लग्नंघर.....

Submitted by उडन खटोला on 26 November, 2014 - 08:57

लग्नंघर.....
मी हे वधूपक्षाच्या लग्नंघराबद्दल म्हणतोय. बापाच्या आयुष्यातला खरंतर हा सगळ्यात आनंदी प्रसंग. कार्यालयातून परत आल्यावर भावनिक त्सुनामी येउन गेल्यानंतरची परिस्थिती घरभर असते. बरेचजण सुट्ट्या नसल्यामुळे परस्पर कार्यालयातून स्टेशनवर पळालेले असतात. सामान घेऊन गाड्यांबरोबर माणसंही घरी येतात. थकवा ओसरला की निघायच्या दृष्टीने रिटायर्ड लोकांनी दोनचार दिवसानंतरची जायची रिझर्वेशंस केलेली असतात.
मागे राहिलेले दहाबारा पाहुणे, घरभर अस्ताव्यस्तं पडलेलं सामान, रंगीबेरंगी कागदात गुंडाळलेली प्रेझेंटस, बाहेर लावलेल्या लाईटच्या माळांचा निस्तेज प्रकाश, प्रत्येकाच्या चेह-यावर मानसिक आणि शारीरिक थकव्याचा हलकासा पफ फिरवल्यासारखा थर, कुणालाही भूक नसते पण दुपारीच जेवण झाल्यावर परतलेली, कमी दमलेली एखादी अनुभवी वयस्कं आत्या, काकी मुगाच्या डाळीची खिचडी ग्यासवर चढवते, 'पोह्याचे पापड कुठेत गं? सांग फक्तं, मी काढते ' विचारत तिच्या दृष्टीने नुसत्याच मिरवणा-या पाहुण्या मुलीला/सुनेला 'ताक घुसळतेस पटकन?' अशी आदेशवजा विनवणी करते. सुनेला त्रास न देता सापडल्याच तर दहाबारा सांडगी मिरच्या तळून ठेवते.
उद्या सकाळी जाणारे पाहुणे आपापलं सामान गोळा करतात, सकाळी घालायचे कपडे, रिझर्वेशंस वरती काढून ठेवून टूथब्रश सकाळी सापडेल अशा नेमक्या जागी ठेवतात. आजीच्या चेह-यावर लग्नाकरता एवढ्या लांबून मुद्दाम आलेल्या माणसाबद्दलचं कौतुक ओसंडून वहात असतं. परत भेट होतीये न होतीये म्हणून ती मायेने चिवडा लाडूच्या दोन पुड्या त्यांच्या हातात कोंबते. गाड्यांचे, कुणीकुणी गेल्या दोन दिवसात खर्च केलेले पैसे आठवणीने दिले जातात. सुतकात असल्यासारखे सगळेजण ऊनऊन खिचडीचे दोन घास पोटात घालतात, लग्नं कसं झालं, फोटो, दागिने यावर हलक्या आवाजात निरुत्साही चर्चा होते. अशावेळी सगळं पटापट आवरलं जातं. बापाचा हात न वाजलेल्या फोनकडे सारखा जातो. एकदाचा उत्साहानी फसफसलेला, आनंदी फोन येतो, सगळा ताण रिलीज झाल्यासारखा बाप 'मिरची फारच तिखट आहे' म्हणत तांब्यानी वरून पाणी पित डोळ्यातलं मागे सारतो.
नमस्कार होतात, ओट्या भरल्या जातात, दिलं घेतलं जातं. आठवणी निघतात. डोळे ओले होतात, पुसले जातात, तोंडभरून आशिर्वाद मिळतात, दिले जातात, कानशिलावर बोटं मोडली जातात, परत लवकरच भेटण्याचे वायदे होतात, नातवंडांचे, माहेरवाशीणीचे गाल आजीच्या पाप्यांनी ओलसर होतात. दोनतीन दिवसात सुगी संपल्यावर पाखरं नाहीशी होतात तसा एकेक पाहुणा परततो. मग उरतो तो फक्तं नि:शब्द एकांत. मग आजी शहाण्यासारखी कोचावर सुखानी लवंडते.
शेवटच्या पाहुण्याला स्टेशनवर सोडून आलेला बाप 'मला भूक नाहीये गं, पडतो जरा' म्हणत बेडरूममधे जातो.मुलीचं कपाट उघडतो, घरी आल्यावर लागतील म्हणून तिनी ठेवलेल्या कपड्यांवरून थरथरता हात फिरवतो. लागूनच असलेल्या बेडवर बसतो आणि ओंजळीत तोंड धरून आवाज न करता धबधब्यासारखा फुटतो. मांजरीच्या पावलांनी पाठोपाठ आलेली मनकवडी बायको आई होते आणि त्या फक्तं वय वाढलेल्या सशाला छातीशी घट्ट धरते.
Source- WhatsApp ,Original Writer-Unknown !
Salute to the original writer !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे मला ही whatsapp वर आलय - लेखकाचनांव - जयंत विध्वांस - खर/ खोट माहीत नाही... पन खरच सुन्दर लिहिलय...

किति सुदंर लिहिलय.........माझी पाठ्वणि करताना माझ्या आई पेक्षा माझे वडिलच खुप हळ्वे झाले होते.

छान लिहिलयं Sad
माझी पाठ्वणि करताना माझ्या आई पेक्षा माझे वडिलच खुप हळ्वे झाले होते .. अगदी माझ्यासोबत पण असच झाले होते..
माझे बाबा लहान मुलासारखे रड्त होते Sad

खुप छान.. लग्नाच्या दिवशी कार्यालयात एका कोपर्‍यात ढसाढसा रडणारे आणि दुसर्‍या दिवशी फोन केल्यावर खूप आठवण येते तुझी म्हणत लवकर ये म्हणणारे माझे हळवे बाबा आठवले.... माहेरी पण इनमीन आम्ही ४ माणसं... कल्पना करू शकते किती सुनंसुनं वाटत असेल घर... Sad माहेरच्या आठवणी...हाय!

आवडलं !
>>कल्पना करू शकते किती सुनंसुनं वाटत असेल घर... >>+१

व्हॉट्स्प फेसबुकवर दणादणा पडणार्‍या एक लाख टिनपाट दवणीय अंड्यांपेक्षा हे एकच अस्सल लिखाण लाखपटीनं सहज, सुंदर आणि हेलावणारं आहे...

मूळ लेखक सापडला तर माझाही सलाम सांगा.

ज्यानी लिहल आहे खरच छान आहे. लग्न करून सासरी निघाले तेव्हा डोळ्यात पाणी आल नाही पण हे वाचून डोळे ओलावले.

खूप हळवं लिहिलंय, डोळ्यातलं पाणी थांबत नाहीय. बाबांची आठवण आली, माझ्या पाठवणीपर्यबत ते राहिले नाहीत पण असते तर अशीच अवस्था झाली असती त्यांची.

लेखाबद्दल काहीही म्हणायचं नाहीये परंतु इथे मायबोलीवर स्वतः केलेले लिखाणच प्रसिद्ध करावे असा नियम असल्याचे ऐकले होते. क्वचित चिनूक्स सारखे आयडी अनेक मान्यवरांचे लेख त्यांच्या पूर्वपरवानगीने प्रसिद्ध करतात.

असे असताना whatsapp वर फॉरवर्ड म्हणून आलेले लिखाण इथे कसे प्रसिद्ध केले जाऊ शकते? ऍडमिन कृपया लक्ष द्या व स्पष्ट करा.

मलाही whatsapp, फेसबुक आणि अन्यत्र खूप छान छान / लक्षवेधी / वाचनीय लेख / लिखाण / मजकूर मिळत असतो. तो असा मायबोलीवर स्वतंत्र धागा काढून प्रसिद्ध करत जाणे हे संस्थळांचा धोरणात बसते का?

(विनोद किंवा भोंदू फोर्वर्ड्स हे धागे या नियमाला योग्य अपवाद आहेत).

फेसबुकवर जयंत विद्वांस खरच खुप छान लिहितात.. तिकडे बरेच दिवस जाणं झालं नाहि म्हणुन वाचनात आलं नसेल हे लेखन.. छानच लिहिलय.

फेबु वर बरेच अ‍ॅक्टिव लोक्स आहेत. त्यांचं लिखाणही मस्त असतं. सगळे लेख टाईप कव्हर होतील असं.
मी लिस्ट पण टाकली होती कुठेतरी... बहुधा पार्ल्यात. मिळाली तर पुन्हा डकवेन इथे...