निसर्गाचं सोनं...

Submitted by स्मिता द on 19 October, 2018 - 03:37

सतरा ऑक्टोबरच्या दै. सकाळच्या दसरा पुरवणीत प्रसिध्द झालेला माझा लेख
..........................................................................................
निसर्गाचं सोनं...
आपल्या कित्येक धार्मिक सणांचा संबंध निसर्गाशी जोडलेला आहे. दसऱ्याला सोन्यासारखा मान असणारे, लुटता येणारे म्हणजे सोने म्हणजे "आपट्याची पाने"! त्याचे उपयोग पाहिले असता आपसूक शब्द बाहेर पडतात, हे खर सोनं...
स्मिता दोडमिसे
smita.dodmise@esakal.com

निसर्गातील विविध गोष्टी अन्‌ सणांचा फार सुरेख परस्पर संबंध जोडलेला आपण बघत आलेलो आहोत, जसे गणेशोत्सवात पत्री, दूर्वा, श्रावणात बेल, गुढीपाडव्याला कडुलिंब; तर दसरा म्हणजे आपट्याचे पान! या सर्व बाबींचा इतका खोल संस्कार आपल्या मनावर झाला आहे की तो सण म्हटला की, ती वनस्पती आपल्या नजरेसमोर येते. सण उत्सवांच्या आपल्या भारतीय परंपरांचा मागोवा घेतल्यास असे लक्षात येते प्रत्येक उत्सवामागे, सणामागे, प्रथेमागे एक उदात्त हेतू आहे. निसर्गाने आपल्याला बहाल केलेला अमूल्य ठेवा जतन केला जावा, त्याचे उपयोग आपल्याला व्हावे यासाठी त्यांच्या या प्रथांमधील समावेशाला काही शास्त्रीय कारणे आहेत. निसर्गातील अगदी वनस्पतींचा विचार करायचा झाल्यास आपल्या अवतींभोवती अशा कित्येक कित्येक औषधी वनस्पती आहेत की ज्यांचे जाणीवपूर्वक संवर्धन करणे आपल्याच फायद्याचे ठरणार आहे. तसे पाहायला गेले तर नुसते झाडे लावा, ही झाडे जपा असे सांगून कोणी त्या झाडांचे रक्षण केले नसते. केवळ उपदेश केला अन्‌ महत्त्व सांगितले म्हणून त्याचे महत्त्व पटले, हा मनुष्यसुलभ स्वभाव नाहीच. मानवाच्या या स्वभाव वैशिष्ट्याचा सूक्ष्म अभ्यास केलेल्या आपल्या पूर्वजांनी मग या सर्व गोष्टींचा संबंध सण, उत्सव, धार्मिकता यांच्याशी जोडला आहे. दैवीकोपाला माणूस घाबरतोच, त्यामुळे मानवी जीवनाला आवश्‍यक व उपयुक्त अशा गोष्टींच्या संवर्धनाचा संबंध सणावारांशी जोडलेला आहे. या पाठीमागची कारणमीमांसा केली असता असे लक्षात येते की, या सर्व वनस्पती औषधी आहेत, म्हणजेच या सर्व औषधी वनस्पतींचे संवर्धन करावे, ही एक दूरदृष्टी या रुढींपाठीमागे दिसते.

शमी वृक्ष

अज्ञातवासात पांडवांनी शमी वृक्षाच्या ढोलीमध्ये आपली शस्त्रे लपवली व दसऱ्याच्या दिवशी ती बाहेर काढली, त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी "शमी वृक्षाचे पूजन करायचे, ही लहानपणापासून मनावर ठसलेली गोष्ट. मोठे झाल्यावर मग राजस्थानातील चिपको आंदोलनाचे गोष्ट वाचण्यात आली. राजस्थानातील पर्यावरणप्रेमी लोकांनी "खेजडी' या त्यांच्या आरध्यवृक्षाच्या रक्षणासाठी बलिदान केले. आजही अंगावर रोमांच उठावे अशी ही घटना. खेजडी म्हणजे काय तर शमी वृक्ष. तेथील राजाने जेव्हा बांधकामासाठी झाडे तोडायचे फर्मान काढले तेव्हा सैनिकांनी झाडे तोडू नये म्हणून स्त्रीपुरुषांनी त्या वृक्षांना मिठ्या मारल्या व तीनशे एक लोकांनी प्राणार्पण केले; पण खेजडी वृक्ष वाचवले. असा हा "शमी' वृक्ष तेव्हापासून खरंच मनाच्या तळाशी जाऊन बसला अन्‌ मनापासून आराध्यवृक्ष वाटायला लागला. शमीचा वृक्ष ओळखणे तसे अवघड कारण बाभळीच्या व खैराच्या वृक्षाशी खूप साम्य शमी वृक्षाशी असते. शमीच्या सालींचे अनेक औषधी उपयोग आहेत. आयुर्वेदामध्ये दमा, कुष्टरोग, कोड, मनोविकार यावर शमीचे साल गुणकारी असल्याचे सांगितले आहे. सालीच्या उपयोगाबरोबरच शमीच्या लाकडाचा उपयोग शेतीची अवजारे, बैलगाड्या करण्याकरता देखील होतो. जळाऊ लाकूड म्हणून शमीचे लाकूड उत्तम आहे.

आपटा

आपट्याला अनेक नावे असलेली आपल्याला आढळतात जसे, की चंद्रक, युग्मपत्रक, मालुकापर्ण इ. संस्कृतमध्ये आपट्याला "अश्‍मंतक' म्हणतात. अश्‍मंतकाचा शब्दशः अर्थ दगड किंवा खडक फोडणारा असा आहे. या अर्थाप्रमाणेच याची उपयुक्तता देखील आहे. पहिला उपयोग म्हणजे या वृक्षाची मुळे जमिनीत खोलवर जाऊन खडकाच्या फटीत देखील वाढतात, त्यामुळे खडकसुद्धा फुटतात. खडकाळ माळरानावर जिथे दुसरे झाड फारसा टिकाव धरणार नाही तिथे "आपटा' तग धरतो. त्यामुळे उघड्या बोडक्‍या माळरानांवर वृक्षारोपण करण्यासाठी "आपटा' हा एक आदर्श वृक्ष आहे. या गुणधर्माप्रमाणे आपट्याचा औषधी गुणधर्म असा आहे की मूतखडा होऊ न देणे व झाला असेल तर तो जिरवण्याचे सामर्थ्य आपट्यामध्ये असते. म्हणजेच दोन्ही अर्थाने "आपटा' उपयोगी आहे. याचबरोबर पित्त व कफ दोषावर तो गुणकारी आहे. त्याची साले, पाने, शेंगा, बिया औषधात वापरतात. या औषधी गुणधर्माबरोबरच त्याचे इतरही गुणधर्म आहेत. आपट्याच्या लाकडाचा उपयोग पूर्वीपासून शेतीची अवजारे करण्यासाठी होतो. त्याचा उष्मांक चांगला असल्यामुळे इंधन म्हणूनही त्याचा उपयोग होतो, इतकेच नव्हे तर त्याचा राखेचा उपयोग खत म्हणूनही करता येतो. जनावरांनी ही पाने खाल्ली तर त्यांच्या साठीही ती पौष्टिकच असतात. असा हा बहुगुणी "आपटा'!
पूर्वजांनी पाडलेल्या या पायंड्यांचा अर्थ आपण समजावून न घेता केवळ अंधानुकरण करत आलो आहोत. त्यामुळे झाले काय तर दसऱ्याला आपटा हवा, या हव्यासापोटी आपट्याच्या पानांची, फांद्यांची वारेमाप तोड केली जाते. आपटा म्हणून आपट्याबरोबरच "कांचन' या आपट्याच्या फॅमिलीतील वृक्षाच्या पानाचीही तोड केली जाते. अशा अनावश्‍यक तोडीमुळे आपण खूप प्रमाणात निसर्गाचे व पर्यायाने आपले नुकसान करत आहोत, हे कोणी लक्षातच घेत नाही; पण आता आपण हे सर्व थांबवायला हवे.
हे सगळे बघितले की पुनश्‍च प्रकर्षाने वाटायला लागते की खरंच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये उत्सव, निसर्ग व पर्यावरणरक्षण यांची सुरेख सांगड घातली गेली आहे. पर्यावरण संतुलन; तसेच मानवी स्वास्थ्य आणि समृद्धी यासाठी महत्त्वाच्या वृक्षांना सांस्कृतिक महत्त्व दिले आहे. तेव्हा आपणही या झाडांची बेसुमार तोड न करता, उगाच पत्री तोडून कचरा निर्माण करण्यापेक्षा त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प करूया. सोन्यासारख्या निसर्गाचे रक्षण करून सोन्यासारखे वर्तन करूया.
............चौकट........
आपण सुरू करूया पर्यावरणपूरक दसरा
दसऱ्याला सोने म्हणून आपट्याची पाने देण्याऐवजी आपट्याचे रोप द्यायला हवे.
इतरही वनस्पतींचे रोप द्यायचे.
दुर्मीळ अशा आपल्या निसर्गातील वनस्पतीचे बी द्यायचे.
झाडांच्या नुसते रोप देऊन घेऊन हा प्रश्न सुटणार नाही; तर त्या रोपाचे रोपण जवळच्या माळरानावर, मोकळ्या खडकाळ जागांवर करायला हवे. त्यामुळे जमिनीचे संरक्षण व त्याच्या औषधी गुणधर्मांमुळे आपले संरक्षण असा दुहेरी हेतू साध्य करता येईल. तेव्हा निश्‍चय करा या दसऱ्यापासून "आपट्याच्या झाडाची पाने, फांद्या न तोडता आपण एकमेकांना आपट्याची रोपे देऊया व या सोन्याचे रक्षण करूया! तरच खऱ्या अर्थाने आपला दसरा साजरा होईल.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

माहितीपूर्ण लेख. आवडला.
पण एकंदरीत आपल्या पूर्वजांचा निसर्गविषयक अभ्यास आणि त्यांनी निसर्गाची धार्मिक कार्ये तसेच साणा-वारांशी घातलेली सांगड बघता, दसरा ह्या सणापासून वा थोडं मागे पुढे पावसाळा संपत असल्याने खडकाळ, मुरमाड, उघड्या, बोडक्‍या टेकड्यांवर सरळ न वाढता वेडेवाकडे वाढणाऱ्या आणि भरपूर फांद्या असणाऱ्या आपट्याच्या झाडाची पाण्याची गरज पुढच्या पावसाळ्यापर्यंत कमी करण्यासाठी, ते बहुगुणी झाड तोडून न टाकता त्याच्या फांद्या छाटून त्याची पाने सोने म्हणून वाटण्याची कल्पना ह्या परंपरे मागे असावी असे वाटते.

झाडांच्या नुसते रोप देऊन घेऊन हा प्रश्न सुटणार नाही; तर त्या रोपाचे रोपण जवळच्या माळरानावर, मोकळ्या खडकाळ जागांवर करायला हवे. त्यामुळे जमिनीचे संरक्षण व त्याच्या औषधी गुणधर्मांमुळे आपले संरक्षण असा दुहेरी हेतू साध्य करता येईल. तेव्हा निश्‍चय करा या दसऱ्यापासून >> चांगली आयडिया. तुम्ही किती रोपे दिलीत आणि तुम्हाला किती रोपे मिळालीत काल ?