भूतकथा - "दुराई"

Submitted by Mandar Katre on 10 March, 2016 - 14:22

कोकणच्या समुद्रकिनार्याावरील कुचवडे गावची गोष्ट ... पक्या आणि तुक्या हे दोघे जिगरी दोस्त , सकाळी उठायचे .. मिश्री लावून चहा पीवून गावात फिरायला जायचे आणि आवश्यक ते “संशोधन” करून १० वाजेपर्यंत घरी परत यायचे ,... मग न्याहारी करून १२ वाजता सख्याच्या अड्ड्यावर जावून पावशेर गावठी दारू ढोसायची आणि मग घरी येवून जेवायचे आणि मस्तपैकी सहा वाजेपर्यंत ताणून द्यायची हा त्यांचा नेहमीचा उद्योग ....त्यांचा दिवस खर्याी अर्थाने सुरू व्हायचा तो रात्री दहा वाजल्यावर ! सगळीकडे नीजांनीज झाल्यावर मग हे दोघे वाड्यांतून आंबा काजू बागा धुंडाळायला बाहेर पडायचे !. नाही म्हणायला रविवार अन बुधवारी मात्र न चुकता ते जोडीने बाजाराला जायचे . जवळच असलेल्या गोठणे गावात आठवडी बाजार भरायचा ... रविवारी मच्छी मटन आणि बुधवारी भाजी चा .. पण पक्या तुक्या दोघेही नेमाने दोन्ही बाजार करायचे ...जाताना पिशव्या अन गोणी भरभरून आंबे –काजू न्यायचे अन बाजारात विकायचे आणि येताना भरल्या खिशाने यायचे .... पोराबाळांना आणि बायकोला नवीन कपडे लत्ते किंवा मच्छी मटन आणायचे ...त्यामुळे पोरही खुश असायची .... असं असलं तरीही गावात त्यांना “बॅटरी आंबा वाले” म्हणूनच ओळखत असत ... “बॅटरी आंबा” म्हणजे दुसर्यायच्या बागेतून चोरून आणून बाजारात विकलेला आंबा ..... त्यामुळे आंब्या-काजुच्या दिवसात पक्या-तुकयाची चंगळ असली तरी बरीच लोक दबक्या आवाजात त्यांना चोर ठरवून मोकळे होत .....

तर एका बुधवारी बाजार करून पक्या –तुक्या गोठणे वरुन कुचवडे ला परत येत होते ,येताना वाटेत आबा सोनाराची आंब्याची बाग लागली ... मग काय ? दोघेही लगेच दगडी कुंपणा वर चढून शोधक नजरेने बागेत आंबे कुठे आहेत त्याची टेहळणी करू लागले... इतक्यात कुठूनतरी राख पक्याच्या अंगावर पडली... काय झाले म्हणून बघतो तर बागेत आबा सोनार आणि मांत्रिक भगत “दुराई चेपण्याचा “ विधी करत होते .... हा “दुराई चेपणे “विधी म्हणजे भगताच्या सहाय्याने तेथील रखवालदार भुताला नारळ कोंबडा देणे व बागेचे रक्षण करण्यास सांगणे. शेवटी तो कोंबडा कापून नारळ एका लाल कापडात बांधून बागेतील एका झाडावर बांधायचा व त्यानंतर अभिमंत्रित भस्म सर्व दिशेला उडवायचे ..... तेच भस्म नेमके पक्याच्या अंगावर पडल्याने त्याची जाम टरकली होती ... तसाच तो कुंपणावरन खाली उतरला आणी तुक्या ला सोबत घेवून धावत धावत कसाबसा घरी पोहोचला.... पण भीतीने त्या दोघांची जाम गाळण उडाली होती ....

असेच काही दिवस गेले... आता आंब्याचा सीझन संपत चालला होता ... आता चोरी कुठे करायची असा प्रश्न त्या दोघांना पडला कारण बर्यादच बागांतील आंबे मालकांनीच काढून नेले होते आणि काहींनी चोर्याच होतात म्हणून नेपाळी गुरखे राखणेसाठी आणून ठेवले होते ... ते गुरखे चोर दिसताच कुकरी घेवून धावत यायचे ...त्यामुळे पक्या-तुक्या सारख्या चोरांनी त्याचा चांगलाच धसका घेतला होता .... शेवटी एकच उपाय ... आबा सोनारची बाग ... कारण तिथे गुरखे नव्हते आणि आंबेहि अजून बरेच शिल्लक होते .... पण पक्याच्या मनात “दुराई”ची भीती बसलेली होती ,त्यामुळे त्याचे मन काही आबा सोनाराकडे चोरी करायला धजेना...
पण आता पावसाळा जवळ आला होता आणि पोरांना शाळेत नवीन वर्षाच्या साठी वह्या पुस्तके घ्यायला दोघांकडेही पैसे नव्हते ... त्यामुळे शेवटी नाईलाज झाला ... तुक्या ने कशीतरी पक्याची समजूत काढली आणि मग दोघांनी संध्याकाळीच फुल्ल दारू प्यायली आणि त्या रात्री आबा सोनाराच्या बागेवर डल्ला मारण्याचा विचार पक्का झाला
.....

ती नेमकी वैशाख अमावास्येची रात्र होती. चारी बाजूला मिट्ट काळोख पसरलेला ... आकाशात थोडेफार ढग होते ,त्यामुळे चांगलेच उकडत होते ,त्यामुळे त्रासलेले लोक अंगणातच झोपून पावसाची आतुरतेने वाट पहात होते . अशातच रात्री अकराच्या सुमारास पक्या अन तुक्या बॅटरी घेवून आबा सोनाराच्या बागेकडे निघाले . सोबत दोरी आणि दोन गोणी (मोठ्या पिशव्या /पोते ) घेतल्या होत्या आंबे आणायला. थोड्याच वेळात दोघे बागेत पोहोचले आणि पक्या एका मोठ्या झाडावर चढून आंबे काढू लागला . तुक्या झाडाखाली उभा राहून दोरीने गोणी खाली घेणार होता आणि चारी बाजूला लक्षं देखील ठेवणार होता ....

पंधरा वीस मिनिटे गेली आणि पहिली गोणी पक्याने खाली सोडली ... तुक्या ने गोणी सोडवून घेतली आणि तंबाखूचा बार भरला . इतक्यात पक्याच्या कानात आवाज आला ” आता बस्स कर ... पुरे झाले ....” पक्याला वाटले तुक्या च बस्स म्हणतोय ... म्हणून त्याने तुकयाला शिव्या घालायला सुरुवात केली ... “अरे साल्या ... तू सांगितलस म्हणून तर आलो ना आंबे चोरायला ? मग बस्स काय म्हणतोस ?” तुक्या बोलला “मी कुठे काय बोललो? “ ...मग बरीच बाचाबाची झाली ... शेवटी पक्या नशेत असल्यामुळे त्याने काहीतरी आवाज ऐकला असेल ,ए म्हणून त्यांनी आवाजाकडे दुर्लक्ष केले आणि पुन्हा दुसरी गोणी भरून आंबे काढायला सुरुवात केली ...

दुसरी गोणी भरली आणि ती खाली सोडून पक्या झाडाखाली उतरला ... आता दोघेजण एकेक गोणी खांद्यावर घेवून निघणार इतक्यात चमत्कारच झाला.... .... तुक्या कडची गोणी एकदम हलकी आणि पक्या कडची एकदम जड झाली होती... आता त्यावरून पुन्हा भांडणे सुरू झाली ... आणि दोघांनीही एकमेकांची आई-बहीण काढायला सुरुवात केली ...”साल्या ,मी इतका मर-मरून जीव धोक्यात घालून आंबे काढतोय आणि तु वाटणीत घोटाला करतोस काय? आधी माझ्या वाटणीचे आंबे दे “ असे तुक्या ने म्हणताच त्या दोघांमध्ये तूफान हाणामारी चालू झाली... शेवटी चल आंबे बाहेर काढ ... असे पक्याने म्हणताच तुक्या जड असलेली गोणी उघडू लागला .... गोणी उघडताच एक काळी आकृती गोंनीतून बाहेर पडली .... आणि पक्याची मानगुट पकडून अक्राळ विक्राळ हसत म्हणाली .... “ अरे हरामखोर चोरांनो..... मी इथला रखवालदार भूत आहे... आबा सोनारा ने दुराई चेपून मला आंबे राखायला बसवलं आहे ...... तरीपण मी तुम्हाला एक गोणी आंबे द्यायला तयार होते ,… पण ह्या पक्याने माझं ऐकलं नाही .... आता भोगा आपल्या कर्माची फळं .... तुमचे आंबे मीच गायब केलेत ...... हरामखोरांनो आजपासून हे चोरीचे धंदे सोडा आणि गपगुमान मोलमजुरी कष्ट करून जगा ....बोला आहे कबुल ?नाहीतर आत्ताच तुमचा दोघांचा जीव घेते ..... “

पक्या तुक्या तर भीतीने अर्धमेले झाले होते ... दोघांनाही दरदरून घाम फुटला होता.... . त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता ..... तरीपण दोघांनी त्या भूताच्या हातापाया पडून कशीबशी सुटका करून घेतली ... आणि बॅटरी ,दोरी ,गोणी सगळे तिथेच टाकून धूम ठोकली ... येताना अडखळत –ठेचकाळत कसेबसे अंधारातून घरी पोहोचले ... आणि दोघेही तापाने फणफणले होते ... नंतर आठ दिवस तो ताप उतरलाच नाही.... डॉक्टरी उपचारावर बराच पैसा खर्च झाला ... शेवटी गोठणेच्या नागू भगता कडे दोघांना नेण्यात आले... नागू भगता ने सांगितल्यानुसार आबा सोनारच्या बागेच्या कुंपणावर एक नारळ विडा ठेवून माफी मागावी लागली ,आणि पुन्हा आयुष्यात चोरी करणार नाही , अशी शपथ दोघांनी तिथे घेतली...... त्यानंतर दोनच दिवसात मग ते बरे होवून हिंडू फिरू लागले .... दोघांनीही आता तात्या बामणा च्या मळ्यात कामाला जायला सुरवात केली ..... आयुष्यात परत त्यांनी कधीच चोरी केली नाही ... मात्र दुराईचा हा किस्सा गोठणे अन कुचवडे च्या पंचक्रोशीत सगळीकडे फेमस झाला ! आणि त्यामुळे त्या पंचक्रोशीतल्या आंबा –काजुच्या चोर्याा मात्र एकदम बंद झाल्या ...........!

हे आमचे पेज ---

https://www.facebook.com/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9F%E...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

*

प्लॉट चांगला होता..
थोडी अजुन खुलवता आली तर बघा..
एकदम साच्यात लिहिलेली वाटतेय.. एक होता राजा सारखं..
पुढील लेखनास शुभेच्छा.. Happy