१०२ नॉट आऊट

Submitted by बेफ़िकीर on 7 May, 2018 - 23:09

चांगले जगता यावे ह्यासाठी सकारात्मकता आणि मनःस्वास्थ्य कसे आवश्यक आहे व ते कसे मिळवावे ह्याची कहाणी म्हणजे १०२ नॉट आऊट!

चित्रपटाचा आरंभ, मध्य आणि अंत ह्यात कथानक वेगवेगळेच वाटू शकते. प्रथम स्वतःच्या दीर्घायुष्यासाठी मुलाला वेठीला धरणारा बाप, नंतर मुलाला जगण्याचे स्पिरिट मिळवून देण्यासाठी चमत्कारीक अटी लादणारा बाप आणि शेवटी मुलासकट सगळ्याच प्रेक्षकांना एका अत्युच्च विचारसरणीवर नेऊन सोडणारा बाप असे कथेचे तीन टप्पे जाणवतात.

चित्रपटात मन गुंतून राहावे ह्यासाठी अ‍ॅक्शन, रोमान्स, संगीत, दर्दी अभिनय, विनोद, कथानकातील अंगभूत ताकद ह्यातील एक किंवा अनेक गोष्टी एकाचवेळी कार्यरत होत असतात. मात्र १०२ नॉट आऊट सारखी कथानके दुर्मीळ असतात व त्यात ह्यातील बहुतेक घटकांना काहीच स्थान नसते. मग अपरिहार्यपणे अभिनयाची उत्तुंग पातळी आणि हलकाफुलका विनोद ह्यातून प्रेक्षकाला गुंतवून ठेवावे लागते. होय, कथानक तसे पाहिले तर अगदीच दोन ओळींत सांगण्यासारखे व विशेष काही नसलेले आहे. जगावे कसे, मानसिकता कशी ठेवावी ह्यावर कथानक एक आश्वासक व अनुकरणीय भाष्य करते इतकेच! हे कथानक फुलवून फुलवून किती फुलवणार? त्यातल्यात्यात आईबापांना विसरणार्‍या, पैशामागे असलेल्या, परदेशात कायमचे गेलेल्या एका पिढीचा नालायकपणा व त्या पिढीला घडलेली अद्दल ही फोडणी तेवढी दिलेली आहे. पण एक वेळ अशी येते की फक्त फोडणीचीच चव व्यापून उरते.

अमिताभ बच्चन ही अभिनयाची संस्था आहे. संपूर्ण चित्रपटात त्याच्या तोंडी असलेल्या शेकडो वाक्यांपैकी दोनच वाक्ये अशी आहेत जी बोलताना कॅमेरा त्याच्या डोळ्यांवर स्थिरावतो आणि फार फार पूर्वीचा अमिताभ लक्ककन् झळकून जातो. मनात गलबलते. त्यातील एक वाक्य म्हणजे:

"औलाद अगर नालायक हो, तो उसे भूल जाना चाहिये, सिर्फ उसका बचपन याद रखना चाहिये "

हाडकलेल्या शरीराच्या विझलेल्या डोळ्यांमध्ये पूर्वीचा एक ओळखीचा अंगार दिसतो आणि त्या एका क्षणातच मन तृप्त होते.

आणखी असे दोन तीन क्षण सोडले तर चित्रपटभर अमिताभचा वावर हा 'हा चित्रपट तर काय, पूर्णपणे माझाच आहे 'ह्या शैलीतील आहे. आता कथानकाची गरजच त्या पात्राने तसेच वागावे ही आहे हे मान्य केले तरी अमिताभचे अमिताभपण बेमालूमपण झाकण्याइतपत कथानक थोर नाही. अमिताभचे अमिताभपणच वापरण्यावर भर दिसून येतो. त्याला दिलेल्या वेशभूषा, त्याची वेगळी देहबोली, वेगळी भाषाशैली, वेगळे हसणे ह्या इतक्या सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या करूनही अमिताभ हा अमिताभ म्हणूनच वावरतो आणि प्रेक्षकांनाही तो तसाच पाहायला लागतो व आवडतही असावा. परिणामतः चित्रपट अमिताभच्या खिशात जातो.

मानवी भावभावनांचा सूक्ष्म अभ्यास असलेला, दिलखुलास व सर्वार्थाने जिवंत राहू पाहणारा हँडसम म्हातारा अमिताभने जिवंत केला आहे खरा, मात्र काही किरकोळ बाबी खटकतात. १०२ वर्षाचा म्हातारा काही झाले तरी इतका फिट नसतो. ते एक असो! त्याने काहीतरी उद्देशाने एक दीर्घ योजना आखणे, ती यशस्वी होण्यासाठी विविध मार्ग अवलंबणे हे सगळे कथानकातील काल्पनिकतेला अधिक ठळक करते.

अमिताभऐवजी इतरांनी हे पात्र कसे वठवले असते असा विचार अमिताभच्या बाबतीत पहिल्यांदाच मनात आला. नसिरउद्दिनने ह्या भूमिकेचे तितकेच सोने केले असते असेही वाटले. बाकी परेश रावल वगैरेंनी भूमिकेची वाट लावली असती.

मूळ कथानकाची मध्यंतरापर्यंत चुणूकही दिसत नसल्याने पहिला बराचसा भाग कंटाळवाणा झाला.

अमिताभ आणि ऋषी कपूर ह्यांनी अनेक चित्रपट एकत्र केले व अनेकदा ऋषी कपूर अमिताभचा लहान भाऊ वगैरे असे. अमिताभच्या दैदीप्यमान कारकीर्दीत काही अत्यंत गुणी अभिनेत्यांचा वावर काहीसा दुर्लक्षित राहायचा त्यात ऋषी कपूर हे नांव फार वरचे म्हणता येईल. स्वबळावर चित्रपट सहज चालवू शकणारे असे हे काही अभिनेते होते. ऋषी कपूर, शशी कपूर, विनोद खन्ना वगैरे! त्यातल्यात्यात ऋषी कपूर ह्या अभिनेत्याने जेव्हा आपली ज्येष्ठपदाची म्हणजे दुसरी इनिंग सुरू केली तेव्हा त्याच्यातील एक निराळाच अभिनेता जगाला दिसून आला. खलनायकी भूमिका आणि ऋषी कपूर हेही समीकरण असू शकते हे त्याने एका चित्रपटात दाखवून दिले. अन्यथा दिसायला गोरा, गुलाबी, गोंडस, भावुक भूमिका करणारा आणि गीतांना उत्तम न्याय देणारा अभिनेता म्हणूनच ऋषी कपूर मनात बसलेला होता.

१०२ नॉट आऊट मध्ये त्याने कमाल केली आहे. नव्या नवरीला आठ बाय दहाच्या खोलीत काय करायचा तो संसार करून दाखव सांगितल्यानंतरही तिने त्या अडचणीच्या जागेत महाल उभारावा तसा न्याय ऋषी कपूरने त्याच्या वाट्याला आलेल्या भूमिकेला दिलेला आहे. केवळ अधिक वाव मिळाल्यामुळे बच्चनसाहेब श्रेष्ठ वाटणे अगदी साहजिक आहे, पण मिळालेल्या संधीला दिलेल्या न्याय ह्या निकषावर ऋषी कपूर आणि अमिताभ ह्यांच्यात काहीही कमीजास्त करता येणार नाही. बाकी अमिताभकडे असलेल्या दोन दैवी देणग्या म्हणजे डोळे आणि आवाज, ह्यावर कोणीच कुरघोडी करू शकत नाही हे सत्य आहेच! तिथे मात्र ऋषी कपूर एक पाऊल मागे पडतो. मात्र कथानकासोबत ऋषी कपूरवर कॅमेरा अधिकाधिक स्थिरावत जातो व शेवटी त्याच्यावरच राहतो. ह्या चढत्या क्रमात ऋषी कपूरने लाजवाब रंग भरले आहेत. त्याचे हसणे हसवते आणि रडणे रडवते.

मी आहे म्हणून भूमिका अशी लिहिली गेली आहे असा अमिताभचा वावर आणि भूमिका अशी लिहिली गेली आहे म्हणून मी असा आहे हा ऋषी कपूरचा वावर एकमेकांना इतके पूरक आहेत की एक समर्थ जख्खड तरुण बाप आणि एक सुरुवातीचा परावलंबी वृद्ध मुलगा हे निव्वळ अभिनयावर खिळवून ठेवतात.. चित्रपटात स्त्री पात्राला अक्षरशः काहीच स्थान नाही. म्हणायला एक दोन स्त्रिया पडद्यावर एक दोन क्षण झळकून जातात इतकेच! धीरू नावाचे एक पात्रही आपले काम सुरेख करून जाते.

म्हातारा झालेला सिंहही सिंहच असतो पण आपल्याला आठवत राहतो तो त्याचा सुवर्णकाळातील वावर!

ह्या चित्रपटाला खचितच प्रतिष्ठेचे बहुतेक पुरस्कार मिळतील. मात्र त्याहून सुखद बाब अशी की अशी कथानके तिकिटे काढून पाहण्याइतका आपल्याकडचा प्रेक्षक सुजाण झालेला आहे.

========

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पाहिलाय.
"औलाद अगर नालायक हो, तो उसे भूल जाना चाहिये, सिर्फ उसका बचपन याद रखना चाहिये "
या वाक्याला बच्चन साहेब खरच भाऊक वाटले. मनीची व्यथा असेल. पोरगा काही कमावत नाही.

पोरगा काही कमावत नाही.
Submitted by पाथफाईंडर on 8 May, 2018 - 10:29 >>>>> keval acting karun kamaiche source nastaat tyanchyat, itar anek thikani paise guntvtaat.

बेफी, तुम्ही खरंच चित्रपट पाहत रहा वरचेवर आणि इथे लिहित रहा.
खुप छान लिहिलंत.
मला वाटतं डर्टी पिच्चर चित्रपटानंतर ह्या चित्रपटावर लिहिलंय तुम्ही. Happy

छान परीक्षण.
अमिताभचा तो लेखातील डायलॉग ऐकून बागबान आठवला.

अवांतर - पाफा, अभिषेक किती कमावतो याचा एक्झॅक्ट आकडा तुम्हाला समजला ना तर थक्क व्हाल. त्याच्याबद्दल अश्या टिंगलटवाळीच्या अफवा पसरवू नका Happy

खूप सुंदर आणि मनापासून लिहिलेत.
अमिताभबाबत लिहिलेल्या मतांशी सहमत. फर्दर, मला तर तो अतिसुद्धा वाटला. एकंदरीतच right from his hey-days अमिताभने कॉमेडी करताना नेहमीच माती खालली आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. उदा. - सत्ते पे सत्ता, नामक हलाल, याराना वगैरे सिनेमांतली विनोदी दृश्यं. अपवाद म्हणून एक 'चुपके चुपके' म्हणता येईल. एरव्ही कॉमेडी आणि अमिताभ हे समीकरण कधीच जुळलं नाही, असं मला वाटतं.
'१०२ नॉट आउट' मध्येही जे जे हलकेफुलके प्रसंग आहेत, त्यांत मला अमिताभ विशेष भावला नाही. त्याच प्रसंगांत ऋषी कपूर खूप संयत वाटला आणि आवडला. As you have said, "मिळालेल्या संधीला दिलेल्या न्याय ह्या निकषावर ऋषी कपूर आणि अमिताभ ह्यांच्यात काहीही कमीजास्त करता येणार नाही", मी तर म्हणीन अशी जर अ‍ॅपल-टू-अ‍ॅपल तुलना केली, तर ऋषी कपूर सरस ठरतो.

हा सिनेमा एका गुजराती नाटकाचं चित्रपटीकरण आहे. दिग्दर्शक उमेश शुक्लाचा ह्या आधीचा सिनेमाही असाच गुजराती नाटकापासून बनवला होता. तोसुद्धा अफलातून होता. It was 'ओह माय गॉड'. Happy

अपवाद म्हणून एक 'चुपके चुपके' म्हणता येईल.
>>>
+786 रसप
अमिताभ आणि कॉमेडी म्हटले की मला पहिले तोच चित्रपट आठवतो. मस्त बेअरींग आणि काही डायलॉग्जना कसलं अफाट टायमिंग जमलेय त्यात.

पोरगा काही कमावत नाही.
Submitted by पाथफाईंडर on 8 May, 2018 - 10:29 >>>>> keval acting karun kamaiche source nastaat tyanchyat, itar anek thikani paise guntvtaat.
Submitted by अपर्णा. on 8 May, 2018 - 10:04
>>
दिवा घ्या. अभिषेक प्रोकबड्डीच्या जयपूर पिंक पॅथरचा मालक आहे.
आणि तसाही मला तो "सरक" (ज्याचे नाव सगळ्यांना माहीत आहे) पेक्षा जास्ती आवडतो.

पोरगा काही कमावत नाही.> पा फा, तुमचे प्रतिसाद खरंच काहीच्या काही असतात बरेचदा.
Submitted by सस्मित on 8 May, 2018 - 10:28
>>
प्रतीसाद कळला नाही. आवडला नाही का?

अवांतर - पाफा, अभिषेक किती कमावतो याचा एक्झॅक्ट आकडा तुम्हाला समजला ना तर थक्क व्हाल. त्याच्याबद्दल अश्या टिंगलटवाळीच्या अफवा पसरवू नका Happy
Submitted by ऋन्मेऽऽष on 8 May, 2018 - 10:55
>>
थोडा धागा पेटवायचा प्रयत्न होता पण वाया गेला. Biggrin
रच्याकने बाळबच्चनचे समर्थन? आपला नायक चेंडूफळीमधे मग्न आहे म्हणून का?

नुसता कमावतो म्हणजे कर्तृत्ववान का?
आणि कंपरिटीवली बायको आणि बापापुढे काहीच नाही तो.

<<<आणि कंपरिटीवली बायको आणि बापापुढे काहीच नाही तो.>>>
नसेल, पण " कंपरिटीवली " (म्हणजे काय देव जाणे! फुक्कट इंग्रजी शब्द वापरण्याची हौस, "तुलनेने " म्हणता आले असते! ) भीक मागून जगणार्‍यांपेक्षा बरे ना!
नि अंबानी नि टाटा तरी काय, बिल गेट्स नि बेझोस च्या तुलनेने कमीच.

फुक्कट इंग्रजी शब्द वापरण्याची हौस,>>>लोल. अहो माझं सेमी इंग्रजी होत ना ☺️

भीक मागून जगणार्‍यांपेक्षा बरे ना! >>> 100% सहमत !!

नि अंबानी नि टाटा तरी काय, बिल गेट्स नि बेझोस च्या तुलनेने कमीच. >>> हा वेगळा विषय होईल, पण टाटा जास्त रिच आहे बिल गेट्स पेक्षा. तुलना संपत्ती ची असेल तर.

अभिषेकची तुलना अमिताभशी करत आहात...
पण मुळात अमिताभ तरी काय करत आहे.. कसल्या तरी मंजन फंजन आणि च्यवनप्राशच्या जाहीरातीच ना.. त्याच्याच चाहत्यांना त्याचा वीट आलाय Happy

असो, एका गोष्टीत मात्र अभिषेकने आपल्या वडिलांनाच नाही तर कित्येकांना मात दिली आहे,
ते म्हणजे विश्वसुंदरी पटकावली आहे Happy

अवांतराबद्दल क्षमस्व, हवे तर वेगळा धागा काढा, पण अभिषेकबद्दल मी काही उलटेसुलटे ऐकून घेऊ शकत नाही. तो आपला ईस्टाईल आई कॉन आहे Happy

मिस वर्ल्ड होती ती. युनिव्हर्स नाही.>> तुम्हाला ब्रम्हांड सुंदरी नव्हती असे म्हणायचे आहे का?

अमिताभचा अवतार "एम एफ हुसेन" सारखा दाखवला आहे. दाढी, केस इत्यादी तरी राष्ट्रवादी लोकांना खटकले नाही? आश्चर्य आहे Wink

मुसलमानांचे काहीच दाखवले नाही. त्यांच्यातले काहीतरी चांगले दा़खवल्याशिवाय सिनेमा कसा झाला? निदान कुणि चांगला मुसलमान मित्र तरी दाखवायचा.
हे काय हे? भाजप. सत्तेवर म्हणून का?

गुजराती दाखवला आहे म्हणून नाही मित्र दाखवला.. तिरस्कर हा काहीं गुजरातींच्या नसांमध्ये भिनलला आहे

अमिताभ अजुनहि पिकु मोड मधुन बाहेर नाहि आलेत. सुरुवातिचि dialogue delivery बन्गालि वळणाचि वाटते, केवळ सरनेममुळे वाटते कि गुज्जुभाई आहे.

मला ओके= वन टाईम वॉच वाटला. अमिताभ कुठल्याही अँगलने १०२ वाटला नाही. त्याच्यापेक्षा ऋषी कपूर वयस्कर, संथ आणि जास्त गुज्जू वाटतो. धीरुचं कॅरेक्टर अस्सल गुज्जू जमलंय मात्र.
शॉर्ट ठेवला पिक्चर हे एक बरं झालं नाहीतर बोअर मारला असता.

Pages