महाभारतातील “चलाख” महापुरुष आणि तत्व कि अस्तित्वाची लढाई

Submitted by अतुल ठाकुर on 5 January, 2014 - 08:54

mb-300x225.jpg

महाभारतात भगवान कृष्णासकट कुणीही देव नाही असं माझं मत आहे. आहेत ती सारी माणसंच. पराक्रमी, कसलातरी पीळ घेऊन जगणारी. प्रत्येकाचे पाय मातीचे. हर्ष, खेद, सुख, दु:ख, वेदना, लोभ, सूड, कौर्य अशा अनेकानेक भावनांचा विविधरंगी पट या कथेत गुंफला आहे. हा इतिहास पराक्रमी पुरुषांचा असला तरी त्यामागे कुशल राजकारणाचा देखिल अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आणि या राजकारणाचे धागेदोरे महाभारतात फार दुरवर जाणारे आहेत. या राजकारणाचा विचार करताना तीन महापुरुषांनी केलेल्या घडवुन आणलेल्या घटनांचा परामर्ष या लेखात घेतलेला आहे. याला हुशारी, बुद्धीमत्ता असं नाव देता आलं असतं. मात्र मुद्दामच “चलाखी” हा शब्द वापरलेला आहे. समोरच्या माणसाचा कमकुवतपणा हेरुन आपला हेतु साध्य करण्याची किमया या माणसांमध्ये होती. हा मान साधारणपणे कृष्णाला देण्याची लोकपरंपरा आहे. मात्र कृष्णाशिवाय देखिल अनेकांनी हा प्रकार महाभारतात करुन दाखवलेला आहे. कृष्णाच्या “भगवंत” होण्याने बाकीच्यांची “चलाखी” काहीशी झाकोळुन गेली आहे. शिवाय कृष्णाने इतर कुणाहीपेक्षा अशा तर्‍हेची कामगिरी अनेकानेक वेळा यशस्वीपणे पार पाडलेली आहे. याचा शकुनीच्या कपटाशी संबंध नाही. कणिकाच्या कुटील नीतीशीही संबंध नाही. समोरच्याला आपल्याला हवं तसं वागण्याला उद्युक्त करणं ही करामत या घटनांमध्ये घडते.

अतिशय प्रसिद्ध घटनेचा उल्लेख करायचा झाला तर कृष्णाच्या शिष्टाई बद्दल बोलता येईल. द्रौपटीने कॄष्णाला शिष्टाईला जाण्याआधी तिच्या मोकळ्या केसांची आठवण करुन दिली होती. कॄष्ण ही घटना विसरला असण्याची शक्यताच नव्हती. दुर्योधनाचा हट्टी स्वभाव पूर्णपणे माहीत असलेल्या कॄष्णाने चलाखपणे फक्त पाच गावांची मागणी केली. कृष्णाला जरा जरी शंका असती कि दुर्योधन पाच गावांची मागणी मान्य करेल तर त्याने हा प्रस्ताव ठेवलाच नसता. त्यामुळे झाले हे की बिचार्‍या पांडवांनी हक्काचे अर्धे राज्य सोडुन फक्त पाच गावांवर समाधान मानले तरी दुर्योधनाचा लोभ आणि युद्धपिसाटपणा इतका कि सुईच्या अग्रावर मावेल इतकी देखिल जमीन तो द्यायला तयार झाला नाही असा संदेश जनसामान्यांत गेला. पुढे जे काही “महाभारत” झाले त्याला बहुतांशी कौरव जबाबदार धरले गेले याचं कारण कृष्णाने अत्यंत मुत्सद्दीपणे जगासमोर दुर्योधनाला हट्टाग्रही सिद्ध केलं. अर्थात दुर्योधनाला राज्याचा वाटा द्यायचा नव्हताच. पण त्याच्या स्वभावाची ही बाब कृष्णाने शिष्टाईच्या निमित्ताने चव्हाट्यावर आणली. अशा घटना महाभारतात अनेक असल्या तरी येथे फक्त तीनच घटना विचारार्थ घेतल्या आहेत. या तीन घटना त्या काळच्या विचारसरणीवर तर प्रकाश टाकतातच शिवाय या घटना घडल्यामुळे महाभारताला वेगळं वळण देखिल लागतं.

पहिली घटना भीष्माने केलेल्या अम्बाहरणाची. अम्बाहरणाच्या वेळची हकीकत लक्षात घेतली तर त्या काळचे राजे कसे वागत याचा अंदाज येऊ शकतो. केशीराजाने आपल्या तीन मुलींचं स्वयंवर लावलं होतं. त्यात भीष्म स्वतः ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा घेऊन देखिल भाग घेण्यासाठी आला. स्वयंवर कुणाचंही असो. मुलीची इच्छा काहीही असो. त्याच्या अटी वाट्टेल त्या असोत. बाहुबल असेल, धमक असेल, पराक्रम असेल तर मुलगी पळवुन न्यावी असा त्याकाळचा खाक्या दिसतो. पुढच्या काळात कृष्णाने रुक्मिणीचं हरण केलं आणि आपला जिवलग मित्र अर्जुन याला देखिल बहिण सुभद्रेला पळवुन नेण्याचा सल्ला दिला. बायका स्वयंवरात ऐनवेळी कुणाला माळ घालतील याचा नेम नाही त्यामुळे पळवुन नेणेच इष्ट असा भगवंताचा चतुर, व्यावहारिक सल्ला होता. याचा अर्थ स्वयंवरातुन मुली पळवुन नेणे ही त्याकाळी दुर्मिळ घटना नव्हती. पळवणार्‍याने पराक्रम करुन हरण केले असेल, त्याचे घराणे कुलवंत असेल तर कदाचित ती इष्टापत्तीच मानली जात असेल. भीष्म स्वयंवरात आला तो सावत्र भावांसाठी मुलगी मिळवायला. कुणाच्या वतीने स्वयंवरात भाग घेता येत नाही हे भीष्माला ठाऊक असणारच. आणि असाच दंडक असण्याची शक्यता आहे. अन्यथा इतर देशीच्या रा़जांनी त्याची चेष्टा आरंभली नसती. ही चेष्टा भीष्माच्या वयाचीही आहे. राजांनी चेष्टा आरंभल्याबरोबर जणुकाही याच संधीची वाट पाहात असल्याप्रमाणे भीष्माने तिन्ही कन्यांना बळजबरीने रथात घालुन इतर राजांना युद्धाचे आव्हान दिले. भीष्म हा महाभारतात नुसताच महापराक्रमी नाही तर महाज्ञानी म्हणुनही प्रसिद्ध आहे. शांतीपर्वात युधिष्ठीरासारख्या ज्ञानी पुरुषाला आपल्या शंका निरसन करण्यासाठी भीष्माचा आश्रय घ्यावा लागला. अशा ज्ञानवान, श्रेष्ठ आणि ज्येष्ठ कुरुला स्वयंवराचे नियम माहित नसतील ही केवळ अशक्य गोष्ट आहे. भीष्माने तेथे हजर राहुन काही गोष्टी घडु दिल्या आणि आपला कार्यभाग साधला असे वाटते.

भीष्माचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला कधीही स्वतःच्या पराक्रमाबद्दल शंका नव्हती. कुरुंदकरांनी याचं विश्लेषण करताना हनुमानाचं उदाहरण दिलं आहे. हनुमानाला त्याच्या पराक्रमाची आठवण करुन द्यावी लागली आणि मग ते उड्डाण घडले. इथे प्रकार तसा नाही. भीष्माला स्वतःच्या पराक्रमाची इतक्या यथायोग्य प्रकारे जाणीव होती की त्याने परशुरामासारख्या स्वतःच्या गुरुलाही सोडले नाही. समजा राजांनी भीष्माची थट्टा आरंभलीच नसती तर पुढचा प्रकार करणे भीष्माला काहीसे जड गेले असते असे माझे मत आहे. यात चलाखि अशी कि मुळात भीष्माला क्षत्रियांच्या उद्दामपणाबद्दल खात्री असणारच. त्यांच्या दर्पोक्ती करण्याच्या स्वभावाशीही तो परिचित असेलच. आपण आल्याचे पाहुन सारे क्षत्रिय आपली थट्टा करणार याचा त्याने आधिच कयास बांधला असावा. तेव्हा आधी त्यांना कुरापत काढु द्यावी आणि नंतर उग्र रुप धारण करुन, आव्हान देऊन, कन्यांना पळवुन न्यावे असा प्रकार करावा असा विचार भीष्माने केला असेल असे मानायला जागा आहे.

दुसरी घटना इरावती कर्वेंनी “युगान्त” मध्ये सांगितली आहे. मात्र या घटनेकडे लोकांनी द्यावं तसं लक्ष दिलेलं दिसत नाही. “परधर्मो भयावहः” या लेखात त्यांनी द्रोणवधाचा प्रसंग वर्णिताना द्रोण आपला पुत्र अश्वत्थामा मेला हे ऐकुन देखिल शस्त्र खाली ठेवीत नाही हे मुद्दाम नमुद केलं आहे. मात्र जेव्हा भीम त्वेषाने त्याला ही जाणीव करुन देतो कि तो ब्राह्मण असुन लढणे हा त्याचा धर्म नाही. तेव्हा त्याचे धैर्य गळते. या घटनेचा थोड्या तपशीलाने विचार आवश्यक आहे. मुळात बहुतेक लोकांना माहित असलेली घटना म्हणजे भीमाने अश्वत्थामा नावाच्या हत्तीला मारणे आणि त्यानंतर युधिष्ठीराचे ते सुप्रसिद्ध “नरो वा कुंजरो वा ” असे उत्तर देणे. त्यानंतर दु:खाने दोणाचार्यांचे शस्त्र खाली ठेऊन बसणे. आणि धृष्ट्द्युम्नाने त्याचे शीर तलवारीने उडवणे. सर्वजण परंपरेने सांगितलेल्या या कथेशी परिचित आहेत.

जेव्हा अश्वत्थामा मेल्याची आवई उठुनसुद्धा द्रोण शस्त्र खाली ठेवित नाही तेव्हाच या हा प्रसंग वाटतो तेवढा साधा नाही याची जाणीव होते. आपला मुलगा मृत्युंजय आहे हे द्रोणाला ठावुक होते. त्यामुळे पुन्हा त्याने लढायला सुरवात केली. तेव्हा मात्र भीमाने न राहवुन त्वेषाने आपल्या गुरुला स्वधर्माची जाणीव करुन देण्यास प्रारंभ केला आणि हा वार द्रोणाच्या वर्मी बसला. खिन्न होऊन त्याने शस्त्र खाली ठेवले. आणि पुढे धृष्ट्द्युम्नाच्या हातुन तो ठार मारले गेला. या घटनेचा बारकाईने विचार केला तर अनेक बाबी लक्षात येतात.

द्रोणाचा भीमावर मुळीच विश्वास बसला नव्हता. त्याने युधिष्ठीराला विचारुन खात्री करुन घेण्याचे ठरवले. या सार्‍या लांड्यालबाड्या पांडवांना कराव्या लागल्या याचं महत्वाचं कारण हे की द्रोणाच्या अफाट आणि अचाट पराक्रमामुळे पांडवांना विजयाचा भरवसा उरला नाही. भीष्माप्रमाणे “पांडवांना मारणार नाही” वगैरे बोलुन द्रोणाने दुर्योधनाची पंचाईत केली नव्हती. खाल्ल्या मीठाला जागुन त्याने पांडव सैन्याचा भयंकर संहार केला. अभिमन्युला एकटं गाठुन ठार मारायलाही द्रोणाला गैर वाटले नाही. द्रोणाचा हा झंझावात थांबविण्यासाठी ऋषीसुद्धा युद्धभुमीवर उपस्थित झाले होते. या ऋषींमध्ये महत्त्वाची नावे आहेत. विश्वामित्र, जमदाग्नी, भरद्वाज, गौतम, वसिष्ठ, कश्यप, अत्री यासारख्या ऋषींनी तेथे येऊन द्रोणाला शस्त्रत्याग करण्याची सुचना केली. यासर्व गोष्टींचा परिणाम इतकाच झाला की द्रोणाला ज्याच्या सत्यवचनाबद्दल खात्री होती त्या धर्मराजाला त्याने अश्वत्थाम्याच्या मृत्युच्या खरेपणाविषयी विचारले. द्रोणाच्या पराक्रमाने पांडवांचा नाश खात्रीने होणार हा धोका श्रीकृष्णाने सर्वप्रथम ओळखला आणि धर्मराजाला असत्य बोलुन पांडवांना वाचविण्याची विनंती केली.

अर्जुनाच्या पराक्रमाबाबत कुणी कितीही म्हणोत पण द्रोणाला मारण्याची ताकद अर्जुनात नव्हती हे मान्य करणं भाग आहे अन्यथा श्रीकृष्णाने ही गळ युधिष्ठीराला घातलीच नसती. युधिष्ठीराने नाईलाजाने हे मान्य केल्यावर चाचपडत “नरो वा कुंजरो वा” म्हटले. अगोदर तेथे उपस्थित झालेल्या ऋषींनी “हे युद्द तु अधर्माने केले आहेस” असा ठपका द्रोणावर ठेवला होताच. त्यातुन युधिष्ठीराने अश्वत्थाम्याच्या मृत्युला दुजोरा दिला. त्यानंतर आपल्या मृत्युसाठीच ज्याचा जन्म झालेला आहे अशा धृष्टद्युम्नाला चालुन येताना पाहुन द्रोण उदास झाला आणि त्याला पुर्वीसारखे त्वेषाने, कौशल्याने युद्ध करता येईना. मात्र कौशल्य कमी झाले तरी द्रोणाचा पराभव पांडवांना करता येईना. इथे भीमाने द्रोणाच्या मर्मस्थानी लागेल असे संभाषण केले. त्यातले प्रत्येक वाक्य महत्त्वाचे आहे.

भीम म्हणतो” आपल्या स्वतःच्या कर्माविषयी समाधानी नसलेल्या ज्ञानी ब्राह्मणांनी युद्धाचा (अव्यापारेषु) व्यापार सुरु केला नाही तर क्षत्रियांचा जगातुन नाशही होणार नाही. सर्व प्राण्याविषयी अहिंसा पाळणे हा सर्वात श्रेष्ठ धर्म आहे असे ज्ञानी लोक म्हणतात. ब्राह्मण हा त्या धर्माचे मूळ आहे. आणि तु तर ब्रह्मवेत्त्यात सर्वश्रेष्ठ आहेस. एका पुत्रासाठी अधर्माचे आचरण करुन आणि स्वतःच्या नैसर्गिक कर्माचा त्याग करुन, आपापल्या कर्मात मग्न असलेल्या अनेक क्षत्रियांचा वध करताना तुला शरम कशी वाटत नाही? ज्याच्यासाठी तु शस्त्र धारण केलेस आणि ज्या पुत्राच्या विचाराने तु जगत आहेस तो हा तुझा पुत्र पाठीमागे मरुन पडला आहे. आणि त्याच्याविषयी धर्मराजाने स्वतः तुला माहिती दिली आहे. धर्मराजाच्या त्यावचनाविषयी तु शंका घेणे उचित नाही.”

मुळात ही सर्व योजना कृष्णाची. द्रोणाला रोखलं नाही तर पांडवांचा सर्वनाश अटळ आहे हे त्याला दिसु लागले होते. त्याने अश्वत्थामा मेल्याची आवई उठवुन द्रोणाला शत्रत्याग करण्यास भाग पाडावे ही मसलत युधिष्ठीराच्या गळी मोठ्या कष्टाने उतरवली. ज्याला “सीदन्ती मम गात्राणि” च्या अवस्थेतुन अठरा अध्यायी गीता सांगुन युद्धासाठी उभा केला त्या कृष्णसखा अर्जुनाला तर ही योजना आवडलीच नाही. भगवंताची योजना ताबडतोब कुणी उचलुन धरली असेल तर ज्याला गीता सांगण्याची कधी गरजच भासली नाही त्या भीमाने. अश्वत्थामा नावाचा हत्ती मारुन द्रोणपुत्र अश्वत्थामा मेल्याची आवई भीमाने तात्काळ उठवली. त्यादरम्यानच ऋषींनी उपस्थित होऊन द्रोणाला युद्धापासुन परावृत्त होण्याची सुचना केली. तो अधर्माने लढत असल्याचा आरोपही त्याच्यावर ठेवला. पण द्रोण बधला नाही. त्याने पुत्राच्या मृत्युबद्दल सत्यवचनी युधिष्ठीराकडुन खात्री करुन घेतली. त्याच्या उत्तराने द्रोण विचलित जरी झाला तरी तो शस्त्रत्याग करेना आणि त्याचे बळ जरी कमी झाले तरी त्याचा पराभव होईना. तेव्हा ही सारी मसलतच फसण्याची वेळ आली. महाभारतात जरी उल्लेख नसला तरी माझ्या मनात एक कल्पना येते कि जर अशावेळी जिवंत असलेला अश्वत्थामा आपल्या पित्यासमोर आला असता तर पांडवांची अवस्था काय झाली असती? एका क्षणात पाण्डवांचा बनाव द्रोणाला कळुन चुकला असता आणि कदाचित त्याने भूतो न भविष्यती असे घनघोर युद्ध अतिशय त्वेषाने केले असते.

भीमाने मात्र प्रसंगावधान राखुन अत्यंत चलाखपणे, ज्यामुळे द्रोण खरोखरच अस्वस्थ होईल असा स्वधर्माचा अमोघ बाण काढला. महाभयंकर अस्त्र शस्त्रांना सहजतेने तोंड देणार्‍या महापराक्रमी द्रोणाला या बाणाचे मात्र निवारण करता आले नाही. भीमाचे वाग्बाण द्रोणाच्या मनात आरपार रुतले आणि त्याने शस्त्रत्याग केला.

स्वधर्माचे महत्त्व अपरंपार असलेल्या त्याकाळात वर्णानुसार कर्म करणे हा नियम असणार आणि तो नियम मोडणारे द्रोणासारखे महापराक्रमी पण लौकिकार्थाने भ्रष्ट समजले जाणारे असे ब्राह्मणसुद्धा असणारच. त्यातुन ब्राह्मण हा सर्वश्रेष्ठ वर्ण. समाजासाठी गुरुपदी असणारा. त्याच्याकडे समाज नेहेमी मार्गदर्शनासाठी पाहाणार असा. अशा ब्राह्मणांच्या मनात आपण स्वधर्मापासुन ढळलो ही सतत कुडतरणारी, अपराधी भावना असण्याची दाट शक्यता आहे. नेमक्या या कमकुवत जागेचा फायदा भीमाने अत्यंत हुशारीने उचलला आणि द्रोणाच्या मर्मस्थानी बोट ठेऊन आपला कार्यभाग साधला.

द्रोणवधाचा खरेतर सुत्रधार कृष्ण. त्याची योजना पार पाडली भीमाने. शेवटी या योजनेला सुरुंग लागण्याची वेळ आली असताना आपली स्वतंत्र बुद्धी वापरली तीही भीमानेच. आणि द्रोणवधाचे सारे श्रेय दिले जाते ते शत्रत्याग करुन बसलेल्या माणसाचे डोके तलवारीने उडवणार्‍या धृष्टद्युम्नाला.

तिसरी घटना भीम दुर्योधन गदायुद्धाची आहे. यात तर एकमेकांवर कुरघोडी करण्याची जणु स्पर्धाच लागल्यासारखी दिसते. परंपरेने सांगितलेल्या कथा लक्षात घेतल्या तर असं दिसुन येतं कि दुर्योधनाला कुठेतरी ही जाणीव होती कि शेवटी आपला सामना भीमाशी होणारच आहे. त्यामुळे त्याने अनेक वर्षे लोखंडी पुतळ्यावर गदायुद्धाचा सराव केला होता. गदायुद्धाचं शिक्षण प्रत्यक्ष बलरामाकडुन मिळवलं होतं. गदायुद्धात भीम वगळता दुर्योधनाच्या तोडीचा वीर त्याकाळी जवळपास नव्हताच म्हटल्यास अतिशयोक्ती होऊ नये. हे सारं काही असुनसुद्धा साध्वी गांधारीने त्याला आपल्या सामर्थ्याचं कवच घातलं. गांधारीने दुर्योधनाला युद्धापूर्वी भेटायला बोलावताना संपूर्ण नग्न होऊन बोलावले. ती क्षणभर डोळे उघडुन त्याच्याकडे पाहाणार होती ज्यामुळे त्याचं संपूर्ण शरीर लोखंडाचं होणार होतं. पण कृष्णाने हा प्रकार आधीच ओळखुन दुर्योधनाला मध्येच गाठुन मातेकडे जाताना नग्न कसा काय जातोस म्हणुन त्याची चेष्टा केली. तेव्हा दुर्योधन कमरेभोवती वस्त्र पांधरुन गेला आणि त्याच्या मांड्या तेवढ्या कमकुवत राहिल्या अशी कथा सांगितली जाते. एरवी गांधारीबद्दल आदराने बोलण्याची प्रथा आहे. धृतराष्ट्राच्या शारिरीक अंधत्वावर बोलताना तो पुत्रमोहाने आंधळा झाला होता याचा उल्लेख तर न चुकता होतो. पण नवर्‍यासाठी डोळ्यावर पट्टी बांधुन घेतलेल्या गांधारीची गोष्ट तरी नवर्‍यापेक्षा काय वेगळी आहे? पांडवांची बाजु न्याय्य आहे असे जरी तिला वाटत असले तरी युद्धात दुर्योधनाचाच विजय व्हावा अशी तिची इच्छा दिसते. अन्यथा तिने दुर्योधनाला आपल्या तपःसामर्थ्याचं कवच घालुन लोखंडी बनवण्याचा घाट घातला नसता. दुर्योधनाचा विजय याचा दुसरा अर्थ पांडवांचा पराजय किंचा कुठल्यातरी पांडवाचा मृत्यु हे देखिल येथे लक्षात घ्यायला हवं. थोडक्यात धृतराष्ट्राप्रमाणेच गांधारीदेखिल पुत्रामोहाने आंधळीच झाली होती हे म्हणण्यास वाव आहे. आणि हे सर्वात प्रकर्षाने जाणवते ते शेवटी. युद्ध संपल्यानंतर कृष्णाची भेट झाल्यावर गांधारी त्याला शाप देते. नवर्‍याचा पुत्रमोह, मुलांचे प्रताप, त्यांनी पांडवांशी केलेली अन्याय्य वर्तणुक, प्रत्यक्ष सुनेचे राजसभेत केलेले वस्त्रहरण सारं काही विसरुन, अगदी शंभर पुत्र ठार मारलेल्या भीमालादेखिल बाजुला ठेऊन तिची न्याय बुद्धी दोषी कुणाला ठरवते तर श्रीकृष्णाला. वड्याचं तेल वांग्यावर काढण्याचे इतके उत्कृष्ट उदाहरण दुसरे सापडणे कठीण. .

पुढे दुर्योधन कसा मारला गेला हा इतिहास सर्वश्रुत आहे. मात्र त्यात कृष्णाची गदेने मांडीवर प्रहार करण्याची सुचना आणि त्याबरहुकुम भीमाचे वागणे या सर्व प्रकारानेच हा प्रसंग पूर्णपणे झाकोळला आहे. या सार्‍या गोष्टी झाल्या केव्हा तर दुर्योधन गदायुद्धासाठी बाहेर आल्यावर. तोपर्यंत तो पाण्याखाली लपुन बसला होता. तो बाहेर आलाच नसता तर हे गदायुद्ध घडलेच नसते. त्याला डिवचुन बाहेर काढ्ण्याचे श्रेय युधिष्ठीराचे. इरावती कर्वेंनी “युगान्त” मध्ये असा उल्लेख केला आहे कि धॄतराष्ट्राकडुन जर दुर्योधनाला जीवदान देण्याचा निरोप आला असता तर पांडवांचा नाईलाज झाला असता त्यामुळे असा काही निरोप येण्याआधी दुर्योधनाला मारणे आवश्यक होते. एकाचढ एक शस्त्रास्त्रे माहित असलेल्या अर्जुनालादेखिल एखादे अस्त्र वापरुन दुर्योधनाला बाहेर काढता आलं नाही आणि तसा काही उल्लेखही महाभारतात नाही याचा अर्थ दुर्योधन पाण्याखाली संपूर्ण सुरक्षीत होता आणि तो स्वतःहुन बाहेर येइपर्यंत पांडवांकडे वाट पाह्ण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. वाघाच्या गुहेबाहेर उभे राहुन वाट पाहण्याचाच हा प्रकार होता. दुर्योधनाला बाहेर काढणे जरुरी होते. अवघड प्रसंगी युक्त्याप्रयुक्त्या सुचविणार्‍या श्रीकृष्णानेसुद्धा काही उपाय यावेळी सांगितलेला दिसत नाही याचा अर्थ त्यालाही मार्ग सापडत नव्हता. अशा वेळी पुढे सरसावला तो जुगारी युधिष्ठीर. यावेळी त्याने फेकलेले फासे बरोबर त्याच्या बाजुने पडले आणि दुर्योधन अलगत जाळ्यात सापडला. याप्रसंगी धर्म-दुर्योधनामध्ये जो संवाद झाला तो अभ्यासल्यास युधिष्ठीर किती “चलाख” माणुस होता हेच सिद्ध होतं.

युधिष्ठीर हसत हसत म्हणतो,” सुयोधना हे पाण्यात तु अशासाठी अनुष्ठान आरंभलं आहेस? आपल्या कुलाचा नाश करुन स्वतःचा जीव वाचविण्यासाठी तु पाण्यात दडला आहेस काय? येथे येऊन लपुन बसला आहेस तेव्हा तुझा तो पुर्वीचा दर्प आणि अभिमान कोठे गेला? राज्यसभेत सर्वजण तुला शूर म्हणतात पण आता जेव्हा तु पाण्यात दडला आहेस तेव्हा मला तुझे सारे शौर्य व्यर्थ वाटत आहे. कोठे गेलं तुझं पौरुष? कोठे गेला तुझा अभिमान? कोठे गेली तुझी वज्रसमान गर्जना? कोठे गेलं तुझं अस्त्रविद्येचं सारं ज्ञान? उठ आणि क्षत्रिय धर्मानुसार आमच्याशी युद्ध कर. आमचा पराभव करुन पृथ्वीचं राज्य मिळव अन्यथा आमच्या हातुन वीरगतीला प्राप्त हो.” युधिष्ठीराचा प्रत्येक शब्द खोचक आणि वर्मी लागणारा आहे. मात्र त्याचा तत्काळ परिणाम झालेला दिसत नाही. दुर्योधन म्हणतो,” मी प्राणांची रक्षा करण्यासाठी किंवा घाबरुन येथे बसलेलो नाही. मला जरा विश्रांती हवी आहे. तुम्हीही विश्रांती घ्या. मी त्यानंतर तुमच्याशी युद्ध करेन.” युधिष्ठीराला मात्र जराही वेळ दवडण्याची इच्छा नव्हती. तो लगेच म्हणाला.” आमची विश्रांती घेऊन झाली आहे आणि आम्ही बर्‍याच वेळापसुन तुला शोधत आहोत. तेव्हा चल आमच्याशी युद्ध कर.” यानंतर दुर्योधनाने वेगळाच सूर लावला आहे. पांडवांना विजयाचा आनंद धड उपभोगायला मिळु नये यादृष्टीने त्याने उत्तर दिलं असावं. तो म्हणतो,” ज्यांच्यासाठी मला राज्य हवं होतं ते माझे सारे बांधव मारले गेले आहेत. पृथ्वीवरील समस्त शूर क्षत्रियांचा नाश झाला आहे. ही भूमी आता विधवा स्त्रीसमान संपत्तीहीन झाली आहे. म्हणुन तिचा उपभोग घेण्यात मला जराही रस नाही. जेव्हा कर्ण, द्रोण, पितामह भीष्म मारले गेले आहेत तेव्हा माझ्या दृष्टीने आता या युद्धाची काही आवश्यकता उरलेली नाही. आजपासुन ही सारी पृथ्वी तुझी होवो, मला ती नको. मी मॄगचर्म धारण करुन आजपासून वनात जाऊन राहीन. माझे म्हटले जातील असे कुणीच जीवीत नाही तेव्हा मलाही आता जिवंत राहाण्याची इच्छा नाही. आता तु जा आणि जिचा राजा मारला गेला, योद्धे नष्ट झाले, जी संपत्तीहीन झाली अशा पृथ्वीचा उपभोग घे.”

दुर्योधनाने जे चित्र उभे केले ते बर्‍याच प्रमाणात सत्याच्या जवळ जाणारे होते. एखादा ऐरागैरा बावचळुन गेला असता. पण युधिष्ठीर लेचापेचा नव्हता. त्याने दुर्योधनाला लागलीच फटकारले,” मला ही पृथ्वी तुझ्याकडुन दान म्हणुन नको. मी तुला युद्धात जिंकुनच तिचा उपभोग घेइन. तु स्वतःच ज्या पृथ्वीचा राजा राहीलेला नाहीस तिचं दान कसं काय करायला निघालास?” यानंतर त्याने दुर्योधनाच्या सार्‍या पापांचा पाढा वाचुन दाखवला आणि पुन्हा त्याला डिवचले.” चल उठ आणि युद्ध कर. त्यातच तुझं भलं आहे.” हे बोलणे मात्र दुर्योधनाच्या वर्मी लागले. त्याला पांडवांचा संताप येऊ लागला. युधिष्ठीराने बिनतोड उत्तरे देऊन त्याला निरुत्तर केले होते. आता युद्धाशिवाय पर्याय नव्हता. त्याने आता युद्धाच्या दृष्टीने बोलणे सुरु केले,” मी एकटा आणि निशस्त्र आहे तेव्हा मी तुम्हा सार्‍यांशी एकाचवेळी युद्ध असे काय करणार?” युधिष्ठीर पहिली बाजी जिंकला होता. दुर्योधनाला युद्धासाठी त्याने उद्युक्त केले होते. आता त्याने बाहेर येणे आवश्यक होते. युधिष्ठीर पुढे बोलतो,” तुला हवं ते शस्त्र निवड आणि आमच्याशी एकेकट्याने युद्ध कर. आमच्यापैकी एकाला जरी मारलंस तरी सारं राज्य तुझं होईल.” दुर्योधनाने हा प्रकार आता आपल्या बाजुने होत असल्याचा कयास बांधला असावा. कुणाही एकाशी युद्ध आणि त्यातही हव्या त्या शस्त्राने. त्याने अर्थातच ज्यात तो अजिंक्य गणला गेला होता ती गदा निवडली. यानंतर मात्र त्याची जीभ सैल सुटली. मी इंद्राला देखिल घाबरत नाही तर तुम्हाला कशाला घाबरेन अशा वल्गना सुरु केल्या. इथे मात्र युधिष्ठीराने त्याच्या अहंकाराला बरोबर डिवचले. स्वतःच्या शौर्याचा गर्व वाहणार्‍या व्यक्तीला तुल्यबळ प्रतिस्पर्धी हवा असतो. दुबळ्या व्यक्तीला पराभूत करुन त्यांना स्वतःच्या शौर्याचा अपमान करायचा नसतो. युधिष्ठीराने पुन्हा फटकारले,” अरे उठ तर खरा. एकेकाशीच युद्ध करुन आपल्या पौरुषाचा परीचय दे. चल ये माझ्याशीच लढ. आज खुद्द इन्द्राने जरी तुझी साहाय्यता केली तरी तु जिवंत राहु शकणार नाहीस.”

दुर्योधनाच्या पराक्रमाची युधिष्ठीराने ही सरळ सरळ खिल्ली उडवली होती. दुर्योधनासारखा मानी पुरुष हे सहन करणे शक्यच नव्हते. तो त्वेषाने पाण्यातुन बाहेर आला. युधिष्ठीराने दुसरी बाजी जिंकली होती. यानंतरचा इतिहास सर्वज्ञात आहे. दुर्योधन भीमाशिवाय इतर कुणाशीही लढणे शक्यच नव्हते. तो कसाही असता तरी वीर पुरुष होता. त्याला तुल्यबळ प्रतिस्पर्धीच लढण्यासाठी लागला असता. युधिष्ठीराच्या “आमच्यापैकी कुणाशीही लढ” हे आततायीपणाने वचन देण्याबद्दल कॄष्णाने त्याला दोष दिला आहे. मात्र युधिष्ठीराने ही अत्यंत चलाखपणे दुर्योधनाने बाहेर यावे म्हणुन खेळलेली चाल होती असे म्हणण्यास वाव आहे. खुद्द भगवंताला युधिष्ठीराचा कावा यावेळी कळला नाही. तिसरी बाजी अर्थातच भीमाने जिंकली. पांडवांच्या सुदैवाने “मांडीवर गदेचा प्रहार कसा काय करु” असे म्हणुन भीम अडखळला नाही आणि श्रीकृष्णाला दुसरी गीता सांगावी लागली नाही. दुर्योधन मारला गेला. शारिरीक युद्ध भीमाने जिंकले असले तरी या विजयाचा खरा शिल्पकार युधिष्ठीरच.

महाभारतातील चर्चिलेल्या या घटनांमुळे काही प्रश्न मनात डोकावले आहेत. ते या लेखाच्या अनुषंगाने मांडण्याचा प्रयत्न आहे. युद्धाचे नियम दोन्हीकडुन मोडले गेले. एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न दोन्ही पक्षांकडुन सातत्याने झाले. त्यासाठी त्यावेळी जो योग्य वाटेल तो उपाय योजला गेला. महाज्ञानी आणि महापराक्रमी भीष्माने मृत्युशय्येवर युधिष्ठीरासारख्या ज्ञानी माणसाला शांतीपर्वात तत्वज्ञान सांगितले पण स्वयंवरातुन बळजबरीने काशीराजाच्या कन्या हरण करताना हे तत्वज्ञान आड आलेले दिसत नाही. द्रोणासारखा योद्धा पराभूत होत नाही म्हणुन त्याजवर मुलाच्या मृत्युची खोटी बातमी सांगुन दबाव आणताना श्रीकृष्ण नि:शंक असतो. पुढे हा बनाव यशस्वी होत नाही हे पाहिल्यावर भीम द्रोणाची स्वधर्माची दुखरी नस दाबतो आणि त्याला शस्त्रत्याग करायला भाग पाडतो. शस्त्रत्याग करुन स्वस्थ बसलेल्या माणसाला धरुन आणावे असे अर्जुनाचे मत असताना धृष्टद्युम्न त्याचे डोके उडवतो. पुढे युधिष्ठीर चलाखिने दुर्योधनाला पाण्याबाहेर काढुन अधर्माने भीमाकडुन मारवतो. या सार्‍या घटना नीट पाहिल्या तर हा प्रश्न पडतो को महाभारतात सांगितलेलं तत्वज्ञान आहे तरी नक्की कुणासाठी? कारण कुणीही ते पाळलेले दिसत नाही. शेवटी तत्वज्ञान हा दुबळ्यांचा धर्म आहे काय? श्रीकृष्णाने प्रत्येकवेळी तत्वज्ञानाचा सोयीस्कर अर्थ लावलेला दिसतो. याचा अर्थ आपदधर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे काय? जीव वाचविण्यासाठी खोटे बोलावे, विजय मिळविण्यासाठी युद्धाचे नियम मोडावे, बाहुंत बळ असेल तर सारे तत्वज्ञान काखोटीला बांधुन मुली पळवाव्यात. म्हणजे शारीर बळ हेच शेवटी वरचढ ठरते काय? वरवर पाहता असे वाटते कि “बळी तो कान पिळी” हा नियम प्राचिन काळापासुन चालत आलेला दिसतो.

मात्र दुसर्‍या बाजुने पाहीले तर तत्वज्ञानाची बाजुदेखिल वरचढ दिसते. मी शाल्वाला मनाने वरले आहे म्हटल्यावर भीष्म अंबेला शाल्वाकडे परत पाठवतो. येथे त्याने शक्य असुनदेखिल बळजबरी केलेली नाही. भीमाने ब्रह्मणधर्म न पाळल्याबद्दल द्रोणाला दोष दिला त्यावेळी शस्त्र त्याग करण्याइतका त्याच्या बोलण्याचा परिणाम झाला. याचा अर्थ स्वधर्माने वागण्याला त्या काळात नक्कीच खुप किंमत होती. आपापला धर्म पाळावा, धर्माने सांगितलेली नीतीत्त्वे पाळावीत असा विचार समाजात प्रभावी होता. युधिष्ठीर खोटं बोलला असेल मात्र समाजात सत्यवचनी माणसे असतात. काहींचा त्यांच्यावर विश्वास असतो अशी परिस्थीती होती. द्रोण युधिष्ठीराकडुन अश्वत्थाम्याच्या मृत्युबद्दल खात्री करुन घेणार याची कृष्णाला कल्पना होती, इतका युधिष्ठीर सत्यवचनी होता आणि खरं बोलण्याला इतका मान होता. दुर्बलाशी लढुन निसटलेला विजय पुन्हा मिळण्याची शक्यता असताना तुल्यबळाशीच लढायचं हे नीतीतत्व समोर विनाश दिसतानाही दुर्योधनाने पाळलेलं दिसतं. हे सारं काय दर्शवतं? शारीरबळापेक्षा नीतीतत्वे आणि तत्वज्ञान महत्वाचे नाही काय? कारण या प्रत्येक माणसाने, तो भीष्म असो कि द्रोण कि दुर्योधन, नीतीतत्वाचं पालन करुन जीव गमावला आहे. मग तत्वज्ञान महत्वाचे नाही काय?

कि शारिरीक बल, तत्वज्ञान यापेक्षा बुद्धीबलाचा विजय झाला आहे? तत्वज्ञान पाळण्यापेक्षा तत्वज्ञानाचा प्रत्येक वेळी वेगळा अर्थ लावण्यात श्रीकृष्णापेक्षा वरचढ महाभारतात कुणीही नाही. तत्वज्ञानाचा आपद्धर्म म्हणुन वेगळा अर्थ लावणे याला बुद्धीबलच आवश्यक आहे. द्रोणवधात आणि दुर्योधनाला भीमाकडुन मारवताना कृष्णाने नेम़कं हेच केलं. भीमाने तर तत्वज्ञानाचा वापरच द्रोणाला नेस्तनाबुत करण्यासाठी केला. युधिष्ठीरानेही दुर्योधनाला पाण्यातुन बाहेर काढण्यासाठी बुद्धीचाच वापर केला. याचा अर्थ शारीर बलापेक्षा आणि नीतीत्वापेक्षा बुद्धीच वरचढ असते काय?

शेवटी कुठल्याही परिस्थीतीत विजय मिळविण्यासाठी, जीव वाचविण्यासाठी जे काही करावे लागेल ते योग्यच असा सरधोपट अर्थ यातुन काढला तर तो आततायिपणा ठरेल. मात्र माणसाने संकटात करावे तरी काय? कुठलाही उपाय योजुन जीव वाचवावा? कि तत्वपालन करुन मरावे? हा प्रश्न मला आजच्या काळाला लावावासा वाटतो. आजच्या संघर्षात टिकुन राहावे कि तत्व पालन करुन बाजुला फेकले जाणे पसंत करावे? कि महाभारतानंतरच्या शेकडो वर्षाच्या काळात जगाने काही वेगळा उपाय या समस्येवर शोधला आहे? महाभारताकडे पाहताना “तत्व कि अस्तित्व” हा मला पडलेला गहन प्रश्न आहे.

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उदयन
कृष्ण स्थिर का आहे ?
आधी,स्थिर कोण असतो ?
ज्याच्यात वैचारिक गोंधळ नसतो तो.
म्हणजेच ज्याच्यात भल्याबुऱ्याचा नीतीअनीती योग्यायोग्य विवेक ठाम असतो तो.
जो विपदांमध्येही आपला नेतृत्वगुण गमावत नाही तो , त्यामुळे त्याच्या अवतीभोवतीचे लोक त्याच्यावर नि:शंकपणे विसंबू लागतात.
तो पांडवांच्या पक्षात आहे. दोन्ही बाजूंना चलाख माणसे आहेत . कटकारस्थाने दोन्ही बाजूंनी झालीत.कोणताच पक्ष पूर्ण निर्दोष नाही.तरीही विजयश्री कृष्णानेच खेचून आणली आहे. सर्वांचे अन स्वत:चेही सर्वस्व गमावून.युद्धाने कुणाचेच भले होत नाही याची पूर्ण जाणीव असताना असंतोषाच्या ज्वालामुखीचा भडका उडणे अटळ हे नक्की झाल्यावर शांतपणे व्यूहरचना करणारा कृष्ण.

त्याला कोणताही भ्रम नाही म्हणून तो स्थिर आहे.

विनाकारण कुरापतखोर पोस्टी टाकू नका, झक्की.

आँ?!
ही मायबोली आहे हेच तर मोठे कारण आहे, विनाकारण कसे?

असेच असते इथे. गेली दहा वर्षे बघतो आहे, कुठल्याहि चर्चेत विषय बदलून काहीतरी लिहायचे नि जाम भांडा भांडी करायची. हसत खेळत गंमत म्हणून काहीच नाही. इथे काय लिहीले ते सगळे लोक वाचून विचार करत असते तर आत्तापर्यंत कुणालाच वाद घालायची गरज उरली नसती. इतकी '' अंतिम '' सत्ये इथे मांडण्यात आली आहेत. कुठलेहि निवडा.

भारतीताई,

>> त्याला कोणताही भ्रम नाही म्हणून तो स्थिर आहे.

१००% अनुमोदन. अगदी गांधारीचा निर्वंशतेचा शाप लागल्यावरही श्रीकृष्ण शांतपणे दुसर्‍या संहाराची (यादवीची) शक्यता वर्तवतो.

आ.न.,
-गा.पै.

भारतीताई,

अतिशय संयत प्रतिसाद, नेमक्या शब्दात अचूक उत्तर.. आवडलं... Happy

प्रत्येक जण आपापल्य परिघात काही नियम, तत्त्व ठरवून घेत असतो.. जनरलाय्झेशन करून बघितलं तर ती सारी तत्त्वे थोड्यफार फरकाने सगळ्यांची सारखीच असतात.. आजच्या काळात जो ही तत्त्व उ राशी कवटाळतो तो बावळट / रिजिड /स्वत।चे नुकसान करून घेणारा ठरतो, तर जो या तत्त्वांना स्वतह्च्या/ सर्वांच्या सोयीनुसार मुरड घाल्तो तो "चलाख"... कृष्णाने तेच केलं..

उदयन यांचा प्रतिसाद पण मस्त.. एकदम अ‍ॅप्ट...

महाभारतात प्रत्येक व्यक्ती आत्मशोधाच्या आणि अनुषंगाने प्रतिशोधाच्याही अग्नीत जळते आहे. एक कृष्णच स्थिर आहे, कधीही गडबडलेला दिसत नाही म्हणून विचारांचं ध्रुवीकरण होतं त्याच्याभोवती.>>> मस्तच.

त्याला कोणताही भ्रम नाही म्हणून तो स्थिर आहे. >>>>

अंशतः आपल्याला पाठींबा......

मी महाभारत हे देवांचे कार्य.... म्हणुन कधीच बघत नाही...मी नास्तिक आहे म्हणुन नाही तर तो इतिहास आहे म्हणुन.. प्रॅक्टिकली विचार करावा...धर्माची थिअरी न मांडता प्रॅक्टिकली काय करेक्ट आहे हे बघावे.. उगाच प्रत्येक गोष्टीला धर्माच्या पॅकिंग मधे गुंडाळुन प्रेजेंट करु नये. त्याकाळात हिंदु या नावाचा धर्मच नव्हता उल्लेखच नाही.. त्यामुळे इतर बाबी ज्या महाभारतात शामिल केलेल्या आहेत त्यानंतरच्या काळात असाव्यात.. गीताचा उल्लेख देखील कोणी वर म्हणतल्याप्रमाणे नंतर समावेश केलेला आहे. (खरे काय खोटे काय) परंतु मी मानतो की गीता ही महाभारताच्या वेळेसच सांगितली गेली आहे.. त्यावेळेला त्या उपदेशाची नक्कीच गरज होती..प्रॅक्टीकली अर्जुन जेव्हा सैरभैर झाला तेव्हा त्याला ताळ्यावर आणण्याकरीता काहीतरी उपाय केलाच असणार..त्याचे संपुर्ण मन डोके सगळे ब्रेनवॉश करण्याकरीता गीता सारखे दुसरे काहीही नाही.. (हे गीता वाचणारे सुध्दा मान्य करतील)..

त्यावेळेस जर सगळे मनुष्य रुपी असतील तर ते मनुष्य स्वभावानुसारच प्रतिक्रिया करणार ... मग जर कृष्ण देखील मानवरुपात असेल तर तो सुध्दा यातुन वाचणार कसा ??????? काहीतरी नक्कीच असेल ना ??
की काहीभाग काळानुसार वगळला गेला आहे ??????
जसा महाभारतानंतर कृष्णाचा कुठेच उल्लेख नाही. यादवी झाल्यावर कृष्णाने देह त्याग केला .. नंतर च्या काळात कृष्णाला देवत्व बहाल केले गेले असावे.. कारण तो अचानक नाहीसा झाला असेल आनि नंतर लिहिताना देहत्याग वगैरे जोडले गेले असावे..कारण आपल्या भारतीयांना एक वाईट सवय आहे ( हे सगळ्यांच्याच बाबतीत आहे परंतु आपण भारतीय जास्तच).....ज्या गोष्टीचा शोध लागला नाही त्याची चिकित्सा न करता लगेच त्याला देव मानायला लागतात ...जरा काही घडले तर लगेच देव...

महाभारत "देव" काढुन परत वाचा.......बर्याच गोष्टींचा नव्याने शोध लागेल

उदयन..,

>> त्याचे संपुर्ण मन डोके सगळे ब्रेनवॉश करण्याकरीता गीता सारखे दुसरे काहीही नाही..
>> (हे गीता वाचणारे सुध्दा मान्य करतील)..

तुमच्याशी (चक्क) सहमत! फक्त ब्रेनवॉश हा शब्द थोडासा खटकला. अर्जुनाचा मेंदूच मुळी थार्‍यावर नव्हता तर ब्रेनवॉश करणार कसा! Happy माझ्या मते Geeta is one of the best sales pitches the world ever knew.

हे आर्जवभाष्य (sales pitch) चालू असतांना पुढे अर्जुनाने काही प्रश्न विचारले. म्हणून श्रीकृष्णास तत्त्वज्ञान (भक्तियोग, कर्मयोग, दैवी संपत्ती, आसुरी संपत्ती इत्यादि) वर्णन करावे लागले. अन्यथा गीतेचं मूळ उद्दिष्ट आर्जवप्रावृत्तिक (motivation by convincing) आहे.

बाकी, तुमचा इथला प्रतिसाद आवडला.

आ.न.,
-गा.पै.

गामा ..शांत पणे .. डोक्यातुन "देव" संकल्पना काढुन मग "ब्रेन वॉश" हा शब्द वरील वाक्यातील वाचा... कृष्णाने त्याला त्याच्याच भावंडाविरुध्द लढायला लावले होते..हत्यादेखील.. हे सगळे ब्रेनवॉश केल्याशिवाय शक्यच नाही..
जेव्हा थिंकिंग संपली जाते तेव्हा हे शक्य असते

अर्जुन हा त्याकाळातला पृथ्वीवरील एक अजय योध्दा होता हे विसरु नका.. त्याची बौध्दिक शक्ती १०० कौरव आणि ४ पांडवांपेक्षा कित्येक पटीने अधिक होती......अश्या बौध्दिक शक्तीला वेसन घालण्याची अवघड कामगिरी कृष्णाने केली आहे.. जर ऐन युध्दात त्याच्या भावनांनी परत डोके वर काढले असते तर त्याने युध्दात हवीतशी कामगिरी केलीच नसती.. त्याने शस्त्रच खाली ठेवले असते... मग परत "गीता" सारखे सांगायला कृष्णाकडे वेळ होता का ? नाहीच......म्हणुनच गीताच्या माध्यमातुन कृष्णाने अर्जुनच्या मनातले डोक्यातले सगळे सगळे वॉश करुन टाकले आणि एकच रोप रुजवले युध्दाचे.... धर्माकडे बघु नकोस नात्यांकडे बघु नकोस.. ते कोण आहे ते सगळे विसर ..तुझे एकच लक्ष्य आहे युध्द.....आणि युध्द........अर्जुन चा सगळा फोकस युध्दाकडेच वळवला... कृष्णाने

ह्यँ!
कस्चं कस्चं!!
अक्खी गीता वाचून त्या बेण्याच्या डोस्क्यात काय प्रकाश पडंना वो..
पल्डा हुता का?

मंग शेवटाला ते भगवंतांनी त्वांड उघाडलं पगा!
आन दाखिवलं इस्व रूप दर्सन.
ग्रह, तारे, हजारो सूर्य चंद्र तारे सगळेच फिराया लागले की अर्जुनाच्या ड्व्याल्यासमोर..

इत्कं आठरा अद्याय तत्व चिंत क्येलं, तरी अजाबात आइकित न्हव्तं बेणं. मं भगवंतांनी मस्तपैकी येक मुस्काटीत भडकावली.. 66.gif
चांदण्या चमक्ल्या अस्तीन ड्वाल्यासमोर. दिस्लं इस्वरूप...

त्येवा कुटं गांडीव धर्लं पार्थानं हाती आन सुरू झालं --->

म्हाऽभाऽरतऽ...
म्हाऽभाऽरतऽ..
म्हाऽभाऽरत!!!

महाभारत "देव" काढुन परत वाचा.......बर्याच गोष्टींचा नव्याने शोध लागेल

अतिउत्तम विचार.
अत्यंत इंटरेस्टिंग गोष्ट आहे. त्या काळात देव, धर्म सगळ्यात महत्वाचे होते म्हणून त्यांचा सतत उल्लेख येतो.

आजकालच्या जगात, कायदा, धंदा इ. ना जास्त महत्व आहे.
आज आपण अश्या गोष्टी वाचल्या तर समजते की गोष्टीत तसा कायदा आहे म्हणजे त्या गोष्ट लिहिणार्‍या माणसाने केलेला, सांगितलेला कायदा. गोष्टीतले लोक तो मानत असतील, तर आपण कशाला भांडा, की त्यांचे बरोबर की चूक?

तसेहि आजकाल धर्म, कायदा नीतिमत्ता गुंडाळून ठेवून जग चालते, तेंव्हा जरा कमी प्रमाणावर असेल.पण म्हणून ते आदर्शच होते असे नाही. अर्थात अनेक गोष्टी अनुकरणीय आहेत, पण का ते स्वतःचे स्वतः ठरवा. कुणाला कृष्ण आवडेल, कुणाला शकुनि!

उदयन..,

>> गामा ..शांत पणे .. डोक्यातुन "देव" संकल्पना काढुन मग "ब्रेन वॉश" हा शब्द वरील वाक्यातील वाचा...
>> कृष्णाने त्याला त्याच्याच भावंडाविरुध्द लढायला लावले होते..हत्यादेखील.. हे सगळे ब्रेनवॉश
>> केल्याशिवाय शक्यच नाही..जेव्हा थिंकिंग संपली जाते तेव्हा हे शक्य असते

तुमच्या युक्तिवादाचं आकलन व्हावं म्हणून एक गोष्ट अधिक सूक्ष्मपणे जाणून घ्यावीशी वाटते. देव या शब्दात तुम्हाला काय अर्थ अभिप्रेत आहे? एकदा ते नक्की झालं की त्या देवपणाला दूर ठेवेन. Happy

हाच प्रश्न मी या बाफकर्त्याला विचारला होता.

तुम्हा दोघांची मतं ऐकायला आवडतील.

आ.न.,
-गा.पै.

उत्तम लेख, विचारांना चालना देणारा ..

झक्की
>>गोष्टीतले लोक तो मानत असतील, तर आपण कशाला भांडा, की त्यांचे बरोबर की चूक?
+१

देव या शब्दाचा मला अभिप्रेत असलेला अर्थ सर्वशक्तीमान असा आहे. त्याचे मी महाभारताच्या आणि विशेषकरुन श्रीकृष्णाच्या संदर्भात उत्तर देतो. मला चटकन पुढील दोन घटना आठवत आहेत.

१. द्रौपदीला ऐनवेळी वस्त्रे पुरवणे

२. जयद्रथ वधाच्या वेळी सुर्याला झाकुन तात्पुरती संध्याकाळ करणे

या दोन्ही गोष्टी सर्वसामान्य माणसाला शक्य नाहीत. काही अतिमानवी किंवा अतिंद्रीय शक्ती असलेल्यालाच हे शक्य आहे. त्या अर्थी श्रीकृष्ण हा देव.

मात्र पुढील घटना त्याचे माणुसपण दाखवतात.

१. जयद्रथ प्रतिज्ञेच्यावेळी अर्जुनाच्या काळजीने आदल्या रात्री कासावीस झालेला श्रीकृष्ण.

२. आमच्यापैकी कुणाशीही लढ आणि जिंकल्यास राज्य तुझे असे आश्वासन युधिष्ठीराने दिल्यावर त्याला दोष देणारा श्रीकृष्ण.

३. गीता सांगुनही पार्थाला अजुनही भीष्माशी दारुण युद्ध करता येत नाहीय हे पाहुन संतापाने आपली प्रतिज्ञा मोडुन भीष्मावर शस्त्र घेऊन धावुन गेलेला श्रीकृष्ण.

४. घोड्याला खाली बसवुन कर्णाचा बाण चुकवणारा श्रीकृष्ण

अशा अनेक घटना सांगता येतील. मात्र श्रीकृष्णाकडे असामान्य अशी बुद्धीमत्ता होती आणि तो तितकाच शुर देखिल होता. सर्व कौरव पांडवांना आदरणिय अशा भीष्मानेदेखिल स्वतःहुन अग्रपुजेचा मान श्रीकृष्णाला द्यावा हे सुचवलं यातच सारं आलं. श्रीकृष्ण हे त्याकाळचं अफाट व्यक्तीमत्व असणार.

अवान्तरः चित्रपटात शाहु मोडक यान्च्यानन्तर नितीश भारद्वाज यानी खर्‍या अर्थाने श्रीकृष्ण सादर केला. यासम हाच! कलाकाराना यशापयशानन्तर क्षणात आकाश पाळण्यात आणी क्षणात धरतीवर असे चमत्कार दाखवणार्‍या भारतीय जनमानसावर राज्य करणे सोपे नव्हते, या दोघानी ते सोपे केले.

तुमच्या युक्तिवादाचं आकलन व्हावं म्हणून एक गोष्ट अधिक सूक्ष्मपणे जाणून घ्यावीशी वाटते. देव या शब्दात तुम्हाला काय अर्थ अभिप्रेत आहे? एकदा ते नक्की झालं की त्या देवपणाला दूर ठेवेन>>>>>>>

देव म्हणजे तुम्हाला अभिप्रेत असलेलाच देव.. आपण देवात काय शोधतो..? सुख मिळाले तर आपले दु:ख मिळाले तर त्याचे.. ? चमत्कार अलौकिक केलेली कामे यामागे तर्कशास्त्र न लावता सरळ समोरच्याला देवत्व बहाल करणे .. खरे काय खोटे काय याचा सारासार विचार न करता ..स्वतःची विचारशक्ती गहाण ठेवुन तो जे म्हणेल तेच खर. हे मानत जाउन त्याच्या उदोउदो करणे.. समोरचा असेल ही अलौकिक शक्ती धारण करणारा परंतु त्याच्यावर आयुष्यभर अवलंबुन कितपत राहावे ? तुम्ही स्वतः काही कराल की नाही ?
कोणी चमत्कार हातातुन सोने वगैरे काढुन दाखवले तर तो देव झाला ? नाही ना..... तुम्ही आजच्या या जमान्यात अश्या लोकांना देव मानत नाही (काही जण मानतात तो भाग वेगळा) परंतु बहुसंख्य लोक आज अश्या लोकांवर विश्वास ठेवत नाही परंतु तीच बहुसंख्य लोक आदिकाळातुन "देव" संकल्पना मानत आलेले आहेत..हा विरोधाभास का ?

आजच्या या काळात कृष्ण, राम, लक्ष्मी, शंकर, गणपती , यांनी कुठे चमत्कार प्रत्यक्ष घडवुन आणलेत का ? त्यांनी जे केले ते पुरातन काळात केले.. जे काही केले ते वेद , साहित्या यातुन आपल्या समोर आहे..कोणी प्रत्यक्ष बघितले का ? नाही.........तरी सुध्दा आपण (यात मी सुध्दा आलो अंशतः ) त्यांना देव मानतो त्यांची पुजा करतोच ना...... उद्या मी देव मानला नाही.. शंकर यांना मानले नाही....फक्त कृष्ण भक्ती केली तर मला शंकर यांनी काही नुकसान केले का ? नाही केले. या मी कोणत्याच देवाला मानले नाही तर माझ्या आयुष्यात बदल झाला ? माझे नुकसान झाले ? नाही........ जर मी मानले आनि नाही मानले यात माझ्या जीवनात काहीच बदल संभवत नाही...... मग मी माझ्या स्वतःवरच विश्वास का नाही जास्त ठेवु ......?

माझ्या घरी "गणपती" बसतात.. मी त्यासाठी कंपनीतुन भांडुन वगैरे १० दिवसाची सुट्टी घेतो...३ दिवस आधी आरास करतो.. गणपती स्वतः घेउन येतो.. घरी ठेवतो.. घरचे पुजा करतात .. मी ५ ही दिवस गणपती समोरच असतो. घरातुन बिल्कुल बाहेर पडत नाही.....
पण मी ५ दिवस पुजा करत नाही गणपतीची..... शेवटच्या दिवशी गणपती उचलताना पुजा करतो.. बस..
आता मी पुजा केली नाही म्हणुन माझे नुकसान झाले का ? नाही..

वर्षभर मंदीरात सुध्दा जात नाही . सकाळी देवाला नमस्कार सुध्दा नाही.. फक्त येता जाता मंदीर दिसले तर हात जोडले जातात ( लहानपणीची सवय) ... ऑफिसातले म्हणतात देवाला साधा नमस्कार करत नाही तर गणपतीसाठी १० दिवस सुट्टी का घेतोस ? ..

मी देवाला देवासारखाच ठेवला आहे... त्यांनी त्यांचे काम चोख केलेले आहे.. मला माझ्या आयुष्यात मला असलेली कामे मलाच करायची आहेत त्यासाठी देव येणार नाही आहे... मी ऑफिस ला दांड्या मारल्या तर देव चमत्कार करुन पगार न कट करता हातात देणार नाही Wink मग माझ्या रोजच्या आयुष्यात देवाची जागा कुठे ?? त्याची काय कामगिरी ?? शुन्य..... देवाला मनात ठेवले फक्त... तो तिथे आहे .. त्याला तिथेच ठेवतो..बाहेर च्या जगात मी असतो... त्याला बाहेर च्या जगात आणुन काही उपयोग नाही हे मी जाणले आहे..

.(का कसे..?? हर एक के फंडे होते है... मेरे भी है..) ..

माझ्यासाठी "देव" वेगळा "देवाची संकल्पना" वेगळी.........मी देवाची संकल्पना मानत नाही... "देव" आहे पण तो स्वतःच्या जागी आहे.. त्याने त्याच्या आयुष्यात बरीच कामे केली आहे.. त्याने त्याची कामे पुर्ण केली . आता माझी वेळ आहे काम करण्याची... मग उगाच कशाला मी त्याच्या भरोसे राहु ...

------------------

कृष्ण , राम , यांनी मानव जन्म घेतलेला......स्वतःचे कार्य पुर्ण करण्याकरीता.....रामाच्यावेळेला देवाला भविष्याच्या घटना सरळ क्रमात ठेवण्यासाठी स्वतःला उतरावे लागले......
महाभारताच्यावेळी त्याचा काही कामच नव्हते परंतु जे होणार होते ते तसेच होण्याकरीता इतरांना त्या दृष्टीने कार्य करण्यास भाग पाडण्यासाठी "कृष्ण" बनावे लागले.......
त्यांचे ते कार्य संपुर्ण झाल्यावर ...... पुढे कुठे कुणाला "राम", "कृष्ण" यांची गरज भासली ? भविष्यात ?
कोणत्या राजाला राज्य जिंकायला गरज लागली कृष्णाची ? .. कोणत्या रावणाला संपवण्यासाठी रामाची गरज लागली का ??????? नाही अजिबात नाही.. .. का ????????? भविष्य सुरळीत झालेले होते...जसे चालु ठेवायचे होते तसे चालु आहे...... म्हनुन कुणाला नंतर देवाची गरज भासली नाही.......

पण "देव या संकल्पनेची" गरज मात्र सगळ्यांना भासली..........

कुणाला भिती म्हणुन लागली.. तर कुणाला इतरांना दाबवण्यासाठी... खरे तर "देव संकल्पना" हे समाजाला भिती .दाखवण्यासाठी तसेच समाजातील इतरांना . दाबण्यासाठीच जास्त निर्माण झाली.......कर्मकांड स्तोम इत्यादी इत्यादी या संकल्पनेतुन जन्माला आले....

काही लोकांनी इतरांना देव नाही तर देव या संकल्पनेची भिती घातली आहे...जी पुर्वीपासुन चालत आली आहे..

इस्कॉन मंदीरात गेलेलो.... मंदीर बघत असताना ..एका व्यक्तीने माळा दिली जपायला... माळा जपली.. जपल्यावर त्याला द्यायला गेलो तर त्याने परत बसवले...वर म्हणाला " श्रध्देने मोज परत .. या आधी श्रध्देने मोजली नाहीस...पाप लागेल तुला.. मोज परत" असे बर्याच जणांना केले.. मी देखील .चला वृध्द व्यक्ती म्हनते ना तर मोजु..आपले काय बिघडणार आहे का ? त्याचे मन राहील..त्यांच्या शब्दाला मान राहील..

परत तेच.. झाले ..श्रध्देने नाही मोजत तु.. मग बोललो त्याला .... बाबा.. मी या तुमच्या देवालाच मानत नाही तर मनात श्रध्दा कुठुन आणु....... तुमचा मान राखण्यासाठी परत मोजलो होतो.. मला तुमचा आदर होता म्हणुन.. .. मला कृष्ण नाही बोलला कधी की माळ मोजावीच लागेल.. ते ही श्रध्देने.........."

यांनी देवाची नाही तर देव या संकल्पनेचे स्तोम समाजात माजवलेले आहे...... त्याची भिती घातली आहे...

हेच सेम मशिदीत सुध्दा..........कबुल है कबुल है बोलायला लावले आणि डायरेक्ट १००० रुपयाची मागणी केली..मी विचारले कसले १००० ? तर म्हणाले अरे आताच कबुल केले . अल्ला ला मी१००० ची चादर भेट करेन..

मी म्हणालो तु बोलला कि बोल कबुल है.. मी बोललो कबुल है.. तुझ्या मनात काय होते मला काय माहीत ...
असे असेल तर मी मनात धरले होते की तु मला १०००० रोख देणार आहेस अल्ला ने च्या वतीने हे कबुल है म्हणत आहेस... दे तु आता.....१०००० रुपये....... " बसला शांत...

हे जे देवसंकल्पनेचे उदो उदो चालु आहे ना..........तो मनातुन काढा........कोणत्याच देवाने अलौकिक कार्य केले नाही आहे... त्याच्या क्षमतेत जे होते तेच केले आहे......तेव्हाची क्षमता मानवाची प्रचंड होती.....आता नाही आहे

सचिन ने इतकी शतके इतके रन्स बनवले आहे की येत्या २००-५०० वर्षात त्याला देखील देव मानायला सुरुवात करणार आहेत लोक....... त्याकाळात मानवाची क्षमताच राहणार नाही इतके काही करण्यास..

पुढे कुठे जातात...मागे या काही शतके.. शिवाजी महाराजांची, इतर महाराजांची तलवारीचे वजन बघा...३०-४० किलो... लोकच होतीत ना ती तुमच्या आमच्यासारखी .... आजच्या लोकांना सांगा इतक्या वजनाची तलवार घेउन एका हातात घोड्यावरुन १० किमी धावा......भलेभल्यांची क्षमता नाही आहे... त्यांचे कार्य निश्चितच अतिमहान आहे.. परंतु त्यांनी ते केले त्या काळात करुन दाखवले...

"देव संकल्पना" बाजुला ठेवा..... आणि खर्या देवाला मनातच राहु द्या........

परत एकदा मूळ विषयाकडे -
तत्व की अस्तित्वाची लढाई?

तर अस्तित्वाचीच लढाई, पण काही तत्वानुसार. ही तत्वे म्हणजे पांडवांच्या बाजूने असतील ती सगळी बरोबर नि विरुद्ध पक्षाची चूक. नि तसे आपल्या मनावर हजारो वर्षे ठसवणारे महापुरुष चलाख.

असे माझे मत आहे,

कुणा प्रतिभावान लेखकाने, तत्व, धर्म, किंवा देव हे शब्द न घेता देशकालमान परत्वे कायदा, परंपरा, देशहित इ. 'तत्वे' वापरून अशीच एक गोष्ट लिहीली तर वाचायला आवडेल. मग त्या गोष्टीतले जे जिंकतील ते जिंकतील. कदाचित त्यातले महापुरुष चलाख नसतील तर आपल्याला हरणार्‍यांबद्दल साहानूभूति वाटेल. मग चलाख वागणारा महापुरुष होता की खलनायक अशी चर्चा करता येईल.

ही तत्वे म्हणजे पांडवांच्या बाजूने असतील ती सगळी बरोबर नि विरुद्ध पक्षाची चूक. नि तसे आपल्या मनावर हजारो वर्षे ठसवणारे महापुरुष चलाख. <<<<<<<

झक्की साहेब............... इतिहास विजेते लिहितात.....हे विसरु नका......

उदयन प्रतिसाद आवडला... खुप प्रामाणिक वाटला. देव या संकल्पनेबाबत तुमचे विचार पटतात. इव्हन मी देखील बराचसा असाच विचार करते. आधीच्या पोस्टमध्येदेखील हेच सांगायचा प्रयत्न केला.

मला वाटते देव म्हणजे मनुष्यासमोर असणारा असा एक आदर्श ज्याच्या सारखे आपणदेखील बनावे, त्याचे जसे विचार आहेत तसेच विचार आपल्यालाही सहजपणे करता यावेत, त्याच्यासारखे शौर्य, धैर्य, बुद्धिमत्ता आपल्यात असावे असे वाटणे. पारंपारिकरित्या ज्यांना आपण देव मानतो त्यांच्यामध्ये असे काहीतरी आदर्श नक्कीच आहे जे आपल्याला आवडते. कदाचित इतक्या वर्षांच्या प्रभावाने ते गुण आत्मसात करायचे सोडुन लोक फक्त वरवरची भक्ती, अवडंबर दाखवतात. शिवाजी महाराजांना देव मानुन फक्त हार-तुरे घालणारे जसे आहेत तसेच त्यांनी दाखविलेला शौर्याचा, युद्धनितीचा अभ्यास करुन पुढे जाणारे देखील आहेत. कोणाकडुन काय घ्यायचे हे सर्वस्वी तुमच्या स्वतःच्या विचारशक्तीवर अवलंबुन आहे. जे उच्चपदाला पोचलेले संत होते त्यांच्या तोंडी बरेचदा असे वाक्य असते कि देव शोधायला गेलो व देव बनुन गेलो किंवा अरे अरे ज्ञाना झालासि पावन, तुझा तुची देव तुझा तुची भाव.

पण आता झालय काय हिंदु लोक कृष्णाने कशी रासलीला केली मग आपणही करुया म्हणजे कृष्णाचे इतर गुण राहिले बाजुला, जे सोयिस्कर आहे, सहज आहे, ज्यात काही त्रास नाही ते फक्त घ्यायचे. मुस्लिम, ख्रिस्ती त्यांच्या धर्माची किंवा त्यांच्या देवाने ( त्यांचे आदर्श स्त्री-पुरुष) सांगितलेली चांगली तत्वे सोडुन फक्त धर्मप्रसार करणे ( यात खरे तर चांगल्या विचारांचा प्रसार करणे) हे पुण्यप्रद आहे असे मानुन त्यासाठी एखादयाचा जीव गेला तरी बेहत्तर पण असे करणे म्हणजेच जन्नतच्या राज्यात प्रवेश करणे समजतात. देव म्हणुन ज्यांना मानले त्यांच्या विचारांच्या, कार्याच्या नेमके विरुद्ध काम करणे व हे कर्मकांड करणे म्हणजेच देवास प्राप्त करणे असे समजतात.

आताच्या बुद्धीजीवी लोकांचे आदर्श नविन शिक्षणामुळे वेगळे आहेत. ते या प्रकारचे देव मानत नाहीत. पण नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यात कसलातरी आदर्श जपताच. मग तुम्हाला चांगले वागायला, तुमचे एखादे काम होण्यासाठी देवाची गरज लागत नाही तर तुम्ही ज्या विचारांवर श्रद्धा ठेवलेली असते ते विचारच तुम्हाला आयुष्यभर सोबत करतात. तेच तुमच्या आयुष्यात देवाची जागा घेतात.

असो पुन्हा वरील चर्चेच्या अनुषंगाने पोस्ट लिहीली आहे. योग्य नसेल तर कृपया दुर्लक्ष करणे.

अतुल ठाकूर,

आपल्या इथल्या प्रतिसादात आपण जी देवाची लक्षणे दिली आहेत ती वाचली. सर्वसाधारण मानवाला न करता येणारे चमत्कार करणारा तो देव अशी तुमची समजूत दिसते. केवळ चमत्कारक्षमता बाळगणे म्हणजे देव नव्हे. कारण की चमत्कारांवर भरवसा ठेवू नये असं संतांनी बजावलं आहे. देव म्हणजे चमत्कारांपेक्षा अधिक काहीतरी आहे.

तो वेगळेपणा मानवी स्वरूपात व्यक्त होण्यासारखा नसेल तर कोणीच देव नाही, असा निष्कर्ष काढावा लागेल.

आ.न.,
-गा.पै.

उदयन..,

तुमचा इथला प्रतिसाद वाचला. मला काय वाटतं ते सांगतो.

१.
>> तुम्ही स्वतः काही कराल की नाही ?

मानवी प्रयत्नांना मर्यादा आहेत. शिवाजीमहाराजांना दर वेळेस भवानीमातेचा आशीर्वाद का घ्यावासा वाटला? त्यांचं नियोजन तर चोख होतं ना?

२.
>> मी या तुमच्या देवालाच मानत नाही तर मनात श्रध्दा कुठुन आणु

श्रद्धा नसेल तर देवळात जाण्याचं काही खास कारण होतं का? हे मी दरडावून विचारात नाहीये, तर कुतूहल म्हणून विचारतोय. देवावर विश्वास नसतांना जर तुम्ही देवाचं जे काही करता त्यामुळे तुम्हाला वेळ फुकट गेल्यासारखं वाटत नाही का?

३.
>> ऑफिसातले म्हणतात देवाला साधा नमस्कार करत नाही तर गणपतीसाठी १० दिवस सुट्टी का घेतोस ?

मलाही हाच प्रश्न पडलाय. गणपतीची सुट्टी इतर कामासाठी वापरलीत तर सत्कारणी नाही का लागणार?

४.
>> मग उगाच कशाला मी त्याच्या भरोसे राहु ...

देवावर विश्वास ठेवणे म्हणजे जबाबदारी टाळणे नव्हे.

असो.

बराच खल केला तरी देव म्हणजे काय ते तुम्ही सांगितलं नाही.

>> देव म्हणजे तुम्हाला अभिप्रेत असलेलाच देव

देव म्हणजे काय अभिप्रेत आहे ते माझं मलाच माहीत नाही. म्हणून तर तुम्हाला विचारतोय.

आ.न.,
-गा.पै.

देव म्हणजे काय अभिप्रेत आहे ते माझं मलाच माहीत नाही. म्हणून तर तुम्हाला विचारतोय.

<<

माझा फोटो पाठवू का? Happy

शिवाजीमहाराजांना दर वेळेस भवानीमातेचा आशीर्वाद का घ्यावासा वाटला? त्यांचं नियोजन तर चोख होतं ना? >>>
हो पण मातेची भीती शत्रुंना नाही दाखवली..... स्वतःची दाखवली Happy

श्रद्धा नसेल तर देवळात जाण्याचं काही खास कारण होतं का? हे मी दरडावून विचारात नाहीये, तर कुतूहल म्हणून विचारतोय. देवावर विश्वास नसतांना जर तुम्ही देवाचं जे काही करता त्यामुळे तुम्हाला वेळ फुकट गेल्यासारखं वाटत नाही का>>>

सगळे निट वाचले असते तर तुम्हाला हा प्रश्नच पडला नसता.. परंतु हवे तेवढेच वाचुन स्वतःला सोइस्कर अर्थ लावुन वाचल्याने असले प्रश्न निर्माण होतात

मलाही हाच प्रश्न पडलाय. गणपतीची सुट्टी इतर कामासाठी वापरलीत तर सत्कारणी नाही का लागणार?>>>> मी तिथे काय करतोय कसा करतोय त्यामगची भावना काय आहे हे सगळे लिहिले आहे .. वाचुन अर्थ कळला असेल तर.... असो.. Wink

बराच खल केला तरी देव म्हणजे काय ते तुम्ही सांगितलं नाही.>>>>>>>>>>>>

चष्मा खरच लावा तुम्ही गामा.......या तुम्ही मुद्दामुन वेड घेउन पेडगाव ला जात आहेत...

ते काय आहे की काही लोक कर्मकांड वगैरे आले ना कि अश्या पळवाटा शोधत राहतात.. लक्षात आहे ते ..

देव म्हणजे काय अभिप्रेत आहे ते माझं मलाच माहीत नाही. म्हणून तर तुम्हाला विचारतोय.>>>>>>>

जी गोष्ट माहीत नाही मग तिच्या मागे आंधळ्यासारखे का जात आहात ? एकी कडे म्हणत आहे तुम्हाला देव म्हणजे काय अभिप्रेत आहे मग काय तुम्ही नुसती मुर्ती दिसली की पुजा करायला लागतात ? Uhoh

------------------------

मी लिहिलेल्या प्रतिसादाचा अभिप्रेत आणि रोख. बर्याच जणांना कळला आहे.. गामा... तुम्हाला कळला नाही असे कसे होईल का .. ? Biggrin

उदयन..,

तुमच्या वरील प्रतिसादावरून वाटतं की तुम्ही नास्तिक (= देव न मानणारे) आहात. तर तुमचा नास्तिकपणा गृहीत धरतो. मी आस्तिक (= देव मानणारा) आहे हेही स्पष्ट करतो. परंतु देव म्हणजे काय यावर आपलं एकमत नाही. तर या पार्श्वभूमीवर काही विधाने पाहूया.

१.
>> चष्मा खरच लावा तुम्ही गामा.......या तुम्ही मुद्दामुन वेड घेउन पेडगाव ला जात आहेत...

अस्तिकांसोबत चर्चा करतांना देव म्हणजे काय हे मला स्पष्ट करायची कधीच गरज भासली नाही. खरा देव तत्त्वरूपी आहे, असं पूर्वीच म्हंटलं होतं. निदान माझी तरी तशी श्रद्धा आहे.

अडचण येते ती नास्तिकांशी चर्चा करतांना. कारण नास्तिक देवाचं अस्तित्व मानत नाहीत. मग त्यांना तत्त्व वगैरे काय सांगणार. म्हणून नास्तिकाशी चर्चा करण्यासाठी देव म्हणजे काय हे नास्तिकालाच विचारलेलं उत्तम.

२.
>> जी गोष्ट माहीत नाही मग तिच्या मागे आंधळ्यासारखे का जात आहात ? एकी कडे म्हणत आहे तुम्हाला
>> देव म्हणजे काय अभिप्रेत आहे मग काय तुम्ही नुसती मुर्ती दिसली की पुजा करायला लागतात ?

नेमका हाच प्रश्न तुमच्या बाबतीतही उपस्थित होतो. ज्या गोष्टीचं अस्तित्व तुम्ही मानत नाही, तिच्यासाठी तुम्ही तुमचा अमूल्य वेळ खर्ची घालत आहात.

३.
>> ते काय आहे की काही लोक कर्मकांड वगैरे आले ना कि अश्या पळवाटा शोधत राहतात.. लक्षात आहे ते ..

तुम्हाला देव मानायचा नाहीये. पण अस्तित्वात असलाच तर लोच्या नको म्हणून 'मोठ्यांचं ऐकण्या'च्या नावाखाली तुम्ही देवाचं गुपचूपपणे करताहात. यालाच नास्तिकाचं कर्मकांड का म्हणू नये?

कसा वाटला माझा आरोप? कृपया हा आरोप वैयक्तिक रीत्या घेऊ नये. मी तुमच्यावर आरोप करू इच्छित नाही. पण तुम्ही वर्णिलेल्या परिस्थितीत एखादा आस्तिक एखाद्या नास्तिकावर असा आरोप करू शकतो.

एकतर देवाचं अस्तित्व मान्य करा अन्यथा 'मोठ्यांचं ऐकणं' बंद करा. जे कराल ते ठामपणेच करावं लागेल. त्याकरिता शुभेच्छा! Happy

आ.न.,
-गा.पै.

मी लिहीलेल इतरांना कळले ते तुम्हाला कळले नाही या तुम्ही कळून घेत नाही... मी सगळे मुद्दे स्पष्ट लिहीले आहे..
इतरांना याबद्दल विचारू शकतात

अडचण येते ती नास्तिकांशी चर्चा करतांना. कारण नास्तिक देवाचं अस्तित्व मानत नाहीत. मग त्यांना तत्त्व वगैरे काय सांगणार. म्हणून नास्तिकाशी चर्चा करण्यासाठी देव म्हणजे काय हे नास्तिकालाच विचारलेलं उत्तम
<<

देवाचं अस्तित्व मानत नाही म्हणून तत्वहीन कसे काय झाले ब्वा?

नास्तिक देवाचं अस्तित्व मानत नाही म्हंता, अन सोताले देव काय ते ठावं न्हाई म्हंता. मंजी तुमास्नी देव काय, आन नास्तिक काय दोगं बी ठावं हायती की!

आणखी, मला नास्तिलाले इचारला, देव म्हणजे काय? याला उत्तर म्हणून मी माझा फोटो पाठवू का विचारलो, तं पैलवान इग्गी मार्तंय मला Sad

अ:ओ! आता वो काय करायचं?

<<<<<
ह्यँ!
कस्चं कस्चं!!
अक्खी गीता वाचून त्या बेण्याच्या डोस्क्यात काय प्रकाश पडंना वो..
पल्डा हुता का?

मंग शेवटाला ते भगवंतांनी त्वांड उघाडलं पगा!
आन दाखिवलं इस्व रूप दर्सन.
ग्रह, तारे, हजारो सूर्य चंद्र तारे सगळेच फिराया लागले की अर्जुनाच्या ड्व्याल्यासमोर..

इत्कं आठरा अद्याय तत्व चिंत क्येलं, तरी अजाबात आइकित न्हव्तं बेणं. मं भगवंतांनी मस्तपैकी येक मुस्काटीत भडकावली..
चांदण्या चमक्ल्या अस्तीन ड्वाल्यासमोर. दिस्लं इस्वरूप...

त्येवा कुटं गांडीव धर्लं पार्थानं हाती आन सुरू झालं --->

म्हाऽभाऽरतऽ...
म्हाऽभाऽरतऽ..
म्हाऽभाऽरत!!!
>>>>>

नितिश भारद्वाज (जुन्या महाभारत सिरियल मधल्या)अर्जुनाच्या कानाखाली आवाज काढत आहेत आणि त्याने अर्जुनाला चंड्र तारे दिसत आहेत असे डोळ्यासमोर आले. हसून हसून डोळ्यातून पाणी आले.

बाकी माझी मते माझ्याकडे तुमची मते तुमच्याकडे. सध्या मी सामाजिक प्रबोधन करण्याच्या मूड मध्ये नाही त्यामुळे मी काही बोलत नाही. मग मी नास्तिक असेन की आस्तिक की दोन्ही दगडांवर पाय ठेवणारी. शिवाय मीच बरोबर तुम्ही चूक असे म्हणायला मला तरी काय अशा अनुभूती आल्यात. त्यामुळे तुमचे चालू द्या.

Pages