“योग्य आर्थिक गुंतवणूक आपल्या मिळकतीची”

Submitted by मुग्धा जोशी on 13 February, 2020 - 01:52

“योग्य आर्थिक गुंतवणूक आपल्या मिळकतीची”

केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होण्याचा दिवस जसजसा जवळ येतो, तसे सर्वजण आपल्याला या अर्थसंकल्पातून किती सूट मिळणार, याबाबत आडाखे बांधण्यास सुरुवात करतात. त्या अगोदरच्या आर्थिक वर्षांत दरमहा सहा आकडी पगार, आलिशान फ्लॅट, गाडी, वीकएंडसाठी सेकंड होम अशी भक्कम आर्थिक परिस्थिती असतानाही प्राप्तिकर कसा कमीत कमी भरावा लागेल आणि गुंतवणूक कशी वृद्धिंगत होईल, यासाठी अनेकांच्या कर सल्लागारांशी चर्चा सुरूच असतात. सुरुवातीच्या काळात सर्वसामान्य नोकरदारांना प्राप्तिकरात सूट मिळण्यासाठी आयुर्विमा, एनएससी, पीपीएफ असे काही मोजकेच गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध होते. नंतर बदलत्या काळानुसार हे पर्याय विस्तारत गेले.
सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ)चे खाते न उघडणारा मध्यमवर्गीय अपवादानेच आढळेल. करबचत व करमुक्त उत्पन्न असा दुहेरी लाभ देणारी ही लोकप्रिय योजना आहे. पीपीएफच्या खात्याचा कालावधी १५ वर्षांचा असतो. पीपीएफमध्ये पूर्वी गुंतवणुकीची मर्यादा ७० हजार होती, ती आता 1.5 लाख करण्यात आल्याचे खातेदारांना माहीत आहे. पण महिन्याच्या पाच तारखेपर्यंत या खात्यात पैसे भरले तरच पूर्ण महिन्याचे व्याज मिळते, अन्यथा त्या महिन्याच्या व्याजावर पाणी सोडावे लागते, ही बाब अनेक जुन्या खातेदारांनाही कदाचित माहीत नसेल. याशिवाय पीपीएफ खाते दीर्घकाळ चालू ठेवावे, गरज नसताना पीपीएफ खात्यातून पैसे काढू नयेत, पीपीएफ खात्यातील पैसे काढून तेच परत कर सवलत मिळण्यासाठी खात्यात भरू नयेत.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) तसेच टपाल खात्यामार्फत चालवल्या जाणाऱ्या लघुबचत योजनांमध्ये अनेक चांगले बदल झाले आहेत. लहान-मोठय़ा गुंतवणूकदारांसाठी वरदान ठरलेल्या एनएससीवरील व्याज करपात्र असले तरी व्याजावर कर कपात होत नाही. बँकेत ठेवी ठेवताना आपण चलनवाढीचा विचार करत नाही. गुंतवणुकीवर चलनवाढीचा परिणाम होणार नसेल, तरच ती गुंतवणूक चांगली समजावी. स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करणे हा योग्य पर्याय आहे. जमीन खरेदीतील गुंतवणूक चांगला परतावा देऊ शकते. पण कर्ज काढून घेतलेली स्थावर मालमत्ता गुंतवणूक म्हणून चांगली नाही. सोन्याच्या दागिन्यांमधील घट आदी गोष्टी जमेस धरल्या, तर ‘दागिने’ हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय नाही.

शेअर बाजाराचा चांगला अभ्यास करून त्यात पैसे गुंतवता येतील. मात्र कोणत्याही एकाच प्रकारची गुंतवणूक करण्यापेक्षा वेगवेगळ्या स्वरूपातील विभाजीत गुंतवणुकीस प्राधान्य द्यावे. शेअर बाजार पाहून किंवा वाचून लक्षात येऊ शकत नाही, तर त्याचे गमक हे गुंतवणूक करूनच कळू शकते. अगदी छोटय़ा रकमेपासूनही गुंतवणूक करता येते. तरुण वयातच गुंतवणुकीची शिस्त लावून घेणे सुरक्षित भविष्यासाठी गरजेचे आहे. त्यासाठी ‘DEMAT’ आणि ट्रेडिंग अकाउंट उघडा. शेअरच्या मार्केट किमतींच्या कंपनीचा अभ्यास करा. कमीतकमी किंमतीत खरेदी करा, सुरुवातीला नफ्याचे एक उद्दिष्ट ठरवा आणि पुरेसा फायदा होत असल्यास शेअर्स विकून फायदा कमवा. इंट्रा डे ट्रेडचे यश आपण केलेली शेअर्सची निवड, घेतलेला झटपट निर्णय, त्या कंपनीची बातमी आणि तिचा निवडलेल्या शेअरवर होणारा परिणाम यांच्यावर अवलंबून असते. शेअरची मार्केट प्राईस सतत बदलत असते त्यामुळे एखाद्या शेअरच्या किमतीचा सर्वसाधारण कल लक्षांत येत नाही. पण ठराविक दिवसांचे शेअरचे बंद भाव घेवून त्याची बेरीज करून त्याला त्या दिवसांच्या संख्येने भागायचे त्यामुळे एका विशिष्ट काळातील शेअर्सच्या प्राईसचा कल समजतो. यातील दिवसांच्या संख्येवरून अल्प मुदतीचा, मध्यम मुदतीचा आणी दीर्घ मुदतीचा कल स्पष्ट होतो. आपण शेअर मार्केट मध्ये Rs ५,०००/- पासून नक्कीच सुरुवात करू शकता. जेवढी रक्कम गुंतवाल त्याप्रमाणात फायदा किंवा तोटा होऊ शकतो. रोज शेअरमार्केटची माहिती देणाऱ्या दूरदर्शनवरील वाहिन्यांवरील माहिती ऐका. वर्तमानपत्र वाचा. कंपनीच्या साईटवर जाऊन तसेच BSE आणी NSE साईटवर जाऊन आपण ही सर्व माहिती मिळवू शकता. दर तीन महिन्यांनी प्रत्येक कंपनी आपले तिमाही रिझल्ट्स जाहीर करते. त्याकडेही लक्ष द्यावे.

आजपासून साधारण वीस वर्षांनंतर आपला आर्थिक स्तर राखण्यासाठी गुंतवणूक आवश्यक आहे. ती करताना महागाईचा दर, आपल्या जबाबदाऱ्या, योजना, धोका पत्करण्याची क्षमता या सगळ्याचा विचार हवा. ‘म्युच्युअल फंडांतील’ गुंतवणूक हा दीर्घकालीन फायदा देणारा आणि सुरक्षित पर्याय आहे. नियोजनबद्ध गुंतवणुकीचा पर्याय स्वीकारून अगदी कमी रकमेपासूनही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येऊ शकते. केवळ कर वाचवणे नव्हे, तर चांगला परतावा मिळवणे हा गुंतवणुकीचा उद्देश आहे. म्युच्युअल फंडा मध्ये विविध प्रकारच्या योजना उपलब्ध असतात. काही योजना या शेअर बाजाराशी निगडीत असतात म्हणून अशा योजनेत शेअर बाजाराची जोखीम अंतर्भूत असते आणि म्हणूनच अशा योजनेतून दीर्घ मुदतीत अतिशय चांगला लाभ होऊ शकतो. पैसे केव्हाही काढण्याची सुविधा म्युचुअल फंड योजनेत असते.

म्युच्युअल फंडामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारच्या योजनेत गुंतवणूक करता येते:

१.समभाग आधारीत योजना: या प्रकारच्या योजनेत शेअर बाजाराची जोखीम अंतर्भुत असते व म्हणूनच अशा योजनेत शक्यतो एसआयपी (सिस्टिमँटीक इन्व्हेस्टमेंट प्लान) व्दारे नियमीत दिर्घकाळासाठी गुंतवणूक करावी. दिर्घकाळ म्हणजे किमान ५ वर्षे ते २० वर्षे नियमीत गुंतवणूक केली असता चक्रवाढीचा फायदा मिळतो व आकर्षक उत्पन्न प्राप्त होते. या प्रकारात लार्ज कँप (मोठ्या कंपन्या), मिड कँप (मध्यम कंपन्या ), स्मॉल कँप (लहान कंपन्याच्या), लार्ज व मिड कँप ( मोठ्या व मध्यम कंपन्या), मिड व स्मॉल कँप (मध्यम व लहान कंपन्या), मल्टी कँप (मोठ्या,मध्यम व लहान कंपन्या) च्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते, बँलन्सड (कंपन्याच्या शेअर्समध्ये व कर्जरोख्यात गुंतवणूक करुन समतोल राखला जातो).

२.डेब्ट फंड योजना (कर्जरोखे आधारीत): या प्रकारच्या योजनेत शेअर बाजाराची जोखीम नसल्यामुळे यातील काही योजनेत अत्यल्प काळासाठी गुंतवणूक करता येते. सर्वसाधारणपणे अशा योजनेतून मिळणारा परतावा हा तेवढ्याच कालावधीच्या बँक ठेवींपेंक्षा जास्त मिळण्याचीच शक्यता असते.

म्युच्युअल फंडचे विविध प्रकार

1.ओपन-एंडेड योजना : ओपन-एंडेड योजनेला मुदत पूर्तता कालावधी नसतो. यामध्ये त्यादिवसाच्या NAV (गुंतवणुकीसाठी एका युनिटचे मूल्य) चे आधारे केव्हाही खरेदी व विक्री करता येते आणि म्हणूनच ही सर्वोत्तम म्हणावयास हरकत नाही.

2.क्लोज-एंडेड स्कीम्स : मुदत बंद योजना या ३ वर्षे मुदतीच्या असतात. त्यांमध्ये मुदतपुर्तीपूर्वी परत गुंतवणूक करता येत नाही. ज्या स्टॉक एक्सचेंजवर नोंदली असेल तेथेच त्यांची खरेदी-विक्री कंपन्यांचे शेअर्सप्रमाणे करता येते.

3.इंटरवल स्कीम : याप्रकारची योजना ही ओपन-एंडेड व क्लोज-एंडेड योजनांचे मिश्रण असते. या योजना ठराविक कालावधीत विक्री आणि पुनर्खरेदीसाठी खुल्या असतात.

उद्दिष्ट आधारीत योजना सहा प्रकारच्या असतात

1.ग्रोथ योजना: ग्रोथ योजना हि मध्यम ते दीर्घ मुदतीसाठी भांडवली वाढ देऊन आशादायक परतावा मिळण्यासाठी केली जाते. यातील मोठा हिस्सा शेअर बाजारात गुंतविला जातो. त्यामुळे त्यांचे किंमतींत छोट्या कालावधीत जरी घट झाली तरी दीर्घ कालावधीत या योजना चांगलाच परतावा देतात.

2.इन्कम योजना: यामध्ये बॉंडस् व कॉर्पोरेट डिबेंचर्ससारख्या निश्चित उत्पन्न देणा-या सिक्युरिटीज मध्ये गुंतवणूक केली जाते. यातीला परतावे हे स्थिर आणि कमी जोखिमेचे असतात. जर तुम्ही निवृत्त व्यक्ती असाल किंवा तुम्हाला भांडवली स्थैर्य हवे असेल अथवा जर तुम्हाला नियमित व स्थिर परतावे हवे असतील इन्कम योजना स्वीकारा.

3.बॅलन्सड योजना: नावाप्रमाणेच या योजनेखाली काही सुनिश्चित प्रमाणात शेअरमार्केटमधे व निश्चित इन्कम सिक्युरिटीजमधे गुंतवणूक केली जाते. हि योजना म्हणजे ग्रोथ व इन्कम स्कीमांचा सुवर्णमध्य आहे.

4.लिक्विड स्कीम्स: तुम्हाला जर फारच थोड्या कालावधीसाठी गुंतवणूक करावयाची असेल हि योजना चांगली आहे हिच्यामध्ये अगदी २ दिवसासाठीसुद्धा गुंतवणूक केली जाते. या योजनेत मनी मार्केट ट्रेझरी बिल्स, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट, कमर्शिअल पेपर आणि सरकारी रोख्यात अशा सुरक्षित पण कमी कालावधीसाठी गुंतवणूक केली जाते. बॅंकेतील बचत व चालू खाते ज्यावर फारच कमी व्याज मिळते अथवा अजिबात व्याज मिळत नाही त्यापेक्षा या योजनेत गुंतवणूक केली असता साधारणपणे ६ ते ७ टक्के वार्षिक दराने या योजनेत परतावा मिळतो.

5.गिल्ट फंड: हे फंड खासकरुन शून्य क्रेडिट जोखीम असणा-या सरकारी रोख्यात गुंतवणूक करतात. तुम्हाला पूर्णपणे सुरक्षित गुंतवणूक करावयाची असेल या योजनेत करा.

6.टॅक्स सेव्हिंग स्कीम्स: या योजनेअंतर्गत केलेली गुंतवणूक इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम ८०-सी खाली रुपये १,००,०००/- (रुपये एक लाख मात्र) पर्यंत एकूण उत्पन्नातून वजावटीला प्राप्त असते. यात केलेली गुंतवणूक जर इन्कम टॅक्स वजावटीसाठी केली असेल तर ३ वर्ष काढता येत नाही. कर बचतीसाठी हा उत्तम पर्याय आहे.
‘Bond’ हे एक DEBT INSTRUMENT आहे. गुंतवणूकदार एखाद्या कंपनीला, केंद्र सरकार किंवा राज्यसरकारला काही काळासाठी ठराविक व्याजाच्या दराने कर्ज देतात. यापैकी काही कर्जरोखे STOCK EXCHANGE वर लिस्टेड असतात आणी त्या कर्जरोख्यांत नियमित खरेदी विक्री चालते. या पैकी काही bond TAXFREE bonds म्हणून इशू केले जातात. या TAXFREE बॉंड वर मिळणार्या व्याजावर आयकर भरावा लागत नाही.

ब्रोकरच्या बाबतीत पूर्वी बरेच समज गैरसमज होते. लोकांना अनुभव खराब आले. सध्या अशी स्थिती नाही. संगणकीकरणामुळे शेअरमार्केटच्या व्यवहारांत बरीच पारदर्शकता आलेली आहे. सेबी फार चांगले काम करीत आहे. गुंतवणूक दारांच्या हिताचे रक्षण करीत आहे. ब्रोकरला परवाना घ्यावा लागतो. पण शेवटी आपल्याला अतिशय सतर्क राहावे लागते.

आपण हिशेब लिहितो पण स्वत:च्या आर्थिक व्यवहारांचा ताळेबंद मांडत नाही. काही वर्षांपूर्वी जी गुंतवणूक केली त्याचे आताचे मूल्य काय हे आपण लक्षात घेत नाही. असे मूल्यमापन करण्याची सवय लावून घेतल्यास कोणत्याही वित्तीय सल्लागाराशिवाय देखील तुम्ही आपल्या गुंतवणुकीची बाजारातील किंमत काय ते काढू शकाल. आपण आधी केलेली गुंतवणूक किती बरोबर होती किंवा ती कुठे चुकली हे यातून कळेल. तुम्ही स्वतः त्याचा अभ्यास, मनन चिंतन, निरीक्षण करूनच स्वतःचा निर्णय स्वतः घ्या. कारण शेवटी तुमचा पैसा गुंतवायचा असतो. तो जपून वापरा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख आवडला.

बेसिक माहिती छान सांगितली आहे. अजून विस्तृतपणे लिहिणार आहात का?

हा धागा गुंतवणूक विभागात हलवा. पुढे लिहिणार असाल तर तिथेच धागा काढा.

“ रोज शेअरमार्केटची माहिती देणाऱ्या दूरदर्शनवरील वाहिन्यांवरील माहिती ऐका.”>>>>>>>
हे मात्र अजिबात करू नये.
हेमावैम

चांगली ओळख
>2.क्लोज-एंडेड स्कीम्स : मुदत बंद योजना या ३ वर्षे मुदतीच्या असतात. त्यांमध्ये मुदतपुर्तीपूर्वी परत गुंतवणूक करता येत नाही. >
या योजनांच्या विक्रीचा कालावधी ही मर्यादित असतो. गेल्या काही वर्षांत फिक्स्ड मॅच्युरिटी प्लान्स आले आहेत. त्यांची मुदत ९० दिवस , ३६७ दिवस, १००० दिवस अशी असू शकते.

रोज शेअरमार्केटची माहिती देणाऱ्या दूरदर्शनवरील वाहिन्यांवरील माहिती ऐका.>>> Lol Lol चिते की चाल, बाझ की नजर, हवामान खात्याचा अंदाज आणि शेअर मार्केटचे टीव्हीवरील एक्सपर्ट यांचा अंदाज इनपे संदेह नही करना चाहीये, कभी भी मात दे सकते है.

चिते की चाल, बाझ की नजर, हवामान खात्याचा अंदाज आणि शेअर मार्केटचे टीव्हीवरील एक्सपर्ट यांचा अंदाज इनपे संदेह नही करना चाहीये, कभी भी मात दे सकते है. >>> बोकलत Lol Lol अगदी इतके वाईट पण नाही... ऐकावे जनाचे करावे मनाचे पाळले की झाले. पण टीव्हीतल्या जाणकारांकडून जनरल घडामोडी, बातम्या कळतात आणि काहीवेळेला नो ब्रेनर कॉल्स पण जसे की अरोबिंदो झी बिझिनेस वर ४६० पासून गेला एक महिना सतत सुचवत होते... आजची किंमत बघा त्याची

अरोबिंदो वर जाण्याचे कारण केवळ अमेरिकी एफ डी ए ने त्यांच्या पाश्मैलारम कारखान्यावर असलेली निरीक्षणे आणि मनाई काढून घेतली आहेत. त्याचा प्रत्यक्ष फायदा होईपर्यंत किमान दोन तिमाही / सहा महिने जातील. त्यांच्या मूलभूत परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. हि एक "नी जर्क रिऍक्शन" आहे.

कमाईच्या किती टक्के रक्कम गुंतवणूक करु नये? वरची मर्यादा. जसं अजिबात करू नये वाईट तसंच फार करणेही वाईटच असावे. यरी योग्य मर्यादा कोणत्या सुचवाल?

अरोबिंदो वर जाण्याचे कारण केवळ अमेरिकी एफ डी ए ने त्यांच्या पाश्मैलारम कारखान्यावर असलेली निरीक्षणे आणि मनाई काढून घेतली आहेत. त्याचा प्रत्यक्ष फायदा होईपर्यंत किमान दोन तिमाही / सहा महिने जातील. त्यांच्या मूलभूत परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. हि एक "नी जर्क रिऍक्शन" आहे. >>> खरंय पण त्याच न्यूज वर घसरलेलाही होता पार ८०० पासून. तसेही टेक्निकल चार्ट्स वाल्यांना त्याच्याशी फ़ारसे देणेघेणे नसतेच... मुद्दा हा होता की किमान ३-४ जणांनी तो ४६० पासून सजेस्ट केला होता

कमाईच्या किती टक्के रक्कम गुंतवणूक करु नये? वरची मर्यादा. जसं अजिबात करू नये वाईट तसंच फार करणेही वाईटच असावे. यरी योग्य मर्यादा कोणत्या सुचवाल? >>> तुमचा प्रश्न सगळ्या गुंतवणीबाबत आहे का शेअर मार्केट बद्दलच्या गुंतवणूक बाबत आहे?

पहा आज ऑरोबिंदो परत ५९७ पर्यंत खाली घसरला आहे.
कंपनीचे समभाग घसरले होते ते एकंदर बाजार खाली होता म्हणूनच

पहा आज ऑरोबिंदो परत ५९७ पर्यंत खाली घसरला आहे.
कंपनीचे समभाग घसरले होते ते एकंदर बाजार खाली होता म्हणूनच >>> घसरू दे की ... टेक्निकल लोकांसाठी ४६० ते ६०० खूप मोठ्ठी मूव्ह होते ते तर १०-१५ पॉईट्मध्ये खेळत असतात.. माझा मुद्दा समजला असेल तुम्हाला आय होप.
तुम्ही वेगळाच मुद्दा मांडत आहात

होय
आपले बरोबर आहे
व्यापारी (trader) आणि गुंतवणूकदार (investor) यात फरक आहेच

प्रश्न सगळ्या गुंतवणीबाबत आहे. >> ह्म्म अश्या काही लिमिट चा कुणी विचार केला असेल असे वाटत नाही... आणि काही असूही नये. १००% टक्के करणे तर शक्यच नाही पण जितकी शक्य आहे तितकी करायला काय हरकत आहे? आपल्याच भविश्यासाठी आहे.. अर्थात त्यासाठी आत्ता मन मारून जगायचे नाही एवढेच

चांगला लेख.
>>रोज शेअरमार्केटची माहिती देणाऱ्या दूरदर्शनवरील वाहिन्यांवरील माहिती ऐका.>> यात अजिबात वेळ घालवू नये. आपला आपण अभ्यास करावा आणि त्यानुसार गुंतवणूक करावी. शेवटी ट्रेडिंग वेगळे आणि गुंतवणूक वेगळी.

>>कमाईच्या किती टक्के रक्कम गुंतवणूक करु नये? वरची मर्यादा. जसं अजिबात करू नये वाईट तसंच फार करणेही वाईटच असावे. यरी योग्य मर्यादा कोणत्या सुचवाल? >>>
अशी वरची मर्यादा वगैरे नसते. प्रत्येकाची स्वतःची परीस्थिती कशी आहे त्यावर हे ठरेल. मात्र बचत वेगळी आणि गुंतवणूक वेगळी हे कायम लक्षात ठेवावे. तसेच गुंतवणूकीचे ध्येय काय आहे आणि हातात काय कालवधी आहे ते लक्षात घेणे महत्वाचे. त्यानुसार किती रक्कम कशात गुंतवणे योग्य ते ठरावे.
तरुण मंडळी जी पालकांसोबत राहून नोकरी करत आहेत, कसली जबाबदारी नाही, त्यांना सुरुवातीला बचतीचा दर ७०% देखील ठेवता येईल तेच शहरात स्वतंत्र राहून नोकरी करत असाल तर ही बचत कमी होणार.
आता ही जी बचत आहे ती गुंतवताना पुन्हा नजीकचा , मध्यम आणि दूरपल्ल्याचा विचार हवा. उदा. इमर्जन्सी साठी बचतीचा काही भाग हा व्याजही मिळेल पण तरी वेळ आल्यास लगेच उपलब्ध होईल अशा ठिकाणी सुरक्षित हवा. यात तुम्हाला वेळ आल्यास आधारासाठी किती पर्याय आहेत त्यावर हा आपत्कालीन फंड किती ते पुन्हा तुमच्या परीस्थितीवर अवलंबून. आमच्यासारखे परदेशात रहाणारे, एकच उत्पन्नवाले रात्री शांत झोप यावी म्हणून वर्षभर जगायला आवश्यक खर्च हा इमर्जन्सी फंड म्हणून बाजूला ठेवतात. स्वदेशात, स्वकीयांसोबत रहाताना , भक्कम आधार असेल तर ३ महिन्यांचा ठेवूनही निभेल.
त्यानंतर रिटायरमेंटसाठी गुंतवणूक - दूरपल्याची यात तुम्ही कशात गुंतवणार आहात त्यावर किती ते ठरावे. उदा. रिटायरमेंट्साठी केलेली गुंतवणूक एक ठराविक वय झाल्याशिवाय काढता येत नाही मात्र टॅक्स वाचतो, रिटायरमेंटसाठी गुंतवणूक पण वयाची अट नाही आणि टॅक्स वाचणार नाही. पुन्हा निर्णय घेणे आले. मात्र सगळी मिळून कमितकमी १५-२०% गुंतवणूक होईल हे पहावे. यात स्टॉक्स आणि बॉण्डस दोन्ही योग्य प्रमाणात - ९०/१० ते ५५/४५ तुमच्या हातातील कालावधीनुसार. यात स्टॉक्स आणि बॉण्ड्स मधे गुंतवताना देखील पुन्हा बर्‍यापैकी डायवर्सिफिकेशन (विभाजन?) हवे. म्हणजे सगळी रक्कम एकाच सेक्टर मधे किंवा एक -दोन कंपन्यांच्या स्टॉक्समधे असे असेल तर ते वाईट. किंवा रिटायरमेंटला दोन वर्ष राहिलेत आणि सगळी रक्कम स्टॉक्समधे तर ते वाईट.
घरासाठी कर्ज घेणार असाल तर डाऊन पेमेंट्साठी पैसे बाजूला टाकणे आले. तुमच्या हातात काय कालवधी आहे त्यावर ही गुंतवणूक कशात हे ठरेल. हे पैसे गमावणे परवडणार नाही तेव्हा गुंतवणूक बर्‍यापैकी सेफ हवी. तुमचे वेळेचे पत्रक किती लवचिक आहे त्यावरही थोडी रिस्क घेणे परवडेल की कसे ते ठरावे. घर घेताना ती गुंतवणूक नाही हे पुन्हा लक्षात ठेवावे. म्हणजे घराचे हप्ते भरल्यावर रिटायरमेंटसाठी बाजूला टाकायला हातात पुरेशी रक्कम नाही तर ते वाईट.
मुलांच्या शिक्षणसाठीची गुंतवणूक ही मध्यम पल्ल्याची- रिटायरमेंटसाठी कमितकमी १५% बाजुला ठेवून मगच यात गुंतवणूक करावी. मुलांच्या शिक्षणासाठी भरपूर गुंतवणूक केली आणि स्वतःच्या निवृत्तीतल्या खर्चासाठी कमी गुंतवणूक केली असे नसावे.

Ok.

5.गिल्ट फंड: हे फंड खासकरुन शून्य क्रेडिट जोखीम असणा-या सरकारी रोख्यात गुंतवणूक करतात. तुम्हाला पूर्णपणे सुरक्षित गुंतवणूक करावयाची असेल या योजनेत करा>>>>>>>>> हे थोडेसे एकांगी आहे. गुंतवणूक सुरक्षित असली तरी परतावा मिळेलच असे नाही. जर अयोग्य वेळी गुंतवणूक केली तर मुद्दल सुद्धा कमी होण्याचा धोका असतो. जर ८- १० वर्ष किंवा अधिक काळ गुंतवणूक करायची असल्यास हा मार्ग निवडावा. कमी काळासाठी गुंतवणूक करायची असेल यामध्ये तर बाजारामध्ये इंटरेस्ट रेट उच्च पातळीवर असताना करावी. याचे कारण यामध्ये केलेली गुंतवणूक १० किंवा जास्त वर्षासाठीच्या गव्हर्नमेंट बॉण्ड मध्ये केली जाते. एवढ्या दीर्घ मुदतीच्या बॉण्ड मध्ये गुंतवणूक केल्यामुळे बॉंडची किंमत बाजारातील इंटरेस्ट सायकल नुसार बदलते. इंटरेस्ट रेट वाढला की बॉण्ड ची किंमत कमी होते. सध्या बाजारातील इंटरेस्ट रेट जवळपास खालच्या पातळीवर आहेत. जर भविष्यात रेट वाढले तर बॉंडची किंमत कमी होऊन परतावा कमी होईल. ज्यांनी २०१६-२०१७ मध्ये गिल्ट फंड मध्ये गुंतवणूक केली त्यांना बराच चांगला फायदा मिळाला कारण तेंव्हा बाजारामध्ये इंटरेस्ट रेट जास्त होते आणि गेल्या २-३ वर्षात ते खाली आले त्यामुळे बॉंडची किंमत बरीच वाढली.
साधारण ८-१० वर्षात इंटरेस्ट रेट मध्ये बरेच उतार चढाव होतात त्यामुळे सरासरी परतावा चांगला मिळतो. परंतु तेवढ्या दीर्घ मुदतीसाठी ईक्वीटी म्युच्युअल फंड चांगला पर्याय आहे. थोडक्यात गिल्ट फंड मध्ये गुंतवणूक इंटरेस्ट रेट वरच्या पातळीवर असेल तरच फायद्याची पडते.