उणीवांची जाणीव - नटसम्राट (Movie Review - Natsamrat)

Submitted by रसप on 2 January, 2016 - 04:15

'नटसम्राट' पाहून झाल्यावर एक वेगळीच जाणीव जागृत होते. ही जाणीव उणीवेची की रितेपणाची, नक्की समजायला थोडा वेळ जातो. तोपर्यंत आपण आपल्या मनाची हीच समजूत घातलेली असते की हे एक रितेपणच आहे. जळून खाक झालेल्या नाट्यगृहात, त्या अवशेषांप्रमाणेच ध्वस्त, मोडकळलेला, खंगलेला एक महान कलाकार जे रितेपण अनुभवत असतो, तेच आपल्या मनातही आलं असावं, असं वाटतं. असं वाटण्यामागे कारणंही आहेत. नाना पाटेकरने साकारलेला अप्रतिम 'नटसम्राट गणपत रामचंद्र बेलवलकर', मेधा मांजरेकरनी साकारलेली 'सौ. बेलवलकर', बेलवलकरांच्या मित्राच्या सहाय्यक भूमिकेत कमाल करणारे विक्रम गोखले, मूळ संहितेचा जपलेला प्राण, एकापेक्षा एक जबरदस्त स्वगतं, सर्व सहाय्यक कलाकारांचा (एखादा अपवाद वगळता) जबरदस्त अभिनय, सक्षम तांत्रिक बाजू (कॅमेरावर्क इत्यादी) अशी अनेक कारणं.

पण काही काळ गेल्यावर आपलंच आपल्याला समजतं की ही जाणीव रितेपणाची नाही ! ही जाणीव तर उणीवेची आहे किंवा 'उणीवांची' आहे !
सगळ्यात मोठी उणीव ही की ह्या कहाणीत काही म्हणता काहीसुद्धा नाविन्य राहिलेले नाही. मुलांनी नाकारलेल्या म्हाताऱ्यांची फरफट आजपर्यंत कित्येकदा पाहिलेली आहे. वेगवेगळ्या भाषांतून पाहिलेली आहे. अगदी थेट आणि तितकीच भ्रष्ट नक्कल आपण हिंदी चित्रपट 'बागबान'मध्ये पाहिली. तो चित्रपट वेगवेगळ्या वाहिन्यांवरुन इतक्या वेळा माथी मारून झाला आहे की इच्छा नसतानाही पाहिला गेला आहे. असेच इतरही अनेक चित्रपट, मालिका आपल्या माथी मारल्या गेल्या आहेत. असेल, त्या सगळ्याचं उगमस्थान वि.वा. शिरवाडकरांचं 'नटसम्राट'च असेल आणि त्या अर्थी हा चित्रपट 'ओरिजिनल'ही असेल. पण हा ओरिजिनल अनेक 'डुप्लिकेट्स' नंतर आल्याने, त्याची 'ओरिजिनलिटी' लुप्त झालेल्या एखाद्या मोहेंजोदडोसारख्या संस्कृतीसारखी गाडली गेलेली आहे.
अर्थात, चित्रपट पाहायला जातानाच आपल्याला हे सगळं माहित असतं. असं अजिबात नाही की आपल्याला कहाणीची कल्पना नसताना हे कथानक आपल्यासमोर उलगडतं. पण मग हे जे नाट्य रंगभूमीवर गाजलं आहे, ते मोठ्या पडद्यावर सादर केलं जात असताना त्यात काय वेगळेपण असेल, हे कुतूहल उरतं. त्या कुतुहलापोटी चित्रपट पाहत असताना विक्रम गोखलेंचं 'रामभाऊ' हे पात्र वगळता ठसठशीत वेगळेपण असं काही दिसत नाही. नाटकाचं चित्रपटीकरण करताना एक अजून वाव मिळतो, तो म्हणजे संगीताचा. खासकरून प्रचंड भावनिक ओढाताण व नाट्यमयता असलेल्या कथानकात तर संगीत खूपच महत्वाचा भाग बनू शकतं. किंबहुना, ते बनायला हवं, अशी अपेक्षा असल्यासही गैर नसावं. मात्र इथे ही बाजू सपशेल लंगडी पडली आहे. १-२ गाणी जी अध्ये-मध्ये अर्धी-मुर्धी वाजतात ती एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिली जातात. But then, 'संगीत' हा चित्रपटाचा एक भाग असणं, ही संकल्पनासुद्धा आता कालबाह्य झालीच आहे. त्यामुळे त्याकडे होणारा कानाडोळा स्वाभाविकच.
मात्र चित्रपट पाहायला जाण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असतं, 'नाना.' नाना निराश करत नाही. नानाने कधीच निराश केलेलं नाही. नाना हा अभिनेता निराश करणाऱ्या अभिनेत्यांच्या जमातीचा नाहीच. बेलवलकराचा विक्षिप्तपणा आणि मनस्वीपणा तो पुरेपूर साकार करतो. बापाचं हळवेपण, पतीचं प्रेमळ मन, कलावंताचा अभिमानी बाणा अशी सगळी रूपं हा महान अभिनेता अजोड सक्षमपणे सादर करतो. "मी आहे ज्युलियस सीझर, मी प्रतापराव, मी ऑथेल्लो, मी सुधाकर आणि मीच गणपत रामचंद्र बेलवलकर 'नटसम्राट!' " हे म्हणतानाचा नानाचा आवेश अंगावर काटा आणतो ! ज्यांनी डॉ. श्रीराम लागूंचा 'नटसम्राट' पाहिला आहे, त्यांना नानाच्या नटसम्राटावरही त्याचा प्रभाव जाणवेल. मात्र तो केवळ 'प्रभाव'. नानाचा 'नटसम्राट' स्वतंत्रपणे नक्कल करण्याचा विषय आहे खचितच.
रामभाऊच्या भूमिकेतले विक्रम गोखले मनावर आघात करतात. 'अरे नीच माणसा, चप्पल हरवल्याचं दु;ख लंगड्याला तरी सांगू नकोस !' असं हसत हसत आपल्या मित्राला सुनावताना त्यातली सुप्त व्यथा ते बेमालूमपणे पोहोचवतात. दोघांवर चित्रित झालेल्या प्रत्येक प्रसंगांत अश्या प्रकारची जुगलबंदी पाहायला मिळते. इस्पितळात गणपतराव आणि रामभाऊ 'कौन्तेय' मधील कृष्ण-कर्ण संवाद उत्स्फूर्तपणे सादर करतात. तो प्रसंग अभिनयाच्या जुगलबंदीचं एक शिखर आहे.
इतर वेळी कधी मेधा मांजरेकर तर कधी मृण्मयी देशपांडे जान ओततात. खासकरून मुलीच्या घरून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यावरचा जो प्रसंग आहे, ज्यात मुलीला (मृण्मयी) उपरती होऊन ती गयावया करून आई-वडिलांची क्षमा मागते आणि अपमानामुळे रागाचा पारा चढलेली आई (मेधा मांजरेकर) जळजळीत कटाक्ष टाकून दोन शब्द सुनावते, तो सगळा प्रसंग तर 'बॉयलिंग पॉईण्ट' ला पोहोचणारा आहे. सगळ्या सहाय्यक अभिनेत्यांत 'अजित परब' का आहेत, हे मात्र समजत नाही. त्यांचं संगीत जितकं नीरस वाटतं, तितकाच त्यांनी साकारलेला मुलगासुद्धा. त्या भूमिकेसाठी इतर कुणीच का मिळू नये ?

ह्या सर्व कलाकारांकडून उत्तम काम करून घेतल्याबद्दल दिग्दर्शक महेश मांजरेकरांना सलामच. मात्र हे नाटक चित्रपटात आणताना पदरचं जे काही ओतलं, घातलं आहे, ते कमी पडल्याने; त्याचं माध्यमांतर करण्याचा हेतू काय ते कळत नाही. 'पुनरुज्जीवन' हाच जर हेतू असेल, तर तो साध्य नक्कीच झाला आहे. पण त्याहून पुढे त्यांनी जायला हवं होतं. कुठे तरी त्यांच्यातला पटकथाकार बचावात्मक झाला.

Natsamrat-Poster1.jpg

'नटसम्राट - असा नट होणे नाही'.
डोळ्यांत पाणी आणतो. व्याकुळ करतो. मात्र तरीही ही जाणीव मागे सोडतोच की अजूनही काही तरी हवं होतं. अगदी हीच नाही, पण अशीच थोडीशी जाणीव 'कट्यार काळजात घुसली'नेसुद्धा मागे सोडली होतीच. मात्र 'कट्यार' मध्ये असलेल्या 'नटसम्राट'च्या मानाने प्रचंड मोठ्या उणीवांवरसुद्धा 'कट्यार'ने मात केली होती, ती त्यात असलेल्या इतर काही प्राबल्यांमुळे. इथे मात्र 'अभिनय' वगळता त्या उणीवांवर मात करण्यासाठी काहीच नसल्याने 'अभिनय ह्या लोकांनी करायचा नाही, तर कुणी करायचा?' असा सरळसाधा प्रश्न पडतो आणि उणीवांवर मात केली जात नाही. थोडक्यात, ज्या कारणासाठी 'कट्यार' आवडला, त्याच कारणामुळे 'नटसम्राट' कमी आवडतो. 'आवडत नाही' असे मी म्हणणार नाही. पण अजूनही खूप आवडायला हवा होता. कारण अखेरीस आपण आवंढे गिळतो. पाणी पुसतो आणि खुल्या दिलाने ह्या कलाकृतीला दादही देतो. मात्र ती दाद खऱ्या अर्थाने असते पडद्यावर दिसलेल्या कलाकारांसाठीच. पूर्ण चित्रपटासाठी नव्हे.

रेटिंग - * * *
http://www.ranjeetparadkar.com/2016/01/movie-review-natsamrat.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त परिक्षण.

सिनेमाचा प्रोमो पाहिल्यावरच चित्रपट बघण्याचे ठरले आहे, अगदी अंगावर येते नानाची डायलॉगबाजी. काही उणिवा जरी असल्या तरी नानासाठी बघणारच होते आणि आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे विक्रम गोखले आणि नानाच्या अभिनयाच्या जुगलबंदीसाठी तर नक्कीच.

नटसम्राटचा काही भाग पाठयपुस्तकात होता का? असं अंधुक आठवत आहे.
एकूण ते नाटक ट्रॅजिडी असल्यामुळे फार फार रडकं वाटलं होतं. सिनेमा बघताना बोअर होणार नाही का?

हीसुद्धा शोकांतिकाच आहे. मात्र अध्ये-मध्ये काही हलके-फुलके प्रसंग - खासकरून विक्रम गोखले आणि नानाचे एकमेकांशी मित्रत्वाचे संवाद - पेरले आहेत. त्यामुळे कंटाळा यायला नको, खरं तर.

नाटकात सौ बेलवलकर ( शांता जोग ) सरकार असतात. इथे तसा उल्लेख नाही का ?
मी डॉ लागूंचा प्रयोग बघितला आहे नंतर दत्ता भट ते राजा गोसावी असा अनेकांनी तो साकारला पण माझी बघायची हिम्मत झाली नाही. डॉक्टरांनी ऐन तरुणपणी केलेले प्रयोग ज्यांनी पाहिलेत, त्यांना माझ्या भावना नक्कीच कळतील.

खरं तर शिरवाडकर म्हणत हे नाट्क लिहिताना त्यांच्या मनात डॉक्टरच होते ( पण याबाबत मतभेद आहेत. या लेखन काळात डॉक्टर टांझानियात होते )

लोकप्रभात दारु पिण्याच्या आणि नाचगाण्याच्या प्रसंगावर टिका केलीय. बेलवलकर संगीत नाटकांच्या काळातले ( भामिनीचा उल्लेख आहे नाटकात ) त्यामुळे जूनी नाट्यगीते वापरायला हवी होती. नाना कितीही आवडत असला तरी कधी कधी तो नानाचीच भुमिका करतो, इथेही काही प्रसंगात तसे घडले असेल. विक्रम गोखले ना पेपर सोप्पा गेला असणार कारण हि भुमिकाच नव्याने लिहिलेली असल्याने, त्यांना आपल्या परीने म्हणजे अर्थातच उत्तम साकार करता आली असेल.

काल पाहिला.

पिक्चर पाहण्याचे एकमेव कारण म्हणजे मी ते नाटक पाहिले नव्हते.

ज्यांनी ज्यांनी नाटक पाहिले होते ते सर्वजण म्हणाले की नाटकच जास्त सरस होतं; मग डॉक्टर असोत किंवा दत्ता भट असोत. नक्कीच "बागबान" इफेक्ट असावा.

नानाने निराश केले नाही; पण माझे स्वतःचे भाकीत... सोमवारपासून प्रत्येक थेटरात, प्रत्येक खेळाला जास्तीत जास्त २० सीट खपतील.

उगीचच एक विचार मनात आला.. नाना आणि विक्रम गोखले यांच्या भूमिकांची अदलाबदल केली असती तर? त्याचे कारण म्हणजे नानाची एक "अँग्री यंग मॅन" ही इमेज पडद्यावर आहे. कदाचित चित्रपट जास्त चांगला झाला असता.

भरत. त्या भुमिकेसाठी.. डॉक्टर...

शरद..

मला वाटतं, विक्रमने कदाचित नसती केली हि भुमिका. अगदी लीनदीन होणे त्याला शोभत नाही, काही झाले तरी त्याचा आब राखून असतो तो.

दिनेश. | 2 January, 2016 - 16:43 नवीन
नाटकात सौ बेलवलकर ( शांता जोग ) सरकार असतात. इथे तसा उल्लेख नाही का ?

>> तसाच उल्लेख आहे.

पिक्चर चालू शकतो हा. बॉक्स ऑफिसवर नाना फॅक्टर कामात येऊ शकतो. ओपनिंग नक्कीच मिळेल. माझ्या गर्लफ्रेंडने हा बघायची इच्छा व्यक्त केलीय, आणि ती आजच्या तरुणाईचे प्रतिनिधीत्व करते.

पण पुढच्या आठवड्यात माऊथ पब्लिसिटीने तग धरायला चित्रपट पुरेसा मनोरंजक असायला हवा. त्यासाठी हलकेफुलके प्रसंग आणि संवाद असणे गरजेचे आहे. एकच सूर पकडणार असेल तर चित्रपटाची लांबी कमी हवी.

परीक्षण आवडले. मराठी चित्रपट असल्याने माझ्या शुभेच्छा आहेतच. मला लवकर बघायला जमणार नाही. आज उद्या कोणी मित्र बघून आले तर त्यांची मते इथे टाकेन..

नाना खुपच जास्त आवडतो पण त्याच्या तोंडून ते "कुणी घर देता का घर? " अगदी ऐकवणार नाहीसे वाटते.
त्यामुळे चित्रपट पाहण्याचं नक्की नाही.

नटसम्राटचा काही भाग पाठयपुस्तकात होता का? असं अंधुक आठवत आहे. >> हो होता. कितवीच्या ते आठवत नाही.

नट सम्राट , लागूंचे पाहिले होते.(तेही टी.व्हीवर आम्ही घरातील सर्वजणांनी पाहिले होत.त्यावेळचा मन विषण्ण करणारा क्षण पुसट का होईना पण जिवंत आहे.)त्यामुळे ह्या सिनेमाला जाऊ की नको विचारात होते.पण नाना पाटेकरनी कसा नट्सम्राट साकारला असेल याची उत्सुकता आहे. मात्र वर दिनेश ,यांनी म्हटल्याप्रमाणे नाना कितीही आवडत असला तरी कधी तो नानाचीच भुमिका करतो, इथेही काही प्रसंगात तसे घडले असेल असं वाटते.आणि मनात डॉ.लागूंचा नटसम्राट असताना कितपत पाटी कोरी राहिल, याची शाश्वती नाही.उद्या सिनेमा पहाणार आहे.

माझ्या माहेतीनुसार आणि त्यावेळच्या परिक्षणे व प्रति क्रियांनुसार दत्ता भटांचा नटसम्राट डॉ लागूंपेक्षा उजवा होता. कारण भटांचे बोलके डोळे . शिवाय त्यांनी डॉक्टरांपेक्षा वेगळे बेअरिंग दिले होते त्याला. पुढे तर मिडिऑकर नटांनी नटसम्राटाचे पार खेळणे करून टाकले. एकसुरीपणाबद्दलच म्हनायचे तर डॉ लागूही बर्‍याच्दा डॉ लागूंचीच भूमिका करायचे.

मी परीक्षण वाचुन कधीच चित्रपट पाहत नाही. स्वतः पहायचा स्वतः ठरवायचे. मला अतिशय आवडला.
कृपया चित्रपटगृहातच पहा. असे चित्रपट यशस्वी झाले तरच अभिजात कलाकृतींवर आधारीत चांगले चित्रपट काढायचे बळ मिळेल. नाहीतर दिलवाले सारखा कचरा निघत राहील.
आणि कृपया चित्रपट पाहण्याआधी डॉ. लागुनी असे केले, भटांनी तसे केले..हा उजवा तो डावा असा काही पुर्वग्रह न पाहता पहा.. एक सुंदर चित्रपट पाहिल्याचे समाधान मिळेल.

डॉ लागूंची भूमिका असलेलं नाटक लहानपणी पाहीलं होतं. त्यानंतर एकदा टीव्हीवर पाहीलं. ती भूमिका मनावर कोरली गेली आहे. त्या भूमिकेत कुणालाही सहन करता येणार नाही ही अडचण आहे. त्यातून कुणी घर देता का घर या स्वगताचे प्रोमोज ऐकून धस्स झालं...

डॉ लागूं बद्दल बरोबर बोललात पादुकानंद. हे आणि हिमालयाची सावली असे प्रयोग मी बघितले. नंतर बर्‍याच भुमिका, खास करून चित्रपटातल्या एकसूरी वाटल्या. मित्र मधे मात्र त्यांना ज्योती चांदेकरांनी चांगलीच टक्कर दिली. आणि त्यावेळी खास करुन डॉक्टरांचीच तब्येत खालावली होती, त्यामूळे रुग्णाची भुमिका छान जमली.

या नाटकातला, कुणी घर देता का घर.. हा प्रवेश आम्हाला नववीला होता.

मात्र ती दाद खऱ्या अर्थाने असते पडद्यावर दिसलेल्या कलाकारांसाठीच. पूर्ण चित्रपटासाठी नव्हे.>>>>>>> अगदी !

काल हा सिनेमा पाहिला.नानाचा आणि इतरांचा अभिनय लाजवाब! तरीही मला हा सिनेमा नाही आवडला.

काल पाहिला. चित्रपट संपल्यानंतर काही वेळ समोरचं काहीच दिसत नव्हतं. इतकं सुन्न झालो होतो. विशेष म्हणजे हा सिनेमा पहायला तरुणाई जास्त होती. नानाचा आजवरचा सर्वोत्तम अभिनय म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. क्लायमॅक्सची स्वगतं तर कमालच.

कृपया चित्रपटगृहातच पहा. असे चित्रपट यशस्वी झाले तरच अभिजात कलाकृतींवर आधारीत चांगले चित्रपट काढायचे बळ मिळेल. नाहीतर दिलवाले सारखा कचरा निघत राहील.
आणि कृपया चित्रपट पाहण्याआधी डॉ. लागुनी असे केले, भटांनी तसे केले..हा उजवा तो डावा असा काही पुर्वग्रह न पाहता पहा.. एक सुंदर चित्रपट पाहिल्याचे समाधान मिळेल....>>>>>>>>>>+1000000000000
आज पाहिला एकदम भारी आहे.....नाना पाटेकर कधी आपल्या वर हावी होतो कळत सुध्दा नाही. नाना ने अप्रतिम अभिनय केला आहे. तर मेधा मांजरेकर ने नानाला तेवढीच उत्तम साथ दिली आहे. बहुतेक प्रसंगांत तिच्या आधी तीचे डोळेच बोलुन जातात. मी तरी ह्याला नटसम्राट म्हण्यापेक्षा नानासम्राट म्हणेल. ....
एकदा अवश्यच पहा. ...

मला या चित्रपटाने वेगळ्याच कारणांनी अस्वस्थ केले.
गणपतरावांचे कॅरॅक्टर मूळ नाटकात बरेच उदात्त वाटते , ते या चित्रपाटात विनाकारण मद्याच्या बर्^याच अंशी आहारी गेलेले दाखवले आहे. त्यांनी आपली कमाई वाटून देण्याच्या प्रसंगात सुध्दा भावना कमी व बरळणे अधिक दाखवून त्या प्रसंगाचा विचका केला आहे.जिव्हा़ळ्यापोटी मुलांना आपली कमाई वाटून देण्याचा प्रसंग , धुंदीत अधिक अन प्रेमापोटी कमी असा प्रभाव पाडून जातो. ह्हा प्रसंग नाट्काचा केंद्रबिंदु आहे. अन त्याचा चित्रपटात मोरू झालाय.
या व्यतिरिक्त कथानकात सुसंगत पणा व सातत्य वाटत नाही, तुटक तुटक दृष्ये आणि मांजरेकर छाप अकारण हिंसाचार दाखवला आहे.
नाना पाटेकरांचा व विक्रम गोखलेंचा अभिनय अप्रतिम असूनही भावनांना आवर घालण्या साठी केलेला मद्याचा वापर अथवाअ त्यांनी आहारी गेलेले दाखवणे मुळीच आवश्यक नव्हते. त्या मुळे त्यांच्या भूमिकांचा उदात्तपणा दुष्प्रभावित झाला आहे.
गणपतराव घरी भजी घेवून येतात तो प्रसंग मूळ नाट्यात हेलावून नेणारा आहे.. चित्रपटात तो इफेक्ट येत नाही.
चित्रपटाव्चीनाटकाची तुलना करू नये हे खरे , पण मग चित्रपटात त्याहून सुंदर काही असावे लागते. उदा. कट्यार काळजात घुसते हा चित्रपट अवतार त्या मापदंडाने उजवा ठरतो.अत्युत्तम अभिनेते घेवून ही मांजरेकरांनी अपेक्षा भंग केला…. माझा तरी
हा मी नाटक पाहण्याचा प्रभाव असू शकतो पण ते एकमेव कारण नाही.

त्यांनी आपली कमाई वाटून देण्याच्या प्रसंगात सुध्दा भावना कमी व बरळणे अधिक दाखवून त्या प्रसंगाचा विचका केला आहे
या व्यतिरिक्त कथानकात सुसंगत पणा व सातत्य वाटत नाही, तुटक तुटक दृष्ये आणि मांजरेकर छाप अकारण हिंसाचार दाखवला आहे.>>>>> अगदी अगदी.

'सशासारखा मुलगा होता आणि कोकरासारखी मुलगी होती(नक्की आठवत नाही,पण सारांश हाच)... आभाळ पाठीवर घेणार्‍या त्या ढगांना विचारा,ते सांगतील कोणीच कुणाचं नसतं' अशासारख्या संवादांची उणीव की ज्यामुळे ह्या नाटकाला कणा आहे.
नटसम्राटमधील म्हातार्‍यांचे वैफल्य दाखवण्यात सिनेमा कमी पडला.

सॉरी मी त्या नटांची नावे घेत नाहीत, पण ते नट नाटकात असले तर नाटकात मद्यपानाचा प्रसंग हमखास घालावा लागतो आणि त्यात मद्यही अस्सल असावे लागते, असे माहितगार व्यक्तींकडून कळले होते. ( काही नाटके मी बघितलीही आणि त्यात ते प्रसंग अनावश्यक वाटले मला. ) तसे काही झाले असेल का ?

संगीत कोहीनूर पंडितराव नगरकर आमचे नातलग असल्याने त्यांची भुमिका असलेले " एकच प्याला" नाटक मी दोनदा विंगेतून बघितले, पण त्यात अजिबात अस्सल मद्याचा वापर नव्हता. मद्य वगैरे गोष्टी रंगमंचावर आणू नयेत असे मानणारी कलाकार मंडळी होती त्या काळात.

वरच्या प्रतिक्रिया वाचून हे लिहावेसे वाटले.

>>नाना टीटोटलर आहे...

पुण्यातल्या एका लग्नात नाना ला कमीत कमी २-३ तास मद्यपान करताना मी स्वतः पाहिलेले आहे. पण ३ तासानंतर देखील चढल्याची कोणतीच खूण नव्हती...

आज बघीतला ..
मला आवडला..
रेव्यु ला सहमत..मी नाटक पाहिलेल नै आहे पण वाचलयं..
नाना ने छान काम केलेलय.. तो मद्याचा अतिरेक केलेला मलाही पटला नै..

रसप - नाना सिगारेट ओढायचा, म्हणुन निर्व्यसनी नाहि/नव्हता...

प्रविणपा - तुम्ही अलिकडेच पाहिलं अस्ल्यास; आय स्टँड करेक्टेड... Happy

कुणी घर देता का घर?
एका तुफानाला कुणी घर देता का?
एक तुफान भिंतीवाचून, छपरावाचून, माणसाच्या मायेवाचून, देवाच्या दयेवाचून जंगलाजंगलात हिंडतय.
जिथून कुणी उठवणार नाही अशी एक जागा धुंडतय.
क्युं की साला एक मच्छर
एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है
कुणी घर देता का घर?"
घर देता की नाही
देतो हो या नही ?
देखो देखो आ गये सब मेरा तमाशा देखने
ताली बजाओ
ए तुम भी बजाओ
मै चला मरने
ए चल मुझे फांसी लगा ले
साला कोई घर नही देता
देता की नाही ?
एक घर ?
सटकली तर घोडा काढीन
अब तक छप्पन हुए है
जिन्होंने घर नही दिया
आणखी काय हवं असतं माणसाला ?
एक घरच ना ?
देता का ?
कुणी घर देता का घर ?
स्वतःहून दिलंत तर
ठीकच
नाही तर
खाली करून घ्यावं लागेल..
घर
देता ना ?

Pages