लांडग्याने खाल्लेल्या बकऱ्या

Submitted by ravin on 2 September, 2019 - 04:21

लांडग्याने खाल्लेल्या बकऱ्या

नेहमीप्रमाणे रावसाहेब लगबगीत ऑफिसमध्ये शिरले. पाहतात तर काय ऑफिसमध्ये ह्यी माणसांची गर्दी जमलेली. कुणाला अटेस्टेड पाहिजे तर कुणाला अॅफिड्युटवर सह्या. कुणी तलाठी सातबारा देत नाही म्हणणारे तर कोणी दाखले द्या म्हणणारे. प्रत्येक माणसाचे वेगवेगळे काम. सार्‍यांच्या चेहर्‍यावर जणू प्रश्नचिन्हच लटकलेले. ही गर्दी पाहिल्याबरोबर रावसाहेबांना आपल्या जबाबदारीची जाणीव झाली. ते निमूटपणे एखाद्या तालुका दंडाधिकार्‍यासारखे खुर्चीत येऊन बसले आणि सरळ कामाला लागले. साहेबांचा कामात एवढा हातखंडा होता की त्यांनी पाहता पाहता पंधरा-वीस मिनिटात गर्दी कमी केली.अडल्यानडल्यांची कामे मार्गी लावण्याबाबत रावसाहेबांची ख्यातीच होती. रावसाहेब तरूण होते.लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन अधिकारी झाले होते.

रावसाहेबांना मघाचा प्रसंग आठवला. ते शेतरस्ता आडवण्याच्या प्रकरणामध्ये शेलगावला मोक्यावर पाहणीसाठी गेले होते. जख्खड म्हातार्‍या असलेल्या दोन भावांमधील तो रस्त्याचा वाद होता. शेजारच्या शेतकऱ्याचे बयान नोंदविले तर तो म्हणाला " साहेब हे आडमुठेपणाचे येता ठीक आहे ह्या भांडण हाय. यांच्या आरध्या गवर्‍या मसणात गेल्यात तरी हे हयांचं भांडण सुरुच. डांबर रोडनं माझ्या वावरापर्यंत बैल गाडी रस्ता हाय. त्यापुढंनं हयांचा नंबर धुरा जातो. यांच्या पोरासोरांना ह्या भांडण-तंट्यात काही रस नाही.पण हे दोन्ही सख्खे भाऊ कोर्टकचेरीचे नादिष्ट. हे म्हातारे उगाच जत्रा भरवतात. यांचा खरा विषय जमीन वाटणीतल्या नाराजीचा आहे. कधी कधी यातला लाना म्हातारा म्हणतो की माझ्या सहा तिफनी जमीन वरतून येते. मग थोरला म्हातारा याचा रस्ता वरतून नसल्याचे म्हणतो. साहेब यांचे ते नातवंड बघा. कसे खेळीमेळीत बकऱ्या चारीत हाहेत."

रावसाहेबांनी पाहिलं तर खालच्या बाजूला ओढ्याकाठी एका जुनाट देवळाजवळ खरोखरच काही पोरं गोडीगुलाबीत बकऱ्या चारीत होते. रावसाहेबांना आपल्या चार वर्षांच्या मुलाची- सोहमची आठवण आली, दोन दिवसापूर्वी तो रस्त्यावरून जाणाऱ्या बकरीला हात लावून पाहायचा असा हट्ट करीत होता. अल्फाबेट शिकताना तो "जी ग गोट" म्हणायचा आणि बकरीच्या चित्रावरून हलकेच हात फिरवायचा... आज कालचे शहरातले बालपण शेतीसंस्कृतीतल्या या जिवंत अनुभवाला मुकले होते.

डाकवरच्या कावळे बाईंनी मार्किंगसाठी डाकमधील भलामोठा गठ्ठा रावसाहेबांच्या पुढ्यात ठेवला. एकेका पत्रावर मार्किंग सुरू झाली. रावसाहेबांनी बघितलं एक म्हातारी दारात उभी होती. आपल्या भाळावर अतिशय जख्खड दारिद्र्याची लक्तरं नेसलेली म्हातारी. तिच्या हातात एक चुरगाळलेला अर्ज होता. तिला पाहताच रावसाहेबांचे अंतरंग कारुण्याने ओथंबून आले. दुःखाच्या प्राक्तनाचे मूर्तिमंत रूप असलेली ती म्हातारी क्षणभरही त्यांना समोर नको होती. त्यांनी लगेच बेल दाबली आणि ते शिपायाला म्हणाले
" या म्हातारीला संजय गांधी विभागात घेऊन जा आणि तिचे काय काम आहे , ते पहा. मावशी, जा यांच्यासोबत."
म्हातारी लगेच रडवेली होऊन म्हणाली " वो साहेब, माझ्या बकऱ्या तेवढ्या ज्ञानू दुकानदाराकडून परत द्या. "
रावसाहेब गोंधळले. हे काय भलतंच. बकऱ्या कश्या आणि कोणाकडून परत द्यायच्या. असला विषय अद्यापपर्यंत कधी त्यांच्यासमोर आलेला नव्हता. गाय बकऱ्या ही तर खाजगी मालमत्ता असते. हे तर आपल्या अधिकार कक्षेत येणार नाही. असा विचार करीतच ते अधिक माहिती विचारू लागले." कोणाच्या बकऱ्या?"
" माझ्या स्वतःच्या साहेब "
" तुम्ही त्या दुकानदाराला गहाण बिहान दिल्या का ? "
" नाही साहेब. मी ज्ञानू दुकानदाराला तिन बकऱ्या बटाईने दिल्या होत्या. आता तो म्हणतो की तुझ्या काळ्या बकऱ्या लांडग्याने खाल्ल्या. त्यामुळे मी तुला काहीच देणार नाही. आता माझ्याजवळ एकही बकरी नाही साहेब. मी मोठ्या मेहनतीने दुध्यावरुन बकऱ्या घेतल्या होत्या. आता तुम्हीच सांगा मी जगू कशी ? "
" तुला कोणी पोरंसोरं नाहीत का ?"
या प्रश्नावर तर म्हातारी " नशिबाचे भोग " म्हणून अधिकच रडू लागली.
" मावशी शांत व्हा. रडू नका. "
रावसाहेब शिपायाला म्हणाले, " यांना पाणी द्या. "
म्हातारी आसवं गाळीत पुन्हा आर्जवाने म्हणाली, " साहेब तुम्ही काहीही बी करा, पण मला बकऱ्या परत मिळवून द्या. तुम्हाला गरिबाचे आशीर्वाद लागतील साहेब ."
" ज्ञानू दुकानदाराला बकऱ्या बटाईने दिल्या म्हणजे ? दुकानदार कसा बकऱ्या राखण करील ? "
" दुकानदार पैशावाला आहे साहेब. त्याच्याकडे बकऱ्या व जनावरं राखायला माणूस आहे. बकऱ्यांची आरधी पिलं तो घेणार होता. त्यानं तर सार्‍याच बकऱ्या घेतल्या. साहेब मला न्याय द्या हो."
“मावशी, तुम्ही गावात तंटामुक्ती विषय नेला नाही का ?”
“ नेला साहेब , गावात पोलीस पाटील आणि सरपंच सगळ्यांच्या कानावर टाकलं. जो तो म्हणतो की दुकानदार आमच्या भावकितले. तुम्ही तहसिलदाराकडेच जा.”
" ठीक आहे , पाहतो मी काय करायचे ते हा धन्यवाद. या तुम्ही आता. "
म्हातारी आजिजीने हात जोडत म्हनाली " मी पुन्हा केव्हा येऊ साहेब."

रावसाहेबांनी म्हातारीचा कागद उचलला आणि पांडेबाला फोन लावला " पांडेबा, तुम्हाला जरा वेगळं काम सांगतो. तुमच्या तेलारा शिवारातील मंथराबाईच्या बकऱ्या कोणत्या दुकानदाराकडे बटाईने होत्या आणि तो का परत देत नाही याची जरा गावात चौकशी करून परवा सांगा."
" होय सर. उद्या करतो मी चौकशी ." पांडेबा वावगे फोनवरसुद्धा मान डोलावत म्हणाले. पांडेबाला लावलेल्या फोन मुळे म्हातारीच्या चेहर्‍यावर समाधान झळकले. रावसाहेबांना काय वाटले कोणास ठाऊक. त्यांनी आपल्या रीडर शिरसाटला बोलावले." या म्हातारीचे व्यवस्थित बयान नोंदवून घ्या. म्हातारीकडे किती बकऱ्या होत्या? कुठून विकत घेतल्या? बकऱ्यांचा रंग, अंदाजे वय, बटाईने देण्याचा काही कागद केला होता का? कुणी पंच होते का? पिल्लं किती होते? सर्व सविस्तर बयानात घेऊन त्यावर तिचा अंगठा घ्या. तसेच म्हातारीच्या अर्जावर पोलीस पाटलाचा अहवाल मागवून घ्या." मग ती म्हातारी हात जोडत, 'देव पावला साहेब' असे म्हणत निघून गेली.

म्हातारी निघून गेली परंतु तिची व्यथा थोडावेळ रावसाहेबांच्या डोक्याचा भुंगा पोखरत राहिली. त्यांनी म्हातारीचे नाव व गाव डायरीत लिहून ठेवले. पण रावसाहेबांमागे कामाचा व्याप काय थोडा होता! रोजचे शेतरस्त्यांचे वाद, तलाठ्यांनी केलेल्या सातबारा संगणकीकरणाच्या कामाचा आढावा, शेतकऱ्यांचे पिकविमा व पीक कर्जांबाबतचे तक्रार अर्ज, विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय दाखले आणि महसुली न्यायालयाची प्रकरणे या साऱ्या कामांच्या धबडग्यामध्ये रावसाहेब म्हातारीचा बकऱ्यांचा विषय केव्हाच विसरून गेले.

अंधारून आलं तरी रावसाहेब झपाझप चालत होते.
अनोळखी रस्ता खोल खोल खाली दाट झाडीकडे उतरत होता. नेहमीचा ओळखीचा रस्ता सोडून आज या अनोळखी रस्त्याकडे त्यांची पावले कशी वळली कोणास ठाऊक! रस्ता सुनसान आणि भोवती उंच सागाची झाडी. आपल्याला ओळखणारा एखादा गावकरी नक्की येईल पुढून आणि आपल्याला रामराम घालेल असा सुखावणारा विचार या निर्मनुष्य रस्त्यावर रावसाहेबांच्या डोक्यात येत होता. तेवढ्यात पुढुन एक मेंढ्याचा कळप आला. फक्त काळ्यापांढर्‍या मेंढ्या. मागून एक डाव्या खांद्यावर कांबळं आणि उजव्या खांद्यावर लांब काठी घेतलेला मेंढपाळ. सोहम असता सोबत तर किती खुश झाला असता, विचार मनाला चाटून गेला. चालता चालता रस्ता पुढे एका अोढ्याकाठच्या काळ्या पाषाणातल्या हेमाडपंथी मंदिराजवळ जाऊन थांबला. आजूबाजूला वड, आंबा आणि पिंपळ यांचे उंच वाढलेले वृक्ष. मंदिर स्वच्छ झाडलेलं. शिवलिंगा पुढे नंदादीप लावलेला. पण जवळपास कोणीच नाही. मंदिरा पुढच्या ओसरीत बहुतेक पुजाऱ्याची खोली असावी. बाजूला लाकडी पलंग ठेवलेला. त्यावर लाल वस्त्र पसरलेलं. शेजारी एक कोरीव लाकडी खुर्ची. पुर्वी कुठेतरी पाहिलेली. रावसाहेबांनी हात जोडले आणि त्यांनी परतीचा मार्ग धरला. तेवढ्यात मागून खणखणीत आवाज आला.
" मामलेदार, निघालात इतक्यात ?"
रावसाहेब मागे वळून पाहतात तर काय, त्या लाकडी खुर्चीत अंगभर पांढरेशुभ्र धोतर ल्यालेले गोरेपान वृद्ध गृहस्थ बसलेले. डोक्यावर लाल पगडी, भाळावर चंदन तिलक. चेहर्‍यावर आत्मिक तेजाची प्रभा. रावसाहेब जागेवरच थिजले. हे कोण ? हे तर साक्षात देवमामलेदार!
रावसाहेबांच्या नकळतच त्यांचे हात आपोआप दर्शनासाठी जोडले गेले. देव मामलेदारांच्या चेहऱ्यावर स्पष्ट नापसंती दिसत होती.
" काय अजब कारभार आहे ? आमच्यावेळी दुष्काळात शासकीय धान्यकोठार आम्ही जनतेसाठी खुले केले आणि येथे गरीब म्हातारीच्या बकऱ्या चोरी जातात ?. ."
रावसाहेब काही बोलणार तोच शिल्लक फक्त
देवमामलेदारांची कोरीव लाकडी खुर्ची. देव मामलेदार गेले कोठे ?. . . रावसाहेबांचे खाडकन डोळे उघडले, पाहिले तर आभाळ फटफटले होते.

दोन दिवसांनी तलाठी वावगे स्वतःहून हजर झाले. साहेबांना म्हणाले," साहेब, मी त्या म्हातारीच्या बकऱ्यांची चौकशी केली. तिच्याकडे खरेच चार-पाच बकऱ्या होत्या. तिने त्या स्वस्त धान्य दुकानदाराकडे बटाईने वागवायला दिल्या होत्या. हे खरं आहे. दुकानदार म्हणतो की त्या बकऱ्या लांडग्यांनी खाल्ल्या. आता खरे खोटे देव जाणे. पण त्या ज्ञानू दुकानदाराला काही कमी नाही. तो चांगला रगड आहे. आता तुम्ही पहा , काय करायचे ते ? "

खरं पाहिलं तर बकऱ्या खाजगी जंगम मालमत्ता होती. परंतु रावसाहेबांनी जरा चौकटीपलीकडे जायचे ठरवले. त्यांनी आर. एफ अो. साहेबांना फोन करून तेलारा शिवारात वन्य प्राणी हल्ल्याच्या घटना नोंदविल्या आहेत का याबद्दल माहिती मागितली. आर.एफ.अो.साहेबांनी काकडे नावाच्या वनरक्षकासोबत आवश्यक माहिती पाठवून देण्याचे कबूल केले. मग दोन दिवसांनी वनरक्षक काकडे रावसाहेबांकडे आले. त्यांच्या रेकॉर्डवरून मागच्या तीन-चार महिन्यात तेलारा शिवारात लांडग्यांनी चार बकऱ्या मारल्याचे पंचनामे आढळून आले. त्यातील दोन बकऱ्या ज्ञानू दुकानदाराच्या असल्याचे पंचनाम्यात दिसत होते.

याचा अर्थ बकऱ्या तर लांडग्याने मारल्या होत्या. पण कोणाच्या ? म्हातारीच्या की ज्ञानू दुकानदाराच्या ? म्हातारी खरी की दुकानदार खरा ? साहेब विचार करू लागले. ते वनरक्षक काकडेंना म्हणाले, “ तुमच्या जंगलात फिरवा एकदा आम्हाला, दाखवा एखादा लांडगा- बिंडगा.”
काकडे म्हणाले “ नक्की या साहेब. बिबट वगैरे मिळेल पहायला. लांडग्याची मात्र गॅरंटी नाही. लांडगा बिंडगा सापडलेच असं काय सांगता येणार नाही. या दुकानदारासारखे भामटे लोकं मेलेल्या बकऱ्या कुत्र्यांपुढे टाकून लांडग्यांनी तोडल्याचे खऱ्या खोट्या तक्रारी करतात साहेब. वन्य प्राणी हल्ल्याचे पैसे मिळतात आज काल . साहेब, ज्या गरिबांचे जनावरं खरोखर जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात मरतात त्यांना तर नुकसान भरपाईच्या योजनेची माहितीही नसते बऱ्याचदा. ” यावर रावसाहेब काय समजायचे ते समजले.

रावसाहेबांनी आपल्या बाबुला बोलावून सांगितले की
तालुका पशुसंवर्धन अधिकाऱ्याकडून चार महिन्यात तेलारा गावच्या किती बकऱ्यांचे पीएम केले, ती माहिती मागवून घ्या. तसेच त्या ज्ञानू दुकानदाराला म्हातारीच्या अर्जाअनुषंगाने नोटीस काढा.

चार दिवसानंतर रावसाहेबांसमोर तेलार्‍याचे पोलीस पाटील आणि ज्ञानू दुकानदार हजर झाले. दोघे गावातले मोठे अासामी. झकपक कपडे. अंगात सफारी. वागण्यात एक प्रकारचा ताठा. चेहऱ्यावर ठेवणीतले खास हास्य.
“ साहेब नमस्कार, मी पोलीस पाटील तेलारा आणि हे स्वस्त धान्य दुकानदार वायाळ.”
“ काय पाटील, काय चाललंय तुमच्या राज्यात. का छळताय गरिबाला ? ”
“ तसा काही मोठा विषय नाही साहेब.”
“ मग कसा आहे ते सांगा ? ” एव्हाना रावसाहेबांचा रोख दोघांना चांगलाच कळला होता. साहेब पुढे म्हणाले, “दुकानदार, म्हातारीच्या बकऱ्या तुमच्याकडे बटाईने होत्या, हे तर खरं आहे ना ? ”
“ होय साहेब. माझ्याकडे म्हातारीच्या बकऱ्या बटाईने होत्या, हे खरं आहे. पण त्या लांडग्याने खाल्ल्या हे साऱ्या गावाला माहीती आहे. म्हातारी तोंडाळ आहे. चार लोक तिला काहीबाही सांगतात. म्हणून म्हातारीने अर्ज केला. पण म्हातारीच्या बकऱ्या लांडग्यांने खाल्ल्या हेच खरं आहे.”
“ ठीक आहे मग. तसं तुम्ही माझ्या समक्ष लेखी बयानात प्रतिज्ञेवर सांगा. ” रावसाहेब म्हणाले. आता दुकानदार पोलिस पाटलाच्या तोंडाकडे पाहू लागले.
“ साहेब , कागदावर कशाला घेता ? ” पोलीस पाटील म्हणाले.
“ तुमचं खरं आहे ना ? मग घाबरता कशाला ? ” रावसाहेबांच्या बाबुलाही आता स्फुरण चढले होते. ते म्हणाले, “ बकऱ्या म्हातारीच्या मेल्या. आणि वन विभागाच्या पंचनाम्यात मालक दुकानदार. ढोर डॉक्टरच्या पीएम मध्येही मालक हेच. असं कसं ? ही तर 420 ची केस आहे.”
केबिन बाहेर इतर कामासाठी खोळंबलेल्या बऱ्याच गर्दीचा अंदाज घेऊन आता पोलीसपाटील मध्ये पडले. “ काय दुकानदार शोभतं का तुम्हाला ? दोन-तीन बकऱ्या का तुम्हाला जन्माला पुरणार हायेत? उगा इज्जत घालवता. साहेब म्हातारीच्या बकऱ्या आजच म्हातारीला पोचवतो. चला दुकानदार. येतो साहेब. क्षमा करा आपल्याला त्रास झाला.”
ज्ञानू दुकानदार पार खजील होवून त्याने गुपचूप काढता पाय घेतला. त्याचा मघाचा ताठ चेहरा आता चांगलाच काळवंडला होता.
रावसाहेबांनी क्षणभर खिडकीबाहेर पाहिलं. नुकतीच पावसाची सर येऊन गेली होती. आत्मिक समाधानाचा गंध सुटला होता. मामलेदारांनी म्हातारीच्या लांडग्यांनी खाल्लेल्या बकऱ्या पुन्हा जिवंत केल्या होत्या.

डॉ. रवींद्र कानडजे
59, संवाद , सरस्वती नगर, बुलढाणा
मो 7350688852

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान रंगवली आहे कथा. मला तर ही गोष्ट नाशिक जिल्ह्यातील कळवण सुरगाणा तालुक्यातील वाटली. माझे मित्र व्हेटर्नरी डॉक्टर होते. चांगले गोल्ड मेडल मिळालेले. पण सरकारी नोकरीत लोक त्यांना शिव्या देत रात्रीचे सुध्दा व्हिजिटला घेऊन जात. आजच्या काळात जनतेचा विचार करणारा तहसीलदार भिंग घेऊन शोधावा लागेल.

छान.

Pages