‘थक्क, थुंय्य !!

Submitted by bnlele on 9 March, 2015 - 01:41

‘थक्क, थुंय्य !!
आज धुळवड ! एकाकी आयुष्यात भूतकाळातील आठवणी पींजून काढणं हा हमखास विरुंगळा.
ढगाळ वातावरण. आजुबाजूला निरव शांतता. थंडीमुळे सणाची सुरवात नक्कीच उशिरानी होणार.
बाहेर तर पडायच नाहिए, रंग केव्हांच उडून गेलेत अन्‌ परत भरणारही नाहीए. फक्त आठवणींचा
पींजा उडणार - धुरकट-मळकट, मन व्यापून टकणार्र ! धनुष्याच्या तांतीवर घासटून आदळणार्‍या
घोट्याच्या धुंद तालावर __ थक्क_थूंय्य !
दिवा लावून संगणकावर आठवणी पिंजायच ठरवल. जवळची खिडकी उघडली. आजकाल कुठलाही संदेश न आणणारी
कबुतर थैमान घालतात म्हणून बंद ठेवलेली. सैरावैरा वाढलेल्या कडुलिंबाची कोवळ्या पानांची फादी
हाताला येईल इतकी जवळ. आजुबाज्जूच्या इमारती आणि रस्त्याला लागून भरमसाठ वाढलेल्या
रबराच्या झाडाची मोठी-दाट पानं, अन्‌ शेजारी ताडमाड काटॆरी झाडाची जाळी.आकाश फारसं दिसत नव्हत.
जे दिसत होत ते धूसर-काळ्या ढगांनी व्यापलेल होत.
लहानपणि उन्हाळ्याच्या सुरवातीला, कापूस पिंजणार्‍या कारागिरांच्या फेर्‍या असायच्या. खांद्यावर लटकवलेल्या धनुष्याच्या
चामडी- बकरी-शेळीच्या आतड्याच्या वादीवर घोटा मारून जाहिरात करायचे आगमनाची. मुसलमानी पेहराव - लुंगी आणि उघड्या
छतिवर अंगात नक्षिकाम केलेल जाकिट - थक्क-थुंय्य !
पन्नाशी उलटून गेली तरी धडधाकट शरिरयष्टि. सोबत पाण्यासाठी अल्युमिनियमचा टमरेल आणि भिवया,मिशा, दाढी आणि केसाळ
छातिवर पिंजलेल्या कापसाचे कपटे अशा ववतारातला अबदुल अजून डोळ्यासमोर आहे, काम द्या म्हणून गळ घालायचा. आजकाल
मशीनवर करवून घेतात लोक. पण मशीनमुळे खूप कापसाच नुकसान होत हे घ्याकि लक्षात. आणि कुटुंब कस पोसायच मी?
मग दिवस ठरला कि सकाळी नऊ ला सुरवात. गाद्या,रजआ,उषा वगैरे आठ-दहा नग निवडलेले असायचे. एका मोकळ्या केलेल्या खोलीत
कोपर्‍या लगतच्या भक्कम खुंटीला लहान धनुष्य टांगून त्याच्या वादीला पिंजायच धनुष्य अडकवायच जमिनीवर पलथी मारून बसल्यावर
स्प्रिंग सारख हातानी खालिवर - समांतर नाचवून बघायच अन्‌ उंची ओके केली कि कामाला लागायच. त्या खोल्लीत आम्हा मुलांना मज्जाव असायचा
- धुरळा उडायचा म्हणून. तरिही खोलीच्या एकुलत्या खिडकीतून थोडावेळ बघत असू आम्ही भाऊ. धाकट्या दोन भावांच्या ओणव्या पाठींवर
हात रेटून उडी मारून. त्यांनापण कंबरेला धरून उंच गजाला क्षणभर लटकुन डोकवायची सहकार म्हणून संधि द्यायची!
उषा,गाद्या,रजयांचे खोळ टाके उसवून पूर्वतयारीत कापूस गाठोड्यातून बांधून ठेवलेला असायचा. काही खोळ नवीन तर इतर धुवून स्वच्छ
करण्याच कंत्राट मोठ्या बहिणींचे होते. थक्क-थुंय्यच्या तालावर आसपास नाचत असायच आम्ही.
अबदुलनी बरोबर आणल्ला डबा आईच घेऊन ठेवायची आणि जेवणासाठी काम थांबल कि ते ग्गरम करवून द्यायची - घरी केलेल्या निवडक ताज्या
पदार्थाची भर घालून. त्याच्या डब्यात मांसाहारी खीमा असायचा म्हणून तो गरम करण्याच काम मोलकरीण करायची. तो वास अजूनही दरवळतो मनांत !
संध्याकाळ होताहोता सर्व कापू पिंजून झालेला असायचा. त्यावेळी अबदुलची बायको आणि मुलगी त्याच्या मदतीला हजर व्हायची
- दाभणासारख्या सुया, ट्वाईनचा धागा, कात्रि वगैरे घेऊन. घराच्या बाहेरच्या अंगणात मोठ्या जाजमावर एकएक खोळ उलटून अंथरून त्यावर
लखलखित पांढरा शुभ्र मऊ कापूस रचला कि दोघी सराईतपणे खोळ कापसाच्या थरासकट उलटा गुंडाळून आत कापूस भरून घ्यायच्या.
मग शिवण मारून खोळाच तोंड बंद केल कि काठीचे रट्टे मारून कापूस सर्वदूर सारखा केला कि टाके घालायचे - तो आतल्याआत गोळा होऊ नये म्हणून.
टाक्यांतल अंतर किति-कस ते आईच सांगायची. गाद्यांच्या टाक्यांना ठिगळ लागल कि नाही हे बहिणी तपासून घ्यायच्या.
एव्हाना अबदुल कुंचा घेऊन खोली जैसेथे करायचा. जॅकेट चढवून बाहेर आलाकि त्याचा अवतार बघून हसू यायच. तुटक्या मराठीत आम्हाला उद्देशून म्हणायचा
- "घाम गाळला नाही तर पोटाला अन्न मिळ्त नाही अन्‌ झोप येत नाही मुलांनो"
या धनुष्यावर मी असंख्य आठवणी पिंजून काढला आहेत. पण कापूस अजूनही धुरकट-मळकट आहे; मनात सगळे कोपरे व्यापून धुरळा तरंगतोच आहे.
पुन्हापुन्हा कानावर पडावा त्या धनुष्याचा टणत्कार, नाचाव त्या तालावर, आणि, दिसावा घामानी भिजलीला आनंदी अबदुल ! !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users