विवेकानंद विचारः विसंगती-सुसंगती

Submitted by आतिवास on 12 January, 2015 - 02:31

'विवेकानंद साहित्य' वाचणे म्हणजे काहीतरी विशेष गोष्ट करणे असा आपल्याकडे आजही काही लोकांचा समज आहे. विवेकानंद साहित्य वाचणा-या व्यक्तीचे कौतुक तर होतेच पण ही व्यक्ती काहीतरी अवघड बाब करते आहे, असा समज होऊन त्या व्यक्तीकडे आदराने पाहण्याची प्रवृत्ती आजूबाजूच्या लोकांमध्ये निर्माण होताना दिसते. अर्थात काही लोक विवेकानंद 'वाचणे' ही निरर्थक कृतीही समजत असावेत – पण ला तरी असे लोक अपवादानेच भेटले आहेत. आयुष्याबद्दल विचार करणा-यांच्या वाटेवर बहुधा विवेकानंद नावाचा हा टप्पा कधी ना कधी येतोच.

मला स्वत:ला विवेकानंद अवघड कधीच वाटले नव्हते, वाटत नाहीत. आमच्या मित्रमंडळीत अरविंद आणि कृष्णमूर्ती आम्ही 'पुढच्या जन्मासाठी राखून ठेवले आहेत’ असे विनोदाने नेहमीच म्हणत आलो आहोत. विवेकानंदांच्या बाबतीत हा प्रश्न कधी आला नाही. विवेकानंदांचे प्रेरणादायी लेखन वाचताना त्यांच्या ओघवत्या विचारांमध्ये आपण कधी सामील होतो हे आपल्यालाही समजत नाही. विवेकानंद सांगतात त्यानुसार जगणे ‘अवघड’ आहे हे मान्य. पण विवेकानंद आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत असे सहसा होत नाही.

पण वरील सर्व आचार्यांच्या आणि सांख्य-योगादि दर्शनकारांच्या तुलनेत विवेकानंदांकडे पाहायला गेले की गोंधळ होतो. त्यांच्या तत्त्वज्ञानाबद्दल नेमके काही सांगणे अवघड होऊन बसते. विवेकानंद प्रेरणादायी असले तरी तत्त्वज्ञ म्हणून भारतीय विचारांच्या क्षेत्रात त्यांचे नेमके काय स्थान आहे याबाबत मनात प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काय असावे यामागचे कारण?

कदाचित ‘विवेकानंदांचे नेमके तत्त्वज्ञान काय हे थोडक्यात सांगणे अवघड वाटते’ या माझ्या मताशी अनेक वाचक सहमत होणार नाहीत. माझ्या अभ्यासाच्या पद्धतीतच काही उणिवा असतील, आहेत हे मान्य केल्यानंतरही विवेकानंदांचे तत्त्वज्ञान थोडक्यात कसे सांगता येईल हा मूळ प्रश्न तसाच राहतो. विवेकानंदांचे तत्त्वज्ञानविषयक विचार सुसंगतपणे सापडत नाहीत यामागे काही विशिष्ट कारणे आहेत. ती आपण नीट समजून घेतली पाहिजेत.

वेदान्त संप्रदायाच्या पाचही आचार्यांचा विचार आपण यापूर्वी समजून घेतला आहे. त्यांच्या मांडणीतील क्रमबद्धता, सूत्रबद्धता, तार्किक संगती या सा-यांचा आपल्यावर कळत नकळत परिणाम होतो. त्यांचे जे काही विचार आपण वाचतो, निदान त्या क्षणापुरते तरी ते आपल्याला प्रभावित करुन जातात, ते पूर्णत: खरे आणि विश्वसनीय वाटतात.

या ठिकाणी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की, या आचार्यांना काय किंवा इतर कोणत्याही सांप्रदायिक तत्त्वप्रणालीला काय, स्वत:च्या विचारांचा प्रसार करायचा असतो. त्यामुळे काही विशिष्ट हेतू नजरेसमोर ठेवून; प्रतिपक्षाचा अंदाज घेऊन; वेळप्रसंगी प्रतिपक्षावर प्रखर टीका करुन; जुन्या ग्रंथांचा आधार घेऊन त्यांनी आपल्या विषयांची मांडणी केली आहे. यात वावगे असे काहीच नाही कारण तीच त्यावेळची सर्वमान्य पद्धत होती. पण विवेकानंदांच्या विचारांच्या बाबतीत यातली एकही गोष्ट सातत्याने घडताना दिसत नाही. मला इतर कोणावर आणि सन्मान्य आचार्यांवर टीका करायची नाही; आणि त्यांच्यापेक्षा विवेकानंद श्रेष्ठ आहेत असा दावाही करायचा नाही. पण पारंपरिक तत्त्ववेत्ते- आचार्य- गुरु यापेक्षा विवेकानंद काहीसे वेगळे आहेत असे माझे मत झाले आहे.

विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानाची पार्श्वभूमी आपण नीट समजावून घेतली पाहिजे. औपचारिकदृष्टया पाहायचे झाल्यास ते तत्त्वज्ञानाचे ना विद्यार्थी होते ना अध्यापक! कोणत्याही पारंपरिक संप्रदायात त्यांनी शिक्षण घेतले नव्हते. त्यामुळे अनेक वेळा विवेकानंद वाड्मयात आपल्याला पारिभाषिक शब्द आढळत नाहीत. विवेकानंदांचे आयुष्य आणि त्यांचा स्वभाव पाहिला तर जेथे कोठे जे काही नवे, चांगले शिकायला मिळेल, ते शिकण्याची, त्याचा इतर विचारांशी योग्य तो समन्वय साधण्याची त्यांची नेहमीच तयारी होती असे दिसते. ते शिकागोला गेले, सर्वधर्मपरिषदेतील त्यांचे भाषण गाजले म्हणून मार्गदर्शकाची, उपदेशकाची भूमिका त्यांच्या वाटयाला आली. पण तो त्यांचा खरा स्वभाव नव्हता.

सामान्यत: लोक विवेकानंदांना ज्ञानयोगी समजतात. पण विवेकानंद अत्यंत भावनाशील होते. त्यांची असंख्य पत्रे त्यांच्या या भावनाशील स्वभावाची साक्ष देतात. त्या त्या परिस्थितीत जे उत्तर योग्य वाटले ते ते विवेकानंद देत गेले. आपल्या मागच्या पुढच्या विधानाशी त्याची काही सुसंगती आहे की नाही, हेही त्यांनी कधी तपासून पाहिले नाही. त्यामुळे त्यांच्या विधानांमध्ये खूप वेळा विस्कळीतपणाच नव्हे तर विसंगतीही आढळते.

विवेकानंदांमध्ये पंथीय अभिनिवेश अजिबात नव्हता. 'ज्याला त्याला आपापल्या मार्गाने जाऊ देण्यातच त्या व्यक्तीचे भले आहे’ अशी त्यांची भूमिका होती. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला कोंडीत पकडून तिचा पराभव करण्याची त्यांना फारशी कधी गरज भासली नाही. समोरच्या माणसाची जी क्षमता असेल; जडणघडण असेल; त्या अनुषंगाने त्या व्यक्तीला अधिक वरच्या पातळीवर नेण्याचे काम केले पाहिजे अशी विवेकानंदांची धारणा होती. त्यामुळे विवेकानंदांनी काय सांगितले आहे हे पाहताना ते कोठे आणि कोणाला सांगितले आहे हा संदर्भ लक्षात घेणे गरजेचे आहे.

विवेकानंद साहित्याच्या माध्यमातून जे काही आपल्या हाती लागले आहे, त्याचा विचार केला असता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते; ती अशी की, त्यातील बहुतेक सारी व्याख्याने, भाषणे आहेत. 'राजयोग’ आणि ‘उदबोधन’ साठी लिहिलेले काही लेख वगळता सारी व्याख्यानेच आहेत. ही व्याख्याने टिपणांवरुन, इतरांनी घेतलेल्या नोंदींवरुन, पुन्हा तिस-या व्यक्तीने लिहिली आहेत – स्वत: विवेकानंदांनी नाही. तत्त्वज्ञानासारख्या विषयावर व्याख्यान देणे आणि एका जागी बैठक मारुन आपण स्वत: ते लिहिणे या दोन प्रक्रियांमध्ये फार मोठा फरक आहे.

विशिष्ट तत्त्वज्ञानाचा प्रसार करणे हाही विवेकानंदांचा हेतू नव्हता. अमेरिकेतील त्यांच्या अनेक व्याख्यानांमध्ये त्यांनी स्वत:च्या विधानांच्या पुष्टयर्थ बायबलमधील दाखले दिले आहेत. कारण श्रोत्यांना आपण काय म्हणतो आहोत ते समजावे अशीच त्यामागची भूमिका होती. ‘हिंदू’ दाखले ख्रिश्चन धर्माच्या व्यक्तींना समजणे अवघड गेले असते. ज्याला जे माहिती आहे, त्या संदर्भ चौकटीत बोलावे – असा संवादाचा संकेत विवेकानंद पाळतात. लोकांनी फक्त आपले म्हणणे ऐकावे आणि आपली वाहवा करावी - याऐवजी लोकांच्या जीवनात आंतरिक इच्छेतून; आंधळेपणाने नाही तर जागरुक विचारांतून, आतून परिवर्तन यावे ही विवेकानंदांची भूमिका होती.

पारिभाषिक शब्दांचे मायाजाळ विवेकानंदांनी जाणीवपूर्वक टाळलेले दिसते. तत्त्वज्ञानात त्यांना शास्त्रीय अथवा शैक्षणिकदृष्टया रस नव्हता, तर जीवनदृष्टया रस होता. विवेकानंदांची भूमिका सदैव लोकशिक्षकाची होती. त्यामुळे त्यांनी नेहमीच शक्यतो साधी, सोपी, सरळ भाषा वापरली आहे. त्यांच्या भाषेत पांडित्याचा आवेश क्वचितच आढळतो. ज्या व्यक्तीला लोकांसाठी व लोकांबरोबर काम करायचे आहे त्या व्यक्तीला लोकभाषेतच बोलावे लागते - तरच त्याचे/तिचे काम यशस्वी होण्याची शक्यता वाढते – हे जणू विवेकानंद स्वत:च्या कृतीतून आपल्याला सांगत आहेत.

विवेकानंदांनी जी काही भाषणे दिली, त्यातील बहुतेक भाषणे उत्स्फूर्त होती. अगदी सर्वधर्मपरिषदेतील उदघाटनप्रसंगीचे त्यांचे भाषणही विचारपूर्वक, मुददे काढून, आधी तयारी करुन, ठरवून केलेले नव्हते, तर ते प्रसंगी स्फुरलेले होते. उत्स्फूर्तता हा त्यांचा स्वभावच होता. त्यामुळेही त्यांच्या विचारांतील तार्किक संगती शोधणे आपल्याला अवघड जाते.

विवेकानंदांनी पाश्चिमात्य देशांमध्ये केलेली भाषणे आणि भारतातील लोकांना केलेले मार्गदर्शन यामध्ये बराच विरोधाभास दिसतो. हे असे का - याचेही उत्तर पूर्वी येऊन गेले आहे. विवेकानंदांच्या मते ‘तमसात गाढ निद्रिस्त असणा-या भारताला मोठा आरडाओरडा करुन, गोंधळ उडवून देऊन झोपेतून जागे केले पाहिजे’. त्याउलट अमेरिका, इंग्लंड येथे अति राजसिक वृत्तीचे लोक! त्यांना वेगळयाच प्रकारचे मार्गदर्शन करायला हवे. मतभिन्नतेबददल आदर राखून, मनात सर्व मार्गांबददल उदारता ठेवून जिची/ज्याची जी गरज तिला/त्याला ते सांगायचे हेच विवेकानंदांचे ब्रीद होते. शिवाय या सर्व उपदेशाचा नीट बसून विचार करायलाही त्यांना आयुष्यभरात कधीही उसंत मिळाली नाही की कधी निवांतपणा लाभला नाही.

पौर्वात्य आणि पाश्चिमात्य अशा दोन वेगवेगळया संस्कृतीतील लोकांच्या संपर्कात येताना विवेकानंदांना एक गोष्ट स्पष्टपणे जाणवली अन ती म्हणजे तत्त्वज्ञान हा निव्वळ पोकळ बडबडीचा विषय झाला आहे. 'सर्वं खल्विदं ब्रह्म’चा जप करणारे सावलीचा विटाळ मानण्यात गर्क होते तर ख्रिस्ताच्या अनुयायांनीच येशूसाठी हजारो नवे क्रूस उभारले होते. अनेक सामाजिक प्रश्नांचा ऊहापोह तत्त्ववेत्त्यांनी करणे ही त्या काळाची गरज होती. विधवाविवाह, जातिव्यवस्था, बालविवाह अशा अनेक समस्यांवर विवेकानंदांना बोलावे लागले आहे. प्लेग आणि दुष्काळात नि:स्वार्थी वृत्तीने झटणारे कार्यकर्ते त्यांना करावे लागले आहेत. या कार्यकर्त्यांनी पैशांचे हिशोब कसे राखावेत, अहवाल कसे लिहावेत यासंबंधी विवेकानंदांना बोलावे लागले आहे. हे विषय तसे पाहता तत्त्वज्ञानाच्या कक्षेत येत नाहीत. पण विवेकानंदांची या सेवाकार्यांमागची भूमिका वेदान्त्याची होती. विवेकानंदांचे तत्त्वज्ञान परंपरागत विचारांच्या पठडीत बसत नसल्याने आपल्याला ते वेगळे वाटते इतकेच खरे आहे!

विसाव्या शतकातील जगाचे, भारताचे आणि त्यामुळे विवेकानंदांचे प्रश्नही वेगळेच होते. ही जाणीव आपण जर सतत मनात ठेवली तर विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास, त्याचे रहस्य आपल्यासाठी पुन्हा एकदा खुले होऊ शकते. विवेकानंदांच्या या परिस्थितीची जाणीव श्री. वसंतकुमार लाल यांच्या विवेचनात आढळते. ते म्हणतात, “It is difficult to reduce the teachings of a social reformer and a religious teacher, into the technical mould of academic philosophy. The reasons are simple: a preacher or a religious teacher does not merely seek to satisfy the intellectual curiousity of man; he appeals to feelings and fancy as well; as such he does not feel the need of observing the rules of logic. Moreover, one who is basically interested in the practical affairs of life, does not have the time to care for any discrepancies and contradictions involved in the theory side of the problem. In the comprehensive sweep and the feeling approach of the religious teacher, contradictions just melt away!”

विवेकानंद वाचताना श्री. लाल यांचे मत अगदी तंतोतंत पटून जाते आणि केवळ विसंगतीवरच लक्ष केंद्रित न करता विवेकानंद विचार व्यवस्थित समजून घेण्याची आपली प्रक्रिया सुरु होते. वरवर दिसणा-या विसंगतीच्या आड लपलेली सुसंगती मग दिसू लागते.
***
अन्यत्र पूर्वप्रकाशित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आतिवासजींचा विवेकानंद विषयावरचा (आणि एकुणच भारतीय तत्त्वज्ञानाचा)प्रचंड व्यासंग माहीत असल्याकारणाने त्यांच्या मताबद्दल बोलण्याचे धाडस मला करता येणार नाही. लेख अतिशय सुंदर आणि संतुलित आहे. मात्र काही ठिकाणी विवेकानंदांच्या साहित्यात विसंगती जाणवली तरीही विवेकानंदांची एक ठाम अशी भुमिका होती अशी माझी समजुत आहे.

राजयोगावरील त्यांचे भाष्य हे कदाचित इतर उपलब्ध भाष्यांपेक्षा शब्दसंख्येने लहान असेल पण त्यातला पारदर्शकपणा अगदी ठळक उठुन दिसतो. त्यांच्या तत्त्वज्ञानात मला त्यांनी ज्याकाही ठाम भुमिका घेतल्यात त्यातली एक भुमिका त्यांनी जी विज्ञानाची कास धरली आहे ती वाटते. आता त्यांचे शब्द नक्की आठवत नाहीत पण ज्याचे स्पष्टीकरण देता येत नाही त्याबद्दल शास्त्र असे म्हणते असे म्हणुन मी पुढे जाईन असे स्वामीजी म्हणतात. पातंजल योगसुत्राच्या एका पादात फक्त सिद्धी आणि त्या कुठल्याविषयावर संयम केल्याने मिळतात यावर विवरण आहे. तेथे स्वामिजी फारसे रमलेले दिसत नाहीत.

त्याचप्रमाणे रामकृष्णांच्या शिष्यांमध्ये "भाव" प्राप्त होण्याची उदाहरणे मी वाचली होती. मास्तर महाशयांच्या रामकृष्णांवरील खंडांमध्येदेखिल याचे वर्णन आढळते. खुद्द रामकृष्ण तर अनेकदा "भावा"त जात असत. याचा अर्थ बहुधा समाधीशी निगडीत असावा. मात्र स्वामीजींना या बाजुची ओढ फारशी दिसली नाही. ते ज्ञानयोगी होते हा समज बहुधा त्यांच्या या वृत्तीमुळे झाला असावा. मात्र ते भावनाशील होते या आतिवासजींच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. तरीही त्यांची ही भावनाशीलता धर्म आणि देवाशी निगडीत नसुन माणुस आणि माणसाच्या दु:खाशी निगडीत होती अशी माझी नम्र समजुत आहे. देवाच्या नावाने घळाघळा डोळ्यातुन पाणी काढणारी माणसे इतर माणसांच्या दु:खाच्या बाबतीत कठोर होऊ शकतात. आणि स्वामिजींचे नेमके वेगळेपण मला येथेच दिसते.

ते धर्माच्या आणि देवाच्या आठवणीने क्वचितच सद्गदीत झाले असतीत पण दरीद्रनारायणाच्या दु:खाने एकढे भावनाविवश झाले होते कि शिवरुपाने जीवसेवा करण्याचा संदेश त्यांनी जगाला दिला. कुणावरही टिका करण्याचा माझा मानस नाही आणि तेवढा माझा अधिकारही अर्थातच नाही. पण इतर धार्मिक नेत्यांप्रमाणे स्वामीजींचा अजेंडा स्वतःच्या धार्मिक तत्त्वज्ञाची स्थापना हा नव्हता त्यामुळे ते त्यांना न पटणार्‍या गोष्टींवर स्पष्टपणे आणि कठोर टिका करु शकत. त्याचवेळी त्यांना त्या तत्त्वज्ञानातील पटणार्‍या गोष्टींचा स्विकारही करीत. एखादे तत्त्वज्ञान "फुलप्रुफ" असावे किंवा असले पाहिजे असा आग्रह स्वामिजींनी धरला नसावा. त्यामुळे जी विसंगती स्वामिजींच्या विचारातील वाटते ती कदाचित त्या तत्त्वज्ञानातीलही विसंगती असण्याची शक्यता आहे.

आभार Mandar Katre, राधोदय, सुसुकु आणि दाद.
अतुल ठाकुर, सविस्तर प्रतिसादासाठी आभार.

छान आहे लेख. अधुन मधुन थोडा विस्कळीत आहे असे वर वर वाचताना वाटू शकते पण तसे नसुन लेखनात व्यवस्थित सुसंगती आहे हे नीट वाचले तर लक्षात येते Happy

विवेकानंदांविषयी मी भरपुर वाचलेय पण त्यांचे साहित्य अजिबात वाचलेले नाही. किंबहुना, त्यांचे साहित्य म्हणुन एखादे पुस्तकाचे नावही मला सांगता येणार नाही इतके या विषयात अज्ञान आहे. त्यांच्या त्या सुप्रसिद्ध भाषणाबद्दल खुप वाचले पण मुळ भाषण कुठेही वाचायला मिळाले नाही Happy

त्यांच्या साहित्याबद्दल कोणी इथे लिहिल्यास बरे होईल.

विवेकानंद हे सोशिअल रीफॉर्मर प्रथम होते आणि नंतर तत्त्ववेत्ते. लेखात म्हटल्याप्रमाणे दरिद्रनारायण हे त्यांचे लक्ष्य होते. या समूहाला समजेल अशीच भाषा त्यांनी वापरली. जडजम्बाल तत्त्वज्ञान तर आधी अनेकांनी मांडून ठेवले होते. शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी कर्मप्रधान पाश्चात्य जीवनशैलीसमोर हिंदूंचे गतानुगतिकत्व आणि मरगळ अगदी ठळक उठून दिसत होते. हिंदूंमधली सेवावृत्ती, एकमेकांना मदत करण्याची वृत्ती, एकोपा लयाला गेला होता.(अजूनही काही प्रमाणात परिस्थिती तशीच आहे.) या स्थितीत मिशनरी झील समाजात बाणवण्याची आणि सेवाभावी हिंदू(भारतीय)मिशनरीज निर्माण होण्याची गरज होती. विवेकानंदांनी सारे तत्त्वज्ञान या दिशेने राबवले. रामकृष्ण मिशनची स्थापना यातूनच झाली.
त्यांना काही लोक 'योद्धा संन्यासी' म्हणतात. पण त्यांचे युद्ध समाजातल्या भेदांशी, वाईट चालीरीतींशी होते. त्यांचे तत्त्वज्ञान लढाईखोर हिंसेचे नव्हते.
त्यांना आळस अजिबात आवडत नसे. सदैव कार्यरत राहाण्यावर त्यांचा भर असे. ते खरे कर्मयोगी होते.
जाता जाता : परिचयातल्या काही तत्त्वज्ञांनी/निस्पृह साधूंनी विवेकानंदांपेक्षा रामकृष्णांना झुकते माप दिलेले पाहिले आहे. अर्थात हा विवेकानंदांचा उपमर्द अजिबात नाही. रामकृष्णांनी विवेकानंदांना एका खास कार्यासाठी घडवले. ते म्हणजे सनातन धर्माची सूत्रे वापरून धर्मात-अर्थात समाजात सुधारणा घडवून आणणे. त्या काळी बंगालात ब्रह्मसमाज लोकप्रिय होता. पण त्यांची थोडीफार वेगळी चूल होती. अश्या वेगळ्या पंथाची कास न धरता समाजाला नवी दिशा देण्याचे काम विवेकानंदांनी केले.

ओहो, फारच चांगला लेख सापडला अचानक.
फार पुर्वी शालेय वयापासुनच विवेकानंदांचे साहित्य वाचले गेले.
त्यामधे मला सर्वात जास्त आवडलेले "राजयोग"
हा माणूस फार वेगळा होता, काळाच्या फार पुढचा.
त्याचे महत्व कळेकळेपर्यंत तो गेलासुद्धा.
गुडविन साहेबाने जर टिपले नसते तर फार मोठे अमुल्य विचारधन आपल्या हाती लागले नसते.
https://en.wikipedia.org/wiki/J._J._Goodwin

महेशजी, धन्यवाद! इतका सुंदर लेख नजरेतून कसा काय सुटला होता ... अतुलजी व हीरामजींचे प्रतिसाद खूपच छान....