युगांतर - आरंभ अंताचा! भाग ३२

Submitted by मी मधुरा on 16 August, 2019 - 04:15

भाग ३२

"काय झाले गुरु द्रोण?"
"कृपाचार्य, तुम्ही?"
"इतक्या रात्री तुम्ही जागे का ?"
काय उत्तर द्यावं हे न सुचल्याने द्रोणाचार्यांनीच प्रतिप्रश्न केला, "तुम्ही या प्रहराला इथे?"
"एक निर्णय घेतला गेलाय आज राज्यसभेत.... त्यामुळे जरा अस्वस्थ आहे."
"कसला निर्णय?"
"ते होणारा महाराज ठरवणार आहेत येत्या सप्ताहामध्ये."
"त्यात अस्वस्थ होण्यासारखे काय आहे, कृपाचार्य? ही तर आनंदाची बाब आहे."
"ते सर्वांचे युद्धकौशल्यावर मापन करणार आहेत गुरुवर!"
"ह्मम. मग कोण निवडला जाण्याची भिती वाटते आपणास?"
"आपल्या पासून काहीच लपून नाही. नव्याने नाव घेणार नाही मी आचार्य, पण मनात द्वेष आणि राग असलेला राजकुमार राजा बनायला नको असे वाटते मला."
द्रोणाचार्य हसले.
"दुर्योधन योग्य आहे पण. त्याच्यात भरपूर ताकद आहे."
"आणि मित्र जमवण्याची कला पण!" नजर रोखत कृपाचार्य म्हणाले.
"काय म्हणायचे आहे तुम्हाला कृपाचार्य?"
"अश्वत्थामा आणि अर्जुन जरी एकत्र धनुर्विद्या शिकत असले, तरी अश्वत्थामा मित्र मात्र दुर्योधनचा आहे, हे माहित आहे सर्वांना."
"स्पष्ट बोला, कृपाचार्य."
"द्रोणाचार्य, आम्ही तुमचा तुमच्या पुत्राबद्दलचा स्नेह जाणतो. पण गुरु पुत्राचा घनिष्ट मित्र आहे, म्हणून दुर्योधन योग्य बनत नाही राज्य चालवायला."
द्रोणाचार्यांच्या चेहऱ्यावर स्मित आले.
"चिंता नसावी, कृपाचार्य. दुर्योधन योग्य आहे असे जरी मला वाटत असले तरी बाकीचे नाहीत, असे म्हणालो नाही मी. दुर्योधना पुढे असलेले प्रतिस्पर्धी अलौकिक आहेत. जर सामर्थ्यबलाची परीक्षा असेल तर भीमच्या गदेपुढे दुर्योधनाचा निभाव लागू शकेल असे मला वाटत नाही. आणि संपूर्ण जगात अर्जुनास हरवेल असा योद्धाही आता नाही."
"आता नाही? म्हणजे आधी होता?"
द्रोणाचार्य चमकले. नंतर मुद्रा शांत करत म्हणाले,
"कृपाचार्य, मी एक श्वान पाहिला. कैक वर्षांपूर्वी. पण आठवण अजूनही आहे. मुखात बाण होते त्याच्या. पण रक्ताचा एक थेंबही बाहेर आलेला नव्हता."
"बाण मुखात? असेही कोणी करू शकतो?"
"हो कृपाचार्य.....एका धनुर्धाऱ्याने केले असे."
"पण का?"
"साधनेत व्यत्यय आला श्वानाच्या आवाजाने म्हणून!"
"काय ही क्रूरता, गुरुवर!"
'क्रूरता....' त्यांच्या मनात तो शब्द घोळला. धनुर्विद्येच कौशल्य बघताना त्यांनी श्वानाच्या वेदनांकडे नकळत दुर्लक्ष केल्याच त्यांच्या आत्ताच ध्यानी आलं होतं.
"कोण होता तो धनुर्धारी, गुरुवर?"
"तोच.....उत्तम धनुर्धारी! जो कदाचित अर्जुनाहूनही...."
"द्रोणाचार्य, अर्जुनापेक्षा उत्तम?? तुमच्या शिष्यापेक्षा उत्तम? कोण?"
"एकलव्य माझाच शिष्य आहे कृपाचार्य!"
"काय? ते कसे शक्य आहे?"
"कारण तो गुरु मानतो मला."
"तुमची अनुमती नसताना?" द्रोणाचार्य शांत राहिले. "द्रोणाचार्य, तुम्ही त्याला दंड द्यायला हवा होता."
"दिला असचं समजा कृपाचार्य.... "
"काय दिलात?"
"त्याला धनुर्विद्या वापरता येऊ नये असा दंड..... त्याचा उजव्या हाताचा अंगठा मागून घेतला मी कृपाचार्य! " अपराधी असल्या सारखे द्रोणाचार्य म्हणाले.
"योग्यच केलंत."
"कृपाचार्य?" द्रोणाचार्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याची छटा पसरली. "तो स्वअध्यापनावर सर्वोत्तम बनला होता. त्याला धनुष्य उचलायला मी शिकवले नाही. बाण निवडायला आणि प्रत्यंचा ताणायलाही नाही. तरीही गुरुदक्षिणा मागणे योग्य? कसे, कृपाचार्य? कसे?"
"जर साधनेत व्यत्यय आला म्हणून त्या श्वानाला घायाळ केले तर मोठेपणी तो कोणाचीच तमा बाळगणार नाही, गुरुवर. तुम्ही आत्मक्लेषात का आहात, मी समजू शकतो. पण तुमच्या त्या सर्वोत्कृष्ट धनुर्धाऱ्याने श्वानाला दिलेल्या वेदनांपुढे तुम्ही दिलेला दंड काहीच नाही. द्रोणाचार्य, त्या श्वानाला मुखात लागलेल्या बाणांमुळे वेदना होत राहतीलच, परंतु तो ना काही खाऊ शकेल, ना पाणी पिण्या योग्य त्याला धनुर्धाऱ्याने सोडले. बाणांचा आघात होऊनही रक्तस्त्राव बाहेर झाला नाही पण आत झाला नसेल? वेदना झाल्या नसतील? होणाऱ्या यातना सहन करायला जिवंत ठेवलेल्या त्या श्वानाच्या मुकपणाची ही चेष्टा आहे. ही क्रूरता नाही तर दुसरे काय आहे द्रोणाचार्य? तो अर्जुनाहून अधिक उत्तम धनुर्धारी असेलही..... एक सर्वोत्कृष्ट शिष्यही असेल.... पण योद्धा? नाही गुरुवर! ज्याला भूतदया नाही, ज्याच्या शस्त्रावर दयेचे, करुणेचे बंधन नाही, तो सर्वोत्कृष्ट योद्धा असूच शकत नाही."
कृपाचार्यांचा शब्द न शब्द खरा होता. विनय, विवेक, उदात्त हेतू आणि भूतदया नसेल तर मिळालेले ज्ञान सर्वनाश करते. द्रोणाचार्यांना मोकळे झाल्यासारखे वाटले. मनावरचा भार हलका झाला होता. त्यांना जाणवत होते..... त्यांनी जे केले ते केवळ हस्तिनापुर, त्यांचा शब्द राखण्यासाठी नव्हते... तर ते आवश्यक होते....भविष्यातल्या विनाशाला टाळण्याकरता!
"द्रोणाचार्य, मी निघतो. आज्ञा असावी."
------------
ऱाजपटांगण सजले होते. शस्त्रांचे सर्वोत्तम नमुने ठेवलेले होते. नगरवासीयांनी तुंबळ गर्दी केली होती. हस्तिनापुरचे भविष्य ठरणार होते. राजपरिवार आसनस्थ झाला होता.
"महाराज, भीष्माचार्य, कृपाचार्य, महामंत्री विदूर आणि द्रोणाचार्य यांच्या उपस्थितीत आज कौशल्यदर्शन सुरु करण्यात येत आहे."
"यात सर्वोत्तम योद्धा निवडला जाणार आहे. प्रत्येकाने आवडते शस्त्र निवडून हातात घ्या."
सगळ्यांनी आपापल्या वेधवून घेणाऱ्या शस्त्रांची निवड केली. अर्जुनाने दूरवरचे लक्षही भेदू शकेल अश्या धनुष्यबाणाची निवड केली. युधिष्ठिराने त्याच्याच सारख्या सरळ एकरेषीय भाला घेतला. दुर्योधन आणि भीमने स्वतःसारखी भक्कम गदा निवडली.
द्वंद्वयुद्धासाठी नावे पुकारली जाऊ लागली. प्रत्येक वीर साऱ्या शक्तीनिशी जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न करू लागला. जमलेली मंडळी आवडत्या वीराचे नाव घेत विजय घोषणा देत होते.
जिंकलेल्या योद्ध्यांचे एकमेकांशी द्वंद्व सुरु झाले.
भीम आणि दुर्योधन एकमेकांपुढे उभे ठाकले. दुर्योधन अगदी आरामात आपण भीमाला हरवू अश्या विश्वासाने समोर आला. कक्षातल्या एका पुतळ्याला भीम समजून त्यावर नियमित गदेचा सराव करणारा दुर्योधन ! त्या पुतळ्यावर गदा प्रहार करून त्याने पुतळ्याचा चेंदामेंदा करून टाकला होता.
भीमाने गदा उचलली आणि थेट दुर्योधनावर फेकली. त्या अनपेक्षित वाराने तो पडता पडता वाचला. बुचकळ्यात पडून त्याने भीम कडे पाहिले. पुतळा निर्जीव होता... प्रतिकार करत नव्हता. पण भीम सचेतन होता आणि ताकदवर पण. जमेल तसा वार करत आणि हरू नये याची काळजी घेत दुर्योधन भीमाचे प्रहार चुकवत होता. ऱागारागाने तो भीमला गदेने मारण्याचा प्रयत्न करत होता. भीम सहजपणे त्याचे प्रत्युत्तर देत होता.
"हे कौशल्य दर्शन नाही. काही वेगळेच सुरु आहे.....महाराज, थांबवा हे!" शकुनीने धृतराष्ट्राच्या कानात कुजबुज केली.
"गुरु द्रोणाचार्य, थांबवा हे द्वंद्व."
द्रोणाचार्यांनी अश्वत्थामाला सांगून दोघांना बाजूला केले.
आणि अर्जुननाने धनुष्य उचलले. युधिष्ठिराच्या हातातला भाला त्याने पहिल्याच बाणाने पाडून त्याला पराजित केले. एकामागून एक बाण सोडत त्याने कधी दुर्योधनाभोवती बाणांची भिंत बांधली, कधी भीमाचा मार्ग बाणांनी व्यापून टाकला. सगळ्यांनी हार मान्य केली. अर्जुनही नम्रपणे सर्वांना नमन करत होता.
"पहा गुरुद्रोण! समोरच्या व्यक्तीला किंचितही जखम न करता पराजित करण्याची कला!" कृपाचार्य आनंदाने म्हणाले.
"पण युद्धात ही कला काय कामाची? तिथे नरसंहार करावा लागतो." शकुनी चिडून म्हणाला.
"गांधार नरेश शकुनी, युद्धात शत्रू समाप्त करावे लागतात, पण योद्ध्याचा हेतू विजय मिळवणे असावा. कोणाला हानी व्हावी हा नाही. जर एखादा शत्रू शरणागती पत्करत असेल तर त्याचा वध करणे धर्मसंगत नाही."
पुढच्या हरेक द्वंद्वातही अर्जुनाने बाणांचे पथ बांधत विजयश्री चे स्वागत केले.
द्रोणाचार्य, कृपाचार्य, कुंती आणि भीष्माचार्य अर्जुनाकडे अभिमानाने, कौतुकाने पाहत होते.
"हे योग्य नाही महाराज. ज्याच्या हातात गदा आहे, त्याला धनुर्धारीशी द्वंद्व करायला लावून पराजित मानणे कोणत्या नियमाला अनुसरून आहे?"
धृतराष्ट्र निकाल ऐकून अस्वस्थ झाला होता. पण काही पर्याय नव्हता. "शकुनी, पण अर्जुनासमोर कोण धनुर्धारी टिकेल? आणि भीम सोबतच्या युद्धात काय झाले हे पाहिले आपण."
द्रोणाचार्यांनी आनंदाने घोषणा केली, "अर्जुन हा सर्वोत्कृष्ट धनुर्धर आहे."
"नाही द्रोणाचार्य. अजून एक द्वंद्व बाकी आहे....." एक कणखर आवाज गर्दीतून ऐकू आला आणि सगळ्यांचे लक्ष त्या आवाजाच्या दिशेने गेले.

©मधुरा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अक्कु? काय लिहिले होतेस जे संपादित करून एक पूर्णविराम टाकलास? आणि का ? जी प्रतिक्रिया असेल ती लिही. टिका असेल तरीही. चालेल मला. Happy

हो Happy

जर साधनेत व्यत्यय आला म्हणून त्या श्वानाला घायाळ केले तर मोठेपणी तो कोणाचीच तमा बाळगणार नाही, गुरुवर.>>> माझ्या माहितीनुसार हे पाहूनच द्रोणाचार्यांनी अंगठा मागितला होता.

द्रोणाचार्य राजपुत्रांसोबत जंगलात जात असताना कुत्रेही त्यांच्याबरोबर होते. ते पुढे जाऊन एकलव्य साधना करीत होता तेथे जाऊन भुंकू लागले. तेव्हा साधनेत व्यत्यय आल्याने एकलव्याने बाणांनी केवळ त्याचे तोंड बंद केले. इजा करायची असती तर बाण मारुन मारुन टाकले असते. तसे बाणांनी भरलेले तोंड घेऊन ते परत द्रोणाचार्य व मंडळींकडे परत आले.

कृपाचार्याचं बोलणं म्हणजे अंगठा कापुन दक्षिणा मागुन त्याचं कौशल्य नष्ट केल्याचं जस्टीफिकेशन आहे फक्त.

मीनाक्षी,
पद्य,
अमर,
सस्मित
धन्यवाद!
Happy

पद्य, अमर, एका चित्रात तर कृष्ण ही त्यावेळी तिथे होता असे चित्तारले आहे.

Screenshot_20190816_163412.JPG

चित्र छान आहे. द्वापार युगापर्यंत माणसे वचन पाळण्यासाठी जिवाची बाजी लावत होती. कलियुगात फार थोडे असतील एकलव्यासारखे वीर सर्वस्वावर पाणी सोडणारे. रामायणापेक्षा महाभारत जास्त मनात भिनते असे मला वाटते.

हो, मीनाक्षी. Happy

हो, सस्मित.

@akku, तू प्रतिसाद संपादन करून पूर्णविराम नको देऊस. वाचायला राहू दे आमच्या करता. Lol

अमर, खरंतरं एकलव्याने गुरुदक्षिणा दिली नसती तर द्रोणाचार्यांनी त्याला शापही दिला असता. Ekalavya was in a situation of 'इकडे आड तिकडे विहीर!'
हे.मा.वै.म.

विचार केला असता जाणवतं की सगळी पात्रं चांगल्या वाईट गोष्टींनी भरलेली होती अगदी सामान्य माणसांसारखी. अगदी कृष्ण सुद्धा.
म्हणुन तर ह्या नंतर कलियुगाची सुरुवात झाली.

Ekalavya was in a situation of 'इकडे आड तिकडे विहीर
>> हे पटलं नाही. मिळालेली धनुर्विद्या केवळ गुरुकृपेने प्राप्त झाली व हे द्रोणाचार्यांची पूजा करून सांगणारा एकलव्य निष्कपट, सत्यनिष्ठ निरागस वनवासी मनुष्य होता. नागरी लोकांचे छक्के पंजे तो जाणत नव्हता हेमावैम‌

अमर, तुमचा गैरसमज होतोय..... एकलव्याबद्दल मी जे बोलले ते माझे मत होते. एकलव्याने दिलेली गुरुदक्षिणा निष्कपटच होती. त्याला काही माहिती नव्हते. पण जर त्याने घाबरून नकार दिला असता तर द्रोणाचार्यांने काय केले असते, ते सांगितले मी. म्हणजे नियतीने त्याच्या साठी जी परिस्थिती निर्माण केली होती, त्यातून त्याची सुटका होणार नव्हतीच.

विचार केला असता जाणवतं की सगळी पात्रं चांगल्या वाईट गोष्टींनी भरलेली होती अगदी सामान्य माणसांसारखी. अगदी कृष्ण सुद्धा.>>>>कृष्णाने काय चूका केल्या??? बाकी मताशी सहमत आहे. पण कृष्ण???

मधुरा
तुझ्या आतापर्यंतच्या कथेचे सर्व भाग वाचल्यानंतर मला असे वाटते की महाभारताबद्दल तुझा खूप सखोल व गाढा अभ्यास आहे.

तूझ्या कथा वाचताना मी महाभारत चा Real अनुभव घेत आहे असा Feel येतो .

अप्रतिम लिहितेय .
लिहीत रहा

तुझ्या कथेच्या पुढील भाग ची
प्रतीक्षा

मनापासून धन्यवाद अशोक!
खूप छान वाटले तुमची प्रतिक्रिया वाचून. मनापासून धन्यवाद!! Happy Happy

एकदा श्रीकृष्णाने त्याच्या समोरच्या दोन टेकडयांचे रूपांतर सोन्याच्या टेकडयांमध्ये केले आणि अर्जुनाला म्हणाला...
हे सगळे सोने गावकरयांमध्ये वाटून टाक पण
अट एकच, एकूण एक सोने तू दान केले पाहिजेस.
लगेच अर्जून जवळच्या गावात गेला आणि तिथे त्याने जाहीर केले की मी प्रत्येक गावकरयांला सोने दान करणार आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने टेकडीपाशी यावे.
लोक अर्जूनाच्या मागे टेकडीच्या दिशेने चालू लागले.
पुढे अर्जुन छाती काढून चालत होता.
मागे गावकरी त्याचा जयजयकार करत होते.

दिवस रात्र काम चालू होते.
अर्जून खोदत होता आणि सोने काढून लोकांना देत होता.
पण टेकडी थोडीदेखील संपली नव्हती.
लोक सोने घेऊन घरी जायचे आणि परत येऊन रांगेत उभे राहायचे.
आता अर्जून अगदी दमून गेला होता!
शेवटी त्याने कृष्णाला सांगितले की बास....!
आता यापुढे मी काम करू शकत नाही.

मग कृष्णाने कर्णाला बोलावले आणि सांगितले की.......
या दोन सोन्याच्या टेकडया आहेत त्या तू लोकांना दान करून टाकायच्या...
लगेच कर्णाने पंचक्रोशीतील गावकरयांना बोलवले आणि सांगितले,
या दोन सोन्याच्या टेकडया तुमच्या आहेत.
एवढे सांगून कर्ण तिथून निघून गेला.
लोक सोने वाहून नेऊ लागले. अर्जून चकित होऊन पाहात बसला. हा विचार आपल्या मनात का आला नाही? तो भयंकर अस्वस्थ झाला.
कृष्ण मिश्कीलपणे हसला आणि म्हणाला...

अनावधानाने का होईना तू सोन्याकडे आकर्षित झालास.....
तू गर्वाने प्रत्येक गावक-याला सोने वाटू लागलास.
जणू काही आपण उपकार करतो आहोत अशा थाटात तू दान करत होतास..!
कर्णाच्या मनात असले काहीही नव्हते.
त्याने दान केले आणि तो निघूनही गेला.

कृष्णाने काय चूका केल्या???

अर्थातच याला चुका म्हणता येत नाहीत पण...

महाभारतातील युद्ध त्याला टाळता आले असते पण धर्मस्थापनेसाठी युद्ध गरजेचे आहे असे म्हणून त्याने ते करणे टाळले.......
महाभारताच्या युद्धामध्ये गुरु द्रोणाचार्यांना मारण्यासाठी छल करणे आवश्यक आहे हे कृष्णानेच युधिष्ठिराला पटवून दिले होते.....
युद्ध संपल्यानंतर घटोत्कच पुत्र बार्बरिक ( मी चुकत नसेल तर ) बरोबरच्या संभाषणामध्ये पांडव त्यांचे शौर्य सांगत असताना बार्बरिक त्यांना थांबवून त्यांनी केलेल्या प्रत्येक वधा मागे अप्रत्यक्षरीत्या कृष्णाचे सुदर्शन चक्र असल्याचे सांगतो.....
तसेच महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुनाच्या रथाला जास्त नुकसान पोहोचू नये म्हणून त्याच्या रथावर कृष्ण हनुमानाला विराजमान होण्यास सांगतो......
मग मला तरी असे वाटते की महाभारताचे युद्ध पांडवांना त्यांच्या स्वबळावर कृष्णाने लढू द्यायला हवे होते......
हे. मा. वै. म.
( वरील प्रसंग अर्थातच मी रामानंद सागर च्या श्रीकृष्ण मालिकेत पाहिले आहेत म्हणून सांगितले.....
बाकी माहितीचा कुठलाही सोर्स नाही )

Pages