प्रसाद आणि वीणा हताश होऊन बसलेले इतकी सगळी तयारी झालेली पत्रिका पण वाटल्या, नातेवाईकांसाठी रुम्स बुक केल्या. लग्न अगदी आठ दिवसांवर आलेलं आणि आता सर्वांना फोन करून सांगायचं येऊ नका. म्हणून लग्न मोडलेय म्हणून! एका सर्वसामान्य कुटुंबाला हा धक्का पचवणं कठीणच होतं. हाच निर्णय घेणे आवश्यक होते पण तरीही मनावर मणभर वजन ठेवल्यासारखं वाटतंय हेच खरं!
तनिष्का एमबीए करून व्यवस्थित सेटल झाली तेव्हा कुठल्याशा वेबसाईटवरच लग्नासाठी नाव नोंदणी केली रितसर! कित्येक महिने मग पटलेली स्थळं शॉर्टलिस्ट करायची आणि त्यावर सल्लामसलत करायची, असा त्या कुटुंबाचा कार्यक्रमच झालेला. एकुलती एक मुलगी शक्यतो गावातच दिली तर बरं हाही विचार होताच. त्यामुळे त्या दृष्टीने नावं काढली जात होती.
"हा बघ, हा बरा वाटतोय का?" वीणा म्हणाली.
"नको का बाई, कित्ती उंच आहे हा? मान मोडून जाईल वरती बघून बघून त्याच्याकडे!"
" चल काहीतरी बोलू नको"
"बर हा बघ, "
"हं बरा आहे ग पण नोकरी खूप छान नाही वाटत!"
"हे बघ, हा तर वाटतोय ना बरा ? तुझ्या तोलामोलाची नोकरी पण आहे नी दिसायला पण बरा आहे म्हणजे , तुझ्या आधी क्रायटेरियात बसणारा आहे."
" ए थट्टा कसली करतेस ग ममा, आयुष्याचा जोडीदार निवडायचा म्हणजे थोडी चूझी असायला हव ना?"
"मी कुठे काय म्हणते ?जरा आपली तुझी मस्करी!" दोघी मजेत चर्चा करत होत्या.
अशी दोन-चार स्थळें शेवटी फायनल केली दोघींनी बसून आणि ती प्रसादला दाखवली. त्यातलंच एक हे स्थळ! मुलगा चांगला शिकलेला, नोकरी पण चांगल्या ठिकाणी होती. कौटुंबिक पार्श्वभूमीही उत्तम, वडील कोणत्या तरी खासगी कंपनीत उच्च पदावर होते नोकरीला. आई गृहिणी होती. सगळं कसं चौकटीत बसणारं. छोटं कुटुंब मुलाला एक लग्न झालेली मोठी बहीण होती, तीही अमेरिकेत त्यामुळे या स्थळाचा विचार अगदी मनात पक्का झाला. म्हणजे यांच्या बाजूने होकार होता आता त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या वेळेनुसार भेटण्याचा कार्यक्रम ठेवायचा होता. त्यांनाही पसंत पडलं तरच पुढची बोलणी!
मग प्रसादने त्यांच्याशी फोनवर बोलून त्यांची वेळ घेतली. भेटी चा कार्यक्रम ठरला त्यांच्याच घरी, त्याप्रमाणे हे तिघे त्यांच्या घरी आले. घरही छान होते त्यांचं. छान मोठ्ठा हॉल, त्याला लागून असलेली बाल्कनी. डाईनिंग, छानसं सुसज्य स्वयंपाकघर. आणि ३ बेडरूम्स. अगदी छान होते .
थोडावेळ ओळखी वगैरे झाल्यावर तनिष्का आणि तो मुलगा, संकेत दोघं फिरायला जाऊन आले. तास दोन तासाने परतले, दोघेही खुशीत होते. त्यांना दोघांना खुशीत बघून याहि सर्वांच्या डोक्यावरचं ओझं उतरलं. हो असे बघण्याचे ४-२ कार्यक्रम झालेले दोघांचेही. पण हात रिकामेच होते . शेवटी आता ही दोघं एकमेकांना पसंत आहेत म्हटल्यावर सगळेच अगदी रेलॅक्स झाले.
दोन्हीकडचा होकार असल्यामुळे रीतसर सारे सोपस्कार घर पाहणं वगैरे झाले थोड्या दिवसांनी लग्नाची तारीख ठरवली, अर्थात त्यासाठी आधी मंगल कार्यालयं पालथी घातली. कारण आजकाल लग्न त्यांच्या सोयीनुसार करावी लागतात ना! लग्न पहावं करून म्हणतात ते काही उगीच नाही. एक समस्या सोडवली पसंतीची , कि दुसरी कार्यालय पाहण्याची, ते दोन्ही बाजूंना पडण्याची! तारखा, खरेदी, आमंत्रणं ! तशी तारीख ६-७महिन्यानंतरची निघाली कार्यालयाच्या उपलब्धतेनुसार!
" हेही एक बरंच झालं, कारण तेवढाच वेळ या मुलांनाही मिळेल एकमेकांना ओळखण्याचा, काय बरोबर ना?" संकेतचे बाबा म्हणाले.
"आधीच जरा स्वभावाची ओळख झालेली बरी दोघांना एकमेकांच्या, उगाच त्रास नको नंतर हे खरच!" प्रसादने त्यांचीच री ओढली.
"आणि हो आपल्यालाही सवड मिळेल तयारीला थोडी" इती वीणा .
"अहो नातेवाईकांना सुट्ट्यांसाठी आताच सांगून ठेवायला हवं, आणि लेकीला तर पहिल्यांदा, अमेरिकेतून येणार ती, त्यामुळे तिला व्यवस्थित प्लॅनिंग करता येईल. "संकेताची आई म्हणाली.
"सगळं अगदी छान आहे हो, माणसं घर, मुलगा!" वीणा दिपालीला म्हणजे प्रसादच्या वहिनीला सांगत होती. तसच आईलाही सांगितलं तिने सविस्तर. सगळे अगदी आनंदात होते. विशेषतः वीणाची आई! नातीच लग्न म्हणून!
सहा महिने कसे भराभर गेले. लग्नाची वेळ जवळ येऊन ठेपली संकेत आणि तनिष्का एकमेकाला विकएन्डला भेटत होते. व्हॉट्सऍप वर रोज व्हिडिओ कॉलहि होत होता. कधी कॉफी, कधी डिनर असं शनिवार रविवार चालू असायचं. कारण इतर दिवशी फारसा वेळच मिळायचा नाही दोघांना! एका शहरात राहत असले तरी खूप लांब राहायचे आणि कामाच्या ठिकाणी यायला जायला खूप वेळही लागायचा. तसं टाईट शेड्यूल होतं दोघांचं.
"आज भेटतेस का?" संकेतने सक्काळी सक्काळीच फोन करून तनिष्काला विचारलं,"आज रात्री मस्त डिनरला जाऊ तिथूनच पिक्चर टाकू, नवा लागलाय दीपिकाचा!"
"आज? आज नको रे, ऐक ना, मला आज ना करणच्या वाढदिवसाला जायचंय. सगळी गॅंग येणार आहे तिथे. धमाल करायची आहे." तनिष्का म्हणाली.
"कोण हा करण?"
"अरे कॉलेजात होता माझ्या, मागच्याच आठवड्यात आलाय यूएसवरून तीन वर्षांनी! त्याचा वाढदिवस साजरा करणारे आम्ही सगळे."
"त्याचा वाढदिवस महत्त्वाचा आणि मी नाही का?"
"असं उगाच काहीतरी बोलू नकोस हा, चल निघते मी आता, ऑफिसातून डायरेक्ट जायचंय, त्यामुळे तयारी करायचीय मला.चल बाय, उद्या करते फोन." म्हणून तीने फोन ठेवला.
असाच एकदा अचानक संकेत संध्याकाळी ऑफिसात आला. तर ही एका कलीगबरोबर तिथंच गप्पा मारत होती काहीतरी.
"अरे आत्ता इथे कसा?"
"का येऊ नये का?"
"नाही, तसं नाही रे, एकदम इथे पहिले तुला म्हणून विचारलं. बाय द वे, हा निरंजन, माझा कलीग आणि हा संकेत माझा होणारा नवरा!"
संकेत निरंजनचं निरीक्षण करत होता ते पाहून तनिष्कालाच कसंतरी झालं. तिने पटकन तिकडून निघण्याचा निर्णय घेतला. "चाल बाय निरंजन,"
निरंजन संकेतपेक्षा दिसायला नक्कीच उजवा होता. हँडसम! सावळा असला तरी फीचर्स एकदम शार्प होते त्याचे त्यामुळे एकदम रुबाबदार दिसायचा.
"काय पाहत होतास त्याच्याकडे एवढा? बापरे त्याच्या लक्षात आलं नाही म्हणून बरं!"
"खास आहे का तो?"
" ए चिल्ल! अरे लग्न झालेय त्याचं, आणि बायको पण सुंदर आहे त्याची." एवढं बोलून ती निघाली त्याच्याबरोबर.
खरं तर तिच्यासाठी फ्रेंड्स, कलिग्स हे सारे लिंगभेदाच्या पलीकडे होते. अशाच वातावरणात लहानपणापासून ती वाढलेली. त्यामुळे मित्र किंवा मैत्रिणी काय दोन्ही सारखेच होते तिला. त्यामुळे व्यक्तिमत्वात एक मोकळेपणा येतो आणि मुख्य म्हणजे मतं उदार होतात. जास्त फुलतं व्यक्तिमत्व असं तिच्या ममा आणि बाबाचं मत होतं, त्यामुळे स्त्री, पुरुष, जात, धर्म, भाषा अशा संकुचित भिंती कधी घालून घेतल्या नाहीत तिच्याभोवती. अतिशय स्वच्छ निर्मळ अशी नाती तिला त्यामुळे जपता येत होती. संकेतच्या विचित्र प्रश्नाने तीच्या मनात एक बारीकशी कळ उठली.
असंच एकदा ते दोघं डिनरला गेलेले असताना कुणाचा तरी फोन आला.
"अरे तू काळजी करू नकोस, होईल सगळं ठीक. जास्त विचार करू नको. येते उद्या तुला भेटायला., मग बोलू सविस्तर आणि हो काळजी घे स्वतःची. कधीही रात्री वाटलं तर फोन कर. चल झोप आता"
"कोण होता?"
"अरे फिरोज! त्याच्या जॉबचा प्रॉब्लेम झालाय आणि त्याच्या बहिणीचं लग्न आहे पुढच्या महिन्यात. त्यामुळं खूप टेन्शन आलंय त्याला ."
"पण मग तू काय करणार आहेस? आणि कोणत्याही वेळी फोन करेल का तो तुला ?" संकेत विचारत होता. त्याचे ते तसं विचारणं तिला खटकलं. वाटलं लग्नानंतरही हा असाच राहिला तर? पझेसिव्ह असेल तर समजून घेता येईलही पण संशय घेणार असेल तर? बापरे तिच्या अंगावर सर्र्कन काटाच आला.
ती थोडी सावध झाली. लग्नाला अजून महिना होता कपडे, दागिने खरेदी, इ. झालेली पत्रिकापण छापून आलेल्या. बाहेरच्या गावच्या पाठवूनही झालेल्या. त्यामुळे तिला जरा टेन्शन आलेलं. निवड चुकली तर नाही ना आपली?
आताशी मम्माशी पण संकेत बद्दल बोलताना तितकासा उत्साह नसायचा तिच्यात. त्याच्याविषयी बोलायचे ती शक्यतो टाळायचीच. पूर्वीसारखी उत्साही राहिलेली नाही लग्नाबद्दल, असं वीणालाही जाणवायला लागलेलं. काय बरं कारण असेल? आपल्या लेकीच्या वागण्यात झालेला हा बदल तिच्या चाणाक्ष नजरेने बरोब्बर टिपलेला. ती स्वतःहून काही बोलणार नाही, सांगणार नाही. पण आपल्यालाच जरा बारीक लक्ष ठेवायला हवं हे जाणवलं तिला. ती काहीबाही कारणानं तिच्याकडून संकेत बद्दल काढून घ्यायची. ती जे काही सांगायची त्यावरून तिच्याहि मनात शंकेची पाल चुकचुकायला लागली.
असंच एकादा तिच्यासमोर संकेतचा फोन आला.
"अरे भाऊ नाहीये ना मला, त्यामुळे रितेशच उभारणार मागे. त्याच्याच सोबत होते काल. पण तू कुठे पाहिलस? आणि मला का नाही बोललास? ...... मग काय झालं? यायचंस ना? .... एवढं काय त्यात? ........ .... अरे पण दिसला कसा नाहीस मला?.... इतका वेळ होतास तिथे??? कमल आहे तुझी........ चल काहीतरी बोलू नकोस.... चल ठेवते फोन." फोन ठेवल्यावर तिचा चेहरा जरा विचित्र झाला, दुखावल्या सारखा.
"काय गं तनू , काय झालं? काय म्हणतो?"
"तसं काही नाही ग,काल मी आणि रितेश बसलो होतो मॉलमध्ये तिकडे आलेला म्हणे हा, आणि आम्ही बसलो होतो तिथं! यायचं ना मग! तर म्हणे तुला आवडेल की नाही म्हणून नाही आलो. उगाच कशाला डिस्टर्ब करा म्हणून.! काय फालतूपणा आहे हा? मला राग येईल म्हणे! माझा काय बॉयफ्रेंड आहे का रितेश? आणि हा काय माझ्यावर पाळतीवर होता की काय? आला का नाही समोर?"
ती तिथून तिच्या रुममध्ये गेली. प्रसाद आल्यावर त्याच्या कानावर हा प्रकार घातला वीणाने. तोही विचारात पडला.
"तुला काय वाटतंय?"
"सिरीयस वाटतय मला!!. वाटतंय तो जर असाच राहिला तर त्रास होईल आपल्या लेकीला!"
"हो ना सवय नाहीये रे तिला असल्या सगळ्या गोष्टींची. कोमेजुन जाईल ती.कुठं जायचं यायचं सगळ्यांवरच बंधनं येतील तिच्या. कुठे जाते काय करते, कुणाशी बोलते साऱ्याचवर! बापरे विचार केला तरी भीती वाटतेय."
"मला वाटतं आपण आधी तिच्याशी बोलू ... मग त्याच्याशी पण बोलायला हवं. भाऊला पण सांगून बघतो. त्याचे आणि वाहिनीचं पण मत घेऊ, बोललं तर पाहिजेच कारण लग्न अगदी पंधरा दिवसावर आलंय."
"हो ना आधीच गोष्टी क्लियर करुन घेतलेल्या बऱ्या नाही का?"
"हो मी आजच बोलावून घेतो भाऊ आणि वहिनीला." प्रसाद म्हणाला,."भाऊ वहिनीचं मत घेऊ आणि पुढच काय ते त्यांच्याशी बोलून ठरवू.
भाऊ वहिनी तातडीने आले. "अरे लग्न अगदी समोर येऊन ठाकलंय, तर लवकर काहीतरी करावं लागणार. मग त्यांनी तनिष्काशी सगळं सविस्तर बोलून घेतलं. मामला गंभीर होताच खास.
"मला वाटतं आपण त्या मंडळीशी बोलायाला हवं. म्हणजे त्याच्या आईबाबांशी, त्याचाशी,."
"काय सांगणार त्यांना? तुमचा मुलगा संशय घेतो म्हणून? बरं नाही दिसत नाही ना तसं?"
"नाही तसे नाही त्यांना कल्पना देऊन बघू, त्यांचं मत घेऊ."
"हं! एकदम नको म्हणायला, पण साधारण काय झाले आहे ते तरी सांगून बघू. मग प्रसादने त्यांना फोन करून भेटीची वेळ मागितली. आणि सगळे मिळून त्यांच्या घरी गेले. प्रसादने मग त्यांना सविस्तर काय झालंय ते सांगितलं.
"अहो संकेतचा हक्कच नाही का बायको कोणाशी बोलते, काय करते, ते जाणून घेण्याचा?"
"हो ते बरोबर आहे. पण तिची अशी काही स्पेस हवीच ना? लग्न करणार, तर थोडा विश्वास हवाच ना?"भाऊ म्हणाले," आणि प्रत्येक ठिकाणी असा प्रश्न काढत बसला तर कसं जमणार?"
"मला वाटतं संकेतला नवरा म्हणून तसा पूर्ण अधिकारच आहे. थोडा कंट्रोल हवाच ना बायकोवर!" म्हणजे त्यांना मान्य होतं म्हणायचं आणि मुख्य म्हणजे त्यात काहीच गैर वाटत नव्हतं त्यांना! आजच्या जमान्यातहि किती बुरसटलेले विचार असतात लोकांचे! त्यांचंच जर असं मत आणि विचार असतील तर आपल्या मुलीचे भवितव्य कठीण आहे या घरात! त्याची आईपण गप्प बघत बसलेली. त्यावरून तिला काहीच किंमत नसावी घरात असच वाटत होतं.
"आम्ही कळवतो उद्या काय ते." भाऊ म्हणाले.
"म्हणजे? काय म्हणायचंय तुम्हाला?"
"हेच कि आपण हे संबंध पुढे घेऊन जावेत कि नाही याचा विचार आम्हाला करावा लागेल"
"अहो काय बोलताय तुम्ही? असं कसं करू शकता? लग्न दहा दिवसावर आलंय"
"हो पण झालं नाहीये ना?आणि नाही झालंय तेच चांगलं झालंय असं वाटाय लागलाय आता आम्हाला."
असा काही निर्णय हे लोक घेतील अशी अपेक्षाच केली नव्हती त्यांनी. त्यामुळे जरा गडबडलेच ते.
"मला वाटते तुम्ही जरा अतीच करताय." ते म्हणाले.
"नाही आता हे लग्न होणे नाही बस! इतकंच कळतंय मला." प्रसादने निर्वाणीचं सांगितलं त्याना. आणि सारे तिथून घरी आले.
सगळंच इतके पटापट घडलं कि काहीच कळलं नाही. पण जे झालं ते चांगलंच हे मात्र सर्वानाच पटले.
'आपण लग्न ठरवताना किती बेसिक ठोकताळे बांधतो आणि मग असं काही सिरीयस घडलं तरच खोलात जातो नाही का?" भाऊ म्हणाला.
"हो ना! तरी बरं एवढा कालावधी मिळाला त्यामुळे कमीत कमी लग्नापूर्वीच सारं कळलं नाही तर अनर्थच घडता!"
"हो ना मला तर बाबा कल्पनाच करवत नाही काय झालं असतं पोरीचं! तनिष्काला निदान त्याला पारखता आले. लग्न घाईघाईने उरकलं असतं तर भलताच घोळ झाला असता."
" हो ना एवढ्या मोकळ्या वातावरणात वाढलेली आपली लेक लग्नानंतर कोंडवाड्यातच गेली असती कि काय?" वहिनी म्हणाल्या.
"काय झालं असतं याचा विचारच करवत नाही" वीणा म्हणाली. "पण आता लोक काय म्हणतील?"
"अगं लोक काय म्हणणारेत? आज बोलतील उद्या विसरतील" प्रसाद म्हणाला.
"आणि आपल्या लेकीचं आयुष्यभराचं नुकसान झालं असतं तर लोक येणार होते का भरून काढायला?" वहिनी म्हणाल्या.
"हो तसं पटतय मलाही."
घरी आल्यावर तनिष्काशी सविस्तर बोलणे झाल, "तुला काय वाटतं बेटा?" भाऊने तनिष्काला विचारलं.
"काका मला काहीच कळत नाहीये पण तो असा संशय नंतरहि घेत राहिला असता तर अवघडच होतं, त्यामुळं हेच योग्य झालय असं वाटतंय.
ती थोडी गप्प झाली. तसा अवघडच निर्णय होता तो. "आम्ही आहोत सगळे तुझ्याबरोबर तू नको काळजी करू होईल सगळं नीट फक्त ठामपणे तुझा निर्णय काय ते सांग."
"काका, माझा निर्णय पक्का आहे. पण थोडं टेन्शन आलंय. इतकच."
अशा रीतीने ठरलेलं लग्न रहित केल्याचं सगळ्यांना सांगायचं टेन्शन आलेले घरात, पण मुलीच्या भवितव्याचा विचार करता हा कठोर आणि कटू निर्णय घेणे भागच होतं त्यांना! त्यामुळे त्यांनी सर्वांना फोन करून निर्णय सांगितला. लोकांना खूप प्रश्न पडलेले. प्रश्नाला उत्तर देऊन जीव मेटाकुटीला आलेला होता. काहीना हा आतातायीपणा वाटत होता तर काहींना योग्य निर्णय वाटत होता. पण लोकांना काही वाटो, त्यांच्या लेकीची तरी एका मोठ्या होणाऱ्या कोंडवाड्यातून सुटका झाल्याचे समाधानच होतं. !!!!!!!!!!!!!!
अगदी आजच्या काळातील कथा !
अगदी आजच्या काळातील कथा ! आवडली.
Makes sense.
Makes sense.
Right kel
Right kel
अगदी सेम केस माझ्या पाहण्यात
अगदी सेम केस माझ्या पाहण्यात झाली होती,
मुलगा ऑस्ट्रेलिया, मुलगी पुणे,
साखरपुडा झालेला, लग्न 2 महिन्यावर आलेले,
रोजचे व्हिडीओ कॉल असायचेच,
मग हळूहळू मुलाची कॉल घेण्याबद्दल सक्ती वाढत चालली,
माझा कॉल तू घेतलासच पाहिजेच, अमुक इतका वेळ बोललेच पाहिजेस वगैरे अपेक्षा वाढू लागल्या.
टाइम झोन च्या फरका मुळे हिला ते जमणे कठीण होते,
मग फोनवरच भांडणे सुरू झाली,
लग्नाचे शॉपिंग, किती पैसे उडवतेस वगैरे फाटे फुटायला लागले,
शेवटी लग्न रद्द झाले,
पण दिलासा देणारी गोष्ट एकच की वधुपित्याने अजिबात टेन्शन न घेता गोष्ट सगळ्यांना कळवून टाकली आणि लाईफ as usual चालू ठेवले
योग्य निर्णय. लग्नाआधीच कळलं
योग्य निर्णय. लग्नाआधीच कळलं हे ब झालं नाहीतर नंतर डोक्याला ताप.
आवडली.
आवडली.
छान कथा, आवडली. अगदी आताच्या
छान कथा, आवडली. अगदी आताच्या काळातली आणि म्हणून रिलेट करण्यासारखी आहे.
छान कथा!
छान कथा!
कित्ती मज्जा आजकालच्या
कित्ती मज्जा आजकालच्या मुलामुलींची! पन्नास वर्षां पूर्वी असे नव्हते, घरून ठरवलेल्या जोडिदाराशी मुकाट्याने लग्न करायचे - स्वभाव विशेष जसे असतील तसे सांभाळून घ्यायचे!
पुढे डिओर्स होण्यापेक्षा आधीच
पुढे डिओर्स होण्यापेक्षा आधीच वेगळे झाले बरे झाले. लग्न मोडले असे कोणी म्हणणार नाही, इंगजमेंट तुटली असेच म्हणणार.
शुभेच्छा !
योग्य निर्णय
योग्य निर्णय
पुढे संसारात त्रास
पुढे संसारात त्रास होण्यापेक्षा आताच कळले आणि लग्न मोडले बरे झाले.. मुख्य म्हणजे मुलीचे आई वडील आणि नातेवाईक तिच्या बाजूला भक्कम आधार म्हणून उभे राहिले ते खूप आवडले....खूपच चांगली कथा
खूप छान !
खूप छान !
खरंच मुलीच्या नजरेतून आई बाबांनी विचार केला, समाजाला घाबरून तिचे जबरदस्ती लग्न लावून दिले नाही हे किती चांगलं केलं त्यानी.
कथा सशक्त आहे एकदम.
कथा सशक्त आहे एकदम.
या ही काळात नोकरी करणार्या मुलिवर नवरा म्हणून मुलाचा कंट्रोल हवाच की म्हणणार्या लोकांचा निषेध.
छान कथा.
छान कथा.
आई-वडिल मुलीची बाजु समजुन घेउन खंबीर राहिले हे जास्त आवडलं.
छान कथा. लिहिलीय सुध्दा सुरेख
छान कथा. लिहिलीय सुध्दा सुरेख. आवडली.
छान कथा. आई वडीलाच कौतुक
छान कथा. आई वडीलाच कौतुक आहेच पण मुलीचही कौतुक आहे कि तिने उगाच भावनेच्या आहारी न जाता योग्य निर्णय घेतला.
झाले ते चांगले झाले. असी
झाले ते चांगले झाले. असी गोष्ट लग्नानंतार घडली आअणि लग्न मोडणे शक्य नसेल तर ही treatable personality disorder आहे. संशयग्रस्तता असे त्याला म्हणतात.