नो रिग्रेट्स !

Submitted by विद्या भुतकर on 21 February, 2016 - 21:27

या वर्षी मी एक संकल्प केला. म्हणजे तसे सर्वच करतात आणि मोडतातही. असो. तर संकल्प असा की प्रत्येक वेळी मुलं जेव्हा मला म्हणतील ना,'आई हे बघ.' तेंव्हा मी बघेनच. आणि पुढे मी म्हणाले,' I dont want any regrets'. माझा म्हणण्याचा हेतू असा की मुलं लहान आहेत तोवरच आई-बाबा म्हणून मागे लागतील, हौसेन दाखवतील तर आपण पहिले पाहिजे. उद्या ते दाखवायचे बंद झाले तर तेव्हा मला पश्चाताप नकोय. आज काल फेसबुक, Whats app वर पण असे बरेच पोस्ट येतात, कसं आपण आलेला क्षण पूर्णपणे जगला पाहिजे, हवं ते केलं पाहिजे, तसंच मुलानाही वेळ दिला पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, इ इ.त्यांच्याबद्दल पुढे बोलूच.
परवा काय झालं आम्ही स्नो-स्कीईंग ला जायचं ठरवलं. ठरवलं कसलं मित्र म्हणाला जाऊ म्हणून हो म्हणालो. अमेरिकेत इतके वर्ष राहून हेच एक होतं जे करण्याचं धाडस मी अजून केलं नव्हतं. दोन पोरांना घेऊन कुठे जायचं म्हणालं की टेन्शनच असतं मला. कुठे पडलं, लागलं, सर्दीच झाली, खोकलाच झाला. पण म्हणलं जाऊन बघू. अगदी वेळेत आवरून, सर्वांना ३-४ कपड्यांच्या आत कोंबून निघालो. अगदी वेळेत पोचलोही. पण तिथे ते वेगळे शूज, स्कीज, मास्क, हे सर्व ४ लोकांचं लावेपर्यंत १२ वाजले होते. म्हणजे परत पोरांना खायला द्यायची वेळ आली होती. बरं आता इतके कपडे अंगावर होते की स्वत:चं पोरं सापडलं तरी नशीब. त्यांना हाताला येईल ते फळ खायला दिलं आणि स्नोवर आलो. एकदम थंडीने वाट लागली होती. (संजय लीला भन्साळीने बाजीराव पेशव्याच्या तोंडात 'वाट लावली' हा शब्दप्रयोग दिल्यापासून मीही बिनधास्त वापरत आहे तो. असो. )
मित्राने सांगितलं या छोट्या शिकाऊ टेकडीवर जाऊ आधी. मग सरकत्या जिन्यावरून आम्ही त्या टेकडीच्या वरच्या टोकाला गेलो. तिथून आमच्या मित्राने मुलांना एकेकाला नेतो असे सांगून त्यांची जबाबदारी घेतली. मला आणि संदीपला बेसिक माहिती देऊन सुरु करायला सांगितले. संदीप पुढे निघाला पण माझी काही जागेवरून हलायची हिम्मत होत नव्हती. जवळ जवळ अर्धा तास मी त्या टेकडीवर दोन्ही हातात त्या काड्या(काय म्हणतात त्यांना विसरले) घेऊन उभी होते. मनात अनेक विचार येत होते. ते स्की घेऊन सरकले आणि थांबता आले नाही तर? आणि थांबायला स्की वाकडे करायला लागतात म्हणजे स्पीड कमी होऊन थांबता येते. सर्व बोलायला ठीक आहे हो ! तिथे आल्यावर कळलं असतं. बरं मला मोठी भीती कशाची तर पाय वाकडे करून थांबताना गुडघे वाकले तर? नडगीला, घोट्याला कुठे लागले, हाडच मोडले तर? आणि हो, मी इतकी पण भित्री नाहीये तरी मला हे सर्व विचार येऊन पुढे जात नव्हते. सर्वात मोठी भीती मला, 'पायाला काही झाले आणि पळता आले नाही तर?" याची होती. या वर्षीच्या १०किमी, हाफ मेरेथोन मध्ये मला पळायचं आहे. ते मी सोडू शकत नव्हते. असो.
शेवटी नाईलाजाने मी पुढे सरकले आणि सर्ररर्र्र…… सरकायला लागल्यावर काय सुचेना. थांबायला म्हणून गुडघे वाकवले तर घसरून पडून गेले. पाय वाकडे ठेवता येईना म्हणून कसेतरी दोन्ही गुडघे एका बाजूला केले. पण तरी दुखतच होते. शेवटी कुणीतरी मला ते स्की काढायला मदत केली. ते निघाल्यावर मी ५ मिनिट तशीच बसून राहिले. बाकी आजूबाजूला जाणारे लोक अंगावर पडतील याची भीती होतीच. मग शेवटी घसरगुंडीवर कसे सरकतात न, तसे घसरत घसरत कशीतरी खाली पोचले. मधेच वाटत होते की हिम्मत करावी का? पण मधेच वाटलं का पण? काय गरज आहे. गप घरी बसायचं न टीव्ही बघत. काय पाप लागणार आहे का? त्यामुळे मला स्वत:ला उचलून हिरोगिरी करण्यात काहीही जोर नव्हता.
वाटलं पोरांना तरी शिकवावं म्हणून मी आणि संदीपने त्यांना थोड्या अंतरावर घेऊन जायचं आणि त्याने वरून सोडलं की मी खाली पकडायचं असं थोडावेळ केलं. मस्त केलं हो पोरानी. म्हणजे माझ्यापेक्षा चांगलंच. अगदी पडले तरी निवांत पडत होते स्नो वर. त्यांना बघून मी थोडी सावरले. म्हणलं बरं झालं त्यांना तरी मजा तेव्हढीच. २.३०-३ वाजता खाण्यासाठी ब्रेक घेतला आम्ही. खाल्ल्यावर मी म्हणाले मी पण प्रयत्न करते रे. स्वनिक कंटाळला होता. म्हटलं चल यांचा शेवटचा राउंड घेऊ आधी. त्याला संदीपने सोडला आणि तो घसरत खाली येउन जोरात पडला आणि रडू लागला. तो काही उठेना. म्हटलं झालं आता कुठे हाड-बीड मोडलं असेल तर काय? आमच्या दोघांच्याही मनात एकच विचार आला, 'कशाला आलो?' (आधी दोन्ही पोरांना इमर्जन्सी मध्ये नेऊन, त्यांना प्लास्टर लाऊन आणलेले अनुभव गाठीशी असल्याने अजून एकदा जायची इच्छा नव्हती. ) नशिबाने तसं काही नव्हतं. थोडा रडून स्वनिक ठीक झाला. मला जरा हुश्श झालं.
सर्वांना धडधाकट घरी घेऊन येताना, गाडीच्या उबेत बसून मी विचार करत होते,'खरंच मला काय झालंय? एकदम एव्हढी भित्री का झाली आहे ? आधी असे बाकी प्रयोग मी केले आहेत आणि घाबरले आहे पण इतकी नाही. अजून एकदा जाऊ आपण नीट शिकू, पोरानाही शिकवू.' पण हे स्वत:ला सांगताना दुसरीकडे माझ्या मनात विचार येत होता, 'का? कशासाठी?'
हे सगळे पोस्ट असतात ना, ' आयुष्य आजच जगलं पाहिजे, I dont want any regrets, जे हवंय ते मनसोक्त करा' वगेरे, ते सर्व खोटे आहेत. पुढचा विचार न करता प्रत्येक गोष्ट करता येत नाही, आणि समजा नाही केली एखादी गोष्ट आणि करावा लागला पश्चाताप, तरी असू दे. सगळंच जमतं असं नाही. शेवटी, 'अरे हे करायला हवं होतं' असं वाटण्यासाठीही काहीतरी हवं ना?
त्यामुळे ज्यांनी कोणी ते सेंटी पोस्ट लिहिले आहे ना, गेले मेले सगळे ते खड्ड्यात. लई त्रास दिला आहे त्यांनी. त्यांना एकतर स्कीईंग येत असेल, किंवा पुढच्या रंनिन्ग्चे विचार ते करत नसतील किंवा ते लोक अजून आई झाले नसतील. नक्कीच हे लोकं आई झाले नसतील.

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२-३ वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर आत्ता थोडं थोडं जमू लागलय स्कीइन्ग!

पण हे स्वत:ला सांगताना दुसरीकडे माझ्या मनात विचार येत होता, 'का? कशासाठी?'
हे सगळे पोस्ट असतात ना, ' आयुष्य आजच जगलं पाहिजे, I dont want any regrets, जे हवंय ते मनसोक्त करा' वगेरे, ते सर्व खोटे आहेत. पुढचा विचार न करता प्रत्येक गोष्ट करता येत नाही, आणि समजा नाही केली एखादी गोष्ट आणि करावा लागला पश्चाताप, तरी असू दे. सगळंच जमतं असं नाही. शेवटी, 'अरे हे करायला हवं होतं' असं वाटण्यासाठीही काहीतरी हवं ना? >> Happy

हे आवडलं...छान लिहिलंय.

ते लोक अजून आई झाले नसतील. नक्कीच हे लोकं आई झाले नसतील.

Happy

कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है!

, 'अरे हे करायला हवं होतं' असं वाटण्यासाठीही काहीतरी हवं ना?>>>> हे आवडलंच...
परवा अशीच एक कविता वाचण्यात आली अट्टाहास कशाला? अशा अर्थाची. की सगळे जमलेच पाहिजे असा आग्रह का? त्याची आठवण झाली. छान लिहिलंय!