दिल्लीतील सत्तापालट म्हणजे एका नव्या युगाची सुरुवात?

Submitted by अभय आर्वीकर on 29 December, 2013 - 00:21

दिल्लीतील सत्तापालट म्हणजे एका नव्या युगाची सुरुवात?

       अपेक्षेप्रमाणे दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होऊन अरविंद केजरीवालांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडला. त्याचबरोबर विधानसभेच्या त्रिशंकू स्थितीमुळे दिल्लीत नव्याने निवडणुका होण्याची शक्यता काही काळापुरती का होईना पण संपल्याचे संकेत मिळत आहे. लोकशाहीच्या दृष्टीने हे चांगले संकेत मानायला हवे. बदलती राजकीय स्थिती आणि प्रादेशिक पक्षांचा वाढता प्रभाव यामुळे देशात वारंवार त्रिशंकू परिस्थिती निर्माण होणे आता यापुढे नित्याचेच ठरणार आहे. त्यावर वारंवार निवडणुका हा काही पर्याय असू शकत नाही. विभिन्न विचाराचे आणि प्रचंड राजकीय वैचारिक विरोधाभास असला तरी काही पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करणे, हाच यावर एकमेव इलाज आहे. अशा बिकट प्रसंगी जर अपरिहार्यतेने विरोधाभासी पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करत असेल तर याला संधीसाधूपणा म्हणता येणार नाही.

       केजरीवाल मुख्यमंत्री झाल्याने आता त्यांना जनतेला दिलेले महागाई व कांद्याचे भाव वगळता अन्य अभिवचन पूर्ण करणे फारसे कठीण नाही, कदाचित शंभर टक्के यश मिळणार नाही पण एक पारदर्शक आणि "लोकांनी लोकांसाठी चालविलेले लोकांचे राज्य" असे म्हणण्याइतपत चांगले सरकार ते नक्कीच देऊ शकतात. त्यामुळे लोकाभिमुख राज्यकारभाराचा एक अत्यंत चांगला पायंडा पडण्यास सुरुवात होण्याची नक्कीच शक्यता आहे.

       मला अरविंद केजरीवालांच्या वागण्याच्या पद्धतीत, बोलण्यातील ढबीत आणि पेहरावाच्या स्टाइलमध्ये एक "महात्मा" दिसत होता. ही त्यांची नौटंकी की निसर्गदत्त गुणविषेशता हे काळाच्या ओघात स्पष्ट होईलच. पण सध्यातरी माझा भ्रमनिरासच झाला आहे कारण सत्तेच्या माध्यमातून लोकनेता होणे आजवर कुणालाच शक्य झाले नाही. केजरीवालांना शक्य होईल, हेही शक्य वाटत नाही त्यामुळे आता ’महात्मा’ व ’युगपुरुष’ होण्याची त्यांनी संधी गमावलीच आहे. मात्र त्यांना चांगला ’राजकारणी’ होता आले तर ती भारतीय लोकशाहीला कलाटणी देण्याची लोकाभिमुख सुरुवात ठरेल.

       केजरीवाल उत्साही आहे, मेहनती आहे आणि विषय समजून घेण्यासाठी अभ्यास करण्याची प्रवृत्ती आहे. सोबत साधी राहणी आणि निर्धोकपणा या त्यांच्या जमेच्या बाजू आहे. देश घडवण्यासाठी लागणारी कळकळ आणि उद्दिष्ट गाठण्यासाठी परिणामास सामोरे जाण्याची तयारी आहे. मात्र त्यांचा धूर्तपणा यात सर्वात मोठा अडसर ठरेल असे मला वाटते. दिनांक १७/१२/२०१३ च्या फेसबुकवरील एका पोस्टमध्ये मी असे म्हटले होते की, "कोणाचा पाठिंबा घेणार नाही, कोणाला पाठिंबा देणार नाही" या डावपेचामागे भाजपाला सत्तेपासून अडवणे आणि विधानसभेच्या त्रिशंकू अवस्थेचे सर्व सूत्र संचलन आपल्या हातात घेणे, हा उद्देश केजरीवालांचा आहे, आणि नेमके तेच आज ते खरे झाले आहे. निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर

       ’आप’ला २८ जागा मिळाल्याने देशातील जनतेच्या आशा पालवल्या होत्या. अरविंद केजरीवालांच्या रूपाने एक प्रामाणिक नेता देशाला मिळाल्याची भावना व्यक्त व्हायला लागली होती. दिल्लीतून सुसाट निघालेला अश्वमेघाचा घोडा आता भारताच्या खेड्यापाड्यापर्यंत घोडदौड करून भारतीय राजकारणाला एक खंबीर आणि स्वच्छ पर्याय उपलब्ध करून देईल, अशी शक्यता निर्माण व्हायला लागली होती. मात्र त्रिशंकू विधानसभेतून सत्तेचा मार्ग शोधण्यात केजरीवालांनी धूर्तपणाच्या ज्या तिरक्या चाली खेळल्यात, त्या चाली आणि कॉग्रेस व भाजपाच्या मुत्सद्देगिरीच्या तुलनेत धूर्तपणाच्या होत्या, यात मुत्सद्देगिरी खचितच नव्हती. त्रिशंकू विधानसभेत "आप" निर्णायक स्थितीत असताना आणि सरकार स्थापनेचे भवितव्य ’आप’च्या हातात एकवटले असताना ’आप’ची ही भूमिका लोकशाहीला पोषक नव्हती. आपची ही भूमिका प्रामाणिकपणाची नव्हती तर भाजपला रोखून स्वतःचे सरकार स्थापन करण्यायोग्य वातावरण निर्मिती करण्यासाठी खेळलेली ’आप’मतलबी व धूर्तपणाची खेळी होती, असे माझे स्पष्ट मत आहे.

       निवडणुकांच्या निकालानंतर भाजप सर्वात जास्त जागा जिंकून दिल्ली विधानसभेत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेला होता. प्रचलित व्याख्येनुसार जनादेश भाजपला मिळालेला होता. भाजपने सरकार स्थापन करणे व इतर पक्षांनी त्यांना पाठिंबा देणे, हा सरळसोपा आणि प्रामाणिकपणाचा मार्ग होता. मात्र कॉग्रेसच्या मुत्सद्देगिरीने आणि केजरीवालांच्या धूर्तपणाने हा डाव उधळला गेला. याच कारणाने माझ्या नजरेत केजरीवालांचा प्रामाणिकपणा संशयाच्या भोवर्‍यात आला आहे. पण एवढ्याशा कारणाने त्यांच्या डोक्यावरील गांधीटोपीला गालबोट लागले, असे काही म्हणता येणार नाही. त्यांच्या डोक्यावर गांधीटोपी काँग्रेसवाल्यांच्या डोक्यावरील टोपीपेक्षा जास्त उठावून दिसते, हे सुद्धा तेवढेच खरे आहे.

       केजरीवालांना आणि भारतीय शोषित जनतेला अपेक्षित असलेले व्यवस्था परिवर्तन सत्ताप्राप्तीतून साध्य होण्याची शक्यता नाही. तरीही केजरीवाल सत्तेच्या मैदानात उतरले. आता सत्तेतूनही व्यवस्था परिवर्तन साध्य होऊ शकते हे सिद्ध करण्याची जबाबदारी केजरीवालांची आहे. नाहीतर भारतीय जनतेचा परिवर्तनवादी चळवळीवरीलच विश्वास डळमळीत होईल.

       सध्या देशात भ्रष्टाचारविरोधी वातावरण तापवण्यात केजरीवालांना आणि त्यांच्या आम आदमी पक्षाला आल्यामुळे देशासमोरील एकमेव समस्या म्हणजे भ्रष्टाचार असे चित्र निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. या गदारोळात शेतमालाच्या भावाचा प्रश्न पार मागे ढकलला गेला आहे. तरीपण सध्यातरी देशात केजरीवाल वगळता राष्ट्रीय पातळीवर दुसरा कोणताही अन्य आशेचा किरण उपलब्ध नाही, त्यामुळे परिवर्तनवादी घटकांनी अरविंद केजरीवालांना सक्रिय समर्थन देण्याची सक्त गरज निर्माण झाली आहे. ही ऐतिहासिक संधी आपण गमावता कामा नये.

       महाराष्ट्रात आम आदमी पक्ष, शेतकरी संघटना, विदर्भ संयुक्त कृती समिती, काही रिपब्लिकन पक्ष व आणखी काही संघटना एकत्र आल्यास राज्यात एक ताकदवान दबावगट निर्माण होऊन व्यवस्था-परिवर्तनाच्या दिशेने पाऊल टाकले जाऊ शकते, एवढी मला नक्कीच खात्री आहे.

                                                                                                                          - गंगाधर मुटे

-----------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाजपाने (आता) मुर्खपणा केला असं वाटतय. केजरीवाल धुर्त असतील तर उत्तमच. भाजपाला सरकार स्थापनेची संधी मिळाली होती, त्यांनी ती नाकारली. त्यानंतर केजरीवालांनी सरकार स्थापन करावे का ? {यात काँग्रेसने समर्थन दिले होते, केजरीवाल यांनी मागीतले नव्हते} यावर जनतेचे मत घेतले आणि सरकार स्थापन केले. आता काँग्रेसने त्यांना बाहेरुन समर्थन करावे की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. कारण हे सरकार {किंवा भाजपाने स्थापन केले असते तर तेही} समजा कोसळले, तर माझ्या माहितीनुसार पुढील निवडणुका होईपर्यंत काळजीवाहू सरकार म्हणुन केजरीवाल यांना संधी आहेच. यात ते प्रशासकीय निर्णय घेऊ शकत असावेत, फक्त ज्या निर्णयांना विधानसभेची मंजूरी लागते, ते निर्णय ते घेऊ शकणार नाही, असे एका वृत्तवाहिनीवर वाचले होते. (बहुदा आजतक?) त्यामुळे केजरीवाल यांना चांगली संधी आहे, तर भाजपा {त्यांनाही काहीतरी करुन दाखवावं लागलं असतं, म्हनुन} मागे हटले असावे तर काँग्रेस, भाजपा नको म्हणुन केजरीवाल यांना घाईघाईने पाठींबा दिला.
केजरीवाल किंवा त्यांचे साथीदार नुसतेच 'आम' आदमी नाही, तर हुशार लोकांचा गट आहे, आणि त्यांना राजकारणही कळते, हे भाजपा/ काँग्रेस विसरले. आता त्यांचा जळफळाट गडकरी किंवा इतर काँग्रेसी नेत्यांच्या स्टेटमेंटस मधुन दिसतोच आहे.
केजरीवाल आणि टिमला काहितरी करुन दाखवायचे आहे, म्हणुनच ते राजकारणात आलेले आहेत, त्यामुळे ते चांगलं काहीतरी करुन दाखवतीलच. त्याची चुणुक काल दिसलीच.
बाकी शेतमालाला भाव, हा दिल्ली राज्याचा प्रश्नच नाही. {तिथे फारसे पिकत नसल्याने}, त्यामुळे तो उगाच घुसडला असं दिसतय. असो.
केजरीवाल आणि टिमला शुभेच्छा.

गंगाधर,

तुम्ही केजरीवालांच्या नावाने का खडे फोडत होता ते समजत नाही. त्यांनी जो निर्णय घेतला तो योग्यच होता. समाजकारणात, राजकारणात - निदान भारतासारख्या खंडप्राय देशात - कुठलीही भूमिका कायम असू शकत नाही; हे सत्य आपल्याला ठाऊक आहे. 'मी कुणाला पाठिंबा देणार नाही; कुणाचा घेणार नाही' या वक्तव्याच्या वेळी आपच्या पहिल्या निवडणुकीचा निकाल जाहीर व्हायचा होता. नंतर परिस्थिती अशी निर्माण झाली की फेरनिवडणुका घ्यायची वेळ आली. जर आपने सरकार स्थापन केले नसते तर त्याचे खापर त्यांच्या डोक्यावर फोडण्यात आले असते.

मात्र काँग्रेस कडून समर्थन घेण्याआधी आप ने भ्रष्टाचाराच्या चालू किंवा संभाव्य प्रकरणामध्ये काँग्रेसची भूमिका मागून घेतली. पुढे सरकार पडले (९९टक्के शक्यता आहे) तर त्याची जबाबदारी आता काँग्रेस वरच राहील. जर सरकार स्थिर राहिले तर नक्कीच चांगले समाजकार्य होईल. कुठल्याही परिस्थितीत आपचे देशभरात समर्थन वाढेल आणि भारताचा इतिहास पूर्णतः बदलून जाईल याची मला आशा - नव्हे खात्री - वाटते.

शरद,

१०००% खर आहे तुमच म्हणण !

निवड्णुकीच्या निकालात दुसर्यानंबर वर असलेल्या आआप वर सरकार स्थापण्याची नैतिक जवाबदारी नव्हती. जी जवाबदारी होती ती बिजेपीची होती. जर बिजेपी सत्तेवर आली असती तर ते कोणाच्याही
मदती शिवाय ५ वर्षे राज्य करु शकले असते. जर त्यांना विश्वास मत मिळाल नसत आणि बिजेपीच राज्य पडल असत तर त्याच खापर काँग्रेसवर आणि आआपवर फोङता आल असत.

बिजेपीच्या ह्या संभ्रमाचा फायदा काँग्रेसने उचलला आणि आआपला कोंडीत पकडायचा प्रयत्न केला.

काँग्रेस ने आआपला मदत करण्याची अनेक कारणे आहेत पण त्यातील मुख्य कारण म्हणजे ह्या निवडणुकीत चारी मुंड्या चीत झालेली कॉग्रेसची प्रतीमा जन मानसात रुजण्या आधी बदलण्यासाठी
(म्हणजे चारसराज्यात सुपडा साफ झाला नाही, फक्त तीन राज्यात, दिल्लीत आम्ही सरकारला समर्थन करतो आहोत.) दिल्लीतील राजकारणात आपला पत्ता टाकणे गरजेच झाल. म्हणुन त्यांनी आआपला कोंडीत धरण्याच ठरवल.

देशातली माध्यमं ज्याचे गोडवे गातात त्याच्यापासून गोरगरिबांनी सावध रहावे.
देशातली माध्यमे ज्याच्या नावाने खडे फोडतात, अनुल्लेख करतात, त्याला खुशाल डोक्यावर घ्यावे.

भ्रमनिरासांची सवय झालेल्या जनतेने एक नवे स्वप्न पाहण्याची धिटाई केली आहे.

>>त्यामुळे परिवर्तनवादी घटकांनी अरविंद केजरीवालांना सक्रिय समर्थन देण्याची सक्त गरज निर्माण झाली आहे. ही ऐतिहासिक संधी आपण गमावता कामा नये >> बरोबर मुटेजी .
>>.कुठल्याही परिस्थितीत आपचे देशभरात समर्थन वाढेल आणि भारताचा इतिहास पूर्णतः बदलून जाईल याची मला आशा - नव्हे खात्री - वाटते >>
शरद यांच्या या आशावादाशी भीत भीत सहमत.
>>.केजरीवाल किंवा त्यांचे साथीदार नुसतेच 'आम' आदमी नाही, तर हुशार लोकांचा गट आहे >>
होय विजय देशमुख , ही हुशारी देशाचे ढासळलेले वर्तमान सुधारण्याच्या कामी येवो !

भारती..
होय विदिपा, ही हुशारी देशाचे ढासळलेले वर्तमान सुधारण्याच्या कामी येवो ! >>>>>> विदिपा ? Happy
बाकी तुमच्या मताशी सहमत.

हिंदू महासभेतून आरएसएस निर्माण झाली. तिच्यातून जनसंघ आणि मग भाजप. हिंदू महासभा ही काँग्रेसचं अपत्य. असं रक्ताचं नातं असताना दोघांनी परस्परविरोधी पण पूरक भूमिका घेत देशाचं राजकारण स्वतःच्या हाती ठेवलं. राज्याराज्यातील परिस्थितीनुसार स्थानिक सत्ता कधी कठपुतळ्यांकडे सोपवली गेली तर शक्य तिथे स्वतःकडे ठेवण्याचं धोरण धुरिणांनी राखलं. ज्या घटकांनी काँग्रेसला पाठिंबा दिला त्या टाटा, बिर्ला, बजाज, मेहता आदिंचाच विकास झाला. सर्वंकष विकास हे कधीच त्यांचं लक्ष नसावं हे आता इथपर्यंतच्या वाटचालीवरून स्पष्ट झालेलं आहे.

या असंतोषातून प्रादेशिक पक्ष आणि प्रादेशिक नेतृत्व निर्माण झाले. आपल्याला सत्तेत सहभाग नाही ही भावना बळावू लागली. या भावनेतून या दोन्ही पक्षांना नाकारण्यात आलं, ज्यातून अस्थिरता निर्माण झाली. ही कोंडी फ्डण्यासाठी मूळ दुखण्यावर इलाज न करता, अन्याय झाल्याच्या भावनेवरून इतरत्र लक्ष वेधण्यासाठी अनेक नॉन इश्युज सातत्याने कुरवाळले गेले. धार्मिक भावनांना खतपाणी घालून विद्वेषाचं राजकारणही खेळलं गेलं. त्यातून सामाजिक ध्रुवीकरण करून द्विपक्षीय लोकशाहीची स्वप्ने पाहिली गेली. पण अस्थिरता कायमच राहील्याने आणि आता धार्मिक विद्वेषाचं कार्ड बोथट झाल्याने भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आणला गेला.

अण्णांचं आंदोलन हा केजरीवालांना प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न होता. ज्यात काँग्रेसला तिलांजली देणे आणि तिस-या पर्यायाच्या मतांची फाटाफूट करणे असे हेतू होते. या आंदोलनाच्या वेळी सोशल मेडीयातले त्याचे सपोर्टस आणि आताचे मोदी सपोर्टर्स एकच असावेत हा योगायोग नाही. एक शरीर पण चेहरे दोन असा हा प्रकार आहे. केजरीवाल आले तरी आनंद आणि मोदी आले तरी आनंद असा हा प्रकार आहे.

आता भाजप काँग्रेसच्या मार्गाने जाण्याची शक्यता आहे तर केजरीवालांचा पक्ष तत्वाची भूमिका घेत त्यांच्याशी लुटूपुटीची लढाई लढत राहील. मुंबईतले एक मराठी नेते आणि बारामतीचा पहिलवान यांच्यातलं रंगलेलं युद्ध लोकांच्या लक्षात असेल. त्यावरून लोक एकमेकांची डोकी फोडायचे. पण हे नेते मात्र रात्री एकमेकांच्या घरी जेवायला असत. तसाच हा प्रकार आहे.

या निमित्ताने भ्रष्टाचार संपला तर सर्वांना ते हवंच आहे. भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करताना ती सर्वसमावेशक असल्यास आपला आणखी यश मिळेल. सामान्यांना चॉईस नसल्याने आहे त्यातून निवडायचे झाल्यस ते आपला जवळ करतील. त्यानिमित्ताने काही वर्षे तरी प्रादेशिक नेते आणि पक्ष साईडिंगला पडतील असं वाटतंय.

महाराष्ट्रात जर आपला यश मिळालं तर त्याचा सर्वात मोठा फटका शिवसेना, मनसे आणि काँग्रेसला बसेल. ही नव्या युगाची सुरूवात आहे कि नाही हे दहा वर्षांनी सांगता येईल. भ्रष्टाचाराविरुद्ध चाललेलं आंदोलन आणि त्यातून सत्तेत आल्याचे दावे त्यावेळी तपासून पाहता येईल. संधी तर द्यावीच लागते.

आत्ता या क्षणी अंदाज वर्तवणं हे चुकीचं आहे.

दिल्लीतील जनतेने या अपेक्षेनेच हा कौल दिला आहे. हा प्रयोग जर यशस्वी झाला तर देशभरात त्याचे पडसाद उमटतीलच. पण एवढ्या संख्येत समविचारी माणसे मिळवणे आणि त्यांना एकत्र ठेवणे यातच त्यांची कसोटी आहे, आपण त्यांना शुभेच्छा देऊ.

समविचारी माणसे मिळणे, टिकणे कठिण नाही, दिनेश. मला काळजी आहे, की इतर पक्षातले नाराज आणि हौसे, नवसे, गौशे (चुभुद्याघ्या), यांना पक्षात घेतले तरी केवळ निवडुन येतील हा निकष लावुन त्यांना तिकिट देणे अयोग्य होईल.
काल समाजवादीचे कोणी आप मध्ये येणार असं वाचलं. या माणसाने यासीन भटकळबद्दल काय म्हटले होते, ते वाचुन वाईट वाटले, की असे लोकं आप मध्ये येणार ?
अर्थात, पार्टी वाढवायची असेल तर आपवाले ह्या चुका टाळतील, अशी अपेक्षा आहे.

फार पूर्वी राज ठाकरेंकडुनही काही अपेक्षा होत्या, पण नाशिकमध्ये त्यांनी काय केले, हा संशोधनाचा विषय आहे. Sad

पण एवढ्या संख्येत समविचारी माणसे मिळवणे आणि त्यांना एकत्र ठेवणे यातच त्यांची कसोटी आहे, आपण त्यांना शुभेच्छा देऊ.>>> सहमत. हे खरे चॅलेंज आहे. एकदम संघटनाविस्तार करायला गेले तर अनेक भंकस - इतर पक्षांतील असंतुष्ट लोक आप मधे येतील आणि काही दिवसांनी इतर पक्ष व हे यात फरक कळणार नाही.

संघटन कौशल्य व राजकारण ही दोन्ही कौशल्ये यांची किती आहेत ते येत्या काही दिवसांत दिसेल.

पुढच्या काही दिवसांत दोन प्रकारच्या बातम्या मीडियात खूप येतीलः
१. "कसे स्वच्छ लोक आहेत": सरकारी सुविधा न वापरणे, इतर पक्षांचे लोक करतात तसा खर्च हे लोक न करणे याची उदाहरणे. गप्पांमधेही "आमचा तो ह्याचा तो दिल्लीत नोकरीला आहे ना, त्यांना असे आदेश आले आहेत की..." छाप ठोकून देणारे लोक सहज सापडतील Happy
२. "कसे भोंदू लोक आहेत": केजरीवाल किंवा इतर कोणीतरी कोणत्या व्यावसायिकाशी कसे संबंधित आहेत, कोठे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे याच्या बातम्या. "ते ही तसलेच. नुसताच दिखावा आहे. अहो त्यांचा पैसा सगळ्या <> यांच्याकडून येतो" असे सर्वज्ञानीही भेटतील Happy

@फारएन्ड- सहमत.

@शरद- कुठल्याही परिस्थितीत आपचे देशभरात समर्थन वाढेल आणि भारताचा इतिहास पूर्णतः बदलून जाईल याची मला आशा - नव्हे खात्री - वाटते.

भारताचा इतिहास कसा बदलेल? Uhoh भविष्य बदलेल फार तर !

भारताचा इतिहास कसा बदलेल? >>>>> ओ ज्ञानेश... भारताचा इतिहास देखील काही लोक बदलतात.. विसरलात का ? Wink

मग ते जर बदलु शकतात तर केजरीवाल का नाही Happy

एक अज्ञानी म्हणून प्रश्न विचारतो.

एका महत्वाच्या कार्यक्रमाचं प्रक्षेपण करणार का म्हणून विचारणा केली होती. तेव्हां एका अतिफुटकळ वाहीनीने पण प्रक्षेपण करू पण तासाचे सहा लाख रूपये आणि जाहीरातींचा बंदोबस्त करा असं ठणकावून सांगितलं होतं. मग राष्ट्रीय वाहीन्यांनी वीस वीस दिवस एकही जाहीरात न घेता , इतर सर्व कार्यक्रम, बातम्या न दाखवता लाईव्ह प्रक्षेपण करायचे किती पैसे झाले असते ?

इथं लोकांना एक संघटना बांधताना उभा जन्म जातोय....

@अनिवासी पिशाच्च-
मी एक अज्ञानी म्हणून प्रश्न विचारतो. तुमच्या आधीच्या प्रतिसादातले पहिले वाक्य-
हिंदू महासभेतून आरएसएस निर्माण झाली. याबद्दल अधिक माहिती देऊन आम्हाला उपकृत कराल काय?

एका महत्वाच्या कार्यक्रमाचं प्रक्षेपण करणार का म्हणून विचारणा केली होती. तेव्हां एका अतिफुटकळ वाहीनीने पण प्रक्षेपण करू पण तासाचे सहा लाख रूपये आणि जाहीरातींचा बंदोबस्त करा असं ठणकावून सांगितलं होतं. मग राष्ट्रीय वाहीन्यांनी वीस वीस दिवस एकही जाहीरात न घेता , इतर सर्व कार्यक्रम, बातम्या न दाखवता लाईव्ह प्रक्षेपण करायचे किती पैसे झाले असते ? >>>>>>>>>>>>>

जिथे सरकारविरोधी काहितरी असते, तिथे लोकं बघणार हे गृहित धरल्या जात असावे, त्यासाठीच्या जाहीराती आपोआपच मिळतिल असा हिशोब असावा.
बाकी मिडीया मॅनेजमेंट म्हणजे काय, याची उत्सुकता आहेच. आणि आता तर गुगल-हँगआऊटने काम सोपं केलय. Happy

कुमार सप्तर्षी मायबोली वर वावरत आहेत का??

धागा कोणताही असो हिंदू, आरएसएस, सावरकर, शिवसेना या पैकी एखादा शब्द वापरल्याशिवाय कोणताही प्रतिसाद पूर्ण होत नाही.

मुद्दा पटवून देण्यासाठी याची खरच गरज लागते.

@ ज्ञानेश
कुठली माहीती हवी ?
प्रश्नाचं कारण असं कि मनूचा मासा हे पुस्तक मिळवून वाचल्यास त्यात याबद्दल सुरुवातीलाच एक प्रकरण आहे.
तुमच्या प्रश्नातून
- अ) तुम्हाला हिंदू महासभेबद्दल काहीच माहीती नाही
- ब) तुम्हाला सर्व काही माहीत आहे आणि सहमत नाही
अशा दोन शक्यता उद्भवतात. अ कि ब हे कळवावे, टंकनाचे कष्ट कमी होतील.

तुम्हाला संपूर्ण माहीती असावी असं गृहीत धरल्यास एक प्रश्न आहे. संघाच्या स्थापनेच्या वेळी डॉ हेडगेवार यांच्याबरोबर कोण कोण होते ? त्यांचे कुठल्या संघटनेशी संबंध होते ?

त्यातल्या त्यात जवळ जाणारी माहीती खालील लिंकवर आहे. थेट माहीती रमेश महाले लिखीत मनूचा मासा मधे आहेच, शिवाय अन्य काही जुन्या पुस्तकात आहे.

http://books.google.co.in/books?id=RpaEt8npT0sC&pg=PA138&lpg=PA138&dq=fo...

समाधान न झाल्यास कळवावे.

खोटारडेपणाचा अजेंडा केव्हाही वाईटच. तुमचा तोच दिसतो आहे. (मान्य केलंत ते बरं झाल Proud ) असो. चालुद्या. कलियुग आहे शेवटी. Happy

लेखकु
तुम्ही आणि खोटारडेपणा हे समानार्थी शब्द आहेत. तुम्हाला जे दडवायचं आहे ते माहीती बाहेर यायला लागली कि तुमचे असे आरोप सुरू होतात. त्यात नवीन काही नाही.
मान्य करण्याचा प्रश्न नाही, मी तुम्हाला उद्धटासारखा विचारतोय याची कृपया नोंद घ्यावी.

अरुणा रॉय यांनी सांगितलं होतं कि भूषण पिता पुत्र, स्वतः केजरीवाल यांचं आरएसएसशी नातं आहे. केजरीवालांनी आव्हान दिल्यावर अरुणा रॉय यांच्या निकटवर्तियांपैकी कुणीतरी लेखच लिहून केजरीवाल यांचे पिता आणि काका दोघेही संघाचे पदाधिकारी असल्याचं जाहीर केलं होतं.

आउटलुक ला दिलेल्या मुलाखतीत त्याला केजरीवालांनी दिलेलं उत्तर तितकं समाधानकारक नव्हतं. लेखकु सुद्धा त्या वेळी अण्णांच्ञा आंदोलनाचे ईमेल्स फिरवत होतेच कि...

चुकून पाठवले गेले ईमेलवर.

मी तुम्हाला उद्धटासारखा विचारतोय याची कृपया नोंद घ्यावी.>>
एकदा कोण ते समजल्यावर तुमच्याकडून आणखी अपेक्षाच नाहीत वेगळ्या Wink

हेमाशेपो.

Pages