सिनेमा रिव्हीव्ह - नटसम्राट

Submitted by अजय चव्हाण on 2 January, 2016 - 10:50

आजपर्यंत कित्येक सिनेमे पाहीले, अनुभवले, कथेच्या खोल डोहात मनाला बुडवले...पण नटसम्राट पाहील्यानंतर या सिनेमावर काहीतरी लिहावं असं पहिल्यांदाचं वाटलं म्हणून हा छोटासा प्रयत्न....

एखादा भग्न झालेला किल्ला जसा आपला भुतकाळ जगतो, त्याचा तो भारदास्तपणा, बाणेदारपणा, रूबाब, त्या काळी असलेला त्याचा मानमुराद तो अजुनही अनुभवतोय...पण आता त्याला भग्न अवस्था आलीय..
त्याचा तो रूबाब नामशेष व्हायच्या वाटेवर आहे....
काळाने घाला केला नि सारंच काही हिरावून घेतलयं...
पण तो छातीठोकपणे अजुनही आपल्या अस्तित्वाची जाणिव करून देतोय...

अशीच काहीशी "नटसम्राट" अशी पदवी कमावलेल्या श्रीयुत गणपत रामचंद्र बेलवलकर (नाना पाटेकर)
यांची ही शोकांतिका...
गणपतराव रंगभुमीला अखेरचा नमस्कार करून थोडं आयुष्य कुंटुंबाबरोबर जगायचं ठरवतात,
सरकाराच्या ( पत्नीच्या, मेधा मांजरेकर) यांच्या भाषेत सांगायचं झालं तर गणपतरावांनी नाटक सोडलं नाही तर ते घरी घेऊन आले..आणि सुरू होतो नवा खेळ, उभ्या आयुष्यात साकारलेल्या, जगलेल्या, अंतरंगात ओतप्रोत भरलेल्या भुमिका नि त्यांच्या खर्या आयुष्यातली खरी भुमिका...यांचा मेळ साधता साधता झालेली फरफट..
नात्यांत असलेली ओढ, त्यातला तो किळसपणा, अहंकार, प्रेम, विनोद, विक्षप्तपणा, आचरटपणा,फटकळपणा, आतातायीपणा, भांडखोरपणा ( नटसम्राट यांच्या भाषेत सांगायचं झालं तर भाडखाऊपणा), दुःख, शल्य, भीती, स्वार्थ, पश्चाताप, राग, मिश्किलपणा, या सार्यां मानवी भाव भावना आणि त्यांचे स्वभाव म्हणजे हा सिनेमा...

एका कलाकाराला आपली कला नेहमीच प्रिय असते..
त्यांनी ती सोडली तरी कला तर त्याच्या नसानसात असते ती नाही सोडून जात त्याला कधी, जाते ती फक्त ती फुलवण्याची ओढ..रंगभूमी आणि कर्मभुमी यांत खुप फरक आहे..रंगभुमीवर झालेल्या चुका सुधारता येतात पण कर्मभुमीवर कदाचित नाहीच...व्यासपीठ ते घराचा उंबरा यातलं अंतर फारसं नसलं तरी ते ओलांडण अवघड आहे...व्यासपीठावर उभं राहून जमलेल्या लोकांच्या मनावर राज्य करता येतं...पण आपल्याच घराच्या उंबरावर उभं राहून आपल्याच माणसाची मन राखायला अवकाश लागतो..

दोष कुणाचा? आपल्याच ओठांना नकळत चावलेल्या दातांचा?? ओठही आपलेच नि दातही आपलेच..
सिनेमा सरकत जातो, नव्हे आपल्याला त्यात तो अजुनच गुंतवून ठेवतो आणि जेव्हा संपतो तेव्हा काहीतरी अप्रतिम पाहल्याच, भासरूपी जगात स्वतःच्या मनाला हरवून देण्याचा आनंद देऊन जातो ...

नाना पाटेकर यांच्या अभिनयाचं कौतुक करायला शब्द सापडणार नाहीत, त्यांनी उभा केलेला "नटसम्राट" मनाच्या खिडकीतून ह्रद्याच्या गाभार्यात अलगद शिरतो...
विक्रम गोखले यांनी साकारलेला रामभाऊ मस्तच..
मेधा मांजरेकर, मृण्मयी देशपांडे, यांनी साकारलेली व्यक्तीमत्वेही अगदी जिवंत वाटतात..
छायाकंनही जबरजस्तच....
" नात्याला नाव आपुल्या"
"मिठूनि लोचने"
ही दोन्ही गाणी अप्रतिम तर आहेच पण त्याचबरोबर त्या कथानकाच्या प्रसंगाला चपखल बसली आहेत..

पात्रे -

नटसम्राट ( गणपत बेलवलकर) : नाना पाटेकर
रामभाऊ : विक्रम गोखले
नटसम्राट पत्नी (कावेरी): मेधा मांजरेकर
नटसम्राटाची मुलगी (विद्या) : मृण्मयी देशपांडे
सुन (नेहा) : नेहा पेंडसे
जावई : सुनिल बर्वे
मुलगा (मकरंद) : अजित परब

का पाहावा :

नाना पाटेकर आणि विक्रम गोखले यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहण्यासाठी,
एक खरी अजरामर कथा अनुभवण्यासाठी..

नामांकन : ******

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

का पाहावा :

नाना पाटेकर आणि विक्रम गोखले यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहण्यासाठी........ मस्त ! बघणार Happy

सर Lol
ओके नो प्रॉब्लेम .. परीक्षणाबद्दल धन्यवाद.. कोणाला पहिल्यांदा लिहावेसे वाटले यातच या चित्रपटाचे यश आहे.. असे भारावून टाकणारे चित्रपट विरळेच असतात.. असे अनुभव थिएटरात घेणे सोडायचे नसते.. आशा करतो जमेल मला हा बघायला..

सर ह्या साठी म्हणालो की,
मी अजुन वयाने तुमच्यापेक्षा लहान आहे..
पंचविशीपण ओलांडली नाही हो अजुन मी Wink
आणि हो बघाच तुम्ही...
तुम्हाला नक्की आवडेल हा सिनेमा...

चित्रपट पाहण्याची इच्छा आहे पण नानाला हताश, निराधार पाहणे शक्य होणार नाही असे वाटतेय.

अजय सर, ऋ आत्ता कुठे बावीसचा झालाय. Happy

निधि, एका अभिनेत्याचे वेगवेगळ्या मूडम्ध्ये शिरणे काम आहे आणि टेस्टही आहे. त्यामुळे हताश स्थितीत ही तो दिसणे ही त्याच्या कथित स्टिरिओटाईप इमेजवर (सनकि) विजय मानता येईल. नाना कित्येक चित्रपटात ढसढसा रडला आहे. शागीर्द नावाच्या चित्रपटात एका तिसर्‍या फळीतील खलनायकाने त्याच्या फाड फाड मुस्काटीत मारलेल्या आहेत आणि त्यावर नानाने फक्त गाल चोळीत हरल्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे मोठ्या अभिनेत्याची इमेज एका चित्रपटातून दुसर्‍या चित्रपटात नेउ नये.

पंचविशीपण ओलांडली नाही हो अजुन मी
>>>
वा म्हणजे मी ती ओलांडलीय हे तुम्हीच ठरवले ... ठरवले तर ठरवले, माझ्या ग'फ्रेंडला सांगू नका.. Wink
असो, ईथेच पुरे.. नाहीतर यावरच चर्चा भरकटेल..

काल बूक माय शो चाळला, जिथे मला आज बघणे शक्य होते ते जवळपासचे सारे थिएटर फुल्ल झालेत आलमोस्ट.. अगदीच पहिल्या रांगेत चित्रपट बघणे नको म्हणून बूक नाही केली तिकीटे.. ओपनिंग नक्कीच मजबूत मिळाली आहे चित्रपटाला.. अंदाजाप्रमाणेच..

नटसम्राट मधली अप्पा बेलवलकरांची भुमिका लाचार, हतबल, हताश नाहि, माझ्या मते. त्या भुमिकेतलं फ्रस्ट्रेशन, चीड नानासारखा सणकि कलाकारच मस्त साकारु शकतो...

काल पाहिला. चित्रपट संपल्यानंतर काही वेळ समोरचं काहीच दिसत नव्हतं. इतकं सुन्न झालो होतो. विशेष म्हणजे हा सिनेमा पहायला तरुणाई जास्त होती. नानाचा आजवरचा सर्वोत्तम अभिनय म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. क्लायमॅक्सची स्वगतं तर कमालच.

ऋऽऽन्मेष सर...
.साॅरी हा मला माहीत नव्हत ...एक॔दरीत तुमच्या लेखनावर मी गेस केलं होतं की, तुम्ही बरेच अनुभवी असाल म्हणून...

असो, तरीही तुम्हाला मी सर च म्हणणार आहे...
तुमचे लेख इथे नोंद करण्याअगोदर बरेच वाचले आहेत.. त्यामुळे तुमच्या लेखांवर प्रतिक्रिया नाही देता आली..

त्यात तुमचा "सुदामा आणि पोहे" हा लेख तर अप्रितमच...
आणि खरं सांगू तुम्हाला मी तुमचा फॅन आहे ..