कविता महाजनांचं आकस्मिक निधन

Submitted by pkarandikar50 on 28 September, 2018 - 04:30

चटका लावून जाणारी एक बातमी. त्यांच्या असंख्य चाहत्या वाचकांपैकी मी एक. बस्स! एव्हढंच काय ते आमचं नातं. त्यांच्या ब्लॉग्वरच्या किंवा त्यांनी इ-मेल वरून पाठवलेल्या ताज्या कविता वाचणं हा माझा एक आवडता छन्द होता. अगदी अलीकडेच समजलं की त्या वसईहून पुण्याला वास्तव्याला आल्या आहेत. त्या एकदा स्थिर- स्थावर झाल्या की फोन करून त्यांना भेटायला जायचं असं मी ठरवलं होतं. व्हॉट्स अप वर फिरत-फिरत बातमी आली ती त्यांच्या आजारपणाविषयी आणि नंतर आज, आकस्मिक निधनाची. मराठी साहित्य विश्वात कधीही भरून न येणारी पोकळी वगैरे ठराविक साच्यातल्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया येत राहतील. आपलं एखादं आवडतं माणूस किंवा कलाकार निवर्तल्यावर आपल्या आयुष्यात एक खिन्न पोकळी येतेच येते. कविता महाजन यांच्या कडून आणखी खूप काही सकस लेखनाची अपेक्षा होती. अशा वेळी त्यांचं जाणं फारच खेदप्रद आहे.
काही वर्षांपूर्वी, आदिवासी उपयोजनेचा आढावा घेण्यासाठी शासनानं नेमेलेल्या एका समितीचं काम माझ्याकडे आलं होतं. आदिवासींच्या बोलीभाषा हा कविता महाजन यांच्या अभ्यासाचा आणि संशोधनाचा एक विषय असल्याचं मला माहीत होतं. म्हणून त्या संदर्भात मी त्याना भेटायला वसईला गेलो होतो. काही मिनिटातच औपचारीकपणा विरघळत गेला आणि आम्ही अगदी जुने परिचित असल्यासारखं आम्ही खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या. काही आदिवासी प्रमुख बोलीभाषांचा एक ज्ञानकोष तयार करण्याची एक महत्वांकांक्षी योजना त्यांच्या डोक्यात घोळत होती. माझ्या मनात आलं की, एव्हढं मोठं काम – ज्यासाठी कितीतरी मनुष्यबळ, संसाधन, निधी लागणार होता- एकटीच्या बळावर अंगावर घेण्याचं धाडस, ही बाई कशी करू धजावते? “ बघू या, मी काम तर सुरू केलंय, हळू हळू बाकी सगळ्या गोष्टी जुळून येतील. आणि नाही आल्या तरी मला जमेल तेव्हढं काम करायचं मी ठरवलंय.” त्या अगदी सहजपणे बोलून गेल्या. राज्य शासनाकडून तोप्रल्कल्पमंजूत्र करून घेणं राहूनच गेलं कारण आमच्या समोतीचा कार्यकाळ संपऊन गेला. त्यांना या कामासाठी केंद्र शासनाची एक फेलोशिप मिळाली होती पण तो प्रकल्प शेवटी अपूराच राहिला.
धाडस आणि मनस्वीपणा ही त्यांच्या स्वभावाची ठळक वैशिष्ठ्यं होती. जे काही हाती घेतलं त्यात स्वत:ला, पुढचा-मागचा विचार न करता झोकून देणं, जिनं आव्हानं पेलणं आणि दीर्घकाळ कठोर परीश्रम करणं, यांना प्रचण्ड उर्जा लागते. इतकी आणि अशी उर्जा हुकमीपणे पुरवणारी एखादी द्रौपदीची थाळी त्यांच्याकडे होती की काय जाणे!
त्यांची विपुल साहित्य-सम्पदा म्हणजे मराठी सारस्वाताचं एक दैदीप्यमान लेणं आहे. ‘ब्र’, ‘भिन्न’ आणि ‘कुहू’ या त्यांच्या कादंबर्‍या, ‘धुळीचा आवज’, ‘म्रुगकलळीचा मासा’ हे कविता-संग्रह आणि ‘ग्रफिटी वॉल्’ हा ललित लेख- संग्रह, त्यानी केलेले अनुवाद ही सगळीच पुस्तकं खूप गाजली. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. त्यांच्या ब्लॉगवरही त्या नियमिनपणे लिहीत. त्या सर्वांमधून प्रकट होणारं आणि खूप काहीसं अप्रकटपणे जाणवणारं त्यांच व्यक्तिमत्व विलक्षण होतं. ‘स्त्री-वादी’, ‘परिवर्तनवादी’ असले शिक्के काही समीक्षकांनी त्यांच्यावर मारले पण त्यांना स्वत:ला ते कधीही आवडले नाहीत. विशेषणं आणि वर्गवारी या सर्वांना पुरून उरणारी आणि त्या पलीकडे खूप काही असणारी ही लेखिका तिच्या चाहत्याना पोरकं करून गेली.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

कविता महाजनांना श्रद्धांजली.
त्याच्या लेखनाची ओळख "ब्र " या कादंबरीने झाली होती.
मुलींसाठी पुस्तके शोधताना त्यांचे "झोयानाचे रंग " सुद्धा आनंद देऊन गेले.
माझ्या मनात त्यांची प्रतिमा एक कणखर आणि ठाम व्यक्तिमत्व म्हणून आहे/ राहील.
__/\__

श्रद्धांजलि. ब्र व भिन्न वाचलेले शैली खूपच आवडलेली. आमच्या एका हैद्राबादी फॅमिली फ्रेंडच्या सुनेची बहिण त्या. लहान होत्या की वयाने.
वाइट वाटले. ओरि जिनल टॅलेन्ट.

फार वाईट वाटले आणि धक्का बसला. ब्र प्रचंडं आवडली होती. भिन्न काही पानेच वाचली आणि पुढे वाचवलीच नाही. त्यांची काही वाक्ये तेव्हा फारच आवडली होती. जसं की लग्न ठरणं हे एक डील असतं, दोन्ही बाजूला फायद्याचं वाटलं तर ठरतं नाहीतर नाही. मनं जुळणं वगैरे आपण त्या व्यवहाराला दिलेली सुंदर नावं. कुणी हे ईतक्या स्वच्छपणे मांडू शकेल असा तोपर्यंत विचार नव्हता केला. ठकीही खूप आवडलं होतं.