करोना आणि सोशल मीडिया फॉरवर्ड्स

Submitted by मुक्ता.... on 19 March, 2020 - 15:22

सध्या व्हाट्सअप्प आणि फेसबुकवर करोना वरून खूप टिंगलटवाळी आणि फालतू जोक्स पास होत आहेत. इटली,स्पेन ,चीन या देशांमध्ये मृत्यूने थैमान घातलाय, तितकं आपल्या नशिबाने इथे नाही झालाय अजून. त्यांच्या अनुभवांच्या अनुषंगाने कदाचित अधिक काळजी घेण्याची गरज आहे. झटका बसायला हवा का प्रत्येक वेळेला? काळजी घेणं सोपं आहे जास्त. तस पहायला गेलं तर आपल्या सोशल मिडीआवर या लोकांच्या मृत्यूचीच चेष्टा होतेय. व्हाट्सअप्प वर फालतू फॉरवर्ड आणि नको ते उपाय इकडचे उचलून तिकडे टाकण्यापेक्षा आणि एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घेणे श्रेयस्कर आहे.

हे संकट अख्या मानावतेवर आहे. आपलं खुजेपण समजून घेणे गरजेचे.मला किती कळत आहे किंवा आपल्या इथले औषधोपचार किती श्रेष्ठ हे दाखवण्यापेक्षा बेसिक काळजी, स्वच्छता ठेवणे एव्हढे केले तरी पुष्कळ. आपल्या अंतरंगात डोकावून बघण्याची, स्वतःच्या माणुसपणाची जाणीव करून घेण्याची ही संधी आहे. एक सूक्ष्मजीव जो आपल्या डोळ्यांनाही दिसत नाही त्याने हजारो लोकांचे प्राण घेतलेत. आणि किचकट बहुपेशीय अशा माणसाला त्याचे स्थान आणि निसर्गापुढे असलेली त्याची निष्प्रभता दाखवून दिली आहे. यातून बरेच काही शिकण्यासारखे आणि हवेत उडत असू तर जमिनीवर येण्याचे हे दिवस आहेत.कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या कुटुंबियांची आपली काळजी घेतली तरीही पुष्कळ.

रोडचा डिव्हायडार नुकताच काळ्या पिवळ्या पट्ट्यांनि रंगवलेला असतो. दुसऱ्या दिवशी त्यावर लाल रंग जमा होतो. कैक वेळ मुंब्रा ब्रिजवर जर लोकल उभी राहिली तर जरा बाहेर डोकवावे प्रत्येक खिडकी,दरवाजा यातून पिचकाऱ्या आणि लोक थुंकत असतात, प्रत्येक सेकंदाला. आणि कचरा म्हणजे बोलायचंच नाही. कुणाला सांगायला जावे तर धमक्या देण्यापर्यंत मजल जाते. बघून घेईन ची भाषा असते. काय म्हणावं याला? हल्ली रेल्वे स्टेशन्स वर सतत झाडू,कुंचा आणि तोंडाला मास्क बांधलेली कर्मचारी वर्ग स्टेशन साफ करत असतो. डोंबिवली स्टेशनला तर स्टेशन आणि ब्रिज पाणी टाकून धुताना पाहिलाय. आता त्यांनी साफ केलाय आणि दुसर्याक्षणी सगळं पुन्हा आपलं पचाक पचाक. करोना व्हायरस चा संसर्ग जर पहिला भारतात पसरला असता तर? कल्पना न केलेलीच बरी यातून काय झालं असत ते?...असो.

आता सगळं बाजूला ठेवून सरकारे जर आपल्याला काही चांगलं आवाहन करत आहेत तर तर आपण योग्य प्रतिसाद द्यायलाच हवा. केवळ राष्ट्रीय दिवस असले की पांढरे कपडे घालून आणि गळ्यात तिरंगी कपडा टाकला आणि राष्ट्रगीत ऐकून डोळ्यात पाणी आलं की इंडियन्स होत नाही आपण. आता एकमेकांना आणि सरकारच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देणं आपलं परम कर्तव्य आहे. कारण व्हायरस इन्फेक्शन देताना कोणताही जात, धर्म ,लिंग,वय बघत नाही. तो फक्त इन्फेक्शन देणं आजारी पाडणं एव्हढच करणार आहे. तेव्हा आता एकमेकांना समजून वागणं महत्वाचं. नीट नेटके आणि व्यवस्थित राहिलो की आहोतच पुन्हा एकमेकांशी भांडायला मोकळे नाही का?

काळजी घ्या.

रोहिणी बेडेकर

Group content visibility: 
Use group defaults

मुक्ता, जोक्स आणि फॉरवर्ड्स मधुनही सिरिअस अवेअरनेस क्रिएट करता येतो. जोक्समधे माणसांच्या वर्मावर/ सवयींवर बोट ठेवुन त्यांना बदलायचा प्रयत्न केला जातो.. असा वेगळा विचार करुन बघा. Happy

भारतातल्या ९९ %पब्लिकला व्हायरस आणि बॅक्टेरीयातला फरक माहित नाही.या रोगाने किती मरतुक होईल हे माहित नाही .फक्त जोक्स फॉरवर्ड करणे माहित आहे.ते लोकांना कुल वाटते.

Prashant 255, मन्या s..
सगळं ठीक की जोक्स ,आणि व्यंग लेखन, चित्रण यातून प्रबोधन होतं...पण प्रबोधनात्मक असेल तर ना, त्यात सखोलता असायला हवी. चेष्टा आणि विनोद यात फरक नाही का?
विनोद व्यंगात्मक असतो त्यातून कुठलाही प्रकारचा नकारार्थी गंध येत नाही. चेष्टा नकारात्मक, उथळ वाटते...पटतं का...
माझा रोख तो आहे...

गंभीर होवून सांगण्या पेशा जोक,cartoon,चांगला परिणाम करतात माणसाच्या मनावर,
>> लहान मुलांना बरोबर लागू पडतो हा उपक्रम.

आत्माराम जी
आपल्याला निदर्शनास आणि इच्छितो कार्टून ह्या शब्दाचा अर्थ व्यंग चित्र असा असा आहे,तुम्हाला त्या शब्द चे आकलन झाले नाही असे जाणवलं म्हणून तुम्हाला सांगायचं आगावू पना केला आहे.
क्षमा असावी