“जसराज काय गाणी बोलले?”

Submitted by मधु-रजनी on 12 December, 2017 - 20:06

बदल हाच जगाचा नियम आहे. तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळे तर बदलाचा वेग अजूनच प्रचंड वाढतो आहे. हा बदल सतत कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्या समोर येतो आहे. उपयोगी आणि निरुपयोगी नवनवीन माहिती दर मिनिटाला WhatsApp किंवा फेसबुकमार्गे फोनवर दिसते आहे. फोनमधून डोकं वर काढावं तर चोवीस तास भडक बातम्या ओकणारी खाजगी टीव्ही चॅनेल्स आहेत. वृत्तपत्रांची पण तीच परिस्थिती. या मधली मराठी भाषा ऐकल्यावर किंवा वाचल्यावर लक्षात येतं की गेल्या वीस वर्षात मराठी खूपच बदलली आहे. मराठी भाषेतल्या योग्य आणि चपखल शब्दांचा वापर कमी होताना दिसतो आहे. असं का होतंय ते कळत नाही. कदाचित सगळ्या लोकांना समजावं म्हणून भाषा बिघडवायची असं काही टीव्हीवाल्यांनी परस्पर ठरवलं असावं का? किंवा त्यांनाच अजून मराठी भाषेची ताकद समजलेली नाही?

मराठीत अनेक शब्द असे आहेत की त्यांना सांस्कृतिक किंवा गर्भित अर्थ आहे. ‘नारळ’ आणि ‘श्रीफळ’ या शब्दांचा अर्थ जरी एकच असला तरी दोन्हीची छटा वेगळी आहे. ‘पाणी’ आणि ‘तीर्थ’. ‘तांदूळ’ आणि ‘अक्षता’. अजून कितीतरी उदाहरणं आहेत. शब्दाचे अर्थ एकच, पण भाव वेगळे, छटा वेगळी. भाषेची शुद्धता ही प्रत्येकाच्या दृष्टीनी वेगळी असू शकते. पुण्याची मराठी भाषा शुद्ध मानायची की कोल्हापूरची? की नागपूरची? की अमुक एक लोकांचा समूह बोलतो ती मराठी शुद्ध मानायची? त्यामुळे भाषेची शुद्धता जरी सापेक्ष असली तरी मराठी भाषेतले योग्य ते शब्द योग्यवेळी वापरायलाच हवेत. तसं केलं नाही तर नुकसान आपलं आणि मराठी भाषेचं आहे.

काही वर्षांपूर्वीचा एक प्रसंग आठवला. कसल्या तरी कारणानी लोक जमले होते. वेगवेगळ्या क्षेत्रातले. खाता खाता मंडळी काहीतरी गप्पाटप्पा करत होती. एकंदरीत थोडासा कंटाळवाणा प्रसंग होता. राजकारण, शेअर मार्केट, हिंदी सिनेमा असे ठराविक विषय झाले. पंडित जसराज यांचा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम तेव्हा नुकताच झाला होता. त्या कार्यक्रमाचा गप्पांमध्ये विषय निघाला. कोणीतरी एक जण त्याच्या मित्राला म्हणाला,

“जसराज काय गाणी बोलले रे त्या कार्यक्रमात?”

स्टीलच्या ताटाखाली चुकून बारीक खडा आला तर ओरखड्याच्या आवाजानी जसा अंगावर सर्रकन काटा येतो तसं माझं झालं. कर्णकर्कश्य! मी आवंढा गिळला आणि दीर्घ श्वास घेतला.

“काय गाणी बोलले” हे काय वाक्य झालं?

गाणी ‘बोलायची’ नसतात. गाणी ‘गायची’ असतात. किंवा गाणी ‘म्हणायची’ असतात. ‘बोललेला’, ‘गेलेला’, ‘केलेला’ ही कुठल्या मराठी भाषेची निशाणी? त्याकडे दुर्लक्ष केलं, पण जसराज ‘गाणी’ म्हणतात हे ऐकणं म्हणजे अतिच झालं. पंडित जसराज ‘चीज’ म्हणतात, ‘ख्याल’ म्हणतात, ‘तराणा’ म्हणतात, ‘भजन’ म्हणतात, अगदी ‘ठुमरी’ देखील म्हणतात. पण ते ‘गाणी’ नाही म्हणत. शब्दांची छटा नीट कळायला हवी.

नुसतं “हिरव्या रंगाची पानं होती” असं म्हणून कसं चालेल? पानाच्या रंगांमध्ये कितीतरी वेगवेगळ्या छटा आहेतच की. कोवळ्या पानांचा ताजा हिरवा रंग वेगळा आणि जून झालेल्या पानांचा काळसर गडद हिरवा रंग वेगळा. श्रावणातल्या पावसानी सह्याद्रीवर आलेल्या गवताच्या गालिच्याचा हिरवा रंग. केळीच्या पानाचा हिरवा रंग. मेहेंदी भिजवल्यावर होणारा हिरवा रंग. असे कितीतरी प्रकार. सगळी पानंच, पण हिरवा रंग मात्र वेगवेगळा. तश्याच गाण्यातही खूप वेगवेगळ्या छटा आहेत. आणि मराठी भाषा त्या सगळ्या छटा दाखवायला समर्थ आहे.

आता हेच बघा ना. ‘गाणं’, ‘गीत’, ‘पद’ आणि ‘चीज’ हे चार जवळचे शब्द. प्रथम दर्शनी वाटेल, या शब्दांमध्ये काय एवढा फरक आहे? सगळ्या शब्दांचा अर्थ ‘गाणं’ हाच आहे. हे बरोबर असलं तरी हे चारही शब्द वेगळ्या छटा आणि वेगळे भाव दाखवतात. कसे?

गाणं
‘गाणं’ हा शब्द ‘गाणं’, ‘गीत’, ‘पद’ आणि ‘चीज या चार शब्दांचा लघुत्तम साधारण विभाजक म्हणा हवं तर. गाणं म्हणजे थोडक्या वेळात संपणारं. या शब्दाच्या व्याख्येला फार मोठा वाव आहे. गाण्याला विषय, भाव, रस, ताल, सूर, आणि काव्य या कशाचंच कडक असं बंधन नाही.

“अल्ला तेरो नाम, ईश्वर तेरो नाम” असं नितांतसुंदर भावपूर्ण हे गाणं, आणि “चार बोतल व्होडका” असं पूर्णपणे भावहीन देखील गाणंच.

“मेघा छायें आधी रात, बैरन बन गयी निंदिया” असं काव्यमय गाणं, आणि “झ झ झ झोपडी में, च च च चारपाई” याला काव्य म्हणावं का असंही गाणंच.

“हर घडी बदल रही है रुप जिंदगी, छाव है कभी, कभी है धूप जिंदगी” हे छंदबद्ध गाणं आणि, “मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा है” सारखं मुक्तछंद ही गाणंच.

“रघुवर तुमको मेरी लाज” असं भक्तीरस पूर्ण गाणं, आणि “मेरा रंग दे बसंती चोला” असं वीररस पूर्णही गाणंच.

“चुरा लिया हैं तुमने जो दिलको” असं तालानी सुरु होणारं गाणं, आणि ताल कुठे असं शोधावं लागणारं “आती क्या खंडाला?” हे पण गाणंच.

लतादीदी अतिशय सुरात म्हणतात ते गाणं, आणि हिमेश रेशमिया म्हणतो ते ही (दुर्दैवानी) गाणंच!

“आने वाला पल, जाने वाला है” असं जीवनावरचं तत्वज्ञान हा विषय असलेलं गाणं, तसंच “मधुबन में राधिका नाचे रे” असं गोकुळाचं वर्णन हा वेगळा विषय असलेलं गाणं.

इतका प्रचंड ‘गाणं’ या शब्दाचा विस्तार. सगळी सरमिसळ. परीक्षेत देतात तसे गुण द्यायचे झाले तर काही गाण्यांना शंभरपैकी शंभर गुण सहज देता यावेत, आणि काही गाण्यांना शून्य गुण देखील जास्त वाटावेत. इतकी गाण्यांमध्ये तफावत.

म्हणजे ‘गाणं’, ‘गीत’, ‘पद’ आणि ‘चीज’ या चार शब्दांना खाण्याची उपमा दिली तर?

‘गाणं’ हे ‘स्नॅक्स’ या खाद्यप्रकारासारखं. आटोपशीर आणि पटकन खाता येणारं. प्रत्येक स्नॅकची चव, स्वाद, सुगंध, पोत, मूड, प्रेझेंटेशन, खायची वेळ हे सगळं वेगळं. प्रचंड व्हरायटी! स्नॅक्स म्हणून कितीतरी गोष्टी आपण खातो. हातगाडीवर कागदाच्या पुडीत बांधून मिळणारे खारे दाणे, फुटाणे. मीठ लावलेली सुकी बोरं. उग्र वासाचे पण तरीही चविष्ट फणसाचे गरे. गरमागरम पोहे, उपमा. आधल्या दिवशी उरलं-सुरलं वापरून केलेली फोडणीची पोळी नाहीतर फोडणीचा भात. उडप्याच्या हॉटेलातली इडली, डोसा, उत्तप्पा. मिसळ, वेफर्स, सँडविच, असे कितीतरी स्नॅक्सचे प्रकार. बाकरवडी, फरसाण, पाणीपुरी, दाबेली. गोडामध्ये पेढे, बर्फी, गोळ्या, बिस्किटे, नानकटाई, चॉकलेट, लस्सी. अक्षरशः शेकडो प्रकारचे स्नॅक्स आहेत आणि आपण ते आवडीनी खातो. तसेच गाण्याचे शेकडो प्रकार. प्रत्येकानी आपल्या मूड प्रमाणे आणि आवडीप्रमाणे स्नॅक्स खायचे.

सात्विक आहार शरीर शुद्ध करणारा आणि मनाला शांती देणारा म्हणतात. कोणाला सात्विक गुणाची ताजी साबुदाणा खिचडी, ताजी फळे, दूध, मध, काजू, बदाम, खारीक असे पदार्थ आवडतील. त्याचप्रमाणे कोणाला सात्विक गुणांची आरती, भजन, प्रार्थना, धावा ऐकायला आवडेल.

राजस पदार्थ हे शरीर आणि मनाला प्रेरित करणारे मानले जातात. चहा, कॉफी, फोडणी-कांदा-लसूण घातलेले आणि तळलेले स्नॅक्स. बरीचशी हिंदी-मराठी चित्रपटातली गाणी या प्रकारात मोडणारी. उत्तेजित करणारी आणि तजेला देणारी.

तामसी पदार्थ शरीर आणि मनाला जडत्व देणारे. मन भरकटायला लावणारे. खूप तिखट, तेलकट, अति गोड, मांसाहारी स्नॅक्स सारखे. त्याचा अतिरेक झाला की सेवन करणाऱ्याचा स्वभाव चिडचिडा, रागीट, बेचैन होतो म्हणतात. तशीच रॅप, रॉक, फ्युजन ही ‘गाणी’.

थोडक्यात म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती, तितक्याच प्रकारची गाणी. कोणाला आवडणारी आणि न आवडणारी. समाधान देणारी आणि न देणारी. पण प्रत्येकासाठी ‘गाणी’ आहेतच, अगदी स्नॅक्स सारखी.

गीत
गीत, पद, चीज हे सगळे गायनाचे प्रकार, त्यातलं ‘गीत’ हे ‘गाण्याच्या’ सगळ्यात जवळचं भावंडं. गीत हे गाण्यासारखंच चार-पाच मिनिटात संपणारं. गीतालाही गाण्यासारखे बरेच विषय चालतात, आणि गाण्यासारखे गीताचे बरेच प्रकार आहेत - भावगीत, प्रेमगीत, विरहगीत, अंगाई गीत, समरगीत, राष्ट्रसन्मान गीत. सुर आणि ताल हे तर सगळ्या संगीताचे प्राण, पण गीत या प्रकाराला काव्य आणि त्या काव्यामधल्या भावना फार महत्वाच्या.

काव्य लिहिणारी, त्या काव्याला संगीत देणारी आणि ते संगीतबद्ध केलेलं गीत गाणारी अश्या तीनही व्यक्तींची जबरदस्त तयारी हवी. त्या गोष्टींचा अभ्यास झालेला असावा. गाण्यासारखं प्रेझेंटेशन भपकेदार नसलं तरी गीताचा दर्जा उत्तम हवा. कस चांगला हवा.

‘गाणं’ हे स्नॅक्स सारखं आहे असं म्हणलं तर ‘गीत’ हे घरी बनवलेल्या जेवणासारखं म्हणा हवं तर. वरण, भात, भाजी, पोळी आणि एखाद्या चटणीसारखं. मोजके आणि सुटसुटीत पदार्थ. पण ते रुचकर, सकस, गरमागरम आणि मनापासून तयार केलेले.

म्हणजे स्वयंपाक करणाऱ्या गृहिणीला कधी-कधी रोजच्या जेवणाचा कंटाळा येत असेलही, पण तिच्या हातून नीरस आणि बेचव अन्न कधी बनत नाही. कंटाळा आला असला तरी तिचा रोजच्या सवयीनी हात बसलेला असतो. त्यामुळे ती पटकन घरी असलेली भाजी चिरून तिला फोडणी घालून साधीच पण रुचकर ओली किंवा सुकी भाजी तयार करते. भाजी तयार होतानाच कुकरमध्ये डाळ-तांदूळ शिजवून झाले की डाळ सारखी करून त्यात हिंग, हळद, मीठ घालून वरण तयार करते. ते झालं की झरझर लाटून गरमागरम पोळ्या ताटात वाढते देखील. त्याबरोबर काकडी, गाजर अशी काहीतरी कोशिंबीर, नाहीतर बाटलीतलं लोणचं ताटात वाढते. म्हणजे सुरुवात केल्यापासून एका तासाच्या आत तिचा गरम आणि रुचकर स्वैपाक तयार होऊन घरातली मंडळी जेवायला देखील बसलेली असतात. असाच आटोपशीरपणा आणि सुटसुटीतपणा गीतामध्ये.

चांगली अर्थ असलेली आशयसंपन्न कविता घ्यायची. तिला चांगल्या तालासुरात बांधायची. मोजकेच साथीदार वादक बरोबर घ्यायचे. रोजच्या जेवणात जसा वरण-भात हवा, तसं पेटी-तबला असायलाच हवे. भाजी-पोळी या ताटातल्या जोडगोळीसारखी, उत्तम चाल आणि गायिकेचा सुरेल आवाज ही जोडगोळी तितकीच महत्वाची. या चार मुख्य पदार्थांचा भक्कम पाया केल्यावर कवितेतला जो भाव असेल त्याप्रमाणे साथीला एखाद-दुसरं वाद्य घ्यायचं. कधी टाळ, तर कधी घुंगरू. कधी संतूर, तर कधी सतार. अगदी रोजच्या जेवणात मूडप्रमाणे चवीला आपण लोणचं, चटणी, कांदा, पापड, तूप-साखर नाहीतर गुळंबा घेतो तसं.

गीतामध्ये सिनेमाच्या गाण्यासारखा ऑर्केस्ट्रा नाही. वाद्यांचा भलामोठा ताफा नाही. काव्य आणि त्या काव्यातली भावना थोड्या वाद्यांमध्येही श्रोत्यांपर्यंत पोचवून त्यांना तृप्त करायची ज्याची ताकद असते, ते म्हणजे ‘गीत’. “स्वये श्री रामप्रभू ऐकती” पासून “पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा” ते अगदी “गा बाळांनो श्रीरामायण” अशी रामायण कथा सांगणारी छप्पन गीते, म्हणजे गीतांचा अत्युच्च बिंदू.

‘गीत’ या प्रकारची वेगवेगळ्या भाषांमध्ये कितीतरी उत्तम उदाहरणं आहेत. “धीरे से आ जा रे अखियन में, निंदिया आ जा रे आ जा” असं अंगाई गीत. “चांदोबा चांदोबा भागलास का?” असं बालगीत. “घननीळा लडिवाळा झुलवू नको हिंदोळा” असं शालीन भावगीत. “वेदमंत्रांहून आम्हा वंद्य वंदे मातरम” असं प्रखर देशभक्तिगीत. पंडित किशोर कुमारांच्या आवाजातलं “कुछ तो लोग कहेंगे, लोगोंका काम है कहेना” हे जननिंदेला तोंड कसं द्यायचं सांगणारं गीत. किंवा मनावर आवर घालणारं उस्ताद रफींनी गायलेलं गीत “मन रे तू काहे ना धीर धरे”. आनंद बक्षींचे गीत “जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मकाम”.

अशी एकापेक्षा एक उत्तम अर्थपूर्ण आणि विचारपूर्ण गीतं. मनाला शांति देणारी. स्वतःच्या आत पाहायला लावणारी.

पद
‘पद’ हा नाटकात आढळणारा गायनप्रकार. त्याची मजा फारच वेगळी. ‘पद’ हे लग्नमुंजीतल्या जेवणावळीच्या स्वैपाकासारखं. ते करायला कसलेल्या तयारीचा अनुभवी बल्लवाचार्य हवा. पदाला वेळेचं बंधन नाही. एकेक पद गायक त्याच्या कल्पकतेप्रमाणे कितीतरी वेळ रंगवू शकतो. पदात काव्याचं महत्व गीतापेक्षा थोडं कमी होतं, कारण पदात महत्व असतं ते म्हणजे गायकाच्या तयारीला, त्याच्या आवाजाला, त्याच्या सुरेलपणाला, आणि मुख्य म्हणजे गायक ते पद कसं फुलवतो या कलेला.

पद फुलवायचं म्हणजे पदाची एक ओळ घ्यायची आणि वेगवेगळ्या गायन अलंकारांनी ती नटवायची. तीच ओळ दहा-पंधरा वेळा गाताना प्रत्येकवेळी त्यात काहीतरी नवीन हवं. खटका हवा, मुरकी हवी, गमक हवं, तान हवी, लयकारी हवी, तालाशी खेळ हवा. प्रत्येकवेळी ती ओळ नवीन वाटली पाहिजे. त्याक्षणी सुचेल असं काहीतरी त्या ओळीत हवं, पण ते मात्र तालात, सुरात आणि प्रेक्षकांना रंजक वाटेल असं हवं. तासनतास एका जागी उभं राहून नाटकातली वेशभूषा सांभाळत पदाचे सूर सांभाळायचे. बरीचशी पदं रागांवर आधारित असल्यामुळे पद गाताना रागाचं शास्त्र सांभाळायचं. असं सूर, ताल आणि भरघोस अलंकारांनी नटलेलं भव्यदिव्य गीत म्हणजे ‘पद’!

रुखवताच्या जेवणासारखं पदात खूप काही हवं. वेगवेगळ्या पदार्थानी ताट भरलेलं असावं तसं पदात विविधता आणि रेलचेल हवी. ताटाभोवती महिरप किंवा रांगोळी काढतात तसं पदाचं प्रेझेंटेशन महत्वाचं. पदाभोवती वाद्ये हवी आणि वाद्यांची चोख साथ हवी. नटेश्वराच्या मूर्तीसमोर उदबत्त्यांचा सुवास दरवळला पाहिजे. गरमागरम सुग्रास मसालेभात, अळूची भाजी, मठ्ठा आणि चटण्या खाताना सगळ्या पंक्तीची भूक वाढली पाहिजे. त्याबरोबर जिलबी किंवा श्रीखंडाच्या घासाप्रमाणे ताना, सुरांची फेक आणि काव्यप्रसंगाचा भाव असं जमलं की श्रोत्यांची अतृप्ती अजून वाढायला लागली पाहिजे. मग अश्यावेळी यजमान आग्रह करून खाणाऱ्याच्या ताटात जसं दोन जिलब्या वाढतो आणि खाणारादेखील त्या केशरयुक्त जिलब्या अधीरतेनी उचलून त्याचा आस्वाद घ्यायला सुरुवात करतो, तसं तयारीच्या गायकाचं पद सुरु झालं की श्रोत्याला किती ऐकू आणि साठवू असं होतं.

पदांना अतिशय लोकप्रियता मिळाली ती बालगंधर्वांमुळे. तेच पदांचे खरे सम्राट. त्यांनी गायलेली “कशी या त्यजू पदाला”, “खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी”, “जोहार मायबाप जोहार”, “मला मदन भासे हा”, “नाथ हा माझा मोही”, “वद जाऊ कुणाला शरण” अशी अनेक पदं आज शंभर वर्षांनंतरही लोकप्रिय आहेत. कुमारजींनी गायलेलं “उठी उठी गोपाला”, दीनानाथांचं “कठीण कठीण कठीण किती, पुरुष हृदय बाई”, वसंतरावांचं “कर हा करी धरिला शुभांगी”, अभिषेकीबुवांचं “घेई छंद मकरंद”, “नच सुंदरी करू कोपा”, “सर्वात्मका सर्वेश्वरा”. उत्तमोत्तम पदांची शेकडो उदाहरणं आहेत. एकच पद अनेक गायकांनी गायल्याची खूप उदाहरणं आहेत. प्रत्येक गायकाचं त्याचं स्वतःचं त्यात काहीतरी ओतत असल्यामुळे ती मजा अजून वेगळी.

पद ऐकणारा श्रोताही तसा असावा लागतो. नवरा-नवरीवर अक्षत टाकून लगेच पंधरा-वीस मिनिटात जेवण उरकून ऑफिसला पळणारा चाकरमाना लग्नाच्या साग्रसंगीत जेवणाचा आनंद घेऊ शकत नाही. तसंच घाईत असलेला श्रोता पद ऐकायला कुचकामी. गाण्यातला आनंद घेता येण्यासाठी श्रोत्याला उसंत हवी. आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे जशी खवैय्याला उत्तम खाण्याची चटक असते तशी श्रोत्याला सुरांची चटक हवी! पटकन पोट भरता कामा नये. मग लग्नाचं साग्रसंगीत आणि अत्यंत चविष्ट जेवण झाल्यावर जेवणाऱ्याची जशी ब्रम्हानंदी टाळी लागते, तसंच उत्तम पद ऐकल्यावर श्रोता दोन-चार तास तरी त्याच आनंदात तृप्त असतो.

लग्नसमारंभ हा शुभप्रसंग असल्यामुळे त्यावेळी अशुभ खाद्यपदार्थ टाळायचे असतात. लग्नात जसे श्राद्ध-पक्षाचे पदार्थ वर्ज्य, तसे पदात सुद्धा काही गोष्टी वर्ज्य आहेत. पदात सवंगपणा नको. थिल्लरपणा नको. संगीताच्या शुचितेला आणि खरेपणाला धक्का लागायला नको. वाद्यांचा दणदणाट नको. वादकांनी एकमेकांवर किंवा गायकावर कुरघोडी करायला नको. गळ्याची तयारी आहे म्हणून उगीच पद लांबवत कसरती करणंही नको. ‘असा मी, असामी’ मधला प्रसंग आठवा. ‘लग्नाला जातो मी’ हे पद खूप लांबवणाऱ्या गायकाचा.

हे सगळं तंत्र जर जमलं नाही तर लग्नाच्या जेवणात क्वचित कधी पदार्थ फसलेला असतो तसं व्हायचं. मऊ पडलेली जिलबी, आंबट झालेलं श्रीखंड, वास यायला लागलेल्या खोबऱ्याची चटणी, किंवा किंचित उतरलेली आहे काय अशी शंका येणारी रसमलई. एखादा पदार्थ थोडा जरी खराब असला तरी पंक्तीतल्या माणसाला समाधान मिळणार नाही. एखादा खवैय्या तर संपूर्ण जेवणाचा विचका झाला असा निराश होईल. तसा जाणकार श्रोता पद भरकटलं किंवा चांगल्या पदाचं वाटोळं झालं असं म्हणून दुःखी होईल.

‘पद’ या शब्दामध्ये एवढा अर्थ भरलेला असताना त्याला नुसतं ‘गाणं’ असा शब्द वापरायचा म्हणजे मराठी भाषेवर केवढा मोठा अन्याय होईल.

चीज
‘चीज’ ही एक वेगळीच चीज आहे! ‘चीज’ या शब्दाचा एक अर्थ म्हणजे शास्त्रीय गायन करताना गायलेल्या चार ओळी. प्रत्यक्षात ‘चीज’ म्हणजे कठोर व्रत करून गायन साध्य करायच्या कलेचा मिळणारा प्रसाद. जणूकाही सोळा सोमवार किंवा एकवीस चतुर्थी या सारखं कडक व्रत-वैकल्य करून पूर्ण झालं की त्याच्या उद्यापनाच्या दिवशी नेवैद्याचा स्वयंपाक म्हणजे ‘चीज’.

एका तासात शब्द चालीत बसवले, त्यानंतर अजून एक तासभर सराव करून ती चाल घट्ट केली की ‘गाणं’ तयार होतं. चीजेचं तसं नाही. मुळात चीज गायची पात्रता येण्यासाठी कित्येक वर्षं कठोर संगीत साधना करायला पाहिजे. आवाज स्थिर व्हायला पाहिजे. नुसता नीट षड्ज लागेपर्यंत कित्येक महिने लागून जातात. मग एकेक सूर शिकत, पहात आणि अनुभवत पुढे जायचं.

सुरांची ओळख झाली की त्यापुढे शास्त्रीय संगीताचा अथांग सागर, अगदी प्रशांत महासागरासारखा. त्याच्या काठावर उभे राहून नुसता सागराच्या भव्यतेचा अंदाज यायला परत अनेक वर्षं जाणार. एवढ्या मोठ्या समुद्राच्या काठावरून थेट पाण्यात पोहायला जायचं धाडस कोणाचं नसतं. त्यासाठी अनुभवी गुरूच पाहिजे. गुरुनी शिष्याला समुद्राची ओळख करून देता देता समुद्र ओळखायची ‘नजर’ दिली पाहिजे. हे सगळं जमून समुद्रात पोहायला जमणारे अगदी थोडे. आणि जमलं तरी किनाऱ्यापासून फार आतपर्यंत न जाणारे. पण एखादा भीमसेन, कुमार किंवा एखादी किशोरी जन्मतःच दैवी नजर घेऊन येतात आणि त्या अथांग समुद्रावर सत्ता गाजवतात.

आपल्यासारख्या समुद्रापासून लांबवर कोरड्या जमिनीवर राहणाऱ्या रहिवाश्याना त्या अथांग समुद्राची निळाई, त्याची खोली आणि त्यातलं वैभव ज्या सुरांनी गायक सांगतो ते गायन म्हणजे ‘चीज’. एवढ्या मोठ्या समुद्राची गाथा पाच-दहा मिनिटात कशी वर्णन करावी? शक्यंच नाही! त्यामुळे चीजेला वेळेचं बंधन नाही. फक्त चार ओळींची चीज गाणारा तासभरदेखील गाऊ शकतो. तिथे घाई गडबड चालायची नाही.

चीजेला खूप बंधनं आहेतही आणि नाहीतही. चीज गाताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक सूर शंभर टक्के शुद्ध सोन्यासारखा हवा. कारण सुरांशी एकरूपता हेच मुळी गायकाचं साध्य असतं, अगदी कठोर व्रत करणाऱ्या उपासकासारखं. ईश्वरप्राप्ती हेच ध्येय. त्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी कमीच पडायचे.

सोळा सोमवार किंवा एकवीस चतुर्थी अश्या कठोर व्रताच्या उद्यापनासाठी पहाटे उठून स्नान करून शुचिर्भूत झाल्यावर आधी पूजा करायची. सोवळ्यानी स्वैपाक करायचा, तो ही पूर्णपणे निर्जल उपास करून. स्वैपाकातला प्रत्येक घटक शुद्ध, सात्विक आणि स्वतः बनवलेला. स्वैपाक चालू असताना सतत ईश्वराचं स्मरण करत राहायचं. सुरांची शुद्धता मनातल्या शुद्धतेसारखी कायम ठेवायची. नैवेद्यासाठी मोजकेच पदार्थ करायचे. भगर नाहीतर साबुदाण्याची खिचडी, खीर, पंचामृत, मोदक असे थोडेच आणि सात्विक पदार्थ, अगदी चीजेतल्या ओळींसारखे. दोन ओळींची अस्ताई आणि दोन ओळींचा अंतरा. बस. मोजून चार ओळी.

ताटात उगीच आंबट, मसालेदार, तिखट, चमचमीत भारंभार पदार्थ नाहीत; तसंच चीजेतले शब्द शांत आणि मर्यादापूर्ण. उगीच उठपटांग शब्द नाही आणि भावरसांची सरमिसळ नाही. चीजेत भावही दोन प्रकारचे. सगळ्यात जास्त करून चीजेतून प्रकट होणारा भाव ईश्वरभक्ती. दुसरा भाव म्हणजे विरह, कधी ईश्वराचा आणि कधी प्रियकराचा. चीजेत शब्दांची गर्दी नाही आणि शब्दांचं महत्वही तसं कमीच. शब्दाला भाव असलेच पाहिजेत असंही नाही. पण ते शब्द अश्या सुरांमधून दाखवून द्यायचे की शब्द असला नसला तरी चालून जावं, तराण्यात होतं तसं. ते सूरच असे भरून चीज तयार करायची की पदार्थातून ईश्वरदर्शन झाल्याशिवाय राहणार नाही.

चांदीच्या ताटात त्या मोजक्याच पण सात्विक पदार्थांचा नेवैद्य देवाला दाखवायचा. तो नेवैद्य म्हणजे शास्त्रीय संगीत साधकाने गायलेली ‘चीज’. तो प्रसाद सगळ्या उपस्थित भक्तांना वाटायचा आणि त्यांनी तो भक्तिभावाने ग्रहण करायचा. उद्यापन सोहळ्याला येणारे लोकसुद्धा सात्विक आणि विचार करून बोलावलेले असतात. प्रसादाला आलेली व्यक्ती वेगळी आणि हातगाडीवर चायनीज खाणारी व्यक्ती वेगळी. तसंच फिल्मी ‘गाणं’ ऐकणारा वर्ग वेगळा आणि ‘चीज’ ऐकणारा वर्ग वेगळा. त्यात कोणी कमी-जास्त नाही, फक्त प्रकृतीमध्ये फरक एवढंच.

सत्यनारायणाच्या प्रसादाला किंवा उद्यापनाला लोक जसे भक्तिभावाने येतात तसेच चीज ऐकणारे सुरांच्या भक्तिभावात बुडालेले. त्यांची श्रद्धा फक्त शुद्ध सुरांच्या तरंगांवर आणि आज स्वररूपी ईश्वरदर्शन होईल यावर. चीज जर जमली असेल तर त्याचा अंमल ऐकणाऱ्यावर फार काळ राहणारच. कित्येक वर्षांनंतरही ती चीज श्रोत्याला नीट आठवते, अगदी साक्षात देवाचं दर्शन झाल्यासारखी.

चीजेच्या शब्दाला महत्व कमी असल्यामुळे चीज ऐकायची म्हणजे खरंतर राग ऐकायचा. पण तरी काही चीजा कानावर पडून बऱ्याच प्रचलित झाल्या आहेत. उदाहरणार्थ किशोरीताईंची भूप मधली “सहेला रे” ही चीज. यमनमध्ये बऱ्याच गायकांनी गायलेली “ए री आली पियाबीन”. सिनेमामुळे जास्त परिचित असलेली अहिर-भैरव मधली चीज “अलबेला सजन आयो रे”. आपल्या सुदैवानी हिंदुस्थानात अनेक दिग्गज होऊन गेले आहेत आणि होत आहेत. त्यांची कुठलीही चीज ऎका. ईश्वराच्या जवळ घेऊन जाणारच! ही ‘चीज’ या शब्दाची करामत.

तात्पर्य काय, तर वरकरणी सारखे दिसणारे असले तरी इतके प्रचंड गर्भितार्थ ‘गाणं’, ‘गीत’, ‘पद’ आणि ‘चीज’ या शब्दांमध्ये भरले आहेत. अशी समर्थ आणि समृद्ध मराठी भाषा असताना योग्य शब्द योग्य तसा वापरण्याची जबाबदारी आपली आहे. संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदास, स्वातंत्र्यवीर सावरकर, शब्दप्रभू गदिमा, कुसुमाग्रज, शांताबाई या सारख्या तेजस्वी सरस्वतीपुत्र आणि सरस्वतीकन्या यांनी घातली तशी भाषेत भर घालणं हे काही प्रत्येकाचं काम नाही. पण निदान पूर्वजांनी दिलेली भाषाही आपल्याला नीट सांभाळता आली नाही तर करंटेपणा आपला!

--------------

ता. क.: विचार करून मराठी भाषा वापरतात त्यांना हे लिखाण कळणारच आहे. पण त्या वाचकांच्या पलीकडे पोचावं म्हणून जाणूनबुजून या लेखात थोडे इंग्रजी शब्द वापरले आहेत. टार्गेट ऑडियन्स डोळ्यासमोर ठेऊन त्यांना समजेल अश्या भाषेत मेसेज द्यावा हा मार्केटिंगचा सिद्धांत आहे म्हणे!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही लिन्क बघून घ्यावी जरा. विदर्भातच किती भाषा आहेत. आणि वेगवेगळ्या

http://glottolog.org/resource/languoid/id/varh1239

ह्या खालच्या लिंकवर बरोब्बर १०० वर्षापूर्वीची वर्‍हाडी मराठी ऐकायला मिळेल. आज शंभर वर्षांनीही ही भाषा अशीच शुद्ध आहे. आम्ही आजही ही आणि अशीच भाषा आमच्या भागात बोलतो. एक कणाचाही फरक नाहीये. आम्ही अजून आमची भाषा अशीच शुद्ध ठेवली आहे.
http://lsi.uchicago.edu/lsi/5494AK (खूप हळवी कथा आहे ही)
http://dsal.uchicago.edu/lsi/5493AK

आणि आता ही १०० वर्षापूर्वीची पुण्यातली मराठी भाषा..... आजही पुण्यात अशीची अशीच भाषा बोलली जात असेल तर सांगा बुवा कोणीही.....
http://lsi.uchicago.edu/lsi/5542AK

बाकी पुढे बोलू, जमलं तर.

(दोन्ही नमुने १०० वर्षापूर्वी जॉर्ज गॅरिसन ह्या इंग्रज अधिकार्‍याने ध्वनिमुद्रित केलेले आहेत.)

http://dsal.uchicago.edu/lsi/search/node/marathi

वरील लिंकवर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या बोलीभाषांचे १०० वर्षापूर्वीचे रेकॉर्डेड स्पेसिमेन आहेत. इच्छुकांनी आपआपल्या भागातल्या भाषा कशा होत्या आणि आता कशा आहेत याची तुलना करुन आनंद घ्यावा.

सायोच्या पोस्ट चा जातीशी संबंध कुठे दिसला नानाकळा तुम्हाला? मी दोन वेळा वाचली पण काहीच कळले नाही.

मला वाटत या मुळ लेखातील मुद्दा काहीस वेगळा आहे..
तो मुद्दा भाषा शुध्द वा अशुध्द या विषयी नसुन... भाषेच्या प्रतिभे विषयी तिच्या प्रगल्भ ते विषयी आहे..

सर्व प्रथम - कोणतीही भाषा शुध्द वा अशुध्द असत नाही.. भाषे मध्ये हे म्हणजे अशुध्द असे कोणतेच नियम नसतात. जे नियम आहेत ते व्याकरणाचे असता.. त्याविषयी वेगवेगळ्या धाग्यावर प्रतिसाद देउन लिहल आहे...

पण भाषे मधे एकादी वस्तु वा क्रिया सुचीत करायला एकादा मुळ शब्द असतो. व त्या वस्तुच्या वापरानुसार वा ति क्रीया कोण, कुशी करतोय त्यानुसार त्या शब्दाचे वेगवेगळे प्रकार तयार होतात...
धागा कर्त्याचा आग्रह हा बहुतेक असे शब्द योग्य प्रकारे वापरण्यावर आहे...

उदा.
लाकुड = लाकुड, ओंडका, काठी, छडी, मेढ, फोक, वासा. इ.
पहाणे = पहाणे, बघणे, निरीक्षण करणे, डोकावणे, दिसने, नजर फिरवणे इ.

हे आणि असे प्रकार आहेत व असतात.. योग्य शब्द योग्य ति क्रीया वा वस्तु दाखवायला वापरणे धागाकर्त्याला अपेक्षीत असाव....

स्वरुपच्या पोस्टपासून सगळे वाचा एकामागोमाग. मग कदाचित कळेल. आता त्यांनी इतके स्पष्ट लिहून नाहीच म्हणायचे असेल तर ठिक आहे. माझे काही म्हणणे नाही.

'भाषासंबंधी शिक्षणाचा दर्जा जातीआधारित आरक्षणामुळे घसरला' यास त्यांची सहमती आहे असे दिसले. ती तशी नसेल तर माझे विधान मागे घेतो. प्रतिसाद मिटवतो. झालेल्या चुकीबद्दल सपशेल माफी मागतो. पुन्हा अशी चूक होणार नाही अशी ग्वाहीसुद्धा देतो.

पण सहमती असेल तर त्यांनी ती सिद्ध करावी, केलीच पाहिजे असा माझा हट्ट नाही आणि मी कोणाला दमात घ्यायची मला आवश्यकता नाही. पण ते त्यांचे वैयक्तिक मत असेल तर असू देत पण ते वै मत सार्वजनिक ठिकाणी मांडल्यास त्यावर सर्व प्रकारची टिका होऊ शकते याचे अवधान तर त्यांना असेलच.

वेगळा धागा काढून केवळ "भाषासंबंधी शिक्षणाचा दर्जा जातीआधारित आरक्षणामुळे घसरला " ह्याच विषयावर चर्चा करायची असेल तर माझी तयारी आहे.

>>भाषासंबंधी शिक्षणाचा दर्जा जातीआधारित आरक्षणामुळे घसरला' यास त्यांची सहमती आहे असे दिसले >> अरे बापरे, असं म्हणाले स्वरुप? आणि मी त्याला संमतीही दिली? हे पोस्ट आहे त्यांचं >>आपल्या बोलीभाषेवर आपल्या कुटुंबाचा किंवा परीसराचा जेव्हढा प्रभाव असतो तितकाच प्रभाव आपण ज्या माध्यमात शिक्षण घेतो त्याचा, ज्या दर्जाचे शिक्षक आपल्याला भाषाविषय शिकवतात त्याचा आणि एकूणच आपल्या शालेय जीवनाचा असतो. शिक्षकच जर धेडगुजरी किंवा भाषानियम धाब्यावर बसवून बोलत असतील तर पुढच्या पिढीकडून फार शुद्ध भाषेची अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही!>> शिक्षकांचा दर्जा म्हटल्यावर तुमच्या डोक्यात जात, आरक्षण घंटा वाजायला लागली आणि जातीआधारीत आरक्षण तुम्ही आणलंत. त्याला मी सहमती दिलेली नाही.
तुम्हांला समोरचा जे म्हणाला नाही तेच त्याला म्हणायचंय हे डोक्यात ठेवून लिहायचं असेल तर प्रश्न मिटला.

>>या धाग्यावर ही घाण तुम्ही घेऊन आला आहात. आता विरोध होतोय तर त्रास होतोय का?

अरेच्चा! माझ्या एका तरी पोस्टीत जातीचा उल्लेख आहे का हो?
मी शिक्षणाचे माध्यम, शिक्षकांचा दर्जा आणि त्यांची गुणात्मक पात्रता आणि त्याचा विद्यार्थ्यांच्या भाषेवर होणारा परिणाम याबद्दल बोलत होतो..... ज्या धाग्यांवर जातीबद्दल बोलायचे होते तिथे उघडपणे बोललेलो आहे.... आता तिकडचे संदर्भ इकडे घेउन येउन या धाग्यावर जात कुणी आणली हे तुम्हीच बघा!

"भाषासंबंधी शिक्षणाचा दर्जा जातीआधारित आरक्षणामुळे घसरला " >>> माझ्यामते, मी नाही असं समजत कारण वैयक्तिक मला शिकवणाऱ्या शिक्षिका वेगवेगळ्या जातीच्या आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून आलेल्या होत्या. त्या सर्वांचा वाटा आहे खूप मोठा माझ्या भाषेच्या जडणघडणीत माझ्या कुटुंबाबरोबर.

स्वरुप, तुम्ही कुठले संदर्भ इथे आणले म्हणताय ते माहित नाही. कारण मला तुम्ही इतर ठिकाणी काय म्हटले काही आठवत नाही. मला रोजच्या रोज प्रतिसाद देणारे आयडी लक्षात असतात. तुमचा आयडी माझ्या अजिबात लक्षात नाही. त्यामुळे तुम्ही कुठे कधी काय लिहिले याचा ट्रॅक मी ठेवत नाही, रादर कोणाचाच ठेवत नाही. अगदी रिसेंट असेल तर लक्षात राहतात. आणि माझ्यावर पर्सनली केलेले अटॅक लक्षात राहतात.

तुमच्या सगळ्या प्रतिसादांतून तुम्ही तुमचे विचार नीट उघड केले आहेतच ना? मग आता माझ्यावर उलटायची काही गरज नाही.
घाण तुम्ही घेऊन आलात, मी त्याच्याकडे बोट दाखवले तर मलाच घाणेरडा म्हणता, हा कोणता न्याय आहे बुवा...? Happy

पण कोणती घाण त्यांनी आणली? ते शिक्षकांचा दर्जा म्हणाले. ती पोस्टच मुळात घाण होती का?
माझ्या पोस्ट्स्चं मी स्पष्टीकरण दिलं. माझी माफी मागताय ना? Wink

सायो,
"भाषासंबंधी शिक्षणाचा दर्जा जातीआधारित आरक्षणामुळे घसरला" हे तुम्हाला ' मान्य आहे की नाही' तेवढं स्पष्ट करा.

>>स्वरुप, तुम्ही कुठले संदर्भ इथे आणले म्हणताय ते माहित नाही.
तसे असेल तर ते अधिक धोकादायक आहे... कारण कुठला तरी संदर्भ घेऊन दर्जाचा अर्थ आरक्षणाशी लावणे समजू शकतो.... पण कुठल्याही संदर्भाशिवाय "दर्जा " म्हंटल्या म्हंटल्या "आरक्षण" आठवत असेल तर गोष्ट काळजीची आहे Wink

>>
आम्ही आजही ही आणि अशीच भाषा आमच्या भागात बोलतो. एक कणाचाही फरक नाहीये. आम्ही अजून आमची भाषा अशीच शुद्ध ठेवली आहे.
आणि आता ही १०० वर्षापूर्वीची पुण्यातली मराठी भाषा..... आजही पुण्यात अशीची अशीच भाषा बोलली जात असेल तर सांगा बुवा कोणीही.....

"जातीयवादा'चा (समोरच्याने उल्लेखही न केलेल्या) इतका तिटकारा असणाऱ्याने असा उघडउघड "प्रांतवाद" केलेला चालतो वाटते?
(टीप: हा तुमच्यावर केलेला वैयक्तिक हल्ला नसून सहज आढळलेली विसंगती आहे... नाहीतर हे 'नेमके' लक्षात ठेउन याचा (गैरलागू) संदर्भ दुसऱ्या कुठल्यातरी धाग्यावर द्यायचात Wink )

हा हा, प्रांतवाद का?बरं बरं, ठिक आहे मी आहे प्रांतवादी, मग काय वाईट आहे त्यात?

भाषेच्या दर्जाबद्दल आमच्याकडे विदर्भात काही रडारड होत नसते, जिथे होत असते त्यांच्या आणि आमच्या भागातला फरक दिलाय. फार साधंसोपं आहे ते. त्याचा लावायचा तो अर्थ तुम्ही लावा. माझं काही म्हणणं नाही. कारण माझ्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी उत्तर आहे. विचारुन तर बघा.

तसे असेल तर ते अधिक धोकादायक आहे... कारण कुठला तरी संदर्भ घेऊन दर्जाचा अर्थ आरक्षणाशी लावणे समजू शकतो.... पण कुठल्याही संदर्भाशिवाय "दर्जा " म्हंटल्या म्हंटल्या "आरक्षण" आठवत असेल तर गोष्ट काळजीची आहे

>> ह्या तुमच्या डायलॉग वरुन बॉर्डर चित्रपटातला एक सीन आठवला. सनी देओल, सुनिल शेट्टी आणि अक्षय खन्ना तिघे घुसखोरांच्या शोधात जातात. तिथे त्यांना एका ठिकाणी काही लोक जेवण करतांना दिसतात. ते स्थानिकच आहेत असे समजून त्यांना सोडून तिघे पुढे निघतात तर सुनिल शेट्टीचे लक्ष उंटांच्या पुढ्यात टाकलेल्या चार्‍याकडे जाते. आणि तो म्हणतो की हा असा चारा इकडे नाही मिळत, बॉर्डरच्या पलिकडे मात्र जरुर मिळतो.

तुम्ही सनी देओलच्या ठिकाणी असतात तर सुनील शेट्टीला "तू बॉर्डरपार जात असशील म्हणून तुला माहित, तूपण त्यांना सामील आहेस" असे म्हणून सर्वात आधी 'गद्दार' म्हणून गोळ्या घातल्या असत्या.... जे तुम्ही वरील विधानातून केलंय.

उपमा समजली असेल अशी आशा करतो. Happy शुभरात्री.

नानाकळा, अ‍ॅक्चुअली मी तुम्हांला सनी देओलच्या जागी ठेवून तो डायलॉग असा म्हणून बघितला. ‘स्वरुप हा आयडी भाषेसंबंधी शिक्षकांचा दर्जा म्हणतोय म्हणजे ह्याला जातीआधारित आरक्षणच अपेक्षित असणार. म्हणजेच हा आयडी जातीयवादी आहे‘. (आता स्वरुप ह्यांच्या त्या विषयाशी रिलेटेड पोस्ट मी वाचलेल्या नाहीत, वाचल्या असल्या तरी लक्षात नाहीत)

काय हा विचित्रपणा!! Uhoh सायोने स्पेसिफिकली लिहिले होते दर्जाबद्दल सहमत. सायोची जात, तिची जातीपातीबद्दल मतं, आरक्षणाबद्दलची मतं काहीच तुम्हाला माहित असायचे कारण नाही. बरं स्वरुप हा आयडी , त्याची मते तुम्हाला माहित असेल असे दिसते पण सायोला माहित असण्याची शक्यता किती ? काहीच माहित नसताना घाई घाईने कन्क्लुजन काढायचे कारण काय ? कशासाठी हा अ‍ॅग्रेसिव अप्रोच?? आधी समजून तर घ्या ना समोरचा नक्की काय म्हणतोय. मग द्या की सार्कॅस्टिक भाषणं!!
रेस्ट माय केस वगैरे काय !! किती भडक पोस्टी त्याही अज्ञानावर आधारित!! जहीर खान नावावरून मराठी नसल्याची शंका आली तर त्याला "बायस" म्हणणारे हे तुम्हीच का ?!!

morpankhis, धन्यवाद! माझ्या लेखातला मुद्दा तुम्ही बरोबर पकडलात.
>>>> मला वाटत या मुळ लेखातील मुद्दा काहीस वेगळा आहे..
>>>> तो मुद्दा भाषा शुध्द वा अशुध्द या विषयी नसुन... भाषेच्या प्रतिभे विषयी तिच्या प्रगल्भ ते विषयी आहे..

या लेखात सुरुवातीलाच लिहिलं आहे:
"भाषेची शुद्धता ही प्रत्येकाच्या दृष्टीनी वेगळी असू शकते. पुण्याची मराठी भाषा शुद्ध मानायची की कोल्हापूरची? की नागपूरची? की अमुक एक लोकांचा समूह बोलतो ती मराठी शुद्ध मानायची? त्यामुळे भाषेची शुद्धता जरी सापेक्ष असली तरी मराठी भाषेतले योग्य ते शब्द योग्यवेळी वापरायलाच हवेत. तसं केलं नाही तर नुकसान आपलं आणि मराठी भाषेचं आहे."

इतर मुद्द्यांसाठी वेगळा धागा सुरु करावा ही विनंती 

जसराज काय गाणी बोलले - Lol

जॅसरॅज काय साँग सिंगले असेही ऐकायला मिळेल काही काळाने! मध्यंतरी एक ठामपणे केलेले विधान वाचण्यात आले होते की कोणतीही भाषा प्रमाण म्हंटली जाऊ नये. तेच मी आजही मानून चालतो. पण हे असे काहीतरी 'काय गाणी बोलले'वगैरे ऐकले की एक तरी प्रमाण भाषा म्हणून मान्यताप्राप्त व्हर्जन असावे असे फार वाटते. (ह्या विधानाचा जातपात, धर्म, आरक्षण ह्याच्याशी संबंध नसून हे विधान आखाड्यात ओढले जाऊ नये अशी अपेक्षा)

स्वरूप, सायो व मैदेवी ह्यांच्या प्रतिसादातील 'अराजकीय ', जातनिरपेक्षपणे उल्लेखल्या गेलेल्या (/ री ओढल्या गेलेल्या) 'दर्जा'ह्या निकषावरील भाष्याशी सहमत!

भाषेचा दर्जा म्हणजे काय ओ?
नाय म्हणजे मुठभर भाषेचे तथाकथित ठेकेदार अनुनासिक उच्चार करतात म्हणून त्याला प्रमाण माना असा सात्विक आदेश द्यायलाही हे स्वयंघोषीत भासापरभू पुढेमागे पहायचे नाहीत.
इंग्रजीत English (U.S),English(U.K) असे अनेक वर्जन आहेत nobody looks down upon to other.इथे मात्र आमच्या भाषेलाच प्रमाण माना अशी बोंब मारुन विषय आरक्षणापर्यंत नेला आहे.कुठे गेले गल्लेवाले,विषयांतर होतेय.

भाषेचा दर्जा म्हणजे काय ओ?
नाय म्हणजे मुठभर भाषेचे तथाकथित ठेकेदार अनुनासिक उच्चार करतात म्हणून त्याला प्रमाण माना असा सात्विक आदेश द्यायलाही हे स्वयंघोषीत भासापरभू पुढेमागे पहायचे नाहीत.
इंग्रजीत English (U.S),English(U.K) असे अनेक वर्जन आहेत nobody looks down upon to other.इथे मात्र आमच्या भाषेलाच प्रमाण माना अशी बोंब मारुन विषय आरक्षणापर्यंत नेला आहे.कुठे गेले गल्लेवाले,विषयांतर होतेय.

मधुरजनी,
तुम्ही उल्लेखलेले उदाहरण तर सहजी खटकणारे आहे पण एकेकाळी खटकलेली पण आताश्या लोकांच्या तोंडावर रुळलेली अनेक उदाहरणे आहेत!
गंमत म्हणजे आजकाल ऐकणाऱ्यालाही त्यात फारसे आक्षेपार्ह काही वाटत नाही!
"ते लोक" च्या ऐवजी "ती लोकं" हे एक सर्रास आढळणारे उदाहरण
वस्तू "मिळण्या" ऐवजी वस्तू "भेटली" म्हणणे
माझ्यावर भरवसा "ठेवा" ऐवजी माझा भरवसा "करा"
आणि अशी कैक उदाहरणे आहेत

चुकीचे शब्द वापरण्याचे तर आजकाल कुणालाच काहीच वाटेनासे झालेय!
"अभिमान" च्या जागी सर्रास "गर्व" वापरणे.... "स्वयंपाक करणे" च्या ऐवजी "जेवण करणे" वगैरे राजरोस वापरले जाते

मध्ये महाराष्ट्रतल्या दोन दिग्गज नेत्यांच्या भेटीची बातमी देताना एका वृत्तवाहिनीने "महाराष्ट्रातल्या दोन 'टोलेजंग' नेत्यांची भेट" अशी बातमी दिल्याचे कुठेतरी वाचनात आले!

असो!
जिथे समोरचा "ऐकू शकेल/सुधारु शकेल" असे वाटते तिथे चूक दाखवून द्यायचा प्रयत्न करतो.... बाकी ठिकाणी "कालाय तस्मै नम:" म्हणावे आणि पुढे चालावे हे उत्तम!

वरील चर्चा वाचून एक प्रश्न मनात आला - भाषा ही जातीनुसार बदलते की प्रांतानुसार?

म्हणजे एकाच प्रांतात राहणारया दोन भिन्न जातीतील लोकांची भाषा सेम असते का वेगळी?

तसेच एकाच जातीतील लोकं महाराष्ट्राच्या दोन भिन्न प्रांतातील असतील तर त्यांची भाषा सेम असेल की वेगळी?

<सचिन तेण्डुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर मुंबईत जन्म घेतलेले आणि लहानाचे मोठे झालेले मुंबईकर>
यातले प्रमाण मराठी बोलणारे अनेकजण मला माहीत आहेत. तेव्हा सरसकटीकरण नको.

<आक्षेप दर्जाला आहे आणि त्यामुळे (आणि त्यामुळेच) आरक्षणाला आहे!>
अरे वा! आला का हा मुद्दा? फिरून फिरून गाडं तिथेच येतं. छान छान.

छे!! कुठल्याही लिखाणावर चांगली चर्चा होत आहे असे वाटत असतानाच तिथे जात पात धर्म राजकारण का येते?

आता थोड्या वेळात गल्ली ते दिल्ली राजकारण न येवो!

मराठी भाषेचेच म्हणाल तर मी ६०-७०% भागात फिरलो आहे आपल्या महाराष्ट्रात अगदी आमच्या ४० गांव डांगाना पासून कोकणा पर्यन्त मराठवाडा विदर्भ, खानदेश. १०० किमी वर बोली भाषा बदलते आमच्या नगर जिल्ह्यातच ४ कोपर्‍यात भाषेचा वेगळा वेष वेगवेगळे शब्द आहेत.. त्यामुळे सगळे जाती धर्म पंथ त्या त्या भागात तीच भाषा बोलतात त्यामुळे जातीचा आणि भाषेचा बादरायण संबंध देखिल नाही!

अहो हिंदीचेच घ्या ना इथली हैदराबादेतील हिंदी पाहिली पंजाब मध्ये वेगळी हरियानवी वेगळी उप्र ची वेगळी तर बिहारी वेगळी प्रांत परत्वे तीची रुपे बदलत गेली आमच्या गावातली हिंदी तर 'भागते भागते गया अन धपकन् पड्या' किंवा 'उसको ओळख पाळख कुछ नही लगती किसको भी बोचकाडताय' ही असली भाषा काय सांगायचयं ते पोहोचविते!
पण भाषा म्हणून तुम्ही कोणती भाषा शिकत असाल तर ती योग्य तीच आधारभूत व्याकरणासह असावी.

कालपरत्वे स्थानपरत्वे भाषेचे रुप बदलेल पण गोडवा तोच असणार. पारिभाषिक शब्द आल्याने भाषा अशुद्ध वा भ्रष्ट न होता समृद्ध होते असे माझे प्रामाणिक मत आहे. परंतु ओढुन ताणुन इतर भाषेतील शब्द उगाचच पेरुन आपण कसे हे वेगळे आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न असेल तर ते देखिल योग्य नाही असे वाटते...

मी शक्यतो कोणत्याही वादात पडत नाही पण इथे माह्या आईच्या भाषेवर तुम्या समदे बोलून राह्यले तेंव्हा रहावले नाही ह्या काराणास्तव म्याबी माझ्यावाल्या चार सहा ओळी खरड्ल्या ना राव! चालतयं नव्ह!?

Pages