वाटलं?
काय वाटलं ?
मीच तो ?
छे छे !!
माझ सोड रे
अरे मी ठरवून लिहिता झालो
आंडू पांडू पण नाय,
चांगला सामाजिक कवी आहे (?)
पाहिजेल ते लिहून देतो
(पण) पाहिजेल ते घेतो
रोगासारख्या राईचा पर्वत करत नाही
आणि कधी चुकून झालाच
तर ती डोंगरे खोदून न्यायाचं कुपोषण दाखवत नाही
तोंडपाठ झालेली इज्जतीची लक्तरे पोरांची दप्तरे भरतात
उपोषण फक्त 'कवर' करतो, करत नाही
रक्ताच्या डागावर अलगद शाई ओततो
दुसऱ्यांची आई बहिण छापतो
आणि चवल्या पावल्या वाचवून
घरी येवून आपली आई बहिण झाकतो
जरावेळाने विसरतोही
मीही विसरतो
लोकही विसरतात
तुला काय वाटलं ?
पेटून उठलो आणि
शब्दांनी सामाजिक घाणीवर मूत मूत मुतलो
की झालास तू कवी ?
छे छे !!
अरे,
आपली (होणारी) आई बहिण वाचवता आली ना
की टिकते कवीत्व
होय कवित्वच !!
कवितेच काय एवढ ?
आज माझी आहे, उद्या तुझी असेल
सोप्पं नाही हे !!
बघितलेस ना आजूबाजूला कित्ती कित्ती कवी आहेत ते !!
मग....
तुला काय वाटलं माझ हे शब्द्चाळे म्हणजे
आतून ?
स्पार्क ?
देणगी ?
''मीच तो !!'' फिलींग ?
सब झूट साला !!
सुरवातीला मी पण असंच म्हणायचो
परिस्थिती बदलायची होती मला
बदलली परिस्थिती !!
तू पण मांडीखालची मेणबत्ती विझव
आणि लोकांना उजेड दाखवत फिर
परिस्थिती बदलते की नाही बघ !!
ऐक माझ
अपना रोजका है रे !!
तनवीर सिद्दीकी