Submitted by सत्यजित... on 23 July, 2016 - 06:40
रात्र अंधारुन आली अन् दिव्याचा मेळ नाही?
घे उश्याला पत्र माझे..चाळ काही,जाळ काही!
जे मला तू द्यायचे ते द्यायचे राहून गेले...
शाश्वती देतेच आहे,दुःख माझे भारवाही!
तू ऋतुंच्या सोबतीने घे प्रशिक्षण बहरण्याचे...
व्हायचा झालाच माझा..पावसाळा बारमाही!
माळले असशील नक्की,तू गुलाबाच्या फुलाला...
त्याविना रुसली नसावी,मोगऱ्यांची लोकशाही!
बातमी होती अशी की,काल तो येवून ‘गेला'...
मार्ग तर नव्हता म्हणे ना,परतण्याच्या कोणताही!
फक्त आता लेखणीचा बाज आहे वेगळासा...
गझलेत तू होतीस त्या,गझलेत तू..आजच्याही!
—सत्यजित
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा