उच्च न्यायालयाची मनमानी

Submitted by pkarandikar50 on 22 September, 2018 - 23:55

उच्च न्यायालयाची मनमानी
महात्मा गांधींनी आम्हाला सविनय कायदेभंग शिकवला. पुढे आम्हाला हा जोडशब्द अवघड वाटू लागला, म्हणून आम्ही त्याचे रुपांतर 'कायदेभंग' आणि 'विनयभंग' अशा दोन शब्दात करून मोकळे झालो. आजच्या आमच्या समाजजीवनाची ओळख याच दोन शब्दांनी होऊ लागली आहे. तथापि आमच्या न्यायालयांना त्याची पर्वा उरलेली नाहीय, त्यामुळे गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत 'डीजे' आणि 'डोल्बी' या महा-मंगल प्रकारांवर त्यांनी बंदी घातली आहे. त्याहून कडी केली आहे ती आमच्या मतांवर निवडून आलेल्या सरकारांनी. म्हणे, पोलिसांनी मुंबई उच्च न्यालयाच्या आदेशाची कडक अंमलबजावणी करावी. ही हद्द झाली.
या प्रतिगामी आणि निर्दय शासनाने आधी पासूनच दोन-दोन दिवस दारूची दुकाने बंद ठेवण्याचा जाचक नियम करून ठेवला आहे. त्यामुळे आम्हा गणेशभक्तांना किती तकलीफ होते ते आमचे आम्हालाच ठाऊक ! तीन-चार दिवसांपासून आम्हाला स्टॉक खरेदी करून ठेवावा लागतो. आयत्या वेळी स्टॉ़क कमी पडला तर दुकानांच्या मागल्या दाराने अवाच्या सव्वा किंमत मोजून माल आणावा लागतो.
आता काय तर म्हणे ध्वनि-प्रदूषण रोकण्यासाठी 'डोल्बी' आणि 'डीजे' वर बंदी! म्हणजे गणेश भक्ती करण्याच्या आमच्या मूलभूत हक्कावरच गदा आणली आहे.
पुढच्या वर्षी बाप्पा, आम्हाला तुमचे स्वागत आणि रवानगी आमच्या परंपरागत पद्धतीने करायची आहे. त्यासाठी तुम्ही आम्हाला एक मदत केली पाहीजे. ती म्हणजे, जो पक्ष दारू, डिजे आणि डोल्बी यांवरची बंदी हटवणारी घटना दुरुस्ती करण्याचे ठोस आश्वासन देईल, त्याच पक्षाला येत्या निवडणुकीत यशस्वी करा! काय म्हणालात, परंपरा केंव्हापासूनची? अहो बाप्पा, तुम्हाला एव्हढेसुद्धा माहीत नाही? बदलत्या कळानुसार आम्ही जुन्या शब्दांना नवे अर्थ देत असतो. परंपरा या शब्दाचा जुना अर्थ आता कालबाह्य झाला आहे. आजचा अर्थ असा आहे की, आम्ही गेल्या वर्षी जे केले तेच आम्हाला या वर्षीही करता आले पाहीजे. इतकी क्षुल्लक मागणीसुद्धा मान्य होणार नसेल तर आग लावा की त्या लोकशाहीला!
-प्रभाकर (बापू) करंदीकर

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अगदी खर आहे. मंगलकार्यातील दुष्ट प्रवृत्तींना पिटाळुन लावण्यासाठी डीजे ची निर्मिती झाली आहे. पुर्वी ढोल ताशे वाजवले जायचे. पण दुष्ट प्रवृत्तींची ताकद वाढल्याने ते त्याला दाद देईनासे झाले. म्हणून डीजेचा वापर अपरिहार्य झाला. हल्ली बघा लोअर अँटीबायोटिक्सला रोगजंतू दाद देत नाहीत तसेच काहीसे.

सर्वच हिडीस आणि ओंगळवाणे प्रदर्शन असलेले उत्सव बंद केले पाहीजेत. सर्वजातीय आणि धर्मिय !
फक्त व्हॅलेंटाईन डे सारख्या प्रेमाच्या संदेशाचे सण ठेवू.

मस्त बातमी :
"एवढेच नाही तर डीजे बंदी असेल तर विसर्जन होणार नाही . डीजे वाजणार नसेल तर मूर्ती मंडपातच ठेवणार असा निर्णय आम्ही घेतला आहे. "

डीजे गणपतीसाठी नसतात, गणपती डीजेसाठी असतो.

कालच हिंजवडीत पोलिसांच्या बंदोबस्तात स्पीकर्सच्या भिंती मार्गक्रमण करत होत्या. बाजूने जाणारी माझी अख्खी कार आवाजाने थरथरत होती. सविनय कायदेभंग यालाच म्हणत असावेत.
युअर मूव्ह उच्च न्यायालय....

कोनितरि कुथेतरि म्हनून थेवके अहे न कि
'सरकारचे डोके ठिकाणावर आहे कां?'
दी जे नसन तं जग्न्यात कय अरअथ राय्ला भौ?
ते नेयालयाला कि कय ते दि जे म्हनूम थाव नसन Happy

"एवढेच नाही तर डीजे बंदी असेल तर विसर्जन होणार नाही . डीजे वाजणार नसेल तर मूर्ती मंडपातच ठेवणार असा निर्णय आम्ही घेतला आहे. "
<<

पुण्यातील मंडळांचा अतिशय उत्तम निर्णय !
फक्त "हिंदू"च्याच सणांवेळी या न्यायालय, सरकार यांना ध्वनीप्रदुषणाचे प्रश्न पडतात ! इतर वेळी वर्ष्याचे १२ महिने, मशिदीवरुन दिवसभरातून ५ वेळा कोकलणारे भोंगे काढायची हिम्मत यांची होत नाही. मिरवणुकीत १ दिवस डिजे वाजल्याने असे कितीसे ध्वनीप्रदुषण होणार आहे ?

च्रप्स यांच्याशी सहमत. सार्वजनिक गणेशोत्सव तर बंद झाले पाहिजेतच पण घरगुती गणपती मूर्तीही मातीची असावी, कृत्रिम तलावातच आणि शांततेने विसर्जन व्हावे, यासारखे नियम असले पाहिजेत.

आमचे स्वतःचे पर्सनल कान...ते डिजेच्या मंजुळ आवाजाने फाटले तर न्यायालयाला काय करायचंय? उगीच नुसतं आमच्या स्वतःच्या पर्सनल आयुष्यात मेली ढवळाढवळ.
आणखी त्या डिजेच्या मंजुळ आवाजाने छातीत जास्त जोरात धडधडायला लागलं तर काय झालं? डोकं फुटण्याइतपत दुखलं जरा तर काय बिघडलं? एकच तर दिवस मिळतो ना डिजे लावायला आणि त्याचा मंजुळ आवाज ऐकायला.
हाँ....आता नवरात्र, लग्न वराती, इतर काही समारंभ या सगळ्यात लागणारा डिजे यात मोजू नका.

पोरं बाळं उपाशी मरतील हो डीजे वाल्यांचे
बंद केल्यावर सरकारला ५०-६० लाखाच्या डीजे असणाऱ्या गरिबांची काळजीच नाही.