आशा

Submitted by यतिन-जाधव on 26 February, 2015 - 01:30

मध्य कोकणातलं मारळ सारखं एक अतिदुर्गम, जेमतेम तीसेक घरांच खेडेगाव, याच गावातला एक हुशार मुलगा विजय, घरच्या बेताच्या परिस्थितीवर मात करत आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर रत्नागिरीसारख्या शहरी भागात जाउन स्वतःच शिक्षण उत्तमरीत्या पूर्ण करतो, तिथेचं कॉलेजात त्याच्या बरोबरच शिकत असणाऱ्या वीणाबरोबर अतिशय घनिष्ट मैत्री आहे, वीणा त्याला मनापासून आवडते, तिलाही हि गोष्ट माहित आहे आणी तिची त्याला मूकसंमती सुद्धा आहे, विजय तिच्यावर अगदी मनापासून प्रेम करतो पण त्यावेळची परिस्थिती पाहता प्रेमापेक्षा शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द आणी गरज ओळखुन विजय आपलं प्रेम तिच्यापुढे व्यक्त करू शकत नाही आणी तेव्हाच तो मनाशी ठरवतो की शिक्षण पूर्ण झाल्याबरोबर आधी एखादी चांगली नोकरी मिळवायची आणि मग वीणाला प्रपोज करायचं, थोड्याच दिवसांत विजयला एका चांगल्या कंपनीत नोकरी लागते, विजय आनंदाने हि बातमी देण्यासाठी आणि मनात ठरवल्याप्रमाणे वीणाला मागणी घालण्यासाठी म्हणून वीणाच्या घरी जातो पण त्याला आता फार उशीर झालेला असतो, वीणाचे आजारी वडील अचानक दगावल्यामुळे जवळपासच्या वडिलधाऱ्या नातेवाईक मंडळींकडून तिच्यावर लग्नासाठी दबाव आणून ओळखीतल्याच एका मुंबईत राहणाऱ्या मुलाशी तीच जबरदस्तीने लग्न ठरवल जातं, नाईलाजाने वीणाला लग्न करणं भाग पडतं, लग्न करून वीणा मुंबईला निघून जाते, यागोष्टी इतक्या अचानकपणे घडतात कि त्याबद्दल विजयशी काही संपर्क साधण्यासाठी तिला वेळच मिळू शकत नाही.

विजय निराश मनाने घरी परततो, तो आता वीणाला विसरण्याचा प्रयत्न करतो, पण काही केल्या तिला विसरू शकत नाही, यापुढे आयुष्यात पुन्हा कधीही लग्न न करण्याचा निश्चय करून पुढे स्वतःला कामात बुडवून घेतो, लग्नाचं वय उलटून चालल्यामुळे घरातून विजयला सारखे लग्नासाठी पाठी लागतात, विजय त्यांना खूप विरोध करतो, पण त्याच्या पाठच्या भावंडांची लग्न व्हायची असल्यामुळे कसाबसा नाईलाजाने लग्नाला तयार होतो, घरच्यांच्याच पसंतीने नात्यातल्याच कुसुम नावाच्या एक सुस्वरूप, यथायोग्य मुलीशी विजयचं लग्न करून देण्यात येतं, विजय नवीन संसारात फारसा रमत नाही, नुसताच संसारगाडा रेटत असतो, पण आपलं काम मात्र अगदी मन लावून करत असतो, त्याची मेहनत हुशारी पाहून पुढे काही दिवसातच त्याची प्रमोशनवर मुंबईला बदली होते, साहजीकच त्याला आपल्या पत्नीला घेऊन मुंबईला जाणं भाग पडतं, हळूहळू त्याला जाणीव होते की आपण आपल्या पत्नीशी उगाचच फटकून वागतो, तिला समजूनच घेत नाही, प्रेमात अपयश आल्याचा राग आपण उगाच तिच्यावर काढतोय, तसं पाहिल तर यात तिची काहीच चूक नाहीय, विजय आता आपलं वागणं सुधारतो आणि कुसुमशी नॉर्मल वागू लागतो.

थोड्याच दिवसांत त्यांच्यात एक चांगलं पती-पत्नीच नातं निर्माण होतं, त्यातूनच त्यांना एक छानशी गोंडस मुलगी होते, दोघांचाही संसारही व्यवस्थित चाललेला असतो, दोघेही आपली सुख-दुख एकमेकांशी शेअर करतात, विजय एक दिवस मूडमध्ये येउन आपलं लग्नापूर्वीच वीणाबरोबर जमलेलं प्रेम व काही कारणांनी तिच्याबरोबर होऊ न शकलेलं लग्न ही सगळी हकीकत कुसुमला सांगतो, कुसुमही सगळं निमूट ऐकून घेते, झालं गेलं विसरून जा आता वीणाच्या जागी मी आहेना तिची तुम्हाला आठवण सुद्धा होणार नाही इतक मी इतकं मी तुमच्यावर प्रेम करीन असा विजयला धीर देते, विजय आता कुसुमला आग्रह करतो कि तुला मला काही तुझ्या पूर्वायुष्यातली एखादी गुपित-गोष्ट सांगायची असेल तर सांग, कुसुम सुरवातीला लाजते, नाही-नाही म्हणते, विजय मात्र तिला सांगण्याची गळचं घालतो, कोणालाही न सांगण्याच आणि ऐकून सगळं विसरून जाण्याचं वचन देतो, त्या गोष्टीचा आपल्या वर्तमान आयुष्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याची खात्री देतो, इतका विश्वास दिल्यावर कुसुमसुद्धा आता आपल्या लग्नापूर्वीची मनातली एक अतिशय नाजूक गोष्ट मोठ्या विश्वासाने विजयाला सांगते पण ती गोष्ट ऐकल्यावर मात्र विजयचा पुरुषी अहंकार परत जागा होतो, तो कुसुमची ही गोष्ट पचवूच शकत नाही, त्या दिवसापासून विजय-कुसुमच्या नात्यात पुन्हा हळूहळू दुरावा निर्माण होतो, तो तिला टाळू लागतो, स्वतःला पूर्णपणे कामात बुडवून घेतो, रोज ऑफिसमधून उशिरा घरी येतो, सुट्टीच्या दिवशीदेखील घरात कुसुम किवा मुलीला वेळ न देता सतत बाहेर राहु लागतो, सारखा चिडचिड करतो, कुसुमशी तुसड्यासारखं वागू लागतो, मुलीचा राग करतो, अशाच धुमसत्या परिस्थितीत दोन तीन वर्ष निघून जातात.

विजयच्या वागण्याने कुसुम मनातून कोलमडते, त्याचा परिणाम तिच्या तब्येतीवर होतो, निरुत्साह आणी अशक्तपणामुळे ती सतत आजारी पडते, तिच्या सततच्या कुरबुरीना कंटाळून विजय आता तिला पूर्णपणे टाळू लागतो, सतत पाच-सहा दिवस, आठवडाभर बाहेर राहू लागतो, असंच एक दिवस सकाळी लवकर उठून ऑफिसला निघायच्या तयारीत असणाऱ्या विजयला कुसुम हाक मारते, विजय तिच्याकडे दुर्लक्षचं करतो, पण ती पुन्हा निर्वाणीने हाक मारते आणि सांगते की आज मला अगदीच उठायला होत नाहीय, तेव्हा बेबीला आज तू जाताजाता शाळेत सोड, मग पुढे ऑफिसला जा, विजय चिडतो, नाही म्हणतो, ऑफिसला उशीर होईल असा बहाणा करतो, शेवटी कुसुम त्याला विनवणी करते कि तुझा राग माझ्यावर आहे तर मग बेबीला यात कशाला ओढतोस, तिचा यात काय गुन्हा, शेवटी एकदाचा चरफडत विजय नाईलाजाने बेबीला शाळेत सोडायला जातो, शाळेबाहेर मुलांची आणि त्यांना सोडायला आलेल्या पालकांची खूप गर्दी झालेली असते, फक्त मुलांनाच गेटमधून आत सोडलं जातं, पालक मात्र बाहेरच थांबलेले असतात, विजय बेबीला घेऊन गर्दीत घुसतो आणि बेबी गेटमधून आत जाईपर्यंत पाहत राहतो, बेबी सुखरूप आत गेल्यावर हुश्य करत गर्दीतून वाट काढत बाहेर येतो आणी जमलेल्या इतर पालकांच्या चिकाटीकडे कौतुकमिश्रित आश्चर्याने पहात राहतो, तेव्हा त्याला त्या पालकांमध्ये ओझरता साधारण वीणासारखा चेहरा दिसतो, विजय मुद्दाम तिच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करतो पण गर्दीच्या रेटारेटीमध्ये त्याला नीटसं काही दिसत नाही, वीणासारख्या दिसणाऱ्या त्या चेहऱ्यामुळे विजय अस्वस्थ होतो, त्या दिवशी ऑफिसमध्ये देखील त्याच कामात लक्ष लागत नाही, तो पुन्हा एकदा पूर्वीच्या विसरलेल्या वीणाच्या आठवणींनी बेचैन जातो, रात्री नीट झोपत नाही व आता मनाशी ठरवतो की आता काहीही करून उद्या पुन्हा शाळेत जाउन खात्री करून घ्यायची की ती नक्की वीणाच आहे की दुसरी कोणी.

विजय सकाळी लवकर उठून तयार होतो आणि स्वतःहून बेबीला शाळेत सोडायला निघतो, कुसुम मनातून सुखावते, विजय आता शाळेजवळ पोहोचतो पण आज त्याची नजर मात्र वीणासारख्या दिसणाऱ्या चेहऱ्याचा सतत शोध घेत असते, लवकरच तो क्षण येतो, तो चेहरा त्याला पुन्हा ओझरता दिसतो, विजय आता पटकन बेबिला गेटमधून आत सोडतो आणि तिथेच त्या चेहऱ्याची जवळ येण्याची वाट पहात घोटाळत राहतो, इतक्यात वीणाच आपल्या लहान मुलाला घेऊन गेटकडे येताना त्याला दिसते, विजय तिच्याकडे पाहताच राहतो, दोघांचीही नजरानजर होते, विजय स्माईल देतो, वीणा नुसतीच त्याच्याकडे पाहते, मुलाला गेटमधून आत सोडते आणी विजय काही बोलण्याचा प्रयत्न करणार इतक्यात वीणा पटकन गर्दीतून वाट काढत निघून जाते, विजय नुसताच पहात राहतो, मात्र आता पुन्हा वारंवार वीणाची भेट होण्याच्या शक्यतेने मनातून रिलॅक्सही होतो, काहीही करून आता पुन्हा तिला गाठायचच आणि आपली सगळी बाजू एकदा सविस्तर समजावून सांगायचीच असा विचार करून विजय तिथून निघतो आणि नंतर जवळजवळ दोन-तीन दिवस सतत मुलीला सोडायच्या बहाण्याने शाळेजवळ वीणाची वाट पहात राहतो, पण वीणा काही त्याला भेटत नाही.

चौथ्या दिवशी मात्र पुन्हा त्याला मुलाला सोडायला आलेली वीणा त्याला दिसते, त्याची मनातली आशा पुन्हा पल्लवीत होते, हिम्मत करून विजय आज तिला काहीही करून गाठतोच आणि वीणा अशी हाक मारून बोलण्याचा प्रयत्न करतो, वीणा आता त्याला ओळख तर दाखवते, पण मोजकच बोलून त्याला टाळून पटकन निघून जाते, इकडे विजय बेचैन होतो, पुढच्याच दिवशी विजय पुन्हा शाळेबाहेर वीणाला गाठतो आणि काहीतरी महत्वाच बोलायच आहे अस सांगून तिच्याशी फक्त पाचच मिनिटे बोलण्याची इच्छा व्यक्त करतो, वीणा वेळ नाहीय, उशीर झालाय, घरी कामं आहेत असं सांगून टाळण्याचा प्रयत्न करते पण विजय खूपच आग्रह करतो, तिचाही नाईलाज होतो, ती विजयला आज नको उद्या मुलांना शाळेत सोडल्यानंतर बोलू अस सांगून आपली सुटका करून घेते.

इकडे वीणाच्या मनातही चलबिचल होते, आपला लग्नापुर्वीचा प्रियकर आता इतक्या वर्षांनी अचानक आपल्याला भेटतो आणि काहीतरी बोलण्याची इच्छा व्यक्त करतो, तो आपल्याला ब्लॅकमेल तर करणार नाही ना ? त्याला आपल्याशी काय बरं बोलायच असेल ? आपण अचानक त्याला न कळवता पटकन लग्न करून त्याच्या आयुष्यातून दूर निघून गेलो त्याचा जाब तर त्याला विचारायचा नसेल ? की त्याला आपली बाजू समजावून सांगायची असेल, आता आपण एक विधवा, आपल असं एका परपुरुषाला बाहेर भेटणं योग्य दिसेल का ? कोणी पाहिलं तर काय म्हणेल ? त्यातून इतर काही अफवा पसरली तर उगाचच दोघांचीही बदनामी होईल, काय कराव ? भेटायला जाणं योग्य कि अयोग्य ? जाउदे एकदा शेवटचं भेटून त्याला पुन्हा कधीही भेटनं तर सोडाच पण साधी ओळखही न दाखवण्याबद्दल खडसावून सांगुया असा विचार मनात पक्का करून ती दुसऱ्या दिवशी विजयला भेटायला जाते. .........................................................................................क्रमश.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कथा खुप छान आहे...............
दुसरा भाग लवकर टाकावा............