कोकण .... पावसाळ्यातलं

Submitted by मनीमोहोर on 25 July, 2016 - 14:29

पावसाळ्याचं आणि कोकणाचं माझ्या मनात एक अतूट नातं आहे. कोकण तसं तर वर्षभर सुंदरच दिसतं पण त्याच रुप सर्वात खुलुन येत ते पावसाळ्यात. मी पहिल्यांदा गेले कोकणात तेच मुळी पावसाळ्यात. ढगांची दुलई पांघरलेला बावडा घाट श्वास रोखत पार करुन कोकणात प्रवेश केला आणि मग मात्र त्या हिरवाईने मनाला जी भुरळ घातली ती अगदी आज पर्यन्त. मग पुष्कळ वेळा पावसाळ्यात ही निरनिराळ्या वेळी कोकणात , घरी जाणं झालं आणि कोकणातलं पावसाळ्यातलं नित्य नव रुप ही तितकच मोहवणारं भासलं.

आंब्या, फणसांचा आणि रतांब्यांचा मोसम चालु असेतो पर्यन्त रोज " चार दिवस येऊ नको रे बाबा, तेवढी आंब्यांची काढणी होऊ दे.... मग ये " अस विनवलं जातं पावसाला. पण एकदा का सिझन संपला आंब्याचा की मग मात्र त्याची अगदी आतुरतेने वाट पहिली जाते. आठ पंधरा दिवस आकाशात ढग जमवून त्याने ही तयारी केलेलीच असते. एखाद दिवशी संध्याकाळी किंवा रात्री ताशे वाजंत्र्यांच्या गजरात आगमन होत या हव्या हव्याशा वाटणार्‍या पाहुण्याच. कितीही तयारी केली असली तरी पहिल्या पावसात तारांबळ उडतेच कारण घरावरची कौलं दरवर्षी शाकारली तरी कुठेतरी फट राहुन पाणी गळती होतेच. मग गड्याला वर चढवून ते गळतं काढलं जातं. मागील दारचा आणि खळ्यातला मांडव ही झापा कुजुन खराब होऊ नयेत म्हणून तातडीने काढला जातो. मांडव काढला की खळं खूप मोकळं मोकळं दिसायला लागत. मुलांचे क्रिकेट वैगेरे सारखे खेळ मांडवाचा अडसर नसल्याने अधिक रंगतात. पण ते थोडे दिवसच कारण एकदा का पावसाची झड बसली की आठ आठ दिवस संततधार सुरु असते कोकणात. मग खळ्यात खेळणं तर सोडाच पाच मिनीटं बसता ही येत नाही.

पावसाच्या आगमनाबरोबरच भात शेतीची कामं सुरु होतात. भर पावसात ही कामं करावी लागतात. आमच्याकडे काही जमीन उतारावरची आहे त्यामुळे तिथे वेगवेगळ्या लेवलला ( पायर्‍या पायर्‍यांची ) भात शेती केली जाते. ते शेत फार सुंदर दिसत . लावणीच्या वेळी भरपूर पाउस आणि चिखल ही लागतो . घरातली मुलं आवर्जून जातात मजा करायला आणि चिखलात लोळायला . आमचे काही गडी खूप गमत्ये आहेत. ते मुलांना मुद्दाम चिखलात लोळवितात वैगेरे . मुलांना काय तेच हव असत. (स्मित) घरातल्या बायका ही चहा, बिस्कीट, वडापाव वैगेरे द्यायच्या निमित्त्ताने जातात शेतावर. खाली गुडघाभर चिखल पाणी, वरतुन मुसळधार पाउस, गारठलेली हवा , आणि हातात तो लाल चहाचा कप !

आमच्या कडे रेडे ही जुंपले जातात शेतीकामाला

From mayboli

लावणी लावताना

From mayboli

हा एक दुसर्‍या शेताचा

From mayboli

From mayboli

रोपं वाढली की असं दिसत

From mayboli

ही आमची डोंगर उतारावरची शेती . ह्याला पॅनोरमा पॉइंट असं नाव आहे आमच्याकडे. " कशाला हवं आहे माथेरान बिथेरान ला जायला ? " असं ही जोडुन देतात पुढे ( स्मित)

From mayboli

डॉगर उतारावरची शेती जवळून

From mayboli

भात शेती बरोबरच नाचणी , वरी, हळद, आरारूट हे ही लावल जात थोडं थोडं. कसं काय ते महित नाही पण लावणीच्या दिवशी रात्रभर बेडकांच संगीत सुरु असतं . आमचं शेत तसं घराजवळच आहे, रात्री त्यांच डराँव डराँव घरी ही ऐकु येत. भात लावताना थोडं थोडं अंतर सोडुन रोपं लावलेली असतात पण थोडेच दिवसात रोपं वाढतात आणि एक हिरव्या रंगाचा गालिचाच तयार होतो शेतात. गणपतीच्या सुमारास काही पिकात गोड दुधाचा दाणा तयार होतो त्यावेळी शेतात अतिशय सुंदर सुवास पसरतो त्या दाण्यांचा. चारी बाजूने घनदाट झाडी, पावसाळी हवा, दुरुन येणारा व्हाळाच्या पाण्याचा खळखळाट आणि मध्ये आमचं शेत.... जगातल सर्वात सुंदर दृश्य असत ते. वार्‍यावर हे शेत जेव्हा डुलत ना तेव्हा तर विचारुच नका किती सुंदर दिसत ते.

लावणीचं मुख्य काम झालं की मग गडी आंब्यांच्या कलमांकडे वळतात. कलमांची टाळमाती, कलमांभोवती असलेले गडगे दुरुस्ती, नवीन कलमांची लागवड वैगेरे कामं असतात.

घराजवळ ही परसदारी काकडी, कार्ली, दुधी, पडवळ, यांचे वेल मांडवावर सोडले जातात .सड्यावरच्या मांगरावर लाल भोपळ्याचे वेल सोडले जातात. उन्हाळ्यात मरगळेलं अळू ही पावसाळ्यात चांगलच फोफावत.
त्रिपुरी पौर्णिमेला आमच्याकडे कोहाळा लागतो खरा पण कोकणात कोहाळा हा अशुभ समजला जातो. मुद्दाम लावला जात नाही. पण कधी कधी आपोआपच कोहाळ्याचे वेल ही रुजून येतात. घरच्या भाज्या काही ही मसाला न घालाता ही चवीला अप्रतिम होतात. काकडी तर मुलं एक ठेवत नाहीत मांडवावर. पावसाळ्यात आमच्याकडे फुलांचा महोत्सवच असतो जणू. अनंत, अनेक प्रकारच्या तगरी, कर्दळी, सोनटक्का, गावठी गुलाब,प्राजक्त, विविध रंगाच्या आणि आकारच्या जास्वंदी, संध्याकाळी फुलणारी गुलबाक्षी वैगेरे आमच्या आगराची शोभा वाढवत असतात.

जास्वंद

From mayboli

From mayboli
पावसात गुरांना ओला चारा मिळतो पण गुरांनी कुणाच्या शेतात तोंड घालुन नुकसान करु नये म्हणून ह्या दिवसात गुरांच्या पाठी राखण्ये ( गुराखी ) असतात दिवसभर. चार पाच राखण्ये मिळुन सड्यावर मजा करत असतात तेव्हा कृष्णाची आणि त्याच्या सवंगड्यांची आठवण येते पण त्याच वेळी ही मुलं शाळेत का शिकायला जात नाहीत हा ही विचार मनात आल्या शिवाय रहात नाही. सड्यावर हिरच्या कुरणात चरणारी गुरं फार लोभस दिसतात. पण सड्यावर जायच्या वाटेच्या दोन्ही बाजुला आपल्या कंबरेपर्यन्त गवत माजलेलं असतं. पावसाची काळोखी आली असेल तर तिथुन जाताना भितीच वाटते.

पावसाळ्यातली आणखी एक सनसनाटी घटना म्हणजे आमच्या घरा मागेच असणार्‍या व्हाळाला ( वहाळाला) येणारा हौर म्हणजे पूर. तीन चार तास जोरात पाउस झाला तर हा वहाळ दुथडी भरुन वाहु लागतो. पाण्याला प्रचंड वेग आणि खळखळाट असतो . ते चहा सारख्या रंगाचं पाणी पहायला मग मंडळी अगदी छ्त्र्या वैगेरे घेऊन व्हाळापर्यन्त जातात. कधी कधी पाणी साकवा वरुन ही वहात असत तेव्हा मात्र इकडची मंडळी तिकडे जाऊ शकत नाहीत. थोडावेळ सगळं ठप्प होऊन जातं. खूप मोठा हौर असेल तर व्हाळाच पाणी आमच्या आगरात ही शिरत कधी कधी. कोकणातल्या विहीरी खूप खोल असतात पण व्हाळाला हौर आला की आपसु़कच विहीरींच ही पाणी वर येतं इतक की रहाटाशिवाय ही काढता येईल. कोकणातला हौर तो ... जसा येतो अचानक तसा पाऊस जरा कमी झाला की ओसरतो हि लगेच. .. पण हौर येऊन गेला की व्हाळ मात्र अगदी साफ, स्वच्छ आणि नितळ होऊन जातो

पावसाळ्यात वादळ वार्‍यांमुळे कुठे अपघात वैगेरे होऊ नये म्हणून MESB लाईट घालवूनच टाकते कित्येकदा. ढगाळ हवेमुळे भर दिवसा ही घरात विशेष करुन माजघरात आणि देवघरात अगदीच कमी असतो उजेड. अशा वेळी देवघरात भर दिवसा ही निरांजनं तेवत ठेवली जातात त्यांचा मंद, शांत आणि स्निग्ध प्रकाश एक प्रकारची समाधानाची गुंगीच आणतो मनावर. लाईट घालवले म्हणून मनोमन आभारच मानते मी वीज मंडळाचे. असो.
घरातल्या बायकांची आंब्या फणसाची आणि इतर उन्हाळी कामं झाली असली तरी अगदी वटसावित्री पासुन ते गौरीगणपती पर्यन्त अनेक सण उत्सव असतातच पावसाळ्यात . नागपंचमीच्या दिवशी अगदी भक्तिभावाने आगरातच असलेल्या वारुळाचे पुजन केले जाते. पिकाची नासाडी करणार्‍या उंदरांचा नाश नागोबा करतात म्हणून. मंगळागौर, हरतालिका, श्रावणी सोमवार, शनिवार हे ही जोरात साजरे करतो आम्ही. त्यामुळे घरातही एकंदर उत्साहाचेच असते वातावरण .

कोकणात जनरली उन्हाळ्याच्या दिवसात जातात मंडळी. पण पावसाळ्यात कोकण म्हणजे अगदी स्वर्ग असतो. मी तर मनाने कायमच कोकणात असते पावसाळ्यात आणि हे सर्व अनुभवत असते. ह्या अनुभुतीत तुम्हाला ही सामील करुन घेण्यासाठी हा लेखन प्रपंच......

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप सुंदर वर्णन हेमाताई.

कोकण फिरवून आणलत.

तुमचे आणि जागुचे लेख खास आपल्या मातीतले वाटतात स्मित धन्यवाद जिप्सी.

सईचा लेख वाचा जुन्या मायबोलिवर कोकणावर आहे.

सई तू तुझा तो लेख परत एकदा इथे नव्या माबोवर दे ना प्लीज!!!!

धन्यवाद गं ममो.:स्मित: एवढे आवर्जून निमंत्रण दिलेस तर एकदा जमवायला हवे.

भाऊ Happy मालिका कशी का असेना पण आजकाल कोकण म्हणले की मला मालवणी डेज आणी राखेचा च आठवतात.

धन्यवाद सर्वांना प्रतिसादा बद्दल

भाऊ, व्यंगचित्र नेहमी प्रमाणेच फर्मास.

गाव कंचं म्हणायाचं ? >>> नाडण नावाच एक अगदी छोटस गाव आहे हे

मी आजवर जे आयुष्य जगलोय त्याच्या जेमतेम चार टक्केही कोकणात गेलो नसेन पण आजवर आयुष्यात जेवढा हिरवा रंग पाहिलाय त्याच्या पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त या चार दिवसांत बघून होतो..>>>> ऋ, +१११

तुमच्या लेखांचे आता काय रोज रोज तेच कौतुक करायचे स्मित > +११११

खरंच तुम्ही खूप छान लिहिता आणि कोकण आहेच सुंदर.
पुन्हा एकदा कोकणातून फिरवून आणल्याबद्दल खूप धन्यवाद.
असेच अनेकानेक लेख तुमच्या गावाबद्दल, कोकणाबद्दल अजून येऊ द्यात.
प्रत्यक्षात नाही तर निदान तुमच्या लेखांमधून आणि फोटोंमधून आम्ही कोकण सफर करत राहू.

यजमान तर कुठे ही गेलं तरी म्हणतात चांगल आहे पण नाडण एवढ नाही. >>>> नाडण म्हणजे विजयदुर्ग तालुल्यातील का? माझे काही नातेवाईक तिथे राहतात ......

खूप छान लेख , अतिशय आवडला

अगदी मी आत्ता जिथे आहे त्या आमच्या घराचे आणि आजूबाजूच्या परिसराचे जीवंत वर्णन

धन्यवाद

वाह ममो...
सुपर्ब..
मी पन मनातल्या मनात एक चक्कर टाकून आली तिकडं..
ती पायर्‍यांची शेती तर चुम्मा दिसतेयं..

ममो , अतिशय सुरेख वर्णन ! मी गेल्याच् शनिवारी कोकणात होते, तिथला पाऊस अनुभवताना विलक्षण वाटत होते, ती हिरवाई पाहून टार खूप खूप समाधान वाटत होते

ममो ,अतिशय सुंदर झालाय लेख.. तुझं कोकणातल्या घरावरचं ,कोकणावरचं प्रेम शब्दाशब्दांतून भरभरून वहात असतं .. तुझ्या मनरूपी वहाळाला आलेल्या या प्रेमपुरात आम्ही ही आकंठ डुंबून घेतलं..
सुरेख,अप्रतिम!!!!

भाऊ, चित्र नेहमी प्रमाणेच फर्मास.>>>>+१

नाडण जवळचं मोंड , माझी सासुरवाडी .... मस्त गाव आहे छोटसं .... Happy

धन्स सर्वांना पुन्हा एकदा .

इथे आमच्या पंचक्रोशीतील किती जणं आहेत ! खूप छान वाटतंय त्यामुळे

मोंड, पडेल, मालपे, वाडा , मुटाट हि सगळी गावं छानच आहेत .

नेहमी प्रमाणॅच मस्त Happy

मी कधिच पावसाळ्यातल कोकण अनुभवल नाहिये Sad नेहमी उन्हाळ्यातच गेलिये. उन्हाळ्यात २-२ महिने राहिले आहे. माझ्या आज्जीच माहेर कोकणात (बसणी) त्यामुळे लहानपणीची जवळपास प्रत्येक सुट्टी कोकणात.

रच्याकाने सड्यात म्हणजे नकी काय? आम्ही बसणीतुन सड्यात आज्जीच्या बहिणीकडे जायचो, मी सडे हे गाचाचे नाव समजत होते Happy

मोंड माझ्या आतेसासुबाईंच गाव आणि आजेसासुबाईंच माहेर. Happy

नताशा बसणी माहीतेय, आमचे जुने शेजारी जोशी त्या गावचे, आम्ही रत्नांगिरीहून आमच्या देवीला (ढोकमळे, नेवरे) गेलो होतो तेव्हा बसणी लागलं मधे आम्हाला.

<< नाडण म्हणजे विजयदुर्ग तालुल्यातील का? माझे काही नातेवाईक तिथे राहतात .....>> <<. नाडण जवळचं मोंड , माझी सासुरवाडी ...>> <<.मोंड माझ्या आतेसासुबाईंच गाव आणि आजेसासुबाईंच माहेर >> वा: ! नाडण परिसरातल्यांचं छान पावसाळी 'गटग'च होवूं घातलंय इथें !! Wink

नताशा Happy

भाऊकाका तेवढंच नाही हो, माझं सासर 'फणसे' गाव हे नाडण जवळंच आहे आणि माझे दीर जाऊ सासुबाई रहातात तिथे. Happy

Pages