कालच्या एक्झिट पोलनंतर एका मोदीविरोधकाला रात्री एक सुंदर स्वप्न पडले. आज सकाळपासून तो त्या स्वप्नरंजनात दंग आहे. त्याच्या त्या रम्य स्वप्नरंजनाचा एक भावार्थ:
बिहारमध्ये महागटबंधनला स्पष्ट बहुमत म्हणजे 125 -130 जागा मिळतील. लालूप्रसाद यादवांचा राजद हा मोठा पक्ष असेल त्यामुळे सहाजिकच लालू मुख्यमंत्री होतील. नितीशकुमार स्वत: तशी घोषणा करतील. मतमोजणीच्या दिवशी दुपारपूर्वीच भाजप जनतेचा कौल मान्य करून पराजय स्वीकारेल. रविशंकर प्रसाद तशी घोषणी करून लालूप्रसादांचे अभिनंदन करतील व बिहारच्या विकासासाठी विधायक विरोधकाची भूमिका बजावण्यास भाजप तयार आहे असेही नम्रपऩे नमूद करतील. त्यानंतर भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात येईल. मात्र, भाजपमधील मुख्यमंत्रीपदाचे निराश दावेदार नाराज असल्याने बैठकीस येणार नाहीत. गटबीजीला उधाण येईल. विरोधी पक्षनेतेपदावर जितनराम मांझी दावा करतील व रालोआची शकले होतील.
तिकडे दिल्लीत मोदी यांच्या राजीनाम्याची सर्वपक्षीय मागणी सुरू होईल, तर शहा यांचे पक्षांतर्गत विरोधक उचल खातील.
नागपूरच्या मुख्यालयात तातडीची बैठक होऊन भाजपचा निंदाव्यंजक ठराव संमत करावा का यावर गंभीर विचारविनिमय सुरू होईल. दरम्यान मोदी हे लंडन दौऱ्यावर रवाना होणार असल्याने, बिहारमधील घडामोडींबाबत भाजपची अवस्था निर्नायकी होऊन पक्षात प्रचंड अनागोंदी माजेल.
सरकारच्या कामकाजावर याचा परिणाम होऊन देशात अस्थैर्य निर्माण होईल. व्यवस्था खिळखिळ्या होतील व याचा लाभ उठवत पाकिस्तानातून अतिरेकी कारवायांना बळ दिले जाईल. अतिरेकी गट भारतात घुसून हिंसाचार भडकवतील. देशात जातीय, धार्मिक असंतोष उफाळेल.
या अस्थिरतेमुळे सरकार मध्यावधी निवडणुका घोषित करेल. लवकरच निवडणुका होतील. काँग्रेसला बहुमत मिॆळेल. राहुलजी पंतप्रधान होतील व कल्याणकारी राज्यव्यवस्थेचे पर्व पुन्हा सुरू होईल!!
नंतर काही दिवसांतच, रामलीला मैदानावर एका भव्य सोहळ्यात, पुरस्कार वापसी समारंभाचे आयोजन केले जाईल. ज्या मान्यवरांनी पुरस्कार परत केले होते, ते त्यांना पुन्हा प्रदान केले जातील. सगळीकडे आनंदी आनंद पसरेल.
.... आणि देशवासीयांच्या स्वप्नातील 'अच्छे दिन' वास्तवात अवतरतील!!