खडतर आयुष्य ! तीच-४

Submitted by रिना वाढई on 21 September, 2019 - 08:18

तिला होस्टेल वर सोडायला तिचे बाबा सोबत गेले होते आणि संध्याकाळ व्हायच्या आत परतले सुद्धा . आता समोरचा प्रवास तिला एकटीलाच करायचा होता . १२ वि च्या निकालामुळे बाबा तिच्यावर थोडे नाराजच होते . "आता निदान समोर तरी अशी चूक नाही करशील म्हणजे झालं" . ते प्रवासात तिला सारखी एकच गोष्ट सांगत होते , आम्ही तुला कितीही शिकवायला तयार असलो तरी , अभ्यास तुलाच करायचा आहे . १० वि पर्यंत मराठी मिडीयम असल्यामुळे तुला हे पॉलीटेकनिक थोडं कठीणच जाणार , आणि १२ वि ला सायन्स जरी घेतली असशील तरी त्यामध्ये काही फारसे चांगले मार्क्स मिळाले नाहीत . ती फक्त निमूटपणे ऐकत होती , कारण १२ वि चा निकाल का चांगला लागला नव्हता हे फक्त तिलाच माहित होते आणि ती बाबाला काही सांगू शकत नव्हती . त्यामुळे त्यांच्या प्रत्येक शब्दाला हो म्हणण्यावाचून पर्याय नव्हताच तिच्याकडे .
आणि शेवटचं वाक्य नेहमी लक्षात राहील असेच बोलले होते तिचे बाबा . "पोरी , आता छातीला माती लावून अभ्यास कर , म्हणजे नक्कीच जमेल तुला सगळं ! "
एक उत्सुकता होती तिच्या मनात होस्टेलवर पोहोचत पर्यंत , मात्र पहिलाच दिवस तिचा अविस्मरणीय ठरला . कॉलेज मध्ये फक्त पहिलाच राउंड झाला होता त्यामुळे खूप कमी मुली होत्या होस्टेलवर . दुसऱ्या आणि तिसऱ्या राउंड चे ऍडमिशन अजून व्हायचे होते . तिला तिच्या खोलीवर सोडून बाबा परतले होते . तस तिला काय हवं ,नको ते विचारून बाबानी सगळं सामान आणलं होत बाजारातून .
चार पाच मुली होत्या सोबतीला , पण सगळ्या आपापल्यामध्ये व्यस्त . कोणी फक्त फोनवर बोलण्यात मग्न, तर कोणी गाणे ऐकण्यात . रात्र झाली ती आपल्या खोलीमध्ये एकटीच मोबाइल विचकत बसली होती , तेवढ्यातच सगळ्या होस्टेलवरची लाईट गेली . ती किंचाळतच बाहेर आली , तिला असं किंचाळताना बघून बाकींच्या मुलींना हसू आवरत नव्हतं . बाई , किती घाबरट आहेस ग तू , सगळ्या मुली व्हरांड्यात जमा होऊन तिला बोलू लागल्या . ती कधी एकटी राहिलेली नव्हती त्यामुळे थोडा घाबरटपणा होता तिच्यामध्ये . घरी दिवे लागायच्या वेळी तर चुकूनही ती एकटी राहत नव्हतीच आणि इथे तर ती एकटीच खोलीमध्ये होती आणि वरून हि लाईट अचानक गेल्यामुळे ती घाबरूनच बाहेर किंचाळत आली होती .
सगळ्या मुलींना खूप आश्चर्य वाटलं होत, एवढी शांत स्वभावाची मुलगी अशी भित्री ... मग थोडी ओळखीपाळखी झाली त्यांच्यासोबत आणि ती त्यातल्या एका मुलीच्या खोलीमध्ये झोपायला गेली . दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेज ला जाऊन आली , आता तिच्या खोलीमध्ये एक मुलगी राहायला आली होती . तिच्याच क्लासमधली होती ती , सगळ्यांपेक्षा खूप वेगळी होती ती .
आतापर्यंत भेटलेल्या सगळ्या मुली तिला थोड्या अल्लडच वाटल्या होत्या , त्यांच्यासोबत राहणे तर तिला कठीणच होते. पण हि मुलगी आल्याने तिच्या जीवात जीव आला होता .
"आज जया येणार आहे क्लास मध्ये , ती हि होस्टेलवरच राहणार आहे तर तिला तू रूममेट्स बनवशिल का "?
क्लास मध्ये गेल्यावर एका मुलासोबत तिची ओळख झाली होती , आणि त्याने लवकरच तिच्यासोबत मैत्री सुद्धा करून घेतली .
आणि थोडं इकडे - तिकडेच विचारून झाल्यावर त्याने तिला, हे जयाबद्दल सांगितलं होत . जया क्लासमध्ये एन्ट्री करताना सगळ्यांची नजर तिच्यावरून हटतच नव्हती . ती हि तिच्याकडेच बघत होती , दिसायला सुंदरच होती ती .
क्लास सुटला आणि सुजित (तो मुलगा ) ने जया आणि तिची ओळख करून दिली . जया आता तिच्यासोबतच होस्टेलवर राहणार होती . आज बऱ्यापैकी मुली होस्टेलवर राहायला आल्या होत्या . सपना तिच्या बाजूच्या च खोलीत राहायला आली होती . आता या तिघींची चांगली ओळख झाली आणि त्या तिघी हि रात्री बसून एकत्र गप्पा मारणे , चिवडा खाणे आणि बरच उपद्रव करणे असं चालू होत .
थोड्याच मुली असल्यामुळे त्या तिघी एकाच खोलीत झोपत होत्या .
रात्री २ वाजता ती उठली , कोणाचा तरी रडण्याचा आवाज येत होता तिला . पाहते तर काय ! जया फोनवर बोलत होती , आणि बोलता बोलता रडतही होती .
"काय गं , एवढ्या रात्री कुणाशी बोलतेस आणि रडत कशासाठी आहेस" , तिने न राहवून विचारलं जयाला .
हा असाच करतो ग , नेहमी भांडत असतो माझ्याशी , मी किती प्रेम करते त्याच्यावर , पण त्याला मात्र माझ्या प्रेमाची जाणीव नाही . अशी म्हणतच जया अजून रडत होती .
तिला मात्र हे सगळं एकदम नवीन भासत होत , असं कोणी रात्रीचे २ वाजता फोनवर बोलतात का ? आणि प्रेम करतात तर मग एवढे रडतात कशाला ? काल रात्रीचा प्रकार ती दुसऱ्या दिवशी सकाळी सपना ला सांगत होती आणि दोघीही हसत होत्या .
अ ग ज्याचे girlfriends, boyfriends असतात ते बोलत असतात रात्र - रात्रभर फोनवर , हे असं चालूच असते ग , तू नको काळजी करू . सपना तिला समजावून सांगत होती .
तिला जया ने सांगितलं होत कि सुजित च तिचा बॉयफ्रेंड आहे .
तिला हे सगळं ऐकून थोडं नवलच वाटलं होत , बापरे एवढे रात्रभर काय बोलतं असतील हे लोक .
आणि त्याची आठवण झाली , कदाचित त्याने आपल्याला होकार दिला असता तर आपण हि त्याच्याशी असेच फोनवर रात्रभर बोललो असतो काय ? कदाचित बोललो असतोच , कारण त्याच्याशी बोलताना वेळ कसा जायचा ते कळतसुद्धा नव्हतेच ना आपल्याला !
होस्टेलवर सगळ्या मुलींना एक ना एक बॉयफ्रेंड होताच , काही मुली तर फक्त timepass म्हणून बॉयफ्रेंड ठेवतात हे तिला तिथे राहूनच कळलं होत .
दिवाळीपर्यंतचे दिवस छान मजेत गेले होते तिचे . अभ्यास करणे , मस्ती करणे , आणि त्यातल्या त्यात त्याची आठवणही . पण तिने त्याच्याबद्दल अजून कोणाला काहीच सांगितलं नव्हतं . बाकीच्या मुली ऐटीत सांगायच्या , माझा boyfriend आहे , तस तिला ते जमणार नव्हतंच आणि तो तिचा boyfriend तर नव्हताच आता . तिने होस्टेलवरून सुद्धा त्याला एक - दोनदा फोन केला होता ,त्याला हे ऐकून बरं वाटलं होत कि ती समोरचा शिक्षण घेत आहे . आणि तो फक्त तिला तिच्या पुढच्या शिक्षणाला शुभेच्छा देऊन फोन ठेवत होता .
-------------------------------------------------------------------------
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये ती घरी आली होती , आपली मुलगी एवढ्या दिवसांनी आली म्हणून घरी नवीन नवीन पक्वान बनत होते . दिवाळी असल्यामुळे सगळे पाहुणे सुद्धा होते घरी . पण ती गावाकडे आली कि त्याची आठवण स्वस्थ बसू देत नव्हती तिला . त्याला एकदा तरी भेटायचं का असं वाटायचं तिला, पण का म्हणून भेटायचं आता असं वाटून ती आपली इच्छा आतल्या आतच दाबून टाकत होती . एकटेपणा काही केल्या जात नव्हताच तिचा , घर गच्च भरून असतानाही मनात मात्र एकलकोंडेपणा होता .

ती दारावर रांगोळी काढत होती , आणि तिच्यासमोरून एक व्यक्ती तिच्या घरात गेला . त्याच्याकडे बघून नाही बघल्यासारखं करून ती आपली रांगोळी काढण्यात मग्न होती .
"अभय , तू केव्हा आलास गावाकडे "? तिचे वडील त्या व्यक्तीला विचारत होते . कालच आलो म्हणत त्याने तिच्याकडे बोट दाखवत विचारलं , हि तुमची मुलगी काय ?
तिच्या बाबानी हो म्हणत तिला आत बोलावलं आणि त्याच्याशी ओळखी करून दिली .
खरंतर ती त्याला ओळखत होती , पण कधी बोलली नव्हती त्याच्याशी. तिच्याच गावात राहणारा तो , ती ज्या ठिकाणी poly करत होती तिथेच poly करून त्याने नोकरी मिळवली होती . हुशार असल्यामुळे कॅम्पस सिलेक्शन झाला होता त्याचा . आणि गाव छोटा असल्यामुळे त्याची सगळीकडे चर्चा हि असायचीच... किती गरीब परिस्थिती होती त्याची तरी तो शिकला आणि आता मोठ्या पदावर नोकरीला लागला . हे सगळं तिला तिच्या घरच्यांकडूनच माहित झालं होत . नोकरी करत असूनदेखील त्याने त्याचा शिक्षण चालूच ठेवला होता . तिलाही अभय च थोडं कौतुक वाटलं होत ,पण तिने तस काही न दाखवताच मौनव्रत धारण करून त्याच्याशी न बोलणेच पसंत केले होते . आईने लवकिचे वडे बनविले होते , आणि तिला ते अभय ला नेऊन द्यायला सांगितले . कामाचा थोडा आळस असल्यामुळे ह्या बाई ने नाक मुरगडतच त्याला ते वडे आणून दिले . तो तिच्याशी बोलू पाहत होता पण हि आपल्याच तालात असल्याने त्याच्याशी धड बोलत नव्हतीच .
अभय ये उद्या म्हणत बाबाने त्याचा निरोप घेतला , तो जाताच ती आईवर बरसली होती ... कशाला ग त्याला वडे बिडे खाऊ घालायला सांगितले मला , एवढंच होत तर तू नेऊन द्यायचीस ना त्याला . मला दुसरे पण काम असतातच ना .
आई तिला समजावू लागली कि एक - दोन काम करायला शिका बाई आता आणि कोणाला फक्त वडे नेऊन देणे हे काही काम नसतेच . पण हे ऐकायला ते नव्हतीच , ती बाहेर येऊन आपली अर्धवट रांगोळी पूर्ण करायला लागली होती . अभय हि घरी गेला नव्हताच , समोर दारात तो अजून दुसऱ्या व्यक्तीशी बोलत होता. त्याचा लक्ष तिच्याकडे गेला आणि तो तिच्याजवळ येऊन , "छान रांगोळी टाकता येते तुला ". ती फक्त थँक्स म्हणत आपल्याच रांगोळीमध्ये गुंग होती . तो मात्र तिला एकसारखा बघत होता . का बरं अशी शांत हि , लहान असताना ओळखायचो आपण हिला तेव्हा तर हि एवढी शांत नव्हती वाटत , किती बदल झाला आहे हिच्यामध्ये .. . मनातच तो बोलत होता
आणि तिच्या मनातला तो एकलकोंडेपणा त्याच्या मनापर्यंत पोहचला होता .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users