गोष्ट एका अरभाट 'बिझनेस मॉडेलची

Submitted by बावरा मन on 29 February, 2016 - 08:30

सन १९९३. देशात उदारीकरणाचं वारं वाहू लागलं होतं. मनमोहन सिंग आणि नरसिंह राव ही जोडगोळी देशाला गहाण ठेवत आहे, असा आरोप विरोधक उच्चरवात करत होते. बाहेरच्या उद्योगांसाठी आपले दरवाजे उघडले तर आपल्या लोकांचं काय होईल, असा प्रश्न तावातावाने विचारण्यात येत होता. नवीन आणि जुने असा संघर्ष सर्व क्षेत्रांत चालू होता. या संघर्षाचं चित्रपटसृष्टीमधलं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे, अभिनेता मिथुन चक्रवर्ती होता. त्या वेळी व्यावसायिक आघाडीवर त्याचं काही फारसं बरं चालू नव्हतं. नवीन दमाची ‘खान’ मंडळी तोपर्यंत बस्तान बसवू लागली होती. मिथुनचे चित्रपट एकामागून एक आपटत होते. तेव्हा अडगळीत जाऊ पाहात असलेल्या मिथुनने आपलं बस्तान रम्य हिलस्टेशन असणाऱ्या ‘उटी’ला हलवलं. तिथे त्याने लक्झरी हॉटेल सुरू केलं, त्याच हॉटेलमध्ये बसून मिथुनने एक अचाट ‘बिझनेस मॉडेल’ तयार केलं. आपल्याला चित्रपटात घेऊ इच्छिणाऱ्या निर्मात्यांना त्याने काही अटी टाकल्या. त्यातली सगळ्यात मोठी अट म्हणजे, चित्रपटाचं शूटिंग उटीमध्येच होईल. शूटिंगसाठी येणारं युनिट मिथुनच्या मालकीच्या हॉटेलमध्ये उतरेल. त्या बदल्यात मिथुन निर्मात्यांना सलग बल्क डेट्स देईल. प्री-प्रोडक्शन, शूटिंग आणि पोस्ट प्रॉडक्शन हे निर्मितीचे विविध टप्पे पार करून सिनेमा तीन ते चार महिन्यांत हातावेगळा होईल. या वेगामुळे निर्मात्याचं बजेट मर्यादित राहील, हा त्यामागचा मुख्य उद्देश.
बजेट कमी असलं तर परतावा सहज मिळेल, असं त्यामागचं गणित. छोटी शहरं आणि ग्रामीण भागातल्या प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून हा सिनेमा तयार केलेला असल्याने तिथून सहज नफा कमावता येईल, हे चाणाक्ष निर्मात्यांना माहीत होतं. ‘बाकीचे स्टार्स चित्रपट सुरू करण्याची डेट देतात; मी चित्रपट पूर्ण कधी होईल, याची डेट देतो.’ असं मिथुन एका मुलाखतीमध्ये आत्मप्रौढीने बोलला होता. ते अगदीच खोटं नव्हतं. कारकिर्दीच्या उतरणीला लागलेला मिथुन आणि छोटे निर्माते यांच्यासाठी ही ‘विन विन सिच्युएशन’ होती. मिथुनच्या करियरला नवसंजीवनी मिळाली. इतकंच नव्हे, तर १९९५ ते १९९९ अशी सलग पाच वर्षं तो देशामधला सर्वाधिक कर भरणारा अभिनेता होता. कमी बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमांनी ‘बी आणि सी क्लास सेंटर’वर चांगलाच धंदा केला. सिंगल स्क्रीन थिएटरच नव्हे तर ओपन थिएटर आणि व्हिडिओ पार्लरमध्ये पण हे चित्रपट चांगले चालले.
या चित्रपटांचा दर्जा काय होता, हे अर्थातच सांगायची गरज नाही. या चित्रपटांमध्ये कुठल्याही वैश्विक जाणिवा झळकत नव्हत्या. चित्रपट माध्यमांची सामाजिक जबाबदारी वगैरे शब्दबंबाळ गोष्टींशी त्यांचा दुरन्वये संबंध नव्हता. आपल्या प्रेक्षकाला काय पाहिजे ते द्यायचं आणि नफा कमवायचा, या निव्वळ व्यावसायिक उद्देशातून हे सिनेमे बनत होते. यातल्या बहुतेक चित्रपटांत मिथुन एक तर प्रामाणिक सरकारी अधिकारी असे किंवा श्रमजीवी वर्गातला (मिथुनचा मोठा चाहतावर्ग यातलाच आहे) असे. सर्व पात्र काळ्या आणि पांढऱ्या रंगात असत. नायिका बहुतेक आखीव, रेखीव आणि भरीव अशी दाक्षिणात्य अभिनेत्री असे. काळी कृत्ये करणाऱ्या खलनायकाचा एकदा नायकाने एकहाती नि:पात केला की, चित्रपटाचं सूप वाजत असे आणि प्रेक्षक पैसे वसूल झाले, या कृतार्थ भावनेने बाहेर पडत असे.
या काळात अनेक दिग्दर्शकांसोबत मिथुनने काम केले, पण त्याची जोडी जमली ती टी. एल. वी. प्रसादशी. या दिग्दर्शकासोबत १९९५ ते २००२ या काळात मिथुनने तब्बल २६ चित्रपटांत काम केलं आहे. कुठल्याही नटाने एकाच दिग्दर्शकासोबत सलग इतकं काम केल्याचं असं उदाहरण विरळाच. टी. एल. वी. प्रसादचा असा दावा आहे की, याची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड‌्स’मध्ये झाली आहे. ‘मी जेव्हा एका सिनेमाचं शूटींग करत असतो तेव्हाच पुढचा सिनेमा लिहीत असतो आणि तिसऱ्या सिनेमाच्या संगीतासाठी काम करत असतो.’ हे टी. एल. वी. प्रसादचं विधान त्या वेळेस प्रसिद्ध झालं होतं.
शरद जोशींनी सांगितलेला ‘इंडिया’ आणि ‘भारत’ हा भेद सगळ्याच क्षेत्रांत दिसून येतो. अगदी सिनेमा आणि चित्रपट प्रेक्षकांमध्ये तो असतो. प्रेक्षकांमध्ये ‘मल्टिप्लेक्स प्रेक्षक’ आणि ‘सिंगल स्क्रीन’ प्रेक्षक असे दोन प्रकार आहेत, असे ट्रेड पंडित आणि चित्रपट निर्माते मानतात. आपला ‘पोटेन्शियल’ प्रेक्षक यापैकी कुठला आहे, हे लक्षात घेऊन निर्माते मार्केटिंगची रणनीती आखतात. पण समीक्षक, प्रसारमाध्यमे, पुरस्कार सोहळे, आणि अगदी ज्याचं पूर्ण लोकशाहीकरण झालं आहे, असं मानलं जातं, त्या सोशल मीडियावर पण सिंगल स्क्रीनमध्ये जाऊन चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकाचा जो सिनेमा आहे, त्याला अनुल्लेखाने मारलं जातं. कसा असतो हा ‘सिंगल स्क्रीन सिनेमा?’ तर त्याचं एक ठरलेलं ‘टेम्पलेट’ आहे. अतिशय मर्यादित बजेट, काही अपवाद वगळता अनोळखी अभिनेते, सुमार संगीत, भडक अंगप्रदर्शन, बटबटीत संवाद, नायकाच्या बहिणीवर बलात्कार करणारा आणि एक टुकार तकिया कलाम तोंडात घोळवणारा खलनायक हे घटक एकत्र केले की, हे ‘टेम्पलेट’ तयार होतं. काही लोक याला ‘बी ग्रेड’ सिनेमा पण म्हणतात. सिनेमा म्हणून याचा दर्जा काय, यावर विवाद असू शकतात; पण जो सिनेमा वर्षानुवर्षं करोडो लोकांचं मनोरंजन करत आहे, त्याची व्यवस्थित नोंद व्हायला नको? हा लेख अशाच एका मिथुनयुगाची नोंद घ्यायचा प्रयत्न आहे, जो ‘लगान’मधला सूत्रधार म्हणतो त्याप्रमाणे, ‘इतिहास के पन्नों में कही खो गया...’

(पुर्वप्रकाशीत)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहीले आहे. याबद्दल पूर्वी वाचले होते. मला तर वाटते या बी ग्रेड वाल्यांनी एकत्र येउन एक स्वतःचे अ‍ॅवॉर्ड सुरू करावे फिल्मफेअर सारखे :).

मात्र मला यात एक दोन प्रश्न पडतात - एक म्हणजे- एका गटातील प्रेक्षकांकरता बनवलेला चित्रपट नेहमी इतका दरिद्रीच असायला हवा का? श्रमजीवी वर्गातील (मिल मजदूर वगैरे) जीवनाचा/घटनांचा संदर्भ घेउन सलीम-जावेद यांनी लिहीलेल्या पटकथा समाजातील सर्व थरातील वर्गाला आवडून गेल्या व इतकी वर्षे झाली तरी त्याबद्दल बोलले जाते. तसे काहीही या चित्रपटांतून निर्माण झालेले नाही. गुंडा सारखे चित्रपट 'त्यांचे वाईट असणे' भन्नाट रीत्या व कदाचित अनपेक्षितरीत्या जमून गेल्याने नंतर गाजले. पण ते अपवाद.

दुसरे म्हणजे अशी 'गरिबांसाठी' करमणूक पर्याय म्हणून पटायला मेनस्ट्रीम करमणूक ही जास्त 'क्लासी' किंवा जी कळायला थोडीफार माहिती करून घ्याची लागते, चित्रपटाबद्दल 'शिकावे' लागते अशी असली तर समजू शकतो. ९० च्या दशकातील मेनस्ट्रीम करमणूकही बर्‍यापैकी जन्ता कॅटेगरीतीलच होती. म्हणजे हम आपके है कौन चालवणार्‍यांत सिंगल स्क्रीन मधे जाणारे प्रेक्षकही बहुसंख्येने असावेत - त्यांच्यासाठी असा वेगळा बी ग्रेड पर्याय कसा काय चालला? त्याचे गणित बहुधा वितरक व थिएटर्स चे मालक यांच्या धंद्याच्या गणितात असावा. म्हणजे हम आपके है कौन पासून तिकिटांचे दर वाढले, मल्टीप्लेक्सेस वाढली. सिंगल स्क्रीन मधला रेट घेउन तेथे चित्रपट लावणे हे फक्त अशा स्वस्तात निर्माण झालेल्या चित्रपटाच्या वितरकांनाच किफायतशीर ठरत असावे. असे काहीतरी गणित असेल.

"बी ग्रेड वाल्यांनी एकत्र येउन एक स्वतःचे अ‍ॅवॉर्ड सुरू करावे फिल्मफेअर सारखे " - मग आता आहे ते वेगळं काय आहे? Wink (pun intended)

>> अभिनेते, सुमार संगीत, भडक अंगप्रदर्शन, बटबटीत संवाद, नायकाच्या बहिणीवर बलात्कार करणारा आणि एक टुकार तकिया कलाम तोंडात घोळवणारा खलनायक हे घटक एकत्र केले की, हे ‘टेम्पलेट’ तयार होतं.

आणि मराठी मध्ये "गरीब नायिका, तिचे महागरीब आई-वडील, तिचा सासरी होणारा छळ, त्यातच नवऱ्याचे अफेअर, ते कमी म्हणून खाष्ट सासू, बहिरा सासरा, भांडकुदळ नणंद, कारस्थानी थोरली जाऊ, बेफिकीर थोरला दीर आणि उडानटप्पू धाकटा दीर" असे हे ‘टेम्पलेट’ होते. कथा वेगवेगळ्या. त्यानुसार काही पात्रे प्लस मायनस. पण मूळ बिजनेस मॉडेल तेच. यात बोनस म्हणून एखादा बलात्कार, थोडीशी फायटिंग व चारदोन गाणी पण असत. सगळी रडकी गाणी अर्थात नायिकेच्या तोंडी आणि एखाद दुसरे उडते गाणे त्या धाकट्या दिराच्या आणि त्याच्या फटाकडी प्रेयसीच्या तोंडी. अशी हि भट्टी लो बजेट मध्ये सुद्धा छान जमून जात असे.

चित्रपटात तरण्या पासून म्हाताऱ्या पर्यंत सर्व पात्रे असल्याने आणि सगळ्यांच्या समस्या दाखवल्या गेल्याने बघायला येणारे सगळे "कनेक्ट" होऊ शकत. आणि म्हणून असे चित्रपट भरपूर गल्ला जमवत.

छान लिहिलंय.
हे चित्रपट झटपट निर्माण करायच्या नादात सर्वच बाबतीत तडजोडी केलेल्या असत. कुठलीच बाजू उल्लेखनीय नसे. भारतात ते फारसे चालले नाहीत पण आफ्रिकेत खास करुन नायजेरियात आणि केनयात ते फारच लोकप्रिय होते.

छान लेख. फारेण्डाची प्रतिक्रिया पण आवडली. मिथुनला याच कारणाने गरीबांचा अमिताभ म्हणत असत ना ?

छान लिहल आहे.अजुन ह्यावर वाचायला आवडेल.
मला उगीच अस वाटत की त्या वेळेच्या हिरो च्या तोंडी आताच कुठलही रॅप टाकल तर कस चित्रीकरण होईल ???

उत्तम लेख!
फारेंडाने उल्लेखलेले मुद्देही महत्वाचे आहेत. 'हआहैकौ'ने केवळ तिकीटाचेच दर वाढवले असे नव्हे तर राजश्रीवाल्यांनी थिएटर्स अपग्रेड केलीत तरच सिनेमा देऊ अशी अट घातली, ते स्वतःच डिस्ट्रिब्यूटर्स असल्याने हे शक्य झाले. सामान्य दर्जाच्या थिएटर्सना; (विशेषतः हिंदी बेल्ट) त्यामुळे मिथून आणि भोजपूरी सिनेमांचाच आधार उरला.
रामसेंच्या सिनेमावरती लेख लिहीतानाही त्यांच्या खास बिझनेसमॉडेलशी परिचय झाला. कमीतकमी प्रिंट्स काढून हळूहळू सिनेमा रिलीज केल्याने त्यांचा प्रॉड्क्श्न खर्च वाचत असे.
मात्र ' या चित्रपटांमध्ये कुठल्याही वैश्विक जाणिवा झळकत नव्हत्या.' या वाक्याचा तीव्र निषेध, कृपया हे वाचा-http://greatbong.net/2007/06/20/gunda-the-legend/