<strong>ग्राम गीता पुस्तक परिचय</strong> भाग १

Submitted by शशिकांत ओक on 25 March, 2018 - 12:38

ग्राम गीता पुस्तक परिचय भाग १
ग्रामगीता मुखपष्ठ.jpg

ग्रामगीता ऍपवर मराठीतील पुर्ण गीता वाचायला मिळते.
वंदनीय राष्ट्रीय संत श्री तुकडोजी महाराज विरचित युग परिवर्तन कार्य
मित्रहो,
नुकतेच एक ग्रंथराज वाचनात आले. त्याचा परिचय करून द्यावा आणि ज्यांना आधीपासून या ग्रामगीतेची महती ज्ञात आहे, त्यांना पुनःप्रत्ययाचा आनंद मिळावा ही इच्छा. अमरावतीच्या साहित्य रत्न सूदामजी सावरकरांच्या मार्गदर्शनाखाली कर्मयोगी संत श्री तुकाराम जी दादा गीताचार्य जन्मशताब्दीच्या निमित्ताने याचे विशेष संस्करण सन 2014मध्ये प्रकाशित केले गेले.
सुजन हो, दुमदुमवा कानोकानी, ही ग्रामगीतेची वाणी ।
बाह्यांग –
41 अध्यायाच्या 375 पानाच्या या गीतेची रचना विदर्भातील राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज यांनी ओवीच्या स्वरूपात आहे. आजकालच्या मराठी वाचकाला समजेल अशी सोपी व जवळची भाषा आहे. यात पाच अध्यायांचे एक असे आठ पंचक आहेत. शेवटचा अध्याय ग्रंथ महिमा आहे. व्यक्तिसमूहातून वाडी, खेडी, गाव आणि शहर बनते. यातून पुढे जिल्हे, राज्य आणि राष्ट्र बनते. या सर्वांच्या सामुहिक सहचरातून अनेक शक्ती, विचार आणि व्यवहार निर्माण होतात. प्राचीन काळपासून समाजधुरिणांनी याचा विचार करून जीवन पद्धती कशी असावी याची मांडणी केली. सामाजिक मापदंड, परंपरा, चालीरिती यातून ती मान्य होत गेली. त्यातून सामाजिक उन्नती झाली. मात्र काळानुसार मालिन्य आल्याने अनेक गोष्टींचा पुनर्विचार करून अनिष्ट व विघातक मांडणींना निरोप देऊन नव्याने समाजाला प्रेरणा द्यायला हवी असे अनेक विचारकांना वाटत राहिले. परंतु ते लेखनबद्ध करून समाजापुढे आचरणात आणायचे कार्य तुकडोजी महाराजांसारख्या लोकोत्तर व्यक्तीला करावे लागले. 22 जुलै 1953 ला आषाढी एकादशीच्या चंद्रभागेच्या स्नानपर्वाच्या कलकलाटात तुकडोजींना ध्यानावस्थेत साक्षात्कार होऊन याकार्याला स्फूर्ती मिळाली. नंतर विविध ठिकाणी वास्तव्यात, तर कधी मोटार-अग्निरथाच्या प्रवासातून त्यांचे हे गीतानिर्मितीचे कार्य होत राहिले. आणि 28 मे 1954च्या नारद जयंतीच्या दिवशी हा ग्रामगीता काव्याची निर्मिती संपन्न झाली सामान्यतः गीता म्हटले की जड शब्दात देव, आत्मा-परमात्मा, मोक्ष, जपतप, साधना आदि उपदेशाची घुट्टी पाजण्याची पाणपोई असे वाटून दुर्लक्ष केले जाते. नेमके ते सर्व या गीतेत नाही. मग हे काय असा प्रश्न साहजिकच पडेल म्हणून हा परिचय उपयोगी व्हावा. याचा परिणाम म्हणजे काळाच्या पुढे राहून अंधश्रद्धा मुक्त, अनिष्ट रूढीमुक्त, तंटामुक्त, व्यसनमुक्त, भ्रष्टाचारमुक्त समाज बांधणीला सरकारकडून आणि अन्य समाजसेवी संस्थांकडून प्रचंड कार्य होत राहिले. तरीही अनेक विचारी व जाणीव रुंदावलेल्या तरुणांच्या नजरेत ही ग्रामगीता आली तर आपल्या आधीच्या पिढीने आपल्याला काय काय करायला प्रेरित केले आहे याची जाणीव व्हावी म्हणून हा ग्रंथ परिचय.
सुरवातीच्या अध्यायात श्रोता व वक्ता यातील संवादातून ते म्हणतात,
संतमहात्यांचे हद्गत। देवाचा शुभ सृष्टीसंकेत। विशद करावया सरळ भाषेत। सुखसंवाद आरंभिला।। येथे श्रोती विचारले । ग्रामगीते प्रति लिहिणे झाले। त्यात संत देव कासया घातले। स्तुतिस्तोत्रे गौरवूनि?।।... काय देव म्हणता काम नोहे?। संता न भजता वाया जाय?। आशीर्वाद न घेता येतो क्षय। सत्कार्यासि?। कासयासि मध्यस्थता। उगीच देव धर्माची कथा?। करावी सर्व आपण गाथा। मारावी माथा देवाच्या?।।….
यावर ते म्हणतात - देव म्हणजे अतिमानव। मानवचा आदर्श गौरव। त्याचे कार्य ध्यानी राहो। स्फूर्ति यावया पुढिलांसि।। येथे मुख्य देवाचे व्याख्यान। नाही केले यथार्थ पूर्ण। देवासि पुरुषोत्तम समजून। वागा म्हणालो सर्वांना।। मित्रहो! गाव व्हावे स्वयंपूर्ण। सर्व प्रकारे आदर्शवान। म्हणोनि घेतले आशीर्वचन पूर्वजांचे।। ग्रामातील सर्वजन। होवोत सर्वसुखी संपन्न। घेऊ नये कुणाचा प्राण। समाजस्थिती टिकावी।। आम्ही सर्वचि संतुष्ट राहू। सर्वमिळोनि स्व खाऊ। राबू सर्व, सुखे सेवू जे जे असेल ते सगळे।। ... आमची संपत्ति नसे आमची। आमचि संतति नसे आमची। कर्तव्यशक्तिही नसे आमची। व्यक्तिशः उपभोगार्थ।। हे सारे गावाचे धन। असो काया वाचा बुद्धि प्राण। ऐसे असे जयाचे धोरण। तो नास्तिकही प्रिय आम्हा।। लोकांपुढे विशाल ज्ञान। ठेवाया अत्युच्च आदर्श कोण?। म्हणोनि देवाचे नामाभिमान। घेतले विशाल भावाने।।...
भाग 1 समाप्त... पुढे चालू...
.....

Group content visibility: 
Use group defaults