मैत्री

Submitted by समीर यरोळकर on 21 January, 2015 - 03:58

मैत्री
मैत्री म्हणजे काय? तर मैत्री म्हणजे विश्वास, धीर, आणि दिलासा. मैत्री ही दोन जीवनांमधली सेतू असते. आयुष्यात आपल्याला कोणाचीतरी सोबत हवी असते. आपल्याला कधी मैत्री हवी असते, तर कधी प्रेम हवे असते. या प्रेमाची साथ कधीही तुटते. पण मैत्री मात्र चिरकालीन असते. प्रेमाची साथ तुटल्यावर आपले आयुष्य विसकटते. पण मैत्री ही या आयुष्याची नव्याने घडी घालत असते.
कोणीही कुणाला आयुष्याची सोबत देऊ शकत नाही. कारण जीवन जगणे आणि मरणे कुणीही बदलू शकत नाही. आपल्या या जीवनातल्या प्रत्येक प्रवासात खूप चांगले आणि वाईट अनुभव येतात. यात आपल्याला मरेपर्यंत साथ देणारे जिवलग मित्र-मैत्रिणी भेटतात. आयुष्याची सोबत नाही पण अनमोल आठवणी हृदयात राहतात. अशा आठवणींनी आपले जीवन खूप सुंदर बनून जाते. अशा मित्रांच्या आठवणींचे ठसे आपल्या मनात कायम उमटले जातात.
मैत्री म्हणजे उधान आलेल्या समुद्राच्या बधुंद लहरी लाटा. वय, जात, धर्म, झुगारून जोडलेल्या असंख्य वाटा. शब्दांमध्ये न मांडता येणारं सर्व नात्यांपलिकडचं नातं. सर्व नात्यांना मनातून समानतेने जोडले जाते. मैत्री म्हणजे कॉलेज कट्ट्यावरची टिंगल टवाळकी आणि कैफियत. माणुसकीचं झाड उगविण्यासाठी टाकलेलं हळवं खत. मैत्री म्हणजे समोरच्याला सुख-दुःखामध्ये साथ देणे. प्रत्येकाच्या आयुष्याचा नसतो नुसता दोन शब्दांचा खेळ. मैत्री म्हणजे प्रत्येक क्षणात सुख-दुःखात वेळेची साथ द्यायची असते.
मैत्रीचे धागे हे कोळ्याच्या जाळ्यापेक्षाही बारीक असतात आणि लोखंडाच्या तारेहूनही मजबूत असतात. तुटले तर श्वासाने तुटतील नाहीतर वज्रघाताणेही तुटणार नाही.
मैत्री म्हणजे आयुष्यभर क्षणाक्षणांची संगत. मैत्री ही सुख-दुःखात भिजलेली एकत्र नाती. ठेचकाळून पडताना सावरणारा तो हात. पहिल्या पावसात ओल्या मातीचा सुगंध, रणरणत्या उन्हात फुलणारा तो गुलमोहर, अव्यक्त भावनांना मूर्त रूप देतो. शेवटच्या प्रवासात रेंगाळणाऱ्या त्या आठवणी, जन्मांतरीच्या साथीचं ते आश्वासन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मैत्री म्हणजे उधान आलेल्या समुद्राच्या बधुंद लहरी लाटा. वय, जात, धर्म, झुगारून जोडलेल्या असंख्य वाटा. >>>>छान लिहिले आहे तुम्हि समिर. Happy