एक और अत्याचार

Submitted by पायस on 10 January, 2015 - 06:04

महाभारतातली अभिमन्युची गोष्ट आठवते? अभिमन्युला फक्त चक्रव्युह फोडून आत कसे घुसायचे हे माहित होते पण परत बाहेर कसे यायचे हे माहित नव्हते. असे सांगितले जाते कि जेव्हा अभिमन्यु सुभद्रेच्या पोटात होता तेव्हा अर्जुनाने सुभद्रेला चक्रव्युह भेदाविषयी सांगितले होते जे याने पोटातून ऐकले आणि शिकून घेतले. पण सर्वज्ञ कृष्णाने चक्रव्युहातून बाहेर यायचा भाग येताच हस्तक्षेप करुन विधिलिखितामध्ये बदल टाळला. सांगायचा मुद्दा असा कि व्यासांनी गर्भ एखादी गोष्ट शिकु/लक्षात ठेवू शकतो हा झक्कास प्लॉट डिवाईस तेव्हाच देऊन ठेवलेला आहे. जेव्हा मोहन पलिवल हा दिग्दर्शक याचा वापर करुन आपल्या डोळ्यांवर (म्हणजे अप्रत्यक्षपणे मेंदूवर) एकापेक्षा एक भयाण दृश्यांची मालिका आदळवतो तेव्हा आपल्या लक्षात येते कि आपल्यावर अजून एक अत्याचार (एक और अत्याचार) झालेला आहे.

तर यातला अभिमन्युचा पार्ट राज बब्बरच्या वाट्याला आला आहे व त्याने अभिमन्युला अधिकाधिक यातना होतील याची पुरेपूर काळजी घेतली आहे. सुरुवातीलाच आपल्याला न्यायालयीन कोठडीचे दर्शन होते व लगेचच न्यायालयाचे. आपल्याला असे कळते कि राज ने स्वतःच्या स्टेटमेंट मध्ये ३ खून केल्याची कबूली दिली आहे व ३ लाशे पण मिळाली आहेत. पण त्याला वकील नसल्याने न्यायाधीश सदाशिव अमरापूरकर साहेब - होय सदाशिव अमरापूरकर - खटला पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतात.

इथे एंट्री होते फरहा नाज बाईंची. यात गीता या नावाने फरहाताई वकील दाखवल्यात. न्यायमूर्ती अमरापूरकर तिला रा. बब्बर चे वकीलपत्र घ्यायला गळ घालतात, ती म्हणते ओके. इथून पॅरलली फरहाच्या एकसे एक केशभूषा सुरु होतात - सर्वात लक्षणीय बुद्धमूर्तीस्टाईल बुचडा! मग आपल्याला फरहाताई अ‍ॅडिशनल माहिती देतात कि किशनलाल(रा. बब्बर) याला ५ खून करायचे होते, ३ त्याने केले, एक आधीच नैसर्गिकरित्या मरण पावला होता आणि एक अजून करायचाय. इथे जर कोणी तो ५ वा माणूस कोण हे ओळखले तर स्वतःची पाठ थोपटून घ्यायला हरकत नाही. जर का खून करायचेत हे देखील ओळखू शकलात तर तुम्हाला साष्टांग दंडवत! (असे कैक अत्याचार सहन केल्याशिवाय हा अंदाज लागणे शक्यच नाही)

मग फरहा डिटेक्टिव तीर्थराम (विजू खोटे) याची मदत घेते. खून झालेल्यांपैकी दोन जणांच्या मुलांना मदतीकरिता विचारले जाते. इथे सुमित सहगल एक अत्यंत वॅलिड पॉईंट मांडतो - किशनने कबूली दिलेली आहे, लाश मिळाली आहे व पुरावे सुद्धा आहेत. अशावेळी हा खटला चालू ठेवण्याचे कारणच काय? त्याला फरहा अत्यंत हृदयस्पर्शी उत्तर देते - ताकि बदले कि राह पर भटके एक इन्सान को बदले कि इस भावना से मुक्ती मिल सके! सुमित अशा आणखी उत्तरांच्या भीतीने लगेच होकार देतो.

मग राज बब्बरकडून त्याने हे खून का केले हे काढून घ्यायचे प्रयत्न सुरु होतात. जेव्हा पण राज बब्बर त्या खूनांविषयी बोलतो त्या प्रत्येक वेळी मागून लहान बाळाचा रडण्याचा आवाज येतो. ते इतक्या जास्ती वेळा होते कि माझ्या आईला (ती सिनेमात लक्ष देत नव्हती) वाटले शेजारच्यांचे बाळच रडतंय. ("आता बास कर त्या राज बब्बरचा सिनेमा बघणं शेजारच्यांच बाळपण त्याचे डायलॉग ऐकताच रडायला सुरु करतंय. लहान लेकराला पण कळतंय असे फालतू सिनेमे पाहू नये तुला अजून कळू नये" - इति मातोश्री). असो पण बब्बर भाऊ काही दाद लागू देत नाहीत.

हो ना करता करता असे ठरते कि खूनांचा आणि 'पूनम के चांद' चा काही संबंध आहे आणि डॉक्टर वर्मांना (शफी इनामदार) पाचारण केले जाते. किशन पूर्वी वर्मांकडे उपचारांसाठी जात असतो. वर्मांना संमोहन विद्या अवगत असल्याने त्यांच्या डॉक्टरकीवर शिक्कामोर्तब होते. काही तरी पॉजिटिव्ह-नेगेटिव्ह बडबड केल्यावर वर्मा सांगतात कि जेव्हा पूनम का चांदला एका विशिष्ट संगीताची जोड दिली जाईल तेव्हाच किशनला झटके येतात आणि तुम्हाला या कॉम्बोतून खूनामागची कारणमीमांसा समजू शकते. मग संशोधकवृत्तीची फरहा राज बब्बररूपी स्पेसीमेनवर विविध प्रयोग करते. यात विजू खोटे हेपण शोधून काढतो कि तिसरा खून झालेला इसम म्हणजे फरहाचे वडील - यावर तीपण अरे ये तो मेरे डॅडी है तो इनकाभी खून इसीने किया था वगैरे बोलते. यावर विजू खोटे सुद्धा तिच्याकडे हताश नजरेने पाहतो.

प्रत्येक प्रयोगात राज बब्बरचा एकच रिस्पॉन्स असतो - चांद चांद म्हणत घाबरणे आणि फरहाला करकचून मिठी मारणे. पण वकीलबाईंचे नेटवर्क सीआयडीपेक्षा स्ट्राँग असल्याने त्या इस जमाने के अभिमन्युच्या आईला शोधून काढतात आणि घोळ थोडा क्लीअर होतो. तिचे वडील(पक्षी किशनचे आजोबा) सांगतात कि किशनचे वडील पोलिस इन्स्पेक्टर असतात पण त्या चार जानवरांच्या काल्या कारनाम्यांचा पर्दाफाश करण्याच्या नादात मारला जातो. तेव्हा किशनची आई ८ महिन्यांची गरोदर असते आणि ते ४ भेडिये आणि त्यांचा एक गुप्त साथीदार पौर्णिमेच्या रात्री त्या डिस्कोसदृश संगीताच्या तालावर विलनचे आद्य कर्तव्य पार पाडतात.

तर हा अभिमन्यु त्या सर्वांचे चेहरे लक्षात ठेवूनच जन्माला येतो. सूज्ञास लक्षात आले असेलच कि तो ५वा अमरापूरकर असतो. मग नेमका त्याचाच चेहरा कसा लक्षात नाही? खोटेंचा युक्तिवाद असा - वो काला व्हयेगा और उसके बारी के वक्त चांद बादलों के पीछे शर्म के मारे छिप गया हो गा! तो काली रात मे वो काला कैसे दिखेगा? मग कुठल्याही सुरागाशिवायच कसेतरी फरहाताई अमरापूरकरांचे रहस्य शोधून काढतात आणि तिची अपेक्षा असते कि अमरापूरकर स्वतःहून हे कबूल करतील - मूर्ख कुठली! स्वतः अमरापूरकरांच्या चेहर्‍यावरील भाव - तुला काम मिळत नव्हते तेव्हा ही केस मिळवून दिली आणि तू मलाच अडकवतेस! धिक्कार असो तुझा!

एव्हाना माझा संयम संपत आला होता. मग मधूनच कुठूनतरी अमरापूरकरांचा डुप्लिकेट येऊन सगळा इल्जाम स्वतःवर घेतो पण त्याचा रबरी मुखवटा निघून येतो, राज बब्बरला झटका येतो तो अमरापूरकरांच्या नरडीचा घोट घ्यायला झेप घेतो आणि सिनेमा अबरप्टली संपतो. मी काही हा थेटरात पाहिला नाही पण ज्या कमनशीब जीवांनी याच्या तिकिटावर पैसे घालवले त्यांच्याविषयी मला अतीव सहानुभूती वाटते.

आणि हो विसरलोच होतो - आमचं तुम्हाला डिसक्लेमर - हापिसात बसून वाचण्याची रिस्क घेऊ नये, पोटदुखी होण्याचा संभव आहे! (फार लवकर टाकतोय/सांगतोय नै :फिदी:)

फुकटात बघण्यासाठी तूनळीवर उपलब्ध
https://www.youtube.com/watch?v=Yz6YQTge-Nc

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुंदन नावाचा धर्मेंद्र जयाप्रदाचा चित्रपट होता. "छमछम बाजे घुंगरू" या भीषण गाण्यावर दोघांचा भयंकर नाच आहे. >>>>>>>>> गाण छान होत, जयाप्रदा डान्समध्ये अ‍ॅझ युज्वल बेस्टच होती. पण तिचे कपडे आणि धर्मेंद्रचा डान्स भयंकर होता.

कुंदन नावाचा धर्मेंद्र जयाप्रदाचा चित्रपट होता. "छमछम बाजे घुंगरू" या भीषण गाण्यावर दोघांचा भयंकर नाच आहे.

आता हे गाणे पहाणे आले!.

कालच पाहिला. बाळाच्या रडण्याच्या आवाजाचा अतिवापर अक्षरशः डोक्यात जातो.
आणि शफी इनामदार घरी गेल्यावर धुवून वाळवून रोज एकच निळा सूट वापरत असावा अशी शंका येते.

शफी इनामदार घरी गेल्यावर धुवून वाळवून रोज एकच निळा सूट वापरत असावा अशी शंका येते.
Submitted by ShashankP on 10 April, 2019 - 16:02

चित्रपट बघण्याचा तुमचा अनुभव कमी पडलेला दिसतोय. संदर्भाकरिता आर के प्रॉडक्षन्स चा बीवी हो बीवी हा सिनेमा पाहावा. संजीवकुमार कडे एकसारखे सहा सूट्स असतात. बडे लोग एकजैसे कपडे हमेशा पहनते है इसका मतलब यह नही के उन्के पास एक ही जोडा होता है|

Pages