळ कसं शोधणार?" सौम्य
"आज त्याला संपवता येणार नाही, आज फक्त त्याच्या सगळ्या शक्ती संपवून त्याला कायमस्वरूपी बंद करून ठेवू शकतो आपण. पण तसं केलं तरी तो पुन्हा कधी ना कधी येईलच." वास्तू
"मग आपण एक करू शकतो, आज त्याला बंदिस्त करूयात आणि लवकरात लवकर त्याच्या जन्मस्थळचा शोध लावुया." रिया
"पण मग सईच काय? त्याला बंदिस्त करून सई त्याच्या तावडीतून सुटेल का?" सौम्य
"सईला काहीही होणार नाही याची जबाबदारी माझी. तुम्ही दोघं त्याला बंदिस्त करा, सईला मी सांभाळतो." वास्तू
"पण सई तर केव्हाच गेली त्याच्याकडे. मी जेव्हा सौम्यला घेऊन येत होते तेव्हा तिला देखील परत आणायचा प्रयत्न केला, पण तीच शरीर आगीसारखं तापत होतं आणि तिची नजर तर अक्षरशः लाव्हारासासारखी लाल दिसत होती, जस ती नजरेनेच एखाद्याला जाळून टाकेल." रिया
"तिला तिथून परत आणावं लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. आणि तिथून परत आणायला आपल्याला मदत करेल ती सौम्यची ताई - गिरिजा." वास्तू

क्रमश:

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

खुप सुंदर लेखन .
जयश्री कथा आवडली आणि
तुझ्या पुढील भागाच्या लेखनासाठी शुभेच्छा .

keep writing.

Khup diwasani bhag ala. Mastach.
Pudhil bhagachya pratikshet

पुढील भाग कधी येणार?
(ह्या नाशिककर मंडळींना वाट बघायला लावण्याची का इतकी हौस असते?) 

Submitted by अज्ञातवासी on 11 April, 2020 - 23:57

Biggrin शठ प्रती शाठ्यं इति "जशास तसे"