अनवट किल्ले ५ : असाच लोभ असावा (Asawa )

Submitted by दुर्गविहारी on 13 May, 2017 - 10:18

पालघर डोंगररांगेतला सर्वात उत्तरे कडला किल्ला "असावा" बघण्याचा प्लॅन केला. आज सोबत कोणीच नव्हते, त्यामूळे एकला चालो रे ला पर्याय नव्हता. बोईसर स्टेशनला उतरलो आणि पुर्वेकडे नजर गेल्यानंतर सपाट माथ्याच्या डोंगराचे दर्शन झाले. हाच असावा गड असणार याची खुणगाठ बांधून स्टेशन बाहेर आलो आणि चिल्हार फट्याकडे जाणारी सहा आसनी रिक्षा पकडली आणि निघालो आणखी एका मोहिमेवर. किल्ला पुर्वेला असला तरी चिल्हार फाट्याकडे जाणार्‍या बस किंवा सहा आसनी रिक्षा बोईसर पश्चिमेकडुन सुटतात हे ध्यानात ठेवावे.
असावा किल्ल्याला यावयाचे झाले तर दोन मार्ग आहेत.
१ ) मुंबई - अहमदाबाद रेल्वेरूट्वर धावणार्‍या पॅसेंजरने किंवा विरार - डहाणु लोकलने बोईसरला ( पश्चिम ) उतरायचे व चिल्हारकडे जाणार्‍या बस किंवा ट्मटमने वरांगडा गावी उतरायचे.
२ ) बसने यायचे असेल तर मुंबई - अहमदाबाद हायवे वरून मनोरनंतर चिल्हार फाट्यावरून डाव्या बाजुला वळायचे व सुर्यानदीवरचा पुल ओलांडला कि वरांगडा गाव लागते.
रिक्षात बसल्या बसल्या परिसराकडे नजर गेली आणि इथल्या दुर्ग उभारणीचे कारण समजले. प्राचीन डहाणु ( किंवा नाशिक लेण्यातील शिलालेखात उल्लेख केल्याप्रमाणे डहाणुका बंदर ) बंदर व सागवानी जंगलाचे वैभव मिरविणारा प्राचिन अशेरी गड यांच्यातील व्यापारावर नजर ठेवण्यासाठी एका लष्करी ठाण्याची गरज होती आणि हे ओळखून माहिमच्या बिंब राजाने या गडाची निर्मीति केली असे मानले जाते. १०७० फूट ( समुद्रसपाटीपासून ३५० मी )उंचीच्या या गडाचा ताबा पुढे पोर्तुगीज राज्यवटीकडे आला. शिवकाळातही याच्यावर पोर्तुगीजांचा ताबा होता. पुढे संभाजी महारांज्याच्या काळात १६८३ मधे हा किल्ला मराठ्यानी घेतला, मात्र पोर्तुगीजानी लगेचच त्याचा ताबा मिळविला. त्यानंतर चिमाजी अप्पाच्या वसई मोहिमेत १७२७ मधे हा किल्ला घेउन या भागातल्या पोर्तुगीज सत्तेचा कायमचा शेवट केला. शेवटी १८१८ मधे ईतर किल्ल्यांप्रमाणे कॅप्टन डिकीन्सनने याचा कायमचा ताबा घेऊन युनियन जॅक फडकविला. याला असावा तसेच विसावागड असाही काही ठिकाणी उल्लेख आढळतो.
हा इतिहास मनात घोळवित मी वरंगडा या गावी उतरलो. इथे एम. आय. डी. सी. आहे त्यामुळे बर्‍याच कंपन्याच्या शेड दिसतात. त्यापैकी विराज प्रोफाईल लि. या फॅक्टरीजवळून चालायला सुरुवात केली. महागाव कडूनही या किल्ल्यावर जाता येते, पण ते थोडे लांब पडते. वरांगड्यामधून बारीपाडा हि छोटी आदिवासी वस्ती गाठायची . इथे सुर्या नदीचा कॅनोल आलेला आहे, या कॅनोलवर तीन पुल आहेत. या तिनही पुलावरून गडावर जाण्यासाठी वाटा आहेत.
१) सगळ्यात पहिल्या पुलावरून वाट जाते ती किल्ला आणि शेजारची डोंगरसोंड यांच्या मधल्या घळीतून वर चढते, हा शॉर्ट्कट आहे पण यासाठी स्थानिक वाटाड्या सोबत हवा. सकाळी सकाळी या मंडळींची कालची उतरल्याची खात्री नसल्याने तो पर्याय बाद केला.
२ ) दुसर्‍या पुलावरून जाणारी वाट थेट डोंगर्सोंडेवर चढून माथ्याजवळ पोहचविते. मात्र या दोन्ही वाटा पावसाळ्यात टाळाव्यात. या वाटांनी आपण
अवघ्या पाउण तासात गडावर पोहचतो, पण सोबत माहितगार असेल तरच.
३) बारीपाड्यातुन गडाकडे पाहिल्यास डावीकडे कातळ्माथा दिसतो तर समोर एक लांब डोंगररांग आडवी पसरलेली दिसते. आपल्याला या डोंगरसोंडेवर आधी चढाई करायची आहे हे लक्षात ठेवायचे. यासाठी तिसर्‍या पुलावरून कॅनोल ओलांडुन सरळ शेताडीतुन एक वाट उजवीकडे डोंगरावर चढत गेलेली दिसते, नंतर हिच वाट डावीकडे म्हणजेच पुर्वेकडे वळून गडमाथ्याच्या दिशेने जाते. आधी एक टेकडी लागते, इथे दुसर्‍या पुलावरून आलेली वाट मिळते. इथून समोरच गडमाथा दिसु लागतो. मस्त गर्द झाडीतून चढण्यार्‍या ह्या वाटेने गेल्यास १ ते १.५ तासात
आपण गडावर पोहचतो. या वाटेने यावयाचे असल्यास वाटाड्या नसला तरी चालेल इतकी ठळक आहे.
1.JPG
किल्ल्याचे गावातुन होणारे प्रथम दर्शन
2.jpg
हा कॅनोलवरचा तिसरा पुल
18.jpg
हि डोंगरसोंडेवरची ठळक पायवाट, लांबवर असावागडाचे शिखर दिसत आहे.
13.jpg
वाट चढून या टेकडीवर येते
3.jpg
सुरवातीला तटबंदीचे हे अवशेष दिसतात. वर पोहचल्यानंतर बरीच सपाटी नजरेला पडते.
6.jpg
यातुन प्रवेश केल्यानंतर मध्यभागी एका इमारतीचा चौथरा दिसतो. हे किल्लेदाराचे घर असावे.
14.jpg
ह्याच्या कडेने पुढे जाउया.
5.jpg
तसेच थोडे पुढे म्हणजे उत्तरेला गेल्यानंतर कातळ सपाटीला असलेल्या उताराचा फायदा घेउन दोन कातळ कोरीव टाकी एका खाली एक येतील अशी बांधली आहेत. वरच्या टाक्यातून खालच्या टाक्यात ओव्हरफ्लो झालेले पाणी वाहून जावे यासाठी चॅनेल तयार केला आहे.
732Eod.jpg
शिवाय पावसाळ्यात खडकावरून पाणी वाहून येताना, बरोबर असलेला गाळ टाक्यात पडू नये यासाठी खडकातच असे कोरीव खड्डे पहाण्यास मिळतात.
11.jpg
यानंतर या किल्ल्याचे वैशिठ्य म्हणजे उत्तर टोकाशी असलेला हा अर्धा बांधीव व अर्धा कोरीव हौद. बहुधा किल्ला बांधताना, किल्ल्याच्या ह्या बाजुला असणार्‍या नैसर्गिक कपारीचा वापर करून बराचसा भाग कोरुन आणि जिथे आवश्यक आहे तिथे भिंत बांधून हा प्रंचड हौद उभारला आहे. हा पावसाळ्यात एकदा भरल्यानंतर वर्षभर किल्ल्याची तहान भागवत असणार. हा हौद हे किल्ल्याचे मुख्य आकर्षण आहे. सहसा पुर्ण बांधीव तरी किंवा पुर्ण कोरीव अशी टाकी पहाण्यास मिळतात. ( अपवाद - रायगडावरचा हत्ती तलाव)
2XgEan.jpg
मात्र सध्या त्याची एका बाजुची भिंत थोडी पडली आहे,
9.JPG
तिथून पाण्याची गळती होत असल्याने हौद नंतर कोरडाच रहातो.
7.jpg
इथुन खालच्या बाजुला आपण आलेले वरांगडा गाव व एम.आय.डि.सी.मधल्या कंपन्या दिसत असतात. हवा स्वच्छ असेल तर पश्चिमेला डहाणू , बोईसरचा परिसर दिसतो, इशान्येला अशेरी, दक्षिणेला काळदुर्ग व देवखोप तलाव दिसतो तर नैऋत्येला पालघर परिसर दिसतो. पुर्वेला लांबवर सुर्या नदी व पायथ्याशी गुंडाळे गाव व पाझर तलाव दिसतो. तसेच सध्या प्रसिध्द झालेले मैत्रेय समुहाचे "मामाचा गाव" दिसते. किल्ल्यावर रहाण्याची किंवा खाण्याची काहीही सोय नसली तरी त्याबाजुने खाली उतरुन ( नकाशात हा रस्ता दाखविला आहे ) या मामाच्या गावाचा
पाहुणचार घेता येतो. (त्यासाठीचे संपर्क क्रमांकः- (022) 65008724, 26630044, Mob: 9619878500, 9619878400, 8652776611 )
ह्या मानव निर्मित वास्तु पाहिल्यानंतर एक निसर्गाचे आश्चर्य बघुया.
4.jpg
यासाठी हौदासमोरुनच पुर्वेला वाट खाली उतरते.
12.JPG
काही पहारेकर्‍यांच्या देवड्याचे चौथरे. कातळात कोरलेल्या पायर्‍यांवरून जपुन उतरावे. पावसाळ्यात हा मार्ग टाळलेलाच बरा.
15.jpg
थोडे खाली उतरल्यानंतर "गणेश गुंफा" म्हणुन ओळखली जाणारी हि प्रचंड गुहा नजरेस पडते. हवा असल्यास इथेही मुक्काम करता येतो.
16.jpg
किती प्रचंड गुहा आहे बघा ही
18_0.jpg
मामाचा गाव या रिसॉर्टपासून दिसणारा असावागड
हि गुहा बघून झाल्यानंतर एक तर आल्यामार्गे परत जाऊ शकतो किंवा याच वाटेने पुढे उतरून मामाच्या गावाचा पाहुणचार घेउन तसेच बोईसर - चिल्हार रस्त्याला पोहचून ट्रेक पुर्ण करता येईल.
Asawa. surrjpg.jpg
असावा किल्ल्याचा नकाशा
Asawa surrond.jpg
असावा गड परिसराचा नकाशा
19.jpg
पालघर डोंगररांगेचा हे गुगल मॅपवरून घेतलेला अफलातून फोटो. यात तांदुळवाडी, काळदुर्ग व असावा तिन्ही किल्ले दिसत आहेत.
नव्याने झालेल्या पालघर जिल्ह्यातले पाच किल्ले आपण पाहिले. याशिवाय बल्लाळगड, सेगवाह, कण्हेरी, तांदुळवाडी, टकमक हे डोंगरी किल्ले तर डहाणु , तारापुर, माहिम, शिरगाव, केळवे, भवानगड, दंडा हे सागरी किल्ले बघायचे आहेत. पण वर्णनातला तोच तोच पणा टाळण्यासाठी राहिलेल्या या किल्ल्यांची माहिती मी पुन्हा केव्हा तरी लिहीन.
पुढच्या आठवड्यात आपण जाणार आहोत वसईजवळच्या तुंगारेश्वराच्या जंगलात. कामणदुर्ग उर्फ कामण्या.
( सर्व छायाचित्रे आंतरजालावरुन साभार )
संदर्भग्रंथः-
१ ) ठाणे जिल्ह्याची दुर्गसंपदा:- सदशिव टेटविलकर
२ ) डोंगरयात्रा :- आनंद पांळदे
३ ) ठाणे जिल्हा गॅझेटियर
४ ) http://trekshitiz.com/ हि वेबसाइट

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults