विचारांचे सोने

Submitted by झुलेलाल on 19 October, 2018 - 02:31

शिवसेनेचा ५२ वा दसरा मेळावा काल मुंबईत शिवाजी पार्कात पार पडला. बाळासाहेबांच्या काळात हा मेळावा म्हणजे विचारांचे सोने लुटण्याचा सोहळा असे म्हटले जायचे. ते खरेच होते. बाळासाहेबांचे भाषण, त्यांचे वक्तृत्व, त्यांची देहबोली, हजरजबाबीपणा, कोपरखळ्या, यांमुळे दसरा मेळावा ही पर्वणी असायची. बाळासाहेबांच्या पश्चात त्यांचे पुत्र, शिवसेनाप्रमुखांचे उत्तराधिकारी, उद्धव ठाकरे यांनीही दसरा मेळाव्याची परंपरा सुरू ठेवल्याने, ‘विचारांचे सोने लुटण्यासाठी लाखोंच्या संख्येने वाजत गाजत या’ अशी साद घालण्याची प्रथाही शिवसेनेने पुढे सुरू ठेवली, आणि त्याच अपेक्षेने शिवसैनिक मैदानावर हजर राहू लागले. मराठी माणूस घरबसल्या टीव्हीवरील भाषणाकडे कान लावून बसू लागला.
कालच्या भाषणानंतर मात्र, विचारांवर केवळ सोन्याचा मुलामा चढविण्याची कसरत सुरू असल्याचे जाणवले. कोणताही नवा विचार, ठोस भूमिका, पुढची दिशा, असे काहीच हाती न घेता शिवसैनिक परतले.
पुढच्या निवडणुकीत युती होणार की नाही, भाजपच्या नावाने खडे फोडायचे की नाही, सरकारसोबत रहाणार की नाही, मोदींच्या पाठीशी उभे रहायचे की विरोधात दंड थोपटायचे, स्वबळाची तयारी करायची की युतीचे दरवाजे उघडे ठेवायचे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील अशा अपेक्षेने आलेले श्रोते हे प्रश्नच सोबत घेऊन परतले असावेत.
विचारांचे सोने लुटण्याच्या त्या ज्वलंत परंपरेची धग कमी होत आहे का?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आडात नाही तर पोहर्‍यात कुठुन येणार? नेत्याकडे नसतीलच जर सोन्यासारखे विचार तर अनुयायी काय लुटणार? बाळासाहेबांच्या होत्या त्या गर्जना आणि त्यांच्या सुपुत्राकडून केली जातात ती फक्त वक्तव्ये.. त्यांची एकमेकांशी तुलनाच होऊ शकत नाही असे माझे मत आहे.