अमर-शक्ती

Submitted by पायस on 2 October, 2019 - 07:49

बिझिनेस जार्गनमध्ये "लो हँगिंग फ्रुट" ही संज्ञा अनेकदा वापरली जाते. थोडक्यात सांगायचे तर असे काहीतरी जे सहज साध्य आहे. जेव्हा काही उत्तुंग आकांक्षा मनी असेल तेव्हा कायम हाच सल्ला दिला जातो की आधी लो हँगिंग फ्रुट्स ओळखा, ती साध्य करा आणि मग टप्प्या-टप्प्याने अंतिम ध्येयाकडे वाटचाल करा. याच न्यायाने धरम-वीर पाहिल्यापासून त्याचे सखोल रसग्रहण करण्याचा पराक्रम करण्याची इच्छा होणे साहजिक आहे. पण एकदम अशा खडतर आव्हानांना सामोरे जाण्यात फारसा अर्थ नाही. सुदैवाने हर्मेश मल्होत्राने आपल्यासाठी एक लो हँगिंग फ्रुट धरम-वीर नंतर केवळ एकाच वर्षानंतर बनवले. त्याचे नाव आहे अमर शक्ती!

हर्मेश मल्होत्रा नक्कीच एक बर्‍यापैकी दिग्दर्शक आहे. त्याच्या या धरम-वीर कोर्सच्या कॅपस्टोन प्रोजेक्टमधून त्याला बरेच काही शिकावयास मिळाले आणि त्याने आपल्याला कैक खतरनाक सिनेमे दिले. नगीना-निगाहें मधून नागपटांची लाट आणणारा हाच मनुष्य! दुल्हे राजा सारखा धमाल चित्रपटही याचाच आहे (दुल्हे राजा डेव्हिड धवनने दिग्दर्शित केला असा गैरसमज आहे). अमर शक्ती, खरेतर अमर-शक्ती, मध्ये त्याने आपल्या उज्ज्वल भवितव्याची चुणूक दाखवली आहे. कुठल्याशा मध्ययुगीन युरोपीय राज्यात, जिथे हिंदी बोलली जाते, घडणारे कथानक. दोन राजपुत्र. जीवनमुळे त्यांची लहानपणीच झालेली ताटातूट. प्रदीप कुमार. इंद्राणी मुखर्जी. रणजीत. अशी अनेक साम्ये या दोन्ही चित्रपटांत असली तरी क्षुल्लक कथा वेगळी असल्यामुळे याला फक्त थिमॅटिक इन्स्पिरेशन म्हणावे लागते. यामुळे याचा अभ्यास करणे क्रमप्राप्त आहे.

१) चित्रपटासाठी स्वामीभक्तांइतकाच राजद्रोही महत्त्वाचा असतो

१.१) दोनच पहारेकरी ठेवणार्‍या युवराजांचे दिवस फार लवकर भरतात

सिनेमाची सुरुवात दहा घोडेस्वार दाखवून होते. हे घोडेस्वार कोणत्यातरी जंगलात संध्याकाळी घोडे फेकत निघाले आहेत. यांचे प्रमुख आहेत प्रदीप कुमार आणि जीवन. प्रकुला जीवन अदबीने कोणते तरी घर दाखवतो. त्या अदबीवरून या सिनेमात जीवनवर दुय्यम व्हिलन, तोही प्रकुचा, बनण्याची दुर्दशा ओढवल्याचे स्पष्ट होते. हे घर आणि प्रकु-जीवन जोडीमध्ये कोणतातरी विशेष रेखांश असल्याने टाईम झोन बदलून तिथे रात्र झालेली असते. घराबाहेर पहारा आणि सूर्य असलेला पांढरा झेंडा बघता हे कोणत्यातरी राजघराण्यातील व्यक्तीचे निवासस्थान असल्याचे कळते. प्रकु आणि जीवन यांनी राजस्थानी पद्धतीचा पोशाख केला आहे. दोघे लगेच डोईच्या फेट्याने आपली मुखकमले झाकून घेतात. उपस्थित दोन पहारेकर्‍यांनी मात्र ब्रिटिशकालीन हवालदारांचा वेश घेतला आहे. प्रकु-जीवनची माणसे शिताफीने या दोन पहारेकर्‍यांना ठार करतात.

प्रकु खिडकीतून आत डोकावतो. ते घर म्हणजे एक लाकडी केबिन आहे. थोडक्यात केबिन इन द वुड्स आपल्या लोकांनी आधी बांधले म्हणायला हरकत नसावी. केबिनमध्ये आधी राजन हक्सर (ऐलान-ए-जंग मधील लोळणारा सेठ म्हणून सुप्रसिद्ध) दिसतो. आणखी एका खिडकीतून बघतो तर अलका (कालिचरणमधील शत्रुघ्न सिन्हाची बहीण) दिसते. बाहेर सगळे लोक उकाड्याचे कपडे घातलेले असूनही राजन उगाच शेकोटीसमोर दारू पीत बसलेला असतो. तर अलका अतिशय गॉडी डिझाईनचे निळे पातळ घालून बसली आहे. तिचे कपडे बघता फार फार तर ती एखाद्या सावकाराची बायको शोभेल. पण हिला काही मिनिटे राजघराण्यातली सहन करणे भाग आहे. राजन-अलका जोडप्याला दोन मुले आहेत. एक किशोरवयीन तर दुसरा चार-पाच वर्षांचा असेल. या दिमतीला इंद्राणी मुखर्जी लीला या नावाने दासी दाखवली आहे. धरम-वीर मध्ये रानीमाँ बनून भरपूर माती खाल्ल्याने हिचे डिमोशन झाले असावे. अलकाला खिडकीतून डोकावणारा डाकूच्या वेशातला प्रकु दिसतो. ती किंकाळी फोडते. आता लपण्यात फारसा पॉईंट नसल्याने दरवाजा फोडून प्रकु आणि गँग आत शिरते.

बरीच तलवारबाजी होते. राजन एकच जोराचा तलवारीचा आघात करतो. याने खरेतर प्रकुचा चेहरा चिरला गेला पाहिजे. पण तसे न होता केवळ त्याचा बुरखा गळून पडतो. प्रकुचे नाव शमशेर सिंग असल्याचे स्पष्ट होते. याला गोल्डन कलरची फ्रेंच कट दाढी दिली आहे. नाव शमशेर असले तरी हातात रोमन पद्धतीची शॉर्ट स्वोर्ड आहे. शमशेर राजघराण्याचा नोकर असल्याचेही स्पष्ट होते. तोही लगेच गद्दारी का कलंक लावण्याऐवजी खून का तिलक लावायला आला असल्याचे घोषित करतो. मग ते दोघे आता हातात तलवारी दिल्याच आहेत तर पैसे वसूल करण्यासाठी थोडी खणाखणी करूया म्हणतात. राजन अलकाला पळून जायला सांगतो. ती पळते पण त्याआधी ती आणि मोठा मुलगा राजनचा प्रकु-जीवनच्या हातून तलवारी भोसकून झालेला मृत्यु बघतात. हा इंटरेस्टिंग डिझाईन चॉईस आहे. यामुळे धरम-वीरचा जो अर्ध्या तासाचा लांबलचक सेटअप आहे तो जवळ जवळ वीस मिनिटे कमी होतो. पण त्यामुळे काही सेट पीसेस वाया जातात. जसे की धरम-वीर मध्ये जीवनला आपला आयुष्यभराचा गैरसमज कळून चुकतो तेव्हा त्याच्या व्हिलनला सुद्धा अनेक पदर दाखवता येतात. पण दिग्दर्शक शिकाऊ असल्याने त्याला हे अजून कळलेले नाही. म्हणा प्रदीप कुमार व्हिलन हीच चॉईस डिबेटेबल आहे.

१.२) जब तक राजकुमार ना चाहे, राजकुमार को कोई मार नही सकता

अलकाबाईंना किमान डोके असल्यामुळे ती दोन्ही राजकुमार एकत्र घेऊन पळत नाही. छोटा राजकुमार अमर सिंग ती इंद्राणीच्या हवाली करते तर स्वतः मोठा राजकुमार शक्ती सिंग घेऊन पळ काढते. अशी ही अमर-शक्तीची जोडी सहीसलामत वाचणार यात कोणालाही तिळमात्र शंका यायचे कारण नाही. प्रश्न इतकाच आहे की ते कसे वाचणार. शेरू द वंडर बाजच्या डेट्स न मिळाल्याने दुर्दैवाने हे काम मनुष्यप्राण्यांकडून करवून घ्यावे लागले आहे. तर प्रकु-जीवन अलकाच्या मागे लागतात. पण दूरदृष्टी आणि सर्वंकष विचारांचा अभाव असल्याने त्यांना खोलीतून पळून जाणारी अलका दिसते पण त्याच खोलीच्या कोपर्‍यात लपलेली इंद्राणी दिसत नाही. ते सर्व केबिन बाहेर पडल्यानंतर इंद्राणी अमरला घेऊन सुमडीत पळ काढते.
आता पाठलाग जंगलात शिफ्ट होतो. केवळ बरीचशी झाडे आहेत म्हणून याला जंगल म्हणायचे. अन्यथा इथे बरेच मोकळे पट्टे असल्यामुळे माणसांना सहज शोधता येते. अशाच एका मोकळ्या जागेत अलका आणि शक्ती दिसतात. जीवनचा नेम भलताच चांगला असतो. तो अज्ञात अंतरावरून अदृश्य चाकू फेकून मारतो. हा अदृश्य चाकू अलकाच्या विव्हळण्यावरून तिच्या डाव्या खांद्यापाशी लागला आहे असे दिसते (आमचा आपला एक अंदाज). एवढ्याशा जखमांमुळे सामान्य माणसे मरत नसली तरी ऐषारामी वृत्ती हाडामासा खिळलेली ती ललना लगेच प्राण (म्हणजे जीव, प्राण धरम-वीरमध्ये, अमर-शक्तीत नाही) सोडते. एव्हाना सकाळ झालेली असते. आता ते दोन राजकुमार ठार करणे बाकी असते. त्यांना पळणारा शक्ती सिंग दिसतो. मॅन व्हर्सेस वाईल्ड पाहिलेले नसल्याने उंचावरून नदीत उडी घेताना तिच्या पात्राच्या खोलीचा अंदाज घ्यायचा असतो हे शक्तीला ठाऊक नसते. त्यामुळे तो बेधडक नदीत उडी मारतो. नदीत उडी मारणारा माणूस हिंदी चित्रपटात कधीही मरत नाही या महान सत्याचा उलगडा प्रकु-जीवनला झालेला नसल्यामुळे ते शक्ती सिंग मेला असा निष्कर्ष काढून मोकळे होतात. आता राहिला छोटा राजकुमार ज्याला घेऊन पळाली लीला.

इकडे इंद्राणी पळते ती तडक घर गाठते. रात्रीचा तिचा नवरा शांतपणे झोपलेला असतो. ती येऊन दणादणा दार वाजवते. नंतर कळते की तिचा राजकुमाराच्याच वयाचा मुलगा घरात आहे. पण एवढी आदळआपट केल्यानंतरही त्या बाळावर काही ढिम्म परिणाम होत नाही, तो निवांत झोपून राहतो. तो नवराही रात्रीची झोपमोड झाल्याचे कोणतेही लक्षण दाखवत नाही. उलट अतिशय प्रसन्न चेहर्‍याने तो पत्नीला घरात घेतो. इंद्राणी म्हणते की शमशेर सिंग-नाहर सिंग जोडीने युवराज-युवराणीला मारून टाकले आहे. (नाहर सिंग म्हणजे जीवन) तो नवराही महाचतुर आणि स्वामीभक्त असल्याने त्याला लगेच कळते की आत्ता नमकहराम कॅटेगरीचे पारडे जड असून छोटा राजकुमार मोठा होईपर्यंत वाट बघावी लागेल. तसेच सिनेमाची पटकथा आपले बलिदान मागत असल्याचेही त्या चाणाक्ष पुरुषास कळून चुकते. एवढ्यात एक घोडा खिंकाळतो. इंद्राणी लगेच म्हणते की प्रकु-जीवनचे लोक इथपर्यंत आले आहेत. तसे बघावे तर इंद्राणीसुद्धा घोड्यावरूनच इथे आली आहे. हा खिंकाळणारा घोडा तिचा नाही हे कशावरून? ती घोडा ओळखण्यात चतुर असावी. असो तर आता राजकुमाराला कसे वाचवावे? मग लीलाकांत एक अफलातून कल्पना काढतो. तो म्हणतो आपला मुलगा आणि राजकुमार समवयस्क का आहेत? याच दिवसासाठी तर केला होता तो टायमिंगचा अट्टाहास! या बलिदानाच्या चढाओढीत आईचे हृदय तिळतिळ तुटते पण त्यावर स्वामीभक्ती मात करते. ती राजकुमाराला लपवते आणि जीवन घरात प्रवेश करतो. तो म्हणतो कुमार कुठे आहे? लीलाकांत म्हणतो इथे कोणी कुमार नाही, आगे जाओ. आई-बापाप्रमाणेच उत्कृष्ट टायमिंग असल्याने तो रिप्लेसमेंट मुलगा रडायला सुरुवात करतो. वय भलेही चार-पाच वर्षे असले तरी तान्ह्या बाळाच्या आवाजात रडण्यात तो पटाईत असतो. जीवनच्या मते नगास नग मुलगा मिळाला म्हणजे झाले. त्यामुळे तो कोण मुलगा आहे याची शहानिशा करता सरळ जाऊन त्याला मारून टाकतो. लीलाकांतही मरतो. इंद्राणी मध्ये तडमडते तर तिचेही डोके फोडले जाते. मग त्या घराला आग लावून देतात. ते सिमेंटचे पक्के घरही लाक्षागृह असल्यासारखे धू धू करून जळते. पण सिनेमा अजून सुरुही झालेला नसल्याने इंद्राणी मेलेली नसते. ती जीवन गेल्याची खात्री होताच खर्‍या राजकुमाराला घेऊन पळ काढते.

१.३) परफेक्ट प्लॅनिंग

छोटा तर इंद्राणीकडे आहे. पण मोठ्या मुलाचे काय झाले? तो नदीत वाहत जाऊन एका किनार्‍याला लागतो. तिथे एक बंजार्‍यांचा कबिला आलेला असतो. या कबिल्याचा सरदार असतो ओम शिवपुरी. ओम म्हणतो की हा चांगल्या घरातला दिसतो आहे, याला घेऊन चला आणि काय मलमपट्टी करता येईल ती करा. इकडे राजमहालात काय चालले आहे ते बघू. आधी सांगितल्याप्रमाणे राजन हक्सर युवराज होता. म्हणजे अजून तो राजा झालेला नाही. राजा असतो मुराद (हिंदी चित्रपटांतला अनंत काळचा न्यायाधीश, जवळपास ४३ वेळा न्यायाधीशाची भूमिका बजावण्याचे महान कार्य केलेला कलाकार). हा तसाही आज आहे उद्या नाही कंडिशनमध्ये असतोच. त्यामुळे याला सगळे समाचार याच्या बेडरूममध्ये जाऊन द्यावे लागतात. तर जीवन धावत धावत बेडरूममध्ये घुसतो. तिथे राजस्थानी नोकर, पठाणी सैनिक, फ्रेंच कट दाढीधारी प्रदीप कुमार अशी अनेकता में एकता दाखवणारी मंडळी असतात. जीवन त्याला सांगतो की युवराज-युवराज्ञी-राजकुमार (१ आणि २) डाकूंकडून मारले गेले. हे ऐकून मुराद दोन सेकंद आपल्याला कोणता आजार आहे हे आठवायचा प्रयत्न करतो. काहीच न सुचल्याने तो हार्ट अ‍ॅटॅक आल्याचा अभिनय करून बेशुद्ध पडतो. तिथे म्हैसुरी फेटा बांधलेला एक हकीमही (शराबीमधला रुस्तम बंदूकवाला) असतो. प्रकुच्या इशार्‍यावरून तो औषध देण्याच्या नावाखाली मुरादच्या तोंडात विषाची कुपी रिती करतो. मुराद मरतो आणि त्याचा मृत्यु सदमा नावाखाली खपवतात. अजूनही पुरेशी अनेकता में एकता दिसलेली नसल्यामुळे पठाणी, राजस्थानी, बुंदेली असे सगळे फेटे आणि मॉडर्न इन्स्पेक्टर स्टाईलच्या टोप्या घातलेले पहारेकरी दुखवटा व्यक्त करायला मान झुकवण्याचा शॉटही आपल्याला दिला जातो.

ही बातमी ओम शिवपुरीला कळते. शमशेर सिंग आता महाराज बनणार हे ऐकून तो राज्य सोडतो. सोबत शक्ती असतोच पण तो आपले रहस्य उघड करत नाही. इकडे प्रकु कच्च्या गुरुचा चेला नसतो. आपला प्लॅन परफेक्ट असावा म्हणून तो प्लॅनिंगमध्ये इन्व्हॉल्ह्व्ह्ड सर्व पार्ट्यांना बोलावून घेतो. इथे त्याला ब्रिटिश अधिकारी स्टाईल पांढरा शर्ट पांढरी पँट दिली आहे. प्रकु-जीवनला ब्लॅकमेलरची कन्सेप्ट माहित असल्याने ते या लोकांना मारायचे नक्की करूनच आलेले असतात. पण तरी आपले मनोरंजन व्हावे म्हणून ते या लोकांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देतात. इथे शानमधल्या सीनचा प्रिकर्सर बघायला मिळतो. त्यांना बोलाचाली मध्ये विशिष्ट जागी उभे केल्यानंतर प्रकु छानपैकी खुर्चीत बसून टेबलाच्या खणातले एक बटण दाबतो आणि या लोकांच्या पायाखालची जमीन सरकते. खाली एक पिंजरा असतो, पिंजर्‍यात एक वाघ असतो. वाघ ऑफस्क्रीन जेवण उरकतो आणि प्रकु-जीवन जोडीचा मार्ग निष्कंटक होतो. प्रकु राजा तर जीवन त्याचा दिवाण बनतो.

२) हिरो-हिरोईन की एंट्री

२.१) हिरो लोक फेअरप्लेमध्ये विश्वास ठेवत असल्याने विन-विन ऑफर्स घेत नाहीत

इकडे इंद्राणी कुठल्यातरी स्वामीभक्त नोकराकडे आसरा घेते. तोही फार आढेवेढे न घेता हिला आणि राजकुमाराला घरात घेतो. हा तलवारबाज असतो. तो राजकुमार अमर सिंगला या राज्याचा सर्वोत्कृष्ट तलवारबाज बनवण्याचा विडा उचलतो. जसे जागरुक पालक आपल्या पाल्याला आयआयटीतील यशासाठी सध्या पहिली-दुसरी पासून तयारी करतात तसे हा अमरला पाचव्या वर्षापासूनच तलवारबाजीचे धडे द्यायला सुरु करतो. मग हे दोघे काही काळ फेन्सिंग करतात. दोघांच्या हातात रेपिअर्स दिल्या आहेत. पण दोघांनाही रेपिअर चालवायची अक्कल नसल्याने ते दांडपट्ट्याप्रमाणे काहीतरी खणाखणी करतात. यानंतर लहान पोरांना मोठे करा ट्रान्झिशनमधली एक उत्तम केस स्टडी आहे. स्वामीभक्त तलवारबाज त्या पाच वर्षांच्या पोराच्या हातून सहजतेने तलवार पाडतो आणि त्याला वर "तलवार उठाओ अमर" करून हिणवतो. मग श्रेयनामावली होते आणि नामावली संपताच अमर मोठा झालेला असतो. अमर आहे शशी कपूर. तोच सीन रिपीट होतो आणि आता शशी "तलवार उठाओ चाचा" म्हणून आपण निष्णात तलवारबाज झाल्याची ग्वाही देतो. एवढे पुरेसे नसल्यामुळे लगेच त्याला अन्यायनिवारणाचीही संधी मिळते.

गावात कोतवाल शेरसिंग (मोहन शेरी, त्रिशूलमधला गंगू) लगान वसूल करण्याच्या नावाखाली अत्याचार करत असतो. इथे हा कोतवाल नॉटिंगहॅमच्या शेरिफप्रमाणे दाखवला आहे. शशी कपूर एकटाच येऊन त्याच्या लोकांना बदडायला लागतो. हिरोंना समवयस्क व्हिलन द्यायची गरज असल्याने शशीला प्रतिस्पर्धी म्हणून रुपेश कुमारला इंट्रोड्युस केले जाते. रुपेश असतो कुंवर रणजीत नारायण सिंग. हा वेगळ्या कुठल्यातरी राज्याचा युवराज असतो. कोतवाल त्याला थोडक्यात परिस्थिती विशद करतो. हे ऐकून तो म्हणतो की आमच्या राज्यात अशा फायटिंग करणार्‍या लोकांचे हात तोडले जातात. नही वो तो बराबर हैं पण शशी तुझ्या राज्यात येऊन हाणामारी नाही करत आहे. पटकन काहीतरी उपाय सांगायचा सोडून फालतूची शायनिंग मारत असल्याने हा दुय्यम व्हिलन असल्याचे स्पष्ट होते. तो कोतवालाला सुचवतो की गावातले पाच तरुण पकडून घेऊन जा. त्या पाच तरुणांना सोडवण्याची किंमत म्हणजे या वेळचा लगान - पाचशे मोहरा. जर त्यांनी सात दिवसांत लगान नाही भरला तर त्या पाच लोकांना फासावर द्या. सगळे हा उपाय मान्य करतात. समजा गावकर्‍यांनी गावातले उपद्रवी तरुण याच्या हवाली केले आणि लगान भरला नाही तर या उपायानुसार ते उपद्रवी तरुण फासावर लटकतील. म्हणजे आयतीच कटकट गेली. आणि यांना लगानही भरावा लागणार नाही कारण रुपेशच्या काँट्रॅक्टनुसार लगानची रिप्लेसमेंट ते तरुण आहेत. वरुण ग्रोव्हरच्या शब्दांत सांगायचे तर "ऐसी विन-विन ऑफर मैने छह महिने में नही सुनी". पण हिंदी चित्रपटातील सामान्य जनता प्रॅग्मॅटिक विचार करत नसल्याने असा विचार करत नसल्याने तसे होत नाही.

२.२) फ्रान्सचा राजपूत

कट टू दरबार. रुपेश कुमार किशनगढचा युवराज असल्याचे कळते. प्रकुचा पैसा वर आल्यामुळे तो दरवर्षी ऑलिंपिक छाप स्पर्धा भरवत असतो. रुपेशचे कॅरेक्टर यांच्या ऑलिंपिकचा मायकेल फेल्प्स असतो. म्हणजे दर वर्षी तोच जिंकत असतो. आपल्या तोडीचा कोणी प्रतिस्पर्धी नसल्याची त्याची लाडिक तक्रार प्रकु-जीवन ऐकून घेतात. इथे सर्वांचे कपडे मोठे रंजक आहेत. जीवनचा ड्रेस काहीसा तंग असल्यामुळे त्याची ढेरी दिसते. रुपेशला केशरी रंगाचा नेपोलिअनच्या काळातला युनिफॉर्म दिला आहे आणि खाली एम्ब्रॉयडरी केलेली पांढरी पँट. तर प्रकु त्याचा पांढरा ड्रेस घालून बसला आहे. प्रकुच्या खांद्यावरची झूल सिंहासनावरून खाली सोडली आहे आणि ती सिंहासनाच्या तीन-चार पायर्‍यांपर्यंत लोळेल इतकी मोठी आहे. इथे बहुधा ती झूल म्हणजे मुघलकालीन काबा दाखवायचा असावा. पण एवढे पांढरे कपडे बघता या राज्यात धोब्याचा धंदा जोरात असावा.

रुपेशच्या बढाया प्रकु ऐकून घेतो. रुपेशला दरबारातच एकाच वेळी तीन-तीन लोकांशी फाईट करायची असते. त्याच्याकडे बघता त्याला एकाशीही धड फाईट जमणार नाही हे स्पष्ट असल्यामुळे प्रकु त्याला कव्हरअप करू बघतो. म्हणतो की उगाच कशाला दरबारात रक्तपात? पण रुपेश स्वतःला राजपूत समजत असल्यामुळे त्याला जखमा-रक्त वगैरे वीरतेचे लक्षण वाटत असते. तसेच तो आपल्या प्रतिस्पर्ध्यांना कायम मारत असतो, पण यावेळी तो प्रकुच्या लोकांना जिवंत सोडण्याचे वचन देतो. मग तीन सरदारांना समोर आणून फाईटिंग होते. प्रकु सुद्धा हौसेने याला हरवण्याचे बक्षीस म्हणून आपली अंगठी देऊ करतो. दुर्दैवाने प्रकुचे सरदार फारच बंडल निघतात. रुपेश त्यांना सहज हरवतो. प्रकु खुश होऊन त्याला काय बक्षीस पाहिजे विचारतो. रुपेशला या राज्यातला आबदार मोती हवा असतो. राज्यात मोत्यांचे प्रॉडक्शन होत नसल्याने प्रकु गोंधळतो. पण जीवन काय समजायचे ते समजतो. हिरोईनच्या एंट्रीची वेळ झालेली आहे.

२.३) व्हिलनची मुलगी नेहमी हिरोईन असते

हा आबदार मोती असतो राजकुमारी सुनीता. सुनीता दाखवली आहे सुलक्षणा पंडित. सुलक्षणा संपूर्ण सिनेमात गरिबांची गुटगुटीत नीतू सिंग दिसते. तिच्या सख्या खिदळत येतात आणि तिला दरबारात काय झाले ते सांगतात. एम्पॉवर्ड हिरोईन असल्याने ती आपला चॉईस आपणच ठरवणार असल्याची घोषणा करते. सीन कट होऊन कॅमेरा शशी कपूरवर आल्याने सुलक्षणा शशीची हिरोईन असल्याचे कळते. शशीलाही फेन्सिंग ऑलिंपिकविषयी कळते. सिनेमाचा हिरो असल्याने तो ऑलिंपिकमध्ये भाग घेऊन त्याचे बक्षीस - पाचशे मोहोरा - जिंकण्याचा निश्चय करतो. इंद्राणीला रुपेशच्या अजिंक्यपणाच्या दंतकथा ऐकून चिंता वाटते. पण शशी तिला आश्वस्त करतो आणि ऑलिंपिकसाठी राजधानीकडे रवाना होतो.

एका राजकुमाराची हिरोईन दाखवल्यानंतर दुसर्‍याची हिरोईन दाखवणे भाग आहे. कट टू बंजार्‍यांचा कबिला. या कबिल्याच्या कपड्यांमध्ये शून्य कन्सिस्टन्सी आहे. ओम शिवपुरी हंटिंग जॅकेट आणि हंटिंग बूट्स घालून हिंडतो आहे. अजून काही जणांच्या अंगावर मंगोल पद्धतीचे कपडे आहेत. काही जण जिप्सी दाखवले आहेत. पुन्हा अनेकता मे एकता! ऑलिंपिक स्पर्धांसोबत राजधानीत मेलाही होणार असतो. हा दिलों का मेला नसल्यामुळे इथे ट्विंकल खन्ना नाही, चिंता नसावी. तर मेल्यामध्ये तमाशा दाखवून पैसे कमवण्यासाठी बंजार्‍यांनी जाणे गरजेचे असते. त्यानुसार हे लोक तयारी करत असतात. इथे आपल्याला कळते की शक्ती मोठा झाला असून तो कबिल्यातील उच्चपदस्थ आहे. त्याला हिरोईन आहे ओम शिवपुरीच्या राईट हँड मॅन जब्बालची मुलगी चमकी. चमकीची भूमिका केली आहे मंजुला नावाच्या नटीने. ही हिंदी चित्रपटांत साऊथमधून आयात केलेल्या पहिल्या नट्यांच्या ताफ्यात मोडते. हिचा पहिलाच शॉट क्लिवेज शॉट काढून घेऊन दिग्दर्शकाने हिच्या भूमिकेविषयीचे आपले विचार स्पष्ट केले आहेत.

आता जसे शशीला रुपेश आहे तसे शक्तीला सुद्धा कोणीतरी व्हिलन पाहिजे. त्यानुसार चमकीमध्ये इंटरेस्टेड दाखवला आहे रणजीत. रणजीत ओमशिवपुरीचा मुलगा दाखवला आहे. वुल्व्हरिनने आपले साईडबर्न्स वाढवण्याची प्रेरणा रणजीतला या सिनेमात बघून घेतली असावी. बाकी रणजीत दिसतो कमाल! थोडे केस कमी केले आणि अ‍ॅस्थमाची ट्रीटमेंट घेतली तर त्याच्यात नावं ठेवायला जागा नाही. पण नशीबी व्हिलनगिरी लिहिल्यामुळे त्याला मंजुलाकडून बोलणी ऐकून घ्यावी लागतात. त्याला मंजुला आपल्याला भाव देत नसून शक्तीला भाव देते याचे दु:ख झालेले दिसते. तसेही तो सरदारचा मुलगा असतानाही लोक शक्तीला भाव देत आहेत हे बघता त्याला दु:ख होणे साहजिक आहे. असा ग्राऊंडेड व्हिलन इतर सिनेमाच्या तुलनेत फारच आश्चर्यजनक आहे. असो, रणजित मग दोन मिनिटे रणजीतची कामे करतो आणि आपण आता हा शक्ती सिंग मोठा होऊन कोण झाला आहे ते बघतो.

शक्ती सिंग आहे शत्रुघ्न सिन्हा. ही चॉईस जरा ऑड आहे. शॉटगन शशीपेक्षा तरुण दिसतो आणि प्रत्यक्षातही तो आठ वर्षांनी लहान आहे. तरीही तो सिनेमात मोठा भाऊ आहे. याचा पराक्रम ठसवण्यासाठी एंट्री शॉटमध्येच तो एका बिबळ्याला गळ्यात पट्टा घालून कुत्र्याला फिरवावे तसे फिरवत असतो. हा बिबळ्या गुंडामधील सडा हुआ टाईगरचा पूर्वज असावा असा आमचा दाट संशय आहे. यानेही कलाबूत केलेले जाकीट, मॅचिंग पँट आणि पांढरा शर्ट घातला आहे. आपला डाव बघताच तो बिनधास्त त्या बिबळ्याला सोडून देतो आणि तिच्याकडे जातो. बिबळ्या सज्जन असल्यामुळे तो गुपचूप आपल्या वाटेने निघून जातो, उगाच वस्तीत गोंधळ माजवत नाही. शशीला काही लक्षात नसले तरी याला लहानपणचे सर्वकाही आठवत असते. त्यामुळे हा राजधानीला जायचे टाळत असतो. यावेळेस मात्र ओम शिवपुरी त्याला आग्रह करून राजधानीला घेऊन जातो.

३) ऑलिंपिक्स

३.१) मनोरंजनाच्या व्याख्या व्यक्तीसापेक्ष असतात

राजधानीला गणपतीला उसळावी तशी गर्दी असते. गर्दी तिथे पाकिटमार या न्यायाने रणजीत लोकांचे खिसे कापत असतो. ओम शिवपुरी सुद्धा जवळच असतो. प्रेक्षकांना थोडे टीज करावे या हेतुने शशी आणि शत्रुघ्न एकमेकांना धडकतात. पण दोघे एकमेकांना ओळखत नसल्याने यातून निष्पन्न काहीच होत नाही. गंमतीची गोष्ट अशी की या दोघा हिरोंनी आपापाली छाताडे केस दिसावेत इतपत उघडी ठेवली आहेत. पण व्हिलन रणजीतची बॉडी मात्र वॅक्सिंग केलेली आहे. असो, आत्ता वेळ मिलनाची नाही तर खेळांची आहे. खेळ सुरु करायला प्रकु, जीवन, रुपेश मैदानापाशी बांधलेल्या सज्जात येऊन बसतात. प्रकु तिथेही आपला तो इम्प्रॅक्टिकल काबा घालून आला आहे. पण सणासुदीचे म्हणून शर्ट-पँट नवीन आहेत. जीवनलाही सणासुदीचा नवीन शर्टपीस दिला आहे. शत्रुघ्नला लांबून हे लोक दिसतात. टेलिस्कोपिक व्हिजन असल्यामुळे इतक्या लांबूनही त्याला प्रकु ओळखू येतो. हिरो लोक भावनेच्या भरात वाहून जात असल्यामुळे तो प्रकुला सुरा फेकून मारायचा विचार करतो. इतक्या लांबून प्रकुला कदाचित एखादा स्नायपरही मारू शकणार नाही तर याचा सुरा कसला पोहोचायला? पण असं डोकं हिरो लोक लावत नसतात. सुदैवाने त्याला कोणीतरी येऊन ओम शिवपुरीने बोलावल्याचे सांगतो आणि हा वेडेपणा बघायची वेळ प्रेक्षकावर येत नाही.

आता राजकुमारीही गच्चीत येऊन बसलेली आहे. शशी तिला बघतो आणि त्याला पहली नजर का प्यारचा साक्षात्कार होतो. सोबत त्याचा मित्र गोपाल (बीरबल) असतो. तो त्याला भानावर आणतो. गंमत म्हणजे प्रकुच्या डोक्यावर छत आहे तर सुलक्षणाला तसेच उन्हात बसवले आहे. मग काही मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. सुरुवातीला स्कॉटलंडमधला जथा असावा कारण लोक बॅगपाईपर वाजवत येतात आणि जातात. मग काही रथ येतात आणि जातात. मग काही गदाधारी लोक येतात आणि जातात. मग काही लोक कार्टव्हिल मारत येतात आणि जातात. मला वाटले आता स्कूटर वरून गिरीश कुलकर्णीही येईल आणि जाईल, पण तसे होत नाही. या लोकांच्या मनोरंजनाच्या अपेक्षा अत्यंत माफक असल्याने यानेही ते खुश होतात. मग मुख्य आकर्षणाची वेळ झालेली असते. जीवन येऊन म्हणतो की गेल्या पाच वर्षांपासून तलवारबाजीची स्पर्धा रुपेश जिंकत आला आहे. गेली दोन वर्षे तर त्याला वॉक-ओव्हर मिळाला आहे. तर या वर्षी सुद्धा वॉक-ओव्हर की कोणी चॅलेंजर आला आहे? जीवनच्याच शब्दांत सांगायचे तर "क्या इस साल कोई तलवार जवान हुई हैं?" याचे उत्तर सांगण्याची गरज नसावी.

३.२) पहिली चकमक नेहमी हिरोने जिंकावी

तत्पूर्वी या स्पर्धेविषयी थोडेसे. एकतर हिला स्पर्धा का म्हणत आहेत हे कळत नाही. या स्पर्धेला काही क्वालिफाईंग पूल नाही. रजिस्ट्रेशन प्रोसेस नाही. तसाही दरवर्षी रुपेश कुमारच जिंकतो जो आहे दुसर्‍या राज्याचा. या रुपेशच्या तोडीचा तलवारबाज समजा या राज्यात नाही पण रुपेशप्रमाणे इतर राज्यांतून स्पर्धक का येत नाहीत? आणि प्रकुला सुद्धा दरवर्षी गर्विष्ठ रुपेशकडून आपल्या राज्याचा अपमान करून घ्यायची काय हौस आहे काही समजत नाही. बरं असेही नाही की प्रकुचे राज्य रुपेशच्या राज्यापेक्षा कमजोर आहे, किमान तसे वाटत तरी नाही. मग हा टाईमपास दरवर्षी करण्यात काय हशील असावे? संशोधकांनी हा आव्हानात्मक प्रश्न सोडवायला घ्यायला हवा असे नमूद करून पुढे जाऊयात.

रुपेश चॅलेंज म्हणून त्याची तलवार मैदानात फेकतो. चॅलेंज अ‍ॅक्सेप्टेड म्हणून शशीही आपली तलवार मैदानात फेकतो. रुपेशला त्याची ओळख पटते. तो "तुम्हारी मौत मेरे हातों से लिखी हैं" अशा गोंडस शब्दांत शशीचे स्वागत करतो. शशी असल्या पोकळ धमक्यांनी घाबरणारी पार्टी नसते. या दोघांभोवती शिपाई एक रिंगण करतात. शशी पळून जाऊ नये म्हणून ही खबरदारी असल्याचे रुपेश सांगतो. शशी त्याला विचारतो की समजा तुला पळून जायचे असले तर? याने खवळून रुपेश फाईटिंग सुरु करतो. हे लोक फेन्सिंग करत असले तरी नमस्कार-बोईंग वगैरे सोपस्कार या राज्यात अस्तित्वात नाहीत. ही फाईट अ‍ॅक्चुअली चांगली आहे. दोघेही अ‍ॅग्रेसिव्ह स्लॅशिंग करून आपापल्या रेपिअर्स पुढे थ्रस्ट करत आहेत जे फेन्सिंगचे बेसिक आहे. अर्थात ही फाईट फिक्स दिसते कारण शशी शिपायांच्या जवळ जाताच एक शिपाई भाला भोसकण्याचा प्रयत्न करतो आणि क्रॉस-थ्रस्टिंगमध्ये रुपेशच्या हातून मारला जातो. याने रुपेश इतकी वर्षे कसा जिंकत आला हे स्पष्ट होते. थोड्यावेळाने शशी रुपेश जमिनीवर लोळण घेण्यास भाग पाडतो. रुपेश हरतो आहे हे दिसताच ते शिपाई पुढे होऊन शशीवर भाले रोखतात.

लोकांना शशी आवडला असल्याने ते बूईंग करायला सुरु करतात. सुलक्षणालाही शशी आवडला असल्याने ती या फिक्सिंगने भलतीच व्यथित होते. ती प्रकुकडे याची तक्रार करते. प्रॉब्लेम इतकाच असतो की प्रॉस्पेक्टिव्ह जावयाचा अपमान करणे प्रकुला परवडण्यासारखे नसते. पण रुपेशने स्वतःच माती खाल्ली असल्याने प्रकुचाही नाईलाज होतो. शशीला सोडले जाते आणि सुलक्षणा शशी जिंकल्याचे जाहीर करते. ती पाचशे मोहोरांची थैली शशीकडे भिरकावते, शशीही ती झेलून तिला अदबीने कुर्निसात करतो. रुपेश अपमानाने लालेलाल होऊन निघून जातो. हे असे सगळे होणार हे आधीच ठाऊक असल्याने कोतवाल मैदानाच्या कडेला वाट बघत उभा असतो. शशी त्याला मोहोरा देऊन आपल्या गावकर्‍यांची सुटका करतो. त्याचा नावाचा एकच जयजयकार होतो.

अशा रीतिने हिरो लोकांनी छोटासाच का होईना पहिला विजय प्राप्त केला आहे. समोर ताज्या दमाचे व्हिलन (रणजीत, रुपेश) आहेत. तर बदला घेण्यासाठी धूर्त व्हिलनही (प्रकु-जीवन) आहेत. हिरो लोक-व्हिलन लोक अजून काय काय टाईमपास करतात याविषयी सविस्तर चर्चा अल्पविरामानंतर प्रतिसादांत. पण एवढ्या अभ्यासानंतरही तुमचे कुतुहल चाळवले नसेल तर मायनर स्पॉईलर - या सिनेमात ट्रोजन एलिफंट आहे!

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

जबरदस्त!!!
सगळ्यात हुशार रणजितच!!! Lol

दिवाळी बंपर धमाका!! पायस ने बहुदा हे दिवाळी चं गिफ्ट म्हणून अर्धवट ठेवल्याचा माझा वहिम होता. (आता इतकं ऐतिहासिक वाचल्यावर शंका वगैरे 'गैर-मनसबी' शब्द वापरणं अगदीच 'जानपर बन आयी' झालं) Happy

खूपच मस्त! Happy
मॅटर, वुल्व्हरिन , भारीतला हत्ती.. एकसे एक पंचेस!
हॅपी दिवाळी असं शब्दात न म्हणता लेखनातून खरंच आमची दिवाळी हॅपी केलीत!
बाय द वें, त्या रुपेशकुमार ला त्याच्या राज्यातून का हाकलून. दिलेल असत? Happy

Lol मस्तच!
बाकी काही नाही तरी वर्णन केलेले सगळ्यांचे ड्रेसेस बघण्यासाठी सिनेमा बघावा म्हणते. Lol

पायस हे सर्व ऑडिओ पॉड कास्त स्वरुपात उपलब्ध करू शकलात तर खूप छान. तुमच्या टॅलेंटचे चीज होईल. अजून असेच लिहा.

एक नम्बर!!!!

पायस, 'राजतिलक' वर लिहा तुम्ही.

आले का सगळे भाग? सही. आता पुन्हा पहिल्यापासून वाचतो संगती लागण्याकरता, कारण याच्या क्लिप्स पाहताना त्याच काळातले इतर अनेक चित्रपट यू ट्यूबने "टेम्प्ट" करायला आणून ठेवले बाजूला. आणि मग हा इकडे विश्वासू नोकर, तर तिकडे व्हिलन. तो इकडे व्हिलन तर तिकडे सच्चा सिपाही. त्यामुळे कोण कोण आहे याचा टोटल गोंधळ झाला आहे. त्यामुळे "ष्टॅट" पासून वाचतो आणि पाहतो परत. Happy

सर्वांना धन्यवाद आणि दिवाळीच्या शुभेच्छा! दिवाळी जवळ येत आहे लक्षात आल्यावर पुढचे भाग राखून ठेवलेले हे खरं आहे.

पॉडकास्ट >> हो पॉडकास्ट काढायचं डोक्यात आहे, बघू कसं जमतंय.

रुपेश कुमार >> याच्या एवढा रिकामटेकडा राजपुत्र मी पाहिला नाही. हा सुलक्षणाशी लग्न न करताही प्रकुच्या कुंडलीतला दशम ग्रह बनून बसला आहे. मला समजले त्यानुसार हा स्पर्धांच्या निमित्ताने येतो आणि लग्न करूनच जाणार असतो. पण मध्ये इतका वेळ घालवला आहे की असे वाटते हा परत जात नाही कारण याला त्याच्याच राज्यातून हाकलून दिले आहे.

राजतिलक >> हा पाहिला आहे मी. मी शेषनाग नंतर इच्छाधारी नाग अभ्यासक्रम लिहिला होता. त्या धर्तीवरील चांदोबापटांचा अभ्यासक्रम साधारण असा आहे - अमर शक्ती, जय विजय, बगावत, राज तिलक आणि सिंहासन. यातून पाताल-भैरवीपट वगळले आहेत. ती वेगळी कॅटेगरी. धरम वीर हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय असल्याने त्याला या चित्रपटांसोबत बसवून त्याचा अवमान करणे अनुचित आहे.

तपास करण्याचे कार्य सध्या सीआयएफ मधील अली-हनुमान-मीनाक्षी-शंभू वर सोपवलेले आहे. (अवांतरः सीआयएफ हा सीआयडीचा पुनर्जन्म आहे. विश्वास नसल्यास स्वतः खात्री करून घेणे) >>>>>>> हो , तो नवीन दंगल चॅनेल आहे त्यावर CIF लागते.

आज मी बघायला घेतला. तो प्रदीप कुमारचा पदर अगदी जबरी आहे. पावर पफ गर्ल्स मधल्या मोजो जोजो च्या पदरासारखाच आहे अगदी. सर्च करून बघा. रुपडे पण एकूण तसलेच. जीव न रुपेस अगदी अगदी. चमकी एकदम कपडे काटकसर कर आहे. सुलक्षणा गोड दिसते हं शशी पण.
सुलक्षणा विद्या सिन्हा ह्या आमच्या बालपणातल्या हिरविणी. आम्ही पण तसे लाजून बघत असू. उलझन पिक्चर मधले सुबह और शाम काम ही काम क्यु नही लेते पिया प्यार का नाम .. हे गाणे पार बिनाका हिट झाले होते. व छायागितात पण सारखे लागत असे. मुव्ही इज फासट व फेअर्ली एंटरटेनिन्ग.

सुलक्षणाला डॅन्स येत नसल्याने ती एकाजागी बसून राहते. >>>>>>>> कशी नाचणार हो? राजकुमारी आहे ना ती. हे अस सगळयान्समोर नाचण तिच्या ' शान के खिलाफ' असेल.
हा पाहिला आहे मी. मी शेषनाग नंतर इच्छाधारी नाग अभ्यासक्रम लिहिला होता. त्या धर्तीवरील चांदोबापटांचा अभ्यासक्रम साधारण असा आहे - अमर शक्ती, जय विजय, बगावत, राज तिलक आणि सिंहासन . यातून पाताल-भैरवीपट वगळले आहेत. ती वेगळी कॅटेगरी. धरम वीर हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय असल्याने त्याला या चित्रपटांसोबत बसवून त्याचा अवमान करणे अनुचित आहे. >>>>>>>> हो का, मग येऊ दया सावकाश. पाताल भैरवी, धरमवीरची चिरफाड आधीच झालेली आहे माबोवर.

जय विजय, सिंहासन, अमर शक्ती हि नावे पहिल्यान्दाच वाचत आहे माबोवर. बाकीची नावे पाहून- ऐकून माहीत आहेत.

Pages