युगांतर - आरंभ अंताचा!
भाग ४४
अंगापिंडाने मजबूत असा तो दुर्योधन जागेवरून उठला. त्याचे पिळदार बाहू सोन्याच्या अलंकारांनी मढलेले होते. अंगावरचे रत्नजडित वस्त्र सांभाळत तो सभागृहाच्या मध्यभागी पोचला. तिथून त्याने सर्व राजांकडे नजर टाकली. मनातल्या मनात हसला. त्याची काहीशी झलक मुखावरही आली असावी.
"बघं, माझ्या शिष्याची चाल कशी आहे ते! बाहू बघ किती वळणदार आहेत. बलवान आहे दुर्योधन. शोभतो की नाही राजा! बघ एकदा!"
"बघतोच आहे, दाऊ. बघतोच तर आहे केव्हापासून. चेहऱ्यावर थोडाही पश्चात्ताप नाही त्याच्या. जराही लाज नाही."
"तुला अजूनही संशय आहे ना की दुर्योधनानेच लाक्षागृह कांड केलंय?"
कृष्णाने होकारार्थी मान डोलावली.
"पण अनुज, मला नाही खरं वाटत ते. मी त्याला गदा युद्ध शिकवलंय. त्याला ओळखतो मी. त्याच्या डोक्यात तसा विचार येणे शक्य नाही."
"पण त्याने तशी कृती करणे तर शक्य आहे ना दाऊ?"
"म्हणजे काय आता? सरळ बोलत जा कधीतरी" बलराम थोडा वैतागला.
"दुर्जन मामाश्री केवळ आपल्याच नशिबी होते असे नाही ना?"
बलरामने दुर्योधनाकडे पाहिले.
"जाऊ देत. तू अजूनच गोल गोल बोलतोयस नेहमीसारखं; पुन्हा तेच तेच ! आणि तुला काय वाटतं, दुर्योधन जिंकणारच नाही हे स्वयंवर?"
कृष्ण नुसता हसला.
दुर्योधनाने धनुष्याला हात लावला. बारीक कलाकुसर केलेले भव्य आणि सुंदर धनुष्य! दुर्योधनाने उचलण्याचा प्रयत्न केला. एकदा, दोनदा, तीनदा..... आणि त्याला जाणवले. पण सोप्पा नव्हता. प्रतिबिंब पाहून लक्षभेद लांबच राहिले, पण धनुष्य उचलणेच एक अवघड काम होते....आणि दुर्योधनाकरता? कदाचित अशक्य! त्याला धनुष्याला जागचे हालवताही येईना. दुर्योधनाने सगळी शक्ती पणाला लावली. त्याच्या पिळदार बाहूंवर ताणल्या गेलेल्या नसांचे निळे-काळपट जाळे उमटले. दंडावरील सोन्याचा एक अलंकार घट्ट होत होत एकदाचा तुटून पडला. कपाळावर घर्मबिंदूंची रांग लागली. त्याने एकदा प्रत्यंचे जवळ, एकदा धनुष्याच्या मध्यबिंदूला, एकदा कडेच्या दोन्ही टोकांना उचलण्याकरता जोर लावला. पाय मखमली गालिच्यावर घट्ट रोवले. हाताला तड लागेपर्यंत त्याचे प्रयत्न सुरूच होते. पण व्यर्थ! शेवटी त्याने प्रयत्न सोडून दिला. धनुष्य मात्र जागचं तसूभरही हाललं नव्हतं!
रागाने पाय आपटत तो जागेवर जाऊन बसला.
भीमला हसू येत होतं. कृष्णालाही. पण भीमच्या शेजारी युधिष्ठिर होता आणि कृष्णाच्या शेजारी बलराम! हसू आवरले. पुढे कोण कोण येणार भाग घ्यायला हे बघण्यातली उत्सुकता वाढली होती. पांडवांकरता तो एक विरंगुळा होता. जेवणाआधी विनामूल्य मनोरंजन! तेही विविध राज्यांच्या राजांकडून!
लक्ष साध्य करणे पूर्ण करणे राहिले बाजूला, पण धनुष्य उचलण्याचाच असल्या सारखे दृष्य होते तिथले. अनेक राजे थिजलेल्या अवस्थेत असफल प्रयत्न करून अपमानाचा भार घेऊन जागेवर येऊन बसले.
द्रौपदीच्या मनात क्षणभर वादळ घोंगावलं.
'पण कोणी जिंकला नाही तर? नाही.... कोणी ना कोणी जिंकेलच की. या सगळ्या राजांमध्ये कोणीतरी असा उमदा तरुण नक्की असेल.
असेल ना नक्की?
पितामहाराजांची, पांचाल नगरीची प्रतिष्ठा पणाला आहे. मनही भयाने ग्रासलंय. हे गोविंद! माझ्या पिताश्रींची अवहेलना होऊ देऊ नकोस.' डोळे मिटून मनोमन तिने तिच्या देवाला साकडं घातलं. तिने डोळे उघडले तेव्हा कृष्ण तिच्याकडे बघून प्रसन्न हसत होता. त्याने तिच्याकडे बघून एकदा दोन्ही डोळ्यांची उघडझाप केली.
योगायोगाने? की त्याने खरचं काही ऐकलं? माहित नाही, पण द्रौपदीच मन पुन्हा शांत झालं. 'आपली प्रार्थना स्विकारली गेली म्हणल्यावर आज हा पण कोणीतरी पुर्ण करणारच!' तिला मनोमन खात्री वाटली.
__________
"कर्णा, जा!" दुर्योधनाने कर्णाच्या खांद्यावर हात लावून सांगितले.
"दुर्योधन, पण...."
"कर्णा, मला द्रौपदी हवी आहे. कळलं तुला?"
"म्हणजे? दुर्योधन...."
"हस्तिनापुर नाही, आता हा माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. पांचालची राजकुमारी माझीच पत्नी बनायला हवी. विनंती समज किंवा आज्ञा. पण आत्ताच्या आत्ता तू स्वयंवरात भाग घे, म्हणजे घेच."
"पण युवराज...."
"आज्ञाच समज मग!"
कर्णाकरता आता पुढे बोलायला काही उरले नव्हते.
उपकारांच्या, प्रतिज्ञेच्या, शब्दांच्या ओझ्याखाली दबून गेलेले कर्तुत्व! याला एकच अशी ओळख आहे तरी कुठे? कधी त्यास देवव्रताचा चेहरा मिळतो, तर कधी कर्णाचा! ते देवव्रताला भीष्माचार्य बनवून सोडतं आणि कर्णाला अंगराज! त्या ओझाला वाहण्याचा मोबदला म्हणून मिळालेला मान आणि धनही शापितच!
"जशी आज्ञा युवराज!" कर्णाने मान झुकवून खांद्यावरचे वस्त्र सावरत आसन सोडले.
अपेक्षित शब्द कानावर पडले आणि दुर्योधनाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.
कर्ण सभागृहाच्या मध्यभागी चालत येईपर्यंत सभागृहात उमटणारे आश्चर्याचे उद्गार त्याच्या कानी पडत होते. तो जाईल तिथे त्याचे कवच कितीही नाही म्हणले तरी चर्चेचा विषय बनायचच. दुर्योधनाला आणि कर्णाच्या परिवाराला त्या कवचाची दिव्यता पाहायची, अनुभवाची सवयच झाली होती. पण नव्याने पाहणारा त्या कवचाकडे आश्चर्याने पाहत राहायचा. जवळ जवळ संपुर्ण सभागृह त्याच्याकडे पाहत राहिले आणि कधी त्याने ते धनुष्य उचलले हे कोणाला कळलेही नाही.
"भ्राताश्री, तुम्हाला खात्री आहे की कर्ण अधिरथांचा पुत्र आहे, कोणी राजकुमार नाही?"
"नकुल, त्याने अर्जुनाला द्वंद्वाचे आव्हान दिले तेव्हाही मला ते खरे वाटले नव्हते. आताही वाटत नाही." भीमाने नकुल उत्तर दिले आणि तितक्यात कर्णाने प्रतिबिंब न्याहाळत धनुष्याच्या प्रत्यंचेवर बाण नेमला देखील.
गुडघ्यावर बसलेल्या त्या कर्णाची आकारबद्ध आकृती कृष्णाच्याही डोळ्यांत भरली गेली. जरासंधाला मारायला भीमच हवा हा विचार तो मागे टाकणार तितक्यात दुर्योधनाकडे कृष्णाचे लक्ष गेले. कृष्ण हसला, "केवळ पात्रता असून काय फायदा?"
"काय म्हणालास?"
"काही नाही दाऊ!"
"मला वाटलं, मी ऐकलं काहीतरी."
"काय वाटत दाऊ? हा पुर्ण करू शकेल पण?" कर्णाकडे बघत कृष्णाने विचारलं.
"मला नाही माहिती." बलराम नजर फिरवत म्हणाला.
आधीच दुर्योधनाबद्दलचे भाकित सफशेल चुकल्याने तो खजिल झाला होता. पुन्हा काहीतरी अंदाज लावले आणि चुकले तर? नकोच ते! पण कर्ण पहिलाच होता ज्याने धनुष्य उचलले होते, हे मात्र खरे.
त्या सोनेरी कवच असलेल्या वीराचा नेम पाहायला सगळे उत्सुक झाले होते. त्या वीराने बाण प्रत्यंवर ताणला आणि मत्स्यावरून लक्ष हलू न देता ताण एकदम नगण्य केला.
.......आणि बाण जाऊन मत्स्याच्या डोळ्याच्या..... डोळ्याच्या काठावर अगदी जराश्या-केसाच्या फरकाने नेम चुकवून बाण खोलवर रूतून बसला.
रोखून धरलेले श्वास सुटले. पाठा पुन्हा आसनाला ठेकल्या. धृष्टद्युम्नच्या चेहऱ्यावर चिंता पसरली.
दुर्योधन तावातावाने पुढे आला.
"राजा द्रुपद, तुम्हाला नक्की तुमच्या कन्येचा विवाह करायचा आहे की नाही? हा कसला पण ठेवला आहे तुम्ही? कर्णासारखा सर्वोत्तम धनुर्धारी हा लक्षभेद करू शकला नाही म्हणजे कोणीच हा लक्षभेद करू शकणार नाही. मग आम्हाला काय इथे अपमान करायला बोलावून घेतले आहे?" त्याने कर्णाकडे वळून पाहिले. "कर्णा, तू म्हणाला होतास तेच खरे निघाले. द्रोणाचार्यांना दिलेल्या गुरुदक्षिणेचा प्रतिशोध घेताहेत हे आपला अपमान करून."
द्रुपद काही बोलणार तोवर धृष्टद्युम्न समोर आला.
"शांत व्हा, युवराज दुर्योधन! अंगराज कर्ण हा लक्षभेद करू शकले नाहीत यात पांचाल नरेशना दोषी ठरवू नका."
"हो? मग दोष काय आम्हा सर्वांमध्ये आहे? हे बघा राजकुमार धृष्टद्युम्न, तुमच्या भगिनीचा आज स्वयंवर पुर्ण झाला नाही ना, तर जिथून उत्पन्न झाल्यात तिथेच रवानगी करू त्यांची."
अश्वत्थामा दुर्योधनाचे शब्द ऐकून पुरता अस्वस्थ झाला होता. एकीकडे मानस भगिनी द्रौपदी आणि दुसरी कडे जीवाभावाचा मित्र दुर्योधन! दुर्योधनचे वागणे संतापजनक होते आणि द्रौपदीचा या सगळ्यात काही दोषही नव्हता.
म्हणून..... म्हणून त्याने मौन पत्करले!
का?
कारण तेच! उपकार.... तेच ओझे, तीच हतबलता! ज्याच्या कन्येच्या बाजूने उभे राहण्याची अश्वत्थामाची विवेकबुद्धी कौल देत होती, त्याच द्रुपदाने आपल्या पिताश्रींना रिकाम्या हाताने कुटीत परत पाठवले होते, हे कसं विसरणार होता तो? दूध घ्यायला गेलेल्या पिताश्री द्रोणांना अखंड पांचालनगरीतून अपमानाची शिदोरी मिळाली आणि त्याच द्रोणांना हस्तिनापुराने मान, धन आणि आदराचे स्थान दिले. तेच हस्तिनापुर ज्याचे महाराज दुर्योधनाचे पिताश्री धृतराष्ट्र होते.
अश्वथामाशी ब्राह्मण-क्षत्रिय भेदभाव न करता मैत्री करणारा दुर्योधन, दुसरी कडे पांचालनरेश; आणि दुर्योधनाचे पारडे जड झाले.
अश्वत्थामा शांत राहिला. पण मनात काहीतरी सलत होतं. काय? त्याला कळेना.
दुर्योधनाचे विखारी शब्द ऐकून भीमची मुठ आवळली गेली. तो पाऊल पुढे टाकणारच, तितक्यात....
"नाही भीम."
"भ्राताश्री, आता तर आपल्याला आश्रय देणाऱ्या पांचालनगरीचा अपमान करतोय ना तो?"
"पण आपल्याला महाराजांनी कोणताही आदेश दिलेला नाही. त्यांच्या आदेशाविना त्यांच्या अतिथीला दंड देणे, अयोग्य आहे. आणि भीम, इथे द्वारकादिश आहेत. ते इथे असेपर्यंत कोणताही अन्याय आणि अधर्म होऊ देणार नाहीत."
भीमाने युधिष्ठिराने दाखवलेल्या दिशेने पाहिले आणि सोनेरी मुगुटातल्या झुपकेदार मोरपिसाने त्याची नजर काही काळ खिळवून ठेवली. प्रसन्न चेहऱ्यावर हलकेसे स्मित घेऊन काळ्याभोर विशाल नेत्रांनी भीमाकडे बघणारा तो भीम त्याला परिचित असल्यासारखा बघत होता. त्या रेशमी वस्त्रातल्या निळसर काळ्या वर्णाच्या राजाकडे पाहत भीमने नकळत हात जोडले; आणि क्षणभर डोळे मिटले. ताणल्या गेलेल्या धमन्या पुर्ववत झाल्या. थंड वाऱ्याच्या झोताने अग्नि विझावा आणि पुन्हा शीतलता जाणवावी इतके मन शांत झाले.
डोळे उघडले तेव्हा धृष्टद्युम्न सभागृहाला संबोधत होता.
"वेगवेगळ्या राज्यांचे राजे-महाराजे इथे जमले आहेत. तुमच्या पैकी कोणीच नाही जो हा पण पूर्ण करू शकेल? कोणीच नाही?"
सभागृहात शांतता पसरली होती. विलक्षण प्रयत्न करूनही अपयश पदरी पडलेले सारे मान झुकवून बसले होते. मात्र दुर्योधन ताडकन उठला.
"पांचालनरेश, आता तुमच्याकडे दोनच पर्याय आहेत. एकतर तुमच्या कन्येला आमच्यापैकी कोणा एकाला निवडायला सांगा, अन्यथा आज इथे मृत्यूशीच विवाह लावून देऊ तिचा!"
दुर्योधन गरजला.
"पाहिलंत दाऊ? तुमचा शिष्य किती विनम्र आहे ते?" कृष्णाच्या टिप्पणीवर बलराम खजिल झाला.
'पराभूत, कर्तुत्वशुन्य राक्षसी वृत्ती. अश्यांना का निमंत्रण धाडले असेल पिताश्रींनी?' धृष्टद्युम्न विचारात पडला आणि पुढच्याच क्षणी त्याने मनाशी ठरवले. 'द्रौपदी, तुझी वरमाला अयोग्य व्यक्तीच्या कंठाभोवती पडू देणार नाही मी.'
धृष्टद्युम्नने द्रौपदीकडे पाहिले. ती कृष्णाकडे बघत होती. धृष्टद्युम्ननेही कृष्णाकडे नजर टाकली.
त्याचा निर्विकार चेहरा आपल्याकडे आश्वासक नजरेने बघतो आहे.... 'तुमचा आशादिप जिथे हरवला, तिथेच शोध.' असं सांगतोय.
..... आणि धृष्टद्युम्नने पुन्हा पाचारण केले.
"या संपूर्ण सभागृहात कोणीच धनुर्विद्येत निष्णात नाही असे समजायचे का आम्ही? की द्रोणाचार्य शिष्य अर्जुनासोबतच महान धनुर्विद्याही जळून खाक झाली लाक्षागृहात? धनुर्विद्येचा हा अपमान बघत उभे असणारे तुम्ही सर्वजण विसरला आहात की अचूक लक्षभेद केल्याशिवाय जर हा स्वयंवर संपला, तर पांचालनगरीचीच प्रतिष्ठा काय पण यात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाची प्रतिष्ठा देखील अबाधित राहणार नाही; आणि धनुर्विद्येची ही नाही. मी पुन्हा आवाहन करतो आहे. हा स्वयंवर आता सर्वांकरता खुला करतो आहे..... सर्वांकरता!"
क्षणभर स्पर्धक राजांमध्ये कुजबुज झाली. पण युद्ध-शस्त्रास्त्रांचा सराव असणारे, धमन्यांमध्ये शूर विरांचे रक्त असणारे क्षत्रिय जिथे पण पूर्ण करू शकले नाहीत तिथे बाकीचे नगरवासी काय बाण मारणार? असा विचार करत दुर्योधन फक्त सगळ्यांनी हार मानण्याची वाट पाहत होता.
धनुर्विद्येचा मान पणाला लागला होता. त्या आवाहनाला उत्तरादाखल मौन पाळणे आता अर्जुनाकरता अशक्य झाले होते. त्याने युधिष्ठिराला प्रणाम करून सरळ पांचाल नरेशच्या दिशेने पावले टाकली. समोर जाऊन त्याने पांचाल नरेशला नमस्कार केला आणि त्याची श्वेत वस्त्रे पाहत पांचाल नरेशने होकारार्थी मान डोलावत पण पुर्ण करण्याची परवानगी दिली सुद्धा!
अर्जुनाने मध्यभागी येण्याकरता पाऊल उचलले आणि दुर्योधन आश्चर्याने त्याच्याकडे बघतचं राहिला.
"अरे ब्राह्मण? इथे जे आम्ही क्षत्रिय करू शकलो नाही ते एक वेद पाठ करणारा ब्राह्मण कसं करणार?" आणि बोलता बोलता अश्वथामाकडे पाहून दुर्योधनाला द्रोणाचार्यांची आठवण झाली. तसा तो खजिल होऊन गप्प बसला.
भीमने पुन्हा राग आवरला. अर्जुन मध्यभागी पोचला तेव्हा सारे सभागृह त्याच्याकडे एकटक लावून बघत होते.
"त्याची चाल बघा, मद्रनरेश."
"अहो, त्याचे दंड बघा."
"अंगापिंडाने तर राजघराण्यातला वाटतो हा."
कुजबुज अर्जुनच्या कानावर पडत होती. पण आज ओळख लपवण्यापेक्षा धनुर्विद्येचा मान जपणे जास्त महत्वाचे होते.
अर्जुनाने धनुष्याला नमस्कार केला आणि एका विशिष्ट वळणदार आकारावर पकडून ते धनुष्य सहजपणे एका हातावर पेलले आणि संपूर्ण सभागृह डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहतच राहिले.
अचंबित झालेले सभागृह पुन्हा श्वास रोखून समोरचे दृष्य डोळ्यांत टिपून घेऊ लागले.
__________________
©मधुरा
मनापासून धन्यवाद रत्न!
मनापासून धन्यवाद रत्न!
मी सुद्धा याचे पुस्तक बनवायचा विचार करत आहे. संपुर्ण पुस्तक एकसंध वाचायला बरे पडते.
अजय, महाभारतातल्याच भीमाबद्दल
अजय, महाभारतातल्याच भीमाबद्दल बोलतेय मी.
हाडळीचा आशिक, इतका आवडतो कर्ण?
बरं, हस्तिनापुरातला एक प्रदेश होता अंगप्रदेश. त्याचा राजा कर्ण.
तो सतत हस्तिनापुरात पडिक नसायचा. आणि द्रोणांच्या कुटीत का म्हणून येईल कर्ण? धृष्टद्युम्नला भेटायला? कुछ भी!
अजून एक..... द्रौपदीबद्दल केला तोच विचार इथे करू. काट्या कुट्यांच जगण निवडण्या ऐवजी तो बहिणीला महालातल जगणं निवडायला लावू शकत होता. निदान तसा सल्ला देऊ शकत होता. पण त्याकरता त्याच्याकडे जिंकलेल्या किंवा जिंकू शकणाऱ्या स्पर्धकांचा पर्याय उपलब्ध असणे गरजेचे होते.
आणि अनोळखी व्यक्तीपेक्षा (तुमच्या लॉजिकनुसार) ओळखीचा कर्ण काय वाईट?
चला आपण असं गृहीत धरू, की धृष्टद्युम्नची कर्णाशी ओळख होती आणि तसे त्याने द्रौपदीला सांगितलेही. पण त्या काळी स्त्रियांची इतकी हिंमत होतीच कुठे की त्या भर सभेत कोणाचा असा अपमान करतील?
सारांश एकच, कर्णाने अचूकपणे लक्षभेद केला नव्हता.
कर्णावर अन्याय कोण, कशाला करेल? तो जसा कळलाय तसाच दाखवलाय.
बाकी, कर्णापेक्षाही विकर्णाबद्दल सहानुभूती वाटते मला तर.
सुंदर लेखन आणि तुम्ही
सुंदर लेखन आणि तुम्ही लिहिलेलं निगेटिव्ह प्रतिसाद बद्दल लिहिलेलं मला आवडलं
बोकलत साहेब आता माझ्या प्रतिसाद वर ही प्रतिसाद दिला तरी चालेल हो आणि तुमच्या डोळ्यानी शुद्ध लेखन तपासून पहा काय ? काय करणार बिन पगारी फुल्ल अधिकारी हा हा हा (अहो या वर काय ते इमोजी का काय ते टाकता येत नाहीत मला)
धन्यवाद स्वामिनी
धन्यवाद स्वामिनी
Pages