पुण्यातील चांगले अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रम

Submitted by हर्ट on 15 January, 2016 - 05:39

अकोल्यात आमच्या शेजारी एक आजी आजोबा रहायचे. आजोबा चार वर्षापुर्वी गेलेत. ते ९५ वर्षाचे होते. आता आजी ९३ वर्षाची झाली आहे. दोन वर्षांपासून त्या पुण्यात वृद्धाश्रमात राहतात. त्यांना मुलबाळ नाही आहे. आजी आणि आजोबा दोघेही संस्कृत भाषेचे प्राध्यापक होते. असे शेजारी आणि तेही आजीआजोबा आपल्याला मिळालेत ह्याचे मला फार अप्रुप वाटते. आजीला कुठल्याच नातेवाईकांकडे राहयचे नाही. सासरच्या लोकांना आजी नको आहे. आजी मला नेहमी विनंती करतात की चांगले वृद्धाश्रम बघ. मला पुण्यात इतके दिवस शोध घ्यायला मिळत नाही. महिना १० हजार इतपत त्या देऊ शकतात. पुर्वी त्या सिंहगड रस्त्यावर दुर कुठेतरी विजनवासात एका ठिकाणी राहयच्या तिथे फक्त त्या एकच वृद्धा होत्या. फार कंटाळून जायच्या. मी पुण्यात आलो की आजींना माझ्याघरी घेऊन येतो. त्या स्वभावाने फार आनंदी आहेत. सतत वाचायला हवच असत त्यांना. अशा आजींसाठी मला चांगले वृद्धाश्रम शोधायचे आहे. इथे कुणी मदत करु शकेल का? मी जर भारतात परतलो तर आजींना माझ्याच घरी ठेवून घेईन. पण मी नसताना मला माझ्या घरच्यांना ही जबाबदारी देणे योग्य वाटत नाही. कारण माझी आई हीच एक आजी झालेली स्त्रि आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफि, हो का? मला हे नवीन आहे. दोन वर्षांपूर्वी काका माझ्याकडे आले होते, तेव्हा याविषयी काही बोलले नाहीत. असो. बरं झालं, नवीन माहिती मिळाली.

बी, किती छान विचार आहेत आणि ते आचरणात आणायचा प्रयत्न करतो आहेस हे कौतुकास्पद आहे. तुझ्या प्रयत्नांना यश येऊ दे.

अथश्री परांजपे स्कीम्सची ज्येष्ठांसाठीची स्कीम आहे. सर्व अत्यावश्यक आणि दैनंदिन सेवासुविधा आहेत. कन्सेप्ट चांगली आहे.

सीमा, आमच्या शेजारी भाड्याची घरे नाहीत आणि मुख्य म्हणजे आजीला कुणाचेही पैसे चालत नाही. त्या पैशाच्या बाबतीत अत्यंत चोख आहेत. एकदा मी त्यांना खजूर आणि केळी आणून दिली. मी त्यांच्याकडून पैसे घेतले नाही. त्यांना माझा खूप राग आला आणि नंतर त्यांचा तो राग बघून मला कळले की ह्यांना पैसे घेतलेले आवडत नाही. मी ५० रुपयाची नोट घेतली आणि मग त्या परत चांगल्या बोलायला लागल्या. मी जर त्यांना माझ्या घरी रहायला आणले तर त्या मलाही पैसे घेऊन मला ठेव असेच म्हणतील इतक्या तत्त्वाच्या आहेत.

आजोबा गेल्यानंतर आजींने लवकर स्वतःला सावरले. भाचे आणि पुतणे घरावर डोळा ठेवून होते म्हणून कुणालाही खबर न करता आजींनी स्वतःचे घर थोडी कमी किम्मत ठेवून विकले आणि फक्त मला सांगितले की यशवंत मी येथून आता हलणार आहे. मी कुणाहीकडे राहणार नाही. माझी पिढी हयात नाही. भाचे आणि पुतणे ६० च्या पुढे आहेत. त्यांना सुना आणि नातू आले आहेत. मी अशांच्या घरात नीट दिसणार नाही. शिवाय मला कोण कसे आहे हे खूप चांगले ठावूक आहे. आजींनी वर्तमानपत्र वाचून त्यातली कात्रणे मला दाखवली. एकेक कात्रण वृद्धाश्रमाबद्दल होते. मी सिंगापुरला असताना कळले की आजींनी घर विकले आणि त्या पुण्यात आहेत. माझ्या बहिणीकडे पत्ता ठेवला. पुण्याशी कुठलाही सबंध नसताना आजी वयाच्या ९१ वर्षी इतक्या लांब आल्यात. घरातील सगळे सामान आर. एस. एस. दाण केले. फक्त पंचायनन, कपडे आणि एक प्याला. जिथे आजींचे टुमदार घर आणि बाग होती तिथे आता जे आले आहेत त्यांनी सहा महिन्यात घर तीन मजले करुन घराचा नकाशाच बदलला. बाग काढून टाकली. घरे बांधली. काही भाड्यानी दिलीत. एकदम कॉम्प्लेक्स सारखे केले.

Pages