चिंग माय चा वृद्धाश्रम

Submitted by वर्षू. on 12 October, 2015 - 21:24

माझ्या रोजच्या रस्त्या च्या कोपर्‍यावर एक बैठी इमारत दिसे. एल आकारात पसरलेल्या या इमारती भोवताली असलेल्या सुंदरशा बगिच्यात बरेचसे वृद्ध गप्पा मारत बसलेले दिसत. कुणी आजी झोपाळ्यावर बसून विणकाम करणारी तर हातातल्या सिगरेट चे मस्तपैकी झुरके घेत तिच्याशी गप्पा करणारी दुसरी आजी दिसे. त्यांना पाहून कल्पना आलीच होती कि ही इमारत म्हणजे वृद्धाश्रम वगैरे असावा म्हणून कन्फर्म करायला मी एक दिवस त्या इमारतीत प्रवेश केलाच. समोरच त्यांचं ऑफिस होतं. आत शिरले तर एक मध्यम वयीन, हसतमुख स्त्री कंप्युटर शी खुडबुड करत बसली होती .तिच्या समोरची खुर्ची ओढून तिला थोडी माहिती विचारली तिने अगदी उत्साहाने माहिती दिली आणी अगदी आनंदाने ,आत जाऊन चक्कर मारायची, फोटो काढायचीही परवानगी दिली.

मी लगेच आतल्या भागात प्रवेश केला. समोरच मोकळा कॉरिडोर मोठ्याश्या व्हरांड्यात जात होता. चारी बाजूंनी
फुललेल्या बागेचं दर्शन होत होत होतं. मधे लांबच लांब लाकडी दोन टेबलांवर ,इथले रहिवासी आपसात गप्पा मारत्,हसत खिदळत सकाळचा नाश्ता घेत होते. ते सर्वच नीट कपडे घातलेले होते. एक वय सोडल्यास कुणीच आजारी वगैरे नव्हते. मला पाहिल्यावर सगळ्यांना खूप आनंद झाला पण भाषेची मोठ्ठीच अडचण.. माझी थाय भाषा त्यांना समजेना.. मग एक स्मार्टली ड्रेस्स्ड आजी ने मला तिच्याजवळ बोलावले .तिला थोडं इंग्लिश कळत होते. मग तिच्या थ्रू सर्वांशी थोड्या गप्पा केल्या . सगळेच एकेकटे होते. कोणी जीवन सहचर गमावलेला, मुलं नोकरी करता दुसर्‍या शहरात असलेली , तर कुणी सहचर,मुलं सगळच गमावून बसलेली.
. कुणी काहीबाही बनवून त्या गोष्टी विकून आपला खर्च भागवतात तर कुणी स्वैपाकघरा ची जबाबदारी उचलतात. कधी कुणाची मुलं राहाय खायचा खर्च देतात. ज्या कुणाला हे शक्य नसेल त्याच्याकरता सरकार आणी इथली म्युनिसिपालिटी यांचा सर्व खर्च देते.
समोरच्या बाजूला एक हॉस्पिटल होते. तिथले रुग्ण मात्र या बाजूला येऊ शकत नव्हते. कुणी खूप आजारी,किंवा व्हील चेअर वर , पण ते ही तिथल्या कॉरिडोर मधे बसून उत्सुकतेने या बाजूला पाहात होते.
मी जास्त काही त्यांच्या करता नाही करू शकले पण माझ्या जाण्याने त्यांना इतका आनंद झाला. मलाही प्रेमाने त्यांच्याबरोबर नाश्ता खायचे आमंत्रण मिळाले , माझी माहिती विचारून झाली. भारतीय म्हणून कौतुक ही झाले.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शोभा, व्यक्ती तितक्या वृत्ती ना.. म्हणून तर लिंबु. चा विचार पटला अगदी कि स्वतःच्या वृद्धावस्थेला सामोरे कसे जायचे याची पूर्वतयारी आपणच करायची आहे.. Happy

@ सकुरा.. .. अगं या चिंगमाय च्या ओल्ड एज होम बद्दल नेट्वर भरपूर माहिती आहे. फॉरिनर्स करता इंग्लिश बोलणारा स्टाफ मिळू शकतो. मधे वाचलं होतं, एका अमेरिकन सिंगल्,मिडिल एज्ड बाई ने , आपल्या नव्वदी च्या, अल्जायमर पेशंट आईला चिंगमाय मधे येऊन भरती केलं होतं. कॉस्ट वाईज खूप स्वस्त तर आहेच शिवाय इथल्या लोकांमधे एंपथी खूप मोठ्या प्रमाणात दिसून येते. वृद्धांना कुणी हिडिस फिडिस करताना बघितलं नाही.

छान फोटो आणि छान लिहिलेय.

कुणाचे पोट सुटलेले नाही, बहुतेक सडपातळ आहेत सगळे.
जेवणाच्या फोटोवरुन सगळे मिताहारी वाटताहेत.
आणि सगळे सुखी समाधानी आनंदी दिसताहेत.
त्या सर्वांना मनापासून ऑल द बेस्ट.

हो!! डॉक. कैलास जी.. स्वच्छ, नीटनेटका परिसर आहे इथला, अगदी त्यांच्या भल्यामोठ्या किचन मधे ही भांडी, ओटा चकचकीत स्वच्छ होता. भाजी कापतानाही होणार्‍या कचर्‍याचा पसारा नीट आवरलेला होता. एकुणात थाय लोकं नीटनेटके आहेत आणी निसर्गप्रेमी ही.. सर्व कर्मचारी नेमून दिलेली कामे व्यवस्थित पणे, मन लावून करताना दिसतात.मग ते रस्ता झाडण्याचे असो कि कचरा उचलण्याचे असो.

माझे आता ५० रनिंग आहे आणि मी सिरियसली पुढच्या भविष्याचा विचार करत आहे.
दोन्ही मुलं विदेशात आहेत आणि ते परतुन येणार नाहित तशी माझी इच्छा पण नाही.
आत्ता सध्या मि.जॉब करत आहेत.भारत भ्रमण,दोन्ही देशात मुलांकडे फिरणे चाललेल असते
पण कुठेतरी स्थिरावण्याची एक वेळ येईलच ना.
त्याचे प्लॅनिंग आता पासुनच करायला हवे काय करावे? कसे करावे?

लिंबू, साधना, सकुरा. मी पन्नाशीनंतर असा बाफ काढला आहे उत्तर रंग गॄप मध्ये तिथे लिहा.
उत्तररंग मध्ये नवा धागा काढा.

सकुरा + १
माझ्याही मनात हा प्रश्न अनेकदा येतो.
कुठे कुठे चांगले वृद्धाश्रम / रिटायमेंट होम्स आहेत अशी माहिती काढायला सुरवात करावी, आता पासून थोडा कॉन्टॅक्ट सुरु करावा असे वाटते, म्हणजे तिथे कसे जीवन आहे, काय प्रश्न असतात, आपण काही मदत करु शकु का, आणि पुढे आपल्याला तिथे कसे रहाता येईल इत्यादि.

पण अद्याप काही सुरवात केली नाहीय, कुठुन करावी नक्की हे अजुन ठरत / कळत नाहीय,

अमा..... ओके, त्या गृपमधे लिहीन.
>>>> पण अद्याप काही सुरवात केली नाहीय, कुठुन करावी नक्की हे अजुन ठरत / कळत नाहीय, <<<<<

सकुरा, मानव..... इथेही अजुन एक फाटा फुटतो विचारांचा.. तो म्हणजे तुम्ही जी तयारी करायला हवी असे म्हणता आहात ती सर्व "भौतिक" गरजांबाबतची तयारी आहे, म्हणजे कुठले गाव, कुठली संस्था, किती पैका गाठीशी हवा, कोणत्या वयात, तब्येत कशी राखावी इत्यादिक....! बरोबर ना?
पण माझ्यापुढे माझ्या अनुभवातुन तरी या पैलुचे आधीभौतिक स्वरुपही नजरेसमोर आत्तापासुनच उभे रहाते आहे. व्हायचे काय, की पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत, वेळ कसा जायचा ते कळायचे नाही, एकेका कामाकरता नव्या दमाची पिढी हजर होऊन, जुन्या पिढीला अगदी अलगद पणे हळू हळू दूर होता यायचे, एकदम तोडुन टाकले असे व्हायचे नाही, मात्र हल्ली तसे होत नाही. हे असे दैनंदिन जबाबदार्‍यांबाबत असतानाच, एकेका विशिष्ट बाबतीत/मोहात अंगी विरक्ति बाणवणे, "ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असो द्यावे समाधान" या वाक्याचा खोल गर्भितार्थ समजुन घेणे व स्वतःची चीडचीड टाळणे, आर्थिक्/शारिरीक परिस्थिती जशी आहे ती तशीच कसलीही तक्रार वा कुणावर दोषारोप न करता स्विकारणे व तिला सामोरे जाणे अशा अनेक बाबींचा विचार पूर्वतयारीत करावा लागेल, व तो समजुन घ्यायलाही तितक्या संख्येने वृद्धांचे तर्‍हेतर्‍हेचे जगणे स्वतःहून जाऊन बघुन अनुभुती घ्यावी लागेल.
आमच्याकडे (खासकरुन ताज्या नुकत्याच गेल्या पिढीतच कोकणांतुन आलेल्या कोब्रांमधे - सपेवाल्या जुन्या दोनतिनशे वर्शे पुण्यात राहिलेल्या कोब्रांप्रमाणे नाही) पोराचे वय अठरा झाले की बापावर जबाबदारी नाही त्याची असा खाक्या होता, व आजही आहे. पोरगा पुढील आयुष्यात विचारणार नाहीच हेच गृहित धरुन उत्तरायुष्याची पूर्वतयारी केली जाते, माझ्या वडिलांनी तशी केली होती (दुर्दैवाने ते फार कमी वयात [६८] गेले) व ती करतानाच कर्तव्याचा भाग म्हणून पोरांकरताची तजवीजही केली होती , मी देखिल तसेच करणार. त्यामुळे उद्या पोरांनी विचारलेच नाही तर मानसिक दृष्ट्या आम्हाला त्यात अगम्य / धक्कादायक असे काही वाटत नाही.
पण बाकी समाजात सर्वस्वी इतक्या सु:स्पष्टपणे वा मोकळेपणे गोष्टी घडत नाहीत असे आजुबाजुला पहात असतो.

लिंबु, तुम्ही म्हणता ती मानसिक तयारीही खुप महत्वाची आहे. मी जे म्हटले की आतापासून कॉन्टॅक्ट सुरु करायचा आणि तिथले जिवन / प्रश्न काय असतील हे जाणुन घ्यायचे, यात ते बर्‍यापैकी येईल असे वाटते.
जसे वय वाढत जाईल तस तसे काय नविन प्रश्न/ समस्या उद्भवु शकतात आणि त्याला सामोरे कसे जायचे इत्यादि तयारी सुद्धा करावी लागेल.
पण त्या दृष्टिने अजुन तरी काहीच सुरु केले नाहिय हे खरे, नुसते सुरवातीचे विचार तेवढे आहेत.
तुम्ही छान लिहिताय, सुरु करा नवा बाफ.

वर्षूला खूप धन्यवाद.... Happy
तिने इथे दिलेल्या माहितीतून आणि फोटोमधून चर्चेने वेगळेच पण अपेक्षित आणि फार आवश्यक असलेले असे वळण घेतले.
प्रत्येकाने नोंदवलेली मते छानच आणि विचार करण्यासारखी आणि अतिशय उपयोगी अशी.
लिंबू जे म्हणतोय ते मनोमन पटतय. आयुष्याच्या या टप्प्यावर येऊनही पुढल्या आयुष्याची भौतिक चिंता करतच प्रवास करायचा का? तो तर आतापर्यंत करत आलो. पुढेही फक्त हीच चिंता भेडसवात राहिली तर आयुष्याचं कोडं काही सुटलं नाही असच म्हणायचं.

सव्विस्तर चर्चा आवडेल. Happy

सकुरा, मानव..... इथेही अजुन एक फाटा फुटतो विचारांचा.. तो म्हणजे तुम्ही जी तयारी करायला हवी असे म्हणता आहात ती सर्व "भौतिक" गरजांबाबतची तयारी आहे, म्हणजे कुठले गाव, कुठली संस्था, किती पैका गाठीशी हवा, कोणत्या वयात, तब्येत कशी राखावी इत्यादिक....! बरोबर ना?>>>>>>

हो लिंबुबाऊ बरोबर आहे........मला सध्या हेच हवे आहे अपेक्षित आहे.

एकेका विशिष्ट बाबतीत/मोहात अंगी विरक्ति बाणवणे, "ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असो द्यावे समाधान" या वाक्याचा खोल गर्भितार्थ समजुन घेणे व स्वतःची चीडचीड टाळणे, आर्थिक्/शारिरीक परिस्थिती जशी आहे ती तशीच कसलीही तक्रार वा कुणावर दोषारोप न करता स्विकारणे व तिला सामोरे जाणे अशा अनेक बाबींचा विचार पूर्वतयारीत करावा लागेल, व तो समजुन घ्यायलाही तितक्या संख्येने वृद्धांचे तर्‍हेतर्‍हेचे जगणे स्वतःहून जाऊन बघुन अनुभुती घ्यावी लागेल.>>>>>

हे पण बरोबर आहे आणि याची बर्‍यापैकी तयारी मी केली आहे.:) जवळ राहणारी मुले आई-वडिलांना बघत नाहित दुरदेशी राहणार्‍या मुलांकडुन काय अपेक्षा ठेवणार.

मुले दुरदेशी उडाण्या आधी मनाची बरिच तयारी केली होती.त्या बाबतित मन समाधानी आहे.

अंगी विरक्ति बाणवणे हे जे तुम्ही लिहिल आहे.त्यात बर्‍यापैकी जम बसला आहे.
निसर्गाला गुरु बनवल्या मुळे जिवनाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोण लाभला आहे.

निसर्गाचे सायन्सच जिवनात येणार्‍या कुठल्याही प्रसंगाला समर्थपणे सामोरी जाण्याची ताकद ठरणार आहे.

निसर्गाकडुन खुप काही शिकण्या सारखे आहे ना? एक कळी उमलुन तिचे फुल बनते ते फुल कोमेजून,सुकुन गळुन जाते नैसर्गिक रीत्या बियांच्या रुपात तिचा अंश मागे राहतो. या प्रक्रियेत दु:ख आहे का कोठे?
मानवाचे ही असेच असते ना?

दु:खाला सामोर जाण्याची,तिच्या कडे तटस्थपणे पाहन्याची कला शिकता आली तर मरण, वॄधावस्था उत्सव होऊ शकतो ना
जसा जन्मोत्सव.

सकुरा, छान.... अशी तयारी असेल तर आल्या परिस्थितीला कसे तोंड द्यावे असा प्रश्न उद्भवणार नाही.

>>>>> अंगी विरक्ति बाणवणे हे जे तुम्ही लिहिल आहे.त्यात बर्‍यापैकी जम बसला आहे. <<<<
यातिल विरक्ति म्हणजे मुद्दामहुन सांगु इच्छितो की "लगेच भगवी कफनी वगैरे चढवुन" गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालुन सर्वसंगपरित्याग करुन अनवाणि पायांनी कुठे कुठे भटाकायचे असे अपेक्षित नाहीये Proud
विरक्तिचा अत्यंत साधा अर्थ मी घेतोय तो म्हणजे एखादी वस्तु/घडविण्याची घटना/व्यक्ति याबाबत जीवाची फार आसक्ति दाखवु नये, त्यात जीव फार गुंतवु नये. या शब्दांच्या बुडबुड्यांनी नेमके कळणे कदाचित अवघड जाईल. म्हणुन एक उदाहरण देतो.
असे बघा की कॉलेज लाईफमधे आपण एखादा नविन सिनेमा आजच्या आज नव्हे, आत्ताच्या आत्ता बघायचाच असे ठरवुन खूप प्रयत्ना अंती यशस्वी व्हायचो. अन जर बघता आला नाही तर अतिशय नाऊमेदही व्हायचो. बरोबर ना?
एखादी गोड सुंदर मुलगी, तिच्याशी बोलणे वा तिने आपल्याशी बोलणे ही लांबची बाब, पण तिने नुसते आपल्याकडे बघुन सुहास्य केले, स्मित केले तरी आपला जीव स्वर्गाला दोन बोटे उरल्याप्रमाणे आनंदी व्हायचा, पण तेच तिने आपल्याकडे ढुंकुनही बघितले नाही की प्रचंड अस्वस्थ व्हायला लागायचे, नाउमेद व्हायचो. बरोबर ना?

तर अशा कोणत्याही प्रसंग/घटना/कृती/विचार यामुळे "नाऊमेद" न होणे हीच विरक्तिची साधना होय.
मी त्या प्रसंगात, त्या त्या गोष्टी/घटनेच्या अपेक्षेत आहे, नक्कीच आहे, कारण मला मानवी देहाशी संबंधित सर्व षड्रिपु व ज्ञानेंद्रियांची कर्तव्ये आहेतच. पण त्या घडल्या नाहीत तर मी त्यापासुन विरक्त/अलग/बाजुलाही आहे, मी त्यात गुंतलेलो नाही. अशी गरज नाही की माझ्या मनाच्या/शरिराच्या इच्छे/गरजेप्रमाणेच सर्व घडत जावे. अन तसे ते घडले नाही, तरी मी "आहेच" अन जसा आहे, ज्या परिस्थितीत आहे, ती देखिल मला सुखावहच आहे, किंबहुना ती जैसे थे परिस्थितीच माझे वास्तव आहे. मी स्वतः किंवा इतरांनी माझ्याकरता/त्यांचेकरता बदलावे-काही विशिष्टच कृती करावी ही अपेक्षा/आग्रह करणे चुक आहे हे मला समजले तर ती देखिल विरक्तिच. प्राप्त परिस्थितीबाबत, घडणार्‍या वर्तमानाबाबत, मी कर्म जरुर करतो, पण त्याचे नि:ष्पत्तीबाबत मी "आग्रही" नसतो. माझे प्रयत्न टोकाचे असतात, जीव ओतुन असतात, पण ते ते अंतिम उद्दिष्ट साध्य झाले नाही तरि मी दु:खि होत नाही, नाऊमेद होत नाही, अशी विरक्ति यायला हवी.
मी काय केले वा नाही केले, या विचारांतुन येणार्‍या उदासिनतेवर ताबा मिळवणे हे जितके महत्वाचे तितकेच, किंवा त्याहुनही जास्त महत्वाची असे की "माझ्याकरता कोणच काहीच करीत नाहीये , माझी कुणाला किंमतच राहिली नाहीये" वा तत्सम विचारांवर पूर्ण ताबा मिळविणे. या विचारांच्या आहारी न जाणे म्हणजेही विरक्तिचीच साधना होय.

गजानन महाराजांच्या पोथीत एक प्रसंगाच्या वर्णनात असे दिलय की कोणतरी महाराजांना काही एक खायला देऊ पहातो, वे हे देऊ का, ते देऊ का वगैरे विचारतो, महाराज उत्तरतात की देणे वा न देणे, काय द्यायचे वा न द्यायचे हा सर्व तुझ्या मनाचा खेळ आहे, व त्याप्रमाणेच तु वागणार आहेस, तर परत ते मला का विचारतोस? द्यायचे तर दे वा नको देऊस - माझ्या परवानगीची गरजच काय? काही देणे वा न देणे हा सर्वस्वी तुझा स्वतःचा प्रश्न आहे. तो माझा प्रश्नच नाही तर मी उत्तर काय देणार? (मला काय मिळणार, कोण देणार वगैरे बाबी मी इश्वरावर सोपविलेल्या आहेत.) हे उदाहरण सांगण्याचे कारण की, असंख्यवेळेस आपण आपल्याशी संबंधीत नसलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात व देण्यात व्यग्र असतो, अन जिथे संबंधच नाही अशा ठिकाणाहून आपल्या स्वतःच्या प्रश्नांना उत्तरे मिळविण्याचा व्यर्थ प्रयत्न करीत असतो. इथे ते वाक्य (बहुधा आठवलेंचे) चपखल बसते की "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार" - पण कधी, तर नेमकी कृती, नेमका विचार केला तर.

अशा या विविध स्वरुपातील विरक्ति अंगी बाणवित नेणे हे अपेक्षित असते असे मला वाटते.

यातिल विरक्ति म्हणजे मुद्दामहुन सांगु इच्छितो की "लगेच भगवी कफनी वगैरे चढवुन" गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालुन सर्वसंगपरित्याग करुन अनवाणि पायांनी कुठे कुठे भटाकायचे असे अपेक्षित नाहीये .>>>>>>>>

लिंबु भाऊ, ते या अर्थाने घेतलेल नाही गैरसमज नसावा.
उलट या गोष्टींचा तिटकारा आहे मला.

वरील पोस्ट थोडी क्लिष्ट झाली आहे असे मला वाटते. व या सर्व बाबींचा वृद्धापकाळीशा नेमका संबंध काय असाही प्रश्न वाचकांना पडू शकतो.
तर, वृद्धापकाळीतील जीवन अर्थातच दोन घटकांशी झगडण्यात जाते, एक शारिरीक अवस्था दुसरी मानसिक अवस्था.

शारिरीक अवस्थेबाबत, तुम्ही व्यायाम वगैरे पूर्वतयारी, इन्श्युरन्स वगैरे ने आर्थिक तयारी, दवाखाने वगैरेने प्रत्यक्ष उपचार इत्यादि करु शकता.
पण मनाचे अवस्थेबाबत काय? त्याकरता सध्या तरी कोणताही सुनिश्चित असा बाह्य उपचार उपलब्ध नाही असे माझे मत. किंबहुना उपचार हवा आहे हे देखिल न कळणे ही वास्तविकता.
अन वृद्धावस्थेत सर्वात जास्त त्रास होतो तो मानसिकतेचाच. कसा काय बोवा?
तर लक्षात घ्या की वृद्धावस्थेत तुम्ही अगदि धडधाकट आहात, पण मनाने असंख्य बाबीत गुंतुन आशानिराशेच्या खेळात असंख्य वैयक्तिक व दुसर्‍याकडूनच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबत स्वतःस व दुसर्‍यास दुखावित आहात,
किंवा, तुम्ही शारिरिक दृष्ट्याही अपंग/परावलंबी आहात, अन दुसर्‍याकडूनच्या अपेक्षांपूर्ती होणे /न होणे च्या झुल्यात गुंतुन पडला आहात व त्यामुळे राग, चिडचीड, मनःस्ताप, निराशा, असहाय्यता यांचे धनी होत आहात...
तर या सर्व बाबतीत, एक सुनिश्चित असते की तुमच्या स्वतःच्या व्यतिरिक्त, बाह्य परिस्थिती, व्यक्ति, व्यक्तिंची विचारसरणि, व्यक्तिंचे तुमच्याबद्दलचे मत/ग्रह-पूर्वग्रह तुम्ही बदलू शकत नसता.
तुम्ही बदलू शकता ते फक्त अन फक्त तुमच्या स्वतःला, शारिरीक द्रुष्ट्या बरेचदा परिस्थिती अशक्यप्राय असते, पण मानसिक दृष्ट्या तुम्ही कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे मनास बदलवु शकता.
अन तसे बदलण्याची गरज निर्माण व्हायची वाट बघेस्तोवर थांबायचे का आतापासुनच पूर्वतयारि सुरु करायची याचे विचार करणे म्हणजेच वृद्धावस्थेस यशस्वीपणे सामोरे जाण्याची शाश्वती होय.

लिंबुभाऊ, वरच्या पोस्ट मधे जे मांडलय तेच प्रत्यक्षात जगण्यासाठी निसर्गाचे शास्त्र, नियम समजणे गरजेच आहे.

मला पण वाटायला लागलेय आपण वर्षुचा धागा "हायज्याक " केलाय .

म्हणुन मी तुम्हाला नविन धागा काढायला सांगितलेले. उत्तर रंग गृपात नविन धागा काढा आणि तिथे हे हलवा. धागा सार्वजनिक करा

Lol लिंबु. हायजॅक वगैरे काही नाही हो.. पण योजाटा तर सर्वांना लाभ घेता येईल हो, म्हणून तर अमा ने सुचवल्याप्रमाणे नवीन धागा काढून तिथे चर्चा सुरु करा, अजून ऑप्शन्स डिसकस होतील. नवीन मार्ग सापडतील. इ.इ.

आज उद्या वेळ दिसत नाही, पण योग्य जागी धागा काढून तिथे येथिल काही चर्चा हलविन. काही मुद्दे, सुत्रे, स्वानुभव मांडु पाहेन.

छान प्रचि आणि वर्णन Happy

वृद्धाश्रमातील टवटवीत बागेसारखीच "टवटवीत" ज्येष्ठ मंडळी पाहून खूपच छान वाटले ....
तुझ्यासारखी संवेदनशील व्यक्तिच अशी भेट देऊ जाणे आणि त्याचे सुरेख शब्दांकन करु जाणे...>>>>>+१०००० Happy

Pages